Skip to main content

अनुत्पादक काम

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 14/01/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी डिसेंबर १९८८ साली ओखा येथे नौदलाच्या आय एन एस द्वारका या स्थावर तळ (BASE) वर डॉक्टर म्हणून गेलो होता. त्यावेळी ओख्याला रेल्वे व नौदल सोडून काहीच नव्हते.नौदलाच्या मेस मध्ये राहत होतो. तेथे पाणी पूर्ण खारट होते.(मचूळ नव्हे अलिबाग नागाव रेवदंडा इथे मिळते तसे मचूळ नव्हे ). चहा किंवा कॉफी सुद्धा खारट होत असे. पहिले १० दिवस मी शीत पेयांवर काढली.(नमकीन चहा हा तिबेट किंवा लडाख मध्ये मिळतो ज्यात याकचे लोणी घालतात). अजून मी चहा कॉफी शिवाय काढू शकतो पण प्यायचे पाणी खारट म्हणजे फारच त्रासदायक.असो. तेथे माझा दवाखाना परेड मैदानाच्या बाजूलाच होता.एके दिवशी दुपारी जेंव्हा मी दुपारी जेवणानंतर दवाखान्याच्या बाहेर आलो तेंव्हा एक सैनिक रायफल डोक्यावर धरून परेड करताना दिसला थोड्यावेळाने ते दोघे विश्रांतीसाठी माझ्या दवाखान्याच्या सावलीत आले. त्याच्यावर देखरेख करणाऱ्या दुसर्या सैनिकाला मी विचारले कि हे केंव्हा पासून चालू आहे. तो म्हणाला साहेब याला ७ दिवस झाले.मी त्या दुसर्या सैनिकास विचारले कि याला का शिक्षा झाली आहे?.तेंवा तो म्हणाला कि साहेब हा विनासुट्टी गैरहजर राहिला.( absent without leave). शिक्षा झालेल्या सैनिकाचे नाव पहिले तर चव्हाण (किंवा मालुसरे, मला नीट आठवत नाही )दिसले.मी त्या दुसर्या सैनिकास जायला सांगितले आणि चव्हाण बरोबर बोलण्यास सुरवात केली.एक गोष्ट माल खटकली होती कि ४०-४५ वयाचा सैनिक सुट्टी न घेत गैरहजर राहतो. हि गोष्ट साधी सोपी नाही. मी नौदलात मानसोपचार तज्ञा बरोबर काम केले असल्यामुळे अशा गोष्टींचा पाठपुरावा करण्याची मला सवय आहे. चव्हाण यांना मी विचारले कि एवढी नोकरी झाल्यावर आपण असे का केले?त्यावर चव्हाण यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी सांगितले कि ते या वर्षाची उरलेली १ महीना सुट्टी घेऊन सांगली जवळ गावाला गेले होते. शेवटच्या पंधरा दिवसात त्यांची १७ वर्षाची मुलगी कावीळीने आजारी पडली. शेवटी तिला मिरजच्या सरकारी (वानलेस)रुग्णालयात दाखल केले.दुर्दैवाने सुटीच्या शेवटच्या दिवशी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे असलेले रिझर्वेशन सोडून देण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. या गडबडीत आपल्या युनिटला कळवायला ते विसरले.१४ दिवस झाल्यानंतर ते ओख्याला आपल्या युनिट मध्ये रुजू झाले.त्या वेळेपर्यंत त्यांच्या युनिटने वाट पाहून त्यांच्या रेकॉर्ड ऑफिस ला आणि आर्मी हेंड क्वार्टर्स ला सिग्नल ने कळविले होते. त्या काळात मोबाईल नव्हते. म्हणून परत आल्यावर त्यांचे कोर्ट मार्शल झाले आणि त्यांना ४८ दिवस DQ (detention in quarters) स्थानबद्धते ची शिक्षा झाली.चव्हाण यांनी सांगितले कि त्यांना पुढे नोकरीची गरज आहे. त्यांना एक १४ वर्षांचा मुलगा आहे त्याच्या व पत्नीच्या पालन पोषणासाठी हि नोकरी त्यांना आवश्यक होते.तेंव्हा जी काही शिक्षा मिळेल ती विनातक्रार भोगून ते नोकरी करणार होते. मी चव्हाण यांना जाण्यास सांगितले.आणि त्यांच्या कंपनी कमांडर (एक्झिक्युटिव ऑफिसर EXO ) शी बोललो.EXO कमांडर दास हे अत्यंत सज्जन गृहस्थ होते.ते म्हणाले डॉक्टर सर्वत्र सिग्नल पाठवल्यामुळे आम्हाला चव्हाण यांच्यावर कारवाई करणे भागच होते. त्यांची परिस्थिती कितीही सत्य आणि कटू असली तरी प्राप्त परिस्थितीत मला सर्वात कमीत कमी देत येण्यासारखी शिक्षा मी त्यांना दिली आहे.त्यांना ४८ दिवस स्थानबद्धता आहे आणि रोज २ तास सक्त मजुरी.एवढी शिक्षा दिल्यावर त्यांची नोकरी चालू राहील आणि नोकरीत खंड सुद्धा पडणार नाही.हे १४ दिवस सुद्धा त्यांच्या पुढील वर्षाच्या राजेतून कापून जातील आणि त्याचा पूर्ण पगार सुद्धा त्यांना मिळेल.या पेक्षा कमी शिक्षा देणे अशक्य आहे.मी कमांडर दास यांना विचारले कि सक्त मजुरी हि फक्त रायफल ड्रिल च आहे का? ते म्हणाले जरूर नाही. यावर मी त्यांना विचारले मी जर चव्हाणांना दुसरे काम दिले तर चालेल का? डॉक्टर असण्याचा हा गैरफायदा घेणे होते हे माहित असून मी हे प्रश्न मुद्दाम विचारला होता. त्यांनी सांगितले डॉक्टर चव्हाण यांच्याकडून काम करून घेणे हे जबाबदारी मी तुमच्यावर सोपवितो. आणि माझा एक सैनिक त्यावर सुपर व्हिजन करतो त्याला पण मी काढून घेतो. दुसर्या दिवशी चव्हाण परत परेड मैदानावर आले असताना मी त्यांना म्हणालो कि मी कमांडर दास यांची परवानगी घेतली आहे आणि तुमचे रायफल ड्रिल माफ झाले आहे.त्या ऐवजी तुम्ही रोज २ तास दवाखान्यासमोर बागकाम करायचे आहे.मी तुमच्यावर लक्ष ठेवणार नाही. तुमच्या मुलीच्या आठवणीसाठी तुम्हाला जमेल तशी तुम्ही इथे बाग तयार करा.पुढचे ३० दिवस त्यांनी कोणताही आळशी पण न करता काम करून एक फार सुंदर अशी बाग दवाखान्याच्या दर्शनी भागात तयार केली. त्यानंतर मी ओखा सोडून परत मुंबईला आलो. आज ती बाग आहे कि नाही हे मला माहित नाही, पण एका बापाचे दुख समजून घेऊन त्याचा विधायक कार्यात उपयोग करु शकलो असे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7239
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

अनुभव मनाला भिडला.. तुमच्यासारखे लोक लिहीते झाले तर मराठी साहित्य समृद्ध होईल. असच चालू राहु द्या. आवडतय वाचायला..

हे काम अनुत्पादक? खरे अहो त्या दु:खाने तापलेल्या मनावर शिक्षेच्या ज्या डागण्या उठत होत्या त्या वर सहानुभुतीच जल शिंपल तुम्ही. तुमचे सारेच अनुभव अगदी मनावर कोरले जाताहेत.

In reply to by स्पंदना

+१. कुणाच्या दु:खावर इतका विधायक उपचार करण्याचं सुचावं, हेच किती दुर्मीळ आहे!

In reply to by स्पंदना

रायफल डोक्यावर घेऊन दोन तास उन्हात धावणे हे तसे अनुत्पादक काम आहे पण त्याचा पण काही हेतू असतो. सर्व जवानांसाठी तो एक संदेश असतो कि शिस्तभंग हा खपवून घेतला जाणार नाही. परंतु यावेळी परिस्थिती जर वेगळी होती. कमांडर दासना स्वतः ला पटत नसूनही चव्हाणांना शिक्षा द्यावी लागत होती त्यामुळेच त्यांनी मला अशी परवानगी दिली. गणवेशात माणसाचे माणूसपण सरते हे अर्धसत्य आहे. अशी कितीतरी हतबल "माणसे " मी माझ्या २३ वर्षात पहिली आहेत.कमांडर दास ना सलाम.मुलीच्या आठवणीत बाग तयार करणे हि एक दुख्खाला वाचा फोडणारी बाब होती.ते काम नक्कीच अनुत्पादक नाही.

In reply to by स्पंदना

रायफल डोक्यावर घेऊन दोन तास उन्हात धावणे हे तसे अनुत्पादक काम आहे पण त्याचा पण काही हेतू असतो. सर्व जवानांसाठी तो एक संदेश असतो कि शिस्तभंग हा खपवून घेतला जाणार नाही. परंतु यावेळी परिस्थिती जर वेगळी होती. कमांडर दासना स्वतः ला पटत नसूनही चव्हाणांना शिक्षा द्यावी लागत होती त्यामुळेच त्यांनी मला अशी परवानगी दिली. गणवेशात माणसाचे माणूसपण सरते हे अर्धसत्य आहे. अशी कितीतरी हतबल "माणसे " मी माझ्या २३ वर्षात पहिली आहेत.कमांडर दास ना सलाम.मुलीच्या आठवणीत बाग तयार करणे हि एक दुख्खाला वाचा फोडणारी बाब होती.ते काम नक्कीच अनुत्पादक नाही.

खरे साहेब, आगे बढो, आपले लेख खरोखरच उत्कृष्ट आहेत. आणखी अनुभवांची वाट पाहतो आहे.

तूमचा अनुभव मनाला भिडला तुमच्या रुपात त्याला देवच भेटला तो आजूबाजूला असतोच आपण त्याची दखल घेयची असते अनिल आपटे

In reply to by अनिल आपटे

असेच म्हणतो. देव आहे कि नाही अशा वांझोट्या चर्चा करण्यापेक्षा , अशी कृती करणे केंव्हाही उत्तम

In reply to by स्पा

+२

In reply to by अनिल आपटे

तुमच्या रुपात त्याला देवच भेटला तो आजूबाजूला असतोच आपण त्याची दखल घेयची असते
प्रत्येक सत्कार्याचा संबंध देवाशी लावलाच पाहिजे का? एक 'माणूस' दुसर्‍या माणसाला मदत करू शकत नाहीच का?

आर्मीतले लोक कडक शिस्तीचे का असतात त्याचा अंदाज आला. अजून अनुभव वाचायला आवडतील.

In reply to by सुधीर

काही वेळा असं वाटतं की ब्रिटिशांचे गुलामगिरीचे नियम आपण स्वातंत्र्यानंतरही विसरलो नाही. केवळ आर्मी किंवा नेव्हीतच नव्हे तर बऱ्याच सरकारी नोकऱ्यांमध्ये हा विनापरवानगी अनुपस्थितीचा नियम विनाकारण कडक आहे. योग्य व पटण्यासारखे कारण असूनही रुजू झाल्यानंतर त्याची नोंद घेण्याची तरतूद नाही. हे सगळे फार खेदकारक आहे. माणुसकीला मारक आहे.

In reply to by सस्नेह

येथे ब्रिटिशांचा काही संबंध नाही. इतके कडक नियम नसतील तर युद्धात सगळीकडेच 'खरोखरची कारणे' तयार होऊन लोक सुट्या मागतील किंवा सुट्टीवर गेलेले युद्धासाठी रीकॉल केले तर कारणे सांगतील. रीकॉल करण्यासाठी युद्धच व्हायला पाहीजे असे नाही. युद्धजन्य परीस्थिती किंवा कमांडींग ऑफिसरला वाटले अशी परीस्थिती असेल तर तो सुद्धा रीकॉल करु शकतो. ह्यालाच आर्मी अॅक्ट म्हणतात. ह्याच्यात काही माणुसकी येत नाही. ते काम आहे.

आपल्या हातुन इतर काही अनुत्पादन झाले असेल तर ते ही टंका, नक्कीच वाचायला आवडेल...!

मला असं वाटतं की ,खरे यांना बागकामाला अनुत्पादक म्हणायचं नसावं. ते रोज रायफल डोक्यावर घेऊन परेड करणं, हे अनुत्पादक ठरेल. त्यांनी माणुसकीला जागून जे काम दिले ते त्या सैनिकाने मनापासून केले. ते अनुत्पादक असूच शकत नाही. खरे साहेब, मिपावर स्वागत आणि असेच अनेक अनुभव येऊ द्यात तुमच्या लेखणीतून!

हे खरे व्यवस्थापन. असे प्रसंग वाचून माणुसकीवरची श्रद्धा बळकट होते.

खूपच आवडले लिखाण. साधे सरळ आत्मियतापूर्ण निवेदन. 'अनुत्पादक' कामातून तुम्ही सृजनशीलतेने त्याला दुसर्‍या एका सृजनशील उपक्रमाला लावलेत, हे फारच भावले. बंदुक डोक्यावर ठेऊन धावताना त्याला चीड, हताशा, संताप, नाइलाज, अश्या भावनांना सामोरे जावे लागत असणार, याउलट बागकाम करताना शांति, सौंदर्य, निसर्गप्रेम, सृजनशीलता, कृतकृत्यता इ. ची अनुभूति येत असेल. ही मोठी क्रांतीच म्हणावी लागेल, आणि त्याचा परिणाम निश्चितच संबंधित लोकांच्या जीवनात घडून आला असेल. आणखी लिहित रहावे.

लिखाण आवडले. सैनिकातल्या माणसाचे अनुभव वाचायला आवडताहेत.

अशा वेळेला काय काम द्यायचे ते कमांडींग ऑफिसरच्या मनावर असते. हल्ली ब-याच ठिकाणी आपण लिहिले तसे अनुत्पादक काम होत नाही. पण काही वेळेला त्याला गत्यंतर नसते.

नागरी प्रोसेसप्रमाणे, सैन्यातील नियमच नव्हे तर बर्‍याचशा प्रोसिजर्स अजूनही ब्रिटिशकालीन आहेत असे ऐकून होतो. त्याचा प्रत्यय अशा लेखनातून येत असतोच. बाकी दु:खावर घातलेली हळुवार फुंकर आवडली

हे वेगळे अनुभव वाचायला नक्कीच आवडत आहेत धन्यवाद चेतन

त्या हतबल सैनिकाची शिक्षा अश्या प्रकारे कमी करण्याचे आपले काम स्तुत्य होते !

In reply to by मालोजीराव

अगदी असेच म्हणतो. नियमित लिहीत रहा.