Skip to main content

एक आठवण / ती

Published on मंगळवार, 03/12/2013
कालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. तब्बल तीस वर्षानंतर ती दिसली होती. रूप रंग बदलले असले तरी ही तिने मला ओळखले. एक मंद स्मित तिच्या चेहऱ्या वर उमटले. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, असे वाटले, वसंत ते शिशिराचा प्रवास क्षणातच घडला. तिने पाठ फिरवली आणि पुढच्याच अर्थात पटेल चौक स्टेशन वर ती उतरली. मी पाहताच राहलो. त्या वेळी सुद्धा ती अशीच आयुष्यातून निघून गेली होती, काही न बोलता. पहिल्यांदा तिची भेट मंडी हाऊसच्या सरकारी वाचनालयात झाली. मला आठवते, वसंत कानिटकरांचे ‘प्रेम तुझा रंग कसा’ ह्या नाटकाचे पुस्तक चाळत होतो. हे पुस्तक मला मिळेल का, हळूच तिने विचारले. ‘लेडीज फस्ट’, या सिद्धांताचे अनुकरण करून, पुस्तक तिला दिले. थेंकस, तिचा मंजुळ आवाज कानात घुमला. तिला वसंत कानिटकरांची नाटके आवडायची. नुकतीच ती सरकारी नौकरीच्या निमित्याने नागपूर हून दिल्लीला आली होती. तिलाही वाचनाची हौस. आमच्या गाठी-भेटी सुरु झाल्या आणि आयुष्यात ही प्रेमाचा वसंत फुलू लागला. कित्येकदा लंच टाईम मध्ये चाणक्य थियेटर मध्ये पहिल्या रांगेत बसून आंग्ल भाषेतील न कळणारे अनेक सिनेमे बघितले, बहुतेक वेळा चित्रपटाचे नाव ही माहीत नसायचे, शिवाय अश्या वेळी सिनेमा पाहण्यात कुणाला रस? (सिनेमा किती ही हाउस फूल असला तरी चाणक्य थियेटरमध्ये, सिनेमा सुरु होण्याच्या अर्धातास आधी, पहिल्या दोन रांगांचे ६५ पैशाचे तिकीट मिळायचे, बहुतेक लंच मध्ये सिनेमा पाहणाऱ्या प्रेम करणाऱ्या सरकारी कर्मचार्यांसाठी केलेली सोय असावी). तिकीट नाही मिळाले तर समोरच्या ‘नेहरू पार्क’ मध्ये हातात हात घेऊन मनसोक्त हिंडायचो आणि तीन वाजे पर्यंत ऑफिस मध्ये परत. कुणालाही काही कळायचे नाही. तो दिवस, मला चांगलाच आठवतो, ऑफिस सुटल्या वर सायंकाळी ती ‘आयएनए’ मार्केट वर भेटली होती. त्या वेळी तिथे आजच्या सारखी तिथे गर्दी नसायची. जवळ-पासच्या सरकारी कालोनीतले कर्मचार्यांचे परिवार तिथे खरीदारी करता यायचे. दक्षिण भारतीयांची संख्या ही त्यात मोठी. सहाजिक आहे, तिथे दक्षिण भारतीयांची इडली- दोस्याची तीन-चार दुकाने होती. साडे तीन रुपयात, साधारण डोस्यापेक्षा दुप्पट मोठा डोसा तिथे मिळायचा. दोन लोक मिळून एक डोसाच खाणार हे दुकानदारांना नक्कीच माहीत असेल. कित्येक सरकारी बाबूंचे प्रेम प्रसंग इथल्या डोस्यांवरच फुलले आणि कोमजले असतील. अर्थात आम्ही ही एकच डोसा मागवत असू व त्या नंतर एकच कप मद्रासी काफी मिळून पीत असू. (एका-दुसर्याला घास भरवत खाण्याचीही गम्मत फक्त प्रेम करणार्यांनाच कळू शकते). डोसा खाल्यावर दोघं दुकानातून बाहेर पडलो. मोगर्याचा सुगंध वातावरणात पसरलेला होता. सहज बघितल, एक पोरगा मोगऱ्याचे गजरे विकत होता. राहवले नाही, एक जोडी गजरा विकत घेतला. ती म्हणाली हे काय? मी: ‘तुझ्या काळ्याभोर केसांवर हा गजरा शोभून दिसेल’. ती: ही दिल्ली, आहे आणि मला माहीत आहे, इथे कुंवाऱ्या पोरी गजरा नाही घालत. मी: महाराष्ट्रात लहान पोरी सुद्धा गजरा घालतात, आपण मराठी आहोत. ती: आपण दिल्लीत राहतो, घरी आईने विचारले तर काय उत्तर देणार? मी: खरे काय ते एकदाचे सांगून टाक. ती: लग्नाचे! तू करशील? मी: नौकरी करणाऱ्या मुलीसोबत लग्न करायला मला निश्चित आवडेल. ती: तुझी गाडी नेहमी पेश्यांवर येऊन का बरं अडकते. तू एकदम अरसिक आहे, तुला खूप खर्च करणारी आणि एक पै न कमविणारी मुलगी भेटली पाहिजे. मी: ती, तू असेल तर मला आवडेल. ती चक्क लाजली. गजरा केसांत लावत ती म्हणाली, मी कशी दिसते. मी: मोगऱ्याच्या फुलांपेक्षा ही सुंदर. त्या दिवशी मी आनंदात तरंगत-तरंगत घरी पोहचलो. दुसऱ्या दिवशी, ऑफिस सुटायचा आधी तिला फोन केला. दुसरी कडून, एक रुक्ष आवाज ऐकू आला, ‘उसकी ट्रान्सफर हो गयी है. कहाँ? हमें नहीं मालूम. कोई नंबर? नहीं मालूम. फोन ठेवला. पुढे कित्येक दिवस तिच्या फोनची वाट पाहत होतो. न फोन आला, न ती भेटली. आज इतक्या वर्षानंतर ती भेटली आणि पुन्हा काही न वोलता निघून गेली. तिला आवाज द्यावीशी वाटत होती. दोन क्षण थांबली असती, बोलली असती तर काय झाले असते? गेलेला काळ आता परत येणार नव्हता. जास्तीस-जास्त सीपी मध्ये ‘केफे काफी डे’ मध्ये बसून एक कप काफी सोबत आयुष्याचा प्रवासाबद्धल बोललो असतो. तिच्या नवऱ्या- मुलांची विचारपूस केली असती आणि स्वत:च्या संसाराबाबत बोललो असतो. ती तिच्या संसारात सुखी असलेली पाहून, मला आनंदच झाला असता. ‘अगला स्टेशन उत्तम नगर ईस्ट है’ अनाउन्समेंट झाली. विचारांची तंद्रा भंग झाली. स्टेशन वर उतरलो. घरच्या दिशेने चालू लागलो. नेहमीच्या फूलविक्रेत्या कडून एक जोडी गजरा विकत घेतला. दुकानदाराने सहज विचारले, आज भाभीजी का जन्मदिन है क्या? मी नुसताच हसलो. घरी आलो. सौच्या हातात गजरा ठेवला. हात-तोंड धुतले. नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसलो. सौ. चहा घेऊन आली. तिने केसांत गजरा घातलेला होता. चहाचा कप हातात देत, तिने आपले मोठे आणि भेदक डोळे माझ्यावर रोखत विचारले, खरोखरच! हा गजरा तुम्ही माझ्या साठी आणला आहे का? सौ. समोर खोट, बोलणे मला कधीच जमले नाही. मी म्हणालो, आज ती भेटली होती, पूर्ण कथा सांगितली. शेवटी म्हणालो गजरा घातलेली तू ही तिच्याच सारखी सुंदर दिसते आहे. सौ. ने हसत-हसत, खट्याळपणे विचारले. ती खरोखरची होती की कल्पनेतली?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5274
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

प्रेयसीपेक्षा पत्नीच जास्त समजुतदार,नशीबवान आहात.

In reply to by अनिरुद्ध प

पूर्णपणे सहमत... नशीबवान आहात. :)

In reply to by अनिरुद्ध प

प्रेयसी बायको होई पर्यंत समजूतदार असते , पुढे पत्नी झाल्यावर ....... कथा आवडली. दुनियादारी सिनेमा मधील एक वाक्य आठवले. नाका तोंडात पाणी जायला लागल्यावर आपण जगण्याची जी धडपड करतो तशी आपल्या आयुष्यातील प्रेम मिळवण्यासाठी का नाही करत .

(एका-दुसर्याला घास भरवत खाण्याचीही गम्मत फक्त प्रेम करणार्यांनाच कळू शकते).
क्या बात है! इथच कथेने मनात घर केलं.... अन निव्वळ कल्पनेत प्रेम करणारा हे लिहुच शकत नाही. परवा बालमैत्रिण (?)भेटली. अशीच हुरहुर अनुभवली..... घटस्फोट घेतेय म्हणाली. मी निशब्द.

In reply to by अग्निकोल्हा

खरेय, मला कुठे हॉटेलमध्ये एखादे जोडपे (विवाहित असो वा अविवाहीत) वेगवेगळे अन आपापले मेनू खाताना दिसले तर काय बावळट आहेत असेच वाटते.. बाकी जेवल्यावर कोणीतरी आपल्या "आ" केलेल्या तोंडात बडीशेप टाकण्यातही एक मजा असते..

In reply to by तुमचा अभिषेक

लेखाबद्दल बोलायचे झाल्यास थांबवायचे होते राव, बोलून घ्यायचे.. न बोलता लागलेल्या रुखरुखीपेक्षा बोलून काही खपल्या निघाल्या तर निघू द्यायच्या.. मला फेसबूकावर अन आता वॉस्सअपवर जुना क्रश भेटला तरी तिची चौकशी करून आधी ती सुखात नांदतेय हे कन्फर्म करतो, आणि मग बिनधास्त सांगतो की मला तेव्हा तू आवडायचीस, पण आता मी सुद्धा सुखात आहे तर डोण्ट वरी, मागे नाही लागणार तुझ्या परत.. :)

In reply to by ग्रेटथिन्कर

च्यायला , रायसीना पर्वतावर गेल्या ३० वर्षांपासून तपस्या करतोय तरी ही 'धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी' या दोन शब्दांचे अर्थ कळला नाही.

......! (नवर्‍याच्या मैत्रीणी आवडणारी अपर्णा)

आवडली. अर्रर्रर्र म्हणेस्तोवर अरे वा म्हणायला लावणारी.

नशीबवान आहात...(बायकोच्या बाबतीत) :) लेख मस्तच

तुमची बायको समजूतदार आहे हे चांगलेच पण अशी व्यक्ती की जी, सोडताना नीट मनमोकळं बोलणं तर जाउंद्या पण काहीही निरोप न घेता गायब होते, ते ही वर्षानुवर्ष, तुमच्या आयुष्यात पुढे आली नाही हेच बरे! Few people come in our life for season and very few for reason! सिझन संपल्यावर तुमची मैत्रिण गायब झाली ह्यातच काय ते समजा. गंमत म्हणजे, ३० वर्षांनीही पुन्हा तेच केले नि तिने तुमच्या हातात मात्र गजरा..! - (पृथ्वीतत्त्वाचा) उपास