Skip to main content

मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज

लेखक आशु जोग
Published on मंगळवार, 12/03/2013
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' बर्‍याच दिवसांनी एक असे नाटक पहायला मिळाले जे नाटक काही ऐतिहासिक सत्याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते. त्याची नव्याने मांडणी करते. पण त्यापूर्वी... या नाटकातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाची भाषा. सध्या मराठीमधे ग्रामीणच्या नावाखाली प्रेक्षकांच्या माथी काहीच्या बाही मारलं जातंय. ग्रामीण चित्रपटात शहरी कलाकार 'ग्रामीण'च्या नावाखाली चित्रविचित्र हेल काढून बोलत राहतात . सगळी सोंगं आणता येतात पण भाषेचं सोंग नाही आणता येत त्यामुळे जी भाषा आपली नाही ती बोलायच्या फंदात पडा कशाला ? या नाटकातले सगळे कलाकार स्वतःची ओरिजीनल भाषा बोलतात त्यामुळे भाषेत सहजता आहे. त्यांच्या जीभेवर ती भाषा लादल्यासारखी वाटत नाही. यातले पोवाडे खड्या आवाजात आहेत. कलाकार आपापली भूमिका नीटपणे वठवतात. यातले काही शब्द पहा मधात - मधे नटाएला - नटाला कामून रे - का म्हणून रे असे अनेक खास शब्द ऐकायला मिळतात. ही भाषा नुसती शब्दात नाही मांडता येणार. उदा. "काही बी बोलssतो". लांबवलेला ल. जे त्या भागातले असतील त्यांना हे लक्षात येइल. मेल्या मुडद्या टकुरं डोसकं, आत्ता ग बया याशिवायही ग्रामीण असू शकते ही कल्पना अनेकांसठी नवीन असेल. असो. काय आहे या नाटकात - इ. स. १६८०. स्वर्गात इंद्रदेव यमाला बोलवून घेतो आणि सांगतो. पृथ्वीवर जा आणि शिवाजीमहाराजांना त्यांच्या विचारांसकट घेऊन ये. पण शिवाजीमहाराज यमाच्या तावडीतून निसटतात आणि त्यानंतर कित्येक शतके यम महाराजांचा शोध घेतच राहतो. ३५० वर्षानंतर महाराजांचा विचार यमाला भीमनगर मोहल्ल्यांमधे 'मिलिंद कांबळे' याच्या रुपाने सापडतो. पण हा शोध घेताना नाटककार राजकुमार तांगडे(दलपतसिंग येता गावाचे लेखक) काही नवे शोध मांडतात. १> "शके १५८१ विकारीनाम संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी, गुरुवार दुपारी आठवे तासी स्थळ - प्रतापगड " असे तपशील एका दमात घडाघडा म्हणून दाखवणे म्हणजे शिवचरीत्र नव्हे. (आपल्या लक्षात आले असेल हा टोला कोणाला ते) २> गोब्राह्मणप्रतिपालक - यावर नाटककाराचे भाष्य असे - "खरेतर ब्राह्मणांपासून रक्षण करा गायींचे असे म्हणायला हवे" ३> महाराज गोब्राह्मणप्रतिपालक असते तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याला का ठार केले असते ? ४> महाराजांचे ३३ पैकी ११ म्हणजे ३३% अंगरक्षक मुस्लिम होते. मग महाराजांचा संघर्ष मुसलमानांविरुद्ध कसा. ५> महाराज धर्मासाठी लढले नाहीत . ६> महाराजांना गरजच नाही वाटली धर्माची. उलट धर्मालाच मोठे होण्यासाठी महाराजांची गरज वाटली. ७> त्यांच्या सैन्यात ३५ % मुसलमान होते. ८> हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर हे त्यांच्या सेवेत होते. अति विश्वासू होते. तर ते मुसलमानाविरुद्ध कसे ? ९> अफजलखानाचे पोट फाडले, शायिस्तेखानाची बोटे तोडली एवढेच सांगितले जाते. त्यांनी अनेक मराठा सरदारांनाही शासन केले हे सांगितले जात नाही. १०> नगरचा निजामशहा मूळचा कुलकर्णी होता, हसन गंगू बहामनी लहानपणी एका भटाच्या घरी वाढला म्हणून त्याने नाव घेतले बहामनी किंवा ब्राह्मणी. तर हे मुस्लिम बादशहा हिंदूविरोधी कसे ? ते हिंदूविरोधी नव्हतेच. ११> विजापूरच्या आदिलशाहाची बायको मराठी. आदिलशाहाचा कसा असेल विरोध हिंदूंना ? १२> शिवाजी महाराजांच्या वडीलांचे व काकांचे नाव शहाजी, शरीफजी. ते शहाशरीफ या दर्ग्यावरून ठेवले होते. महाराज तुकाराम व याकूतबाबा यांना गुरु मानत असत. तर ते मुस्लिमविरोधी कसे ? १३> अफजलखानाच्या वधानंतर त्यांनी त्याची कबर बांधली. तर ते मुस्लिमविरोधी कसे ? १४> हा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हताच. १५> ही दलितांची आणि शोषितांची शोषणाविरुद्धची लढाई होती. १६> महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून काशीहून गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणाला धाक दाखवून आणि भरपूर लाच देवून राज्याभिषेकासाठी आणावे लागले. १७> संभाजी महाराजही अतिशय विद्वान, शूरवीर होते. बुधभूषण या ग्रंथाची रचना त्यांनी केली. अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांना औरंगजेबाने पकडल्यावर त्यांना शिक्षा स्वतः औरंगजेबाने दिल्यासारखी वाटत नाही. ती शिक्षा मनुवाद्यांनी दिल्यासारखी वाटते. संस्कृत शिकल्याबद्दल जीभ छाटणे, स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिल्याबद्दल डोळे काढणे. या सगळ्या शिक्षा मनुवाद्यांच्या आहेत. मनुस्मृतीला अनुसरून आहेत. १८> महाराजांनंतर आलेल्या 'पेशवाई' मुळे खरा इतिहास बाहेर आला नाही. मनुस्मृती का जाळली हे समजून घेतले पाहीजे. 'संभाजी महाराजांचा शेवट' याबाबत एका थोर संशोधकाने मांडलेले विचारही या लिंकवर आवर्जून पहावेत, समजून घ्यावेत. या नाटकात पोवाडे सादर करणार्‍या मंडळामधे पाशा नावाचा एक मुस्लिम युवक आहे. तोही आपले विचार, वेदना मांडतो. तो म्हणतो "आम्हा मुस्लिमांनाही नेहमी बदनाम केलं जातं. खतरे में है. खतरे में है. असं म्हणून धार्मिक संघर्षात ओढलं जातं. ज्यापासून आम्ही दूर राहायला हवं." "आम्ही इथे ९०० वर्षे राज्य केले हेही आमच्या मनावर सतत बिंबवले जाते." या चर्चेनंतर मिलिंद कांबळे आणि पाशा एक होतात. असे दाखवले आहे इथे खतरे में है. पण काय खतरे में है ? हे मात्र नाटककार तांगडे स्पष्टपणे उच्चारत नाहीत. तर एकूण असे महान संशोधन नाटककाराने आपल्यापुढे मांडल्यावर सर्वसामान्य प्रेक्षक चकीत होऊन जातो. (स्तिमित झालेला) जोग
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 29945
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

ज्याचा त्याचा शिवाजी. बाबासाहेब पुरंदर्यांचा शिवाजी वेगळा आणि ब्रिगेड वाल्यांचा शिवाजी वेगळा. सत्य नेहमीप्रमाणे कुठेतरी मध्यावर

शिवाजी महाराज हिंदुवादी वगैरे नव्हते हे त्यांचं चरित्र डोळसपणे वाचणार्‍या कोणाच्याही लक्षात येईल. औरंगजेब बादशहा बद्दल मला तितकीशी माहिती नाही, पण त्याचा हिंदूविरोध वैयक्तिक पातळीवरचा असावा. हिंदूंचे शिरकाण (होलोकॉस्ट वगैरे) करण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही. त्यामुळे हा संघर्ष धार्मिक नव्हता हे नक्की. अगदी पटण्यासारखं. हेच सांगण्यासाठी ब्राह्मणविरोध करणे याला मात्र काही अर्थ नाही. ही "फोडा आणि झोडा"ची नीती झाली. किंवा पाकिस्तानातले राजकारणी कायम भारतद्वेषाची चूड पेटवून ठेवतात तसं झालं. समोर कुठलंतरी टार्गेट ठेवायचं झोडपायला आणि आपली पोळी भाजून घ्यायची, हा जुना खेळ आहे. असो.

In reply to by आदूबाळ

औरंगजेब बादशहा बद्दल मला तितकीशी माहिती नाही, पण त्याचा हिंदूविरोध वैयक्तिक पातळीवरचा असावा. हिंदूंचे शिरकाण (होलोकॉस्ट वगैरे) करण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही. त्यामुळे हा संघर्ष धार्मिक नव्हता हे नक्की. अगदी पटण्यासारखं.
महाराज कडवे हिंदुत्ववादी वगैरे नसले तरी हिंदू धर्माची प्रतिष्ठा वाढावी यासाठी कायम प्रयत्नशील होते. बाकी औरंगजेबाला हिंदूंचे शिरकाण करणे शक्यच नव्हते, कारण ९०% प्रजा आणि निम्म्याहून अधिक सरदार हिंदूच! त्यामुळेही अत्याचाराला मर्यादा पडायची. पण याचा अर्थ जर कोणी औरंगजेब हिंदूविरोधी नव्हता असा काढेल तर ते साफ चूक आहे. जिथे जिथे जमेल तसतसे अँटी-हिंदू व अँटी-क्रिश्चनपणा दाखवायला त्याने आजिबात कमी केले नाही. त्यामुळे हा संघर्ष मुख्यतः राजकीय असला तरी धार्मिक अँगल त्याला यायचाच. प्रमाण कमीअधिक इतकेच!

In reply to by बॅटमॅन

त्यामुळे हा संघर्ष मुख्यतः राजकीय असला तरी धार्मिक अँगल त्याला यायचाच. प्रमाण कमीअधिक इतकेच! होय ! पण सेक्युलर जमान्यात ते मानण्यात अडचण येते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

दक्षिण दिग्विजयाच्या मोहीमेवर असताना महाराजांना ३ मशिदी दिसल्या ज्याकी मंदीर पाडुन बाधल्या आहेत असे त्यांना कळाले ....तेव्हा महाराजांनी त्या मशीदी पाडुन पुन्हा मदीरे बाधल्याचे ऐकीवात आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

तमिळनाडूमध्ये बहुतेक तिरुनेलवेली येथील एक देऊळ महाराजांनी असे रिस्टोअर केले असे वाचलेय. नक्की रेफ्रन्स पाहून सांगतो. महाराजांनी मुस्लिम धर्मीयांचा फुकाचा द्वेष केला नाही. पण त्यांचे राज्य हे हिंदू राज्य होते. त्यांचे उच्चपदस्थ अधिकारी पाहिले तर चुकूनमाकून एखादा मुसलमान सापडेल. त्यांनी ब्राह्मणांना इनामे दिली तशी मशिदी किंवा फकिरांना इनामे दिल्याचे वाचनात नाही. जुनी इनामे कंटिन्यू केली पण नवीन दिली नाहीत. मुद्दा इतकाच आहे की संधी मिळताच मुसलमान राजांनी अत्याचार केलेतच-बाकी कारणांनी त्याला बरीच मर्यादा पडली असली तरीसुद्धा. हे सत्य झाकायचे कारण नाही आणि हे कुणाला झोंबायचे कारण तर त्याहून नाही.

In reply to by बॅटमॅन

यापूर्वीही हा प्रतिसाद मी इतरत्र दिला होता. शिवाजीच्या सैन्यात चुकूनमाकून एखादा मुसलमान होता हा भ्रम आहे. शिवाजीच्या सैन्यात २० ते ३० टक्के मुसलमान सैन्य होते. किंबहुना जे राज्य 'मराठा राज्य' मानले जाते त्याची प्रेरणाही अहमदनगरच्या मलिक अंबरपासून शहाजीराजांना मिळाली असे मानता येते. शिवाजीचे राज्य हे हिंदू राजाचे राज्य असले तरी सध्या जी विचारसरणी हिंदुत्त्ववाद म्हणून खपवली जाते तिचा शिवाजीशी काडीचाही संबंध नसावा असे वाटते. शिवाजी जसे तुकाराम, रामदास वगैरे हिंदू संतांचे आशीर्वाद घेत असत तसेच ते फकीर आणि मौलवींचे आशीर्वादही घेत होते. संधी मिळताच मुसलमानांनी अत्याचार केले तसे हिंदू राजांनी आणि पेशव्यांनीही अत्याचार केलेच होते. त्यामुळे अत्याचार हे केवळ एकाच धर्माच्या राजांचे व्यवच्छेदक लक्षण नाही. त्यात झोंबण्यासारखे काहीच नाही. कॉ. गोविंद पानसरे आणि प्रेम हनवते यांच्या (शिवाजीच्या सैन्यातील मुस्लिम आणि शिवरायांचे निष्ठावंत मुसलमान सरदार) लेखांमध्ये शिवाजीच्या सैन्यातील मुसलमानांबद्दल बरीच माहिती आहे. त्यातील निवडक माहिती खालीलप्रमाणे. सिद्दी हिलाल - घोडदळातील सेनापती सहाय्यक पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले। उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले. सिद्दी वाहवाह - (सिद्दी हिलालचा पुत्र) घोडदळातील सरदार सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद. सिद्दी इब्राहिम - शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली. सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले. नूरखान बेग - स्वराज्याचा पहिला सरनोबत २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दीड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली. मदारी मेहतर - विश्वासू सेवक आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत. काझी हैदर - शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव १६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले. खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले. शमाखान सरदार - कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली. सिद्दी अंबर वहाब हवालदार - जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला हुसेनखान मियाना लष्करातील अधिकारी मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला. बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले. रुस्तमजनमा - शिवाजी महाराजांचा खास मित्र विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले. हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली. नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली. सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले. दर्यासारंग आरमाराचा पहिला सुभेदार खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला. बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले. इब्राहीम खान - आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला. दौलतखान - आरमाराचा प्रमुख (सुभेदार) उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०) खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८) सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४) सिद्दी मिस्त्री - आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला. सुलतान खान आरमाराचा सुभेदार शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार. दाऊदखान - आरमाराचा सुभेदार अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला. सुलतान खान नंतर सुभेदार झाला. पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला. इब्राहिम खान गारदी - तोफखान्याचा प्रमुख स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख. डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही. घोडदळातील चार मोगली पथके घोडदळातील सरदार आणि सैनिक मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.

In reply to by आजानुकर्ण

प्रतिसाद नीट न वाचताच तुम्ही लिहिलेले दिसतेय. शिवाजीमहाराजांच्या सैन्यात एखाददुसरा मुसलमान होता असे मी कुठेही म्हटलेले नाही. माझे वाक्य नीट बघा. शिवाजीच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांपैकी एखाददुसरा मुसलमान सापडतो असे म्हटले आहे. बाकी तुम्ही दिलेले लोक वन बाय वन बघू. नूरखान बेग- सरनौबत होता हे मान्य-पण शहाजीराजांपासूनचा जुना जाणता असल्याने तो महाराजांनी ठेवला होता. आरमारात मुसलमान लोक होतेच- दर्यावर्दी जातींपैकी काही मुसलमान बनल्या होत्या तोपर्यंत. शिवाय, जसा दौलतखान होता तसा मायनाक भंडारीही होताच. रुस्तुमेजमान- हा शिवाजी महाराजांकडे कधीच नव्हता. तो एक अनुकूल असा आदिलशाही सरदार होता. रणदुल्लाखान हेही त्यापैकीच एक उदाहरण. काझी हैदर- हा महाराजांचा वकील नसून फारसनवीस होता. बाकीचे अधिकारी तादृश उच्चपदस्थ नाहीत. आणि इब्राहिमखान गारदी हा उल्लेख बहुतेक चुकलेला आहे. त्या नावाचा तोफखान्याचा प्रमुख पानिपतच्या लढाईत होता. आता २० ते ३० टक्के मुस्लिम सैन्याचा दावा कितपत बरोबर आहे हे बघू. काही पठाण तुकड्या आणि आरमारातले काहीजण वगळले, तर १६८० सालच्या मराठा आर्मीत मुसलमान इतके नक्कीच नव्हते. सैन्याचा रफ साईझ आणि मुसलमानांची संख्या यांचे गणित केले तरी हे सहज कळण्यासारखे आहे. महाराजांच्या सैन्यात मुख्यतः पुणे, सातारा, कोल्हापूर हे देशावरील जिल्हे तर रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग हे कोकणातील जिल्हे यांतील सैनिकांचा भरणा होता. मुघल साम्राज्याचा पसारा इतका मोठा होता की त्यात विविध लोकांचा भरणा असणे अपरिहार्य होते. पण शिवाजीचे स्वराज्य इतके मोठे नक्कीच नव्हते. तमिळनाडूपर्यंत एक पट्टा स्वराज्यात गेला असला आणि दक्षिणी पलटणी महाराजांकडे असल्या असे मानले तरी मुसलमानांची संख्या इतकी खचितच भरत नाही. त्यामुळे काही मुसलमान होते इतकेच म्हणता येईल- अजून काही नाही. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी साधारण घोडदळ-पायदळ धरून मराठा लष्कराचा आकार ६०,००० च्या आसपास होता. जास्त वर नक्कीच जात नाही. ६०,००० च्या लष्करात २० टक्के म्हंजे १२,००० मुसलमान योद्धे होते असे झाले. इतक्या मोठ्या संख्येचा कुठेही उल्लेख दिसत नाही. तसा कुठे उल्लेख असल्यास पहायला आवडेल. बाकी मलिक अंबरच्या अप्रत्यक्ष प्रेरणेबद्दल तसा सहमत आहे. सारांश काय??? हिंदू धर्माच्या नावाखाली महाराजांनी मुसलमान धर्मीयांवर अत्याचार केले नाहीत. काही मुसलमानांना आपल्या नोकरीत ठेवून घेतले, वेळप्रसंगी उच्च पदे दिली. पण हिंदूंच्या उत्थानाची कास कधीच सोडली नाही. ते मुख्यतः हिंदू राज्य होते. रादर त्या राज्याच्या हिंदूपणामुळेच मुसलमानांचा छळ झाला नाही असे म्हटले तरी चालेल. पेशव्यांनी धर्माच्या नावावर काय अत्याचार केले हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by बॅटमॅन

आरमाराचा प्रमुख, सेनापती, दारुगोळा विभागाचा प्रमुख ही पदे पुरेशी उच्च नसल्यास मला उच्चपदस्थ ह्या शब्दाची व्याख्या जाणून घ्यायला आवडेल. इब्राहिमखान गारदी हा जसा पेशव्यांचा तोफखाना प्रमुख होता तसाच दुसरा इब्राहिमखान गारदी हा शिवाजीराजांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. एखादी व्यक्ती जुणीजाणती असल्याने (ती मुसलमान असल्याकडे दुर्लक्ष करुन) राजांनी त्या व्यक्तीस सेनापती केले असा निर्देश असल्यास तो एखादी व्यक्ती हिंदू असण्यासही लागू व्हावा. शिवाजीच्या सैन्यात हिंदू नव्हते असे मी म्हटलेच नाही. शिवाजीची बहुसंख्य प्रजा हिंदू होती व त्यामुळे सैन्यातील बहुतांशी लोक हिंदू असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मायनाक भंडारी असणे अध्याहृत आहेच. मात्र शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेत मुसलमानांचे कितपत योगदान होते हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे. काझी हैदरबाबत मी जितके वाचले त्यात अफजलखान वधाच्या प्रसंगी तो महाराजांचा वकील होता व कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी महाराजांवर केलेल्या हल्ल्याचा त्याने प्रतिकार केला इतपत माहिती मला आहे. शिवाजीराजांनी (केवळ) हिंदूंच्या उत्थानाची कास सोडली नाही की प्रजेतील (हिंदू किंवा मुसलमान) कोणत्याही धर्माच्या नागरिकाच्या उत्थानाची कास सोडली नाही इतपतच वादाचा मुद्दा आहे. पेशव्यांनी धर्माच्या नावावर अत्याचार केले नाहीत. मात्र जातीच्या नावावर अत्याचार निश्चित केले. पेशव्यांव्यतिरिक्त होळकर आणि शिंदे या मराठा सरदारांनीही हिंदू व मुसलमान या प्रजेवर अनेक अत्याचार केले. म. वा. धोंड यांचा मराठी लावणी या पुस्तकात हे विस्ताराने वाचायला मिळेल.

In reply to by आजानुकर्ण

"काझी हैदरबाबत मी जितके वाचले त्यात अफजलखान वधाच्या प्रसंगी तो महाराजांचा वकील होता व कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी महाराजांवर केलेल्या हल्ल्याचा त्याने प्रतिकार केला इतपत माहिती मला आहे." अफझलखान वधाच्या वेळी शिवाजी महाराजांचा वकील बोकील हा होता (त्याचे नाव बहुतेक कृष्णाजीपंत बोकील असे होते). "काय वाटेल ते करून खानास प्रतापगडाच्या पायथ्याशी घेऊन येतो" असे त्याने महाराजांना वचन दिले होते. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा "ब्राहमण" होता व त्याने महाराजांवर वार केला होता, या घटनेवरून ब्रिगेडी ब्राह्मणांवर गरळ ओकत असतात. पण महाराजांचा वकील बोकील हाही ब्राह्मण होता व त्याने कौशल्याने खानाशी बोलणी करून व त्याला गाफील ठेवून प्रतापगडाच्या पायथ्याशी आणले, हा किरकोळ ऐतिहासिक तपशील मात्र ते विसरतात.

In reply to by आजानुकर्ण

आरमाराचा प्रमुख, सेनापती, दारुगोळा विभागाचा प्रमुख ही पदे पुरेशी उच्च नसल्यास मला उच्चपदस्थ ह्या शब्दाची व्याख्या जाणून घ्यायला आवडेल.
परत तेच. तुरळक म्हणण्याइतपत मुसलमान उच्चपदस्थांत सापडतात असे म्हणणे आहे. त्याला प्रतिवाद करण्याइतपत पुराव्यात काही दिसत नाही. नूरखान बेग काही वर्षांतच हटवला जाऊन त्याजागी नेतोजी पालकराची नेमणूक झाली होती.
काझी हैदरबाबत मी जितके वाचले त्यात अफजलखान वधाच्या प्रसंगी तो महाराजांचा वकील होता व कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी महाराजांवर केलेल्या हल्ल्याचा त्याने प्रतिकार केला इतपत माहिती मला आहे.
अफझलखान प्रकरणी महाराजांच्या वतीने सर्व वाटाघाटी करणारे पंताजी गोपीनाथ बोकील हे होते, काझी हैदर नव्हे. हैदर यांचा उल्लेख या संदर्भात कधी पाहिला नाही. शिवाय कृष्णाजी भास्कराने महाराजांवर केलेला हल्ला खुद्द महाराजांनी परतवल्याचे वाचलेय.
शिवाजीराजांनी (केवळ) हिंदूंच्या उत्थानाची कास सोडली नाही की प्रजेतील (हिंदू किंवा मुसलमान) कोणत्याही धर्माच्या नागरिकाच्या उत्थानाची कास सोडली नाही इतपतच वादाचा मुद्दा आहे.
शिवाजीमहाराजांनी सर्वधर्मीय प्रजेची काळजी घेतली यात वाद असण्याचे कारण नाही. इतकेच, की त्यांनी ढोंगी सेक्युलॅरिझम कधी दाखवला नाही. लढाईत कुराणाची प्रत हाती आल्यास मौलवीकडे सुपूर्त केली जायची तसेच वेळप्रसंगी मंदिराच्या जागेवर उभारलेल्या मशिदींचे परत मंदिरात रूपांतरही केलेले आहे. सप्तकोटीश्वराची स्थापना करून पोर्तुगीजांच्या जबरदस्तीच्या धर्मप्रसाराला आळा घालण्याचा प्रयत्नही केलेला आहे. म वा धोंड यांच्या पुस्तकात पाहीन पेशव्यांबद्दलचे उल्लेख. माहितीकरिता धन्यवाद.

In reply to by बॅटमॅन

सुरुवातीचे ५ पेशवे (पंतप्रधान) हे वंशपरंपरा नव्हते. बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर बाजीराव हा नेतृत्वगुणांमुळे पेशवा झाला. त्यानंतर १७४० साली नानासाहेबांपासून वंशपरंपरा पेशवे पद सुरू झाले असे म्हणायला हरकत नाही. १८०२ साली वसईच्या तहापर्यंत पेशवे स्वतंत्र होते, १८०२ पासून इंग्रजांचा अंमल हळूहळू सुरू झाला. पैकी बाजीरावाची हयात युद्धे करण्यात गेली. त्यानंतरच नानासाहेबांच्या काळात डामडौल, जेवणावळी वगैरे जोरात सुरू झाले असणार. नंतर १७६१ ते १७७२ या माधवरावांच्या कारकीर्दीत पुन्हा हे सगळे कमी झाले होते. म्हणजे "पेशवाई" असे आपण ज्याला म्हणतो तो उण्यापुर्‍या ५०-६० वर्षांचा काळ होता. आपल्या एवढ्या मोठ्या इतिहासात ५० वर्षे हा काळ इतका प्रचंड परिणाम करणारा असेल का? की जो परिणाम दोनशे वर्षांनीही पुसला जाऊ नये?

In reply to by पैसा

पेशवे आणि पर्यायाने ब्राह्मणांना शिव्या देण्याची एक फॅशन आहेच. पण ती सोडून पुराव्यांकडे पाहिले, तर किमानपक्षी दुसर्‍या बाजीरावाच्या काळात हे सगळे लै बोकाळले होते.याचाच हँगओव्हर अव्वल इंग्रजीपर्यंत आला होता. याचा उत्तम आढावा "पेशवाईच्या सावलीत" या त्र्यंबक शंकर शेजवलकरांच्या खतरनाक लेखात घेतलेला आहे. अर्थात, चंगळवाद सोडला तर जातीयवादी अत्याचार कोणते केले यांबद्दल विद्रोही ब्लॉग्सवर बरेच काही वाचायला मिळते. त्याची सत्यासत्यता पारखून घेतली पाहिजे. शृंगेरी क्षेत्र लुटणे ही पेशव्यांकडून झालेली अक्षम्य चूक म्हणता येईल.

In reply to by बॅटमॅन

>>चंगळवाद सोडला तर जातीयवादी अत्याचार कोणते केले यांबद्दल विद्रोही ब्लॉग्सवर बरेच काही वाचायला मिळते. विद्रोही ब्लॉग्स कशाला विचारवंताना विचारले तरी ते डिट्टेल सांगतात.

In reply to by बॅटमॅन

शिवाजीच्या सैन्याचे तपशील शोधून त्यातून अधिक माहिती शोधता येईल. हा एक असाच टाईमपास दुवा पाहण्यात आला (http://jainismus.hubpages.com/hub/Shivaji-and-His-Muslim-Warriors) जिथे शिवाजीच्या सैन्यात ६६००० मुसलमान होते असे म्हटले आहे. :) दुर्दैवाने मुसलमानांमध्ये सावरकर किंवा पुरंदरे झाले नसल्याने मुसलमानांना शिवाजींची ही आयडेंटिटी पटकन क्लेम करता आली नसावी. माझा मुद्दा एवढाच आहे की शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते. त्यातील काही मुसलमान हे सरसेनापतीसारख्या उच्चपदावर होते. मदारी मेहतर सारख्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता राजांना मदत केली. त्याचप्रमाणे औरंगजेबाचे बहुसंख्य सैन्य हे हिंदू राजपुतांचे होते आणि आदिलशहाचे बरेचसे सैन्य हे दक्षिणेतील हिंदू-मराठे यांचे होते. औरंगजेब-आदिलशाह यांच्याविरुद्ध शिवाजीने जो लढा दिला तो हिंदू धर्मासाठी नसून शिवाजीच्या सर्वधर्मीय रयतेसाठी होता. रामदास-तुकाराम यांच्याप्रमाणेच याकुबबाबांचाही शिवाजीने अनेकदा आशीर्वाद घेतला. मात्र काही लोक आजकाल संकुचित हिंदुत्वासाठी शिवाजीला नेहमी अफजलखानाचा वध करतानाच दाखवणे योग्य समजतात. खंडोजी खोपडे किंवा चंद्रराव मोरे यांनाही अधूनमधून दाखवले तर संपूर्ण शिवाजी पुढे येईल. म. वा धोंड यांच्या पुस्तकात मराठेशाहीविषयीचा खालील उतारा वाचला आहे. राजकीय स्थितीः पानपतानंतर महाराष्ट्राचे भाग्य थोर म्हणून माधवरावासारखा माणसांची योग्य परीक्षा असलेला व त्यांच्याकडून कामे करुन घेणारा नेता लाभला. त्याने महादजी शिंदे, नाना फडणीस, गोपाळराव पटवर्धन, रामशास्त्री वगैरे कर्तबगार माणसांना पुढे आणले. निजामाचा दणदणीत पराभव केला, जानोजी भोसल्याचे बंड मोडून काढले आणि स्वार्थाकरता इंग्रजांशी संंगनमत करु पाहणाऱ्या राघोबाला आपल्या बाजूस वळवण्याचा प्रयत्न केला व त्यात अपयश आल्यावर त्याला कैदेतही टाकले. अवघ्या ११ वर्षांनी माधवराव मृत्यू पावला तेव्हा तत्कालीन एका पत्रलेखकाने "वाघ गेला! सारी कोल्ही राहिली आहेत. ईश्वरसत्ता प्रमाण!" असे उद्गार काढले आणि त्याची प्रचीती काही वर्षातच आली. पुढे नानाने पुण्यात आणि महादजीने उत्तरेत पराक्रम गाजवून 'खूप शर्तीने राज्य राखले' असले तरी मराठेशाही आतून किडत चालली होती. नारायणरावाचा खून करुनही अपेक्षित राज्यप्राप्ती न झाल्याने रघुनाथराव इंग्रजांस मिळाला. नानाच्या चुलतभावाने (मोरोबा फडणीस) याने नानावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि बारभाईचे विसर्जन होऊन नानाच्या हाती कारभार आला. नाना कर्तबगार असला तरी सहकाऱ्यांचा विश्वास तो कधीच संपादू शकला नाही. सरदार व सैन्यात हेवेदावे-बेशिस्तपणा वाढीस लागला. सर्वत्र बेबंदशाही माजू लागली. याचे एक उदाहरण म्हणजे तुकोबा होळकराने बदामीस टिपू सुलतानाचा पराभव केला पण त्याच्या सैन्याने मराठी मुलखातच गावे लुटली, बायका नासवल्या रयतेची गुरे नेली. तुकोबा होळकर पेशव्यांच्या फौजेचा सेनापती म्हणून त्या लढाईवर गेला होता. उत्तरेत प्रचंड पराक्रम करुन पानपताचे अपयश धुवून काढलेला महादजी पेशव्यांचे दर्शन घेण्यास पुण्यास यायला निघाला तेव्हा नानाने घाबरुन कॉर्नवालिसकडे सैन्याची मदत मागितली. महादजीच्या सैन्याने पुण्यात २० महिने तळ दिला, त्या काळात पुण्यात दुष्काळाचा भयंकर कहर चालू होता. पुण्यात पटकीचा धडाका सुरु झाला होता. आजाराने आणि भुकेमुळे कंगाल लोक रस्त्यात मरुन पडत होते. लोक आपल्या फिकिरीत होते त्यात शिंद्याच्या लष्कराचे पंचवीसएक हजार लोक आणखी पुण्यात आल्याने पुण्याचे लोक जास्तच चरफडले. या सर्व परिस्थिचीची तमा न बाळगता शिंदे व पेशवे 'पुणे ग्राम गोकुळ क्रीडले त्यांत कृष्ण श्रीमंत धनी' असे पवाडे रचवून घेण्यात व विलासात मग्न होते. दोनच वर्षानी सवाई माधवरावाने आत्महत्या केली आणि स्वार्थ, हेवेदावे, परस्परसंशय, भ्याडपणा, कारस्थाने, कपट, फितुरी, विश्वासघात, अंदाधुंदी, खुनशीपणा, सूडबुद्धी, धर्मभोळेपणा, दक्षिणा, स्त्रैणता, स्वैराचार, नाचरंग, तमाशे या राष्ट्रीय दुर्गुणांना उधाण आले. दुसरा बाजीराव गादीवर येण्यास पुणे दरबारातील सरदार, होळकर, सातारा-कोल्हापूरचे छत्रपती यांचा विरोध होता. त्यामुळे त्याने दौलतराव शिंद्याशी संधान साधून त्याला नानासह दोन कोटींची वरात दिली. दौलतराव शिंद्याने नानाला कैदेत टाकले आणि त्याचा उपासमार करणे, तापल्या तोफेवर विवस्त्र बसवणे असा अमानुष छळ केला. नानाच्या गटातील अप्पा बळवंत मेहेंदळे सारख्यांनी विषभक्षण करुन स्वतःची सुटका करवून घेतली. पण दौलतरावाने मृतांच्या नातेवाईकांचाही छळ केला. दौलतरावाने पुण्यास जे केले तेच पुढे त्याने ग्वाल्हेरास केले. स्वतःचा सेनापती नारायणराव बक्षी याच्या अंगास बाण बांधून बत्ती मारून आकाशात उडवले आणि ठार केले. का? तर 'बक्षीचा पक्षी केला' असा प्रास साधण्याकरिता. ही मोठमोठ्या सरदार मंडळींची गत. सामान्य रयतेचे विलक्षण हाल झाले. वानवडीवर शिंद्यांची पलटणे होती. ते शहरावरच तोफा रोखून लोकांजवळ धान्य मागत आणि लोकांच्या घरात बेलाशक शिरुन दाणावैरण नेत. या अंदाधुंदीच्या काळात बाजीरावसाहेबांनी शिंद्यांचा तगादा भागवण्याकरता पुण्यात पट्ट्यांचा सुळसुळाट केला होता १. कर्जपट्टी, २. सरंजामपट्टी, ३. वेतनपट्टी, ४. सावकारपट्टी, ५.उंबरेपट्टी, ६. भाडेपट्टी आणि कहर म्हणजे ७. संतोषपट्टी. ही संतोषपट्टी बाजीरावसाहेबांस पेशवाई मिळाली याकारण रयतेस संतोष झाल्याचे गृहीत धरून वसूल करण्यात येत होती. व्यक्तीदोषाने प्रेरित होऊन बाजीरावाने अनेक खुनशी कृत्ये केली त्याचा त्रासही रयतेस भोगावा लागला. विठोजी होळकराचा अमानुष वध केल्याचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. "बापू गोखल्याने विठोजीस सरकारांत पाठविले. सरकारवाड्यात पोचताच त्याला बेडी तोडून ठार मारिला. दोनशे कमचा मारून लागलीच हत्तीच्या पायास बांधोन वोढविला" हा प्रसंग चालू असताना बाजीराव शनिवारवाड्याच्या वरच्या दिवाणखान्यातून या प्रसंगाचा तमाशा आनंदाने पाहत बसले होते. पुढे बाजीरावाने आपल्या दृष्टिसुखार्थ होळकराचा मुडदा तसाच चौकात चोवीस तास ठेवला . मराठी साम्राज्याच्या विस्तारास आधी कारणीभूत ठरलेले शिंदे आणि होळकर आता उत्तरेत एकमेकांशी आधीच लढत असताना, एकमेकांचा मुलुख उद्ध्वस्त करत असण्यात रंगले असताना या प्रसंगाने यशवंतराव होळकर प्रचंड संतप्त होऊन पुण्यास येण्यास निघाला आणि त्याच्या फौजेने येताना मराठी प्रांतात विलक्षण धिंगाणा घातला. खानदेश प्रांताचे त्याच्या सैन्याने केलेले नुकसान पुढे पन्नास वर्षेपर्यंत भरुन निघाले नाही. दिवाळीच्या सुमारास यशवंतराव पुण्यात पोचला आणि बाजीराव पुण्यातून पळून वसईस गेला आणि कारभार इंग्रजांवर सोपवून मोकळा झाला. ऐन दिवाळीच्या काळात यशवंतरावाने पुण्याला यमपुरीचा अनुभव दिला. दौलतरावाचे कौर्य फिके पडावे इतके कौर्य यशवंतरावाने पुण्याबाबत दाखवले. 'शहर गायीसारखे हळहळते' अशा स्वरुपाचे उतारे तत्कालीन अनेक पत्रात उपलब्ध आहेत. मराठेशाहीचा कारभार इंग्रजांवर सोपवल्याचे बाजीरावासह कोणत्याच मराठा सरदारास आवडले नसले तरी सगळेजण इंग्रजांशी स्वतंत्रपणे लढले, होळकराने अनेकदा इंग्रजांस चोपलेही. मात्र अखेरीस प्रत्येकजण पराभूत झाला. या सर्व घटनांनी सुरापूरकर, प्रतिनिधी, कोळी, पेंढारी, बेरड, रामोशी सर्वच टोळ्या बंड करुन उठल्या आणि स्वतःच्याच राज्यात लुटालूट करु लागल्या. आपल्या काखेत लहान मुलांना घेऊन बायकांनी नदीत जीव दिला.

In reply to by आजानुकर्ण

पेशवाईबद्दलच्या उतार्‍याबद्दल धन्यवाद.
औरंगजेब-आदिलशाह यांच्याविरुद्ध शिवाजीने जो लढा दिला तो हिंदू धर्मासाठी नसून शिवाजीच्या सर्वधर्मीय रयतेसाठी होता. रामदास-तुकाराम यांच्याप्रमाणेच याकुबबाबांचाही शिवाजीने अनेकदा आशीर्वाद घेतला. मात्र काही लोक आजकाल संकुचित हिंदुत्वासाठी शिवाजीला नेहमी अफजलखानाचा वध करतानाच दाखवणे योग्य समजतात. खंडोजी खोपडे किंवा चंद्रराव मोरे यांनाही अधूनमधून दाखवले तर संपूर्ण शिवाजी पुढे येईल.
बाकी या परिच्छेदाशी थोडा असहमत आहे. पण असू दे.

In reply to by आजानुकर्ण

बाप रे! अंगावर शहारे आणणारा परिच्छेद आहे.
म. वा धोंड यांच्या पुस्तकात मराठेशाहीविषयीचा खालील उतारा वाचला आहे.
नाव काय या पुस्तकाचं?

In reply to by आजानुकर्ण

उत्तम प्रतिसाद आपल्या म्हणण्याप्रमाणे शिवाजीच्या सैन्यात २० ते ३० टक्के मुसलमान सैन्य होते. आणि शिवाजीच्या सैन्यात ६६००० मुसलमान होते असे .. म्हणजे संपूर्ण सैन्य किमान दोन-अडीच लाख असावे बरोबर?? नानाच्या चुलतभावाने (मोरोबा फडणीस) याने नानावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि उत्तरेत प्रचंड पराक्रम करुन पानपताचे अपयश धुवून काढलेला महादजी पेशव्यांचे दर्शन घेण्यास पुण्यास यायला निघाला तेव्हा नानाने घाबरुन कॉर्नवालिसकडे सैन्याची मदत मागितली. महादजीच्या सैन्याने पुण्यात २० महिने तळ दिला बर्र – मराठा रियासतमध्ये माहिती दिसते अशी आहे.. नाना आणि मोरोबामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रसंग चालूच होते. २६-२-१७७८ शिवरात्रीच्या दिवशी नाना मेणवलीला गेलेला असताना मोरोबा आणि होळकर मिळून नाना विरुद्धचे कारस्थान रचले गेले. नाना परत पुण्यात येताच पंढरपूरच्या यात्रेला जाण्याचा निर्णय मोरोबाने सांगितला कारण कुटुंब नानाकडे ओलीस राहू नये. पुढे मोरोबा पंढरपुरास न जाता बरामातीस गेला तिथे तिथे नानाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तो साध्य झाला नाही , २५ मार्च ला नानाला पकडण्यासाठी मोरोबा आणि होळकरांची माणसे पुण्यात पोहोचली, पण नाना पळून पुरांदारास पोहोचलेला , तेंव्हा दुसऱ्या दिवशी मोरोबाच्या हाती पुण्याची सत्ता आली... (पृ क्र. १२४ रियासत) यात विषप्रयोगाचा उल्लेख नाही आणि मुख लिहायचा मुद्दा असा की मोरोबा पासून कारभार परत मिळवताना महादाजीने नानाला मदत केली( पृ क्र १३८ रियासत उत्तर विभाग-१ ) मोरोबाला कसा पकडला ते समजून घेण्यासारखे आहे.तुकोजी होळकरास मोरोबापासून अलग केल्याशिवाय मोरोबाच्या वाटेस जाणे शक्य नव्हते शिंदे-होळकर लढण्याचं प्रसंग आला असतं तर मोठा रक्तपात होऊन कोणास कसा घातक ठरला असता हे सांगण्यासारखे नव्हते महादाजीने त्यास समजावले. की आपण बरोबरीचे सरदार ,हे कारभारी वाटेल तसें भांडोत, त्यात पडल्याने आपणास फायदा काय? इत्यादी... हे प्रकरण मोरोबाच्या दृष्टीस पडल्यानंतर तो घाबरला आणि नानाबापूची पाय्धारणी करू लागला. शिन्द्याची देखील पुष्कळच विनवणी केली. होळकरा मार्फत तिसरे बोलणे लावले की जरीपटका शिक्के कट्यार आणि शिवनेरी इतकेच फक्त माझ्याकडे ठेवा. तुझ्याकडे कोणताही सरकारी सरंजाम राहणार नाही असं नानाचा निरोप गेल्यावर त्याने मुंबई अथवा हैदर कडे पळून जाण्याचे ठरवले जुन २२ ते २७ जुनला हरिपंत फडके आणि परशुराम भाऊनी त्याच्या गोटावर चालून गेल्यावर शिक्के कट्यार नानाकडे आली.. .. या प्रकरणात महादजी शिवाय नानाला काही करणेच अशक्य झाले असते. हरिपंत आणि परशुरामभाऊ हे शिंदे होळकरां इतके मोठे सरदार नव्हते.. ते इथे शिंदेनी नानाला मदत केली आणि तुम्ही म्हणता आहात की पेशव्यांचे दर्शन घेण्यास पुण्यास यायला निघाला तेव्हा नानाने घाबरुन कॉर्नवालिसकडे सैन्याची मदत मागितली. कधी? १७७९ च्या तळेगावच्या लढाईत नाना-महादजी एका बाजूने लढले. १७७९ च्या दरम्यानच स्वतःकडे कारभार घेतल्यावर नाना आणि महादजीने बंधुभावाची शपथक्रिया केली (पृ क्र. २०२ रियासत). या बंधुत्वाचा उल्लेख कित्येक पत्रात सापडतो . संकट समयी मला कोणी कामास आले नाही एकट्या नानाचा भाऊपणा कामास आला. उदंड झाले तरी थोर ते थोरच असे महादजीचे शब्द आहेत... दौलतराव शिंद्याने नानाला कैदेत टाकले आणि त्याचा उपासमार करणे, तापल्या तोफेवर विवस्त्र बसवणे असा अमानुष छळ केला. नानाच्या गटातील अप्पा बळवंत मेहेंदळे सारख्यांनी विषभक्षण करुन स्वतःची सुटका करवून घेतली. पण दौलतरावाने मृतांच्या नातेवाईकांचाही छळ केला. नानाची अटक राजकीय होती आणि त्याचा मृत्यू कैदेत झालेला नाही. नानाच्या अटके नंतर त्याला शारीरिक हाल असे बिलकुल काढावे लागले नाहीत (रियासत उत्तर विभाग ३ पृ क्र- ९६) त्याच्या नातेवाईकान बद्दल संपूर्ण प्रकरण लिहिलेलं आहे, त्यात वाचावे मी तरी किती टायपू ?? आणि मुत्सद्दी लोकांवर अत्याचार करणारा होता सर्जेराव घाडगे, याला वर आणले बाजीराव आणि दौलतराव शिंदेनेच पण नंतर १७०९८च्या पावसाळ्यात अटक केली.. मुद्दलात चुका वाटल्या म्हणून लिहिले,

In reply to by आजानुकर्ण

मराठेशाहीचा कारभार इंग्रजांवर सोपवल्याचे बाजीरावासह कोणत्याच मराठा सरदारास आवडले नसले तरी सगळेजण इंग्रजांशी स्वतंत्रपणे लढले, होळकराने अनेकदा इंग्रजांस चोपलेही. मात्र अखेरीस प्रत्येकजण पराभूत झाला. केवळ मराठेशाहीतच नव्हे तर अनादी अनंत काळापासूनच हेच भारताचे रडगाणे आहे. एकत्र येऊन परकीय सत्तेचा मुकाबला करण्याऐवजी वैयक्तीक स्वार्थासाठी दलबदलूपणा करणे--- त्यासाठी अगदी आक्रमकांची आणि परकियांची चाकरी करणे-- हेच एक फार मोठे भारताच्या पारतंत्र्याचे कारण आहे ! या कारणामुळेच परकीय भारतात मूठभर संख्येने आले आणि इथल्याच लोकांच्या मदतीने इथल्याच लोकांवर शेकडो वर्षे सत्ता गाजवत राहिले. याबाबतीत कोणी वर-खाली नाही... ना राजपूत, ना जाट, ना मराठे, ना इतर कोणी.

In reply to by बॅटमॅन

इथे कामावर ठेवण्याच्या बाबतीत किंवा उच्च पदावर ठेवण्याच्या बाबतीत धर्माचा जास्त विचार केला जात नसावा, चांगला एम्प्लोयि मिळाला कि जास्त विचार न करता ऑफर देत असावेत.काझी हैदर उत्कृष्ट न्यायाधीश असावा… नंतरच्या काळात औरंगजेबाच्या दरबारी त्याने 'चीफ जस्टी'स म्हणून काम पाहिल्याचे ऐकिवात आहे.

In reply to by आजानुकर्ण

"नूरखान बेग - स्वराज्याचा पहिला सरनोबत २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दीड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली." मदारी मेहतर बद्दल वाचले आहे, पण बाकिच्यांबद्दल फारशी माहिती नाही. शिवाजी महाराजांजवळ दीड लाख इतके सैन्य असल्याचे कधी वाचले नाही. १६५७ साली शिवाजी महाराज २७ वर्षांचे होते. स्वतःचे स्वतंत्र राज्य उभारण्याची शपथ घेउन जेमतेम १० वर्षे झाली होती. इतक्या कमी अवधीत त्यांनी दीड लाख सैन्य जमविणे अशक्य वाटते. (चूभूद्याघ्या)

In reply to by श्रीगुरुजी

दीड लाखाचा तपशील चूकच आहे. बाकी माझ्या वरच्या प्रतिसादात दिलेले आहे. त्या माहितीत तपशिलाच्या अजूनही बारीक चुका आहेत.असो.

In reply to by बॅटमॅन

जदुनाथ सरकार यांनी लिहीलेली या संदर्भातील माहिती: Strength of his army The growth of his army is thus recorded at the outset of his career he had 1,200 household cavalry paga and 2,000 silahdars or mercenary horsemen provided with their own arms and mounts Sabh 8 After the conquest of Javli 1655 the number was increased to 7,000 paga 3,000 silahdars and 10,000 Mavle infantry. He also enlisted 700 Pathans from the disbanded soldiery of Bijapur Chit 33 TS 15b After the destruction of Afzal Khan 1659 he raised his forces to 7,000 paga 8,000 silahdars and 12,000 infantry.At the time of his death 1680 his army consisted of 45,000 paga under 29 colonels 60,000 silahdars under 31 colonels and one lakh of Mavle infantry under 36 colonels. But TS states that he left 32,000 horses in his stables besides 5,000 given to the bargirs The core of his army was therefore formed by 30 to 40 thousand regular and permanently enlisted cavalry in his own service and about twice that number of infantry militia hasham whom he used to withdraw from the cultivation of their fields during the campaigning season only as in England under King Alfred.

In reply to by विकास

धन्यवाद. साधारणपणे लाखभर असा हिशेब दिसतो. अतिशयोक्त मानला तरी ६०-७० हजारांपर्यंत नक्की सैन्य असू शकते.

In reply to by आजानुकर्ण

स्वराज्याचा पहिला सरनौबत बहुतेक माणकोजी (दहातोंडे?) होते. नुरखान बेग सरनोबत झाल्याचे कधि वाचनात नाहि. जीजाऊ साहेबांसारखा मान मिळवणारे सोनोपंत डबीर (महाबळेश्वरला ग्रहण प्रसंगी मासाहेबांची तुला केली व सोनोपंतांचीही. ते सर्व तुळा द्रव्य मग दान करण्यात आले) याच सोनोपंतांचा मुलगा आग्रा प्रसंगी महाराज निसटुन गेल्यानंतर औरंगजेबाने कैद केला. बाकि महाराजांप्रती निष्ठा बसायला कुणाचि जात, धर्म आडवे आले नाहि. तानाजी असो वा मोरोपंत पिंगळे असो वा मदारी मेहतर... त्यांचे काम वेगवेगळे होते पण महाराजांप्रती भाव सारखाच असावा. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

स्वराज्याचा पहिला सरनौबत बहुतेक माणकोजी (दहातोंडे?) होते. नुरखान बेग सरनोबत झाल्याचे कधि वाचनात नाहि. नवा नुकताच लिहिलेला इतिहास वाचलेला दिसत नाही तुम्ही. सवय करुन घ्या ! दोन चार वर्षांत शिवाजीचे राज्य हे मुस्लिम राज्यच होते असा बळकट पुरावा मिळणार आहे.

In reply to by अर्धवटराव

बाकि महाराजांप्रती निष्ठा बसायला कुणाचि जात, धर्म आडवे आले नाहि.> कदाचित आत्ताइतका 'जातीयवाद' बोकाळला नसावा त्याकाळी.

In reply to by मालोजीराव

>>> नाटकाचा विषय शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज नक्कीच नव्हता +१ ब्राह्मणांना झोडपणे हाच या नाटकाचा उद्देश असावा.

"आपल्या लक्षात आले असेल हा टोला कोणाला ते" "गोब्राह्मणप्रतिपालक - यावर नाटककाराचे भाष्य असे - "खरेतर ब्राह्मणांपासून रक्षण करा गायींचे असे म्हणायला हवे" "ती शिक्षा मनुवाद्यांनी दिल्यासारखी वाटते" नाटक कुठल्या अंगाने जाणारे आहे ते साधारण लक्षात येतंय. सदर नाटक आणि नाटककार महान आहेत. तेव्हां आम्ही सामान्य लोक काही त्या वाटेला जाणार नाही. आगाऊ माहीती बद्दल धन्यवाद.

नाटकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! तसंही हे नाटक पाहणार नव्हतोच. नावावरून अंदाज आलेलाच होता. आता तुमच्या लेखनावरून खात्रीच झाली. नाटकाचं सार एका वाक्यात सांगता येईल. "ब्राह्मण हे अनादी कालापासून आजतगायत दुष्ट, क्रूर, नालायक, खोटारडे, इतरांचे शोषण करणारे . . . असे सर्व दुर्गुणांनी भरलेले होते/आहेत." हेच ते सार!

In reply to by श्रीगुरुजी

नाटकाचं सार एका वाक्यात सांगता येईल. "ब्राह्मण हे अनादी कालापासून आजतगायत दुष्ट, क्रूर, नालायक, खोटारडे, इतरांचे शोषण करणारे . . . असे सर्व दुर्गुणांनी भरलेले होते/आहेत." हेच ते सार!
म्हणजे हे दुसरे 'देशाचे दुष्मन' पुस्तक आहे की काय?

In reply to by श्रीगुरुजी

नाटकाचं सार एका वाक्यात सांगता येईल. "ब्राह्मण हे अनादी कालापासून आजतगायत दुष्ट, क्रूर, नालायक, खोटारडे, इतरांचे शोषण करणारे . . . असे सर्व दुर्गुणांनी भरलेले होते/आहेत." हेच ते सार!
अहो फक्त इतकेच नाही. प्रचंड बहुमत ( लोकसंख्येचे )असताना आणि जमिनी ताब्यात असताना आम्ही लोक मागे राहिलो हे पण ब्राम्हणांचेच कारस्थान आहे. ह्यांना हाकलून द्या देशातुन.

धन्यवाद तुम्हाला अन त्या नाटक वाल्या इतीहासकारांना! महाराज जगले ईतीहास रचुन गेले ,आणी आपण मनुवादी मुस्लिम मराठा वैगरे वाद वाढवत बसतो.

In reply to by नाना चेंगट

हो पण आता या नाटकाने पुढची पायरी गाठली आहे. म्हणजे आता पर्यंतच्या सगळ्या इतिहासकारांना महाराज कळलेच नाहीत असाच दाव केला यांनी. नाटकाची निर्मिती कोणाची बघायला हवी.

>>> १७> संभाजी महाराजही अतिशय विद्वान, शूरवीर होते. बुधभूषण या ग्रंथाची रचना त्यांनी केली. अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांना औरंगजेबाने पकडल्यावर त्यांना शिक्षा स्वतः औरंगजेबाने दिल्यासारखी वाटत नाही. ती शिक्षा मनुवाद्यांनी दिल्यासारखी वाटते. संस्कृत शिकल्याबद्दल जीभ छाटणे, स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिल्याबद्दल डोळे काढणे. या सगळ्या शिक्षा मनुवाद्यांच्या आहेत. मनुस्मृतीला अनुसरून आहेत. पवित्र मनुस्मृती भारतातून नष्ट झालेली दिसते (नाहीतरी भारतीय करंटेच आहेत). पण सौदी अरेबिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान इ. देशातून पवित्र मनुस्म्रूतीला अजूनही प्रमाण मानतात हे पाहून आनंदाने व अभिमानाने उर भरून आला. तिथे अजूनही पवित्र मनुस्मृतीला अनुसरून फटके मारणे, तलवारीने शिरच्छेद करणे, चोरी केल्याबद्दल हातपाय तोडणे, दगडाने ठेचून मारून टाकणे अशा शिक्षांद्वारे मनुस्मृती जिवंत ठेवली आहे. पिकतं तिथं विकत नाही हे खरं.

सर्वच जगाचा इतिहास कत्तली, लुटालूट, अत्याचार, धर्मांधता असल्या गोष्टींनी भरलेला आहे. कोणत्याही एका जातीला, पंथाला किंवा धर्माला त्यातून हात झटकता येणार नाहीत. वर्तमानात जगतांना इतिहासाचे ओझे खांद्यावर घेऊन जगायचे की इतिहासाच्या पायावर उभे राहून सुदृढ भविष्याकडे वाटचाल करायची हा खरा प्रश्न आहे. ज्यांचे हितसंबंध इतिहासात अडकलेले असतात ते इतरांच्या खांद्यांवर इतिहासाचे ओझे लादून त्यांना गुडघे टेकायला भाग पाडतात. ज्यांना स्वत:च्या पायांतील शक्तीची जाणीव होते ते इतिहासाचे ओझे उतरवून भविष्याच्या दिशेने चालायचा प्रयत्न करतात. ससा आणि कासवाच्या गोष्टीत कासवाबद्दल गाफील राहिल्याने सशाची जी गत झाली तीच आज इतिहासाच्या पिंजऱ्यात अडकून पडलेल्यांची झाली आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या गोष्टी बोलायला ठीक असल्या तरी प्रत्यक्षात ऐतिहासिक वर्चस्वाचे अंडरकरंटस सर्वांच्याच मनांत किती प्रबळ असतात हे रोजच जाणवत असते. भविष्यात येणारी त्सुनामी ही त्या वर्चस्वालाच कायमस्वरूपी तडाखा देणारी आहे ही जाणीव आत्ता कुठे सर्वांना होऊ लागली आहे. त्या तडाख्यातून स्वत:च्या वर्चस्वाची उरलीसुरली लव्हाळी वाचवण्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे.

In reply to by अवतार

इतिहास हे खांद्यावरचे ओझे बनवायचे का मार्ग दाखवणारा दिवा बनवायचा हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून आहे. विविध परिस्थितीत मानवी स्वभाव कसे निर्णय घेतो, मानवी समुदाय कसे वागतो हे इतिहास शिकवतो. त्यातून बरेच काही शिकायला मिळते. तशी परिस्थिती पुन्हा येऊ घातली तर त्याला कसे तोंड द्यायचे ह्याचे शिक्षण इतिहासाचा उत्तम अभ्यास केल्यास मिळते. त्यामुळे इतिहासाला इतके त्याज्य मानणे मला पटत नाही. तशात ब्रिगेडी भडकावू लोक खोटा इतिहास जेव्हा लोकांना शिकवत असतात तेव्हा त्यांना ठणकवायला आपला अभ्यास असायला हवा.

In reply to by हुप्प्या

लिहिणारे हे सत्याच्या ओढीने तो लिहित असतात. पण असत्य इतिहास लिहिणारे हे अज्ञानातून तसे करत नसून त्यांच्या स्वार्थासाठी करत असतात. त्यामुळे कोणीही त्यांना सत्य इतिहास सांगितला तरी तो मान्य करणे हे त्यांच्या सोयीचे नसते. इतिहास हा सत्य-असत्य आहे की नाही यापेक्षा सोयीचा आहे की नाही हे जास्त महत्वाचे असते. ऐतिहासिक सत्याची किंमत वर्तमानात चुकवायची कोणाचीच तयारी नसते. याचे कारण म्हणजे काळाच्या ओघात अनेक वर्गांचे हितसंबंध विचित्र प्रकारे एकमेकांत गुंतलेले असतात. केवळ ऐतिहासिक कारणांसाठी त्यातून सुटका करून घेणे हे कोणालाच शक्य नसते. अशा परिस्थितीत ज्यांना स्वत:चे वर्चस्व वर्तमानात टिकवून धरायचे आहे त्यांना सोयीचा इतिहास लिहिणे हे भागच आहे. त्यांचा प्रतिकार करणाऱ्यांना देखील स्वत:च्या सोयीचाच इतिहास लिहिणे भाग पडते. "इतिहासाचे ओझे" हा शब्दप्रयोग ह्या अर्थाने वापरला आहे.

In reply to by अवतार

संपूर्ण चर्चा विविध तथ्यांनी भरलेली आणि भारलेली आहे. मात्र त्यातील अवतार यांचा हा प्रतिसाद अत्यंत आवडला. मागे कोणीतरी केलेला "भावनांची गळवे" या शब्दप्रयोगाप्रमाणेच "ऐतिहासिक वर्चस्वाचे अंडरकरंटस" हा शब्दप्रयोग तर प्रचंड आवडला आहे. त्याचा वापर माझ्याकडूनही होईल याची नोंद घ्यावी :) आभार!

In reply to by अवतार

>> ज्यांना स्वत:च्या पायांतील शक्तीची जाणीव होते ते इतिहासाचे ओझे उतरवून भविष्याच्या दिशेने चालायचा प्रयत्न करतात म्हणजे नेमके काय ? म्हणजे इतिहास पूर्ण नाकारायचा का ! आमच्या मते तसे करता येत नाही कारण आज समोर दिसणार्‍या अनेक गोष्टींना इतिहासातील घटना कारणीभूत असतात

In reply to by आशु जोग

@म्हणजे नेमके काय ?>>> पेंढा भरवुन फुगवलेला घोडा फेकुन...सायकल घेतात. ______________________________________________________http://www.freesmileys.org/smileys/smiley-green/greensmilies-010.gif______________________

In reply to by अवतार

सर्वच जगाचा इतिहास कत्तली, लुटालूट, अत्याचार, धर्मांधता असल्या गोष्टींनी भरलेला आहे. कोणत्याही एका जातीला, पंथाला किंवा धर्माला त्यातून हात झटकता येणार नाहीत.
ह्या विषयातील अभ्यास तसा कमी आहे म्हणुन विचारत आहे की हिंदुंनी प्रोअ‍ॅक्टीव्हली कुठल्या इतर धर्मियांची कत्तल लुटालुट जबरदस्तीने धर्मप्रसार केला अशी काही उदाहरणे देता का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

इतरांचे धर्मांतर करण्यासाठी मुळात आपली स्वत:ची धार्मिक ओळख आक्रमकांच्या मनात सुस्पष्ट असावी लागते. आज ज्यांना "हिंदू" म्हटले जाते त्यांच्या जाणीवेत अशी स्वत:च्या धर्माची सुस्पष्ट व्याख्या होती का याचे उत्तर इतिहासाने दिलेले आहे. जे स्वत:च कधी संघटित नव्हते ते इतरांना कोणत्या आधारावर संघटित करणार? कधी "सनातन", कधी "वैदिक", तर कधी नुसतीच "एक जीवनशैली" अशी विशेषणे वापरून वेळ मारून नेणे ह्यातच ज्यांच्या कित्येक पिढ्या खर्ची पडल्या ते संघटित आणि आक्रमक स्वरूपाचा धर्मप्रचार करणार तरी कसा? प्रबोधनकार ठाकरे ज्याला "भिक्षुकी धर्म" म्हणतात त्याचा प्रचार कशा प्रकारे केला गेला हे बौद्ध लेण्यांतील उगवलेल्या देवी / देवांच्या मंदिरांकडे पाहून कळू शकते. किंवा पुरी जगन्नाथ पासून ते बद्रीनाथच्या मंदिरांकडे पहिले तरी सहज समजू शकते. "आम्ही नाही बुवा त्यातले!" असा आव आणण्याचा प्रयत्न आज प्रत्येक धर्माला करावा लागतो यातच सगळे आले.

In reply to by अवतार

अर्थात हिंदुंनी जबरदस्तीने अत्याचार , लुट , धर्मांतर केल्याचे एकही उदाहरण नाहीये तुमच्याकडे.... :)

In reply to by प्रसाद गोडबोले

करण्यासाठी मुळात त्यात आपला फायदा आहे ही भावना असावी लागते. जिथे बहुसंख्य जनतेलाच धर्माच्या खुंट्याला हजारो वर्षे बांधले गेले होते, जिथे समान दर्जा मिळवण्यासाठीच कित्येक पिढ्यांना संघर्ष करावा लागला ते अशा धर्माला इतरांवर लादण्यासाठी मानसिक बळ आणणार तरी कुठून? ही तथाकथित धार्मिक सहिष्णुता औदार्यातून आलेली नसून मानसिक दुबळेपणातून आलेली आहे. ज्यांनी बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करवल्या ते स्वत:ला "हिंदू" म्हणवून घेत नव्हते आणि कालांतराने ज्यांच्यावर "हिंदू" ही ओळख लादली गेली त्यांना अशा कत्तली करण्यात स्वारस्य नव्हते. त्यामुळे जबरदस्ती अत्याचार वगैरे हे हिंदूंनी केले नाहीत या गोष्टीत निश्चितच तथ्य आहे.

In reply to by अवतार

म्हणजे धर्माची ओळख, त्याची सखोलता, परिणामकारता, हि धर्माने किती पीडा दिली यावर ठरवावी लागणार तर. >>करण्यासाठी मुळात त्यात आपला फायदा आहे ही भावना असावी लागते. -- पर्सनल फायदे-तोटे बाजुला ठेऊन "स्व" चा विस्तार कसा करावा हा धर्माचा (वन ऑफ द) फंडा. आपल्या दैनंदीन गरजा, निसर्ग-व-मानव निर्मीत लहान मोठे संकट, वैयक्तीक इच्छा-आकांक्षा, या पलिकडे जाऊन विचार करण्याचे औचित्य सामान्य माणुस कधि दाखवत नाहि. या लिमीटेश्न्स गृहीत धरुन आहिस्ते-कदम पण परिनामकारक धर्म प्रणाल्या तयार झाल्या. त्यांना उपद्रव मुल्यांवर तोलावे काय. हे म्हणजे क्रोसीनची गोळी परिणाकारक नाहि, कारण त्याने मुळीच ताप येत नाहि असं म्हणणं झालं. >>जिथे बहुसंख्य जनतेलाच धर्माच्या खुंट्याला हजारो वर्षे बांधले गेले होते, -- अत्यंत चुकीचे अनुमान. खुंट्याला बांधुन एखादी सिस्टीम फार काळ टिकत नाहि. गेल्या दोन-अडीचशे वर्षांत मानवी जीवनात जे अतिप्रचंड बदल झालेत त्याचे मोमेण्टम इतकं जास्त आहे कि त्यापुर्वीच्या काळाचे कवडसे देखील आजच्या मानसीकतेत पकडणे कठीण आहे. बहुसंख्य जनता धर्माने खुंटीला टांगली हा विचार त्याचाच प्रत्यय आहे. >> जिथे समान दर्जा मिळवण्यासाठीच कित्येक पिढ्यांना संघर्ष करावा लागला -- समान दर्जा ? धर्माच्या मानवी जीवनातील अधिष्ठानाला आजची समान दर्जाची मोजमापे लावणे हेच मुळी चुकीचं आहे. हि मोजमापे तशीही पोकळ आहेत, ठिसुळ आहेत. वर कॉण्ट्रॅडीक्श्न अशी कि धर्म अन-बायस्ड आहे. तो कधि कोणाला खाली फेकत नाहि कि वर उचलत नाहि. >>ते अशा धर्माला इतरांवर लादण्यासाठी मानसिक बळ आणणार तरी कुठून? ही तथाकथित धार्मिक सहिष्णुता औदार्यातून आलेली नसून मानसिक दुबळेपणातून आलेली आहे. -- सहिष्णुता म्हणजे वाघाने शाकाहारी बनणे, किंवा गाईने मासे खाणे नव्हे. मानसीक पराक्रम आक्रमणाच्या, उत्पीडनाच्या स्वरुपात व्यक्त व्हावा, मोजला जावा हि आजच्या मानव प्राण्याची सर्वात मोठी शोकांतीका आहे. >>ज्यांनी बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करवल्या ते स्वत:ला "हिंदू" म्हणवून घेत नव्हते -- हा रोचक इतीहास संदर्भासहीत द्याल का? >> आणि कालांतराने ज्यांच्यावर "हिंदू" ही ओळख लादली गेली त्यांना अशा कत्तली करण्यात स्वारस्य नव्हते. -- अच्छा. हा फ्लीप-फ्लॉप कधी व कसा टर्न ऑन झाला? हिंदु हि ओळख "लादल्या"गेल्या मुळे जर कत्तली करण्यातलं स्वारस्य गेलं तर हा "हिंदु" आयडेण्टीचा विजय. ज्यांना कत्तली करण्यात स्वारस्य नव्हतं त्यांच्यावर "हिंदु" नावाचे लेबल लादल्या गेलं तर हा देखील "हिंदु"च्या पारखी नजरेचा विजय. >>त्यामुळे जबरदस्ती अत्याचार वगैरे हे हिंदूंनी केले नाहीत या गोष्टीत निश्चितच तथ्य आहे. -- त्याकरता धार्मीक अत्याचार नेमके कसे व का झाले, त्याला किती सखोल तत्वज्ञानाचा पाठींबा मिळाला हे समजुन घ्यावं लागेल. असो. तो फार वेगळा विषय आहे. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

ही संकल्पना स्वत:च्या अस्तित्वाविषयी आणि या विश्वाविषयी निर्माण झालेल्या मानवी कुतूहलातून जन्माला आली आहे. प्राण्यांना केवळ शरीरधर्म पुरेसा असतो. पण मानवाला त्यापलीकडे जाण्याची गरज भासते. याचे मुख्य कारण म्हणजे पशुत्वावर मात करण्याची प्रेरणा मानवी मनात असते. न्याय, दया, क्षमा, शांती ह्या सर्वच संकल्पना या मूलभूत प्रेरणेतूनच निर्माण झालेल्या आहेत. सर्वच धर्म हे मुख्यत: पारलौकिक जीवनाविषयी आणि या वर उल्लेख केलेल्या तत्वांविषयी अंतिम भाष्य करण्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येक धर्म हा समाजाच्या ऐहिक जीवनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. या ऐहिक जीवनाविषयी भाष्य करण्याचे सोडून केवळ पारलौकिक जगाविषयीच उपदेश करावा ही भूमिका कोणत्याही धर्माला मान्य होणारी नाही. समाजाच्या परिघाबाहेर फेकले गेलेल्यांतून जी धर्मांतरे होतात ती देखील ऐहिक जगात स्वत:च्या विकासाची संधी मिळावी म्हणूनच होतात. बाबासाहेबांचे धम्मपरिवर्तन हे त्यासाठीच होते. समाजाचा गाडा सुरळीत चालला पाहिजे म्हणून धर्म आवश्यक आहे ही धर्माच्या समर्थकांची भूमिका असते. याचा खरा अर्थ समाजावरचे आपले नियंत्रण टिकून राहावे म्हणून धर्म आवश्यक आहे असा होत असतो. म्हणूनच धर्माला अभिप्रेत असणारी न्यायाची संकल्पना आणि आधुनिक संविधानाने मान्य केलेली न्यायाची संकल्पना यात फरक असतो. खुंट्याला बांधुन एखादी सिस्टीम फार काळ टिकत नाहि म्हणूनच ही सिस्टीम इतर धर्मांच्या आक्रमणानंतर आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या प्रहारानंतर ढासळून पडायला सुरुवात झाली आहे. युरोपमध्ये देखील आधुनिक विज्ञानाधिष्ठित विचारांपुढे चर्चचे साम्राज्य अखेर कोसळून पडलेच. तुर्कस्थानात देखील तेच झाले. धर्म अन-बायस्ड आहे. तो कधि कोणाला खाली फेकत नाहि कि वर उचलत नाहि. नेमक्या याच कारणासाठी संविधान अस्तित्वात आले आहे. जे खाली फेकले गेले होते त्यांना वर उचलण्याचे कार्य धर्माने पार पाडले नाही. जो धर्म वरच्यांना वर आणि खालच्यांना खाली राहू देतो त्याला "अन-बायस्ड" म्हणणे कठीण आहे. हा रोचक इतीहास संदर्भासहीत द्याल का? देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे या प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेल्या ग्रंथात आद्य शंकराचार्यांनी सिथियनांच्या टोळ्यांना हाताशी धरून बौद्ध धर्माचे काय केले ते विस्ताराने दिलेले आहे. "हिंदु" आयडेण्टीचा विजय, "हिंदु"च्या पारखी नजरेचा विजय "हिंदू" हा शब्द मुख्यत: इस्लामच्या आक्रमणानंतर रूढ झालेला आहे. त्यापूर्वी त्याला व्यापक अस्तित्व नव्हते. जे ग्रंथ "हिंदू" धर्माचे प्रमुख ग्रंथ मानले जातात त्यांच्यात मूर्तीपूजेला स्थान नाही. जे प्राचीन काळापासून मुर्तीपुजेलाच महत्व देत होते त्यांना ते ग्रंथ वाचण्याचा अधिकार देखील नाही. तेव्हा ज्यांनी "हिंदू" ही ओळख या मुर्तीपुजकांच्या समुदायांवर लादली त्यांचा हा विजय आहे. ज्यांच्यावर ही ओळख लादून त्यांना दुय्यम दर्जाचे ठरवण्यात आले त्यांचा हा पराजय आहे.

In reply to by अवतार

>>न्याय, दया, क्षमा, शांती ह्या सर्वच संकल्पना या मूलभूत प्रेरणेतूनच निर्माण झालेल्या आहेत. -- म्हणजे (मानव निर्मीत) धर्माचा हा पाया म्हणावा काय? ज्याप्रमाणे न्याय, दया, क्षमा वगैरे मुलभूत प्रेरणेचा अविश्कार आहेत त्याच प्रमाणे अन्याय, जुलुम, दमन वगैरे देखील मुलभूत प्रेरणेतुनच उद्भवतात. आणि या प्रेरणांप्रती माणसाचा स्वाभावीक कौल असतो. मग त्याचे खापर धर्मावर का फोडावे? >>सर्वच धर्म हे मुख्यत: पारलौकिक जीवनाविषयी आणि या वर उल्लेख केलेल्या तत्वांविषयी अंतिम भाष्य करण्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येक धर्म हा समाजाच्या ऐहिक जीवनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो -- ऐहीक जीवनाप्रती आवड आणि पारलौकीक जीवनाप्रती आस्था या एका सरळ रेषेत दुभंगल्या जात नाहि. या दोन्ही प्रेरणा कायम एकमेकांना प्रतिसाद देत असतात. त्यामुळे एकावर भाष्य केले तर त्याचे दुसर्‍यावर काय तरंग उमटतील हा विचार अगदी स्वाभावीक आहे. अंतीम भाष्याच्या मुद्याशी असहमत. इतर धर्मीयांचं माहित नाहि पण ज्याला आज हिंदु म्हणण्यात येतं त्यांचे भाष्य एका विशिष्ट पातळीवर जाऊन मुकं होतं व त्यापलिकडे माणासाने स्वतःच परिक्षण करावे असा सल्ला देतं. समाजावर नियंत्रण मिळवण्याची धडपड मनुष्याच्या नसांनसांत भिनली आहे (इतर बहुतेक प्राण्यांच्या देखील). त्यामुळे कुठलीही संस्था वापरुन आपले उदीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न मनुष्य सतत करत असतो.. मग तो धर्म असो, विज्ञान असो, राज्य व्यवस्था असो वा कायदेमंडळ. आपली समता, स्वातंत्र्य, बंधुतेवर आधारीत घटना देखील याच उद्देशाचा पाठलाग करते. >> या ऐहिक जीवनाविषयी भाष्य करण्याचे सोडून केवळ पारलौकिक जगाविषयीच उपदेश करावा ही भूमिका कोणत्याही धर्माला मान्य होणारी नाही. -- ऐहीक आणि पारलौकीक जीवनाच्या मधे नैतीकतेचा बफर झोन येतो. या झोन ची लिमीट कधी या बाजुला तर कधी त्याबाजुला वाढत असते/घटत असते. हे नित्यपरिवर्तनीय आहे. आणि धर्माच्या मागे जर मुलभूत प्रेरणा असतील तर त्या प्रेरणा प्रसंगी कुठल्याही कारणाने, कुठल्याही विषयावर उद्दीपीत होतील... त्याला अमुक एक क्षेत्र वर्ज्य असं होत नाहि. आणि तेच उपदेश रुपाने पसरते. जर कुठल्याही धर्माला न मानता एखादा मनुष्य पारलौकीक जीवनावर आपले विचार मांडु शकतो, तर त्याच्या उलट का होऊ नये? >>समाजाच्या परिघाबाहेर फेकले गेलेल्यांतून जी धर्मांतरे होतात ती देखील ऐहिक जगात स्वत:च्या विकासाची संधी मिळावी म्हणूनच होतात. बाबासाहेबांचे धम्मपरिवर्तन हे त्यासाठीच होते. -- सहमत. आणि बाबासाहेबांनी धर्म अपरिहार्य म्हणुन नाहि स्विकारला. धर्माचा एक नवा कळप तयार करण्याची त्यांची इच्छा नव्हती. बौद्ध धर्माची ऐहीक जीवनातील तत्वे बाबासाहेबांना पटली म्हणुन त्यांनी बौद्ध धर्म स्विकारला. शिवाय त्यांनी हिंदु धर्म त्यागण्यापुर्वी त्यात आवश्यक सुधारणांचा पाठपुरावा केला. काहि मोजकी मंडळी वगळता तत्कालीन धर्माचार्यांनी, समाज धुरीणांनी त्याला पाठींबा दिला नाहि (व हिंदु समाजाने आपले मळलेले वस्त्र धुण्याची एक प्रचंड मोठी संधी घालवली). जर आवष्यक ते बदल झाले असते तर बाबासाहेब हिंदु म्हणुनच जगले असते >>समाजाचा गाडा सुरळीत चालला पाहिजे म्हणून धर्म आवश्यक आहे ही धर्माच्या समर्थकांची भूमिका असते. -- सहमत >> याचा खरा अर्थ समाजावरचे आपले नियंत्रण टिकून राहावे म्हणून धर्म आवश्यक आहे असा होत असतो. -- असहमत. ज्याला समाजाचे नियंत्रण करायचे आहे त्याला धर्माच्या कुबड्या अपरिहार्य नाहित. थोडं अवांतर उदाहरण: गांधीजींनी ग्रामस्वराज्याची कल्पना मांडली. त्यालाच धरुन नक्षलवादासारखी एखादी चळवळ ग्रामपुढार्‍यांकरवी सेंट्रल व्यवस्थेला चॅलेंज करु लागली तर त्याचा दोष गांधींवर किंवा ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेवर नाहि >> म्हणूनच धर्माला अभिप्रेत असणारी न्यायाची संकल्पना आणि आधुनिक संविधानाने मान्य केलेली न्यायाची संकल्पना यात फरक असतो. -- या दोन्ही समानतेच्या (सं)कल्पना तत्वतः कुठेच एकमेकांना छेद देत नाहित. आगीत हात घातला तर चटका बसेल हा धर्माचा न्याय. आगीचा चटका द्यायचा कि नाहि हा संवीधानाचा न्याय. मुलभूत फरक आहे. >>म्हणूनच ही सिस्टीम इतर धर्मांच्या आक्रमणानंतर आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या प्रहारानंतर ढासळून पडायला सुरुवात झाली आहे. युरोपमध्ये देखील आधुनिक विज्ञानाधिष्ठित विचारांपुढे चर्चचे साम्राज्य अखेर कोसळून पडलेच. तुर्कस्थानात देखील तेच झाले. -- सामाजीक अभिसरणाची हि क्रिया शाहु, फुले, आंबेडकरांनी सुरु केली नाहि. धर्म, राज्य, आणि इतर सर्व व्यवस्था कालौघात निर्माण होतात, समाजात स्विकारल्या जातत व शेवटी नष्ट होतात... त्यांच्या जागी नव्या व्यवस्था येतात. "संभवामी युगे युगे" या काव्यामागचा हाच संदेश आहे कि कुठलिही व्यवस्था कधि ना कधि आपले सत्व गमवते व तिला मोडुन टाकावेच लागते. (महाभारत इतीहास मानला तर) श्रीकृष्णाच्या काळी तेच झालं, आधुनीक काळात शिवाजी, बाबासाहेब, व युरोपात इतरांनी तेच केलं. जुन्या धर्म व्यवस्था मोडुन निघाल्यावर हि अभिसरणाची प्रोसेस थांबणार आहे कि काय? >>नेमक्या याच कारणासाठी संविधान अस्तित्वात आले आहे. जे खाली फेकले गेले होते त्यांना वर उचलण्याचे कार्य धर्माने पार पाडले नाही. जो धर्म वरच्यांना वर आणि खालच्यांना खाली राहू देतो त्याला "अन-बायस्ड" म्हणणे कठीण आहे. -- माणसाचे कर्मस्वातंत्र्य हा धर्माचा प्राण आहे. आणि जे काहि स्खलन किंवा उत्थापन होते ते त्याच शक्तीच्या जोरावर. धर्म अन-बायस्ड या अर्थाने कि ज्याची मापं त्याच्या पदरी घालताना तो लुडबुड करत नाहि. तो इनर्ट आहे. तसं नसतं तर जुने धर्म-मार्तंड कधिच खाली खेचल्या जाउ शकले नसते. संवीधानाबाबतचे मत देखील चुक आहे. संवीधान एकाला वर व दुसर्‍याल खाली खेचायला अस्तीत्वात आलं नाहि. >>देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे या प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेल्या ग्रंथात आद्य शंकराचार्यांनी सिथियनांच्या टोळ्यांना हाताशी धरून बौद्ध धर्माचे काय केले ते विस्ताराने दिलेले आहे. -- संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद. "एका क्ष धर्माव्यतीरीक्त इतर कुठल्याच धर्माला टिकण्याचा अभिकार नाहि, एका क्ष प्रेशीता व्यतीरीक्त इतर कुणीच इश्वराचा पुत्र नाहि, एका विवीक्षीत धर्मग्रंथाव्यतीरीक्त इतर कुठलेच ज्ञान पवित्र नाहि, तेंव्हा त्या क्ष धर्माबाहेरच्यांना जगण्याचा हक्क नाकारावा" या तत्वज्ञानावर आधारीत बौद्ध शिरकाण झाले असा काहि दावा आहे का या पुस्तकात? शंकराचार्य एकदंर सनातन व्यवस्थेतलं मोठं प्रस्थ. तेंव्हा त्यांचा हा आदेश मानुन इतर धर्मीयांच्या शिरकाणाला एक पवित्र धर्मकर्तव्य म्हणुन मान्यता मिळाली काय? >>"हिंदू" हा शब्द मुख्यत: इस्लामच्या आक्रमणानंतर रूढ झालेला आहे. त्यापूर्वी त्याला व्यापक अस्तित्व नव्हते. -- "हिंदु" शब्दाला खचीतच नव्हते. नेमाडे ज्याला समृद्ध अडगळ म्हणतात ते जे काहि आहे, ते "समृद्ध" आणि "अडगळ" होण्यालायक व्हायला एका मोठ्या कालखंडात प्रॅक्टीस केल्या जात होतं एव्हढं तर निश्चित. आज ज्याला ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्म म्हणुन समजल्या जातं ते सुद्धा एकाच अब्राहमी विचारधारेच्या पोटशा़खा. एखादी धर्मसंस्था/संस्कृती कुठल्या काळात कुठलं नाव रुप घेऊन प्रॅक्टीस केली जाते या वरुन त्या संस्थेचे जन्म-मरण ठरत नाहि. त्यात जीवनाच्या परिवर्तनशीलतेला स्कोप असणे महत्वाचे. >>जे ग्रंथ "हिंदू" धर्माचे प्रमुख ग्रंथ मानले जातात त्यांच्यात मूर्तीपूजेला स्थान नाही. -- अमूर्ताला जे व्यक्त आहे त्याने (व्यक्तीने) ओळखणे हे मूर्तीपुजेचे तत्व. मूर्तीपूजेला स्थान न देणार्‍या ग्रंथांत नेमकं कशाला स्थान देण्यात आलं आहे याचा सांगोपांग विचार केला तर त्यात मूर्तीपूजेच्या तत्वांवर आधारीत ग्रंथांशी त्यांची जवळीक अगदी स्पष्ट होईल. शिवाय यादी द्यायची म्हटलं तर मूर्तीपूजेची चर्चा करणार्‍या ग्रंथांची लांबलचक यादी देता येईल. >> जे प्राचीन काळापासून मुर्तीपुजेलाच महत्व देत होते त्यांना ते ग्रंथ वाचण्याचा अधिकार देखील नाही. -- चुकीचे मत. हिंदु म्हणजे मूर्तीपूजा न करणारे व अहिंदु म्हणजे मूर्तीपूजा करणारे असा भेद केला जात असेल तर हिंदु व मूर्तीपूजा, दोन्ही समजण्यात प्रचंड घोळ झाला आहे हे नक्की. शिवाय मूर्तीपूजा हि एक प्रकारची साधना आहे. साधना पद्धतीची धर्माशी तुलना करणेच मुळात चुक आहे. >> तेव्हा ज्यांनी "हिंदू" ही ओळख या मुर्तीपुजकांच्या समुदायांवर लादली त्यांचा हा विजय आहे. ज्यांच्यावर ही ओळख लादून त्यांना दुय्यम दर्जाचे ठरवण्यात आले त्यांचा हा पराजय आहे. -- वेगवेगळ्या साधना पद्धतींमधे, त्यांच्या सामाजीक प्रभावांमधे चढ-उतार होत असतात. त्यात निर्णायक विजय वा पराजय होत नसतो. किंबहुना तिथे विजयाकरता म्हणुन काहि कॉम्पीटीशन नसते (आर्थीक लाभ, सामाजीक प्रतिष्ठा वगैरे भानगडी चिकटल्या तर संघर्ष उघड दिसतो, पण साधनापद्धती हा संघर्ष घडावा म्हणुन अस्तीत्वात येते नाहि). त्यामुळे मूर्तीपूजक पराजीत झाले, दुय्यम झाले असं काहि झालं नाहि. अर्धवटराव

In reply to by अवतार

जिथे बहुसंख्य जनतेलाच धर्माच्या खुंट्याला हजारो वर्षे बांधले गेले होते, जिथे समान दर्जा मिळवण्यासाठीच कित्येक पिढ्यांना संघर्ष करावा लागला ते अशा धर्माला इतरांवर लादण्यासाठी मानसिक बळ आणणार तरी कुठून?
>> ह्याला कोलांटीउडी म्हणतात ... प्रश्न धार्मिक हिंसेविषयी आहे ... जातियवाद , जातीजातींमधली हिंसा येथे चर्चेला नाहीये ( हवे असल्यास त्यावरही चर्चा करु पुढे )
ज्यांनी बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करवल्या ते स्वत:ला "हिंदू" म्हणवून घेत नव्हते आणि कालांतराने ज्यांच्यावर "हिंदू" ही ओळख लादली गेली त्यांना अशा कत्तली करण्यात स्वारस्य नव्हते.
>>> कोणी केल्या बौध्द भिक्कुंच्या कत्तली ? आणि कोणी कोणावर लादली हिंदु ही ओळख ?? राजाचे नाव ,पार्श्वभुमी, कालखंड वगैरे सांगता का जरा ?
त्यामुळे जबरदस्ती अत्याचार वगैरे हे हिंदूंनी केले नाहीत या गोष्टीत निश्चितच तथ्य आहे.
>>> :) हिंदुंनी केवळ अहंमन्यता आणि अभिनिवेषापायी प्रोअ‍ॅक्टीव्हली हिसा केल्याचे एकही उदाहरण इतिहासात सापडत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

कोणी केल्या बौध्द भिक्कुंच्या कत्तली ? आणि कोणी कोणावर लादली हिंदु ही ओळख ?? राजाचे नाव ,पार्श्वभुमी, कालखंड वगैरे सांगता का जरा ?
अशोकाच्या मृत्युनंतर मौर्य साम्राज्य अल्पावधीतच संपुष्टात आले आणि पुष्यमित्र शुंग गादीवर आला. हा बौद्धांचा कडवा विरोधक होता. (अशोकाने लादलेल्या विविध निर्बंधामुळेच बहुधा) याने बौद्ध स्तूपांचा, बौद्ध मठांचा विध्वंस काही प्रमाणात केला. पण भिख्खूंच्या कत्तली केल्या गेल्या का नाही ते मला माहित नाही. पण हा पुष्यमित्र सोडला तर बहुधा इतर सर्वच राजवटींनी बौद्धांना राजाश्रय दिला होता.
हिंदुंनी केवळ अहंमन्यता आणि अभिनिवेषापायी प्रोअ‍ॅक्टीव्हली हिसा केल्याचे एकही उदाहरण इतिहासात सापडत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे .
सहमत.

In reply to by प्रसाद गोडबोले

कोणी केल्या बौध्द भिक्कुंच्या कत्तली ? आणि कोणी कोणावर लादली हिंदु ही ओळख ?? राजाचे नाव ,पार्श्वभुमी, कालखंड वगैरे सांगता का जरा ?
चालुक्य आणि गौड दोघेही बौध्ह धर्माचे द्वेष्टे होते, त्या काळात अनेक स्तूप पाडले गेले आणि त्याजागी शिव मंदिरे उभारली गेली . गौड राजा शशांक याच्या काळात तर प्रचंड प्रमाणात नासधूस झाली आणि बौद्ध धर्मप्रसारका चे डोके कापून आणणार्यास १०० सुवर्णमुद्रांचे बक्षीस जाहीर केले गेले.

In reply to by मालोजीराव

आज बहुतेक मुस्लिम राष्ट्रात इतर धर्मीय नाहीसे झालेत (असे आमचे गुरुजी हमीद दलवाई म्हणतात) याउलट हिंदुस्थानात इतर धर्मीय आरामात जगताना दिसतात. वढूला संभाजीमहाराजांना हाल हाल करून ठार मारण्यात आले. असंख्य तुकडे करण्यात आले. तीनशे वर्षानंतरही आज ते क्रौर्य कुणी विसरलेले नाही तिथे महाराजांच्या बलिदानाच्या स्मरणदिनाला काही हजार हिंदू जनता उपस्थित असताना आणि औरंग्याविषयी, त्याच्या धर्माविषयी तिखट भाषणे होत असताना बाहेर एखादा मुस्लिम विक्रेता आरामात आपला धंदा करु शकतो. धिस इज दि ब्युटी ऑफ हिंदू धर्म सहनशक्ती पराकोटीची आहे. कधी ती स्ट्रेंथ आहे कधी वीकनेस आहे. सव्वीसशे वर्षे सतत आक्रमणे होत असूनही हा देश आणि धर्म टिकला कसा याचा विचार करा. वाटते तेवढी ही छोटी गोष्ट नाही. गांभीर्याने विचार करण्याजोगी गोष्ट आहे वरवर आक्रमक दिसत नसला तरी अनेक गोष्टी सहज पचविण्याची याच्यात ताकद आहे.

In reply to by अवतार

अवतार तुमचा काहीतरी गोंधळ होतोय >इतरांचे धर्मांतर करण्यासाठी मुळात आपली स्वत:ची धार्मिक ओळख आक्रमकांच्या मनात सुस्पष्ट असावी लागते > कालांतराने ज्यांच्यावर "हिंदू" ही ओळख लादली गेली स्वतःची ओळख नसताना ती इतरांवर लादता कशी येइल

In reply to by आशु जोग

ते एकदा म्हणत्तात हिंदु धर्माची स्वतःची अशी ओळखच नाही अन नंतर म्हणतात हिंदुनीही अत्याचार केलेच ... सगळाच घोळ . जाऊ द्या . सोडुन देवु . सर्वच जगाचा इतिहास कत्तली, लुटालूट, अत्याचार, धर्मांधता असल्या गोष्टींनी भरलेला आहे. कोणत्याही एका जातीला, पंथाला किंवा धर्माला त्यातून हात झटकता येणार नाहीत. हिंदु धर्माच्या प्रोअ‍ॅक्टीव्ह हिंसेचे उदाहरण न देता आल्याने , हिंदु धर्माच्या वतीने किमान मी तरी हात झटकुन घेत आहे >>> ज्द्ग्फेव्ज्फव्म्फेव्,व्द्न्व्व्न्व्फ्द्ग्ज्;चिव्ह्निच्घ्ल्द्क्फ्पिचि इओह्ग्विउच्न्फ्ग्ज्फ्ह्ग्र्जोज्त ह्फ्देच्ज्फ्क्ष्हुच्म्;ज्फ्च्म्ध्चोउव्क्ग्ल्चिम्व्च =))

http://dc177.4shared.com/img/800134280/a7fe624c/dlink__2Fdownload_2FuBx_5FrYKy_3Ftsid_3D20130316-73927-34f28990/preview.mp3 हा पोवाडा लेखकाने ऐकावा अशी माझी ईच्छा आहे

सर्वांनी न चुकता बघावे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

पण एक सुचना. गरळ ओकायला महाराजांचे प्यादे बनवु नका.

In reply to by चिंतामणी

नंदू माधव नावाचे अतिशय प्रतिभावान कलाकार या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. ते आपले आडनाव काही कारणाने लपवतात पण अशा नाटकामुळे त्यांच्याबाबत काही अंदाज बांधता येतात

सगळे बादशहा एवढे छान होते तर शिवाजी महाराजांना नेमके काय काम शिल्लक होते ? आणि मग महाराणा प्रताप, गुरु गोविन्दसिंग यांचे नेमके योगदान काय ?

In reply to by आशु जोग

असं कसं ? काही वाह्यात हिंदूंना वठणीवर आणण्याच काम त्यांनी केलं ना ! थांबा जरा नवा इतिहास लवकरच सर्व बाबींवर प्रकाश टाकेल ;)

तांगडेचे आधीचे नाटक पाहीले तेव्हा वाटले हा चळवळीतला माणूस आहे. काही चांगला विचार लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या नाटकात सुरुवात छान होते पण नंतर मात्र २०१४ च्या निवडणूकीच्या मतांची जुळणी सुरू आहे असा संशय येऊ लागतो कुठलीतरी अर्धवट माहितीवर आधारीत निष्कर्ष पात्रांच्या तोंडी आहेत. शिवाजीमहाराजांच्या नावाचा जातीय राजकारणासाठी वापर करणारे लोक संभाजी महाराजांच्या हत्येपाशी आल्यावर क्लीन बोल्ड होतात.

In reply to by आशु जोग

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18409907.cms

महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ विचारवंत श्री .... यांचेही उद्बोधक विचार खालील लिंकवर पहावेत https://www.youtube.com/watch?v=e6jeCn1pbNM आणि आपली मते कळवावीत

त्याचं काय आहे ना. कि ब्राम्हणांवर टिका करण्याइतकी सोप्पी गोष्ट नाही. गेल्या अनेक वर्षांपासुन टिका सुरु आहे. काय मिळालं ? ब्राम्हणांनी आपली वाटचाल अशीच चालु ठेवली आणि बौद्धिक क्षेत्रात व्यवस्थित स्थान मिळवले. कुळकायद्यात ब्राम्हणांच्या जमिनी गेल्या, गांधीहत्येत घरे जाळली, अनेक ब्राम्हणांना मरेपर्यंत बेदम मारलं (आमच्या ओळखीतल्यांना एकांना डोक्यावर इतकं मारलं की ते वेडे झाले आणि तसेच काही वर्षांनी वारले) पण पुर्वी रामदास काकांनी एका ठिकाणी म्हणाल्याप्रमाणे जे कुळ कायद्यात गमावलं ते सिलिकॉन व्हॅलीने परत मिळवुन दिलं. एव्हरी ब्लडी डॉग हॅज हिज डे. ब्राम्हणांवर कितीही टिका केली तरी आम्हाला आधीही फरक पडत नव्हता, आताही पडत नाही, पुढे पडेल असं वाटतही नाही. एके ठिकाणी वाचलं होतं (बहुदा मिपावरच) की कै. श्रीकांत जिचकरांना विचारलं होतं की ब्राम्हण अत्याचार करतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? तेव्हा ते म्हणाले होते की गावात या आणि बघा की अत्याचार कोण करत ? ब्राम्हण का बाकीचे उच्चवर्णीय ? पण त्यांच्यावर टिका केली की त्यांचे गुंड नाटकात काम करणा-या चोपुन काढतील. त्यापेक्षा ब्राम्हणांवर टिका केली की विचारवंत म्हणुन कौतुक होते, बाकीचे पण टिका करायला पुढे येतात, म्हणुन हे सर्व चालतं. वर म्हणाल्याप्रमाणे अशी कितीही नाटकं आली तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. हा प्रतिसाद पण दिला नसता, पण ह्या लेखाला मिपावर इतके प्रतिसाद मिळाले ते पाहुन नवल वाटलं.

In reply to by अमोल खरे

आता मला कळलं की इतकी वर्षं होऊन हा प्रकार कसा चालू आहे. अजूनही असा विचार करणारे ब्राम्हण आहेत आणि ते तसं वागून दाखवतात म्हणून या सर्व ब्रिगेडी आणि तत्सम मंडळींचं फावतं किंवा त्यांना कोलीत मिळत राहतं. फक्त एका मुद्द्याशी असहमत नाही -- "बाकीचे उच्चवर्णीय ? पण त्यांच्यावर टिका केली की त्यांचे गुंड नाटकात काम करणा-या चोपुन काढतील. त्यापेक्षा ब्राम्हणांवर टिका केली की विचारवंत म्हणुन कौतुक होते"

In reply to by मैत्र

अजूनही असा विचार करणारे ब्राम्हण आहेत आणि ते तसं वागून दाखवतात म्हणून या सर्व ब्रिगेडी आणि तत्सम मंडळींचं फावतं किंवा त्यांना कोलीत मिळत राहतं.
असा विचार म्हणजे नक्की कसा आणि तसे वागतात म्हणजे नक्की कसे वागतात ते जर एकदा विशद करून सांगता का?? अमोल च्या प्रतिसादात नक्की काय खटकले ते सांगितलेत तर उपकार होतील साहेब.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यावर पूर्वी दुसर्‍या एका लेखात चर्चा झाली होती त्याची आठवण आली. मिपावर सध्या शोध घेता येत नाहीये म्हणून दुवा देऊ शकत नाही. "कि ब्राम्हणांवर टिका करण्याइतकी सोप्पी गोष्ट नाही. गेल्या अनेक वर्षांपासुन टिका सुरु आहे. काय मिळालं ? ब्राम्हणांनी आपली वाटचाल अशीच चालु ठेवली आणि बौद्धिक क्षेत्रात व्यवस्थित स्थान मिळवले. " "ब्राम्हणांवर कितीही टिका केली तरी आम्हाला आधीही फरक पडत नव्हता, आताही पडत नाही, पुढे पडेल असं वाटतही नाही. " या मागचा विचार / वृत्ती काय दिसते मेहेंदळे साहेब. वरवर सहज दिसणार्‍या या वाक्यांमागे मला तरी ब्राम्हण असल्याची आढ्यता दिसते. असा विचार असला तर तो वागण्यात येतो आणि समोरच्यालाही समजतं ते वर्तन. मग अशी आढ्यता दाखवणारे ब्राम्हण आणि बिनडोकपणे सरसकट ब्राम्हणद्वेष करणारे ब्रिगेडी यात फरक तो काय?

In reply to by मैत्र

मैत्र यांचे म्हणणे पटले त्यांचे खोटे आरोप कुणीही आपल्या वर्तनाने खरे करून दाखवू नयेत. कुणीही आपल्या हाताने दुसर्‍यांना कोलीत देऊ नये.

नाटकाच्या शेवटी पाशा, मिलिंद कांबळे, गरीबदास हे एकत्र येतात. पण ही सहज घडणारी घटना न वाटता केवळ मतांची बेरीज वाटते. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, औरंगझेब यांची भलामण कशासाठी तर त्यांच्या अनुयायांच्या मतांसाठी. फुले, आंबेडकर यांच्याबद्दल प्रेम नसून त्यांच्या अनुयायांच्या मतांमधे रस आहे

गर सिवाजी न होते तो ..... हे … कविराज भूषण यांनी जे म्हटले आहे त्यात कितपत तथ्य आहे.