मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मध्य वयातील वादळ

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ---------------------- रजो निवृत्ती (menopause) हा एक पूर्ण कुटुंबावर परिणाम करणारा विषय आहे. हा केवळ स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय नसून सर्व वयाच्या पुरुषांवर सुद्धा परिणाम करतो. कारण या कालखंडातून आपली आई बहिण बायको मुलगी किंवा सासू जात असेल तर त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम पुरुषांवर होतो. रजो निवृत्ती म्हणजे स्त्रियांच्या मेंदूत तयार होणार्या संप्रेरकांना बीजांड कोश(ovary)प्रतिसाद देणे बंद करतात त्यामुळे त्यांच्या प्रभावाखाली बीजांड कोश तयार करणारी स्त्रियांची संप्रेरके इस्ट्रोजन आणि प्रोजेस्तीरोन यांचे प्रमाण बरेच घसरते. हि दोन्ही संप्रेरके स्त्रियांचे स्त्रीत्व जागृत ठेवण्याचे काम करतात. त्यांच्या मुळेच मासिक पाळी चालू राहते. साधारण चाळीशीनंतर स्त्रियांची पाळी अनियमित होण्यास सुरुवात होते आणि पंचेचाळीशीच्या आसपास ती बंद होते. हा शारीरिक बदल आहे. यापेक्षा जास्त बदल मानसिक स्थितीत होतो. स्त्रियांना रजोनिवृत्ती मुळे आपले स्त्रीत्व संपले असे वाटू लागते. आपण म्हातारे होणार हि भीती बोचू लागते. आता आपण पूर्वी सारख्या तरुण राहिलो नाही याची खंत वाटू लागते. आपल्या नवर्याला आपल्याबद्दल आकर्षण राहणार नाही हि भीती वाटू लागते.इत्यादि इत्यादि याचा मुळापासून विचार केला तर असे लक्षात येते कि सुंदर असणे सुंदर दिसणे आणि सुंदर राहणे हा स्त्री स्वभावाचा मूळ पैलू आहे लग्नात आपण पाहिले तर आपल्या आजीच्या वयाच्या बायका सुद्धा ( साठीच्या पुढील) छान साड्या नेसून दागिने घालून नटून आलेल्या दिसतात. तेच आपल्या आजोबांच्याच काय पण काकांच्या वयाचे सुद्धा (४० -४५ वर्षे) पुरुष हे जर बर्यापैकी शर्ट आणि पैन्ट घालून आलेले असतात मग त्याला इस्त्री असो कि नसो त्यांना काही फरक पडत नाही. नुस्तेच असे नाही कोणतीही स्त्री जर तिच्या साडीवर डाग पडला असेल ( आणि लोकांना दिसत नसेल तरीही) पूर्ण समारंभ संपेपर्यंत अतिशय अस्वस्थ असतात. बायका अगदी पूर्ण बायकान्चे हळदी कुंकू असेल तरीही अस्वस्थ असतात. कारण चांगले दिसणे आणि चांगले राहणे( good looking and well groomed) हा एक स्त्री स्वभावाचा पैलू आहे.पुरुषांना आकर्षित करणे हा त्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटासा भाग आहे रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते.( age miracle cream) सारख्या सौंदर्य प्रसाधनाचा जबरदस्त खप यामुळेच होतो. आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय? क्वचितच. पण एखाद्या प्रथितयश माणसाचा(राजकारण्याचा सुद्धा) पन्नासावा वाढदिवस सहज साजरा होताना दिसतो कारण काय? पुरुषाचे कर्तृत्व पहिले जाते स्त्री चे कर्तृत्व पहिले जाते पण आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही. त्याच वेळेला त्या स्त्रियांचे नवरे साधारण ४५ ते ५० वयाचे असतात आणि ते आपल्या कर्तृत्वाच्या शिखराकडे वाटचाल करत असतात. त्यात आपले पोट सुटले आहे कि टक्कल पडले आहे याचे त्यांना वाईट वाटत असले तरी ते मनाला फारसे लावून घेत नाही. त्यामुळे बायको जेंव्हा त्यांना विचारू लागते कि माझा चेहरा सुरकुतलेला दिसतो आहे काय त्यावर त्यांचे फारसे लक्षच नसते. त्यांना उत्साह वाटत नाही काही करू नये असे वाटते. हे सर्व संप्रेरके कमी झाल्यामुळे होते. जसे व्होल्टेज कमी झाल्यावर दिवा मंद होतो.त्याप्रमाणे त्यांच्या सर्व पेशींची क्रिया थोडीशी मंदावते. या काळात बायकांचे वजन वाढू लागते.पोटावर आणि मांड्यांवर ते चढू लागते आणि शरीराचा आकार बेढब होऊ लागतो(असे स्त्रीला जास्त वाटते). हा सर्व परिणाम संप्रेरके कमी झाल्यामुळे होतो कारण पूर्वी ती जर ४०० ग्राम अन्न दिवसात खात होती तर त्यातील ५० टक्के अन्नाचे शोषण होत असे आणि उरलेले ५० टक्के आतड्यातून मला वाटे बाहेर टाकले जात असे. आता कार्य प्रणाली हळू झाल्याने ६० टक्के अन्नाचे शोषण होते. म्हणजे रोज ३० -४० गरम अन्न जास्त शोषले जाते. म्हणजे महिन्यात १ किलो आणि वर्षाला १० ते १२ किलो वजन वाढते. आता उरलेले ४० टक्के अन्न सुद्धा हळूहळू खाली उतरल्यामुळे त्यावर जीवाणूंचा प्रभाव होऊन पोटात वात तयार होतो आणि पोट फुगल्या सारखे वाटते.(याच मुळे त्या स्त्रीला प्रत्यक्ष असल्यापेक्षा जास्त लट्ठ झाल्यासारखे वाटते)याच काळात बर्याचशा स्त्रियांची मुलेसुद्धा शाळेत वरच्या वर्गात किंवा कॉलेजात जाऊ लागलेली असल्याने त्याना पण शिंगे फुटू लागतात. या मुळे ती आई ज्या काही गोष्टी काळजीपोटी सांगत असते त्या काय कटकट आहे या नजरेने पाहत असतात. शालिनीताईनि सकाळी उठून केशर घालून आपल्या मुलांना गरम गरम शिरा डब्यात दिला होता. शाश्वत( त्यांचा मुलगा जो आता ११ वीत जायला लागला आहे तो डबा घेऊन गेला पण त्याच्या मित्राने वाढदिवसाची मैकडोनाल्डमध्ये पार्टी दिली त्यात तो डबा खायचा विसरून गेला.आणि शाल्मली हि इंजिनियरिंग च्या तिसर्या वर्षाला आहे ती आज आपल्या मित्र मैत्रिणींच्या बरोबर कॅन्टीन ला जाणार आहे तेथे आईचा दिलेला डबा उघडला तर काकूबाई वाटू अशी तिला भीती वाटते म्हणून ती घरून डबा न्यायलाच "विसरते". यावर शालिनीताई मुले घरी आल्यावर चिडचिड करतात माझ्या कष्टाची कुणाला किंमतच नाही पहाटे उठून इतकी मरमर करून मुलांसाठी काही करावे तर त्यांना याच काही पडलेलं नाही. शैलेशराव संध्याकाळी परत आल्यावर शालिनी ताई त्यांच्या कडे तक्रार करतात तर शैलेशराव शाल्मलीला विचारतात तर ती म्हणते कि मी चुकून डबा विसरले पण मी कॅन्टीनमध्ये व्हेज सैंडविच खाल्ले हे सांगते( मी जंक फूड खात नाही). आता शैलेशराव मुलांवर ओरडावे का या विचारात असताना शालिनी ताई चिडचिड करतात लेकीला बापाचीच फूस आहे मी इतकी मरमर करते त्याची कुणाला किंमतच नाही इ. उत्साहात शैलेशराव आपल्या कंपनीत होणार्या पगारवाढ किंवा बढती बद्दल बोलणार असतात पण बायकोचे बोलणे ऐकून त्यांच्या उत्साहावर विरजण पडते. मुलांना घेऊन आज बाहेर KFC किंवा smoking joe मध्ये जाऊ अस ते सांगणार असतात पण ते काही बोलत नाहीत. शाश्वत डबा खायला विसरलो हे सांगतो तर आई ते ऐकण्याच्या मूड मध्येच नसते आईची बडबड चालू आहे तर काय करावे हे त्याला कळत नाही. आई म्हणते ते पटत असले तरी तो खरोखरच डबा विसरलेला असतो हे कोणी ऐकतच नाही शेवटी तो आपल्या खोलीत निघून जातो. हि कहाणी घरोघरी थोड्या फार फरकाने दिसणारी आहे. संप्रेरके मनावर सुद्धा परिणाम करीत असतात त्यामुळे स्त्रियांना उल्हसित वाटत असते जेंव्हा ती संप्रेरके कमी होऊ लागतात तशी मानसिक उभारी कमी होऊ लागते आणि नैराश्य येते. यात भर म्हणजे तिला असे वाटत असते कि कुटुंबात कोणालाही तिची किंमत राहिली नाही. अशा वेळी तिला समजून घेणारे कोण असते तर तिची एखादी मैत्रीण जी या सर्वातून गेलेली असते किंवा तिची आई जी आपल्या मुलीत घडणारी स्थित्यंतरे पाहत असते आणि तिला त्याचा स्वानुभव असतो. या काळात स्त्रीला अशा आधाराची गरज असते. क्रमशः

वाचने 34336 वाचनखूण प्रतिक्रिया 79

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/09/2013 - 02:29
ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. मग स्त्रीया त्यांच्या शरीरातील बदल 'निसर्ग नियम' ह्या विचाराने का स्विकारू शकत नाहीत? आपल्या वागण्याने, चिडचिड करण्याने सर्व संसाराची राखरांगोळी होते आहे हे पाहूनही समंजसपणा दाखवून, नवर्‍याशी बोलून ह्यावर उपाययोजना का करीत नाहीत. ह्याच काळात पुरूषाला त्याच्या (व्यवसाय) निवृत्तीचे वेध लागलेले असतात. निवृत्ती काळातील आर्थिक गणितांनी तोही व्यथित, चिंतित असतो. त्याच्या सहनशक्तीची पातळीही, महागाईशी झुंजता झुंजता, उतरणीला लागलेली असते त्यात निवृत्तीकाळातील समस्यांची चिंता ह्या सर्वांशी एकांगी लढणार्‍या त्याच्या कडून 'पत्नीला, तिच्या शारीरीक बदलाला समजून घेण्याची' अपेक्षा करणं म्हणजे त्याच्या दुर्बल खांद्यावर अतिरिक्त भार टाकण्यासारखे आहे. अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे. शब्दांना अतिशय धार असते. धारदार शब्दांचा बेबंद वापर (शारीरीक बदलामुळे)केल्याने नाती कायमस्वरुपी तुटतात. अशा वयात विधायक वाचन आणि डॉक्टरांची मदत घेतल्यास आयुष्यातील हे वळणही पार करताना जास्त कठीण जाऊ नये.

In reply to by प्रभाकर पेठकर

शिल्पा ब गुरुवार, 05/09/2013 - 05:54
थोडक्यात उतारवयात सुद्धा बायकोला समजावुन घ्यायला नकोच आहे नै का!! उत्तम विचार .

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा गुरुवार, 05/09/2013 - 07:57
पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो
पेठकरकाका, ही इतकी एकांगी कमेंट तुमच्याकडून आली आहे ह्यावर विश्वास बसत नाहीये.

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/09/2013 - 09:47
माझ्या संपूर्ण प्रतिसादावर विचार केल्यास तो एकांगी वाटणार नाही.
स्त्रीया त्यांच्या शरीरातील बदल 'निसर्ग नियम' ह्या विचाराने का स्विकारू शकत नाहीत?
ह्या वाक्यातून मला स्त्रीयांच्या अशा काळातील वागण्यावर सखोल चर्चा घडावी अशी अपेक्षा आहे.
आपल्या वागण्याने, चिडचिड करण्याने सर्व संसाराची राखरांगोळी होते आहे हे पाहूनही समंजसपणा दाखवून, नवर्‍याशी बोलून ह्यावर उपाययोजना का करीत नाहीत.
स्त्रीयांच्या शारीरीक आणि मानसिक बदलांबद्दल नोंद घेऊनच ह्यावर नवर्‍याशी चर्चा करण्याचा, शांतपणे बोलून समस्या सोडविण्याचा विचार मांडला आहे.
ह्याच काळात पुरूषाला त्याच्या (व्यवसाय) निवृत्तीचे वेध लागलेले असतात. निवृत्ती काळातील आर्थिक गणितांनी तोही व्यथित, चिंतित असतो. त्याच्या सहनशक्तीची पातळीही, महागाईशी झुंजता झुंजता, उतरणीला लागलेली असते त्यात निवृत्तीकाळातील समस्यांची चिंता ह्या सर्वांशी एकांगी लढणार्‍या त्याच्या कडून 'पत्नीला, तिच्या शारीरीक बदलाला समजून घेण्याची' अपेक्षा करणं म्हणजे त्याच्या दुर्बल खांद्यावर अतिरिक्त भार टाकण्यासारखे आहे.
पुरुषाची ह्या वयातील मानसिक अवस्था विशद करण्याचा एक क्षीण प्रयत्न केला आहे. ह्या व्यतिरि़क्तही अनेक भावभावनांना तोही सामोरा जात असतोच. त्यामुळे 'नवर्‍याने समजून घेतले पाहिजे' असा विचार न करता, त्याच्या एकट्याच्या खांद्यावर बोजा न टाकता हा भावनिक बोजा दोघांनीही उचलून समस्या निवारण केले पाहिजे.
अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे.
ह्या विचारातही दोघांनाही स्थान आहे. दोघांच्याही गरजेचा विचार केला आहे. एक्मेकांनी एकमेकांचे समुपदेशन करून धीर, आधार दिला पाहिजे.
शब्दांना अतिशय धार असते. धारदार शब्दांचा बेबंद वापर (शारीरीक बदलामुळे)केल्याने नाती कायमस्वरुपी तुटतात. अशा वयात विधायक वाचन आणि डॉक्टरांची मदत घेतल्यास आयुष्यातील हे वळणही पार करताना जास्त कठीण जाऊ नये.
जेंव्हा आपल्याला समुपदेश जमण्यासारखे नसते तेंव्हा तज्ञांची (डॉक्टरची) मदत घ्यावी, विधायक वाचन करावे. असे सुचविले आहे. ज्या प्रतिसादात दोघांचाही विचार मांडला आहे. तो एकांगी कसा?

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि गुरुवार, 05/09/2013 - 11:14
मला वाटते की स्त्रीच्या बाबतीत हार्मोनल इफेक्ट जास्त असावा (घरात आणि आजुबाजूला पाहिलेल्या या वयातून स्थित्यंतर केलेल्या स्त्रियांबाबत पाहता). (अद्याप अनुभव नसला तरी, पुन्हा एकदा, निरिक्षणानेच) पुरुषांनाही या काळात जरुर बदलाला सामोरं जावं लागतं पण जनरली आपण पुरुष "कमावणे" हा भाग सोडला तर बर्‍यापैकी आरामात जगतो असं माझं मत आहे (ऑफिसचे कष्ट वेगळे.. मी रोजच्या घरातल्या तापत्रयींविषयी म्हणतो आहे). बायका घरात किरकोळ वाटणारी पण तितकीच कष्टाची कामं करुन करुन जास्त इरिटेट होत असाव्यात आणि त्यात भर म्हणजे बहुधा हा थँकलेस जॉब असतो. पुरुषांच्या "ऑफिशियल" कामाप्रमाणे या घरच्या कामाची पोचपावती अजिबात मिळत नाही. त्यामुळे उपरोल्लेखित लेखातल्या वयोगटात स्त्रिया जास्त वेंगत असाव्यात, जे साहजिक आहे. बाकी हार्मोनल इफेक्ट पुरुषांपेक्षा स्त्रियांमधे जास्त प्रखर, अधिक जाणवणारा, दृश्यमान असतो हाही एक फरक असणार. हा मुद्दा सत्य किंवा कसे ते डॉक्टरच ते खात्रीपूर्वक सांगू शकतील. बाकी वयानुसार तुम्ही जास्त आयुष्य पाहिलेलं आहे. या प्रतिसादात फक्त माख्या मनात असलेली शक्यता बोलून दाखवली.

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा गुरुवार, 05/09/2013 - 18:58
ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. मग स्त्रीया त्यांच्या शरीरातील बदल 'निसर्ग नियम' ह्या विचाराने का स्विकारू शकत नाहीत? पेठकरकाका, पुरुष निसर्गनियमानुसार सर्व काही स्वीकारतात, असं खरंच वाटतं तुम्हांला? आणि स्त्रिया स्वीकारत नाहीत हा निष्कर्ष तुम्ही कुठून काढलात? आपल्या वागण्याने, चिडचिड करण्याने सर्व संसाराची राखरांगोळी होते आहे हे पाहूनही समंजसपणा दाखवून, नवर्‍याशी बोलून ह्यावर उपाययोजना का करीत नाहीत. अजून एक गृहितक. अजून एक निष्कर्ष. घर+ ऑफिस = काम + काम हे अनेक स्त्रियांसाठीचे आजचे वास्तव आहे. पुरुष जरी घराबाहेर काम करत असला, तरीही आजही बर्‍याच घरांतून घरी आल्यावर त्याच्या पदरी आराम पडतो, तेच स्त्रीला पुन्हा एकदा कामासाठी कंबर उभे रहावेच लागते. तिची थकण्याची पातळी अधिक असू शकेल हे तरी तुम्हांला मान्य आहे का? सतत हेच आयुष्य असेल तर हळूहळू वार्धक्याकडे झुकताना तिची अधिक चिडचिड होणं पर्याप्त नाही का? ह्याच काळात पुरूषाला त्याच्या (व्यवसाय) निवृत्तीचे वेध लागलेले असतात. निवृत्ती काळातील आर्थिक गणितांनी तोही व्यथित, चिंतित असतो. त्याच्या सहनशक्तीची पातळीही, महागाईशी झुंजता झुंजता, उतरणीला लागलेली असते त्यात निवृत्तीकाळातील समस्यांची चिंता ह्या सर्वांशी एकांगी लढणार्‍या त्याच्या कडून 'पत्नीला, तिच्या शारीरीक बदलाला समजून घेण्याची' अपेक्षा करणं म्हणजे त्याच्या दुर्बल खांद्यावर अतिरिक्त भार टाकण्यासारखे आहे. स्त्रिया आर्थिक भार उचलत नाहीत? बर्‍याच मध्यमवर्गीय आणि निम्न मधयमवर्गीय घरांतून स्त्रियाही घरात पगार आणत असल्याने राहणीमानाचा स्तर उंचावला आहे, हे विसरता येईल का? स्त्रियांना आर्थिक विवंचना नसतात हे तुम्हांला कोणी सांगितले? एकीकडे म्हणता की नवर्‍याशी चर्चा करुन मार्ग काढावा आणि पुढे म्हणता की त्याच्या दुर्बल खांद्यांवर भार टाकू नये? मग जर नवराच स्त्रीच्या शरीरात, मनात घडणारे बदल समजून घेणं ह्याला "भार" समजणार असेल तर बोलणंच खुंटलं की! इतर कोणाकडून अपेक्षाच करायला नको. अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे. नक्कीच पण जर समजून घेण्याला भार समजले तर हे होणार कसे? शब्दांना अतिशय धार असते. धारदार शब्दांचा बेबंद वापर (शारीरीक बदलामुळे)केल्याने नाती कायमस्वरुपी तुटतात. अशा वयात विधायक विधायक वाचन आणि डॉक्टरांची मदत घेतल्यास आयुष्यातील हे वळणही पार करताना जास्त कठीण जाऊ नये. हे दोघांनाही लागू आहे, जितके स्त्रीला तितकेच पुरुषांनाही. केवळ स्त्रियांना नव्हे इतके लक्षात ठेवले तरी खूप झाले. स्नेहांकिता आणि गवि ह्यांच्या प्रतिसादांना +१

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर Fri, 05/10/2013 - 13:06
यशोधरा,
पुरुष निसर्गनियमानुसार सर्व काही स्वीकारतात, असं खरंच वाटतं तुम्हांला?
सर्वच पुरुष सर्व काही स्विकारत नसले तरी बरेच पुरुष बरंच काही स्विकारतात, हे माझे वैयक्तिक निरिक्षण आहे.
आणि स्त्रिया स्वीकारत नाहीत हा निष्कर्ष तुम्ही कुठून काढलात?
हा निष्कर्ष मी काढलेला नाही. मुळ धाग्यात डॉक्टरसाहेबांचे विधान आहे, रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथापालथ होते.
.........सतत हेच आयुष्य असेल तर हळूहळू वार्धक्याकडे झुकताना तिची अधिक चिडचिड होणं पर्याप्त नाही का?
चिडचिड होणे (शारीरीक बदलामुळे) हे मी कुठे नाकारले आहे? माझे म्हणणे एवढेच आहे की पुरूष म्हणून कदाचित नवर्‍याला ह्या शारीरीक बदलांची संपूर्ण माहीती नसू शकते तेंव्हा त्याच्याशी बोलून, चर्चा करून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. ह्यात मी गैर असे काय सुचविले आहे?
स्त्रिया आर्थिक भार उचलत नाहीत?
हे स्त्रियांच्या शारीरिक बदलाच्या विषयाला सोडून होते आहे. स्त्रियांच्या रजोनिवृत्तीसमयी होणार्‍या शारीरीक/मानसिक्/भावनिक बदलांमुळे उद्भवणार्‍या समस्यांवर स्त्रियांच्या बाजूने मुद्दे मांडताना त्याच काळात पुरुषाचेही कांही प्रश्न निर्माण झालेले असतात त्याचा विशेष उल्लेख डॉक्टरसाहेबांच्या लिखाणात आढळला नाही तेंव्हा हा मुद्दाही सर्व सदस्यांनी विचारात घ्यावा आणि साधक-बाधक चर्चा करावी असे मला अपेक्षित आहे.
एकीकडे म्हणता की नवर्‍याशी चर्चा करुन मार्ग काढावा आणि पुढे म्हणता की त्याच्या दुर्बल खांद्यांवर भार टाकू नये? मग जर नवराच स्त्रीच्या शरीरात, मनात घडणारे बदल समजून घेणं ह्याला "भार" समजणार असेल तर बोलणंच खुंटलं की!
कुठलीही चर्चा, सल्लामसलत, तज्ञांचे मार्गदर्शन न घेता 'माझ्या रजोनिवृत्तीचा काळ आहे तेंव्हा मी जे कांही वागेन, बोलेन ते मनावर न घेता मला सगळ्यांनी, विशेषतः नवर्‍याने, समजून घ्यावे' ह्या समजूतीला मी, तोही कांही विशिष्ट समस्यांना तोंड देत असताना, नवर्‍याच्या खांद्यावर अतिरिक्त भार टा़कणे म्हणतो आहे. चर्चेला नक्कीच वाव आहे. चर्चा, सल्ला मसलत, तज्ञांचे मार्गदर्शन ह्या मार्गाने जाण्यास मी 'भार टाकणे' म्हणत नाहीए.
नक्कीच पण जर समजून घेण्याला भार समजले तर हे होणार कसे?
वर म्हंटल्याप्रमाणे, चर्चेविना, सल्याविना, तज्ञांच्या मार्गदर्शनाविना 'नुसते समजून घेणे' अपेक्षिणे हा भारच आहे.
हे दोघांनाही लागू आहे, जितके स्त्रीला तितकेच पुरुषांनाही. केवळ स्त्रियांना नव्हे इतके लक्षात ठेवले तरी खूप झाले.
पुन्हा विषयाला सोडून होते आहे हे. पुन्हा सांगतो विषय असा आहे की, 'रजोनिवृतीसमयी स्त्रीच्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक बदलांमूळे येणार्‍या समस्या.' हे सर्व स्त्री बद्दलच असल्याने माझ्या प्रतिसादातील माझे विधान फक्त स्त्रियांना (आणि तेही रजोनिवृत्ती काळातील) लागू आहे. इतर वेळी ते दोघांनाच नाही तर घरातील सर्वांनाच (आई, वडील, नवरा, बायको, बहीण, भाऊ, सासू, सासरे, मुले, इ.इ.इ.) लागू आहे. अगदी मिसळपाववरील सर्व सदस्यांनाही. अत्यंत, महत्त्वाचा आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यावर निकोप चर्चा व्हावी ह्या उद्देशाने मी पुरुषांच्यावतीने काही मुद्दे मांडले होते. स्त्री-पुरुष वेगळेपणा, स्वभाव विशेष किंवा दोघांपैकी एकाला कमी वगैरे लेखण्याचा माझा उद्देश नाही. मुद्दाम आगी लावण्यासाठी बेछूट विधाने करण्याचे उद्योग मी करीत नाही. पण माझ्या हेतूंबद्द्ल शंका असेल तर संपादक मंडळाने माझे सर्व प्रतिसाद संपादीत करावेत. माझी काही हरकत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा Fri, 05/10/2013 - 13:14
पण माझ्या हेतूंबद्द्ल शंका असेल तर संपादक मंडळाने माझे सर्व प्रतिसाद संपादीत करावेत. माझी काही हरकत नाही
अरे बापरे पेठकरकाका! असो. :( यापुढे काळजी घेईन.

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर Fri, 05/10/2013 - 13:23
सॉरी यशोधरा, हे तुला उद्देशून नाही. पण ह्याच धाग्यावर 'काही प्रतिसाद याला स्त्री विरुद्ध पुरुष असे स्वरुप देउ पहातात.' असा आरोप दिसला म्हणून माझ्याकडून ते स्पष्टीकरण दिलेले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण ह्याच धाग्यावर 'काही प्रतिसाद याला स्त्री विरुद्ध पुरुष असे स्वरुप देउ पहातात.' असा आरोप दिसला
हे माझ्या एका चारोळी प्रतिसादातील विधान आहे. आरोप नव्हे.आपले मत दर्शवणारे एखादे विधान म्हणजे आरोप म्हणता येणार नाही.ते विधान म्हणजे त्रिकालाबाधित सत्य असेही म्हणता येणार नाही. एखादे मतभिन्नता दर्शवणारे विधान म्हणजे सुद्धा आरोप नव्हे.सार्वजनिक व्यासपीठावर अशी अनेक विधाने होत असतात.प्रत्येक विधान हा फार गांभीर्यानेच केलेले असते अशातला अजिबात भाग नाही. दुसरी गोष्ट अशी आपण या विधानाशी सहमत नाही असे विधान आपण करु शकता! तिसरी गोष्ट अशी की या धाग्यावरील आपल्या प्रतिसादाशी मी बहुतांशी सहमत आहे. चौथी गोष्ट अशी स्त्री पुरुष वर्तनाबाबत मी निरंजन घाटयांच्या पुस्तकाची लिंक एका प्रतिसादात दिली आहे. कोणी पुस्तक वाचले असल्यास तो काही मत देउ शकेल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर Fri, 05/10/2013 - 14:55
घाटपांडे साहेब, ह्या विषयावर आपले मत, व्यनितून, आधीच कळले आहे. फक्त त्या विधानामुळे कोणाचा कांही गैरसमज झाला असेल तर तो दूर व्हावा म्हणून माझ्या प्रतिसादाच्या तळाशी त्या ओळी टाकल्या आहेत. (तुम्हाला हे व्यनितून कळविणार होतोच तेवढ्यात हा प्रतिसाद आला, असो.) धन्यवाद्.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आहे ना असं नाटक! आणि चाललंय पण भारी. इतर सगळी नाटकं त्याचाच मुळ संहितेवर आधारित आहेत असं म्हणतात! प्रकाशजी तुमच्या या एका प्रतिसादावर बेहद्द खुष!

In reply to by प्रभाकर पेठकर

जेनी... गुरुवार, 05/09/2013 - 09:06
स्त्री मुद्दाम चिडचिड करत नसावी .... हे बदल सुद्धा " निसर्ग नियम " असावेत ... ती नवर्‍याला " मला समजुन घे " अशी जबरदस्तीही करत नसावी ... नवर्‍याचं ते कर्तव्य असावं .... कबूल आहे पूरुष टक्कल , पोट सुटणं या गोष्टिंकडे दुर्लक्ष करतो ... पण तसं करायला स्त्री त्याला नक्कीच सांगत नाहि ... त्याने लक्ष द्यायला हवं पण चालढकल करणे हाच पूरुषाचा मुळ स्वभाव आहे याला स्त्री काय करणार ??? पूरुषाला निव्रुत्तीचे वेध लागतात ... पण स्त्रीयाना निव्रुत्ती कुठे मिळते ?? सुब्बु काका म्ह्नतात त्याप्रमाणे संप्रेरके ही स्त्रीयांत होणार्या मानसिक बदलाला कारणीभुत असतात .. मग स्त्री मुद्दमहुन संसाराची राखरांगोळी करतेय हे म्हणणं कितपत योग्य???

In reply to by जेनी...

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/09/2013 - 10:19
स्त्री मुद्दाम चिडचिड करत नसावी .... हे बदल सुद्धा " निसर्ग नियम " असावेत ...
बदल हे 'निसर्ग नियमाने' होतात. त्यांना स्विकारणे हे परिपक्वतेचे लक्षण आहे.
ती नवर्‍याला " मला समजुन घे " अशी जबरदस्तीही करत नसावी ... नवर्‍याचं ते कर्तव्य असावं ....
हेच म्हणतो मी. एकदा 'कर्तव्याचे' लेबल लावले की त्याने ते केलेच पाहिजे ही जबरदस्ती असते.
कबूल आहे पूरुष टक्कल , पोट सुटणं या गोष्टिंकडे दुर्लक्ष करतो ... पण तसं करायला स्त्री त्याला नक्कीच सांगत नाहि ...
मी कुठे म्हंटल आहे की तसं करायला स्त्री त्याला सांगत असते म्हणून?
त्याने लक्ष द्यायला हवं पण चालढकल करणे हाच पूरुषाचा मुळ स्वभाव आहे याला स्त्री काय करणार ???
सगळ्या पुरुषांचा 'चालढकल करणे' हा मूळ स्वभाव असतो?
पूरुषाला निव्रुत्तीचे वेध लागतात ... पण स्त्रीयाना निव्रुत्ती कुठे मिळते ??
हा वेगळा विषय आहे. त्यावर वेगळी चर्चा घडू शकते.
त्याप्रमाणे संप्रेरके ही स्त्रीयांत होणार्या मानसिक बदलाला कारणीभुत असतात .. मग स्त्री मुद्दमहुन संसाराची राखरांगोळी करतेय हे म्हणणं कितपत योग्य???
सर्व स्त्रीया करतातच असे मी म्हणत नाहीए. पण अशा केसेसही असतात. शारीरिक बदलांना न स्विकारणे, 'आपण आजन्म तरूण राहणार आहोत' हा भ्रम, आजूबाजूच्या स्त्रियांशी संवाद न करणं आणि आपलाच हेका चालवणं ह्या गोष्टी आपल्या संसारासाठी घातक आहेत ह्याची जाणीव ठेवल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केल्यास 'राखरांगोळी' टाळता येते. 'राखरांगोळी' हा शब्द टाळता येईल पण 'संसारसुखाची होणारी पराकोटीची हानी' असा शब्दप्रयोग केला तरी ते घटीत टाळता आल्यास जास्त चांगले. ------------------------------------------------------------------------------
...रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते.... ....आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही.....
ह्यावर प्रत्येक स्त्रीने जरूर विचार करावा आणि अशी दडपणे आपल्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून प्रयत्नशील राहावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा Fri, 05/10/2013 - 16:57
पेठकरकाका, मला वाटते तुमच्या सगळ्यात पहिल्या प्रतिसादात खूप सरसकटीकरण आहे स्त्रियांविषयी, तसे वाटले नसते तर. मी लिहिलेच नसते तुमच्या प्रतिसादावर. इथेही वर तुम्ही विचारलेच आहे ना की सगळ्या पुरुषांचा चालढकल करण्याचा स्वभाव सतो का म्हणून, तुम्हांला प्रतिसादात सरसकटीकरण वाटल्याशिवाय का विचारले आहे? तसेच तुमच्या पहिल्या प्रतिसादातून ध्वनित होते आहे. (माझ्या वरच्या प्रतिसादात मी ते उदाहरणांसकट सांगितलेही आहे, तेह्वा पुन्हा तेच लिहित नाही) मात्र ह्या वाक्यांचा अपवाद जरुर आहे व ते मान्यही केले आहेच.-
अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे.
पुरुषाला सहसा स्त्रीच्या तुलनेत मिळणारा आराम, स्त्रियांची घर, नोकरी ह्या दोन्ही आघाड्यांवर होणारी मानसिक व काही कालाने शारीरीक दमछाक आणि त्याची सहसा न घेतली जाणारी दखल, आर्थिक सहभाग देऊनही बर्‍याचदा त्याची कदर नसणं वा एकूणात घरामधील लोकांनी गृहीत धरल्याची भावना आणि तत्सम इतर गोष्टी ह्या सार्‍यांचा मानसिक परिणाम शरीरावर जाणवल्याशिवाय राहील का? तेह्वा हे सर्व एकमेकांत गुंतलेले विषय आहेत, एकापासून दुसारा असा वेगळा काढता येत नाही. तुम्ही पुरुषांना आर्थिक विवंचना असतात हे म्हणालात तेह्वा मी स्त्रिया आर्थिक भार उचलत नाहीत का हे विचारले आहे. तो विषय वेगळा कसा?
कुठलीही चर्चा, सल्लामसलत, तज्ञांचे मार्गदर्शन न घेता 'माझ्या रजोनिवृत्तीचा काळ आहे तेंव्हा मी जे कांही वागेन, बोलेन ते मनावर न घेता मला सगळ्यांनी, विशेषतः नवर्‍याने, समजून घ्यावे' ह्या समजूतीला
अशी का आणि कशाला समजूत असेल बरे स्त्रियांची? :) हा काही फार सुखद काळ असतो का त्यांच्यासाठी तरी? 'रजोनिवृतीसमयी स्त्रीच्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक बदलांमूळे येणार्‍या समस्या' - ह्या समस्या एकदम येत नाहीत. हे वर्षानुवर्षे साचत रहत असते. त्रास होत असतो, काहीतरी अशा निमित्ताने तो बाहेर पडतो. असो.

In reply to by यशोधरा

प्रभाकर पेठकर Fri, 05/10/2013 - 21:39
माझ्या प्रतिसादात सरसकटीकरण दिसले असेल तर क्षमस्व. स्त्रीया आर्थिक भार उचलतात हे मान्य आहेच. पण बहुतांश केसेस मध्ये त्यांचे उत्पन्न हे 'पुरक' म्हणून असते. ( म्हणून त्याचे महत्त्व कमी होते असे नाही.) पण घर चालविण्याची, आर्थिक प्रगतीची मुख्य जबाबदारी पुरुषावर असते. कुठे ह्याच्या उलट असेल तर त्या केस मध्ये स्त्रीवर आर्थिक विवंचनेचा भार अधिक असेल. दूसरे, आपली नोकरी गेली तरी 'कुटुंबाला आधार देणारा पुरुष खंबीर आहे' ही सुरक्षिततेची भावना स्त्रीच्या मनांत असते तर, पुरुषाची जबाबदारी अमर्याद असते. मुख्य असते. स्त्री इतकी सुरक्षित वर्तुळात नसते. त्याच्या उत्पन्नावर (असतील तर) आई-वडील, बायको, मुले, (कधी कधी) भावंडे इतके सर्व अवलंबून असतात. त्याच्या ह्या जबाबदारीस अर्थार्जन करून पत्नी हातभार लावत असते तरीही मुख्य आणि महत्त्वाची जबाबदारी त्याची असते. पण चर्चेसाठी हे फार व्यापक क्षेत्र आहे म्हणून ह्या चर्चेत तो विषय मुख्य विषयाला सोडून आहे असे मी म्हंटले आहे. डॉक्टरसाहेबांचे, स्त्रीयांची मानसिक स्थिती विशद करताना पुरुषांच्याही त्या वयात काही मानसिक समस्या असतात ह्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखे मला वाटले म्हणून मी पुरुषांची बाजू हलकेच मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात चुका असू शकतील. जसे, गृहीणी आणि नोकरदार स्त्री ह्यांच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात ह्या मुद्याकडे माझे अक्षम्य दुर्लक्ष झाले.
'रजोनिवृतीसमयी स्त्रीच्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक बदलांमूळे येणार्‍या समस्या' - ह्या समस्या एकदम येत नाहीत. हे वर्षानुवर्षे साचत रहत असते. त्रास होत असतो, काहीतरी अशा निमित्ताने तो बाहेर पडतो.
म्हणूनच नवर्‍याशी संवाद महत्त्वाचा असे म्हणतो. संवादाने अशा भावनांचा निचरा होऊन अशा निमित्ताने 'एकदम' स्फोट होण्याचे टळेल असे माझे मत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे Sat, 05/11/2013 - 00:39
पेठकर साहेब आपण म्हणता तसे पुरुषांचे आपले गहन प्रश्न असतात. पण मी केवळ रजोनिवृत्ती हा विषय घेतला होता म्हणून पुरुषांचे प्रश्न त्यात विशद केले नाहीत. पुढे मागे त्यावर सुद्धा एक जिलबी टाकावी काय या विचारात आहे. वानगीदाखल--एशियन हार्ट इन्स्टीट्यूट मध्ये असताना एक सज्जन गृहस्थ रुग्ण म्हणून आले होते. ते अतिशय चिंतेत होते हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हि बाब मी त्यांना विचारली तर त्यांचा बांध फुटला. डोळ्यात अश्रू आणून म्हणाले कि मी बैंक ऑफ इंडिया मधून निवृत्त होणार आहे मला पेन्शन नाही( तेंव्हा नव्हते) काय मिळतील पैसे ते फंड आणि ग्राच्युईटी चे पैसे. पंचवीस तीस लाख मिळणार आहेत. पण मी माझ्या लग्न झालेल्या मुलाबरोबर एक बेडरूम च्या घरात राहतो. मुलगा म्हणतो आहे कि आपण हे घर विकून तुमच्या फंडाचे पैसे घालून एक दोन बेडरूम चे घर घेऊया. आता मी अत्यंत तणावाखाली आहे. पैसे दिले तर आयुष्यभर मुलापुढे हात पसरावे लागणार आणि नाही दिले तर मुलगा दुखावला जातो. काय करणार? माझ्याकडे उत्तर नव्हते शेवटी आपले भोग स्वतःलाच भोगावे लागतात हे खरे.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Sat, 05/11/2013 - 02:56
धन्यवाद खरे साहेब. मन आहे त्याला/तिला मानसिक समस्या असणारच. त्यावर मिपासारख्या संस्थळावरून कांही समुपदेशन झाले तर सर्वांचाच फायदा होईल. मुले, मुली, स्त्री, पुरुष आणि तृतिय पंथी सर्वांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. निदान आपल्याला माहित असलेल्या समस्यांवर उद्बोधक चर्चा घडावी आणि मिपा ह्या सामुदायिक मंचाचे चिज व्हावे.

ढालगज भवानी गुरुवार, 05/09/2013 - 04:04
माणसाला जेव्हा जेव्हा वाटतं ना की त्याने "निसर्गावर" विजय मिळवला आहे तेव्हा तेव्हा फक्त हे लक्षात घ्यायचं की 'हार्मोन्स' (संप्रेरके) काय हॅवक माजवतात - मग ते ऐन पौगंडावस्थेत असो की मध्यम वयात असो. आपोआप नम्र होईल माणूस. लेख छानच आहे. याचा दुसरा भाग हा येऊ द्या की डॉक्टर की यातून जाणे टळणार तर नाहीच पण ते सुसह्य व्हायला काय करता येईल. जसे मी वाचले आहे - वेट बेअरींग व्यायामा करुन "हाडांची घनता" वाढविणे, मल्टीव्हायटॅमिन्स नियमित घेणे वगैरे. हे मला सुचलेले व मी वाचलेले. पण बरेच कोणाला फारसे माहीत नसलेले असूही शकतात. हो आणखी एक - मी वाचले होते स्वीट पोटॅटो (रताळं बहुतेक) यात "बी" व्हायटॅमिन असते जे की मूड बूस्टींग असते. त्याचाही खूप फायदा होतो.

काकाकाकू गुरुवार, 05/09/2013 - 04:36
"ईस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोनच्या पूरक गोळ्या" असा काही उपाय नाहि वाटतं? अर्थात, १. हि दोन मुख्य, अजून बरेच फॅक्टर्स असतील/असतात व २. प्रत्येकाचा नेमका डोस निश्चित करणं कठीण असेल. पण सरसकट सगळ्याना नाही तरी जास्त त्रास असला तर याचा विचार केला जाऊ शकतो का?

शिल्पा ब गुरुवार, 05/09/2013 - 05:57
काय गोळ्या वेग्रे घ्यायच्या ते डॉक्टरला विचारुनच घेतलेल्या बर्‍या नाहीतर तिसरंच कैतरी होउन बसायचं. हा हार्मोन प्रकार भयंकर त्रासदायक आहे खरा..प्रेग्नन्सी असो, पिरिएड्स असो नैतर अजुन कै !! शारीरीक अन मानसिक दोन्ही बाजुने त्रास होतो. डॉक्टरांनी यावर कॉमन उपाय असतील ते सुचवावे.

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/09/2013 - 08:38
रुणुझुणू यांनी मायबोलीवर रजोनिवृत्तीविषयी अतिशय माहितीपूर्ण लेखमाला लिहीलेली आहे. मेनोपॉज-१ : नेमकं काय घडतं ? मेनोपॉज-२ : शरीरात होणारे बदल / लक्षणे मेनोपॉज-३ : शरीराला होणारे धोके - हाडांची झीज (ऑस्टिओपोरॉसिस) मेनोपॉज- ४ : शरीराला होणारे धोके - हृदयविकार त्याशिवाय सातीने वंध्यत्व या विषयावर मायबोलीवर लेखमाला लिहीलेली आहे. साती स्त्रीरोगतज्ञ आहे. भाग १. प्राथमिक माहिती आणि पुरूषांमधील वंध्यत्व. भाग २. स्त्रीयांमधले वंध्यत्व आणि मासिक पाळीचे सामान्य चक्र. वंध्यत्व-३. पी सी. ओ. एस.
चांगले दिसणे आणि चांगले राहणे( good looking and well groomed) हा एक स्त्री स्वभावाचा पैलू आहे.पुरुषांना आकर्षित करणे हा त्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटासा भाग आहे
याबाबतीत असहमती. शिल्पा ब आणि यशोधरा यांच्या वर दिलेल्या प्रतिसादांना +१.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2013 - 09:45
वरील सर्व दुवे एका अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण मालिकेकडे घेऊन जातात. माझ्या मनात एकच गोष्ट होती कि शारीरिक बदलांची माहिती विकी किंवा अशा माहितीपूर्ण लेखांद्वारे सर्वसामान्यपणे मिळते परंतु स्त्रीच्या मानसिक वावटळी बद्दल माहिती त्रोटक/ कमी प्रमाणात उपलब्ध आहे ( किंवा माहिती उपलब्ध असेल पण अज्ञानामुळे मला माहित नाही) यासाठीच मानसिक त्रासाबद्दल जास्त चर्चा करावी असे वाटल्याने मी हा लेख लिहिण्याचा उपद्व्याप केला आहे. आपल्या माहिती(दुव्यान) बद्दल धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

ढालगज भवानी गुरुवार, 05/09/2013 - 18:18
खरे साहेब, आपला लेख उत्तमच आहे. तसेच या विषयावर होईल ती चर्चा चांगलीच. आपण मागे 'मॅमोग्राम" चा लेख लिहील्यानंतर , मी बराच काहीना काही कारणाने काळ रखडलेली अपॉइंट्मेंट घेतली. तेव्हा अशा प्रकारचे लेख जरुर जरुर लिहा एवढेच म्हणेन.

In reply to by सुबोध खरे

ढालगज भवानी गुरुवार, 05/09/2013 - 18:18
खरे साहेब, आपला लेख उत्तमच आहे. तसेच या विषयावर होईल ती चर्चा चांगलीच. आपण मागे 'मॅमोग्राम" चा लेख लिहील्यानंतर , मी बराच काहीना काही कारणाने काळ रखडलेली अपॉइंट्मेंट घेतली. तेव्हा अशा प्रकारचे लेख जरुर जरुर लिहा एवढेच म्हणेन.

In reply to by सुबोध खरे

बारावीच्या जीवशास्त्राच्या अभ्यासक्रमातही मानवी पुनरूत्पादन संस्था (आणि बेडकाचं डिसेक्शन) शिकवलं जातं. (मी ९८ साली बारावी झाले तेव्हा होतं. मी लैच म्हातारी आहे; आता कदाचित काढलं असेल.) मूलभूत आणि तपशीलवार माहिती मायबोलीवरच्या या लेखांमधेही आहे. तेच पुन्हा टंकण्याचे श्रम तुम्ही घेण्यापेक्षा तुमच्या शिक्षण-अनुभवांमधून तुम्ही जे शिकला असाल ते अधिक उपयुक्त ठरेल. दुसरं म्हणजे तुमचं वय-अनुभव आणि पुरुष असणं हे लक्षात घेता इथे आणि अशासारख्या ठिकाणी कान टोचण्यासाठी तुम्ही योग्य सोनार आहात असं वाटतं. मायबोलीवरच्या या लेखांमधे सगळं सांगून झालंय असं मला वाटत नाही. दोन्हीकडचा टार्गेट ऑडियन्सही वेगवेगळ्या वृत्तीचा आहे. सगळं सांगून झालेलं असलं तरीही पाळीला अपवित्र समजणं, पाळी जाणं म्हणजे आता आपण स्त्री राहिलेलोच नाही असं समजणं, असे गैरसमज अजूनही आपल्या समाजातून पूर्णपणे हद्दपार झालेले नाही. (शहरी, तरूण मुलीही पाळी सुरू असताना देवळात जात नाहीत, त्यांच्या घरी रोजची देवपूजा होत नाही कारण या "अपवित्र असतात".) त्यामुळेही अशा विषयांवर पुनःपुन्हा चर्चा जरूर घडवून आणली पाहिजे. हॉर्मोन्स स्त्रीच्या शरीराचा सदासर्वकाळ ताबा घेत नाहीत; स्त्री असण्याची वैज्ञानिक व्याख्या काय, अशासारखे प्रश्न सामाजिक बाबतीतही महत्त्वाचे आहेत. वात्सल्याविण नारी अपूर्ण वगैरे नसते, काही बायकांना नैसर्गिकतःच नटणं-मुरडणं, मुलांचा सांभाळ करण्यात काहीही रस नसतोच; अनेकींवर समाज, आई-वडील, कुटुंबीय या गोष्टी लादतात आणि काही स्त्रियांना पुरुषांमधेच रस नसतो, स्त्रियांमधेच असतो पण त्याही स्त्रियाच असतात अशासारख्या विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची अपेक्षा या लिखाणातून आहे. (काही पुरुषही अतिशय आवडीने बालसंगोपन, स्वयंपाक, व्यवस्थित रहाणं - मेट्रोसेक्शुअल यात रस घेतात आणि ते पुरुषच असतात.) अलिकडे मुली मोठ्या प्रमाणात अर्थार्जनच नाही, करियर करायला लागलेल्या आहेत. विसाव्या वर्षी हातात मूल असणार्‍या कमीच दिसतात. मोठ्या वयात मुलं होतात, रजोनिवृत्ती येते त्या वयात ही मुलं आईचं "आजारपण" समजण्याएवढी मोठीही नसतात आणि विभक्त कुटुंबांमधे मोठ्यांशी वाद न घालण्याची कडवी शिस्तही त्यांना लावली जात नाही. लेखाच्या शेवटी तुम्ही दिलेलं उदाहरण ठीकच, पण मग या कुटुंबियांनी रजोनिवृत्तीमुळे हैराण झालेल्या स्त्रीला कसं सांभाळून घ्यावं, तिच्याशी कसं वागावं अशा प्रकारचा सल्ला अधिक महत्त्वाचा आहे. या विषयातलं शिक्षण नसल्यामुळे, स्वतः कटकटीच्या रजोनिवृत्तीमधून गेलेल्या स्त्रियाही या प्रश्नांना कितपत उत्तरं देऊ शकतील याबद्दल मला शंका वाटते. हे मला सुचलेले मुद्दे. तुमच्या अनुभवातून अजून बरंच काही येईल. "आकाश निळं असतं" हे सामान्य मनुष्यही सांगू शकतो. त्यासाठी विज्ञान शिकण्याची आवश्यकता नसते. शिक्षित आणि अनुभवी व्यक्तीकडून आकाश निळंच का असतं आणि सूर्योदय-सूर्यास्ताला एवढे जास्त रंग-छटा का दिसतात या प्रकारच्या स्पष्टीकरणांची, सूचनांची अपेक्षा आहे.

जेनी... गुरुवार, 05/09/2013 - 09:10
उदाहरण तितकसं पटलेलं नाहि ... बाकी उत्तम विषयाला हात घातल्याबद्दल मनापासुन आभार.. शक्य तितकी माहिती शेअर करावी ही विनंती .... वेटिंग ...

पैसा गुरुवार, 05/09/2013 - 09:24
उत्तम माहितीपूर्ण लेख. लेखाच्या शेवट क्रमशः वाचून बरे वाटले. या लक्षणांवर उपाय किंवा ती कमी करण्यासाठी काय करता येईल याबद्दलही कृपया लिहा. तसेच रजोनिवृत्तीनंतर काहीप्रकारच्या रोगांची शक्यता वाढते त्याबद्दलही लिहा. वाचायला आवडेल.

सहज गुरुवार, 05/09/2013 - 09:30
लेखकाचे नाव वाचून धागा उघडला, विक्रांत वादळात सापडली असे काही वाचायचे डोक्यात :-) धागा उत्तम आहे. तरीच की काही हुशार नवरे कायम नवनवीन लग्ने करत बायकोचे सरासरी वय २० ते ४० मधे ठेवतात ;-)

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/09/2013 - 09:37
आपल्या संसाराची गाडी समंजसपणावरच चालते हे पक्के ठाऊक आहे मला तरी या लेखमालेनंतर त्या काळात बायकोला जास्त समजून घेता येईल हे नक्की.. पुढचा भाग सावकाश अन सविस्तर येऊद्या.. वाचतोय.. :)

आतिवास गुरुवार, 05/09/2013 - 09:53
हल्ली* अनेकदा डॉक्टर मंडळींना रोगाची /आजाराची लक्षणं समजतात पण नेमकं निदान (आणि त्यामुळे उपचार) करता येत नाहीत - त्यामुळे अनेकदा उपचार हा प्रयोगात्मक राहतो... याची आठवण आली हा लेख वाचताना; विशेषत:
आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय?
यांसारखी वाक्यं वाचताना. असो. * म्हणजे पूर्वीही घडत असेल; किंवा कधीच घडले नसेल इतरांच्या बाबतीत - मी आपली माझ्या अनुभवावरुन सांगते आहे. इतर कुणाला यापेक्षा वेगळा अनुभव असेल हे मान्य आहे.

In reply to by सुबोध खरे

आतिवास गुरुवार, 05/09/2013 - 20:44
खुलासा? खुलासा इतकाच की एखादं 'तथ्य' आपल्याला दिसतं तेव्हा त्यामागे अनेक सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी इत्यादी संदर्भ असतात. ते सगळे आपल्याला माहिती असू शकत नाहीत - ही आपली मर्यादा असते. पण ते बाजूला ठेवून सरसकट स्त्रियांबाबत विधानं होतात तेव्हा आश्चर्य वाटतं. 'स्त्रियांना आपलं वय लपवायची हौस असते' - हे काही स्त्रियांच्या बाबतीत खरं असेलही - पण ते सर्वांना कितपत लागू पडतं? तसंही मोठ्या (म्हणजे वयाने मोठ्या) माणसांचे वाढदिवस साजरे करणं ही प्रथा किती समाजघटकांमध्ये आहे? त्यातही जाहीरपणे - सार्वजनिक? वगैरे वगैरे. शास्त्रीय माहिती हा एक भाग झाला आणि त्या शास्त्रीय माहितीच्या आधारे समाजातील एखाद्या वर्गाबाबत, गटाबाबत (त्यात अनेक उपवर्ग, उपगट आहेत हे विसरुन) विधानं करणं हा दुसरा भाग. माझ्याकडून या चर्चेला मी पूर्णविराम देते.

पिंपातला उंदीर गुरुवार, 05/09/2013 - 10:20
बहुतेक धाग्यांमध्ये आणि प्रतिसादानमध्ये स्त्रिया या जास्त Vulnerable (योग्य मराठी प्रतिशब्द माहीत नाही) आहेत आणि त्यांची कशी काळजी घ्यायला हवी असा एक सूर आढळतो. बघायला गेला तर पुरूष पण तेवढाच Vulnerable असतो. पण मर्द को दर्द नही होता सिंड्रोम इथे जास्त काम करत असावा. बाकी लेख उत्तमच

In reply to by पिंपातला उंदीर

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2013 - 10:34
अमोल साहेब, स्त्रियांची जशी रजोनिवृत्ती होते (menopause) तसा पुरुषांचा andropause होतो. फरक एवढाच आहे कि स्त्रियांमध्ये हा बदल १ ते २ वर्षात होतो आणि पुरुषात हा बदल दहा ते बारा वर्षात होतो. शिवाय स्त्री आणि पुरुषात मूळ फरक असा कि पुरुष आपला प्रश्न तोंड मिटून सोडवण्याचा प्रयत्न करतो तेच स्त्री आपला प्रश्न तोंड उघडून सोडवण्याचा प्रयत्न करते. एकाच स्थिती चा उपाय दोघे वेगवेगळ्या तर्हेने करण्याचा प्रयत्न करतात. vulnerable- असुरक्षित किंवा हळव्या जमतोय का पहा

In reply to by सुबोध खरे

पिंपातला उंदीर गुरुवार, 05/09/2013 - 10:43
मग तोंड दाबून होणारा कोंडमारा हा पण तेवढाच मोठा प्रश्न. तोंड मोकळे सोडल्याने किमान भावनांचा निचरा तरी होतो. अर्थात अशी ही तुलना करणे हा या धाग्याचा उद्देश नसावा. धागा हाइजॅक होऊ नये पण पुरुषांचा बीभत्स कोंडमारा यावर पण काही लिहा तुमच्या अनुभवांचा वापर करून ही विनंती.

महेश नामजोशि गुरुवार, 05/09/2013 - 12:36
याचा अनुभव मलाही आला आहे व त्यावरील उत्तरही असेच मिळाले आहे. निसर्गनियमाने या गोष्टी होत असतात. पण याचा त्रास होतो हे नक्की व तो टाळण्याजोगा नसतो हेही खरेच. यापासून कोणाचीही सुटका होणार नाहि. आपण आपल्या परीने परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे वादविवाद होत नाहित. मुख्य म्हणजे स्त्रीने जर स्वतःला कुठल्यातरी कामात गुंतवून घेतले तर हा त्रास कमी होईल. माझ्या पत्नीने हार्मोनियमचा क्लास लावला. ती शिकत आहे. भिशी तसेच भजनी मंडळात जाते. त्यांचे सतत कुठेनाकुठे कार्यक्रम असतात. त्यांची ठरवाठरव, कार्यक्रमाची पूर्वतयारी इत्यादी मध्ये इतका वेळ जातो कि बाकी विचार करायला त्यांना वेळच मिळत नाहि. त्यामुळे आपोआप चिडचिडहि कमी. महेश नामजोशी

In reply to by महेश नामजोशि

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/09/2013 - 13:00
मलाही हेच म्हणायचे आहे. आपल्यातील होणारे बदल स्विकारून त्यावर जी शक्य होईल ती उपाययोजना, स्वतःच किंवा नवर्‍याशी सल्लामसलत करून, स्त्रीने करणे अपेक्षित आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

हा सर्वोत्तम उपाय आहे. गाणी व्यवस्थित वाजवता यायला लागली की इतर गोष्टींकडे आपोआप दुर्लक्ष होतं.

In reply to by संजय क्षीरसागर

कारण शेवटी सूर जुळणे महत्वाचे... ते झालं की सगळे त्रास आपोआप कमी होतात :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ते झालं की सगळे त्रास आपोआप कमी होतात
क्या बात है एक्का! तुमने तो मारा छक्का!

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/09/2013 - 12:58
उत्तम लेख काही प्रतिसाद याला स्त्री विरुद्ध पुरुष असे स्वरुप देउ पहातात.असो . लेखात असलेली निरिक्षण आपल्या भोवती घडणारी आहेत. हार्मोन्स मधे होणारे बदल हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचा घटक असतो.

ऋषिकेश गुरुवार, 05/09/2013 - 13:42
यावर माझ्यामते उपाय आहे स्त्रियांनी पुरूषांप्रमाणेच स्वायत्त होणे. आर्थिक, मानसिक वगैरे अनेक दृष्टीने. आपली मुले, आपला संसार, आपले घर यातच अडकून पडले की असा त्रास होणारच. पुरूष केवळ यातच अडकलेले नसल्याने त्यांना एकूणच त्रास कमी होतो. आर्थिक दृष्ट्या स्वायत्त स्त्रियांना आपल्या अश्या काळात मुलांचे तथाकथित वैट्ट वागणे, नवर्‍याचे दुर्लक्ष वगैरे ऐवजी इन्व्हेस्टमेन्टची चिंता, चढता उतरता शेअरबाजार, आपल्या गाडिचं जवळ आलेलं सर्विसिंग, मित्र-मैत्रिणींबरच्या पुढिल ट्रिपला नवर्‍यालाही कसे नेता/टाळता येईल याचे विचार करताना बघितलेले आहे.

In reply to by ऋषिकेश

ढालगज भवानी गुरुवार, 05/09/2013 - 18:20
अगदी असेच. मर्यादित विश्वावर अवलंबून रहाता कामाच नये. पंख पसरले तर मोकळा श्वास घेता येईल. अगदी हेच.

In reply to by ऋषिकेश

ढालगज भवानी गुरुवार, 05/09/2013 - 18:20
अगदी असेच. मर्यादित विश्वावर अवलंबून रहाता कामाच नये. पंख पसरले तर मोकळा श्वास घेता येईल. अगदी हेच.

सस्नेह गुरुवार, 05/09/2013 - 14:47
स्त्रियांना रजोनिवृत्ती मुळे आपले स्त्रीत्व संपले असे वाटू लागते. आपण म्हातारे होणार हि भीती बोचू लागते. आता आपण पूर्वी सारख्या तरुण राहिलो नाही याची खंत वाटू लागते. आपल्या नवर्याला आपल्याबद्दल आकर्षण राहणार नाही हि भीती वाटू लागते.इत्यादि इत्यादि
असहमत. आपण तरुण ‘दिसत’ नाही यापेक्षा आता आपल्याला काम पूर्वीसारखे निभत नाही, ही खंत स्त्रीला जास्त असते. म्हणजे स्वत:पेक्षा कुटुंबाची काळजी. फारच कमी स्त्रिया या वयात तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. जास्तीत जास्त स्त्रिया उलट सुटकेचा श्वास टाकतात (पाळीची अन पुरुषांच्या लघळपणाची कटकट मिटली म्हणून.) असे निरिक्षण आहे..
रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते.( age miracle cream) सारख्या सौंदर्य प्रसाधनाचा जबरदस्त खप यामुळेच होतो.
पुन्हा असहमत. तारुण्याचे आकर्षण काही फक्त स्त्रियांनाच असते काय ? पुरुष सौंदर्य प्रसाधने किंवा तरुणांसारखे स्टायलीश कपडे वापरत नाहीत काय ? वयस्कर पुरुष स्त्रियांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत नाहीत काय ? दडपण असेल तर सौंदर्य टिकवण्यापेक्षा सर्व अवधाने सांभाळण्याची शक्ती टिकवण्याचे.
आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय? क्वचितच. पण एखाद्या प्रथितयश माणसाचा(राजकारण्याचा सुद्धा) पन्नासावा वाढदिवस सहज साजरा होताना दिसतो कारण काय? पुरुषाचे कर्तृत्व पहिले जाते स्त्री चे कर्तृत्व पहिले जाते पण आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही.
कौटुंबिक पातळीवर कितीतरी स्त्रियांचे चाळीस अथवा पन्नासचे वाढदिवस थाटात साजरे झालेले पाहिले आहेत. मोठ्या प्रमाणावर ते साजरे न करण्याचे कारण वय लपवणे हे नसून स्वत:ला फार एक्सपोज न करण्याची स्वाभाविक स्त्रीसुलभ वृत्ती हे आहे. तसेच कर्तृत्वाचा दिंडोरा पुरुष जितके उत्साहाने पिटून घेतात, तसा स्त्रियांचा कल नसतो. ....वयामुळे स्त्रियांच्या शरीरात होतात तसे संप्रेरकांचे वगैरे बदल पुरुषांचे होत नसल्यामुळे चाळीशीनंतर पुरुषांना अशा काही समस्यांना तोंड द्यावे लागत असेल असे वाटत नाही. बाकी लेखातील इतर निरिक्षणांशी सहमत.

In reply to by सस्नेह

ढालगज भवानी गुरुवार, 05/09/2013 - 18:25
आपण तरुण ‘दिसत’ नाही यापेक्षा आता आपल्याला काम पूर्वीसारखे निभत नाही, ही खंत स्त्रीला जास्त असते.
अगदी बरोबर!!! अनेक वर्षांनी मुलीचं बाळंतपण झेपण्याइतके आपण खमके/खंबीर राहू का असली भीती मधेच डोके वर काढू लागते. :)
कौटुंबिक पातळीवर कितीतरी स्त्रियांचे चाळीस अथवा पन्नासचे वाढदिवस थाटात साजरे झालेले पाहिले आहेत.
प्रचंडच सहमत. उलट या नव्या फेझ चे एक अ‍ॅड्वेन्चरस आकर्षण वाटते :)

In reply to by सस्नेह

(पाळीची अन पुरुषांच्या लघळपणाची कटकट मिटली म्हणून.) असे निरिक्षण आहे..
बाप रे! हेच तर कारण आहे संप्रेरकं लवकर मंदावण्याचं आणि मंदावल्यावर निरूत्साही वाटण्याचं.
आपण तरुण ‘दिसत’ नाही यापेक्षा आता आपल्याला काम पूर्वीसारखे निभत नाही, ही खंत स्त्रीला जास्त असते.
वयपरत्वे शारीरिक जोम कमी होणारच याचा अस्विकार असं नैराश्य आणतो. पण आहे ते शरीर योग्य व्यायामाच्या आभावामुळे वेळेपेक्षा लवकर अकार्यक्षम झालं हाच सार्वत्रिक अनुभव आहे, मग तो पुरूष असो की स्त्री. बाकी इतर गोष्टींवर चर्चा मुळ प्रश्न सोडवायला कोणतीहि मदत करत नाही म्हणून व्यर्थ आहे.

यशोधरा गुरुवार, 05/09/2013 - 19:04
कारण चांगले दिसणे आणि चांगले राहणे( good looking and well groomed) हा एक स्त्री स्वभावाचा पैलू आहे.पुरुषांना आकर्षित करणे हा त्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटासा भाग आहे रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते.( age miracle cream) सारख्या सौंदर्य प्रसाधनाचा जबरदस्त खप यामुळेच होतो. सुंदर दिसणे व रहाणे ही केवळ स्त्रियांचीच इच्छा नव्हे तर पुरुषांचीही असते, फार तर रुबाबदार आणि वगैरे वगैरे काय ते, असे म्हणू. खास पुरुषांसाठी त्वचा, केस, फेशियल इत्यादि ट्रीटमेंट्स देणारीही पार्लर्स निघत आहेत आणि धो धो चालत आहेत, हे कशाचे लक्षण? टीव्हीवर पदोपदी पुरुषांची क्रीम्स, डीओ़ज ह्यांच्या जाहिरातीचा उबग येईपरेंत मारा होत असतो ते काय त्यांचा पुरुषांमध्ये खप असल्याशिवायच? आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय? क्वचितच. पण एखाद्या प्रथितयश माणसाचा(राजकारण्याचा सुद्धा) पन्नासावा वाढदिवस सहज साजरा होताना दिसतो कारण काय? पुरुषाचे कर्तृत्व पहिले जाते स्त्री चे कर्तृत्व पहिले जाते पण आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही. हे वाढदिवसाबद्द्लचे विधान खरोखर हास्यास्पद वाटते. स्त्रीची इच्छा नसते म्हणून दणक्यात वादि साजरा होत नसतोपेक्षा, घरात किती जणांना त्या स्त्रीचा वादि लक्षात राहतो आणि तिला निदान त्या दिवशी तरी खास ट्रीटमेंट द्यावी वाटते हा अभ्यास केला/ सर्व्हे घेतला, तर लक्षात येईल तिच्या अवतीभवतीचे लोक आपाप्ल्या व्यापात इतके मशगुल असतात, की तिचा वादि साजरा करायचे कितीजणांच्या लक्षात असते, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा, इतके त्या घरातील बाईला गृहित धरले जाते! संप्रेरके मनावर सुद्धा परिणाम करीत असतात त्यामुळे स्त्रियांना उल्हसित वाटत असते जेंव्हा ती संप्रेरके कमी होऊ लागतात तशी मानसिक उभारी कमी होऊ लागते आणि नैराश्य येते. यात भर म्हणजे तिला असे वाटत असते कि कुटुंबात कोणालाही तिची किंमत राहिली नाही. संप्रेरके मनावर परिणाम करतच असतात, आणि त्याचबरोबर कुटुंबात प्रत्येकजण सहसा बायको, आई ह्या नात्याला गृहितच धरत असतो, ते तिला जाणवते आणि त्याचे वाईट वाटणे स्वाभाविक आहे. पुरुषाला/ नवर्‍याला आवडते का त्याच्याकडे दुर्लक्ष झालेले? डॉ. तुमचे काही काही मुद्दे अगदीच पटत नाहीत. शास्तीय माहिती जरुर द्या, पण अशा प्रकारची बायस्ड विधाने डॉ. ह्या नात्याने लिहिताना अपेक्षित नाहीत. धाग्याला स्त्री पुरुष असे वळण लागते आहे अशी भीती कोणीतरी व्यक्त केली आहे, पण अख्खा धागाभर तेच आहे की, आणि हे उल्लेख अप्रिहार्यपणे येणारच, कारण धागाच असा आहे.

सुबोध खरे गुरुवार, 05/09/2013 - 19:44
यशोधरा ताई आपल्याला काही मुद्दे पटत नाहीत हे मान्य किंवा काही मुद्दे अगदी हास्यास्पद वाटतात हेही मान्य. पण सुंदर दिसणे आणि राहणे यासाठी पुरुष किती वेळ घालवतात किंवा पुरुषांच्या सौंदर्य प्रसाधनांचा खप विरुद्ध स्त्रियांच्या प्रसाधनांचा खप याचे प्रमाण जगभरात पहा म्हणजे मी काय म्हणतो ते आपल्या लक्षात येईल. आपण जेंव्हा तुलना करीत आहात ती फक्त मध्य किंवा उच्च मध्यम वर्गीय स्त्रियांची. त्यातही बर्याचशा सुशिक्षित महिलांची. निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रियांचे प्रमाण लोकसंख्येत वरील वर्गाच्या पाच पट आहे आणि त्यांना सुद्धा रजोनिवृत्ती चा त्रास होतोच. जर आपण उच्च आणि उच्च मध्यम वर्गातील स्त्रिया जितक्या प्रमाणात सौंदर्य वाढवण्यासाठी शल्यक्रिया करून घेतात त्याच्या पाच टक्के सुद्धा पुरुष त्या करीत नाहीत हे मी मुंबईत कॉरपोरेट रुग्णालयात किंवा त्वचारोग तज्ञांच्या आकडेवारीवर ठाम पणे म्हणू शकतो. आज आपल्या चित्रपट व्यवसायात किती नायिका तिशीच्या पुढे आहेत. पण आजही म्हातारे नायक( शाहरुख, आमिर, सैफ अली खान किंवा अक्षय कुमार इ जोरदार का चालतात. पुरुषांच्या डीओ किंवा क्रीम हे वय लपवण्याचे नसून अंगाला वास न येण्या साठी आहेत आणि बायकांना आकर्षित करण्यासाठी आहेत. age miracle किंवा तत्सम उत्पादने यांचे खपाचे प्रमाण पहिले तर आपल्या लक्षात येईल. कोणतीही जाहिरात किंवा धारावाहिक पाहिली तर त्यात लग्नाळू मुलीची आई हि सुद्धा तिशीची असते. संतूर सारख्या ममी च्या जाहिराती हे सहज विशद करतील. आपण टीव्ही वर जाहिरातीपैकी किती जाहिराती पुरुषांच्या तारुण्य टिकविण्याच्या आहेत हे आपण पहा. आपल्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा स्त्रियांची पुरुषांपेक्षा जास्त असते. आपण वाढदिवसासाठी भेट आणली नाही म्हणून रागावणारा (किंवा रुसणारा) पुरुष पाहिला आहे काय? पण नवर्याने आपल्या वाढदिवशी आपल्याला भेट आणली नाही म्हणून रुसणार्या आणि रागावणार्या स्त्रिया सहज सगळीकडे दिसतात. यात वैयक्तिक कल(bias) कुठे आला. आपण कितीही नाकारले तरी वस्तुस्थिती बदलत नाही. संप्रेरके स्त्रियांच्या आयुष्यात जितका गोंधळ घालतात तितका पुरुषांच्या नाही हे दर महिन्याला दिसतेच( पाळीच्या अगोदर आणि पाळीच्या वेळेस). यातून स्त्रीची सुटका नाही. (जोवर शरीराच्या प्रत्येक पेशीत दोन x गुणसूत्रे आहेत तोवर). मग आपण मान्य करा कि करू नका.मग घरचे पूर्ण लक्ष देतात कि दुर्लक्ष करतात.

यशोधरा गुरुवार, 05/09/2013 - 19:59
निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रियांचे प्रमाण लोकसंख्येत वरील वर्गाच्या पाच पट आहे आणि त्यांना सुद्धा रजोनिवृत्ती चा त्रास होतोच >> होतोच की. मी कुठे नाकारीत आहे? उलट तो त्रासही सहन करुन त्यांना नेहमीचे कष्ट चुकत नाहीत. कोणी त्यांची कौतुके करायला येत नाही, हे मी म्हणत आहे. >>उच्च आणि उच्च मध्यम वर्गातील स्त्रिया >> निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रियां आणि उच्च मध्यमवर्गातल्या स्त्रियांचे प्रमाण समतोल आहे का हो? उच्च मध्यमवर्गीय जीवनशैली किती जणांना परवडते? तुमचा लेख उच्च मध्यमवर्गीयांपुरताच मयादित आहे असा अर्थ घ्यायचा का? इतर मुद्दे, मला तरी पटत नाहीयेत, जाहिरातीतली आई जशी तरुण दिसते तसाच जाहितारीतला बापही रुबाबदारच असतो. बाई एखाद दिवस वादिला भेट आणली नाही म्हणून बापडी रुसत असेल हो, नवर्‍याला ३६५ दिवस सरबराई हवी असते आणि करुन मिळते, रुसायचा प्रश्नच कुठे येतो? >> आजही म्हातारे नायक( शाहरुख, आमिर, सैफ अली खान किंवा अक्षय कुमार इ जोरदार का चालतात. पुरुषांच्या डीओ किंवा क्रीम हे वय लपवण्याचे नसून अंगाला वास न येण्या साठी आहेत आणि बायकांना आकर्षित करण्यासाठी आहेत >> :D, जसे क्रीम वापरल्याने तरूण दिसणे शक्य नाही, तसेच केवळ एखाद्या माठाने डीओमध्ये अंघोळ केली तरी स्त्रीला ढिम्म फरक पडेल असे वाटत नाही! असो.

In reply to by यशोधरा

यशोधरा गुरुवार, 05/09/2013 - 20:02
हार्मोनल बदलांची वस्तुस्थिती कोणीच नाकारीत नाही, पण काही शास्त्रीय माहितीआड निरर्थक विधाने आणि स्वतःचे बायसही घुसडू नये इतकीच अपेक्षा आहे.

In reply to by यशोधरा

जेनी... गुरुवार, 05/09/2013 - 20:26
एक्झॅक्ट्ली ... आणि स्त्री हि स्त्री असते ... उच्च , मध्य .. कनिष्ठ ... असली वर्गवारी करुन स्वताहाची मतं पटवुन देन्याचे प्रयत्न होउ नयेत ... ठोस कारणं द्यावीत एवढीच माफक अपेक्षा ...

In reply to by यशोधरा

यशोधरा आणि ऋषिकेशचे प्रतिसादही आवडले. वरच्या प्रतिसादात भर घालणारा आणखी एक मुद्दा:
निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रियांचे प्रमाण लोकसंख्येत वरील वर्गाच्या पाच पट आहे आणि त्यांना सुद्धा रजोनिवृत्ती चा त्रास होतोच
इंटरनेट वापरणारा, मिसळपाव वाचणारा वर्ग हा उच्च मध्यमवर्ग आहे. निम्न मध्यमवर्ग आणि कनिष्ठ वर्गाला इंटरनेट वापरणे आणि मिसळपाव वाचण्यएवढा वेळ परवडेल अशी आर्थिक स्थिती दुर्दैवाने अजूनतरी मराठी भाषिक (आणि भारतीयही) समाजाची नाही. इथल्या लेखनाचा टार्गेट ऑडियन्स हा उच्चमध्यमवर्गीयच आहे. पण तरीही यशोधरा यांचा मुद्दा तेवढाच ग्राह्य आहे. आर्थिक वर्ग सुधारलेला असला म्हणून स्त्रियांकडे होणारं दुर्लक्ष, गृहित धरलं जाणं संपलेलं आहे असं अजिबातच दिसत नाही. कनिष्ठ वर्गातल्या स्त्रिया मात्र सबला असल्याचं अनेकदा दिसतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे Fri, 05/10/2013 - 10:52
मला हेच म्हणायचं होतं कि स्त्रिया आपल्याकडे लक्ष द्या असे का म्हणतात स्त्रियांचे सबलीकरण हे केवळ आर्थिक किंवा सामाजिक नसून मानसिक सबलीकरण झाले पाहिजे. डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीण बाई म्हटले तर सन्मान झाल्यासारखा वाटतो पण बायको डॉक्टर असलेल्या पण स्वतः डॉक्टर नसलेल्या पुरुषाला डॉक्टर म्हटले तर कसेसेच होते. जोवर हे मानसिक सबलीकरण होत नाही तोवर स्त्रीची खरी मुक्ती होणार नाही आजही ८० टक्के अर्थार्जन करणाऱ्या बायकांचे आर्थिक व्यवहार त्यांचे नवरे सांभाळत असतात. त्यात काही चूक आहे असे नाही परंतु हे पूर्ण आर्थिक व्यवहार तिला माहित असावे अशी अपेक्षा अहे. परन्तु आत्तापर्यंत पाहिलेल्या अकाली मृत्यूमध्ये स्त्रिया आर्थिक व्यवहारात अनभिज्ञ असल्याचे आढळले. हि परिस्थिती आजही उच्च शिक्षित उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांची आहे यास्तव हे वर्गीकरण केले होते तर सगळ्या बायका माझ्यावर पुरुष जातीचा प्रतिनिधी म्हणून तूटून पडल्या. पुरुष सुधारणे याला काही दशके जावी लागतील पण त्या कालावधीत स्त्रियांनी स्वतःला सबळ करावे यासाठी हा प्रपंच होता. क्रीम सौंदर्यप्रसाधने फ़ेशिअल यातून स्त्रिया बाहेर आल्या तर बरे असा माझा विचार होता असो. बाकी "कनिष्ठ वर्गातल्या स्त्रिया मात्र सबला असल्याचं अनेकदा दिसतं. या बद्दल वेळ मिळेल तेव्हा

अर्धवटराव Fri, 05/10/2013 - 00:06
चर्चा वाचताना अनेक वेळा पॉज घेतला :) स्त्रियांमधे मानसीक ढवळाढवळ केवळ हार्मोन्स ने नाहि तर एखाद्या ऑनलाईन आर्टीकलने देखील होऊ शकते हाच काय या समग्र उपक्रमाचा निश्कर्श :) अर्धवटाराव

प्रेम स्पर्श आणि आकर्षण हे निरंजन घाट्यांचे पुस्तक स्त्री पुरुष यांच्या वर्तणुकीचा उत्क्रांती वादाच्या दृश्टीने अभ्यासपुर्ण व वाचनीय आहे. बुकगंगावर याचा परिचय आहे. पहा http://www.bookganga.com/eBooks/Book/4975847069030416395.htm?Book=Prem-Sparsh-Ani-Akarshan बाकी स्त्री पुरुष..... चालू द्यात