Skip to main content

लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/12/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अलिकडे पर्यंत गीतारहस्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ एवढच सामन्यज्ञान होत.पण एकेकाळी ह्या ग्रंथाने विक्रिचे तत्कालीन विक्रम केले असावेत असे वाटते. लोकप्रभा साप्ताहीकातील एका लेखात डॉ.यशवंत रायकर यांनी, '१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले.' अशी माहिती दिली आहे.या ग्रंथाचा जो भाग (बहुधा शेवटील भाग) ऑनलाईन उपलब्ध झाला ते १९२४ सालचे पुर्नमुद्रण आहे त्यावर ५००० प्रती असा आकडा आहे. लोकप्रभा साप्ताहीकातील डॉ.यशवंत रायकर यांचा हा लेख इतर बाबीकरता वाचनीय (आणि चर्चा करण्याजोगा) आहेच पण त्यात रायकरांनी एखाद्या विषयावर लेखन करताना एखादा परिपेक्ष,एखादी बाजू कशी सुटून जाऊ शकते याचा उहापोह केला आहे. रायकरांचा लेख आणि गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग वाचताना अजून एका गोष्टीकडे लक्ष गेल ते म्हणजे लोकमान्य टिळकांनी अवलंबिलेली संस्कृत ते मराठी अनुवादाकरता अवलंबलेली पद्धतपण उल्लेखनीय आहे. गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग मराठी विकिस्रोत प्रकल्पात या दुव्यावर उपलब्ध केला आहे.(मराठी विकिस्रोत प्रकल्पात पिडिएफ फॉर्मॅटचे वाचन करताना युनिकोडीकरण करत लिहिण्याची म्हणजे ग्रंथ बारकाव्याने अभ्यासण्याची संधी सुद्धा उपलब्ध होते) गीतारहस्याचा उपलब्ध सदर ऑनलाईन भाग आणि रायकरांचा लेख याच्या वाचना नंतर काही प्रश्न पडले ते असे १) गीतारहस्य ग्रंथाचे अधिकृत नाव श्रीमद्भभगवद्गीतारहस्य असे आहे का ? २) गीतारहस्य ग्रंथाचे एकुण भाग किती ? (अर्काइव्ह डॉट ऑर्गवरून विकिस्रोतावर आणलेली मूळ प्रतीचे १९२४चे पुनर्मुद्रण गीतारहस्य ग्रंथ आहे पण पृष्ठ संख्या कमी आहे का हा गीता रहस्याशी संबंधीत ग्रंथ आहे आणि सुयोग्य आवृत्ती आहे यास दुजोरा/खात्री करून हवी आहे.कारण प्रथम पृष्ठावर ह्या ग्रंथाचा शेवटील भाग असा उल्लेख दिसतो आहे.) *(कुणाकडे गीतारहस्याचे अजून भाग असतील तर ते मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोडीकरणाकरता पिडिएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देऊ शकल्यास हवे आहेत) *(ऑनलाईन उपलब्ध (दुसर्‍या का शेवटच्या ?) भागात काही पृष्ठे रिकामी दिसताहेत.२रे, १६वे व १८वे पान रिकामे आहे ह्यातील एखादे पान गहाळ नसून मूळातूनच रिकामे असल्याची खात्री करून हवी आहे.) ३) उपरोक्त ग्रंथाच्या प्रथमपृष्ठावर "कर्मविपाकसिद्धांत" असा ग्रंथ नामोल्लेख दिसत नाही मग तो कुठून येतो ? ४) लोकप्रभेतील रायकरांच्या लेखात "मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम" असा उल्लेख येतो ते सात निय्म कोणते इत्यादी माहिती हवी आहे.गीतारहस्य बद्दल इतर माहिती चर्चा झाल्यास स्वागतच असेल. उपलब्ध झालेली माहिती मराठी विकिपीडियावरील लेख लिखाणात वापरण्याचा मानस आहे. येत्या वर्ष २०१४ करता आपण सर्व आणि मिपा परिवारास शुभेच्छा.

वाचने 57957
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

गीतारहस्य म्हणजे टिळकांचे स्वतःचे जीवन विषयक सूत्र आहे हे खरच आहे. आयुष्यभर टिळक हेच तत्वज्ञान जगले. गीतेत त्यांना त्याचीच अनुभूती यावी हे ही सहाजीक आहे.
या गोष्टीशी सहमत.पण कुरुंदकरांच्याकडून टिळकांच्या एका बाजूच उदात्तीकरण होताना त्यांच्या व्यासंगाची बाजू नकळत गौण तर होत नाहीएना.तुम्ही म्हणता तसे गीतेच लोकमान्यांकडून वाचन झाल तेव्हाच गीतेतून कर्मयोग पूर्ण आयूष्याची प्रेरणा मिळाली.ती तशी गीतेतून मिळालेली नसती तर कुरुंदकर स्वतःच म्हणतात तसे "लोकमान्यांनी, गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता." पण त्यांना तसा गीते बद्दल लिहावा वाटला म्हणजे त्यांना गीतेचा व्यासंग होता. वर मिपा सदस्य विकास यांनी टिळकांची विवेकानंदांसोबतचे वर्णन केले आहे त्यातही,विवेकानंद कोण आहेत याची कल्पना नसताना त्यांच्याशी चर्चा झाली आहे तरीही, विवेकानंदांच्या इतर विचारांपेक्षा गीतेची कर्मयोगपरता हाच विषय टिळक उचलून धरतात ह्यातून त्यांचा व्यासंग आणि जीवन दृष्टीकोण दोन्हीही प्रगट होते आहे. कुरुंदकर कर्मयोग हा ज्ञानमुलक असावाच लागतो सोबत श्रद्धा अथवा भक्ती हवीच नुसते कर्म हा कर्मयोग नव्हे हा कुरुंदकरांचा दृष्टीकोण आणि टिळकांच्या दृष्टीकोणाशी जुळतो का वेगळा आहे ह्यावर जाणकारांनी/अभ्यासकांनी प्रकाश टाकावयास हवा. दुसरे असे कि जर कुरुंदकर विचारांनी समाजवादी होते तर ते स्वतः उपरोल्लेखीत कर्मयोग योगाची त्यांचीच व्याख्या आणि समाजवाद यांची सांगड कशी घालत. हा कुरुंदकरांशी संबंधीत तसा वेगळा मुद्दा आहे. पण टिळक त्यांच्या उत्तरकाळात बोल्शेवीकांबद्दलही चर्चा करत होते तर तेही त्यांचीही कर्मयोग व्याख्या कुरुंदकरी शैलीचीच असेल तर साम्यवादाशी सांगड कशी घालत असावेत अशा काही शंका मनात उपस्थित होतात. पुढेचालून असेही म्हणता येऊ शकते का की टिळकांच्या श्रद्धेचा भक्तीचा परीघ हा भारत आणि भारताय राजकीय स्वातंत्र्याच प्राधान्य असा होता.नवीन वर्षाच २०१४च स्वागत करताना एक मराठी विचारवंत त्यांच्या अनुदिनीवर म्हणतात कि एकाच प्रश्नास प्राधान्य देण हे इतर प्रश्नांच अजाणता घडणार सपाटीकरण अथवा अतीसुलभीकरण कि ज्यात इतर तत्कालीन प्रश्न गौण गृहीत धरले जातात. कदाचित तत्कालीन समाज सुधारंकाचे आक्षेप येण्याची जागा इथे असावी या कडे कुरंदकर ओझरता उल्लेख करताना भाषणात म्हणतात "...म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे." या कुरुंदकरांच्या विश्लेषणाकडे आपण कसे बघतो ?

In reply to by माहितगार

सर्वप्रथम कुरुंदकरांच्या लेखाच्या दुव्याबद्दल आपल्याला दुवा! :) त्यांचे लेखन कधी कधी पटले नाही तरी नुसतेच वाचनीय नाही तर विचार करायला लावणारे आणि त्यातून आपण काहीतरी शिकलो असे वाटते... पुढेचालून असेही म्हणता येऊ शकते का की टिळकांच्या श्रद्धेचा भक्तीचा परीघ हा भारत आणि भारताय राजकीय स्वातंत्र्याच प्राधान्य असा होता. टिळकांना प्रच्छन्न सुधारक म्हणायचे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या दृष्टीने वयं पंचाधिकं शतम् म्हणजे कुणालाही न दुखावता सर्वांना एकत्र घेऊन जायचे हे धोरण होते. त्यामुळे जर ते स्वातंत्र्यानंतर हयात असते तर आगरकर अथवा इतरांसारखे रॅडीकल नाही पण समाजसुधारक नक्की झाले असते असे वाटते. तरी देखील भारतीय आध्यात्मिक तत्वज्ञान हे धार्मिक कर्मकांडाच्या पेक्षा वेगळे आहे त्यापासून स्वतंत्र आहे. त्यामुळे देव या संकल्पनेचा नेहमीपेक्षा वेगळा अर्थ लावताना आपली संत मंडळी पण दिसतील... बाकी कर्मकांडे ही त्या त्या वेळच्या पद्धती म्हणायचे आणि सोडून देयचे. टिळकांवर गीतेचा प्रभाव असावा का? तर नक्की असेल असे वाटते. (अवांतरः वर अर्धवटरावांनी कुणा आजारी व्यक्तीजवळ टिळकांनी प्रथम गीता वाचल्याचे म्हणले आहे. हा प्रसंग मला नवीन आहे आणि अधिक कळून घेण्यास नक्की आवडेल.) गीतेचा प्रभाव पब्लीकवर आहे. कारण त्यात विचाराला चालना घेयची इच्छा असल्यास मिळू शकते! विनोबा म्हणतात, "गीताई माऊली माझी, तीचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी". अर्थात जेंव्हा आयुष्यात आव्हाने निर्माण होतात तेंव्हा असे गीता भक्त गीतेत उत्तरे/मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भले गीतारहस्यात टिळकांचे जीवनविषयक तत्वज्ञान असेलही, नव्हे ते होतेच, पण ते त्यांना गीतेतून मिळाले असे म्हणण्यात काहीच गैर नाही आणि म्हणूनच त्यांनी ते म्हणले. कुरुंदकरांच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. की ते जितके खर्‍या अर्थाने स्वतंत्र विचारवंत होते तितकेच त्यांचा कल हा डावीकडे झुकलेला होता. ते त्यांनी देखील कधी लपवलेले नव्हते. त्यामुळे कुठेही देवधर्म म्हणणे टाळणे त्यांना कायम योग्य वाटत आले. याचे एक मस्त उदाहरण म्हणजे, "छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य". जर वाचले नसले तर अवश्य वाचावे असे ते पुस्तक आहे. आय विश, कुरंदकरांना अधिक जगायला मिळाले असते आणि या छोट्याशा पुस्तकाचा ते अधिक विस्तार करू शकले असते... पण त्यात देखील त्यांची धडपड शिवाजीने कसे हिंदवी स्वराज्य म्हणून केले नाही, हिंदू धर्माशी संबंध नाही वगैरे वगैरे करण्यात जाते. तेच येथे टिळकांच्या बाबतीत झालेले दिसते. तरी देखील त्यांचे एकंदरीत लेखन बघता त्यांच्या विचाराच्या प्रामाणिकपणावर अविश्वास दाखवावासा कधीच वाटत नाही. असो: नवा धागा काढण्याऐवजी किंचित अवांतर. अमेरीकेत हवाई राज्याच्या अमेरीकन काँग्रेससाठीच्या (खासदार) लोकप्रतिनिधी तुलसी गॅबर्ड ह्या पहील्या हिंदू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी गीता जयंती निमित्त युट्यूबवर गीतेवरून टाकलेला संदेशः

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव: एक लहानसा मुद्दा असा कि टिळकांनी प्रथम गीतावाचन केलं ते आजारी माणसाच्या उशाशी बसुन, त्याच्या समाधानाकरता... नीलकंठ खाडिलकर त्यांच्या हिंदुत्व (मुंबई: परचुरे प्रकाशन २००५: ५३-५४) या पुस्तकात लिहितात की वयाच्या सोळाव्या वर्षी आजारी वडिलांना गीतेवरील टीका वाचून दाखविताना टिळकांच्या मनात हा प्रश्न आला की युद्ध करावे यासाठी सांगितलेल्या गीतेत मोक्षामार्गाचा विचार कशाला? अवांतर: खाडिलकर पुढे लिहितात--आमचे [टिळकांचे] प्रदीर्घ वाचन-चिंतन-मनन यानंतर असे मत झाले आहे की मनात भक्ती, मस्तकात ज्ञा,आणि हातात कुशल कर्म हीच गीतेची आणि यशाची त्रिमूर्ती आहे(पृ ५४).

माहितगार आपण उत्तम काम केले आहे ... हा ग्रंथ माझ्या नित्य वाचनात आहे आणि दासबोध आणि गीता रहस्य या दोन ग्रंथात कामालीचे साम्य मला आढ्ळले आहे ! माझ्या कडे १९१५ ची प्रत आहे तुम्हाला हवी तेव्हा उपलब्ध करुन देऊ शकेन. ही प्रत साक्षात टिळक महाराजांनी स्वाक्षरी करुन माझ्या आजोबांना ( फौजदार, औन्ध संस्थान )यांना भेट दिली आहे ! हा आमच्या घरचा अनमोल ठेवा आहे !

In reply to by विटेकर

प्रोत्साहनाकरिता धन्यवाद.मराठी विकिबंधू प्रकल्पात गीतेचे दोन तीन मराठी अनुवाद आधीच उपलब्ध आहेत नाही असे नाही.एक अनुवाद कुठून आला आहे माहित नाही पण आजच्या सरळ सुलभ मराठीत आहे सोबत ज्ञानेश्वरी आहे (गीताई आहे पण कॉपीराईट स्टेटस साशंकतेत असल्याने वगळली जाण्याची शक्यता आहे). पण प्रत्येक शब्दाचा अर्थ सिद्ध करत अथवा व्युत्पत्ती देत केलेल्या अनुवादाकरता गीतारहस्या शिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन हा प्रयास केला. गीतारहस्याचे युनिकोडीकरण करून उपलब्ध झाले आणी गीताईच्या कॉपीराईटचा प्रश्न मिटला तर गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा आजच्या मराठीतला अनुवाद मग गीताई मग गीतारहस्यातील अनुवाद मग ज्ञानेश्वरीतील श्लोक आणि त्याचे अर्थ असे करता येऊ शकेल पण या करता मराठी विकिप्रकल्पांवर अधिक चहात्या स्वयंसेवकांची गरज असेल.केव्हा किती आणि काय काय होते ते काळ ठरवेल.आपण गाडीचा मार्गावर आपल्या क्षमतेत आहे तेवढी पुढे नेऊन सोडावयाची. मी गीतारहस्य त्याच्या प्रस्तावनेपलिकडे अद्याप फारसा वाचला नाही पण आपण म्हणतातसे दासबोध आणि गीतारहस्य दोन्हीही वेग वेगळ्या धाटणीने कर्मयोगाची मांडणी करत असल्यामुळे साम्य वाटत असावे.आपल्या सारख्या जाणकारांनी खुलासा करणे अधिक योग्य पण दासबोधातील तत्वज्ञान मुलतः वाल्मिकी लिखीत योगवसिष्ठातून येत असावे असे योगवसिष्ठ चाळताना वाटले होते.गीतेचा आणि योगवसिष्ठाचा काही सहसंबंध किंवा तत्वज्ञानात साम्य फरक आहे किंवा नाही या बद्दल फारशी माहिती नाही.

In reply to by माहितगार

गीतारहस्याच्या पहिल्या भागातील विषयप्रवेश प्रकरणातील पान क्रमांक ५ वर योग्वसिष्ठाचा उल्लेख आढळला.योगवसिष्ठाच्या शेवटच्या निर्वाण या प्रकरणात भगवदगीतेतील अनेक श्लोक आणि भगवद्गीतेचे सार जसेच्या तसे गोवले असल्याचे टिळक नमूद करतात.आध्यात्म रामायण आणि योगवसिष्ठ हे ग्रंथ विस्तृत असले तरी ते भगवद्गीतेच्या मागाहूनचे असल्याचे त्यांच्या रचनेवरून उघड होते असे मत टिळक पान क्रमांक ६वर नमुद करतात

In reply to by माहितगार

नमस्कार, गीतारहस्याची अर्पण पत्रिका "अथ समर्पणम" लोकमान्य टिळकांनी संस्कृतातून लिहिली आहे.पूर्ण "अथ समर्पणम" चा शब्दार्था सहीत मराठी अनुवाद हवा आहे.

In reply to by माहितगार

श्लोक १. श्रीगीतेचा अर्थ इतका खोल अन गंभीर आहे. जुन्या कवींनी आणि अनेक आचार्यांनी बहुत प्रकारे तो विशद केल्यावर त्यापुढे माझी अल्पबुद्धी ती काय? श्लोक २. तरीही माझ्या उद्धटपणामुळे जुन्या आणि उचित अशा नवीन शास्त्रार्थांना समोर ठेवून गीतार्थ सांगण्यास मी पुन्हा तयार झालो आहे. श्लोक ३ ते पुढे. काय कार्य आणि काय अकार्य याचा निवाडा करण्याची इच्छा असलेले श्रेष्ठ लोक हा गीतार्थ ऐकण्यास पात्र आहेत. अशाप्रकारे सज्जन लोकांना प्रिय अशा कालिदासाच्या भाषेत मी कथन करीत आहे. श्लोक ४. (मी) टिळककुलोत्पन्न बाळ हा गंगाधराचा मुलगा असून शांडिल्य गोत्री ब्राह्मण आहे. महाराष्ट्रातील पुण्यपुरात(पुण्यात) राहतो. श्लोक ५. (मी) शालिवाहन शकाच्या १८३७ व्या वर्षी सज्जनांचा मार्ग अनुसरून हरिवचन स्मरून, श्लोक ६. हा ग्रंथ जनतेच्या आत्मारूपी देवास समर्पित करतो आहे. या ग्रंथामुळे परम पुरुष असा देव प्रसन्न होवो. खाली बहुतेक गीतेतला श्लोक आहे त्याचा अर्थ असा: हे कौंतेया, तू जे करशील, जे खाशील, जे यज्ञात अर्पण करशील, जे दान देशील आणि जी तपश्चर्या करशील ते सर्वही मला अर्पण कर.

जवळजवळ संपूर्ण गीतारहस्य मराठी विकिस्रोत प्रकल्पात चढवून आपण एक मोलाचे काम केले आहे. नव्या वर्षाची एक सुंदर भेट या निमित्ताने आपणा सर्वांना मिळाली आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. हा धागा वाचनखूण साठवावी असा मोलाचा झाला आहे.

अवांतरासाठी क्षमस्व... प्रत्यक्ष विषयाला धरून नसेल कदाचीत पण लोकमान्यांच्यावर येत असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर आत्ताच पाहीला आणि येथे सांगावासा वाटला...

केतकर ज्ञानकोशात लोकमान्य टिळकांचे एक वाक्य उधृत केले आहे '' गीता म्हणजे कर्म, भक्ति व ज्ञान या तीन स्वतंत्र निष्ठांची खिचडी किंवा कापूस, रेशीम व जर यांच्या चिंध्या शिवून तयार केलेली गोधडी नसून, कापूस, रेशीम व जर यांचे निरनिराळे धागे यथास्थानी योग्य रीतीनें जमवून दिल्यावर कर्मयोग नांवाचें मौल्यवान् व मनोहर असें गीतारूपी सनंग अव्वलपासून अखेरपर्यंत 'अत्यंत योगयुक्त चित्तानें' सलग विणलेलें आहे.'' (गीतारहस्य पा. ४६२)

In reply to by विकास

ना.सी.फडकेयांनीही गीतारहस्याबद्दल काही लेखन/उहापोह केले आहे असे वाचण्यात आले.त्यांच्या गीतारहस्यसंबंधीत लेखनाबद्दल/मतांबद्दल काही अधीक माहिती उपलब्ध झाल्यास हवी आहे.

In reply to by माहितगार

१८४९ साली ब्रीटीशांनी महाराजा दुलीप सिंग यास त्याच्याकडे असलेला कोहिनूर हिरा महाराणी Victoria हिला भेट म्हणून देण्यास भाग पाडले. तो हिरा नंतर Amsterdam येथे त्याला पैलू पाडण्यासाठी पाठवण्यास आला. पैलू पाडल्यावर तो अधिकच दिमाखाने चमकू लागला. हा संदर्भ पकडून लोकमान्यांनी लिहिले कि गीता ही कोहिनूर सारखीच दैदिप्यमान आहे आणि राहीलच. परंतु ज्या काळात आणि ज्या उद्देशानी ती अस्तित्वात आली ती परिस्थिती आज नाही. त्यामुळे तिचा स्वयंप्रकाश काही अंशी मंदावला आहे. म्हणून ज्ञानभक्तीमूलक कर्म योगाची छिन्नी घेऊन त्यांनी गीतेला नवीन पैलू पाडण्याचा प्रयत्न केला (गीतारहस्य लिहिले)जेणेकरून ती पैलू पाडलेल्या कोहिनूरप्रमाणे पुन्हा नवीन दिमाखाने चमकू लागेल.अर्थात लोकमान्यांचा यत्न किती यशस्वी झाला हे सुजाण वाचकांनींच ठरवायचे आहे. लोकमान्यांपासून स्फूर्ती घेऊन मीही Understanding karma in light of Paul Ricoeur’s philosophical anthropology and hermeneutics (Nagpur: International Centre for Cultural Studies 20006) हे ५०० पानी पुस्तक प्रकाशित केले आहे (माझं त्यांच्याशी काही नातं नाही!). थोडक्यात माझा विचार असा की प्राचीन काळी वेदांत (ज्ञानयोग) आणि कर्मांत (कर्मयोग) ही दोन स्वतंत्र (किंवा पर्यायाने परस्परपूरक = ज्ञानकर्मसमुच्चय) अशी मुक्तीची साधने होती. परंतु काळानुसार कर्मान्ताचा लोप होऊन फक्त वेदांत उरला. माझा उद्देश कर्मयोग हे स्वतंत्र (किंवा पर्यायाने ज्ञानाबरोबर पूरक) असे साधन परत उपलब्ध करून देणे हा होता. Paul Ricoeur यांची theory of action ही काही प्रमाणात आपल्या कर्म सिद्धांताशी मिळती जुळती आहे म्हणून मी तिचा आधार घेतला आहे. तसेच आपला पारंपारिक कर्म विचार आधुनिक परिभाषा आणि प्रणालीतून मांडला तर त्याला अधिक प्रतिसाद मिळेल ही पण अपेक्षा होती.

In reply to by श्रीनिवास टिळक

पैलू पाडणे या रुपकात, मला माझे विचार(संप्रदाय) जोडावयाचे नाहीत, तर भगवदगीता जशी मूळ रूपात आहे तशी दाखवावयाची आहे, आणि गीतेच मूळरूपच पैलू पाडलेल्या कोहिनूर हिर्‍या प्रमाणे आहे आणि लोकमान्यांचा गीतारहस्य लेखना मागचा दृष्टीकोण आहे असे गीतारहस्याची प्रस्तावना वाचताना वाटले. या धाग्याच्या वाचकांकरता थोडक्यात Paul Ricoeur यांची theory of action आणि कर्मयोग यांची थोडक्यात तुलना देता आल्यास हा धागा वाचनीय आणि समृद्ध होईल. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांकरता धन्यवाद.

नमस्कार, गीतारहस्याची अर्पण पत्रिका "अथ समर्पणम" लोकमान्य टिळकांनी संस्कृतातून लिहिली आहे.पूर्ण "अथ समर्पणम" चा शब्दार्था सहीत मराठी अनुवाद हवा आहे.

विकिस्रोत वरिल श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक) हा धागा आजच बघितला. हा एक अत्यंत चांगला आणि उपयोगी उपक्रम आहे. बर्‍याच प्रयत्नानेही न मिळणारे हे महत्वाचे पुस्तक असे उपलब्ध करून दिल्याबद्दल धागाकर्त्यांचे आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन. शिवाय त्या अनुषंगाने होणारे इतर टीकाटिप्पणी आणि साधकबाधक चर्चाही रोचक होईल असे वाटते. या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विकिस्त्रोत प्रकल्पास भेट, प्रतिसाद आणि शुभेच्छांकरता धन्यवाद. आपल्या आवडीचे वाचन लेखन होत राहो ही शुभेच्छा.

नमस्कार, अथ समर्पणम् चे युनिकोडीकरण केले पण काही अक्षरे पुसट होती अथवा जुन्या टंकांचा उपयोग होता त्यामुळे टंकलेली अक्षरे बरोबर आहेत याची करून हवी आहे. सोबतच प्रत्येक शब्दाचा शब्दार्थ आणि प्रत्येक ओळीचा अनुवाद करून मिळावा अशी जाणकारांना विनंती आहे. अनुवाद करताना अनुवाद प्रताधिकारमुक्त कॉपीराईट मुक्त करत आहोत असे लिहावे म्हणजे तो विकिस्रोत प्रकल्पात कॉपीपेस्ट करता येईल ॥अथ समर्पणम्॥ श्रीगीतार्थः क्व [खात्रीचेटंकन?] गंभीर: व्याख्यात: कविभि: पुरा । आचार्यैर्यश्च बहुधा क्व [खात्रीचेटंकन?] मेऽल्पविषया[खात्रीचेटंकन?] मति:॥ तथापि चापलादस्मि वक्तुं तं पुनरुद्यतः । शास्त्रार्थान् संमुखीकृत्य प्रत्नान् नव्यैः सहोचितैः [खात्रीचेटंकन?]॥ तमार्याः श्रोतुमर्हन्ति [खात्रीचेटंकन?] कार्याकार्य-दिदृक्षव:[खात्रीचेटंकन?] । एवं विज्ञाप्य सुजनान् कालिदासाक्षरैः प्रियैः ॥ बालो गांगाधरिश्चाऽहं तिलकान्वयजो द्विजः । महाराष्ट्रे पुण्यपुरे वसन् शांडिल्यगोत्रभृत ॥ शाके मुन्याग्नि वसुभू-संमिते शालिवाहने । अनुसृत्य सतां मार्गं [खात्रीचेटंकन?] स्मरंश्चापि वचो ऻ[खात्रीचेटंकन?] हरेः ॥ समर्पये ग्रंथमिमं श्रीशाय जनतात्मने । अनेन प्रीयतां देवो भगवान् पुरुषः परः ॥ --- यत्करोषि यदश्नासि [खात्रीचेटंकन?] यज्ज्य्द्दोषि ददासि यत् । यत्तपस्यासि कौंतेय तत्कुरुध्ध मदर्पणम् ॥

In reply to by माहितगार

ओ साहेब, धाग्यावरचे प्रतिसाद पाहण्याचे कष्ट घेत चला की जरा. कालच टंकलाय अनुवाद, दिसला नाही का आँ???????????????????? http://misalpav.com/comment/542617#comment-542617

In reply to by बॅटमॅन

पुरता अगदी अगदी क्षमस्व.सध्या बर्‍या पैकी मिपावर पडिक आहे. प्रतिसाद पाहण्याचा सारखा प्रयास असूनही आपली आपली अनुवादाची एवढी सुंदर भेट देणारा अत्यंत उपयूक्त प्रतिसाद नेमका राहीला असे दिसते. आपल्याला अजून एक आग्रहाची विनंती आहे.आपण अनुवाद प्रताधिकार कॉपीराईट मुक्त करत असल्याचे नमूद केलेत तर तो विकिस्रोत प्रकल्पात घेता येईल आणि मिपा शिवाय इतर मराठी बांधवांनाही आपण केलेल्या या अनुवादाचा लाभ आणि आनंद घेणे सोपे जाईल. अनुवाद उपलब्ध करण्या बद्दल अजून एकदा धन्यवाद

In reply to by बॅटमॅन

आपण करून दिलेला अनुवाद विकिस्रोतवर चढवला आहे. लोकमान्य टिळक ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या सुरवातीसच म्हणतात "श्रीमदभगवद्गीतेवर अनेक संस्कृत भाष्यें ,टीका आणि प्राकृत भाषांतरें अगर विस्तृत सर्वमान्य निरुपणें असतां हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कारण काय हें जरी ग्रंथारंभीच सागीतले आहे,..." आपण दिलेला अनुवाद वाचल्या नंतर,उपरोक्त संदर्भ 'अथ समर्पणच्या' पहिल्या आणि दुसर्‍या श्लोका बद्दल असण्याची शक्यता वाटली.तसेच, श्लोक क्रमांक ५, ६ आणि गीतेतील श्लोक सोबत वाचले तर जनतेचा आत्मा आणि हरी (इश्वर) यांना समर्पण आणि अर्पण आहे. लोकमान्यांना जनतेचा आत्मा आणि हरी यांचे अपरोक्ष अद्वैत दर्शवायचे असे काही असेल का असेही वाटून गेले. आपल्या अनमोल अनुवाद 'भेटी' करता पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by माहितगार

बहुतेक सर्व बरोबर. क्व शब्द बरोबर आहे. क्व सूर्यप्रभवो वंशः, क्व मेs/ चाल्पविषया मति: हे रघुवंशाचे प्रथम वाक्य सुप्रसिद्ध आहे. [कुठे तो सूर्यप्रभव वंश (आणि तो वर्णू इच्छिणारी) कुठे माझी अल्पमती. मे+अल्प किंवा च+अल्प]. फक्त शेवटी गीतेतल्या श्लोकात यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् असे पाहिजे.

In reply to by राही

आपल्या मार्गदर्शना प्रमाणे विकिस्रोत प्रकल्पातील लेखन अद्ययावत करता आले.खूप खूप धन्यवाद

Understanding karma...ची सुधारित आवृत्ती amazon.com वर उपलब्ध आहे. गुगलवर पण आहे (अर्थात ठिकठिकाणी मधली पाने गाळलेली). मूळ आवृत्तीचा draft skydrive वर चढविला आहे त्याचा दुवा https://skydrive.live.com/redir?resid=838F479655AE3BFB%21129

गीतारहस्याच्या मूळ प्रथम आवृत्ती (१९१५) चे मुखपृष्ठ आणि नंतरच्या आवृत्तींचे मुखपृष्ठ यात अंशतः फरक असावा असा असे वाटते. मूळ प्रथम आवृत्ती (१९१५) चे मुखपृष्ठा नंतरचे पान मिपा सदस्य श्री जयंत कुलकर्णी यांनी पुरवलेल्या छायाचित्रातून मिळाले.बहुधा मुखपृष्ठावरील मजकुर आणि त्यानंतरच्या प्रथम पानावरील मजकुर एक सारखाच असावा असा अंदाज आहे. मुखपृष्ठा नंतरच्या प्रथम पानावरील मजकूर खाली टंकून उपलब्ध केला आहे.१९१५ची आवृत्ती असलेल्या गीतारहस्या चाहत्यांकडून खालील मजकूर १९१५ आवृत्तीच्या मुखपृष्ठावर असल्याची खात्री करून हवी आहे. शिवाय शेवटच्या कव्हरचे छायाचित्र पहाण्यात आलेले नाही त्यावरही काही मजकुर असल्यास अवश्य कळवावे हि नम्र विनंती
The Hindu Philosophy of Life,Ethics and Religion ॐ तत्सत् । श्रीमद्भवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र गीतेचें बहिरंगपरीक्षण,मूळ संस्कृत श्लोक[टंकनभेद],मराठी भाषांतर,अर्थ- निर्णायक टीपा,पौर्वात्य व पाश्चिमात्य मतांची तुलना वगैरेसह . हा ग्रंथ बाळ गंगाधर टिळक यांनीं रचिला. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ गीतासु. ३. १९. पुणें. शके १८३७. सन १९१५. किंमत तीन रुपये.