Skip to main content

कर्नाटक विधानसभा निवडणुक-२०१३

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 08/05/2013 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली त्याचे निकाल पुढीलप्रमाणे: एकूण जागा: २२४ (मतदान २२३ जागी झाले) कॉंग्रेस: १२१ भाजप: ४० जनता दल(धर्मनिरपेक्ष): ४० कर्नाटक जनता पक्ष: ६ बी.एस.आर कॉंग्रेस : ३ महाराष्ट्र एकीकरण समिती: २ समाजवादी पक्ष: १ अपक्ष आणि इतर: १० कर्नाटकात २००८ पासून भाजपचे सरकार होते.पक्षाने राज्यात पाच वर्षात बी.एस.येडियुराप्पा, डी.व्ही.सदानंद गौडा आणि जगदिश शेट्टर हे तीन मुख्यमंत्री दिले. मुळात पाच वर्षे सत्तेत असल्यामुळे असलेला प्रस्थापितविरोधी कल, येडियुराप्पांचा भ्रष्ट कारभार,सत्तेत राहण्यासाठी वाटेल ते मार्ग अवलंबणे (रेड्डी बंधूंसारख्या भ्रष्ट तत्वांची मदत घेणे, ऑपरेशन लोटस अंतर्गत विरोधी पक्षांचे आमदार फोडणे इत्यादी) तसेच नंतरच्या काळात स्वत: येडियुराप्पांचे पक्ष सोडून जाणे या कारणांमुळे भाजपचा राज्यात पराभव होणे अगदीच अनपेक्षित नव्हते.या निकालांचा आढावा घेणे हा या लेखाचा उद्देश आहे. सर्वप्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की कर्नाटक राज्यातील मतदार विधानसभा निवडणुकांमध्ये सामान्यपणे देशात जे वातावरण असेल त्याच्या विरोधात कौल देतात.१९७७ मध्ये देशभरात इंदिरा गांधींच्या कॉंग्रेस पक्षाचा धुव्वा उडाला.पण वर्षभराने झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींच्या पक्षाला २२४ पैकी १५९ जागा मिळाल्या. १९८० च्या दशकात केंद्रात कॉंग्रेस पक्षाची स्थिर सरकारे होती.पण कर्नाटकात मात्र रामकृष्ण हेगडेंच्या जनता पक्षाचे सरकार होते.१९८९ मध्ये देशभरात राजीव गांधींच्या कॉंग्रेसचा पराभव होत होता पण कर्नाटकात मात्र पक्षाला २२४ पैकी १७८ जागा मिळून घवघवीत यश मिळाले.१९९४ च्या निवडणुकीत कर्नाटकात कौल देशातील वातावरणाला मिळताजुळता आला.पुढे १९९९ मध्ये वाजपेयींची लाट असताना राज्यात मात्र कॉंग्रेसने आरामात विजय मिळविला.२००४ मध्ये एन.डी.ए चा देशात पराभव झाला पण कर्नाटकात मात्र भाजप-जनता दल संयुक्त युती सर्वात मोठा गट ठरली.२००८ मध्ये राज्यात भाजपचा विजय झाला पण २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला.आता २०१३ मध्ये कॉंग्रेस पक्षाचा विजय झाला आहे.या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला मिळालेला विजय फारसा शुभशकुनी नक्कीच नाही :) राज्यातील निकालांवरून असे दिसते की भाजपचा २० वर्षातील सर्वात मोठा पराभव या निवडणुकांमध्ये झाला आहे.यापूर्वी भाजपने राज्यात ४० जागा हे चित्र १९९४ मध्ये बघितले होते.पण त्यापूर्वीच्या १९८९ च्या निवडणुकांमध्ये पक्षाला अवघ्या ४ जागा मिळाल्या होत्या त्या तुलनेत ४० जागा हे मोठे यश मानले गेले होते.पण यावेळी मात्र मागच्या निवडणुकांमधील ११० जागांच्या तुलनेत ४० जागा म्हणजे जोरदार आपटी भाजपने खाल्ली आहे.तसे असले तरी भाजपने काही "क्लस्टर्स" मध्ये विजय मिळविला आहे.उदाहरणार्थ चिकोडी, बेळगाव,उडुपी-चिकमागळूर, बंगलोर उत्तर आणि बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हे "क्लस्टर्स" आहेत. तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने विशेषत: राज्याच्या दक्षिण भागात म्हैसूर, मंड्या, हसन, चामराजनगर आणि बंगलोर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील "क्लस्टर्स" मध्ये यश मिळविले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या निवडणुकांप्रमाणेच मतदान झाल्यास जनता दल (धर्मनिरपेक्ष) ला ६ आणि भाजपला ५ जागा मिळण्यात फारशी अडचण येऊ नये. तसेच स्वत: येडियुराप्पा किंवा त्यांचा पुत्र बी.एस.राघवेन्द्र यांनी निवडणुक लढविल्यास शिमोगा लोकसभा मतदारसंघातून कर्नाटक जनता पक्षाला विजय मिळविणे अवघड जाऊ नये.म्हणजे २०१४ मध्ये राज्यातून २८ पैकी कॉंग्रेसला १६, जनता दल (ध) ला ६, भाजपला ५ तर कजपला १ असे चित्र उभे राहू शकेल.अर्थात लोकसभा निवडणुकांमधील मुद्दे वेगळे असतात आणि प्रभावशाली उमेदवार एखाद्या पक्षाने दिल्यास निकालात फरक पडू शकतो.तरीही सांगायचा मुद्दा हा की २२४ पैकी १२१ म्हणजे चांगल्यापैकी यश कॉंग्रेस पक्षाने मिळविले असले तरी लोकसभेत ते तितक्या प्रमाणावर परावर्तित झालेले दिसायची शक्यता जरा कमी आहे.याचे कारण म्हणजे भाजप,जनता दल (ध) आणि कजपने "क्लस्टर्स" मध्ये विजय मिळविले आहेत. मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारण फॉलो करत आहे. या निवडणुक निकालांची १९९४ च्या निकालांशी तुलना केल्यास दोन निकालांमध्ये कमालीचे साम्य आढळते.१९९४ मध्येही कॉंग्रेस पक्षाने निवडणुकीला सामोरे जाताना त्यापूर्वीच्या ५ वर्षात तीन मुख्यमंत्री (विरेन्द्र पाटिल,एस.बंगाराप्पा आणि विरप्पा मोईली) दिले होते तर यावेळी भाजपने तसे केले होते.१९९४ मध्ये कॉंग्रेस पक्षाला डोकेदुखी निर्माण करणारा पक्ष होता एस.बंगाराप्पांचा "कर्नाटक कॉंग्रेस पक्ष" तर २०१३ मध्ये भाजपला डोकेदुखी निर्माण करणारा पक्ष होता "कर्नाटक जनता पक्ष". हे दोन माजी मुख्यमंत्री त्यांच्या मुळच्या पक्षातून बाहेर पडून आपल्या मुळातल्या पक्षांच्या मुळावर उठले होते. हे दोन्ही माजी मुख्यमंत्री शिमोगा जिल्ह्यातील तर दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होते.१९९४ मध्ये सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा पराभव होऊन तो ३५ जागांनिशी तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला तर २०१३ मध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव होऊन तो ४० जागांनिशी जवळपास तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. १९९४ मध्ये जिंकला मुख्य विरोधी पक्ष जनता दल ११५ जागा घेऊन तर २०१३ मध्ये जिंकला मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेस १२१ जागा घेऊन. १९९४ आणि २०१३ या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यापूर्वी कनिष्ठ विरोधी पक्ष असलेल्या पक्षांनी सत्ताधारी पक्षाला मागे टाकत दुसरे स्थान पटकाविले. १९९४ मध्ये भाजपला ४० तर २०१३ मध्ये जनता दल (ध) ला ही ४० जागा मिळाल्या.१९९४ मध्ये बंगाराप्पांच्या कर्नाटक कॉंग्रेस पक्षाला १० तर २०१३ मध्ये येडियुराप्पांच्या कर्नाटक जनता पक्षाला ६ जागा मिळाल्या. या निकालांचे स्वरूप १९९४ आणि २०१३ मध्ये जवळपास सारखेच आहे. डिसेंबर १९९४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर मे १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील २८ लोकसभेच्या जागांपैकी १६ जागा जनता दलाला, ६ भाजपला, ५ कॉंग्रेसला तर १ जागा कर्नाटक कॉंग्रेस पक्षाला (बंगाराप्पांची शिमोगा) मिळाली होती. त्याच धर्तीवर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये २८ पैकी १६ जागा कॉंग्रेसला, ६ जागा जनता दल (ध) ला, ५ जागा भाजपला तर १ जागा कर्नाटक जनता पक्षाला मिळणार का याचे उत्तर काळच देईल. दुसरे म्हणजे २००९ मध्ये सत्तेत परत आल्यानंतर कॉंग्रेस-युपीए ला मोठ्या राज्यांमध्ये केवळ महाराष्ट्रात निसटता विजय मिळाला होता.बाकी हरियाणा आणि आसाम या मध्यम आकाराच्या राज्यांमध्ये पक्षाला विजय मिळाला होता.पण उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि गुजरात या मोठ्या राज्यांमधे पक्षाचा पराभवच झाला होता.केरळमध्ये तर अगदी काठावरचे बहुमत मिळाले होते.या पार्श्वभूमीवर कर्नाटकातला निर्भेळ विजय हा मोठ्या राज्यात पक्षाला बऱ्याच काळानंतर मिळालेला विजय आहे आणि त्याचे महत्व कॉंग्रेस पक्षाला नक्कीच वाटणार.कॉंग्रेस पक्षाला मिळालेल्या या विजयाबद्दल पक्षाचे अभिनंदन. पण हा विजय तसा फार अनपेक्षित नाही.त्यातून जवळपास दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून युपीए सरकार अडचणीत येत आहे. हा विजय म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या यशाची नांदी वगैरे कल्पना कोणी करून घेणार नाही ही अपेक्षा.

वाचने 38400
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

मुळात कुठलीही घटना आणि कायदा लिहिताना त्यांत माणसाची सद्सदविवेक बुद्धी गृहीत धरणे हीच फार मोठी चूक आहे. कायदे लिहिण्यामागचे मूळ गृहीत म्हणजे "चूक करणे हा मानवी स्वभावाचा एक गुणधर्म आहे. त्याला आळा घालण्याचा किंवा कमीतकमी चुक एका मर्यादेपर्यंत ताब्यात ठेवण्याचा एक प्रयत्न." हेच आहे. चलाख माणसांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या माणसांनी सद्सदविवेक बुद्धीचा वापर करणे अपेक्षीत असते. आणि ही निर्णयक्षमतासुद्धा एकाच हाती एकवटून तिचा दुरुपयोग होउ नये यासाठी लोकशाहीत एकापेक्षा जास्त शाक्तिकेंद्रे (Legislature, Executive, Judiciary आणि Press) कल्पिलेली आहेत. थोडक्यात: कायदा करताना पूर्णपणे मेंदूचा (तर्कनिरपेक्षतेचा अथवा लॉजीकचा) उपयोग करून कायद्यातील सर्व पळवाटा बंद करणे आवश्यक असते आणि कायद्याची अंमलबजावणी करताना मेंदूबरोबर हृदयाचा (सद्सदविवेक बुद्धीचा) उपयोग करून निर्णय घ्यायचे असतात.

In reply to by श्रीगुरुजी

घटनाकाराना यात दोष कसा दिसला नाही याचा विस्मय वाटतो.
घटनाकारांना बर्‍याच गोष्टींचा अंदाज आला नाही.blockquote> घटनाकारांना गोष्टी कळल्या नाहीत, दोष दिसले नाहित किंवा अंदाज आला नाही यापेक्षा त्यांनी काहि गोष्टी अध्याहृत ठेवल्या असे म्हणणे संयुक्तिक ठरावे. व घटनेचा, घटनेच्या 'स्पिरिट'चा अर्थ लावायचे काम न्यायालयावर सोडले आहे. बाकी निवडणूक पद्धती त्यातील प्रस्तावित सुधारणा वगैरेवर काहि वर्षापूर्वी लिहिलेल्या एका लेखमालिकेतील हा लेख आठवला

In reply to by श्रीगुरुजी

'द हिंदू' या वृत्तपत्रात १० मे रोजी आलेल्या
वृत्ता
नुसार अगदी तंतोतंत. क्षणभर तुम्हीच विद्या सुब्रह्मण्यम आहात, असे वाटून गेले. या वृत्तातील दुसरा, तिसरा परिच्छेद तुम्हीच लिहिलेला दिसतोय. अभिनंदन.

In reply to by श्रावण मोडक

=]:-) अहो इथे केवळ काँग्रेसच्या (व तोंडी लावण्यापुरती भाजपाच्या) भ्रष्ट वर्तनाविषयी चर्चा सुरु आहे हे अजूनही तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही. वैयक्तिक भ्रष्ट वर्तनाचे अवांतर कशाला? श्रीगुरुजी हे अभ्यासू सदस्य आहेत.

In reply to by श्रावण मोडक

असू द्या हो मोडक साहेब. कुणी संदर्भ दिले नाहीत म्हणून लगेच त्याला खोटारडा ठरवायला आपण काय मिपावरचे संघसमर्थक थोडेच आहोत.

राहुलजीच्या करिष्म्याचा विजय आहे. त्याचे सगळे श्रेय श्री राहुलजीच्या कल्पक नेतृत्वाला जाते. हा इसम देशाचा चेहरामोहरा बदलुन टाकणार हे नक्की आहे.कारण प्रचंड हुशार व कार्यकौश्यल लोकांची फौज ह्याच्या दिमतीला आहे.

नेहमीप्रमाणेच क्लिंटन स्पेशल उत्तम विश्लेषणात्मक लेख.

आता वळूया आपल्याच सगळ्यांच्याच जिव्हाळ्याच्या प्रश्नाच्या उत्तराकडे--हे निकाल राज्यातील २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालात कसे परावर्तित होतील याच्या.यासाठी पुढील "सिनॅरिओंचा" विचार केला आहे: १. लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान आताच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच होईल. २. लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतदानात आता कजप आणि बी.एस.आर कॉंग्रेसला मते दिलेले मतदार भाजपला मते देतील. ३. लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतदानात आता कजप आणि बी.एस.आर कॉंग्रेसला मते दिलेले मतदार भाजपला मते देतील आणि देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेता कॉंग्रेसची मते २% ने कमी होऊन जुन्या म्हैसूर भागात जनता दल (ध) ला तर इतरत्र भाजपला मिळतील. ४. लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतदानात आता कजप आणि बी.एस.आर कॉंग्रेसला मते दिलेले मतदार भाजपला मते देतील आणि देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेता कॉंग्रेसची मते ५% ने कमी होऊन जुन्या म्हैसूर भागात जनता दल (ध) ला तर इतरत्र भाजपला मिळतील. याव्यतिरिक्त आणखी कुठल्या शक्यतेचा विचार करावा असे कोणा मिपाकराला वाटत असल्यास जरूर कळवावे.माझ्याकडे एक्सेल फाईल आहेच.त्यातून नक्की निकाल कसे लागतील हे काढायला फार वेळ लागू नये. १. लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान आताच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच होईल. तसे झाल्यास हसन,कोलार,मंड्या आणि तुमकूर या ४ जागा जनता दल (ध) जिंकेल तर बेळगाव आणि चिक्कोडी या २ जागा भाजप जिंकेल आणि उरलेल्या २२ जागा--बागलकोट, बंगलोर मध्य, बंगलोर उत्तर, बंगलोर ग्रामीण, बंगलोर दक्षिण,बेल्लारी,बिदर,विजापूर,चामराजनगर,चिकबाळापूर,चित्रदूर्ग,दक्षिण कन्नड, दावणगेरे, धारवाड, गुलबर्गा, हावेरी, कोप्पळ,म्हैसूर,रायचूर,शिमोगा,उडुपी चिकमागळूर आणि उत्तर कन्नड कॉंग्रेस जिंकेल. मूळ लेखात यापेक्षा वेगळा अंदाज व्यक्त केला आहे पण त्यावेळी मतदारसंघनिहाय कोणत्या पक्षाला किती मते मिळाली हे विश्लेषण व्हायचे होते. २. लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतदानात आता कजप आणि बी.एस.आर कॉंग्रेसला मते दिलेले मतदार भाजपला मते देतील. तसे झाल्यास भाजपची परिस्थिती बरीच सुधारेल.तसे झाल्यास बेळगाव,बेल्लारी,बिदर,चिक्कोडी,धारवाड, गुलबर्गा,हावेरी,कोप्पळ,शिमोगा,तुमकूर आणि उत्तर कन्नड या ११ जागा भाजप जिंकेल, हसन,कोलार आणि मंड्या या ३ जागा जनता दल (ध) जिंकेल आणि उरलेल्या १४ जागा--बागलकोट,बंगलोर मध्य, बंगलोर उत्तर, बंगलोर ग्रामीण, बंगलोर दक्षिण,विजापूर,चामराजनगर,चिकबाळापूर,चित्रदूर्ग,दक्षिण कन्नड, दावणगेरे,म्हैसूर,रायचूर कॉंग्रेस जिंकेल. ३. लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतदानात आता कजप आणि बी.एस.आर कॉंग्रेसला मते दिलेले मतदार भाजपला मते देतील आणि देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेता कॉंग्रेसची मते २% ने कमी होऊन जुन्या म्हैसूर भागात जनता दल (ध) ला तर इतरत्र भाजपला मिळतील. तसे झाल्यास भाजप ११ जागाच जिंकेल. त्या असतील: बंगलोर दक्षिण,बेळगाव,बेल्लारी,बिदर, चिक्कोडी,धारवाड,गुलबर्गा,हावेरी,कोप्पळ,शिमोगा आणि उत्तर कन्नड. कॉंग्रेस बागलकोट,बंगलोर मध्य, बंगलोर उत्तर,विजापूर,चामराजनगर,चिकबाळापूर,चित्रदूर्ग,दक्षिण कन्नड,दावणगेरे,म्हैसूर,रायचूर आणि उडुपी-चिकमागळूर या १२ जागा तर जनता दल (ध) बंगलोर ग्रामीण,हसन,कोलार,मंड्या आणि तुमकूर या ५ जागा जिंकेल. ४. लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतदानात आता कजप आणि बी.एस.आर कॉंग्रेसला मते दिलेले मतदार भाजपला मते देतील आणि देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेता कॉंग्रेसची मते ५% ने कमी होऊन जुन्या म्हैसूर भागात जनता दल (ध) ला तर इतरत्र भाजपला मिळतील. तसे झाल्यास मात्र भाजपला राज्यात पूर्वीचे वैभव दिसेल.त्या परिस्थितीत भाजप बागलकोट, बंगलोर मध्य,बंगलोर दक्षिण,बेळगाव,बेल्लारी,बिदर,विजापूर,चामराजनगर,चिक्कोडी,चित्रदूर्ग,दक्षिण कन्नड, दावणगेरे, धारवाड, गुलबर्गा,हावेरी,कोप्पळ,रायचूर,शिमोगा,उडुपी-चिकमागळूर आणि उत्तर कन्नड या २० जागा, जनता दल (ध) ला बंगलोर ग्रामीण,चिकबाळापूर,हसन,कोलार,मंड्या आणि तुमकूर या ६ जागा तर कॉंग्रेस केवळ बंगलोर उत्तर या २ जागा जिंकू शकेल. एखाद्या ठिकाणी कोणा पक्षाने तगडा उमेदवार दिल्यास (उदाहरणार्थ शिमोगातून स्वत: बी.एस.येडियुराप्पा किंवा त्यांचा मुलगा बी.एस.राघवेन्द्र उभे राहिल्यास त्यांचा पराभव करणे जवळपास अशक्य असेल) किंवा बंडखोरी झाल्यास मतदारसंघातील कल बदलतील त्या शक्यतेचा अर्थातच यात अंतर्भाव केलेला नाही.तसेच कजप आणि बी.एस.आर कॉंग्रेस या पक्षांची १००% मते भाजपकडे वळतील असे व्यक्तिश: मला वाटत नाही.तरीही कोणत्या परिस्थितीत राज्यातील निकाल कसे लागतील हे इथे स्पष्ट केले आहे. माझ्याकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालांची एक्सेल फाईल आहे.कोणाला ती हवी असल्यास व्य.नि करून ई-मेल पत्ता कळवावा ही विनंती.मी ती फाईल ई-मेलवर पाठवू शकेन.

In reply to by क्लिंटन

आणि दुसरे म्हणजे सर्व मतदारसंघातून "युनिफॉर्म" प्रमाणावर मते फिरतील हे गृहितक आहे.तसे होईलच असे नाही (बहुदा होणारच नाही).अनेकदा मतदारसंघनिहाय प्रस्थापितविरोधी कलही बघायला मिळतो.अशा वेळी पक्षाने मागच्या वेळी निवडून आलेल्या खासदाराऐवजी इतर कोणता उमेदवार दिला तर हा कल काही प्रमाणावर नक्कीच कमी होऊ शकतो.

In reply to by क्लिंटन

२००८ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांचा असाच तुलनात्मक अभ्यास करता काहीसे आश्चर्यदायक निष्कर्ष पुढे येतात. २००८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला जरी २२४ पैकी ११० जागा मिळाल्या असला तरी तसेच मतदान २००९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी झाले असते तर भाजपला राज्यातील २८ पैकी अवघ्या १० मतदारसंघांमध्ये (बागलकोट,बंगलोर उत्तर,बंगलोर दक्षिण,बेळगाव,बेल्लारी, दावणगेरे,धारवाड, हावेरी, शिमोगा आणि उडुपी-चिकमागळूर) विजय मिळाला असता. तर कॉंग्रेसला बंगलोर मध्य, बिदर, विजापूर, चामराजनगर, चिकबाळापूर, चिकोडी,चित्रदूर्ग, दक्षिण कन्नड, गुलबर्गा, कोलार, कोप्पळ, म्हैसूर, रायचूर आणि उत्तर कन्नड या १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये तर जनता दल (ध) ला बंगलोर ग्रामीण,हसन,मंड्या आणि तुमकूर लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळाला असता. पण प्रत्यक्षात २००९ च्या लोकसभा मतदारसंघात भाजपला जागा मिळाल्या १९, कॉंग्रेसला ६ तर जनता दल (ध) ला ३. २००८ च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच मतदान झाले असते तर भाजपला ज्या १० जागा मिळाल्या असत्या त्या तर पक्षाने २००९ मध्ये मिळविल्याच पण विजापूर, चिक्कोडी, चित्रदूर्ग, दक्षिण कन्नड, कोलार, कोप्पळ, रायचूर आणि उत्तर कन्नड या जागा कॉंग्रेसकडून तर तुमकूर ही जागा जनता दल (ध) कडून खेचून आणली. २००८ मध्ये रायचूर मधून कॉंग्रेसला जवळपास ७% चे मताधिक्य होते तर ती जागा प्रत्यक्षात २००९ मध्ये भाजपने जिंकली. (भाजपने ज्या जागा कॉंग्रेसकडून खेचून आणल्या त्यात रायचूर ही जागा जिंकणे भाजपला सर्वात अवघड होते). २००८ पेक्षा २००९ मध्ये भाजपची ७.७७% मते वाढली तर कॉंग्रेसची २.८९% मते वाढली तर जनता दल (ध) ची ५.३८% मते कमी झाली. लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांची मते वाढणे आणि स्थानिक पक्षांची/इतरांची मते कमी होणे हा कल इतर राज्यांमध्येही बघायला मिळतो.आता २००९ मध्ये २००८ च्या तुलनेत भाजपची मते प्रत्येक मतदारसंघात ७.७७% ने वाढवली, कॉंग्रेसची मते २.८९% ने वाढवली आणि जनता दल (ध) ची मते ५.३८% ने कमी केली आणि तसेच हसन मधून माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा आणि बंगलोर ग्रामीणमधून त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी निवडणुक लढवित असल्यामुळे मते जनता दल (ध) विरूध्द जाणार नाहीत हे लक्षात घेतले तर २८ पैकी २६ लोकसभा मतदारसंघांचे निकाल predict करता येऊ शकतील. या सगळ्या पध्दतीत नक्की कोणत्या पक्षाची किती टक्के मते कमी-जास्त होऊ शकतील हा सर्वात महत्वाचा इनपुट ठरेल. पण एक गोष्ट नक्कीच दिसते.देशभरात कॉंग्रेस आणि युपीएला अनुकूल वातावरण असतानाही कर्नाटकात मात्र वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या विरोधी पक्ष भाजपची मते कॉंग्रेसपेक्षा बरीच जास्त वाढली.२०१४ मध्येही साधारण अशीच परिस्थिती दिसली--जनता दल (ध) ची मते ५% कमी, भाजपची २% ने जास्त अधिक कजप अधिक बी.एस.आर कॉंग्रेसची मते भाजपला आणि कॉंग्रेसची मते ३% ने जास्त, शिमोगातून येडियुराप्पा किंवा राघवेन्द्र निवडणुक लढविणार आणी हसनमधून देवेगौडा आणि बंगलोर ग्रामीणमधून कुमारस्वामी निवडणुक लढविणार असे गृहित धरले तर राज्यातून भाजपला ७, कॉंग्रेसला १६, जनता दल (ध) ला ४ आणि कजपला १ जागा अशी परिस्थिती निर्माण होईल. मला वाटते की ही परिस्थिती अधिक realistic आहे.

In reply to by क्लिंटन

>>> तर राज्यातून भाजपला ७, कॉंग्रेसला १६, जनता दल (ध) ला ४ आणि कजपला १ जागा अशी परिस्थिती निर्माण होईल. मला वाटते की ही परिस्थिती अधिक realistic आहे. २००८ च्या विधानसभेपेक्षा २००९ मध्ये लोकसभेसाठी भाजपला जास्त अनुकूल परिस्थिती होती. तशीच परिस्थिती २०१४ मध्ये निर्माण होईल असे वाटते. जरी भाजपला विधानसभेत फक्त ४० जागा असल्या तरी लोकसभेसाठी भाजप २८ पैकी किमान १० चा आकडा पार करेल असे वाटते. लोकसभेची निवडणुक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढविली जाईल व त्यात काँग्रेस बहुतेक सर्व राज्यात अत्यंत दुर्बल अवस्थेत असणार आहे.

लेख आणि प्रतिसाद भारीच. बंडामामांचे फूटबॉलचे उदाहरण लाईक हं...! -दिलीप बिरुटे

नेहमीप्रमाणेच मस्त लेख आणि विवेचन, कालच ऐकलेल्या बातमीनुसार मल्लिकार्जुन खरगेना केन्द्रिय रेल्वे मन्त्रिपद देण्यात येणार आहे. सिद्धरामय्या न मुख्यमन्त्रिपद दिल्यामुळे नाराज झालेल्या खरगेना आगामी लोकसभा निवड्णुकीपर्यन्त औटघटकेचे रेल्वे मन्त्रिपद देउन खुश करायचा कॉन्ग्रेसचा विचार असावा का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

खरगें निष्टावंतात असल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असे सर्वांना वाटत होते.१९७२ पासूनच्या सर्व विधानसभा निवड्णूका ते जिंकत आले आहेत.त्यांचा रेकॉर्डही चांगला आहे. सिद्दारामैय्या २००६ पर्यंत जनता दलात होते.देवेगौडांनी आपल्या मुलाला मुख्यमंत्रीपद दिल्याने ते काँग्रेसमध्ये गेले.आक्रमक शैली,जातिचे राजकारण व्यवस्थित सांभाळणे,मुख्य म्हणजे गौडा कंपनीचे सिक्रेट्स माहित असणे ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आतापर्यंत 'हायकमांडचा आदेश अंतिम' म्हणण्याची काँग्रेसी प्रथा होती. ह्यावेळी मुख्यमंत्री आमदारांनी गुप्त मतदान पद्धतीने निवडला आहे.

माझीही काही मते - १ असे लक्षात येत आहे की एखाद्या मतदारसंघात एखाद्या माणसाची निवडून येण्याची क्षमता ही सध्या सगळ्यात जास्त महत्वाचे ठरत आहे. मग पक्ष, धोरणे इ गेले तेल लावत. २ हे असे होऊ नये म्हणून काय करावे लागेल ते बघावे लागेल. त्यासाठी मतदारसंघात माणसे उभी न करता पक्ष उभे केले पाहिजेत. धोरणांना उभे केले पाहिजे. धोरणे राबविण्याच्या क्षमतेला उभे केले पाहिजे. म्हणजे लोकांनी पक्षाला मते द्यावीत व त्या पक्षाने अगोदरच त्यांचे मंत्रीमंडळ जाहीर करावे. मला वाटते याने बरेच प्रश्न सुटण्यास मदत होईल. व Accountability पण वाढेल. स्थानिक गुंडगिरीलाही आळा बसेल व फुटकळ पक्षही नष्ट होतील आणि एक मतानी निवडून आला असेही होणार नाही. सध्या एकूण मते कमी असली तरीही एखादा निवडून येतो तसे होणार नाही. हे असे कुठेतरी असेल व त्याला काहीतरी म्हणतही असतील....तर तसेच करावे असे माझे मत आहे. ३ मतदान ३० दिवस चालू ठेवावे. ज्या इंटरनेटवर अब्जावधी रुपयांचे व्यवहार होतात त्यावर मतदान करण्याची सोय करावी. बँकेतून/क्रेडिट कार्डावरही मतदानाची सोय करावी व सध्याची पद्धतही चालू ठेवावी ती फर तर ३ दिवस ठेवावी. हे जरा अवांतर झाले आहे पण मनात आले ते लिहिले.

In reply to by जयंत कुलकर्णी

आपल्या सूचनांशी बहुतांशी सहमत. मी आजवर एकदाही मतदान करू शकलो नाही. जेव्हा मी पहिल्यांदा मतदान करू शकेल असे वाटत होते तेव्हा लोकसभा व विधानसभा दोन्हींच्या निवडणूका वेळेपूर्वी झाल्या. त्यानंतर ५ वर्षांनी माझे नाव मतदारयादीत असूनही स्वतःच्या गावापासून ६०० किमी दूर राहत असल्याने व माझी परीक्षा सुरू असल्याने तेव्हाही मतदान करू शकलो नाही. त्यानंतरच्या निवडणूका मी भारताबाहेर असतानाच झाल्या. मला तर असे सुचवावेसे वाटते की भारतीय नागरीक संपूर्ण भारतातून स्वतःच्या मतदारसंघाचे मतदान करू शकला पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी ओळखपत्र तपासून व मतदारसंघनिहाय नाव तपासून त्या मतदार संघाचे सुरक्षित (जालावर नसलेल्या वेबसाईटचे) वेबपेज उघडावे व त्या मतदाराला स्वतःचे मतदान करू द्यावे. निवडणूकीच्या दिवशी स्वतःच्याच गावात उपस्थित राहणे प्रत्येकाला शक्य नसते. विद्यार्थी असेल तर परीक्षा वगैरे असू शकतात, नोकरी असेल तर सुटी मिळण्यास समस्या असू शकतात. मतदान करण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमूळे प्रत्यक्षात तसे शक्य नसते. अन केवळ त्या कारणासाठी प्रवासाचा खर्च करणेही प्रत्येकाला जमेल असे नाही. त्याखेरीज राजकीय पक्षांची जी ओरड असते की परप्रांतियांची नावे खोटेपणाने घुसवली जातात त्याचे कारणही शिल्लक राहणार नाही. १५ वर्षे वास्तव्याच्या अटी पूर्ण केल्याखेरीज स्थानिक मतदारसंघाचे मतदान करण्याची पात्रता येण्याची अंमलबजावणी करणेही अधिक परिणामकारक होईल. मतदान एकच दिवस ठेवण्याचीही काही गरज नाही. पूर्ण महिनाभरात प्रत्येक मतदाराला तीन ते चार दिवस - वेळांचे पर्याय द्यावेत. उदा. मे ७ सकाळी १० ते ११, मे १२ दुपारी १ ते २, मे १७ दुपारी ४ ते ५, मे २९ सकाळी ९ ते १०. अन एक दोनदा असे पर्याय न घेता नेहमीसारखे मतदानाची प्रक्रीया पार पाडावी. सूरक्षा यंत्रणांवरही ताण पडणार नाही. शिक्षक, सरकारी कर्मचार्‍यांना या कामास जुंपण्याचे प्रयोजनही संपेल. कृपया या प्रस्तावातल्या सूचनांचा आशय लक्षात घ्यावा, अंमलबजावणी यापेक्षाही अधिक परिणामकारकपणे करता येईलही.

In reply to by श्रीरंग_जोशी

सूचना आवडल्या. आधार कार्डांचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कदाचित हे करता येईल. अवांतर १. नुकत्याच झालेल्या पाकिस्तानातील निवडणुकांत निकाल (कल) आपल्यापेक्षा खूपच लवकर कळले. आपल्याकडे सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काही थोडेच कल उपलब्ध असतात. उलट तेथे आपल्या आठ वाजताच (तिथल्या साडेसात वाजता?) स्पष्ट कल उपलब्ध होते. तसेच मतदानाच्या दिवशी काही शहरात मतदानाच्या वेळा वाढवण्यात आल्या होत्या तरीही हे शक्य झाले. त्याअर्थी तेथे मतदानाची नोंद थेट मुख्य सर्वरवर होत असावी. आपल्यासारखे मतदानयंत्राचे हबिंग करावे लागत नाही असे वाटते. ही सुधारणा आपल्यायेथे करायला हरकत नाही. अवांतर २. वरच्या अनेक प्रतिसादांत २०१४ च्या लोकसभा निवडणुकांविषयी अंदाज करताना धागाप्रस्तावकांनी* आणि इतरांनीही "देशभरात काँग्रेसविरोधी वातावरण" असल्याचा दावा केला आहे त्याची मौज वाटली.

In reply to by नितिन थत्ते

अवांतर ३ राहिले. आदल्या रात्री वाटलेल्या पैशांवर/दारूवर निवडणुकांचे निकाल ठरतात असे एरवी मत असलेल्यांना मतदारांचा कौल, सरकारचा परफॉर्मन्स वगैरेवर चर्चा करताना पाहून आणखीच मौज वाटली.

In reply to by नितिन थत्ते

आपल्यासारखे मतदानयंत्राचे हबिंग करावे लागत नाही असे वाटते. ही सुधारणा आपल्यायेथे करायला हरकत नाही.
भारतात प्रत्यक्ष मतमोजणीआधी मतदान केंद्र निहाय एकूण मतदानाची कागदोपत्री नोंद आणि यांत्रिक नोंद याची पडताळणी होते. त्यावर सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींची सही घेतली जाते. आणि मगच त्याचे हबिंग होते. ही पद्धत अधिक फूलप्रूफ आहे.

In reply to by नितिन थत्ते

अवांतर २. वरच्या अनेक प्रतिसादांत २०१४ च्या लोकसभा निवडणुकांविषयी अंदाज करताना धागाप्रस्तावकांनी* आणि इतरांनीही "देशभरात काँग्रेसविरोधी वातावरण" असल्याचा दावा केला आहे त्याची मौज वाटली.
देशात काँग्रेसविरोधी वातावरण आहे हे आता तरी थत्तेचाचांना मान्य व्हावे. देशात गेल्या वर्षा-दीडवर्षापासून काँग्रेसविरोधी वातावरण आहे हे कोणत्याही नि:पक्षपाती माणसाला समजून येणे कठिण नाही.पण त्याचे कसे आहे की काँग्रेसभक्तीचा चष्मा लावला की अशा गोष्टी फिल्टर आऊट होऊन जातात.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हा कॉंग्रेस चा दणदणीत पराभव आहे हे अमान्य करण्यात अर्थ नाही . . १९९८ मध्ये याच राज्यांच्या निवडणुकात काँग्रेस चा विजय झाला होता पण नंतर लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप केंद्रामध्ये सत्तेवर आले . याउलट २००३ मध्ये या राज्यांमध्ये भाजप ने दणदणीत विजय मिळवला होता मात्र २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा सपशेल पराभव झाला . भारतामध्ये ज्याप्रमाणे हिंदी भाषिक राज्य आहेत त्याप्रमाणे nagaland पण आहे, केरळ पण आहे आणि महाराष्ट्र पण आहे . या प्रचंड वैविध्य असणारया देशाचा मूड ३-४ राज्यांच्या निकालावरून ठरवण्याची चूक होऊ नये असे वाटते . त्यामुळे कॉंग्रेस चा आज पराभव झाला असला तरी पूर्ण देशभरात कॉंग्रेस विरोधी लाट आहे असा निष्कर्ष काढणे घाई चे ठरेल असे माझे मत आहे

In reply to by जयंत कुलकर्णी

हे असे होऊ नये म्हणून काय करावे लागेल ते बघावे लागेल
येथे, "सध्याची पद्धत चुकीची आहे" असे गृहित धरले गेले आहे. मुदलात हे गृहितकच तपासून पहायची गरज आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीकडे पाहू. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही देशव्यापी पक्ष आपली बाजू व्यवस्थित मांडू शकणार नाहीत म्हणून बेळगावी जनतेने म. ए समितीच्या दोन आमदारांना विधानसभेत पाठवले. हे दोघे नक्की काय करतील हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवला तरी, तुम्ही सुचवलेल्या व्यवस्थेत बेळगावी जनतेचा हा अधिकारच हिरावून घेतला जाईल. ते निश्चितच लोकशाहीला मारक असेल. मूळात भारत हा एकजिनसी समाज नाही, हे वास्तव आहे. म्हणूनच विविध प्रादेशिक पक्ष हेदेखिल तितकेच वास्तव आहे आणि ते तसे राहणार आहे. मारून-मुटकून एकजिनसी बनविण्याचा प्रयत्न अंतीमतः घातक ठरण्यचीच शक्यता आहे. (भारताप्रमाणेच पाकिस्तानदेखिल एकजिनसी नाही. परंतु, त्याला एकजिनसी बनविण्यासाठी जेव्हा उर्दू हीच एकमेव राष्ट्रभाषा ठरवली गेली, तेव्हा पूर्व बंगाल फुटला आणि सिंधमध्ये असंतोष पसरला.) लोकसभेसाठी जनता देशपातळीवरील प्रश्नांवर मतदान करते, हा दुसरा मोठ्ठा गैरसमज! आणिबाणीनंतर झालेल्या निवडणूकीत लोकांनी "व्यक्तीस्वातंत्र्याच्या झालेल्या गळचेपीविरुद्ध मतदान केले" असा गाजावाजा करण्यात आला. मग आंध्र-कर्नाटकात काय आणिबाणी नव्हती? खरी गोष्ट ही की उत्तरेत जसे लोकांवर अत्याचार झाले तसे दक्षिणेत झाले नाहीत. ऑल पॉलिटिक्स इस लोकल!

कर्नाटकात झालेले पानिपत पाहून तरी भाजपाला काही अक्कल येईल व कॉग्रेस ज्यामुळे यश मिळाले त्या धड्यातुन काही शिकेल अशी आशा करणे देखील व्यर्थ आहे.

क्लिंटन यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार ८० च्या दशकापासून (विधानसभा निवड्णुकीत) सत्ताधारी पक्षाचा पराभव होण्याचे प्रमाण विजय होण्याच्या दुप्पट आहे असे दिसते. भारतातली लोकशाही प्रगल्भ झाली आहे असे म्हणता येईल का? (वाटलेले पैसे घेऊनही) जनता आपल्या मनाप्रमाणे मतदान करते असे म्हणता येईल का? १९८९ पासून मतदारांचे किमान वय २१ वरून १८ करण्यात आले. त्याचा या ट्रेण्डमधला वाटा किती असेल?

In reply to by नितिन थत्ते

भारताची का कर्नाटकाची लोकशाही प्रगल्भ झाली असे म्हणायचे? कारण महाराष्ट्रात हा नियम लागू होतो असे वाटत नाही. बरं सत्ताबदल हा निकष धरायचा तर तामिळनाडू अतिप्रगल्भ म्हणावा लागेल. :-)

क्लिंटन, आपले कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे -२०१३ विश्लेषण आवडले.

गेल्या २ वर्षात म्हणजे मार्च २०११ पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर एक वेगळाच कल दिसून येतो. मार्च २०११ मध्ये तामिळनाडू, केरळ, प.बंगाल, आसाम व त्रिपुराची विधानसभेची निवडणुक झाली. यापैकी तामिळनाडूत द्रमुक कडून अद्रमुककडे सत्ता गेली. कॉंग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांना तिथल्या जनतेने धुडकावून लावले. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडे सत्ता गेली. काँग्रेस जरी तृणमूल बरोबर युतीत होती तरी काँग्रेसला प्रत्यक्ष सत्तेत सहभाग मिळाला नाही. आसाममध्ये काँग्रेसने बांगला घुसखोरांच्या जीवावर सत्ता टिकविली. काँग्रेसच्या भयंकर खेळामुळे २०१६ किंवा २०२१ मध्ये आसामचा मुख्यमंत्री हा एखादा बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर असेल. केरळमध्ये भाजपला स्थान नव्हते. तिथे काँग्रेस आघाडीने डाव्या आघाडीकडून सत्ता मिळविताना जेमतेम बहुमत मिळविले (१४० पैकी काँग्रेस आघाडी ७२ व डावी आघाडी ६८). नंतर उ.प्र. मध्ये सपाने बसपाकडून सत्ता खेचून घेतली. काँग्रेस व भाजपला लोकांनी नाकारले. उत्तराखंडात सत्ताबदल होताना काँग्रेस व भाजप जवळपास बरोबरीत आले (७० पैकी काँग्रेस ३२ व भाजप ३१). इथे प्रस्थापितविरोधी कौल असूनही काँग्रेसला फारश्या जागा मिळाल्या नाहीत. गोव्यात सत्ताबदल होताना भाजपला ४० पैकी काठावर बहुमत मिळाले (२१ जागा). हि.प्र. मध्ये सत्ताबदल होताना काँग्रेसने काठावरचे बहुमत मिळविले (६८ पैकी ३६). कर्नाटकमध्येही काँग्रेसने २२३ पैकी १२१ अशी काठावरचीच कामगिरी केली. गुजरातचा अपवाद होता. तिथे भाजपने १८२ पैकी ११५ जागा अशी भरीव कामागिरी केली. यातून खालील निष्कर्ष निघतात. (१) ज्या राज्यात भाजप वि. काँग्रेस अशी सरळ लढत आहे किंवा काँग्रेस वि. प्रादेशिक पक्ष अशी लढत आहे, तिथे बहुतेक ठिकाणी सत्ताबदल होत आहे. पण विजेत्या पक्षाला जेमतेम काठावरचे बहुमत मिळत आहे (उत्तराखंड, हि.प्र., गोवा, कर्नाटक, केरळ). या दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला भरघोस बहुमत मिळताना दिसत नाही (किमान २/३ जागा). २) ज्या राज्यात काँग्रेसला प्रादेशिक पक्षांचा पर्याय आहे किंवा प्रादेशिक पक्ष जास्त तुल्यबळ आहेत तिथे मात्र प्रादेशिक पक्षांना भरघोस यश मिळालेले दिसत आहे. (तामिळनाडू, उ.प्र., प. बंगाल). म्हणजे जनता प्रादेशिक पक्षांना मोठ्या प्रमाणावर मते देत आहे. पण जिथे प्रादेशिक पक्षांचा अभाव आहे तिथे मात्र काँग्रेस किंवा भाजपला मते देताना जनता हात आखडता घेत आहे.