Skip to main content

अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (2)

लेखक शिवोऽहम् यांनी बुधवार, 18/09/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. सिंहलांनी तमिळांचा चालवलेला वंशविच्छेद, त्याविरुद्ध एकाकी झुंज देणारा हिकमती प्रभाकरन, त्याचे जिवावर उदार सैन्य आणि त्यांचा निर्धार. सगळेच रसायन जबरी होते माझ्यासारख्या अंड्यातुन बाहेर येऊ पाहाणार्‍या मुलाच्या दृष्टीने. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ त्या वयात अशा गोष्टींविषयी, व्यक्तींविषयी सुप्त आकर्षण वाटत असे, असे आता मागे वळून बघताना जाणवते. इतरांच्या तुलनेत माझ्याकडे वाचनाचा रतीब मोठा होता हे वर सांगितलेच आहे. स्थानिक वृत्तपत्रे फुकटात येत असत, कर्टसी म्हणून. बाहेरगावची आणि इंग्रजी वृत्तपत्रे बाबा घेत असत. सकाळी एक गठ्ठा सकाळ, पुढारी, सत्यवादी, नवसंदेश, ऐक्य, तरूण भारत, जनवाणी(का दुसरे नाव होते? बाबुराव धारवाड्यांचा पेपर, इचलकरंजीहुन निघणारा). संध्याकाळी महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स ऑफ इंडिया, एक्स्प्रेस् व आधल्या दिवशीचा हिंदु. आठवड्याला इलस्ट्रेटेड वीकली, दोन आठवड्यानी फ्रंट्लाईन, स्पोर्टस्टार, आजोबांनी कधीकाळी पूर्ण वर्गणी भरली असल्यामुळे ऑर्गनायझर. शिवाय दर शनिवारी पोलिस टाईम्स येत असे तो निराळाच. त्यातील ग्राफिक चित्रे, बटबटीत बातम्या आणि क्रूड काव्यमय शैलीतले मथळे बालमनाला फार मनोरंजक असत. पण लहान मुलांना उघड, उघड वाचायची चोरी होती. मोठ्यांनी चवीने, चघळत वाचायचा पेपर होता! पो. टा. आलेला दिसला की बाबा तो तत्काळ शेजारी देऊन टाकत. त्यामुळे तो चुकून हातात पडल्यानंतर बाबांच्या नजरेआड, एखाद्या कोपर्‍यात बसून पटापट मुख्य मजकुर वाचुन काढावा लागे. अशा फाष्ट वाचनाला स्पीड रिडींग म्हणतात हे पुढे समजले आणि कॉलेजच्या अभ्यासात उपयोगही झाला. एकदा कोल्हापुरात प्रेमचंद डोगरा आला होता. त्याचे शरीरसौष्ठव प्रदर्शन पहायला आम्ही शाहु स्मारकात गेलो. मी नुकताच सातवी-आठवीत सुर्यनमस्कार, दंड वगैरे व्यायाम सुरू केला होता त्यामुळे हा बलभीम पहायची मला उत्सुकता होती. म्हणुन मीदेखील बाबांसोबत गेलो. कार्यक्रमात शेवटी प्रेमचंदचे प्रदर्शन झाले, डोळे विस्फारुन एकेक पोझेस पाहिल्या. अशक्य काम होते सगळे! मग कार्यक्रम संपला. आम्ही बाहेर पडायला लागलो. ऑर्गनायझर होते अनंत सरनाईक, स्वतः जबरदस्त बॉडीबिल्डर. बाबांना पाहुन त्यांनी हसुन हात केला. बाबांशी गप्पा चालु झाल्या आणि मध्येच बाबा त्यांना म्हणाले, ह्याला आवडतो तुमचा पोलिस टाईम्स! मी चाटच पडलो. मला कल्पनाच नव्हती की बाबांना हे माहित आहे म्हणुन. 'हो, आवडतो' म्हणायचीही चोरी! सरनाईक आणि बाबा हसले, मला फार लाज वाटली स्वतःची, असे आठवते. पण तेवढ्यापुरतेच. पुढच्या शनवारी पुन्हा पोलिस टाईम्सची वाट पाहिली असेल. त्यावेळी स्थानिक पेपरात येणारे विषय, म्हणजे नॅशनल, इंटरनॅशनल वगैरे, मला फारसे आठवत नाहीत. पण महाराष्ट्र टाईम्स, एक्स्प्रेस्, वीकली, हिंदु हे फार चांगले असे बाबा म्हणत असत. त्यामुळे मी वाचायचा प्रयत्न करत असे. सातवीच्या सुट्टीत फार कष्टाने मी टॉम सॉयरची गोष्ट इंग्रजीतुन वाचली. महिना लागला असेल! पण मराठी माध्यमाच्या मुलाला कितीसे इंग्रजी येणार? म्हणुन बाबांना सांगितले की तुम्हीच तुम्हाला आवडलेले थोडे-थोडे वाचुन दाखवा. मग त्यांनी गाळीव बातम्या मला वाचुन दाखवाव्यात, कधी मराठी तर्जुमा सांगायचा तर कधी नाही. पण एकुण बातम्या वाचायची, ऐकायची आवड लागली. हे सगळे वाचन, श्रवण चालले असताना मुख्य इतिहास घडत होताच, जगात उलथापालथी सुरू होत्या आणि अनिवार्य, अनाकलनीय घटनाप्रवाहात माणसे, समाज, राष्ट्रे होत्याची नव्हती होत होती. पण मला ते फक्त वाचुन कसे कळणार? चित्रांनी, फोटोंनी ते काम सोपे केले. चमच्या-चमच्याने भरवले म्हणा ना. भिंद्रनवालेंचा काळ फार धामधुमीचा होता. पंजाबात पुर्वी एका घरात मोठा मुलगा हिंदु आणि धाकटा शीख अशी विभागणी असायची. शीख धर्म न मानता पंथ असे सारे समजत असत पण मास्टर ताराचंदांनी, माझ्या माहितीप्रमाणे, फाळणीच्या काळात शीखांच्या वेगळेपणाचा उच्चार केला. अकालींना काटशह देण्याच्या संजय आणि इंदिराबाईंच्या युक्तीने भिंद्रनवालेंचा उदय पंजाब राजकारणात झाला. तो संत होता की नाही हे माहित नाही पण राजकारणी नव्हता हे नक्की. खालसा आणि निरंकारी असे काही असते हे मला फोटोंवरून समजले. सात मजली निळी पगडी घातलेले, पांची हत्यारे ल्यालेले ते उंचेपुरे खालसा. आणि पांढरी साधी पगडी घातलेले संत-समागमवाले निरंकारी. तर निरंकारी/खालसा वादात शिखांची यादवी सुरू झाली आणि आज आपल्याला माहित असलेल्या पंजाब प्रश्नाची वात पेटली. त्या आगीत कोणी आपली पोळी शेकली आणि कोणाचे सरपण कामी आले ते सर्वज्ञात आहे. 'फ्रॅट्रिसायडल' शब्दातच काही चिरफाड करण्याचा भाव आहे असे मला वाटते, हिंदु-शीखांच्या, शीख-शीखांच्या संघर्षात अनेक कुटुंबे उध्वस्त झाली पण लोकांपर्यंत माहिती पोहोचत नसे, आणि बरीच सेंसॉरही होत असे. एका मोठ्या संपादकाला, लाला जगत नारायण यांना, दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातात पण मराठी वर्तमानपत्रांमध्ये एकही बातमी नव्हती, अपवाद फक्त म. टा. हे बाबांनी सांगितल्याचे आठवते. घटना मी स्वतः वाचायला लागण्याआधीची आहे. टा. ऑ. इं. तेव्हाही सरकारधार्जिणा होता आणि 'इन द गुड बुक्स' राहुनच त्यांनी आजचे साम्राज्य उभे केले आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चवथा खांब असे म्हणतात, पण भारतात एक्प्रेस्, इलस्ट्रेटेड वीकली, हिंदू हे आणि असेच इतर काही त्यातले बिनीचे मानकरी म्हणावे लागतील. अर्जनसिंह, जसजीतसिंह अरोरा, दिपेंदरसिंह हे सेनानी सरदार 'दिसत' असत. पण कुलदीपसिंह ब्रार म्हणजे सफाचट सैनिक. मग मला आमच्या वर्गातला रणजीतसिंह खर्डेकर आठवे. खानदानी मराठयांमध्ये असलेले हे 'सिंहां'चे फॅड तोवर मला माहित नव्हते. ब्रार यांच्या मुलाखती, त्यांचे निर्णायक डावपेच आणि त्यांचा अरूण वैद्यांबरोबर चालत असतानाचा फोटो मला आठवतो. त्याच्याच शेजारचा फोटो होता भिंद्रनवालेंच्या छिन्नविच्छिन्न झालेल्या चेहर्‍याचा. म्हणजे सरकारने तसे जाहिर केले होते. भिंद्रनवालेंचा उजवा हात असणारे, निवृत्त मेजर जनरल शाहबेगसिंह यांचे शव राष्ट्रध्वजात गुंडाळण्यावरुन उठलेली राळ आठवते. शौरी एक्प्रेसचे संपादक असताना झालेला झगडा तर पत्रकारितेसाठी प्राणांतिक असाच होता. अंतुले प्रकरणात त्यांनी कॉन्ग्रेसला दे माय, धरणी ठाय करून सोडले होते. अंतुले खुर्चीवरून पायौतार झाल्यावर आलेले बाबासाहेब भोसले यांनी छोट्या इनिंगमध्ये जोरदार बॅटिंग करून अवघ्या महाराष्ट्राला लोटपोट हसविले. कोल्हापुरात आलेले असताना त्यांना बाबांनी राजोबा-गडदे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वैमनस्याबद्दल विचारले होते तेव्हा ते असे काहीसे म्हणाले होते "चालायचंच हो! एवढं काय मनावर घेता तुम्ही पत्रकार लोक? पुर्वी एका न्हाव्यानं मिशी उडवली तर सगळ्या न्हाव्यांची भावकी बोडकी व्हायची. आता एखादा खपला तर दुसरा एखादा खपणार इतकेच!" राज्यकर्त्या व्यक्तीला समाजाच्या नाडीवर बोट ठेवुन चालावं लागतं वगैरे गैरसमज माझ्या डोक्यात कधी शिरलेच नाहित याचं कारण अशा नेत्यांची मुक्ताफळे. मराठी पेपरात बरंच काही येत होतं. कोल्हापुर सकाळ हा त्यातल्या त्यात राज्य/राष्ट्रीय स्तरावरील बातम्या द्यायचा तर पुढारी हा इतर स्थानिक बातम्यांसाठी वाचला जायचा. म्हणजे मंगळवार पेठ व शिवाजी पेठ येथील तरुणांमध्ये कमानपाटा हाती घेऊन झालेली हाणामारी, किंवा शाहु मैदानावर फुट्बॉलच्या मॅचमध्ये प्रेक्षकांनी खुश होऊन विजेत्या संघातिल खेळाडुला प्रत्येकी २ कोंबड्या तिथल्या तिथे घोषित केल्या. अशा बातम्या आणि 'विश्वसंचार' नावाचे तुफान लोकप्रिय चौकटवजा सदर. त्याशिवाय इतर वृत्तपत्रे अनेक होती. नवसंदेश हा कल्याण्/मुंबई मटक्याच्या आकड्यांसाठी वाचला जाई. सत्यवादी हा पेपर कुस्त्यांचे रंगतदार वृत्तांत देत असे. राजकुमार पाटलांचे वडील, आता नाव आठवत नाही, चालवत असत. शाहु मिलसमोर तेव्हा असलेल्या मैदानात एडक्यांची टक्कर होत असे. मोठमोठे वळलेली शिंगे असलेले एडके मोठ्या मस्तीत उभे असायचे. एकदा जिंकलेल्या एडक्याला, त्याच्या मालकाला बक्षिस देण्यासाठी सत्यवादीचे मालक आले होते आणि ते समोर येताच अजुन मूडमध्ये असलेल्या एडक्याने धडक देऊन त्यांना आडवे केले होते! हळुहळु वाचायची गोडी लागली आणि मग मोहरा वळला हिंदुकडे. गोष्टी घडतच होत्या तशा तेव्हा. जिनिवाहुन कोणी एक नवी पत्रकार, चित्रा सुब्रह्मण्यम नावाची, नव्या बातम्या देऊ लागली होती...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7567
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

क्रमशः टाकायला नेहेमी विसरतो..

हाही कव्हरेज आवडला. पुढारी माझाही लै फेव्हरीट पेपर होता लहानपणी. विश्वसंचारच्या कितीतरी कात्रणांचा साठा करून ठेवत असे. गुरुवारी निघणारी भरारी पुरवणीही जबरीच. अन पोलीस टाईम्सबद्दल काय बोलावे? हाष्टेलवरचा फेव्हरीट पेपर ;) तीच कथा दै. "काली गंगा" (इच्चलकरंजी स्पेशन) ची.

In reply to by बॅटमॅन

पोलीस टाईम्सचे रिफाईन्ड व्हर्जन - दक्षता. ;-) हा ही भाग पहिल्या भागाप्रमाणेच वाचनीय. सदर 'इतिहास' १९८० ते १९९५ चा आहे का..?

In reply to by मोदक

दक्षता? नेव्हर हर्ड धिस वन. पाहिले पाहिजे ;) सदर इतिहास माझ्या मते इ.स.२००३ पर्यंत लांबवल्यासही हरकत नसावी.

In reply to by बॅटमॅन

दक्षता हे पोलिस टाईम्सचे प्रेकर्सर म्हणावे, काळानुसार आणी कंटेंटनुसारही. इतके अंगावर येत नसे. श्री नावाचे एक अफलातुन साप्ताहिक होते. त्यात भानामती, काळी जादु, नरबळी हे पेटंट विषय असायचे. शिवाय इतर माल-मसालादेखिल असायचा. हे साप्ताहिक घरी आणायला, वाचायला बंदी होती. पण खामगावला मी गेलो असताना मावशीच्या माळ्यावरच्या अडगळीत मला खूप गठ्ठे सापडले श्री साप्ताहिकाचे. जमके वाचुन काढले, शाळीग्रामाचे वेगवेगळे प्रकार, दक्षिणावर्ती शंख, नरबळीचे प्रकार, अघोरी पंथाचे किस्से असे सगळे त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत समजावुन घेतले.. आणि हो, हा आठवणींचा फेरा १९८० च्या दशकात सुरू झालाय. तुम्हाल आवडले, मला जमले तर नेऊ २००३ पर्यंत.

In reply to by शिवोऽहम्

आयला जबरीच की. हे माहिती नव्हते. काळी जादू इ. बद्दल कुठेतरी इंद्रजाल किंवा तत्सम कैतरी पुस्तक पाहिल्यागत आठवतंय. रैट्ट-भौतेक नरसोबावाडीतल्या पुस्तकांच्या दुकानात ;) यातला बाकी काही कंटेंट अ.ल.भागवत यांच्या पुस्तकांत पाहिला आहे. त्राटक, भ्रूमध्य, इ. खास खंग्री जार्गन तिथेच वाचली. तुम्हाला वाटेल तितका हा फेरा न्या, वाचायला आनंदच आहे :) बाकी मोदका, चित्राबद्दल धन्यवाद रे. :)

In reply to by शिवोऽहम्

तुम्हाल आवडले, मला जमले तर नेऊ २००३ पर्यंत. नेकी और पूछ पूछ..?? बिन्धास्त न्या. २००३ नंतरच बहुदा या चौथ्या स्तंभावरची राजकारण्यांची पकड फासामध्ये बदलली असावी. हे वृत्तपत्र याचे, ते त्याचे हा प्रकार खूप आधीपासून होता.. मात्र आत्तासारखा लाळघोटेपणा नक्कीच नव्हता! आणखी एक, दक्षता हे पोलीसांचेच प्रॉडक्ट होते त्यामुळे त्यातला कंटेंट अधिकृत आणि वास्तव असे.

प्रेमचंद डोग्रा!! आपण एकाचवेळी कोल्हापुरच्या भुमीत होतो! फार छान बातम्यांची मालिका चाललीय. हा असा एकमेव लेख ठरावा. लिहा. @मोदक-दक्षताच्या मुखपृष्ठाबद्दल धन्यवाद.

दर्दी मिपाकरांनी आपापल्या आठवणींची कात्रणं लावली तर संदर्भग्रंथ होईल हा धागा.

याच दरम्यान "स्वराज्य" व चित्रपटाची चटपटीत खबरी "चित्रांसाठी" मायानगरी असे आकारही "श्री" मसिकासारखाच फुल साईझ.. श्री-पो.टा.-मायानगरी केशकर्तनालयात खास विरंगुळा असे (मोफत वाचन) आणि अक्षरशः पत्रावळ्या होईपर्यंत पारायण होई..

जिनिवाहुन कोणी एक नवी पत्रकार, चित्रा सुब्रह्मण्यम नावाची, नव्या बातम्या देऊ लागली होती...
याबद्दल पण येउद्या एखादा भाग.

'पुढारी','सत्यवादी' नावे ऎकून बर्‍याच आठवणी मनात जाग्या व्हायला लागल्यात.'सत्यवादी' फ़क्त त्याच्या खराब प्रिंटिग क्वालीटीमूळे आठवतोय. इतका खराब,की एका पेजवरची अक्षरे मागच्या पेजवर उलटी उठलेली दिसायची. सकाळ मात्र चांगला साफ़सुथर्‍या स्वरूपात निघत असे.पुढारी यथातथाच होता.पण लोकप्रिय मात्र प्रचंडच होता.आमच्या घरी सकाळच येत असे.पण पुढारीत ‘सोनेरी’ पुरवणी बहुदा त्याच काळात सुरू झाली असावी.त्यामूळे गंगावेशच्या एका बोळात 'रसरंग' ,'जत्रा' ,'मायापुरी' वाचण्याबरोबरच किमान शनिवारचा ‘सोनेरी’पुढारी मस्ट झाला होता. त्यावेळचा पुढारी आणि एका कारणामूळे लक्षात आहे. पुढारीच्या एका पत्रकाराने(नाव बहुदा प्रकाश पाटील किंवा असेच काहीतरी.) त्यावेळी तुरुंगातले जीवन अनुभवण्यासाठी स्वत:ला खोटीच अटक करून घेतली होती.आणि तुरूंगवासातल्या अनुभवावर आधारीत ‘गजाआडचे विश्व’ नावाची सुरेख मालिका पुढारीत लिहिली होती. सदर पत्रकार पुढारीत चित्रपट परीक्षण पण लिहित असे. अमिताभ,दिलीपकुमारच्या ‘शक्ती’ चे छान परीक्षण पुढारीत त्यावेळी वाचल्याचे आठवते. त्यावेळी पेपरमध्ये पंजाबमधल्या घडामोडींना बरेच स्थान असायचे .आंतरराष्ट्रीय घडामोडीत पॅलेस्टाईन-इस्त्राईल विषय आघाडीवर असायचा. त्यावेळी 'प्रायव्हेट हायस्कूल' मध्ये एका जोशी(की कुलकर्णी?) नावाच्या दाढीधारी सरांनी अचानक ऑफ़ पिरीयडला येऊन गप्पांच्या ओघात पॅलेस्टाईन-इस्त्राईल ह्या विषयाच्या दोन्ही बाजू आम्हा विद्यार्थांना छान समजाऊन सांगितल्या होत्या. असो! तुमचे 'पियुष मिश्रा' वरचे लेखन वाचून का कोण जाणे, त्यावेळच्या कॉलेज बोर्डवरच्या ‘चष्म्या आडून’ नामक सदराची आठवण झाली. :) '

दक्षता मासीक खरेच चांगले होते. पोलीस कथा असत पण पोलीस टाईम्स सारखे उथळ नक्कीच नव्हते. या सर्व वर्तमानांच्या तुलनेत स्वराज्य नावाचे एक सोज्वळ साप्ताहीक होते ते नंतर सकाळ ने विकत घेतले. आणि दुसर्‍या कोणाला तरी विकले. श्री नावाचे एक साप्ताहीक त्यातील सनसनाटी पणामुळे प्रसिद्ध होते. इंग्रजी चित्रपटांची स्टोरी देखील सत्यकथा असवी अशी रीपोर्ट करायाचे.

तेव्हा म. टा. आणि लोकसत्ता, एक्सप्रेस सगळेच चांगले होते. तळवलकर, शौरी इ. मंडळींबद्दल अजूनही लोकांना आदर आहे. आताचा म. टा. हे त्या पेपरचं भूत वाटतं. आर के चा कॉमन मॅन बंद झाला तेव्हाच म> टा. संपला आमच्या दृष्टीने. श्री आणि पोलीस टाईम्सबद्दल सहमत. श्री ची आठवण वाचून गंमत वाटली! दक्षताचा दिवाळी अंक मात्र खराच चांगला असायचा. त्यानंतर रत्नागिरीत रत्नागिरी टाईम्स नावाचा पेपर सुरू झाला, आम्हाला आधी वाटलं की हा टाईम्स ग्रुपचा आहे. पण मग त्यातला शोभाताईचा सल्ला आणि पोलीस टाईम्समधे शोभतील अशा बातम्या वगैरे प्रकार वाचून सॉलिड ह.ह. पु.वा.