Skip to main content

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

लेखक माहितगार यांनी शनिवार, 18/01/2014 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा काढली गेली त्याला दिडशेहून अधिक वर्षे होऊन गेली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषतुलना हे पहिल स्त्रीवादी ग्रंथ लेखन इ.स. १८८२ साली करून सव्वाशेहुन अधिक वर्ष लोटून गेली.अद्याप महाराष्ट्राला स्त्री मुख्यंमंत्री मिळालेल्या नाहीत हाही भाग सोडून द्या सध्याच्या मंत्रिमंडळात ४० पैकी केवळ दोन महिला मंत्री आहेत आणि त्यांच्या कडे दिलेली खाती आहेत महिला व बालविकास आणि कुटूंब कल्याण. भारताला पहिल्या स्त्री राष्ट्रपती उपलब्ध करणार्‍र्‍या महाष्ट्रास महसूल अर्थ गृह सहकार मुख्यंमंत्री अशा खाती चालवण्यास सक्षम स्त्री राजकारणी का पुढे येऊ शकल्या नसाव्यात ? मुंबई दूर असेल तर सहकार चळवळ (साखर कारखाने) गावाच्या जवळच असते सध्याची सहकार चळवळीतील महिलांच्या सहभागाची स्थिती काय आहे ? महाराष्ट्रात विद्यापीठात किती महिला कुलगुरू होऊन गेल्या आणि सध्या किती आहेत याची आकडेवारी हवी आहे. उद्देश महाराष्ट्रीय राजकारणातील स्त्रीयांच्या सहभागाची चर्चा करण्याचा नाही. उद्देश इ.स. १८८२ ते आता पर्यंत महाराष्ट्राने बरेच स्त्रीवादी विचारवंत दिले परंतु महाराष्ट्रातील स्त्रीवाद अजूनही अभिजन वर्गा पर्यंत मर्यादीत आहे का की बहुजन समाजा पर्यंत पोहोचतो आहे ? बहुजन समाजा पर्यंत पोहोचत असेल तर त्याच प्रभावी प्रतिबिंब आजच्या इ.स.२००० ते २०१४ या काळातील समाज आणि राजकारणातल्या सहभागातून पुरेस दिसत का ? सद्य स्थिती आणि आव्हाने कोणती ? गेल्या १३ वर्षात ज्या बहुजन सामाजीक वैचारीक चळवळी आहेत त्यातील वैचारीक दृष्टीकोण स्त्री वादाच्या परिपेक्षातून कसे आहेत अथवा होते या परिपेक्षात स्त्रीवादाची स्त्रीचळवळींची सद्य स्थिती काय आणि आव्हाने कोणती ? आज नवीन इलेक्ट्रॉनीक माध्यमे आणि इंटरनेटची माध्यमे मराठी संकेतस्थळे मराठी अनुदिनी मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चा धागे या संदर्भाने बहुजन मराठी स्त्रीयांचा सहभाग स्त्रीवादाच्या परिपेक्षातून कुठे आहे.मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चातून स्त्रीवादी दृष्टीकोण गेल्या १३ वर्षात व्यवस्थित पणे मांडला जातो आहे का सद्य स्थिती काय आहे आणि स्त्रीवादी विचारांसमोरील या नवीन क्षेत्रातील आव्हाने कोणती इ.स. २००० ते २०१३ बहुजन आणि एकुण स्त्रीवादी साहीत्य आणि चळवळीचा आढावाही या चर्चेतून घेऊन हवा आहे. या चर्चा धागा चालू करताना याची कल्पना देण्यास आवडेल कि मराठी विकिपीडिया चळवळीच्या कार्यात तसेच मराठी विकिपीडियावरील स्त्री अभ्यास आणि स्त्रीवाद या विषयावरील लेखनात पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील अभ्यासकांनी वेळोवेळी सहभाग नोंदवला आहे. काळाच्या ओघात नेहमी प्रमाणे ह्या चर्चा धाग्यातील ज्ञानकोशास सुयोग्य भाग मराठी विकिपीडियावरील संबंधीत लेखांमध्ये घेतला जाऊ शकतो म्हणून या चर्चेतील आपला स्वतःचा सहभाग कॉपीराईट फ्री होत आहे असे गृहीत धरले जाईल. चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.

वाचने 72090
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

बहुजन समाजाला अभिजनांना अभिप्रेत असलेला आणि अभिजनांमधे कमालिचा लोकप्रिय असलेला (मीभाजीकरतेतुपोळ्ञाकरकिंवावाईसवर्साकिंवामीस्वयंपाककेलातुभांडीघासछाप )स्त्रीवाद आवश्यक आहे का याबाबत संभ्रम आहे. एकंदर युरोपामिरेकेत असलेला स्त्रीवाद भारतात रुजणार नाही हे नक्की. बाकी काही करता येत नाही अथवा होत नाही म्हणून स्त्रीवादी झालेल्या विचारवंतांचे विचार रोचक असतील आणि ह्या धाग्यावर त्यांचे प्रतिपादन करमणूक करेल हे नक्की.

चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम चर्चा होऊ शकते. पण्..पण..पण.. मुळ मुद्दा न भरकटता तो ह्याच प्रस्तावावर रहावा आणि परत एकदा "स्त्री वि. पुरुष" असा "नेहमीचाच यशस्वी" मुद्दा येऊ नये ही इच्छा.. बाकी मुळ प्रस्तावावर सविस्तर प्रतिसाद सविस्तर विचार करुन देईन.. धन्यवाद

In reply to by पिलीयन रायडर

स्त्री पुरुष वाद न आणता पिराबैनी केलेली सविस्तर चर्चा वाचण्यास उत्सुक आहे. लवकर येउ द्या :)

In reply to by पिलीयन रायडर

जुनी खोड नि जुनी खोडं! काय करता? ;) तुमच्या तरुण रक्ताकडून तरी भांडणाव्यतिरिक्त वेगळ्या अपेक्षा होत्या. हा हन्त हन्त! धागा काय, प्रतिसाद काय, तू तरी मुद्दा धरुन आहेस काय गं झाशीची राणी? आँ?

In reply to by पिलीयन रायडर

झालं! पण अभ्या ढ आहे. त्याला सांगून कळत नाही. तू हुशार आहेस ना? (अभ्या, गप्प बस. मला तोंडघशी पाडू नको आधीच्च सांगायलोय ;) )

In reply to by प्यारे१

इतका "विंटरेस्टिंग" (सं)वाद मध्येच तोडला मह्णून समस्तांचा सौम्य णिषेद ! बाकी या धाग्यातील विषयात आम्हाला एवढेसेच कळत असल्याने आमचा एवढासाच प्रतिसाद ! कृपया (सं)वाद चालू ठेवावा ही विणंती !

मा.र.कुटे: ...एकंदर युरोपामिरेकेत असलेला स्त्रीवाद भारतात रुजणार नाही हे नक्की. सहमत. आवश्यक आहे देश काळ सापेक्ष स्त्री पुरुष संवाद.

स्त्री अभ्यास अभ्यासकांनी दिलेली स्त्री अभ्यासाची व्याख्या (भागवत, विद्युत २००९) खालील प्रमाणे : स्त्री अभ्यास ही एक नव्याने घडत असलेली, आंतरशाखीय स्वरूपाचा आशय विकसित करू पाहणारी अशी ज्ञान शाखा आहे. स्त्री अभ्यास हे आंतर विद्याशाखीय विद्यापीठीय क्षेत्र आहे ज्यात स्त्री-वादी दृष्टीकोनातून समाजाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक इतिहासाचा बहुसांस्कृतिक अभ्यास केला जातो' आणि ज्यात लिंगभाव, वर्ण, वर्ग, जात, लैंगिकता आणि इतर सामाजिक विषमतांची स्त्रीवादी चिकित्सा केली जाते. अगदी सुरवातीच्या काळापासून भारतीय स्त्रीवादाची आखणी करताना भारतीय संस्कृती लक्षात घेतली गेली होती असे दिसते . भारतीय_स्त्रीवाद या लेखाच मराठी विकिपीडियावर अद्याप व्यवस्थीत लेखन झालेल नाही पण इंग्रजी विकिपीडियावर Feminism_in_India हा दुवा अभ्यासता येऊ शकेल.

Feminism is a collection of movements and ideologies aimed at defining, establishing, and defending equal political, economic, and social rights for women.[1][2] This includes seeking to establish equal opportunities for women in education and employment. A feminist advocates or supports the rights and equality of women.[3] -इंग्लिश विकिपीडियावरील व्याख्या

म्हणजे निदान मला तरी संभ्रमित पाडणारा प्रकार वाटतो. समाजशास्त्रातुन एमए करत असताना ज्या मुली स्त्रीवादी होत्या त्या बहुतेक आर्थिक दृष्ट्या उच्चभ्रु वर्गातील होत्या. बाहेरील सर्वसामान्य स्त्रीबद्दल तर सोडाच पण वर्गातल्या साधारण मुलिंबद्दलदेखिल त्यांना फारशी कणव होती असे वाटले नाही. यात कुठेतरी मी जनरलायझेशन करतो आहे असे वाटण्याची शक्यता आहे. किंवा एका विशिष्ठ वर्गाबद्दल मला आकस आहे असा देखिल समज होण्याची शक्यता आहे. पण तसे काहीही नाही. तुम्ही शैक्षणिक वर्तुळामध्ये पाहाल तर बरेचदा फेमिनीझम आणि डायसपोरा या दोन विषयांकडे हैक्लास मुलिंची गर्दी आढळेल. या विषयांमधले साहित्य हे समजण्यास तसे सोपे नसते. जुडीथ बटलर प्रभुतिंचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाला असणारे बहुतेक विचारवंत हे पाश्चात्य असतात. आपल्या भारतीय स्त्रीयांनी केलेल्या कामाचा फारसा उल्लेख नसतो असे मला वाटते. मी स्वतः हा विषय घेतला नव्हता मात्र इतर वेळी यावर धुमशान चर्चा चालत असत. त्यावेळी आपल्याकडील नावं फारशी ऐकु येत नसत. ब्लॅक स्त्रीयांच्या समस्या आणि त्यांच्याशी निगडीत पुस्तकांची खडानखडा माहिती असलेल्यांना दलित स्त्रीबद्दल फारशी माहिती नसे आणि खरं सांगायचं तर त्यांना त्यात रस देखिल नसावा असं देखिल वाटतं.. एवढं पुरे. या विषयावर बोलताना माझी लेखणी खुप कडवट होते.

In reply to by Atul Thakur

असेच आमचेही निरीक्षण आहे. पुरुषी व्यवस्थेला विरोध हे स्त्रीवादाचे यूएसपी होते, आहे आणि राहील. पण या भानगडीत एक वर्गवाद शिरला आहे. कारण या चळवळीत उच्च सामाजिक स्तरावरील स्त्रियांचाच प्रामुख्याने सहभाग राहिलेला आहे, जे की ओब्व्हियस आहे. कारण जागृती इ.इ. शक्यतोवर उच्च वर्गातच होऊन ट्रिकल डाऊन होते. बरेचसे रिफॉर्मर हे उच्च वर्गात जन्माला आलेले होते. पण कष्टकरी वर्गाचे प्रश्न बर्‍याचदा वेगळे असतात. ते विशिष्ट चौकटीत वाढलेल्यांना कळणे अशक्य आहे. त्यासाठी त्या समाजभागाचा अभ्यास पाहिजे. स्त्रीवाद्यांचा बर्‍याचदा क्लेम असतो, की आधी स्त्रीला घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. पण हे वाक्य तथाकथित उच्च वर्गातल्या स्त्रियांबद्दलच खरे होते. बाकी बर्‍याच जातींमधील स्त्रिया कामासाठी बाहेर जातच होत्या. ब्राह्मण किंवा अन्य काही जातीतल्या स्त्रिया बाहेर पडल्या तेव्हा त्यांचे कौतुक झाले- जे ठीक आहे, पण समाजातील लै मोठ्या वर्गातल्या बायकांना त्याचे कौतुक नव्हते-कारण त्यांच्यासाठी तो रोजच्या जिण्याचा भाग होता. त्यांचे प्रश्न वेगळे होते-डोमेस्टिक व्हायोलन्स रिलेटेड जास्त. बाकी स्त्रीवादी साहित्यात युरोपआम्रिकेतीलच नावे येतात कारण त्यांची चौकट आपण आहे तशी स्वीकारली आहे. सिमॉन दि बोव्हारचे सेकंड सेक्स नामक पुस्तक यावरील बायबल मानले जाते मात्र जुडिथ बटलरचा थेसिस तिच्यापेक्षा पुढचा आहे. युरोपआम्रिकेच्या एक पिढी मागे असतो आपण हे यावरूनही सिद्ध होते. सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे स्त्रीवाद आहे हेच अजून भारतातील विचारवंतांच्या पुरेसे पचनी पडलेले नाहीये. आणि स्त्रीवाद ही एक अभ्यासचौकट आहे. ती तशीच्या तशी सर्व समाजांना लागू होत नाही. भारतीय परिप्रेक्ष्यात नक्की काय बरोबर, काय चूक हेही पाहिले पाहिजे आणि तदनुरूप त्याची मांडणी केली पाहिजे. स्त्री म्हणून असलेल्या समस्यांमध्ये काहीएक समानता असली तरी स्पेसिफिक स्थलकालसापेक्ष फरक इतके असतात की ते एकच एक मॉडेल लागत नाही. पण इतकी अक्कल कुणाला असल्याचे सध्या दिसत नाही. त्यामुळे अर्धवट शिजवलेली युरोपियन डिश भारतीय समाजाच्या नरड्यात ओतण्याचा आटोकाट प्रयत्न विचारवंत करीत असतात. हे झाले विचारवंतांच्या संशोधनपर मांडणीबद्दल. बाकी यांच्या हुच्चभ्रू तुच्छतावादी अ‍ॅटिट्यूडबद्दल बोलावे तितके थोडेच. पुस्तकांतून ज्यांचे गोडवे गातात त्यांचा प्रत्यक्ष सहवास यांना नको असतो. अँड्रे बीटेल नामक समाजशास्त्रज्ञाचे हे लैच मार्मिक निरीक्षण आहे. (बादवे हे साहेब गोरे असले तरी बॉर्न अँड ब्रॉट अप इन इंडिया आहेत. सबब त्यांची मते स्वीकारार्ह असावयास अडचण नाही.)वाचले तेव्हाच फुटलो, म्हटलं क्या बात बोली है. बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है. असो. सध्या इतकेच.

In reply to by बॅटमॅन

>>सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे स्त्रीवाद आहे हेच अजून भारतातील विचारवंतांच्या पुरेसे पचनी पडलेले नाहीये. सहमत आहे. इतकेच नव्हे तर भारतीय परिप्रेक्ष्यात सिमॉन कुचकामी आहे हे सुद्धा अनेकांना कळतच नाही.

In reply to by बॅटमॅन

..बाकी स्त्रीवादी साहित्यात युरोपआम्रिकेतीलच नावे येतात कारण त्यांची चौकट आपण आहे तशी स्वीकारली आहे. सिमॉन दि बोव्हारचे सेकंड सेक्स नामक पुस्तक यावरील बायबल मानले जाते मात्र जुडिथ बटलरचा थेसिस तिच्यापेक्षा पुढचा आहे. युरोपआम्रिकेच्या एक पिढी मागे असतो आपण हे यावरूनही सिद्ध होते. सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे स्त्रीवाद आहे हेच अजून भारतातील विचारवंतांच्या पुरेसे पचनी पडलेले नाहीये. चोप्य पस्ते ;) हे सगळ्याच व्यवहारात चालणारे नाणे आहे (दुर्दैवाने) :( स्वतंत्र विचार करणारे जगात नेहमीच फार कमी संख्येने असतात... ती सुभाषितानी आहे ना, वक्ता दशसहस्रेशु... वेग्रे वेग्रे. मुख्य म्हणजे पाश्चिमात्य शिक्का असलेल्या मालाचा पटकन उठाव होतो आणि किंमतही भरपूर मिळते :)

In reply to by Atul Thakur

समाजशास्त्रातुन एमए करत असताना ज्या मुली स्त्रीवादी होत्या त्या बहुतेक आर्थिक दृष्ट्या उच्चभ्रु वर्गातील होत्या. बाहेरील सर्वसामान्य स्त्रीबद्दल तर सोडाच पण वर्गातल्या साधारण मुलिंबद्दलदेखिल त्यांना फारशी कणव होती असे वाटले नाही.
हे बऱ्यापैकी विनोदी वाटलं. वस्तुस्थिती म्हणून. माझ्या अभ्यासविषयात (खगोलशास्त्र) फार मुली, स्त्रिया दिसत नाहीत. आजही नाहीत आणि पाश्चात्य देशांतही नाहीत. या संशोधकांमधला बहुतांश तरुण वर्ग (चाळीशी आणि कमी वयाचे) लिंगसमानतावादी, (क्वचित कोणी पुरुष स्त्रियांवर अन्याय झाला, होतो म्हणून किंचित उजवं माप देणारे) जातपात न मानणारा आणि उदारमतवादी दिसतो. माझ्यासारख्या मुली-बायकांच्या तोंडावर "तुम्ही शिक्षित घरांमधल्या मुली शिकता आणि काही करता यात काय नवल" असं तोंडावर बोलून चर्चा होतात. पोटापाण्याचा विषय नसल्यामुळे वाचन फार खोल नसतं कोणाचंच, पण देशोदेशीच्या (म्हणजे यूके, यूएस) वर्तमानपत्रांमधून स्त्रीविषयक पुरवण्यांमधे काय छापून येतं याबद्दल चर्चा होते. ठराविक महत्त्वाची पुस्तकं वाचली जातात आणि त्यावर चहापाण्यासोबत चर्चाही होते. समाजशास्त्र शिकणारे लोक, विज्ञान शिकणाऱ्यांपेक्षा संकुचित विचारांचे दिसणं, फार विनोदी वाटलं. कदाचित भारतात, भौतिकशास्त्रात असणारा बंगाली लोकांचा प्रादुर्भाव, त्यांच्याकडे असणारी डावी विचारसरणी, यांचा प्रभाव पडत असेल काय? (माझा अभ्यासविषय नाही, त्यामुळे माझ्याकडे उत्तर नाही. प्रश्न पडला तो मांडला.) हे बहुतेकसे लोक मध्यमवर्गीय म्हणावेत असे ... आता बहुदा उच्चमध्यमवर्गीय. दुसऱ्या बाजूला, माझ्या बरोबर एमेस्सीला असणारे लोक आठवले. बहुतांश लोक नोकरीसाठी काहीतरी शिकायचं म्हणून शिकत होते. त्यांना विषय समजून घेण्याचं काही पडलेलं नव्हतं. पुढे चित्र पालटलं. याचा विचार करता, आता वस्तुस्थिती विनोदी वाटत नाही, दोन्हीत consistency दिसते आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोण कुणापेक्षा संकुचित आहे माहित नाही. मात्र वस्तुस्थीती मला आढळली ती मांडली. भारतीय विद्यापीठातील स्त्रीवादी शिक्षण हाच एक मोठा विनोद आहे हे वाक्य कुणाला झोंबल्यास इलाज नाही. तेथे चालणार्‍या मुख्य चर्चा या लैगिक स्वातंत्र्य आणि हवे ते कपडे घालण्याची मोकळीक या दोन मुद्द्यांपुरत्याच सिमीत असतात. जणु काही तेच स्त्रीयांचे मुख्य प्रश्न असावेत. त्यावर मात्र हिरीरिने चर्चा चालते. आता त्यात समलिंगी लोकांचा प्रश्न शिरला आहे. त्यावर धुमशान चर्चा चालतात. मात्र दलित स्त्रीयांबद्दल ब्र ही नाही. खैरलांजी प्रकरणाबद्दल तर फारशी माहितीदेखिल नसावी असे वाटले.

द्विभार्याप्रतिबंध्क कायदा, ४९८-ए, पोटगी कायदा हे आधी नष्ट करा. मग बोलू निवांत.

आता पर्यंत प्रतिसाद नोंदवलेल्या बर्‍याच सदस्यांनी पाश्चात्य स्त्रीवादी भूमीका भारतास कशी गैरलागू हे सांगितले. वस्तुतः प्रस्ताव मांडताना पाश्चात्य स्त्रीवादी भूमीका फारशी विचारात घेतली नव्हती.तरीपण विषय चर्चेस आला आहे तेव्हा आपल्या मतानुसार भारतीय स्त्रीवादाची व्याख्या काय असावी ? चर्चा प्रस्तावाच्या अनुषंगाने अजून बर्‍याच विषयांचा उहापोह होणे बाकी आहे असे वाटते त्या दृष्टीने पिरा आणि इतर मिपा सदस्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा असेल. प्रतिसादातून विवीधांगी प्रकट होणार्‍या दृष्टीकोन व्यक्त करण्या बद्दल सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद .

हे एक न्हवे तर दोन समान अर्थी शब्दाचे कोंबो आहे. सर्वप्रथम हा शब्द बदला स्त्रियांची परिस्थिति आपाप बदलेल

In reply to by बर्फाळलांडगा

:) नाही इथे 'वाद' या शब्दाची अर्थछटा वेगळी आहे. इथे वाद शब्दाचा अर्थ ism असा असल्यामुळे समानार्थी नाही ! तुम्ही ज्या अर्थाने घेताय त्या अर्थाने अद्यापतरी या धाग्यावरतरी स्त्रीवाद कुठे आढळला नाही उलट पक्षी तर नाही ना अशी शंका येईल अशी स्थिती आहे. :)

In reply to by कवितानागेश

कसलाच वाद आम्ही नाकारालाच नाही त्यामुळे योग्य वादसंवादाचा आभाव हेच आमच्या नापसंती व्यक्त करायचे मुख्य कारण आहे. आय रिस्पेक्ट विमन अलोट.

In reply to by माहितगार

यावर विधान केलेले नाही तर या धाग्यावर "स्त्रीवाद" या संबंधी विधान केले आहे हे स्पष्ट नमूद करतो ज्यामुळे पक्षी उलट सुलट होणार नाहित असे वाटते. स्त्रिवादामधे ism या अर्थानेच वाद हा शब्द घेण्यात आला आह हिच घोडुचुकआहे असे मी विधान केले आहे म्हणुनच स्त्रिवाद हा शब्द बदलला तरच स्त्रियांच्या परिस्स्थितित आपोआप्प सुधारणा होइल असे वाटते.

In reply to by बर्फाळलांडगा

विनोदम्हणून ठिक पण.... आपल्या प्रतिक्रीयेत भारतीय पुरुषांच्या मनातील स्त्रीप्रतिमेचा साचेबंदपणा (स्टिरीओटाईप) नाही ना ?... आणि मराठी संकेतस्थळावरील चर्चातून स्त्रीप्रतिमेचा साचेबंदपणा (स्टिरीओटाईप) बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात मराठी महिला काही भूमिका बजावतात का ? सध्या कशा प्रकारची भूमिका पार पाडत आहेत ? असा या धागा चर्चेतील एक विषय आहे या कडे या निमीत्ताने लक्ष वेधावे असे वाटते

स्त्रीवादविषयक धाग्यात ९०% प्रतिसाद पुर्षांचाच का आहे? जिन्हे नाझ है स्त्रीवादपे वो लोग कहां है?

निव्वळ शब्दांमुळे गोंधळ उडण्यापेक्षा एकूण घराबाहेरील क्षेत्रात, विशेषतः राजकारण, इंटरनेट इ. क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या विषयावर तुम्हाला मते हवी आहेत असे गृहीत धरते. त्यातही महाराष्ट्रात स्त्रियांची दर पुरुषामागे असणारी संख्या इतर काही राज्यांपेक्षा बरी असली तरी महाराष्ट्र स्त्री-समता या गोष्टीबाबत फार प्रगत आहे असे वाटत नाही. सर्व भारताचं सरासरी चित्रच महाराष्ट्रात दिसेल. अगदी आगरकर, सावित्रीबाई फुले आणि कर्वे असे लोक महाराष्ट्रात होऊन गेले तरीही. सर्वप्रथम राजकारणाबद्दल बोलायचं तर राजकारण आणि गुन्हेगारी या क्षेत्रांची सरमिसळ पाहता भारतीय स्त्रियांच्या सर्वसामान्य जडणघडणीमुळे त्या या क्षेत्रात अधिक संख्येने येतील ही शक्यता कमी वाटते. त्यातून महिला आरक्षण विधेयक कसे संमत होणार नाही हेच बहुतेक राजकीय पक्ष पाहतात हा अलिकडचाच अनुभव आहे. खर्‍या अर्थाने स्त्री सबलीकरण कितीजणांना हवे आहे ही शंकाच आहे. सिनेमा आणि मालिकांमधे दाखवल्या जाणार्‍या भरमसाट दागिने घातलेल्या गृहलक्ष्म्याच बर्‍याच जणांना हव्या आहेत असंच चित्र उभं रहातंय. लोकांना तेच पहावंसं वाटत नसतं तर वेगळ्या स्वरूपात स्त्रिया दाखवल्या गेल्या असत्या. शिक्षण नोकर्‍या इ. क्षेत्रात करियर करणे भारतीय महिलांना अवघड जातेच. त्यामागे बरीच कारणे आहेत. लहान वयात होणारी लग्नं आणि त्यापाठोपाठ येणार्‍या कौटुंबिक जबाबदार्‍या यातून करियर करणे फार कठीण आहे. त्यातून मार्ग काढून काही करणार्‍या महिलांना समान शैक्षणिक दर्जा असणार्‍या पुरुषापेक्षा कमी समजले जाते ही आजही वस्तुस्थिती आहे. स्त्री कर्मचार्‍यांना बाळंतपणाच्या रजा द्याव्या लागतात, मुलांसाठी त्या रजा घेत रहातात त्यामुळे शक्यतो स्रिया या निम्न दर्जाच्या कर्मचारी म्हणून सहसा ठेवण्याकडे बर्‍याच आस्थापनांचा कल असतो. इंटरनेट आणि मराठी संकेतस्थळे, अनुदिनी यातील लेखक वाचकांची विभागणी शहरी आणि ग्रामीण अशी कोणी करू शकले तर या गोष्टी किती लोकांपर्यंत पोचल्या आहेत हे कळून येईल. ग्रामीण भागात यांचा फार प्रसार झालेला नसावा. त्यातही स्त्रियांची संख्या किती असेल याचा आपण फक्त तर्कच करू शकतो. एकूण सदस्यांमधे १० ते २०% एवढ्याच स्त्रिया प्रत्यक्ष सहभागी होत असाव्यात. मिपावर अनाहिता विभाग उपलब्ध करून दिल्यानंतर महिला सदस्यांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. एरवी यातील बर्‍याच जणी फक्त वाचनमात्र सदस्या होत्या. काहीजणी तर सदस्याही नव्हत्या. ग्रामीण भागातील स्त्रीवादाबद्दल खूप काही लिहिता येईल. ग्रामीण भागात स्त्रियांना अजिबात स्वातंत्र्य नाही असा सर्वसाधारण समज असला तरी मी १९७०-८० च्या दशकांत एका दळणवळणाचे कोणतेही साधन नसलेल्या खेड्यात राहिले आहे. कोकणातले खेडे असल्याने बहुतेक घरातील पुरुषमंडळी उपजीविकेसाठी मुंबईला नोकर्‍या करत तर शेती, गुरेढोरे, मुले यांची जबाबदारी घरातल्या स्त्रिया उचलत. पत्र हे एकमेव साधन असल्याने या बाबतीत सर्व निर्णय स्वतंत्रपणे या महिलाच घेत असत. परंतु ग्रामपंचायतीची निवडणूक वगैरे कोणी महिलेने आपणहून कधी लढवल्याचे पाहिले नाही. मात्र गिरण्या बंद झाल्यावर काही प्रमाणात पुरुषवर्ग गावाकडे परतले आणि माझाही त्या गावाशी गेल्या वर्षात संपर्क राहिलेला नाही. त्यामुळे सध्या काय परिस्थिती आहे हे मी सांगू शकणार नाही. त्याशिवाय घाटावरच्या गावांतून यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल तर तेही मला माहिती नाही. मात्र कोकणात एकूण शिक्षणाचे प्रमाण घाटापेक्षा जास्त असावे, त्यामुळे स्त्रियांची परिस्थिती तुलनेत नक्कीच अधिक चांगली असणार. शिक्षण, प्रत्येक स्त्रीमागे जन्म दिलेल्या मुलांचे प्रमाण आणि स्त्री-पुरुष दर हजारी संख्या याबद्दल व्यवस्थित माहिती गोळा केली तर या गोष्टींचा स्त्री-वाद, स्त्री-समता किंवा स्त्री सबलीकरण याच्याशी थेट संबंध असल्याचे दिसून येईल. पाश्चात्य स्त्री स्वातंत्राच्या चळवळीची पार्श्वभूमी आणि भारतातील स्त्रियांची शेकडो वर्षांची परिस्थिती यात फारसे साम्य नाही त्यामुळे त्यांची तत्त्वे इथे सरसकट लागू करता येणार नाहीत. बेसिक्स तीच राहिली तरी त्यांची अंमलबजावणी वेगळ्या तर्‍हेने करावी लागेल. पूर्वीसारखे स्त्री -समतावादी स्त्रियांवर आता एक ठराविक छाप जरी राहिला नसला तरी स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे किती जणांना (त्यात स्त्रिया स्वतःही आल्या) जमेल त्यावर स्त्रीवादाचे यशापयश अवलंबून राहील.

In reply to by पैसा

स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे किती जणांना (त्यात स्त्रिया स्वतःही आल्या) जमेल त्यावर स्त्रीवादाचे यशापयश अवलंबून राहील.
(भारतीय) स्त्रीवादी परिपेक्षातून "(भारतीय) स्त्रीकडे एक (भारतीय) व्यक्ती म्हणून पाहणे" हि किमान स्वरूपी अपेक्षा म्हणून पहाता येईल ? पुन्हा पुन्हा भारतीय भारतीय शब्द वाचन कठीण होईल म्हणून स्त्रीवादी परिपेक्षातून स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे" हि किमान स्वरूपी अपेक्षा म्हणून पहाता येईल ? असे लिहितो आणि या किमान अपेक्षेसहीत मराठी स्त्रीवादाच गेल्या दहा बारा वर्षातील सार्वजनीक व्यासपिठांवरील यशापयश काय ? अगदी या किमान अपेक्षेबाबतही स्त्रीया स्वतःही सार्वजनिक व्यासपिठावर असलेल्या स्त्रीयाही अलिप्त/मुकप्रेक्षक असतात असे वाटते का ? सार्वजनिक व्यसपिठावरील स्त्रीच्या साचेबंद प्रतिमा स्त्रीयांना स्वतःस का दिसत नाहीत ? दिसून खट्कत नाहीत? गांभीर्य जाणवत नाही ? नेमक काय होत ? गेल्या दहा बारा वर्षात महाराष्ट्रातील सार्वजनिक व्यसपिठावरील जे विषय आले त्यात स्त्रीच्या साचेबंद प्रतिमा कुठे येते आहेत याचा जाणीवपुर्वक अभ्यास स्त्री अभ्यासकांनी केला आहे का? आपल्या प्रतिसादावर पुढे जाणारी चर्चा वाचनीय असेलच. प्रतिसादा करता धन्यवाद

या विषयावर काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत एक शोध निबंध लिहिला/वाचला होता. त्याचा मराठी सारांश पुढे देत आहे. भारतीय स्त्रीवादाचे लक्ष्य केवळ स्त्री शक्ती किंवा स्त्रीची पुरुषाशी बरोबरी किंवा पुरुषावर वर्चस्व गाजवणे हे नसावे. स्त्री पुरुष संवादाचे अंतिम ध्येय लिङ्गोत्तर समाज आणि विश्व हे असावे जे स्त्री पुरुष शारीरिक आणि मानसिक भेदांच्या पलीकडे जाणारे आहे. मात्र त्याकडे जाणारा मार्ग प्रथम लिंग सापेक्ष आणि नंतर लिंग निरपेक्ष या दोन वाटेत लागणाऱ्या अवस्थांमधून काढावा लागेल.

In reply to by श्रीनिवास टिळक

>> स्त्री पुरुष संवादाचे अंतिम ध्येय लिङ्गोत्तर समाज आणि विश्व हे असावे जे स्त्री पुरुष शारीरिक आणि मानसिक भेदांच्या पलीकडे जाणारे आहे. लिंगोत्तर आणि लिंगनिरपेक्ष यात नेमका काय फरक आपल्याला अभिप्रेत आहे? मला अशा चर्चा वाचल्या कि सर्वेपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामय: सारखा भाबडा आशावाद वाटतो. पण अशा आशावादावर चळवळींची वाटचाल पुढे सरकते हे ही तितकच खर! चालत रहा हम होंगे कामियाब एक दिन ही पुरोगामी चळवळींची गाणी देखील अशीच नैराश्य येवु नये म्हणुन घेतलेली खबरदारी आहे असो स्त्रीवादी चळवळीच्या अनेक छटा आहेत हे मात्र सर्वांनाच मान्य होण्यात अडचण नसावी

'पुरोगामी महाराष्ट्र' शब्द चळवळी / मिडिया / विचारवंत यांनी वापरुन वापरुन फारच गुळगुळीत झाला आहे. मला तर हा शब्द दाभोलकरांच्या हत्येनंतर वापरावासाच वाटत नाही. तसे चळवळींनी बरेच शब्द गुळगुळीत केले आहेत. असो

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>गुळगुळीत झाला आहे. मला तर हा शब्द दाभोलकरांच्या हत्येनंतर वापरावासाच वाटत नाही. या भावना समजता येतात. एकतर टिकेची सुरवात कौतुकाने आणि शेवट नाही तुमच्यात या पेक्षा अधिक चांगल करण्याची क्षमता आहे या सँडविच थेरपिने केलेली बरी पडते. त्या शिवाय आडनाव वाल्या धाग्यात मी एक मुद्दा मांडला आहे कि तुम्ही अमुक तमुक कुटूंबातले तरिही अस करण शोभता का ? या मुद्द्यावर जाता येत तस एकदा पुरोगामी म्हणून मग 'पुरोगामी तरीही ?' म्हणण्यात पुरोगामी राहण्या करताचा दबाब टाकता येतो.आणि पुरोगामित्वावर शंका घेतली जाणार म्हटल्यावर दबाव बळकट होण्यास मदतच होते. प्रतिसादा करता धन्यवाद

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर केवळ स्त्रीवादच नाही तर एकूणच 'सामाजिक प्रश्नां'वर विचार करून त्यावर काम करणार्‍या समाजसेवकांची प्रचंड कमतरता आहे. राजकीय सोयीचे सामाजिक प्रश्न सोडवल्यासारखे करून निवडणूका लढवण्यातच सगळे धन्यता मानत आले आहेत. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात कोणत्या 'सामाजिक' प्रश्नावर अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन झाले आहे ते आठवावे. झालेली सर्व आंदोलने ही राजकीय स्वरूपाची आहेत. बाबा आमटे, बंग दांपत्य किंवा इतरही अनेकांनी उत्तम सामाजिक कार्य केलेच. मात्र ते कार्य स्थानिकच राहिले, त्याचे रुपांतर सामाजिक बदलात वा चळवळीत ते करू शकलेले नाहित. बहुजनांचा विकास घ्या, नाहितर कौंटुंबिक वा इतरही बलात्कार घ्या, भ्रुणहत्या घ्या किंवा हुंडाबळी घ्या हे सारे सामाजिक प्रश्न आहेत. यावर उत्तरे ही समाजाने शोधायची आहेत. या सुधारणांच्या इन्फोर्समेंटसाठी पुरक म्हणून कायदे, सरकार यांची मदत हवीच मात्र त्यांनी बदल घडवावेत ही अपेक्षा अगदीच पळपुटी वाटते. या प्रश्नांवर निव्वळ कायदेशीर उपाय हा इलाज असु शकत नाही. या पार्ध्वभूमीवर महिला स्वायत्तता अथवा स्त्रीमुक्ती कडे बघायला हवे. मुळात महाराष्ट्रात बहुजन वर्गातील बहुसंख्य स्त्रिया हा कित्येक वर्षे 'कमावत्या' आहेत. पाश्चात्यांच्या आगमनापूर्वीपासून त्या स्वतः मिळकत करत आहेत. मात्र त्या मिळकतीचा लाभ म्हणा किंवा खर्च करण्याची अनुमती म्हणा त्यांना नाही. अभिजन वर्गातील चित्र त्याहूनही बिकट होते. तिथे अर्थार्जनाची व खर्च करण्याची दोन्हीची अनुमती नव्हती. अभिजन वर्गातील स्त्रिया जेव्हा बाहेर पडल्या तेव्हाही त्या फार सामाजिक दबावामुळे अथवा घरातील पुरूषांना भुमिका पटल्याने नव्हे तर नव्या आर्थिक गरजांपूढे पर्याय न राहिल्याने. तरीही घर सांभाळायची जबाबदारी पुरूषांवर आली नाहीच. ती बाईकडे तशीच राहिली. (नेमका घाईत आहे, प्रतिसादाचे स्वरूप अगदीच मुक्तकासारखे झाले आहे. पुन्हा वेळ मिळाला की उर्वरीत प्रतिसाद टंकतो) (क्रमशः)

In reply to by ऋषिकेश

(प्रतिसाद पूर्ण करतो आहे, मात्र एक स्वतंत्र प्रतिसाद म्हणून वाचावा कारण विचारांची लिंक तुटल्याने थेट मुळे विषयावर येतो) स्त्रीमुक्ती/स्त्रीवादी पेक्षा मी अनेकदा 'लिंगनिरपेक्षता' हा शब्द माझ्या विचारसरणीसाठी जास्त जवळचा समजतो. अजूनही आपला समाज स्त्रीयांना स्वातंत्र्य 'देतो' आहे हेच मुळात गैर आहे, शिवाय ते काही प्रमाणात स्त्रीला 'समाजापासून वेगळी कोणीतरी' असे बाहेर काढणारेही आहे. एखादे काम स्त्रीनेही करावे म्हणजे स्त्रीमुक्ती झाली हा विचारच मला गैर वाटतो. मुळात कोणतेही काम हे स्त्रीचे वा पुरूषाचे अशी विभागणीच नसावी. एकदा का ती केली गेली की मग "मी पोळ्या केल्या की तु भाजी कर" किंवा "मीच का जेवण करायचे?" स्वरूपाचा बालीशपणा त्याला येत जातो. शिवाय स्त्री स्वातंत्र्य म्हणजे फक्त पत्नी/मुलीला स्वातंत्र्य असे नसून आई/आजी/बहिण/मैत्रिण/प्रेयसी यांनाही असलेले स्वातंत्र्य आहे हे प्रत्येकाने(पुरूष व स्त्रियांनीही) लक्षात ठेवायला हवे. तसेच पतीकडून समान वागणूकिची अपेक्षा करताना आपला मुलगा व मुलगी यांच्यात आपण भेद करत नाहियोत हे ही बघणे त्यात आलेच..इत्यादी.. ------- कुटुंबसंस्था, भारतीय संस्कृती या नावाखाली स्त्रिया व पुरूष यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घेतली तरी निम्म्याअधिक स्त्रिया व पुरूषही स्वतंत्र होतील. भारतीय संस्कृती व कुटुंबसंस्थेच्या नावाखाली कोणी कुठे-कसे-कधी-का जावे/खावे/रहावे/पहावे/वागावे याचे 'निर्णय' त्याच व्यक्तीने घेण्यापासून प्रतिबंध करणे हे अत्यंत दुटप्पी वर्तन झाले. चर्चा/मते सांगणे-ऐकणे/प्रसंगी गळी उतरवणे वगैरे चालु राहिलच पण अंतीम निर्णयाची मुभा प्रत्येक व्यक्तीला हवी. बाकी हे असे व्यक्तीस्वातंत्र्य हे 'पाश्चात्य' फॅड आहे, त्यांना काय आमची संस्कृती माहित वगैरे इथे गैरलागू आहे किंवा निव्वळ सोय आहे. अर्थात त्याच बरोबर स्त्रिया स्वतंत्र हव्यात म्हणजे त्यांनी हाती घेतलेल्या कामाची पूर्णपणे जबाबदारी पेलणे असे मी समजतो/मानतो. उदा. स्त्रीया वाहने चालवु लागल्या आहेत. ती रस्त्यात बंद पडल्यास काय करावे? त्याचा मेंटेनन्स कसा करावा?वगैरे शिक्षणही स्त्रियांनी स्वतःच आपणहुन घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या पगाराचे काय करावे याचा निर्णय त्यांनी स्वतःच जबाबदारीने घेतला पाहिजे. हे असे स्त्रिया करू शकतात असा स्वानुभव आहे. काही वेळा स्त्रिया स्वातंत्र्यासोबत येणार्‍या जबाबदारीकडे काणाडोळातरी करतात किंवा मग फक्त सोयीस्कर भागच उचलतात. यामुळे त्यांचेच स्वातंत्र्य 'संपूर्णपणे' त्यांना नको असावे असे वाटू लागते, हे ही खरेच.

In reply to by ऋषिकेश

यामुळे त्यांचेच स्वातंत्र्य 'संपूर्णपणे' त्यांना नको असावे असे वाटू लागते, हे ही खरेच.
सहमत.. सोयीस्कर स्त्री वाद उचलल्या जातोच.. म्हणजे अनेकदा घरकामांच्या बाबतीत पुरूषाने मदत केलीच पाहीजे असा आग्रह धरणार्‍या स्त्रीया कष्टाची कामे स्त्रिने सुद्धा केली पाहीजेत असा आग्रह धरताना दिसत नाहीत. किंवा अनेकदा पुरूष बाहेरची कामे करतात आणि आपण घरातली करायची ही विभागणी स्वत्"हुन मान्य करतात. तसं करण्यात गैर नाही पण बाहेर्ची कामे / कष्टाची कामे टाळण्याकडे जो कल आहे तो गैर आहे.. तुझा "लिंगनिरपेक्षत"" हा शब्द मलाही पटतो.. स्त्रि पुरूष अशा फंदात न पडता, सगळी कामे सगळ्यांना करता यावीत / करावीत / करु द्यावीत हे सोप्पे आहे.. जसे कामाच्या बाबतीत तसेच संधी / अधिकार / हक्क / कर्तव्य याही बाबतीत हे वाक्य म्हणता येईल.

In reply to by ऋषिकेश

किंचित अवांतरः बर्‍याचदा अशीही उदाहरणं दिसतात जेव्हा एखादी मुलगी नोकरी करतीये. तिचं लग्न ठरलं. नवरा दुसर्‍या देशात/शहरात नोकरी करतो. ती मुलगीपण re-locate होते. अशा वेळी बर्‍याचदा सेटल झालेला जॉब सोडून जिथे स्वत: नोकरीची/ कामाची अनिश्चितता आहे अशा ठिकाणी जाण्यापेक्षा नवर्‍याला 'तु माझ्या शहरात नोकरी शोधच' असा स्टँड किती मुली घेतात?

आजच्या सकाळ मधील एका लेखात राजकारणात सहभागी होताना स्त्रीयांना येणार्‍या काही अडचणींचा आणि त्यावरील उपाय योजनांचा उहापोह आहे. दुवा: *महिलांच्या सुरक्षेसाठी हवी पक्षांतर्गत समिती

In reply to by माहितगार

(सकाळ मधील उपरोक्त लेखातील एका मुद्द्याच्या अनुषंगाने आलेले विचार) एखाद्या व्यक्तीचे विचार अथवा सहभाग पटत नसेल तर व्यक्तीगत हल्ला आणि चारीत्र्यहननाचे प्रयत्न स्त्रीयांच्या बाबतीतच होतात असे नाही ते पुरुषांच्या बाबतीतही होतात.याला चांगाला एक उपाय तर्कशास्त्रातून येतो तो म्हणजे अशावेळी अशा प्रकारच्या तार्कीक विसंगतीची इतर त्याच प्रकारची वारंवार येणारी उदाहरणे देऊन तर्कदोषाकडे निर्देश करणे. मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते. या बद्दल अधिक माहिती मराठी विकिपीडियावर व्यक्तिलक्ष्य तर्कदोष या लेखात उपलब्ध आहे.

>>>ब्लॅक स्त्रीयांच्या समस्या आणि त्यांच्याशी निगडीत पुस्तकांची खडानखडा माहिती असलेल्यांना दलित स्त्रीबद्दल फारशी माहिती नसे आणि खरं सांगायचं तर त्यांना त्यात रस देखिल नसावा असं देखिल वाटतं. >>>पुरुषी व्यवस्थेला विरोध हे स्त्रीवादाचे यूएसपी होते, आहे आणि राहील. >>>सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे स्त्रीवाद आहे हेच अजून भारतातील विचारवंतांच्या पुरेसे पचनी पडलेले नाहीये. सहमत आहे. इतकेच नव्हे तर भारतीय परिप्रेक्ष्यात सिमॉन कुचकामी आहे हे सुद्धा अनेकांना कळतच नाही. खरं म्हणजे मला हा विषयच निट कळला नाहीये. आणि हा स्त्रीवाद, समता ई. ई. विषयी पुरुषानीच सगळे ठरवून टाकल्यामुळे मी जराशी संभ्रमीतच आहे. भारतीय स्त्रीचा स्त्रीवादाचा झगडा खर म्हणजे उंबरठ्याच्या आतच सुरू होतो. आणि बहुतेक वेळा तिथले स्वताचे स्थान निश्चित करण्यातच तिचा शक्तीपात होतो. त्या द्रुष्टिनी पाहिल्यास प्रत्येक भारतिय स्त्री हि दलितच असते. अनाहीता वाचून भारतिय स्त्रीचे दलितपण किती सार्वत्रीक आहे याचा अंन्गावर काटा आणणारा अंदाज आला. भारतिय स्त्रीची स्त्रीवादाची आणि समतेची व्याख्या नेमकी काय असते?... मला वाटत तिला समता म्हणजे फक्त 'निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य' हवे असते, निर्णय प्रक्रीयेत सहभागी होण्याचा हक्क हवा असतो. आणि ईतक्या क्षुल्लक गोश्टिसाठी (जी भारतीय पुरूषाना फक्त त्यान्च्या पुरुषजन्मा मुळेच मिळते) भारतिय स्त्रीला हा जवळ जवळ नेव्हर एण्डीन्ग लढा रोजच नव्या ऊभारीने लढावा लागतो. त्या नंतर मग ते उंबरठ्या बाहेरचे जग....माय सीक्रेट गार्डन मधले ते लैंन्गिक स्वातंत्र्य ई. तर फार दुरची गोष्ट... पुरुषी व्यवस्थेला विरोध हे स्त्रीवादाचे यूएसपी असे सरसकटिकरण भारतिय स्त्रीच्या बाबतीत करता येइल का? पिढ्यानंपीढ्या जखडून ठेवणार्या आणि आता खरच काचणार्‍या सामाजिक चौकटी चे पेच थोडे ढीले व्हावेत आणि फक्त एक मोकळा श्वास घेता यावा ईतकीच अपेक्शा बहूतेक असेल भारतिय स्त्रीची. कसला आलाय डोम्बलाचा पुरुष व्यवस्थेला विरोध..!! अरे, 'मला हरितालीकेचा ऊपास नाही करायचा' ईतकही निर्णय स्वातंत्र्य नसताना स्त्रीवाद म्हणजे फक्त काचोळि दहनच ईतकेच भारतिय पुरुषाला आठवावे हे खरच दुर्दैव..!

In reply to by स्वप्नांची राणी

खरं म्हणजे मला हा विषयच निट कळला नाहीये. आणि हा स्त्रीवाद, समता ई. ई. विषयी पुरुषानीच सगळे ठरवून टाकल्यामुळे मी जराशी संभ्रमीतच आहे.
पुरुषांवर अनाठायी हेत्वारोपाचे कारण समजले नाही. वरील शब्दांच्या व्याख्या तुमच्या मते ज्या काही असतील त्या सांगा.
पुरुषी व्यवस्थेला विरोध हे स्त्रीवादाचे यूएसपी असे सरसकटिकरण भारतिय स्त्रीच्या बाबतीत करता येइल का?
पुरुषी म्हणजे पुरुषप्रधान असे अभिप्रेत आहे. याला विरोध न करणारा स्त्रीवाद मला ठाऊक नाही.
अरे, 'मला हरितालीकेचा ऊपास नाही करायचा' ईतकही निर्णय स्वातंत्र्य नसताना स्त्रीवाद म्हणजे फक्त काचोळि दहनच ईतकेच भारतिय पुरुषाला आठवावे हे खरच दुर्दैव..!
टोकाची उदाहरणे दिल्यास पुरुषांनाही तसेच वाटणार. इलाज नाही.

In reply to by बॅटमॅन

स्त्रीवादावर बोलणार्‍या स्त्रिया आसपास दिसत नाहीत, असं म्हणतेय ती. स्त्रीवादाचा अभ्यास विद्यापीठांमधे किती प्रमाणात झाला आहे याबद्दलची माहिती विद्यापीठांमधे जाऊन काढावी लागेल. मात्र आधुनिक मराठी स्त्रीवादी लेखिका शोधायला गेलं तर गौरी देशपांडे, कविता महाजन अशी काही मोजकीच नावं आठवतात. त्यातही गौरी देशपांडे आता नाहीत. सार्वजनिक व्यासपीठांवर चर्चेचे विषय स्त्रीवादाच्या दृष्टीने आलेलेही फार दिसत नाहीत. म्हणजे महाराष्ट्रातला स्त्रीवाद जो काही आहे तो काही शहरी सुशिक्षित स्त्रियांच्या व्यक्तिगत पातळीवर राहिला आहे. सामाजिक चळवळ सावित्रीबाई फुलेंनी जी केली होती तशी तर आता कुठेही दिसत नाही. ग्रामीण कष्टकरी महिला आणि झोपडपट्टीवासी महिला, यांची परिस्थिती आपल्याला खरेच फार माहित नाही. धर्माने घातलेले निर्बंध पाळणार्‍या महिलांचा एक बुरखे घातलेला मोठा वर्ग मला आसपास दिसतो. तोही भारतीय्/महाराष्ट्रीय लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहे. त्यांच्या परिस्थितीबद्दल तर न बोललेले बरे. स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार अशा एखाद्या निमित्ताने थोडीफार चर्चा होते, पण त्यातून काही ठोस उभे राहिले असले तर मला तरी माहित नाही. कुणी माहिती दिली तर आनंद होईल.
स्त्रीवाद म्हणजे फक्त काचोळि दहनच ईतकेच भारतिय पुरुषाला आठवावे हे खरच दुर्दैव..!
याचं कारण म्हणजे भारतीय परिप्रेक्ष्यात स्त्रीवाद याबद्दल फार कमी लिहिले आणि वाचले जाते हेच असावे. त्यात पुरुषांना दूषण देण्याचा हेतू आहे असे वाटले नाही.

In reply to by पैसा

सहमत. स्त्रीवादी लेखनात इ. कष्टकरी वर्गाचे प्रतिबिंब कितपत आढळते? आढळावे तितके नक्कीच नाही. तुमच्या प्रतिसादावरून तेच अधोरेखित होतंय. असो.

In reply to by बॅटमॅन

कविता महाजनांच्या दोन कादंबऱ्या वाचल्या आहेत. 'ब्र'मधे तर बहुतांश वर्णनं आदिवासी समाजाची आहेत, शहरी, निमशहरीही नाही. 'भिन्न'मधे शहरी पार्श्वभूमी आहे, आणि त्यात निम्न मध्यमवर्गीय समाजाचं वर्णन जास्त आहे. शरीरविक्रय करणाऱ्या समाजाचंही बरंच वर्णन त्यात आहे. या लोकांना कष्टकरी वर्ग समजलं जात नाही का? (कविता महाजन प्रत्यक्ष कामही करतात. वेश्यावस्तींमधे वगैरे. तिथे त्या जाती विचारत असतील असं वाटत नाही.) मेघना पेठे शहरी, मध्यमवर्गीय प्रकारचं म्हणावं असं लेखन करतात. ते लिखाण फक्त स्त्रीवादी असं म्हणवत नाही. त्यांचं लिखाण मला शहरी, मध्यमवर्गीय असंच वाटतं (आणि त्यांच्या कथा मला आवडतात). उलट बाजूने पहाता, दलित लेखकांमधे दया पवार, नामदेव ढसाळ यांची नावं माहित आहेत. दलित लेखिका किती प्रसिद्ध आहेत? नेमाडेंएवढी प्रसिद्धी फार लोकांना मिळत नाही; पण त्या वर्गातल्या लेखिका किती प्रसिद्ध आहेत? लेखिकांना या प्रकारच्या discrimination चा त्रास आपल्याकडेही होत असेल काय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण आम्ही हेच बोलतोय की त्यांच्याशिवाय अगदी पटकन आठवेल असं नाव समोर येत नाहीये. प्रमाण फार कमी आहे. स्त्री लेखिका खूप आहेत पण जाणीवपूर्वक लिहितात अशा फार कोणी नाहीत. कविताताईंच्या कादंबर्‍यांत कष्टकर्‍यांचं चित्रण आहे, पण एकूण ग्रामीण भागात स्त्रियांचे विचार काय आहेत याचा अभ्यास तिथे जाऊन लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज अगदी पुरुषी समजली जाणारी कामं करणार्‍या काही तुरळक स्त्रिया आजूबाजूला दिसतात. त्यातल्या परिस्थितीशरण किती आणि समजून उमजून करणार्‍या किती याची बरोबर आकडेवारी आपल्याला माहित नाही.

In reply to by पैसा

माझा प्रश्न किंचित निराळा आणि जास्त व्यापक आहे. कुठल्याही विषयावर लिहीणाऱ्या असू देत, स्त्री लेखिका आहेत कुठे? न्यूज मॅगझिन्समधे किंवा एका कालखंडात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमधे, अगदी जालावरही स्त्री लेखिकांचं प्रमाण किती? (साधारण दोन वर्षांपूर्वी हाच प्रश्न घेऊन धागा काढला होता.) लोकसंख्येत साधारण ५०% स्त्रिया आहेत, साक्षरतेचं प्रमाणही (शोधायला पाहिजे) पण कमी नसावं. दहावीच्या परीक्षेत मुलींना मुलांपेक्षा किंचित जास्त मार्क मिळतात, उत्तीर्ण होण्याचं प्रमाण किंचित जास्त आहे. मग या सगळ्या मुली जातात कुठे? उच्चपदस्थ स्त्रिया कमी, राजकारणी स्त्रिया कमी, मग त्यात लेखिकाही कमी. आणि मग ज्या मुळात संख्येने कमी त्यात एका ठराविक प्रकारचं लेखन करणाऱ्या स्त्रियाही संख्येने कमीच दिसणार. यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही. (त्यांची टक्केवारी कमी दिसली तर अधिक आश्चर्य वाटेल.) म्हणून आजूबाजूला, जिथे लिंगभेदाचं (gender bias) प्रमाण कमी आहे तिथे पाहिलं तर तिथेही स्त्रियांविरोधात असणाऱ्या किंवा दिसणाऱ्या बायसेसची चौकशी करणं अगत्याचं वाटतं. --- दया पवार, नामदेव ढसाळ ही नावं मुद्दामच घेतली. दलित काय आणि स्त्रिया काय, एकाच मनुवादी संस्कृती, परंपरेचे बळी. दलितांचा आकडा कमी आणि त्यांचा प्रश्न भारतापुरता मर्यादित. पण असे उत्तम दलित लेखक, कवी मराठीत झाले, त्यांना लोकप्रियताही मिळाली (आणि ते योग्यच आहे). पण दलित, कष्टकरी वर्गातून पुढे आलेल्या स्त्री लेखिका फार दिसत नाहीत; त्याच आर्थिक, सामाजिक वर्गातले पुरुष लेखक अगदी शालेय पाठ्यपुस्तकातही दिसतात. (माझं ललित-वाचन तोकडं आहे, पण माझ्या माहितीत अशा प्रसिद्ध लेखिका कोणीही नाहीत. जी काही स्त्री लेखिकांची नावं प्रसिद्ध आहेत त्या कदाचित गरीब घरातल्या असतील, पण वर्गसंघर्षाच्या बाहेरच्या.) बहुसंख्य समाज, जो फक्त वाचन करून आजूबाजूला काय सुरू आहे हे समजू पहातो, त्यांना या स्त्रियांचं आयुष्य काय हे समजतच नाही. कारण या स्त्रियांपर्यंत अजून शिक्षण, प्रगती, समानता, पोहोचलेलंच नाही. (आणि इथे पुन्हा एकदा सिमोन आठवते.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्तम. ढसाळ व दया पवार यांची नावे इथे अप्रस्तुत आहेत. तूर्तास स्त्रीवादी साहित्य अभिप्रेत आहे. त्यानुसार कविता महाजनांचे उत्तम उदाहरण आहे. पण बाकी? तुलनेने मेघना पेठे काय नैतर विभावरी शिरूरकर काय, मध्यमवर्गीय समाजाचेच प्रतिबिंब जास्त. बाकी कविता महाजन जाती विचारत असतील का या वृथा प्रश्नाचा तिरकसपणा हुकला. डिस्क्रिमिनेशनचा त्रास होत असेलही नसेलही. मुद्दा इतकाच की स्त्रीवादी अन कष्टकरी वर्गाचे चित्रण करणारे साहित्य म्हणावे तितके दिसत नाही. त्यामागची कारणे काय आहेत हे पाहूच, तूर्तास कमी दिसते यावर सहमती आहे का? नसेल तर महाजनांसारखी अजून उदाहरणे मिळाल्यास चर्चा दुसर्‍या मुद्यांपर्यंत वाढवता येईल.

मनमोकळी चर्चा चालू झाली आहे प्रतिसादांकरता धन्यवाद पण वर सदस्य पिलीयन रायडर यांनी म्हटल्या प्रमाणे : "चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम चर्चा होऊ शकते. पण्..पण..पण.. मुळ मुद्दा न भरकटता तो ह्याच प्रस्तावावर रहावा आणि परत एकदा "स्त्री वि. पुरुष" असा "नेहमीचाच यशस्वी" मुद्दा येऊ नये ही इच्छा.."
चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम पिलीयन रायडर - Sat, 18/01/2014 - 13:05 चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम चर्चा होऊ शकते. पण्..पण..पण.. मुळ मुद्दा न भरकटता तो ह्याच प्रस्तावावर रहावा आणि परत एकदा "स्त्री वि. पुरुष" असा "नेहमीचाच यशस्वी" मुद्दा येऊ नये ही इच्छा.. बाकी मुळ प्रस्तावावर सविस्तर प्रतिसाद सविस्तर विचार करुन देईन.. धन्यवाद
बाकी पिलियन रायडर यांचा प्रतीक्षा असलेला प्रतिसाद आला तर चर्चा मुळ प्रस्ताव मुद्द्याकडे येऊ शकण्यास मदत होईल असे वाटते.

अगदी बेसिक उदाहरण आहे हो ते. म्हणजे हा झगडा स्त्रिला ईतक्याशा कारणासठी पण करावा लागतो. तसच स्त्रीसाठी फक्त पुरुषप्रधान व्यवस्थेला विरोध ईतक्याच पातळिवर नाही रहात ह विषय. सामाजीक, सान्स्क्रुतिक ई. सगळ्याच चौकटी अंतर्भुत आहेत त्यात. सगळिकडे विरोधच असतो हो, मग ती पुरुषप्रधान व्यवस्था असो अथवा स्त्री ने स्त्री साठी पुरुषप्रधान व्यवस्थे च्या जोखडाखाली निर्मिलेली तथाकथित matrupradhan व्यवस्था असो.. (कसा लिहू हा शब्द?) बाकी काहिही व्यक्तीगत आरोप ई. नाहीत. अनाठायी हेत्वारोप वगैरे नाही कळले खरच. त्यामुळे पास.

In reply to by स्वप्नांची राणी

कसंय ना, विरोध करावा लागेल अशी परिस्थिती असेल तर विरोध करणारच की. असे असेल तर विरोध करण्याच्या विधानाला विरोध कशासाठी हा प्रश्न होता. पण राहूदे. तुमच्या प्रतिसादांवरून तुमची मते टोकाची नसावीत असे वाटते तस्मात शब्दच्छल करत नाही.

In reply to by बॅटमॅन

>>>>कसंय ना, विरोध करावा लागेल अशी परिस्थिती असेल तर विरोध करणारच की. हाच तर महत्त्वाचा प्रश्न आहे ना की विरोध करावा लागेल अशी परिस्थिती असली तरिही स्त्रि विरोध का करत नाहि. याचा खूप छान प्रतिसाद पिरा ने दीलाय खाली. >>> तुमची मते टोकाची नसावीत असंहि काही नहिये हां! दैव, नशिब, अध्यात्म, आत्मा, कर्मविपाक, गुरू आणि तत्सम बाबतित माझी अगदी टोकाची मते आहेत. आणि गम्मत म्हणजे या विषयांवर पुरुषांशी अगदी मनमोकळेपणी चर्चा होऊ शकते. पण स्त्रीयांशी यावर काही बोलण ईतक कठीण असत. माझ्या आसपासच्या स्त्रीवर्गात याविषयी ईतक प्रचण्ड अंतर्विरोध आहे की काही बोलायला जाव तर तत्क्शणी तुम्ही तिथे 'नकुश्या' होऊन जाता. सध्या ईतकचं पण लवकरच हा मुद्दा उदाहरणासहीत लिहिते.

In reply to by स्वप्नांची राणी

या प्रतिसादातील एक पुर्ण वाक्य प्रकाशित करताना कस कोणस ठाऊक पण गहाळ झाल, ते खालील्प्रमाणे; तुमची मते टोकाची नसावीत असंहि काही नहिये हां! दैव, नशिब, अध्यात्म, आत्मा, कर्मविपाक, गुरू आणि तत्सम बाबतित माझी अगदी टोकाची मते आहेत. आणि गम्मत म्हणजे या विषयांवर पुरुषांशी अगदी मनमोकळेपणी चर्चा होऊ शकते. पण स्त्रीयांशी यावर काही बोलण ईतक कठीण असत. माझ्या आसपासच्या स्त्रीवर्गात याविषयी ईतक प्रचण्ड अंतर्विरोध आहे की काही बोलायला जाव तर तत्क्शणी तुम्ही तिथे 'नकुश्या' होऊन जाता.