Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मंदार कात्रे on गुरुवार, 03/21/2013 - 06:48
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
भूल-भुलैया चार वर्षापूर्वीची गोष्ट. शुक्रवारची सुट्टी असल्याने लंचनंतर वामकुक्षी काढून जरा आमच्या कॅम्पबाहेर फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. इथे दम्ममला संध्याकाळचे चार वाजले तरी अजून उष्मा जाणवत होताच ! सौदीला आल्यापासुन दोन महीने आराम असा नव्हताच ! अगदी वीकली ऑफ सुद्धा कॅन्सल केले होते ,इतक्या दिवसानी सुट्टी मिळाली म्हणून जरा एंजॉय करायचा मूड होता .म्हणून अल-खोबर वरुन विक्रांतला फोन करून बोलावलं होतं . तो गाडी घेवून पाच वाजेपर्यंत पोहोचणार होता. तोपर्यंत पायी फेरफटका मारावा म्हणून निघालो, आणि चालत चालत कॅम्प पासून दीड-दोन किलोमीटर वर आलो. सगळीकडे रखरखीत निर्मनुष्य वाळवंट पसरला होता. रस्त्यावरच्या वाहनांची वर्दळ सोडली तर इथे 200-300 किलोमीटर प्रवास केला तरी मानवी अस्तित्वाची खूण सापडणे महामुश्किल काम !मधून मधून खुरटलेली हिरवी झुडपे , त्यातच समुद्रकिनारीच्या जमिनीत मात्र दलदलीमुळे थोडीफार दाट मॅनग्रोव्ह ची झुडपे होती. तिथे मात्र थोडी हालचाल होती. 30-40 उंट घेवून एक राखणदार तिथे उभा होता. जवळ जावून पहिले तर चक्क भारतीय निघाला. मी कुतुहुलाने विचारले, क्यो भैय्या ? नाम कया है ? तो उत्तरला, नमस्ते साहिब ,मै दिलीपकुमार विश्वकर्मा . बलिया –युपी से हूं . ......... अरे व्वा ,मी म्हणालो, इधर कैसे ? तो म्हणाला ,बाबूजी कया बतावू? बडी लंबी कहानी है . तेवढ्यात विक्रांतचा फोन आला ,तो गाडी घेवून आला होता कॅम्पवर . मग मी त्याला गाडी घेवून इकडेच ये असे सांगून तिथपर्यंतचा रस्ता तोंडी सांगितला . पाच मिनिटात तो गाडी घेवून आलाही! हाय-हॅलो झाल्यावर म्हणाला ,अरे इकडे काय करतोस? चल, आज सुट्टी वाया घालवायचीय का? मस्त long drive करून येवू जेद्दाह ला ! पण मी म्हणालो ,थांब रे जरा. जावू उशिराने . अरे या भैय्याची स्टोरी तर ऐकूया जरा ! मग भैय्या घाबरत घाबरत आपली स्टोरी सांगू लागला । त्याचे डोळे पाणावले होते,चेहरा करुण दिसत होता. बायकामुलांना घरी सोडून बरोबर तीन वर्षापूर्वी बलियाच्या जवळच्या एका गावातून तो मुंबईला पोटा-पाण्यासाठी आला. अंधेरीत एका बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन सुरू होते,तिथल्या मॅनेजर शी विश्वकर्माच्या मित्राची ओळख होती. मग तिथे बिल्डरकडे लहानसहान कामे करू लागला . मोलमजुरी करता करता तिथे बिल्डिंगचे एलेक्ट्रिकचे काम करणार्याब मंडळींशी त्याची चांगली दोस्ती जमली. त्यांनी त्याला इलेक्ट्रिकल मधले बेसिक काम शिकवले. मूळचा तो सातवी फेल होता,पण तसा चलाख होता. सहा-सात महिन्यात तो चांगला तयार झाला.आणि मग मोलमजुरीचे काम सोडून तो इलेक्ट्रिक वायरिंग चे काम करणार्याी त्या ग्रुप बरोबर काम करू लागला. त्यातच त्या ग्रुपमधल्या शोभन बॅनर्जी या बंगाली टेक्निशियन ने पासपोर्ट काढलेला होता. त्याने नुकताच एका दुबईमधील कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला होता. त्यात सिलेक्ट होवून त्याचा व्हिसा आला आणि शोभन दुबईला जायला निघाला. मग विश्वकर्माच्या मनातही आपण दुबईला जावे असा विचार सुरू झाला . शोभन ने त्याला सगळी मदत केली ,आणि पासपोर्टसाठी अर्ज करून मुंबईतल्या एजंट्स चे पत्तेही दिले. इंटरव्ह्यू कसा द्यायचा याबद्दल मार्गदर्शनही केले. आणि शोभन दुबईला गेला. त्याला सोडायला सगळी मित्रमंडळी विमानतळावर गेली होती,त्यात विश्वकर्माही होताच. विमानतळावरचा झगमगाट बाहेरूनच पाहून त्याचे डोळे दीपले ,आणि एका मोहमयी स्वप्ननगरीत तो हरवून गेला. कसेही करून आपणही परदेशी जायचेच या वेडाने तो पुरता झपाटला गेला. काही दिवसात पासपोर्ट मिळाला, मग इतर कागदपत्रे जमवून विश्वकर्माने धडाधड इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. पहिल्या सहासात वेळेला तो फेल झाला,पण तरीही जिद्द न सोडता त्याने इंटरव्ह्यू देणे सुरूच ठेवले ,आताशा त्याला कोणते प्रश्न विचारले जातात ,आणि त्यांना कशी उत्तरे द्यायची ,हे त्याला समजले. शेवटी एका इंटरव्ह्यू मध्ये सौदी अरेबिया मधल्या एका कंपनीसाठी तो सेलेक्ट झाला बुवा.2000 सौदी रियाल पगार । त्यादिवशी त्याला आकाशाला हात टेकल्यासारखे झाले. मग काय ? आयुष्यात पहिल्यांदा त्याने दारू प्यायली. सगळ्या मित्रमंडळींना पार्टी देवून स्वत:ही झिंगला . मग काही दिवसात त्याचाही व्हिसा आला ,आणि 1 डिसेंबरचे 2007 चे विमानाचे तिकीटही.मात्र त्यासाठी एजंटला फी म्हणून 50,000/- रुपये द्यायचे होते. मग लोन काढून ते पैसे भरले .आता विश्वकर्मा अतिशय आनंदात होता, लगेच तो चार दिवसासाठी घरी युपीला जावून घरच्यांना भेटून आला. आणि ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरला विमानात बसलाही! सौदीच्या दम्मम विमानतळावर तो उतरला . आपल्या मोहमयी स्वप्नंनगरीत आपण प्रत्यक्ष पोहोचलो आहोत, हे पाहून त्याला आनंदाने वेड लागायचे बाकी राहिले होते. या गडबडीतच विमानतळावरचे सोपस्कार पार पडले ,आणि बाहेर पडल्यावर एक ड्रायव्हर आलीशान गाडीसह त्याचीच वाट पहाट होता. नशीब तो हिन्दी-उर्दू बोलणारा एक पाकिस्तानी होता. विश्वकर्माने आपले सामान आणि पासपोर्ट त्या ड्रायव्हरकडे दिला आणि आता कंपनीत जावू,म्हणून ते निघाले.... हळूहळू शहर मागे पडू लागले आणि सौदीचा भयाण रखरखीत वाळवंट सुरू झाला. आपण नक्की कुठे जातो आहोत?असे त्याने ड्रायव्हरला विचारलेदेखील. पण थातुरमातुर उत्तरे देवून ड्रायव्हरने त्याला गप्प केले. जवळजवळ सहा तास गाडी पळत होती. रात्री एक वाजता मुंबईहून तो निघाला होता ,आणि एव्हाना दुपारचे दोन वाजले होते. त्यामुळे पोटात भुकेचा आगडोंब पेटला होता. ड्रायव्हरने त्याला प्यायला पाणी दिले आणि जेवण मालकाच्या घरी करू असे संगितले.... मालकाच्या घरी? पण मला तर कंपनीत कामाला जॉइन करायचे आहे ना? विश्वकर्माच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. भीती आणि शंका यांनी तो अस्वस्थ झाला. पण तेवढ्यात सौदीच्या वाळवंटात फुललेली हिरवीगार शेती दिसू लागली. संत्री,मोसुंबी,सफरचंदे आणि खजुरच्या बागा. तेवढच जरा हिरवळ बघून मन हलके झाले. काही मिनिटातच मालकाचे घर आले. ते एका श्रीमंत अरबाचे घर होते. भला-थोरला बंगला, 5-6 गाड्या ,नोकर-चाकर.... फार मोठे प्रस्थ होते.... गाडीतून उतरल्यावर त्याला बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एक झोपडीवजा खोलीत नेले. त्याचे सामान तिकडे ठेवून पासपोर्ट मालकाकडे जमा केला गेला. मेरी कंपनी किधार है? आप मुझको इधर किधर लेके आया? या विश्वकर्माच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष दिले नाही . बंगल्यात सर्वत्र 24 तास ए.सी. आणि थंड /गरम पाण्याची सोय असली तरी झोपडीत मात्र एकच पंखा,एक बल्ब आणि एक स्टोव्ह आणि पाण्याचा एक नळ होता. जे जेवण मिळाले ते खावून विश्वकर्मा जो गाढ झोपला ,तो जागा झाला थेट दुसर्याि दिवशी सकाळी . ड्रायव्हर त्याला उठवण्यासाठी हाका मारत होता. ...चलो जलदी करो.... खेतपे जाना है ,काम के लिये . आपण पुरते फसलो आहोत, याची कल्पना आता विश्वकर्माला आली. त्याची मोहमयी स्वप्नांची नगरी कुठल्याकुठे विरून गेली. त्याने ड्रायव्हरच्या माध्यमातून अरबला काही सांगण्याचा प्रयत्नही केला ,पण उपयोग शून्य! उलट तेरेको इंडिया से लाया वो कया खिलाने-पिलाने? चल साला काम पे नही तो मार पडेगी! अशी धमकीही मिळाली. आता मात्र विश्वकर्मा घाबरला. नाइलाजाने कुदळ –फावडी खांद्यावर मारून शेतात गेला आणि पडेल ते काम करू लागला. दोन-तीन महीने गेले ,पगारचे नाव नाही. अरब फक्त त्याला जेवण बनवण्यासाठी धान्य द्यायचा , आणि झोपडीत असलेल्या तुटपुंज्या सुविधांवर विश्वकर्मा जगत होता. घरी /मुंबईला फोन /पत्राद्वारे कळवावे तर अरबाचा कडा पहारा. त्याच्या नजरेतून कुठलीही गोष्ट अजिबात सुटत नसे. कधीकधी चाबकाचे फटकेही खावे लागायचे. विश्वकर्माचे हाल कुत्राही खात नव्हता..... असेच सहासात महीने गेले ,आणि मग शेतीच्या कामांचा सीझन संपल्यावर त्याला उंट चरवायचे काम देण्यात आले. ... आज उंट चरवता-चरवता तो जरा इकडे लांबवर आला ,आणि नेमका आमच्याशी संपर्कात आला . आम्हाला त्याने कळवळून विनंती केली,साब आप किसिको बताना नही,वरना मेरी जान चाली जाएगी .एक बार हायवेसे जानेवाले एक पंजाबी ड्रायव्हर को मेरी कहानी बता रहा था , तो मालिकने देखा और बहूत मारा मुझे साबजी...... विक्रांत म्हणाला,घाबरू नकोस, तुला परत भारतात जायचे आहे का? मी व्यवस्था करतो. कसाबसा तो तयार झाला.आणि उंट घेवून परत गेला .आम्ही मग जेद्दाहचा long drive च प्लॅन कॅन्सल करून रात्रीपर्यंत विश्वकर्माच्या प्रॉब्लेम वर विचार केला. दुसर्याह दिवशी मग विक्रांतने Indian Embassy मधल्या सूरज मेनन या त्याच्या मित्राला फोन करून सगळी हकिगत कळवली. अरबाचा पत्ता आणि विश्वकर्माचा ठावठिकाणा कळवला . चार-पाच दिवसातच वेगाने घडामोडी होवून विश्वकर्माचा पासपोर्ट आणि कागदपत्रे अरबकडून परत मिळवण्यात आली. आम्ही दोघांनी थोडे पैसे त्याला दिले, त्या पंजाबी ड्रायव्हर लोकांनीही माणुसकी म्हणून पैसे जमवून दिले. सगळे मिळून 50,000/- भारतीय रुपये त्याला दिले, आणि तुझे कर्ज पहिले फेड बाबा , आणि पुन्हा नीट चौकशी केल्याशिवाय कुठल्यातरी एजंटच्या नादी लागून इकडे येण्याची स्वप्ने बघू नकोस, असा सल्ला त्याला दिला. तिकीटाची व्यवस्था Indian Embassyने केली होती. जवळजवळ एका वर्षाचा वनवास भोगून ,सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालेला विश्वकर्मा विश्वकर्मा भारतात परत गेला..... पण त्याची सुटका केल्याचे अनामिक समाधान मात्र आम्हाला झाले. न जाणो, त्यादिवशी मी फेरफटका मारायला कॅम्पबाहेर न येता तसाच विक्रांतबरोबर long driveला गेलो असतो तर? ...... तर विश्वकर्मा आणखी किती वर्षे तसाच अडकून पडला असता काय माहीत ??? ...........................................................असे अनेक विश्वकर्मा परदेशीच्या मोहमयी स्वप्नांच्या भूलभुलैयात फसून कुठेकुठे अडकून पडलेले असतील ... ईश्वर त्यांना परत त्यांच्या मुला-माणसात परत आणो ही प्रार्थना .....!!! (सत्यकथे वर आधारित ) मंदार कात्रे
  • Log in or register to post comments
  • 8075 views

प्रतिक्रिया

Submitted by priya_d on गुरुवार, 03/21/2013 - 08:03

Permalink

मंदार

मंदार कथा छोटी पण छान आहे. सत्यकथे वर आधारित असे नमूद केले आहे तर तुम्ही किंवा इतर कोणी जर अशाप्रकारे खरोखरच मदत केली असेल तर ही अतिशय प्रशंसनीय बाब आहे. अशा चांगुलपणा व माणुसकीवरच जग अजून टिकून आहे असे वाटते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 03/21/2013 - 08:19

Permalink

कॉलिंग बिका!!

कॉलिंग बिका!! ट्रंग त्रंग ट्रंग!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मनराव on गुरुवार, 03/21/2013 - 10:43

Permalink

सुरेख काम केलत.......

सुरेख काम केलत.......
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on गुरुवार, 03/21/2013 - 11:12

Permalink

छान काम केले मंदारसाहेब..

छान काम केले मंदारसाहेब..
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on गुरुवार, 03/21/2013 - 13:04

Permalink

वरीलप्रमाणेच म्हणते मी.

वरीलप्रमाणेच म्हणते मी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 03/21/2013 - 14:17

Permalink

सत्यकथेवर आधारित असेल तं

सत्यकथेवर आधारित असेल तं मानलं तुम्हाला. चांगलं काम केलंत. अवांतरः हे सौदीतल्या छळाबद्दल लै ऐकलंय. पुस्तकांतूनही आलंय हे. अरबांचा माज उतरवलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on गुरुवार, 03/21/2013 - 14:39

In reply to सत्यकथेवर आधारित असेल तं by बॅटमॅन

Permalink

नाही

अरबांचा माज उतरवलाच पाहिजे.
अहो ती लोकं पकडू-पकडू घेउन जात नाहीत. आपल्याकडच्या लोकांनी तिकडे जाउनच शेफारून ठेवलय त्यांना. गल्फ लाईनच्या विमानाच्या वेळेला बघा मुंबई विमानतळावर. अक्षरशः शेकडो लोकं अशक्य अवतारात उभे असतात. त्यांना तिकडे काय असेल त्याची काहीच कल्पना नसेल असं वाटत नाही. पण त्यांना वाट्टेल ते करून तिकडं जायचं असतं. एकदा इमिग्रेशनच्या रांगेत माझ्या आधी एक बिहारी माणूस घरच्या कपड्यांवर उभा होता. त्या ऑफीसरने काहिही विचारलं की 'सेख के लिये काम करना है साहब' एव्हडचं म्हणत होता. तो 'सेख' काय करतो? तुला तिथं काय काय करायचं आहे? या बद्दल त्याला काहिही माहीत नव्हतं. शेवटी त्या माणसाने कंटाळून सोडून दिलं.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 03/21/2013 - 15:29

In reply to नाही by दादा कोंडके

Permalink

बाकी ठीक पण सौदीबद्दल तसे

बाकी ठीक पण सौदीबद्दल तसे आक्षेप घेतलेले लै वाचले आहेत. चीप लेबर मिळतो म्हणून अरब खूष असतात आणि अज्ञानामुळे आपले किंवा फिलिपीन्स वगैरे देशांतले पुरुष/बायका तिकडे जातात. "सोन्याच्या धुराचे ठसके" मध्ये आणि अजूनही नेटवर बर्‍याच ठिकाणी असे कैक उल्लेख आलेले आहेत. तुम्ही म्हणता ते खरंय, आपले लोक मूर्खागत काहीही विचार न करता तसेच सौदीला जातात. पण म्हणून अरबांचा दोष नाही का? माझ्या मते आहे. माज उतरवलाच पाहिजे हा उद्गार तात्कालिक भावनांनी प्रेरित होऊन काढला असे वाटणे साहजिक आहे, पण त्यामागे ही निव्वळ वाचनाची का होईना पार्श्वभूमी आहे. असो. तेल संपलं की यांचा माज उतरेल अशी आशा करू, दुसरे काय करणार म्हणा. पण काही झालं तरी अर्थात कुणी प्रत्यक्षदर्शी जे म्हणेल ते १०० पुस्तकांना भारी हे मान्यच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 03/21/2013 - 15:19

Permalink

मोहनरानडे झाला त्याचा. पण

मोहनरानडे झाला त्याचा. पण तुम्ही देवासारखे भेटलात त्याला. नायतर जवानी गुलामीत गेली असती आणि म्हातारपणी त्या हलकट अरबाने दिलं असतं बेवारस सोडून.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 03/21/2013 - 16:09

In reply to मोहनरानडे झाला त्याचा. पण by नगरीनिरंजन

Permalink

मोहनरानडे?

मोहनरानडे? ससंदर्भ स्पष्ट करा. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अण्णु on गुरुवार, 03/21/2013 - 21:20

In reply to मोहनरानडे? by प्यारे१

Permalink

मोह नरा नडे !!

मोह नरा नडे !!
  • Log in or register to post comments

Submitted by मी_देव on Fri, 03/22/2013 - 09:39

In reply to मोह नरा नडे !! by अण्णु

Permalink

(No subject)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sat, 03/23/2013 - 08:38

In reply to मोह नरा नडे !! by अण्णु

Permalink

जबराट

जबराट
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sun, 03/24/2013 - 01:37

In reply to मोह नरा नडे !! by अण्णु

Permalink

कष्ट

जरा गुगलण्याचे कष्ट घेतले असते तर या नावावर इतका पांचट जोके केला नसता .. http://en.wikipedia.org/wiki/Mohan_Ranade
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Fri, 03/22/2013 - 00:27

Permalink

शेख लोकांच्या बायका ही तितक्याच पिचल्या जात आहेत

मंदार, आपल्याकडून माणुस्कीला जागणारे वर्तन पाहून तेथील भीषण परिस्थितीची एकंदरीत कल्पना आली. भारतीयांचे सोडा त्या शेख लोकांच्या बायका ही तितक्याच पिचल्या जात आहेत असे काही वाचनावरून कळते जरा त्यावर ही काही मसाला असेल तर लिहा. ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Fri, 03/22/2013 - 00:33

In reply to शेख लोकांच्या बायका ही तितक्याच पिचल्या जात आहेत by शशिकांत ओक

Permalink

विषय दिलेला नाही

त्या शेख लोकांच्या बायका ही तितक्याच पिचल्या जात आहेत असे काही वाचनावरून कळते जरा त्यावर ही काही मसाला असेल तर लिहा.
_/\_ धन्य आहात सर.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/22/2013 - 00:49

Permalink

मंदार...

तुम्ही फार छान काम केले. मला माझी पहिली दुबईची ट्रिप आठवली. मी पण असाच फसलो होतो. तो अनुभव परत कधी-तरी लिहीन..
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/22/2013 - 01:17

Permalink

बापरे! थोडे फार किस्से ऐकलेत

बापरे! थोडे फार किस्से ऐकलेत असेच! ते अरब मुंबईत पावसाळ्यात येऊन मोठ्या हॉटेलांमध्ये राहूनही कायकाय करतात हे अर्थातच ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sun, 03/24/2013 - 06:01

In reply to बापरे! थोडे फार किस्से ऐकलेत by रेवती

Permalink

मी ह्याची देही ह्याची डोळा

मी ह्याची देही ह्याची डोळा पहिले आहे , एखादा बुरखा धारी महिला आपले आपले मंगळसूत्र गळ्यातून पर्स मध्ये टाकून खोलीत जातांना पहिली मग एका वरिष्ठ व्यक्तीकडून कळले की ह्या अरबांना स्वधर्मीय ,,,, पण आपले लोक जादा शहाणे ते बायकांना बोलबच्चन व व्यवस्थित प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे पाठवतात. हा काळ २००१ चा आहे , मुंबई परिसरात दाउद च्या वर्चस्वामुळे ह्या अरबांचे सर्व चोचले पुरवले जातात
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 03/24/2013 - 14:13

In reply to मी ह्याची देही ह्याची डोळा by निनाद मुक्काम …

Permalink

हा हा..

यावरून हा अरब ज्योग आठवला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 03/24/2013 - 15:17

In reply to हा हा.. by दादा कोंडके

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Sat, 03/23/2013 - 08:15

Permalink

आभार

सर्व प्रतिसादकांचे आभार आणि धन्यवाद ! ही कथा सत्यकथे वर आधारित आहे, काही पात्रांची नावे बदलली आहेत ...
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sat, 03/23/2013 - 08:29

Permalink

छान काम केलंत तुम्ही..

पण ह्या कथेवरून गड्या आपुली पुणे-मुंबईच बरी असं बोलवंस वाटतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sat, 03/23/2013 - 08:40

Permalink

ऐकून आहे हे प्रकार....

पण इतकं थेट कुणी भेटलं नव्हतं.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sat, 03/23/2013 - 08:45

Permalink

सौदी http://www.misalpav.com/node/20236

सौदीमध्ये अजून एक घडलेला किस्सा :- http://www.misalpav.com/node/20236. सुदैवानं त्यातही फाअर काही गोची न होता, कथनकार सुटला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 03/23/2013 - 09:04

Permalink

बिकांना या भागातलं बरंच काय

बिकांना या भागातलं बरंच काय काय माहीती आहे / असावं कारण तिकडे काही काळ राहीले होते ते.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Sun, 03/24/2013 - 06:57

Permalink

अरबस्तान....

खरं तर हे अरबस्तान किंवा आजकालच्या भाषेतलं 'मिडलइस्ट' ह्या जागेचं आपल्याकडच्या अकुशल कामगारांसाठी भयंकर मोठं मृगजळ आहे. अन त्याला खतपाणी घालणारे हलकट एजंट काही कमी नाहीत. भारतीय दुतावासाकडून अशा माणसाला मदत मिळवून देणं, अन त्याला सुखरुप बाहेर काढणं हे मोठंच काम केलं म्हणायचं तुम्ही.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Wed, 07/31/2024 - 19:15

Permalink

अत्यंत गरीब कुटुंबातील अनेक

अत्यंत गरीब कुटुंबातील अनेक पुरुष चांगली नोकरी लागते म्हणून देशाची सीमा ओलांडतात. आपलं घर, शेती विकतात, तारण ठेवतात आणि दुसऱ्या देशात जातात. मुख्यत: अरब देशांकडे जाण्याचा ओढा असतो, कारण आधी लोक गेलेले असतात. या देशात पाऊल ठेवल्याबरोबर व्हिसा, पासपोर्ट काढून घेतला जातो. तुटपुंजा पगार दिला जातो. जेवणाचे प्रचंड हाल होतात. घरच्यांशी बोलायला दिलं जात नाही. कितीतरी तरुण पोरं इथं गायब होतात, परतून येत नाहीत. फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तरी सुटका करून घेऊ शकत नाही. घरच्यांकडं तिकडचा काहीही संपर्क नसतो. याच पार्श्वभूमीवरचा सिनेमा आहे The Goat Life. या सिनेमात भारताच्या एका गावातील एक विवाहित तरुण आपलं घर गहाण ठेऊन सौदी अरेबियात काम मिळेल या आशेनं जातो आणि तिथं त्याच्या वाट्याला फसवणूक येते. त्याला शहरापासून दूर रणरणत्या वाळवंटात मेंढ्या राखण्याच्या कामाला ठेवलं जातं. इथं त्याला त्यांची भाषाही येत नसते. पुढे काय होतं हे सिनेमातच पाहावं. हा सिनेमा जागतिक दर्जाचा बनला आहे. यातील प्रत्येक गोष्ट बेफाम, अफलातून आहे. Casting, सिनेमॅटोग्राफी(Sunil KS- क्रूर सुंदर सहारा वाळवंट काय दाखवलंय!), कथा, अभिनय, साऊंडस्केप म्हणजे विविध ध्वनी तयार करणे(Resul Pookutty) संगीत(ए.आर.रेहमान).. सगळं जमून आलंय(शेवट जरा लांबवायला हवा होता,आणखी जबरदस्त करायला वाव होता आणि मेंढ्यासोबतच नातं आणखी भावनिक दाखवता आलं असतं एवढंच वाटलं.). केरळच्या गावची काही दृश्ये सोडली तर हा सिनेमा पाहताना तो भारतीय आहे असं वाटतच नाही (लोकेशन्स आणि तांत्रिक बाजू पाहता असं वाटतं.). पृथ्वीराज सुकुमरण आणि के.आर. गोकुल, यांनी ऑस्कर मिळू शकेल एवढा दर्जेदार अभिनय केला आहे. दोघेही सिनेमा जगतात. ब्लेसी Blessy याने हा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. Benyamin लिखीत Aadujeevitham या पुस्तकावर आधारित ही सत्यकथा आहे. हा सिनेमा बनवताना दिग्दर्शकाला बजेट अपुरं पडणं, लवकर प्रोड्युसर न मिळणं, कोविडमध्ये अडकून पडणं अशा समस्या आल्या. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर डबल कमाई केली आहे. सध्या हा मल्याळम सिनेमा Netflix वर उपलब्ध आहे. The Goat Life की भी लाईफ बहुत लंबी है...ये फिल्म बहुत आगे जायेगी! आंतरजाला वरून साभार
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 07/31/2024 - 19:33

In reply to अत्यंत गरीब कुटुंबातील अनेक by मंदार कात्रे

Permalink

माहिती बद्दल धन्यवाद

असा माणूस प्रत्यक्ष भेटला आहे. फक्त तो उंट हाकत होता. कसाबसा सुटून घरी निघाला होता. त्या बाबतीत इथे लिहिण्यात सध्या तरी काही अर्थ नाही. डूआयडींच्या राज्यात, मूक राहणेच उत्तम....
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com