Skip to main content

पुस्तके सुचवा ना !

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 08/08/2013 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना ! पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम. मीही जराशी यादी देत आहे.
पुण्याची अपुर्वाई - अनिल अवचट
... बाबाने पुण्याचे केलेले पर्यटन, पुस्तक वाचताना आपणही बाबाबरोबर पुणे पहात हिंडत आहोत असे वाटते.
राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
... शिवाजी महाराजांचे चरीत्र आहे.
शतदा प्रेम करावे - अरुण दाते
... अरुण दाते यांचा जीवनप्रवास. लता मंगेशकर ते सलमानखान आणि जावेद अख्तर ते जगजीतसिंग यांचे संदर्भ येतात. अतिशय संदर्भसंपन्न पुस्तक आहे.
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.
पवनाकाठचा धोंडी - गो. नी. दांडेकर
... पवनेकाठच्या मावळ परिसरात घडलेली ही दोन भावांची गोष्ट आहे. यात धाकट्या भावाला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवणारा मोठा भाऊ आणि वहिनी आहेत. यावर आधारीत मराठी चित्रपटही आला होता. चंद्रकांत सूर्यकांत यांच्या भूमिका होत्या. गोनीदांच्या लिखाणाची मोहिनी का पडते हे समजण्यासाठी वाचकांनी त्यांची 'माचीवरला बुधा', 'शितू' ही पुस्तकेदेखील अवश्य वाचावीत.
पानिपत - विश्वास पाटील
... पानिपतच्या युद्धावरील ही कादंबरी आहे. कादंबरी असली तरी सत्यावर आधारलेली आहे. लिखाण ओघवते आहे. प्रत्ययकारी आहे. या पुस्तकाने मराठीतील ऐतिहासिक कादंबर्‍यांची पूर्वीचे चौकट मोडून नवी निर्माण केली असे मानले जाते.
अमरनाथ संघर्ष - गिरीश प्रभुणे
... पालावरचं जिणं, पारधी हे विषय सोडून प्रभुणे यांनी वेगळ्या विषयावर लिहिलेले पुस्तक आहे. अमरनाथ हे भारतामधे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यात्राकाळात राज्याचा वनविभाग काही जमीन अमरनाथ बोर्डाला वापरायला देते. त्याचे भाडेही वसूल करते. मेहबूबा मुफ्ती, गुलाम नबी आझाद यांचे राज्यात शासन असताना ही जमीन बोर्डाकडून काढून घेतली. त्याविरुद्ध हिंदूंनी संघर्ष केला. हिंदूंचा जोर पाहून देशाबाहेर निष्ठा असलेले लोकही त्यात सामील झाले. अखेर मुफ्ती-आझाद यांना माघार घ्यावी लागली. काश्मीरमधील सद्यस्थिती समजून घेण्यास पुस्तक उपयुक्त आहे.
शांतारामा - हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे आत्मचरीत्र आहे. पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीने लिहिले आहे. लेखनसहाय्य शांताराम यांच्या मुलीने म्हणजे मधुरा जसराज यांनी केले आहे. मूकपट, काळेपांढरे बोलपट आणि रंगीत चित्रपट अशा तीनही कालखंडात शांताराम वावरले. भारतीय चित्रपट व्यवसायात होत गेलेले बदलही त्यांनी पाहिले. हिंदी चित्रपटाचा इतिहास म्हणून या पुस्तकाचे मोठे महत्त्व आहे.
आवरण - एस एल भैरप्पा (अनु उमा वि कुलकर्णी)
... हिंदूस्थानावर अल्लाउद्दीन खिलजी, मोह बिन कासिम अशा परक्यांची आक्रमणे झाल्यानंतर या देशाची स्थिती काय झाली? हिंदूस्थानातल्या अनेक देवळांची मोडतोड कशी झाली हे यात वाचायला मिळते. अर्थात हा इतिहास आजचे वर्तमान समजून घेण्यासही उपयुक्त आहे. या पुस्त्कावर गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती यांनी एकांगी असल्याचा आरोप करीत खूप टीका केली होती. पण मोठा वाचकवर्ग या पुस्तकाला लाभला. एक नवी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे.
मी इडली आणि ऑर्कीड - विट्ठल कामत
... ही एका हॉटेल व्यावसायिकाची गोष्ट आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय कसा वाढवला याबाबत यामधे वाचायला मिळते. शाकाहारी भोजनासाठी प्रसिद्ध असणार्‍या कामत हॉटेलमधे नॉन-व्हेजलाही बदलत्या काळाप्रमाणे विट्ठल कामत यांनी स्थान दिले. वाचताना भारावून जायला होते. पण नीट विचार केला तर अनेक विसंगती सहज लक्षात येऊ शकतात. लेखकाच्या काळात व्यवसाय वाढला असे मानले तरी. वडीलांच्या काळातच कामत हॉटेल्सची संख्या प्रचंड होती. कामत स्वतःला इकोफ्रेंडली व्यावसायिक म्हणवून घेतात. पण हॉटेल व्यवसाय इकोफ्रेंड्ली असूच शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. अनिल मुकेशपेक्षा शून्यातून उद्योगविश्व निर्मिणार्‍या धीरुभाईंचे मोठेपण अधिक आहे. तेच इथेही. बा द वे काही वर्षापूर्वी 'मी मनू आणि संघ' या नावाचे पुस्तक मराठीत आले होते. त्याच्या शीर्षकाची आठवण झाल्यावाचून राहात नाही.
मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट
... मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची ही कहाणी आहे. डॉ सुनंदा अवचट यांनी या संस्थेची सुरुवात केली. पुढील काळात अनेकांनी याचा लाभ घेतला आणि नव्या जीवनाला सुरुवात केली. पेशंटबरोबर वावरताना त्याच्या मनाचा, मानसशास्त्राचाही मोठा अभ्यास यात पहायला मिळतो.
नॉट गॉन विथ द विंड - विश्वास पाटील
... बर्‍याच गोष्टी काळाबरोबर पाचोळ्यासारख्या उडून जातात. काही गोष्टी मात्र टिकून राहतात. अशाच वर्षानुवर्षे टिकून राहिलेल्या जगभरातील कलाकृतींबद्दल यात वाचायला मिळते. रोमन पोलन्स्कीपासून स्टीवन स्पिलबर्गपर्यंत अनेकांच्या कलाकृतींचे यात रसग्रहण आहे. गॉडफादर आहे, अ‍ॅथेल्लो आहे. पानिपतातला नजीब आणि अ‍ॅथेल्लोमधला इयागो यांचा नेमका काय संबंध आहे हे समजण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तकच वाचायला हवे. विश्वास पाटील यांचा जगभरातल्या सिनेमाचा आणि साहित्याचा व्यासंग थक्क करायला लावणारा आहे. पाटील यांना एवढा वेळ कुठून मिळतो असा प्रश्न पडतो. त्यांच्या दिवसाला २४ पेक्षा अधिक तास असावेत असा अंदाज आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 69645
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

मिसळपाववर हात-पाय आपटत देव, धर्म, पुनर्जन्म, विज्ञान, मानसशास्त्र वगैरे गोष्टींवर कीबोर्ड बडवणार्‍यांसाठी: देववादी आणि दैववादी: १. कर्माचा सिद्धांत २. मृत्यूचे माहात्म्य दोन्ही पुस्तके हीराभाई ठक्कर यांनी लिहिली आहेत. मुळ पुस्तकं गुजराती असली तरी इंग्रजीसहीत बर्‍याच भारतीय भाषांमध्ये रुपांतरीत. पुस्तकांचा विषय काय असेल हे नावावरुनच कळते. ३. जिवात्म जगाचे कायदे (द लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड) - खोर्शेद भावनगरी: मुंबईतील एका पारशी कुटुंबातील दोन सख्खे भाऊ खोपोलीजवळ कार अपघातात मृत्यूमुखी पडतात. आई वडील अतोनात दु:खात असताना एका मांत्रिक बाईच्या मदतीने मृत भावांपैकी एकाचा आत्मा आपल्या आईशी स्वयंलेखन (ऑटोमेटीक रायटींग) पद्धतीने आपला म्रूत्यूनंतरचा प्रवास कथन करतो असा काहीसा साचा आहे या पुस्तकाचा. ४. मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स - डॉ. ब्रायन वेसः मराठीत उपलब्ध. व्यवसायाने मानसोपचारतज्ञ असलेल्या ब्रायन कडे एक मुलगी तपासणीसाठी येते. आपल्या नेहमीच्या उपचारांबद्दल पुर्ण खात्री असलेल्या ब्रायनचे इलाज या पेशंटवर चालत नाही. शेवटी तो तिला संमोहन अवस्थेत नेतो. या अवस्थेत त्या मुलीला "मास्टर्स" तिच्या ८६ जन्मांबद्दलची माहिती देतात. प्रचंड गाजलेलं पुस्तक. ५. लाईफ बिफोर लाईफ - जिम टकरः पुनर्जन्म या विषयावरचं मोस्ट ऑथेंटिक लेखन असूनही "पुनर्जन्म आहे" असा दावा न करणारे हे पुस्तक आहे. डॉ. इयान स्टीव्हन्सन या अमेरिकेतील युनिव्हरसीटी ऑफ व्हर्जिनिसाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुखाचे चाळीस वर्षाच्या संशोधनाचे फलित म्हणजे हे पुस्तक. डॉ. स्टीव्हन्सननी चाळीस वर्षात जगभरातील तत्कालीन पुनर्जन्मांच्या केसेसचा अभ्यास केला. त्यांच्या नोंदी केल्या. या नोंदी त्याच्या कनिष्ठ सहकार्‍याने, जिम टकरने पुस्तक रुपात मांडल्या आहेत. या विषयावरील हे "द वन" पुस्तक आहे. अजून खुप पुस्तकं आहेत. पण ब्रेक के बाद.

In reply to by धन्या

फारच मस्त यादी आहे, या विषयावरची पुस्तके शोधायचा प्रयत्न करत होतो पण जास्त कचराच मिळत होता.

In reply to by पुष्कर जोशी

वर्तक म्हंजे तेच का ते सूक्ष्मदेहाने मंगळावर जाणारे आणि वास्तव रामायणात यथेच्छ फेकाफेकी करणारे?

सर्वांना एक नम्र विनंती. पुस्तक आणि लेखकाचे नाव यापेक्षा आपण वाचले असल्यास पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात काही लिहिले तर बरे होइल. धाग्याच्या सुरुवातीला मी तशाच प्रकारे लिहिले आहे. धन्या आणि दत्ता काळे यांचा सविस्तर प्रतिसादही अतिशय उपयुक्त आहे. अनेकदा पुस्तकाचे नुसते नाव दिल्याने ते वाचण्याची उत्सुकता निर्माण होतेच असे नाही. (आपुन विनम्र है) जोग

चिंतन – ले. कविवर्य मंगेश पाडगावकर. हे कवितांचं पुस्तक नसून गद्य आहे. कविवर्यांनी काही पुस्तकांची मराठीत भाषांतरं केली. संत सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या रचना, तसंच शेक्सपियरची तीन नाटकं, आणि बायबल. ही भाषांतरं करताना त्यांनी प्रत्येक रचनाकारांचाही संशोधनात्मक सखोल अभ्यास केला. या प्रत्येक ग्रंथाला लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. अत्यंत रसाळ भाषा. सोपं, तत्त्वचिंतनात्मक. त्या त्या काळाचं, समाजाचं चित्र. एका वेगळ्या पाडगावकरांची आपल्याला ओळख होते. एक धागा सुताचा – कमला काकोडकर याचं (डॉ. अनिल काकोडकरांच्या मातोश्रींचं) आत्मचरित्र. राजकीय वलय लाभलेल्या पतीने संसाराच्या ऐन उमेदीच्या काळात उभ्या केलेल्या वादळाला सामोरं जाताना, जुन्या वळणाच्या त्या माउलीने धैर्याने सगळा संसार सावरलाच, त्याचबरोबर मुलाच्या (अनिलच्या) शिक्षणात खंड न पडू देता त्याच्यावर उच्च मूल्यसंस्कार करून त्याचं भविष्य घडवलं, हे वाचताना आपण आदराने नतमस्तक होतो. एक अत्यंत सात्त्विक, सोज्वळ व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर जिवंत उभं राहतं. जणू सुती धाग्याने विणलेलं भरजरी वस्त्रच. नादवेध – ले. अच्युत गोडबोले. शास्त्रीय संगीतातल्या रागांवर साध्यासोप्या भाषेत लिहिलंय. त्या त्या रागांवर आधारित असलेली, मराठी आणि हिंदी भाषांतल्या प्रसिद्ध सिने/भाव/भक्ति/नाट्यगीतांची यादीही दिली आहे. शास्त्रीय संगीताबद्दल (रागांबद्दल) विनाकारण निर्माण झालेल्या भीती दूर व्हायला मदत होईल. (‘धन्या’च्या प्रतिसादात ‘मुसाफिर’चा उल्लेख आल्यामुळे त्याबद्दल लिहीत नाही.) चकवाचांदणं – वनऋषी मारुती चितमपल्लींचं आत्मचरित्र. जाडजूड (साडेसहाशे पानांचा) ग्रंथ. सुरुवातीची काही प्रकरणं वैयक्तिक आयुष्याबद्दल, नंतर मात्र पूर्ण ‘जंगली’. वनकारकिर्दीत आलेले थरारक अद्भुत अनुभव, चिकित्सक वृत्तीने केलेलं संशोधन, त्यांना भेटलेली माणसं आणि त्याचं मार्गदर्शन याबद्दल अतिशय मोकळ्या भाषेत. ‘मी’पण कुठेही जाणवत नाही. चुका, दोष याबद्दल खोटाखोटा प्रांजळ पश्चात्तापही जाणवत नाही. अतिशय निर्मळ निवेदन. बदलता भारत – ले. भानू काळे. जागतिकीकरणामुळे बदललेल्या परिस्थितीला आणि नव्या आव्हानांना विविध राज्यं (र्ज्यांची सरकार आणि जनता) कशा प्रकारे सामोरी गेली, त्याचा आढावा. विविध राज्यांचा स्वत: दौरा करून त्यावर आधारित. सुधांशुनूलकर

नेगल भाग १ व २ कुणी वाचलेत का ? याच प्रकारचे सोनाली सिंहीणीवरचेही डॉ. पूर्णपात्रे यांचे पुस्तक आहे. त्याला चांगली लोकप्रियता लाभली. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' नावाचा चित्रपट आला होता. त्यावेळी बापू वाटवे यांनी लिहिले दादासाहेब फाळकेंवर लिहिलेले पुस्तक मुद्दाम मिळवून वाचले होते. चित्रपटापेक्षा पुस्तक रंजक आणि रोमांचक आहे. विशेषतः वाटाण्याचे रोप वाढत जाते त्याची चित्रफीत फाळके तयार करतात. ते पुस्तकातले वर्णन चित्रपटापेक्षा शतपटीने भावते.

In reply to by आशु जोग

चित्रपटापेक्षा पुस्तक रंजक आणि रोमांचक आहे.
एकदम दुनियादारी वरून चाललेले कंदन आठवले .. हे पुस्तक कमी लोकांनी वाचले असल्याने तसे काही झाले नाही..

एका लग्न ठरलेल्या मुलीला आपल्याला कुष्टरोग झाल्याचे कळते . लग्न मोडते. नंतर रोगाची वाढ . मग तिच्या मनाची उलघाल , बरे होण्याची धडपड व शेवटी जीवनाचा जोडीदार मिळणे. अशी ही सत्य हकिकत. ...पानगळीचे झाड. माझ्या आठवणी प्रमाणे कोणी तरी जैन आडनावाची लेखिका आहे.

माणूस-मनोहर तल्हार आयुष्य पेलताना-मधुकर तोरडमल परजित-अपराजित-वि.स.वाळींबे पृथ्वीवर माणूस उपराच-सुरेशचंद्र नाडकर्णी तराळ अंतराळ-शंकरराव खरात बनगरवाडी-माडगुळकर माझा प्रवास-गोडसे भटजी वैदीक संस्क्रुतीचा इतिहास-तर्कतीर्थ लक्षमंणशात्री जोशी(अप्रतीम ग्रंथ) फकिरा-अण्णाभाउ साठे झाडाझडती-विश्वास पाटील इजिप्तायन-मिना प्रभू माझी लंडनवारी-आनंद पाटील याशिवाय पु.लंचे सर्व साहीत्य,नारायण धारपांच्या सर्व कथा,आणी अर्थातच सु.शि.

मसापचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळवणारे हे एकमेव जोडपे. प्रतिभा रानडे आणि फिरोझ रानडे यांचे अफगाणिस्तान, पाकिस्तानविषयक जे लिखाण आहे त्याला मराठीत तोड नाही. प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या काबूलमधील १९७२ च्या वास्तव्यावर अफगाण डायरी हे पुस्तक लिहिले. काबूल म्हणजे जुने पुणे हे वाक्य फार भावले. अफगाणिस्तानातील स्त्रिया एके काळी शिकत असत. नोकरी करत असत. इंजिनीयर म्हणून काम करणार्‍या स्त्रियाही तेथे होत्या. असे सगळे वर्णन त्यात येते. -- वाचकांना धर्माच्या नावाखाली अश्मयुगात ढकलला गेलेला अफगाण माहीत आहे.

In reply to by आशु जोग

पाकिस्तानात जो इतिहास सांगितला जातो त्यावर 'मर्डर ऑफ हिस्टरी' नावाचे पुस्तक पाकिस्तानात लिहीले गेले आहे. लेखक आहेत के के अझीझ. याचा मराठी वा हिंदीमधे अनुवाद असेल तर हवा आहे.

In reply to by बाबा पाटील

युगंधर शिवाजी सावंतांचं आहे आणि लैच कंटाळवाणं आहे.

In reply to by बाबा पाटील

मला तरी युगंधर जरा "जास्तच" वाटलं... युगांत मात्र बेष्ट. अर्धवटराव

युगांत महाभारतावरचं ना वाचलय. लोक्सनी नुसती यादी न चिकटवता. त्याबाबत अधिक काही लिहावं म्हणजे ज्यांनी वाचले नसेल त्यांच्या मनात उत्सुकत निर्माण होइल.

दास्तां ए नौशाद - लेखक नौशाद अली.--- लखनौ येथे वाद्यांच्या दुकानात झाडू मारण्याच्या नोकरीपासून चित्रपट संगीतात उच्च कामगिरी असा पट. मुक्य म्हणजे नौशाद यानी " मी" टाळला आहे. चार्ली चापलीन मला सर्वात जास्त आवडलेले आत्मचरित्र. केलेली लफडी, नाकारलेले पितूत्व, चापलीनच्या खुनाचा प्रयत्न, महायुद्धात भाग न घेतल्याबद्द्ल लोकांचा रोष, मित्र मैत्रिणी, आई, चित्र्पट निर्मीतीचे खुलासे. एवढेच काय कुठे काय खाल्ले कुठे पैसे गुंतविले सगळे सगळे ...एकदम बहारदार पुस्तक .

जूल्स वर्न ची सगळी पुस्तके, आर्थर कॉनन डोयल चा शेरलॉक , मायकल क्रायटन ची काही , मारिओ पुझो ची काही …

In reply to by मालोजीराव

अरे हो, मायकल क्रायटन राहीलाच की.. आणि आर्थर हेली पण (कालच मायकल क्रायटनचे 'काँगो' वाचुन संपवलेला) सौंदाळा..

In reply to by मालोजीराव

:) क्या बात! या धाग्यावर जूल वर्नची आठवण निघेल असं वाटलं नव्हतं. छोटी दुरुस्ती - जूल वर्नची काही पुस्तकंच चांगली आहेत. मागे एक "द एण्ड ऑफ नाना साहिब" नामक त्याचं तद्दन भिकारडं पुस्तक वाचलं होतं...

In reply to by मालोजीराव

या असामीच्या उल्लेखाने बालपणात गेलो. " बालमित्र " मासिक मग त्यावरून भा रा भागवत मग त्यावरून फास्टर फेणे असा प्रवास आठवणींचा झाला. एडगर राईज बरोज यांची " टारझन" ही मालिका, एच जी वेल्स यांचे मूळ लिखाणाचे रुपांतर " कालयंत्र" सारे आठवले ! धन्यवाद !

दुर्गा भागवात .. क्लास पुस्तक आहे ! ललित लेखनाचा मानदंड ठरावा असा लेखसंग्रह !त्यातील पैस लेख तर खासम खास ! उमा कुलकर्णीनी भैरप्पांची अनुवाद केलीली सारी पुस्तके वाचावीत.. अप्रतिम आहेत , वर वंश चा उल्लेख आला आहे. नर्मदा परिक्रमेवरील भारती ठाकूर यांचे पुस्तक . एका बैठकीत संपवले आहे.. क्लास ! गोनिदा - सारी पुस्तके त्यातही भ्रमणगाथा आणि स्मरणगाथा विशेष ! प्रादेशिक मध्ये पूर्णामायची लेकेरं झकास ! पावलांपुरता प्रकाश - बा. भ बोरकर आणि आतले आणि बाहेरचे - अनंत काणेकर - सुरेख लेख्स ! समिधा - साधना आमटे जरुर वाचा - तेथे कर माझे जु़ळती असे वाटायला लावणारे पुस्तक ! आणि ब. मो,च्या शिव-चरित्राची पारायणे करावीत !

दास्तान : सुहास शिरवाळकर दास्तान चा अर्थ होतो , कधी न संपणारी कथा, जी सलग असते. सुशींनी ती कांदबरी संपवली पण कथा संपत नाही...

In reply to by तिलोत्तमा

एकदम सुंदर पुस्तक आहे. पलायनकथांमध्ये ही कदाचित सर्वोत्कृष्ट ठरावी मूळ लेखक गंथर बान्हमान एक जर्मन सैनिक आफ्रिकेतून का पळ काढतो आणि त्याला काय काय अनुभव येतात याची एक सत्यकथा या निमित्ताने वाचायला मिळते. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचे अगदी सुंदर व अनेकदा वाचले तरी आनंद मिळेल असे पुस्तक आहे

नावं विसरलेली पुस्तकं

[कधीतरी वाचलेली, पण आता विस्मृतीत जात चाललेली] (या धाग्यातच हात धुवून घेतो, जोग साहेबांची हरकत नसेल तर) १. कुर्ला स्टेशनवर बूटपॉलिश करणार्‍या एका मुलावर आधारित कादंबरी आहे. लेखक जयवंत दळवी किंवा रत्नाकर मतकरी असावेत. २. सुशिंची एक कादंबरी आहे त्यात एक अपंग मुलगी एका कॉलेज हीरो टाईप तरूणाला आपल्या प्रेमपाशात अडकवते आणि लग्न करायला भाग पाडते. ३. वॉर अँड पीसचा एक मराठी अनुवाद आहे. लेखक आठवत नाही, पण प्रकाशक बहुदा गिरगावांतले लाखाणी बुक डेपो असावेत. ४. समांतर विश्व आणि टाईम ट्रॅवलच्या कल्पनेवर आधारित एक विज्ञान कादंबरी आहे. त्यात एक माणूस एका मुलीच्या प्रेमात पडतो. काही कारणाने तो समांतर विश्वात जातो, तिथे ती त्याची मुलगी असते असं काहीतरी कथानक आहे. कुणाला या पुस्तकांची नावं आठवत असतील तर प्लीज सांगा. :)

In reply to by प्रचेतस

पहिली कादंबरी ' झिपर्या' , लेखक अरूण साधू.
येस्स! लोकलच्या लायनीवर वावरणार्‍या ८-९ वर्षाच्या मुलाचं भावविश्व फार सुरेख लिहलंय त्यांनी.

In reply to by आदूबाळ

सुशिंची एक कादंबरी आहे त्यात एक अपंग मुलगी एका कॉलेज हीरो टाईप तरूणाला आपल्या प्रेमपाशात अडकवते आणि लग्न करायला भाग पाडते.
ही कुठली? "काटेरी"चा विषय ह्याच्या जवळपास जाणारा आहे, पण हाच असा नाही.. सुशिंची इतर : दास्तान (सुहासने आधीच सांगितलंय), कल्पांत, क्षितीज, दुनियादारी (डिपेंड्स ;-)), झूम.. मला सगळीच आवडतात.. :-) गोनिदा : दुर्गभ्रमणगाथा, पवनाकाठचा धोंडी, माचीवरचा बुधा आणि इतर अरुण साधु : झिपर्‍या, मुंबई दिनांक पुलं : सगळीच.. वपु : वन फॉर द रोड, सखी, कर्मचारी, कॅलेंडर बायको आणि मी.. जेफ्री आर्चर : केन अँड आबेल, देअरबाय हँग्स अ टेल, पाथ्स ऑफ ग्लोरी.. आत्ता-आत्ताची काही सोडल्यास बाकीची चांगली आहेत.. नॉन-फिक्शन आवडत असल्यास, "द लास्ट मुघल", "द व्हाईट मुघल्स", "इंडीया आफ्टर गांधी"..

In reply to by चिगो

व पुं ची सखी आनी पर्टनर .......या दोन्ही कथांनी मनावर वेगळच गारुड केल. तशी सखी आनी पार्टनर मिळण असे माझ्यासारख्या असंख्य वेड्यांच स्वप्न असत.

In reply to by बाबा पाटील

व पुं ची सखी आनी पर्टनर .......या दोन्ही कथांनी मनावर वेगळच गारुड केल. तशी सखी आनी पार्टनर मिळण असे माझ्यासारख्या असंख्य वेड्यांच स्वप्न असत. एकदम सहमत आहे. पार्टनर एकदम बेस्ट

गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुहा, यांचे एक अप्रतिम पुस्तक. नेमकं मुद्दे मांडणारे, नेमकं काय घडले व काय घडत आहे यावर प्रकाश टाकणारे एक उत्तम पुस्तक. ज्यांना या विषयात आवड आहे, त्यांनी आवर्जून वाचावेच असे पुस्तक. मेकर्स ऑफ मॉर्डन इंडिया ज्यांनी वाचले आहे, त्यांना नक्कीच आवडेल हे पुस्तक.

In reply to by आशु जोग

हो मलाही चटकन व्यंकटेश माडगूळकरांचंच आठवलं होतं. माकडांच्या टोळीतली सत्तास्पर्धा असा काहीतरी विषय आहे बहुतेक...

In reply to by आदूबाळ

हो. आज दोन्ही पुस्तके मुद्दाम चाळून पाहिली. तुम्ही म्हणताय ते व्यंकटेश माडगुळकरांचे आहे. मी म्हणतो आहे ते "सत्तांतर - १९४७" खंड १ व २ - लेखक गोविंदराव तळवळकर.

In reply to by मोदक

मोदका छान विषय छेडलास तू. सत्तांतर ही गोविंद तळवलकरांची ३ खंडांची मालिका आहे. सत्तांतरः १९४७ हे पुस्तकाचे नाव. १९४७ च्या फाळणीच्या इतिहासावर अतिशय परखड भाष्य तळवलकरांनी केलेले आहे. माझ्याकडे हे तिन्ही खंड सुदैवाने आहेत. पुस्तकाचा दर्जा काय आहे हे बुकगंगावर झलक पाहून ठरवता यावा सत्तांतरः १९४७ - खंड १ सत्तांतरः १९४७ - खंड २ सत्तांतरः १९४७ - खंड ३

In reply to by सागर

माझ्याकडे सत्तांतरचे दोनच खंड आहेत तेही १९८३ च्या पहिल्या आवृत्तीचे. तिसर्‍या खंडाच्या माहितीबद्दल आभार्स!

फिलाडेल्फिया एक्सपेरिमेन्ट एका सत्यघटनेवर वर आधारित एक पुस्तक वाचल होतं, लेखकाचं नाव आठवत नाही पण जबरदस्त होतं पुस्तक अमेरिकेत बहुतेक बंदी आहे त्यावर

बारोमास-डॉ. सदानंद देशमुख शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुणाची ही कथा आहे वाचलीच पाहीजे अशी.

बखर बिम्मची - जी.ए.कुलकर्णी जी.ए. म्हटलं की एक गूढ अर्थ दडलेलं लेखन हे वेगळं सांगायला नकोच. आणि त्यांनी हाच गाभा बालसाहित्यात कायम ठेवलाय तो या पुस्तकातून. बिम्म नावाच्या एका ४-५ वर्षांच्या मुलाची ही कथा. त्याची आई, बहिण बब्बी, आणि त्याच्या आजूबाजूचं निरागस जग खास जी.ए. शैलीत असल्यामुळे वाचायलाच हवं. आणि या पुस्तकाच मला भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या वयात वाचताना त्या त्या वयाला अनुसरून वेगवेगळा गर्भितार्थ कळत जातो

एक होती प्रभात नगरी - हे बापू वाटवे यांचे पुस्तक अफाट आहे. 'एका स्टुडीओचे आत्मवृत्त' हे प्रभाकर पेंढारकर यांचे पुस्तक त्यामानाने सपाट आहे. बापू वाटवे 'प्रभात नगरी'मधे एक वेगळेच विश्व उभे करतात. अलिकडे अशी चांगली संदर्भमूल्य असलेली पुस्तके बाजारात उपलब्ध नसतात. ती मुद्दाम मिळवून वाचावी लागतात.

दुर्गाबाई-व्यासपर्व, ऋतुचक्र लंपनची कुणी आठवण नाही का काढली? वीणा गवाणकरांचं आयडा स्कडर बाकी खूप नवीन नवीन नावं कळत आहेत.. :)

In reply to by आदूबाळ

शाळा वाचले. स्वानुभव वाटतो. लेखकाने तो काळ उभा केलेला आहे. पण एवढ्या वर्षापूर्वीच्या घटना बारकाईने लिहिल्यात हे विशेष वाटते. अनेकांना हे आपले स्वतःचे अनुभव वाटू शकतील. यावर आलेला चित्रपटही छानच होता. तो आधी पाहीला असल्याने पुस्तक वाचताना चित्रपटातलीच पात्रे डोळ्यासमोर येत राहतात.

हिंदूस्थानच्या इतिहासात आर्य चाणक्य हा एक द्रष्टा महापुरुष होवून गेला. त्याचे आर्थिक आणि सामरीक (strategic) चिंतन आजही उपयुक्त आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी चाणक्यावर काढलेली दूरदर्शन मालिका चाणक्य समजून घेण्यास उपयोगी आहे. चाणक्यावर मराठीमधे एखादे पुस्तक आहे का ? (बाळशास्त्री हरदास यांचे पुस्तक वाचले होते. पण काही समजले नाही.)

In reply to by आशु जोग

लेखक बहुतेक कोणि कानि(ने)टकर आहेत. प्रकाशक आता आठवत नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

वसंत कानेटकर, वि ग कानिटकर दोन्हीही बघेन कौटिल्यासाठी.

सर्वप्रथम आशु जोग, तुमचे आभार इतका सुरेख धागा काढल्याबद्दल. खूप जणांनी बरीचशी पुस्तके सुचवली आहेत, त्यात हे माझे २ पैसे. जशी पुस्तके आठवत आहेत तशी यादी टंकते - त्यातल्या त्यात साधारण एका प्रकारची पुस्तके एकाच ग्रूपमध्ये ठेवायचा प्रयत्न करते. सुरुवात कवितांपासून करते. अनेक कवितासंग्रह अत्यंत आवडीचे आहेत, सद्ध्या हे - १. बोरकरांची समग्र कविता, खंड १ व २. - बोरकरांच्या कवितासंग्रहांतल्या बहुतांशी कविता ह्या २ खंडांमधून एकत्र केल्या आहेत. बोरकर म्हणजे केवळ निसर्गसौंदर्य, प्रेमभावना वा तत्सम कविता असे समेकरण मनात धरुन असलेल्यांनी ह्या खंडांमधील त्यांच्या अभंगरचना, सामाजिक विषय हाताळणार्‍या कविता, जीवनविषयक आणि मृत्यूविषयक चिंतन करणार्‍या कविता वाचण्यासारख्या आहेत.खंडांमध्ये जाणवणारी उणीव? - मेघदूताचा बोरकरांनी केलेला अनुवाद, कोकणी कवितांचा समावेश नाही. बहुधा ते तिसर्‍या खंडात यावे? अजून जमेच्या बाजू म्हणजे बोरकरांच्या हस्ताक्षरातली कविता आणि त्यांच्या प्रसन्न मुद्रांची प्रकाशचित्रे. अरुणा ढेरे ह्यांनी लिहिलेली शब्ददेखणी प्रस्तावना. २. उत्तररात्र - रॉय किणीकर. झपाटून टाकणार्‍या कविता. रॉय किणीकरांनी खूपच थोडे लिहिले पण भाराभर पुस्तके एका पारड्यात आणि उत्तर रात्र एका पारड्यात - तरीही उत्तर रात्रीचे पारडे जड राहील असे माझे मत आहे. आयुष्यभर अस्थिर आयुष्य वाट्याला आलेल्या ह्या कविच्या कविताही अशाच अतिशय उत्कट आणि अस्वस्थ करुन टाकणार्‍या आहेत. कोलाहलातला एकटेपणा व्यक्त करणार्‍या कविता. ३. दिवेलागण - आरती प्रभू - मनात खोलवर कुठेतरी लपवून ठेवलेली दु:खे जेह्वा तळापासून वर येतात आणि पुनर्प्रत्ययाचा विसकटून टाकणारा अनुभव देऊन जातात, पण कोणापाशी शब्दांमध्ये ते दु:ख व्यक्त करता येणे कठीण, तसे काहीसे ह्या कवितासंग्रहातल्या कविता वाचताना वाटते. साध्या शब्दांमध्ये गहन आशय पोचवणार्‍या कविता. ४. मर्ढेकरांची कविता - बा सी मर्ढेकर - शिशिरागम, किती तरी दिवसांत आणि मर्ढेकरांच्या बाकीच्या कविता. चपखल शब्दयोजना अणि लखलखीत आशय. काही काही कविता मह्णजे शब्दांचे आसूड. ५. किनारे मनाचे - शांता शेळके - शांताबाईंच्या निवडक कविता. सुरेख शब्दकळा ल्यायलेल्या आणि जाणींवाचा प्रवास संयतरीत्या मांडणार्‍या. **** ललित लेखन - १. डोह - श्रीनिवास कुलकर्णी - माझ्या काही अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. सत्यकथा आणि मौज मासिकांमधून ह्यातले लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या ११ लेखांचं हे पुस्तक. लेखकाच्या बालपणी लेख जिथे वावरला, ज्या परिसराशी, माणसांबरोबर त्याचे भावबंद जुळले, आठवणी गुंतल्या, त्या सर्वांचं अत्यंत साध्या पण सहज, ओघवत्या आणि मनाला स्पर्शून जाईल आणि मनात रेंगाळत राहील अशा प्रामाणिकपणे केलेलं शब्दचित्रण. फार फार लोभस. इतक्या समंजस मनोज्ञपणे उलगडलेल्या कोणाच्या अंतरंगातल्या आठवणी वाचायला मिळणं हेच एक भाग्य! .. ललित लेखनात्मक अजूनही पुस्तके आहेत, नंतर लिहिते... पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by यशोधरा

'डोह' बद्दल बर्‍याच जणांनी लिहिले आहे. २०१२ च्या कुठल्याशा दिवाळी अंकामधेही त्यावर श्रीनिवास कुलकर्णी यांचा लेख वाचल्याचे आठवते.

काही पुस्तके वेड लावतात, त्यांना वाचणे म्हणजे एक वेगळा अनुभव असतो. असेच एक पुस्तक म्हणजे "श्रावणसोहळा" दोन व्यक्ती, एक वयस्कर पुरुष, जो व्हिआरस घेऊन आहे व एक तरुणी, यांचा संवाद व त्यासाठी माध्यम महाजाल! श्रावणसोहळा वाचले की जाणवतं की काही नाती ही स्वभावावर निर्माण होतात, टिकतात व त्याचा सोहळा साजरा करण्याएवढे आपल्याला आनंद देऊन जातात.. नक्कीच वाचा! श्रावणसोहळा लेखक - संजय भास्कर जोशी

गो नि दा चि सर्व पुस्त्के , अनिल बर्वे _ अकरा कोटी ग्यालन पाणि . स्टड्फार्म , डोनगर म्हातारा झाला. रारन्ग ढान्ग

कुमार गंधर्व - मुक्काम वाशी. संकलन - मो वि भाटवडेकर - २२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर १९९० रोजी वाशी येथे 'कुमारजींच्या सान्निध्यात' नावाचे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. कुमारांचे संगीतविषयक विचार जाणून घेणे हा ह्या शिबिराचा उद्देश्य होता. ह्या शिबिराचे ध्वनीमुद्रण व चलचित्रण केले गेले, (कुठे मिळेल पहायला? ) व त्यावरुन शब्दांकन करुन संकलित रुपात हे पुस्तक तयार केले आहे. कुमार प्रेमींसाठी संग्राह्य. पुस्तकाआरंभीचे कथनही अतिशय वाचनीय. माझ्या काही आवडत्या पुस्तकांपैकी. पुन्हा मर्ढेकर - विजया राजाध्यक्ष - मर्ढेकरांच्या कविता, त्यांचे वैयक्तिक आयुष्य ह्याविषयीचे पुस्तक. सुरुवातीचाच तीन ऋणानुबंधी: बालकवी, मर्ढेकर आणि आरती प्रभू हा लेख खूप सुरेख जमलेला आहे. आठा उत्तरांची कहाणी - ग प प्रधान -लोकशाही व्यवस्थेमधील अनेकविध प्रश्नांना आपापल्या वकुबानुसार आणि विचाराच्या धारेनुसार उत्तरे शोधणारे अनेक कार्यकर्ते. आपल्याला योग्य वाटेल ते उत्तर स्वीकारायचे आणि इतरानांही सांगायचे, पटणारे घेताता अणि न पटणारे आपला शोध सुरुच ठेवतात. तर अशा ५ क्रियाशील आणि ३ विचारशील कार्यकर्त्यांच्या गटाची ही खरी कहाणी. १९८० ते २००७ परेंतची राजकीय बखर. अंतरीचे धावे - भानू काळे -अंतर्नाद मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या काही सुरेख लेखांचे संकलन. मासिकाच्या पहिल्याच अंकात प्रसिद्ध झालेला महात्मादेखील माणूस असतो हा अतिशय हृद्य लेख ह्या पुस्तकात आहे. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक. संवादाचा सुवावो - महेश एलकुंचवार -राम शेवाळकरांसोबतच्या गप्पा. अतिशय उत्तम सर्जनशील संवाद ह्या पुस्तकात आहे. उत्तम प्रास्ताविक. जास्वंद - माधव आचवल. - गंघाधर गाडगीळ, इंदिरा संत, जीए, पु शि रेगे, अणि आरती प्रभू ह्यांच्या लिखाणावरचे जबरदस्त समीक्षात्मक पुस्तक. अतिशय आवडते! किमया - माधव आचवल - आचवलांचे पहिलेच पुस्तक. त्यांच्या १३ ललितांचा संग्रह. ह्या पुस्तकाचे वर्णन करणे कठीण आहे. आचवलांच्याच शब्दांत सांगायचे तर दैनंदिन आयुष्यातल्या अति परिचयात अवज्ञा ह्या न्यायाने नजरेआड झालेल्या संवेदनांविषयीचे हे पुस्तक. मस्ट रीड. माधव आचवलांची पुस्तके मला अतिशय आवडतात. काल मला त्यांनी अनुवादित केलेल अमेरिकन चित्रकला हे पुस्तकही मिळालेय. किती दिवस शोधत होते! कार्यरत - अनिल अवचट - समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करणार्‍या व्यक्तिमत्वांची ओळख करुन देणारे पुस्तक. चित्रकथी - व्यंकटेश माडगुळकर - अफाट पुस्तक! लेखकाचे स्वतःचे अनुभव. संग्राह्य पुस्तक. ... बाकीची नंतर..

सखा नागझिरा - किरण पुरंदरे -४०० दिवस नागझिर्‍याच्या जंगलात राहून गोळा केलेल्या क्षणांचे शब्दांकन. अफाट सुंदर पुस्तक. आसमंत - श्रीकांत इंगळहळीकर. - निसर्गनिरीक्षणांवर आधारीत लेखांचा संग्रह. अप्रतिम फोटो. सुरेख पुस्तक. हिमालय सर्वांगदर्शन - तिसरा ध्रुव - रमेश देसाई - एका गिर्यारोहकाने हिमालयाच्या प्रेमापोटी लिहिलेले पुस्तक अशी ह्या पुस्ताकची करुन दिलेली ओळख अगदी सत्य आहे. खूप माहिती, सुरेख फोटो, नकाशे. सुरेख पुस्तक. अगस्तीचे अंगण - प्रभाकर पाध्यांचे निवडक साहित्य. माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. सुरुवातीच्या संपादकांच्या मनोगतापासून पुस्तक सुरेख आहे! पत्र - माधव आचवल - पुन्हा एकदा माधव आचवल! वेगवेगळ्या लेखांचे एकत्र संकलन. विंचूर्णीचे धडे - गौरी देशपांडे - गौरीने लिहिलेलं माझ सगळ्यात आवडतं पुस्तक! प्रिय जीए - सुनिता देशपांडे - सुनीताबाई आणि जीए ह्यांच्यामधला पत्र व्यवहार.

चित्रे आणि चरित्रे - व्यंकटेश माडगूळकर - अतिशय सुरेख पुस्तक. हृद्य व्यक्तीचित्रं, भटकंतीविषयक अनुभव. संग्राह्य. सरवा - व्यंकटेश माडगूळकर - ( कोरडवाहू जमिनीत भूईमूग, हरभरा वगैरे पिकं निघाल्यावर काही शेंगा, लोंब्या इत्यादि मातीत राहतात, ती वेचतात, त्याला सरवा वेचणं म्हणतात.) हा अशाच काही लेखांचा सरवा. मनातलं अवकाश - सुनीता देशपांडे - पहिलाच, पुलंना उद्देशून असलेला आण्यांतलं लग्न हा लेख फार सुरेख. बाकीचेही. संग्राह्य. मण्यांची माळ - सुनीता देशपांडे - सोयरे सकळ नंतरचे पुस्तक म्हणजे मण्यांची माळ. सोयरे सकळबद्दलवर लिहिलंच आहे कोणी ना कोणी. कसदार ललित लेखन. गीतयात्री - माधव मोहोळकर -जुन्या काळातील संगीतकार, गायक, गायिका, गीतकार आणि एकूणच त्या काळचा माहौल, ह्यावर अतिशय आत्मीयतेने लिहिलेलं पुस्तक. फार सुरेख पुस्तक आहे.

In reply to by यशोधरा

छानच निवड आहे यशो. बरीसशी यातली वाचली नाहीत आणि वाचायला आवडतील अशी आहेत. वर कुणीतरी म्ह्टल्याप्रमाणे मला ही सगळी माहीती एखाद्या एक्सेल फाईल मधे ही गोळा करायला आवडेल, आणि ती लेखक वा विषयाप्रमाणे फिल्टरपण करता येईल. स्वलेकर यांनी दिलेली लिंक चालत नाहीये त्यांनीच लिहल्याप्रमाणे.

In reply to by सस्नेह

अरूण साधूंची पुस्तकं मिळवून वाचलीच पाहिजेत. "झिपर्‍या" आणि "विप्लवा" तरी. जयंत नारळीकरांची "प्रेषित" ही सुद्धा सुंदर विज्ञान कादंबरी आहे.