भारतरत्न (?) विराट कोहली (??)

लेखक: साळसकर काथ्याकूट
मास्टरब्लास्टर सचिनला भारतरत्न दिले गेले तेव्हा सर्वाधिक आनंद होणार्‍यांच्या यादीत मी वरचे नाव राखून होतो. मराठी आणि मुंबईकर या सामाईक फॅक्टरबरोबरच तेंडुलकर आणि साळसकर यावरूनही एक आपलेपणाचा अभिमान होताच. त्या भारतरत्नाच्या मागे राजकारण शोधणार्‍यांनाही चार खडे बोल सुनावून झाले, काय करणार त्यावेळी भावनाच तश्या होत्या. ज्याने गेले वीस-पंचवीस वर्षे एक वेड लावणारा खेळ बघायचा छंद जडवला त्याच्या एक्झिटलाच हे दिले गेले होते. पुढे त्याच्यानंतरही क्रिकेट चालू राहिले, जे राहणारच होते. पण त्यामुळे ना त्याला कोणी विसरले ना विसरू शकणार. भारतरत्नाची हवा मात्र ओसरली, त्यावरचे वाद थंडावले. मध्यंतरी पुन्हा एकदा वॉस्सअपवर एक मेसेज आला. सचिनला भारतरत्न देणे हि सत्ताधार्‍यांची चाल होती हे दाखवून द्यायला म्हणून कोणीतरी नेहमीसारखेच हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्याशी त्याची तुलना केली होती. मोठा आणि सविस्तर मेसेज होता, ध्यानचंद यांच्याबद्दल चार गोष्टी ज्या या आधी माहीत नव्हत्या त्याही त्यातून समजल्या. साहजिकच अभिमान सुद्धा वाटला. ध्यानचंद यांनाही भारतरत्न दिले पाहिजे होते असे वाटून गेले, मात्र सचिनला डावलून नाही तर सचिनबरोबरच... असो, ते वाटणे तितक्यापुरतेच राहिले. पण हल्ली मात्र क्रिकेटच्या जगतात एक नवीन युवा खेळाडू उगवला आहे. विराट कोहली. तसा केव्हाचाच उगवला आहे आणि सचिनबरोबर त्याची तुलना सुरू होऊनही फार काळ लोटला आहे. पण आपल्या कामगिरीत सातत्य राखत त्याने ते यश क्षणभराचे नसून तोच आपला क्लास आहे हे आता देशोविदेशांच्या खेळपट्ट्यांवर आणि गोलंदाजांना खेळून सिद्ध केले आहे. सचिनच्या विकेटला जी किंमत प्रतिस्पर्धी संघ आणि भारतीय क्रिकेटप्रेमी द्यायचा तीच आता विराटच्या विकेटलाही देऊ लागला आहे. मागच्याच सामन्यात त्याने आपले एकदिवसीयमधील एकोणीसावे शतक झळकावले. जिथे इतर चाचपडत असतात तिथे हा पट्ठ्या येऊन गली क्रिकेट खेळत असल्यासारखे धावा जमवायला सुरुवात करतो, हे एकदोनदा नाही तर नेहमीच होते आणि इथेच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. क्रिकेट हा टेंपरामेंटचा खेळ आहे, दडपणाखाली कोण कसा खेळते याला जास्त महत्व आहे, इथे तुमचे चांगले खेळणे नाही तर मॅचविनर असणे जास्त मॅटर करते वगैरे वगैरे निकषांवर तर तो इतरांच्या आणखी पुढे जाऊन बसतो. त्याची धावांची भूक आणि ते मिळवण्याचा वेग पाहता सचिनचे विक्रम मोडणारा तो एकच आहे आणि तो ते मोडणारच हे सांगायला तुम्हाला नवज्योतसिंग सिद्धू असण्याची गरज नाही. इतकेच नाही तर त्याचा आक्रमक स्वभाव आणि अ‍ॅटीट्यूड पाहता येत्या काळात तो आणखी एका बाबतीत सरस होऊ शकतो जे खुद्द क्रिकेटच्या देवालाही नाही जमले आणि ते म्हणजे एक यशस्वी कर्णधार .. तर सहज याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न पडला, आणखी दहा-पंधरा वीस वर्षांनी जेव्हा विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील एक नवा विक्रमादित्य बनून, एक आणखी उंचावरचे शिखर गाठून निवृत्त होत असेल वा झाला असेल, तेव्हा त्यालाही भारतरत्न पुरस्काराने गौरवताना बघण्याचे भाग्य याची देही याची डोळा आपल्या नशिबी येईल का... आणि जर विराट कोहलीसारख्यालाही (इथे मी ‘कोहलीसारख्यालाही’ असे का म्हणालो यावर कोणाला संदेह वा कुठल्याही प्रकारचे मतभेद असू नयेत) तर विराट कोहलीसारख्यालाही जर त्याच्या खेळाच्या कामगिरीवरून भारतरत्न दिले जाणार असेल तर भारतरत्नाचे निकष पुन्हा पडताळून पाहायची गरज नाही वाटत... खेळाच्या मैदानात, क्रिकेट - रिपोर्टींग अंड्या साळसकर

मुक्त विहारि यांनी 28/02/2014 - 23:45 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

इतर पण काही गोष्टीं साठी असावे. १. जास्तीत जास्त दल बदलू. २. जास्तीत जास्त आश्वासने ३. जास्तीत जास्त दंगली (ह्यात दंगलीस कारणीभुत जर अल्पसंख्यांक असेल तर फार उत्तम...जसे गोध्रा दंगल किंवा मुझफ्फर नगर दंगल...) ४. जो स्विस बँकेत जातीत जास्त पैसा ठेवेल..... ५. जो फूटपाथवर झोपलेल्या माणसांना गाडीने उडवेल. ६. जो एके टाईप बंदूक घरांत ठेवेल ७. सर्वात महत्वाचे म्हणजे जो, जास्तीत जास्त इमारती बांधेल.(भले मग ती पाकीस्थानस्थितीत एखाद्या भारतीयाची का असेना?) ८. जो स्वतःच्या धर्मातील स्त्री , बायको म्हणून न निवडता दुसर्‍या धर्मातील स्त्री बायको म्हणून निवडेल आणि तिला घटस्फोट देवून परत दुसर्‍या धर्मातील स्त्री बायको मणून निवडेल. झालेच तर गेला बाजार, विजय मल्ल्या,शारुख खान,नीता अंबानी ह्या सारख्या मान्यवर व्यक्तींना द्यावे.

पिवळा डांबिस यांनी 28/02/2014 - 23:56 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आणखी दहा-पंधरा वीस वर्षांनी जेव्हा विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील एक नवा विक्रमादित्य बनून, एक आणखी उंचावरचे शिखर गाठून निवृत्त होत असेल वा झाला असेल, तेव्हा त्यालाही भारतरत्न पुरस्काराने गौरवताना बघण्याचे भाग्य याची देही याची डोळा आपल्या नशिबी येईल का...
पंधरा-वीस वर्षांनी द्यायचंय ना? मग तेंव्हा चर्चा करू की, आतापासून कशाला... आणि चर्चा करू म्हणजे तुम्ही करा, कारण आम्ही तोपर्यंत 'मुक्काम पोस्टः देवाचे गोठणे'!!!! :)

पिवळा डांबिस यांनी 28/02/2014 - 23:58 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by पिवळा डांबिस

Permalink

तेंडुलकर आणि साळसकर यावरूनही एक आपलेपणाचा अभिमान होताच.
आपलेपणा म्हणून वरील प्रतिसाद दिला हो, रागावू नका.. पिवळा डांबिस प्रभू-साळगांवकर