Skip to main content

काय या पुणेकरांचे कौतुक !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 10/12/2012 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक. यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक. म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल. कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात. पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो. दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो आणि बातमीचे हेडींग अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते. दुसर्‍या दिवशी फोटो आणि बातमी. पुणेकरांना पावसाने झोडपले. कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी. बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले. थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात. अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्‍या पुणेकरांचे फोटो. यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते. पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले. फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी ! थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते, बातमी - पुण्यातील थंडी गायब कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही. बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच अशा जरा उकडणार्‍या दिवसात हलकी पावसाची सर येते. तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो. बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा ! उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी पुणेकर उकाड्याने हैराण कधी जरा हीच बातमी बदलून - रसाच्या गुर्‍हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत. बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा ! कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो. अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.' हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते. रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते. पाणीटंचाईची बातमी असेल तर ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात. मग त्या महोत्सवाचा फोटो. हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध ! असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 48656
प्रतिक्रिया 192

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

प्रत्येक इमारतीच्या पार्कींगमधे एक तरी MH 31 वाली गाडी असतेच आजकाल विदर्भवासी वाढलेत पुण्यात. बाकी ... चालू द्या

In reply to by नर्मदेतला गोटा

पुणं खरं तर पश्चिम महाराष्ट्राचीच राजधानी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांनी अनुक्रमे नागपूर आणि औरंगाबादला जायला काय हरकत आहे? पण नाही. तिथे वेगळा विदर्भ पाहिजे म्हणून पेटवापेटवी करतात आणि पुण्यात येवून इथले फ्लॅट महाग करतात. वर आणि 'जावून र्‍ह्यायलो' सारखी अशुद्ध भाषा वापरतात. यातले बरेच जण रिटायर्ड सरकारी नोकर आहेत. तुमच्या आमच्या आजूबाजूला रहाणारे या लोकांनी घेतलेले फ्लॅट खरं तर तिथल्या जनतेला भ्रष्टाचारानं नाडून इथं पुण्यात इन्व्हेस्ट करून घेतले आहेत. शिवाय इथं येवून हेच लोक पुणेकरांवर टीका करतात.

In reply to by मृत्युन्जय

शी बाबा, काय तुम्ही पण लॉजिकल उत्तर देऊन टाकले. असे नाही, काहीतरी खरमरीत किंवा अपमानास्पद किंवा टोकाचे लिहा ना. मग भांडता येईल. धागा मस्त द्विशतकी होतो की नाही बघा ;-) अवांतर :- मुद्दा पटला आहे. मुळात हे मान्य होते पण म्हटले आयती आग लावायची संधी का सोडा ? अतिअवांतर :- पुणे मला स्वतःला मनापासून आवडते. म्हणून तर तिथे यायची संधी मिळाली की सोडत नाही. अतिअतिअवांतर :- हे लिहूनही पुढील वेळेस जालीय पुणेकर असेच पेटतील हे माहित असल्याने लिहायला काहीही हरकत नाही :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे काका, पुण्यात लोकं येतात कारण पुणं त्यांना पोटापाण्याच्या उद्योगा बरोबर सुसह्य जगणं सुद्धा देतं. उद्योगधंदे,शिक्षण, वाहतुक आणि दळणवळण,सुरक्षा यांचा विचार ़ केला तर इतर शहरांपेक्षा पुणं कितीतरी सरस आहे.. एक metro शहर म्हणून मिरवत असताना सोबत आपली संस्कृती जपणारं दुसरं शहर मला दाखवून द्या... तुम्ही म्हणताय तशी नाईलाजानं आलेली लोकं ही पुण्यात आहेत.. आणि पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच ! मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!

In reply to by आनन्दिता

अभ्यास वाढवा!!!! पुणे तर अजून धड मेट्रो सिटीपण नैये. जिथे मेट्रो प्रकल्प आहे ते किंवा लोकसंख्या या कुठल्याच निकषावर पुणे मेट्रो नै. मेट्रो शहर असूनही आपली संस्कृती हिरिरीने जपण्यात चेन्नै, कोलकाता यांना विसरलात वाट्टं. पुण्याची जी भौतिक संपन्नता आहे, ती बाहेरून आलेल्या उद्योगधंद्यांमुळेच. नैतर पेन्शनरांचे शहर म्हणूनच पुणे माहिती होते. बाकी वाहतूक आणि दळणवळणाबद्दल काय बोलावे तितके कमीच आहे. इतक्या मोठ्या संख्येने दुचाक्या अन्य कुठल्याही मोठ्या शहरात नाहीत-कारण पब्लिक ट्रान्स्पोर्टचा पूर्ण बोर्‍या वाजलेला आहे. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली, मुंबै, कोलकाता, चेन्नै, बंगळूरू वैग्रेंच्या तुलनेत हाही दिमाख टिकत नै. इतर शहरांपेक्षा म्हणजे सांगली कोल्हापूर वैग्रे म्हणालात तर ठीके, पण त्यापलीकडे जाऊ नका :)
आणि पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच ! मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!
बाहेरून आलेल्या उद्योगधंद्यांमुळेच पुण्याचा विकास झालाय हे सत्य नाकारता येतच नै. एक सांस्कृतिक ओळख वगळली तर हे अतिमहत्वाचे भौतिक अंग बाहेरच्यांमुळेच विकसित झालेय . दुरवस्था म्हंजे नक्की काय म्हणायचेय? कैच्याकै बिनबुडाचे अंधाभिमानी लॉजिक आहे झालं. आणि पुण्यात राहून पुण्यावर टीका करू नये वैग्रे बोलणार्‍यांना हे कळत नाही का, पुणे महाराष्ट्रात आणि भारतात येते. एक भारतीय म्हणून मला माझ्या देशातल्या कुठल्याही भागाबद्दल टीका करायचा अधिकार आहे, नैतिथे बाह्या सरसावणारे तुम्ही कवण???

In reply to by बॅटमॅन

पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच ! मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!
आणि पुण्यातली लोकं अमेरिकेत जाउन उलथल्यानंतर या लोकांना आयतच रान मिळालं. :)

In reply to by दादा कोंडके

आणि सुव्यवस्था म्हणजे तुम्हाला कुठल्या काळातली अभिप्रेत आहे हो? सुवर्णनांगराच्या आधीची का फार नंतरच्या रमण्याची? पेठातल्या हौदावरची की लष्करातल्या साह्यबाची? पेन्शनरांच्या गावातली की प्लॉटींगच्या आत्ताच्या पैशातली? म्हणजे ठरवता तरी येईल सुव्यवस्था कोणी केल्या अन दुरवस्था कुणामुळे झाली ते.

In reply to by दादा कोंडके

कोंडके दादा... हा टोला मात्र जोरात लागला बरका आम्हाला... आम्ही इथे अमेरिकेत उलथलोय हे खरंच आहे....कधी एकदा पुण्यात परततोय असं झालंय बघा,,

In reply to by आनन्दिता

एकदम सहमत आनन्दिता . पण आपण पुण्यात परत जाईपर्यंत पुण्याची कितपत वाट लागली किंवा लावली असेल यालोकांनी .. याची कल्पनाहि करवत नाहि . तरिहि पुण्यावर अत्यंत प्रेम आहे हे बाकि तितकच कठोर सत्य आहे .

In reply to by बॅटमॅन

टाळ्या, अगदी मनापासून टाळ्या बॅट्या. आयला आमच्या गावात आम्ही नुसते महाराष्ट्रातलेच नव्हे तर शेजारील राज्यातले पण सामावून घेतले. त्यांची संस्कॄती आमची संस्कृती असले झेंडे नाचविण्यापे़क्षा त्यांच्या मानाच्या काठया रोवल्या. आज जी संस्कृती संस्कृती म्हणतो ती अशीच मेल्टिंग पॉट्प्रमाणे बनत असते. स्वतःचे वेगळेच अस्तित्व राखणे कदाचित आज अभिमानास्पद वाटत असेल. ते नंतर हास्यास्पद (सध्यापण) आणि शेवटी टाकून देणे नाहीतर विरघळून जाणे एवढेच शिल्लक राहील.

In reply to by अभ्या..

+१११११. एक नंबर रे नसलेला अभिजीत. सोलापूर, मिरज, इ. ठिकाणी मराठी आणि कन्नड दोन्ही संस्कृती तितक्याच दिमाखाने आहेत. कॉस्मॉपॉलिटनिझमचे प्राथमिक शिक्षण असेच मिळत जाते. याबद्दल सीमाभागाचा नाद नै करायचा :)

In reply to by बॅटमॅन

असणारंच ना. कारणी ही गावं महाराष्ट्रातली आहेत. बेळगावातल्या मराठी गळचेपी बद्दल आपलं काय मत आहे? कर्नाटकातलं एक गाव दाखवा जिथे मराठी माणसं आहेत आणि गळचेपी होत नाही असं? उगीच कॉस्मॉपॉलिटनिझम आणि मेल्टींग पॉट वगैरे घफ्फा ठीक आहेत पण तिथल्या मराठी माणसांना जो त्रास होतोय त्यांना जरा हे पटवून द्या बरं! - (महाराष्ट्राने कर्नाटकची नाकेबंदी करायला हवी असं मत असलेला) का.प.

In reply to by बॅटमॅन

नैतिथे बाह्या सरसावणारे तुम्ही कवण???
प्रतिसादामधे वापरलेल्या शब्दांच्या तीव्रतेवरुन "नैतिथे बाह्या सरसावणार " कोण आहे हे कोणीहि सांगेल,,, चैनै प्रमाणे इतर भाषांचा अन प्रांताचा कमालीचा द्वेष ़ करणे म्हणजे संस्कृती हिरिरीने जपणे हे आम्ही मानत नाही
एक भारतीय म्हणून मला माझ्या देशातल्या कुठल्याही भागाबद्दल टीका करायचा अधिकार आहे?
आमचा अभ्यास कमी आहे एकदम्म मान्य. पण भारतीय असुन भारतातल्याच भागांना नावं ठेवणं हा आम्ही आमचा अधिकार वैग्रे मानत नाही.. त्यापेक्षा त्यांचा अभिमान बाळगणं आणि कौतुक करणं हे आम्ही आमच कर्तव्य म्हणुन prefer करु बाकी तुमचं चालुद्या ... ...

In reply to by आनन्दिता

पुण्याबद्दल चकार शब्द कुणी काढला की उसळणारे कोण, तेही बघावे, म्हणजे कळून येईल. आणि उगीच नावं ठेवणं हा अधिकार नाही, तर जे आहे ते बोलणे आणि अवास्तव डिफेन्सिव्हपणाला प्रत्त्युत्तर देणे हा अधिकार आहे. पुण्यात बर्‍याच गोष्टी उत्तम आहेत-कोण नाही म्हणतो? हवामान उत्तम आहे, सर्व तर्‍हेच्या खाण्यापिण्याची चंगळ आहे, शिवाय ऐटी, मॅन्युफॅक्चरिंग, इ.इ.क्षेत्रांत बरेच जॉब्स आहेत. मुख्य म्हणजे मराठीपणाची सांस्कृतिक ओळख पक्की आणि बर्‍यापैकी जिवंत आहे, त्यामुळे मराठी लोकांना पुणे जवळचे वाटते- शिवाय मुंबै एका टोकाशी वसलीये, तिच्यापेक्षा पुणे बरेच जवळ पडते बहुसंख्य लोकांना-कोंकण सोडून जवळपास बाकीचा अख्खा महाराष्ट्र. पण म्हणून कोणी पुण्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीचे उगीच समर्थनासाठी समर्थन करत बसला, तर बाकीचे खवळणारच-त्याबद्दल उगीच डिफेन्सिव्ह होणे हा मूर्खपणा आहे. योग्य तिथे समर्थन केले तर कोण काही म्हणतं का कधी? मी स्वतः कैक उत्तर भारतीयांशी बोलताना पुण्याच्या बाजूने बोलतो, पण नैतिथे समर्थन करत नाही. इथे कुणी पुण्यावर टीका करायला सरसावून बसलेय असे नाही, पण गिरे तोभी नाक/कान इ. ऊपर, वैग्रे छापाचे कोणी बोलला तर मात्र तो वेडगळपणा आहे हे दाखवणे बरे असते. च्यायला, या असल्या धाग्यांवर बॅलन्स्ड लिहिणे लै बोअर काम तेच्यामारी. मूर्खपणाला अजून शतमूर्खपणाने उत्तर देण्यात आणि कल्ला करण्यात जी मजा आहे ती मिसतोय असे वाट्टे :P

In reply to by आनन्दिता

विमे काका
इथे छातीत एक कळ येउन गेली...
पुण्यात लोकं येतात कारण पुणं त्यांना पोटापाण्याच्या उद्योगा बरोबर सुसह्य जगणं सुद्धा देतं.
मान्य. (अर्थात काही पुणेकर अशा परप्रांतीयांचे जगणे challenging करण्यासाठी अथक प्रयत्न करीत असतात म्हणा, पण ढोबळ मानाने मुद्दा बरोबर आहे.)
उद्योगधंदे,शिक्षण, वाहतुक आणि दळणवळण,सुरक्षा यांचा विचार ़ केला तर इतर शहरांपेक्षा पुणं कितीतरी सरस आहे..
कसे काय बुवा ?? संदर्भासहित स्पष्टीकरण द्याला का?
एक metro शहर म्हणून मिरवत असताना सोबत आपली संस्कृती जपणारं दुसरं शहर मला दाखवून द्या...
मुळात वाघुळभाऊंनी लीवल्याप्रमाणे पुणे मेट्रो शहर नाही. दुसरे म्हणजे पुण्याची संस्कृती अजिबात जपली जात नाही आहे सध्या. मागील वेळेस पत्ता विचारला तर सरळ उत्तर मिळाले की हो. आणि अचूक गाईड पण केले त्याने. हे बाणेर-पाषाणवाले पण ना... शी....
तुम्ही म्हणताय तशी नाईलाजानं आलेली लोकं ही पुण्यात आहेत.. आणि पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच !
या विधानाचा आणि मृत्युंजयकाकांच्या (मीच एकटा का म्हणून काका?) विधानाचा एकमेकांना छेद दिला तर सगळ्या परप्रांतीयांमुळे पुण्याची दुरावस्था झाली आहे असे निष्पन्न होते. आणि याचा बॅटमॅनच्या विधानाशी छेद दिला तर अजूनच गोंधळ होतो. त्यामुळे जाऊ देत. बाकी, तुमचे विधान मत म्हणून मान्य करायला माझी हरकत नाही.
मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!
आणि शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे मराठी किंवा प्रेम नसणारे अमराठी येत नाहीत?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

इथे छातीत एक कळ येउन गेली...
ह्हपुवा... काका हा शब्द मी आदराने लिहीला होता..:) पण प्रत्यक्षात तो कळीचा मुद्दा झाल्याबद्दल दिलगीर आहोत.:)
मुळात वाघुळभाऊंनी लीवल्याप्रमाणे पुणे मेट्रो शहर नाही
पुणे हे metropolitant शहर च आहे मुंबई, द्दिल्ली, कोलकता, चेन्नई या चार मुख्य शहराबरोबरच बेंगलुरु, हैदराबाद,अहमदाबाद,आणि पुणे ही शहरेसुद्धा metropolitant मानली जातात. वाटल्यास विकिबाबांना विचारा . वटवाघुळ यांनाच मी हे सांगणार होते पण ते अभ्यास वैग्रे करायला सांगतात. आपल्याला भ्या वाटतं ब्वॉ!, :) कारण पूर्वीपासुनच अभ्यासाशी आमचे तितकेसे मैत्रीपूर्ण संबंध नाहीयेत!!

In reply to by आनन्दिता

आवांतर हा शब्द काळजाला भिडला. म्हणजे तुमच्याऐवजी दुसरी कोणीतरी आवा बोलतेय असे वाट्टेय =)) =))

In reply to by अभ्या..

वरील संवादनाट्यात रसपूर्ण योगदान देऊन श्रीयुत नसलेले अभिजित, सूड, काका(विमे+मृत्युंजय), आनन्दिता, ब्याट्म्यान आणि इतर यांनी हा धागा, पोहर्‍यात उतरून रोचक व रसभरीत केल्याबद्दल अति अति आभार...! a

In reply to by सस्नेह

बघ की बै स्नेहाताई कशी बोलतात तरी लोकं ...यांना यांची शहरं आवडतात ठिक आहे.. पण म्हणून यांनी पुण्याला कै च्या कै नावं का म्हणून ठेवायची...?. आम्ही आमच्या गावाचा अभिमान बाळगला तर यांना वाईट ़का वाटावं बुवा ... वरून आम्ही काही बोललो तर आमच्या अभ्यास वैग्रे सारख्या दुखर्र्या नसांवर बोटं ठेवतात... ;)

पुण्यात रहायचं आणि आयुष्यभर पुण्यालाच दात दाखवायचे किंवा पुण्यात राहून आमचे कोल्लापूरचे लोक कसे दिलदार आहेत आणि पुणेकर कसे संकुचित आहेत असे म्हणून पुण्यावर तंगडी वर करायची हे पटत नाही !

काही वर्षांपूर्वी आमच्या एका मित्राच्या मोठ्या मुलासाठी वधुसंशोधन करताना, आणि आता दुसर्‍या मुलासाठी व.सं. करताना, "कुठलीही मुलगी करा, पण पुण्याची चुकूनही करू नका" ('मुलगी करणे' हा 'टॅक्सी करणे' सारखा शब्द प्रयोगही पुणेकरांचाच) असा प्रेमाचा सल्ला खुद्द पुणेकर मंडळींनीच दिलेला आहे.... .... यातील मर्म पुणेकरांनीच उलगडावे, ही विनंती.

मी पुण्यात राहणे कधी पण पसंत करीन. काही तथाकथित मोठ्या शहरांच्या ह्या समस्या बघा. बंगलोर - तुफान ट्राफिक जॅम. अगदी ५ किमी जाण्यासाठी सुद्धा एक एक तास लागू शकतो. भयंकर महागाई. मौजमजा म्हणजे सिनेमा थेटर आणि मॉल. चेन्नई- बकाल आणि कलकात शहर. प्रचंड तुसडी लोक आणि भाषेबद्दलचा दुराग्रह. खाण्या-पिण्याचे हाल. अतिशय विषम हवामान. मुंबई - बकाल आणि गलिच्छ शहर. जीवाची सर्वसाधारण हमी न देऊ शकणार जीवनमान. कोलकाता - उद्योग आणि विकास कशाशी खातात हे माहित नसणार शहर. केवळ लोकसंख्या ह्या निकषावर मेट्रो बनलेले शहर दिल्ली- न बोलेलेले बर. या सर्व बाबतीत पुण्यातील स्थिती बरी आहे अस वाटते.

In reply to by बोलघेवडा

वर दिलेली सगळीच वर्णने जगातल्या बहुतांश लोकशाहीवाल्या शहरांना लागू पडतात. आणि पुणे हे शहर नाहीच मुळी. इतर लोक ज्या भागाला शहर म्हणतात, पुण्यातले लोक त्याच भागाला 'गावात जाउन येतो, गावात राहतो' वगरै म्हणतात. त्यामुळे पुणे हे एकमेवाद्वितिय गाव आहे असे म्हणायला हरकत नाही. :)

मुंबई - बकाल आणि गलिच्छ शहर. जीवाची सर्वसाधारण हमी न देऊ शकणार जीवनमान. काहि च्या काही ? पुण्याची तरफ्दारी करताना मुंबईला का नाव ठेवताय

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

या धाग्यावर सिरियस्ली लिहायचं म्हणजे कुरकुरीत पापडांवर भिजलेलं घोंगडं टाकण्यासारखं आहे.पण मुंबईची सर कशालाच नाही.मुंबई जिवंत आहे,पुणं निवांत आहे.पुण्याचा फार मोठा भाग मिलिटरी एस्टेट्सनी व्यापलाय म्हणून पुणं इतकं झोपडपट्टीमुक्त राहू शकलंय.आणि हवा हा एकच घटक पुण्याच्या फेवरमध्ये आहे,तो सुद्धा निसर्गनिर्मित.तरीसुद्धा ऐन हिवाळ्यातही लक्ष्मी रोड,कुमठेकर रोड्,मंडई,तुळशीबाग,शनिपार अशा भागांत दम कोंडतो.कधी एकदा बाहेर पडतो असं होतं.करमणुकीची साधनं नाहीत,शाळा कॉलेजिस गल्लोगल्ली खाण्याचे ढाबे,टपर्‍या,स्टॉल इ. नाहीत्,मार्केटस नाहीत.(हे सर्व मुबलक नाही असं म्हणायचं आहे.)बारीकसारीक वस्तू हवी असेल तर थेट तुळशीबागेत जा म्हणून सांगतात.स्ट्रँड सारखं एक पुस्तकांचं दुकान दाखवा.कीर्तीची लाय्ब्ररी,रुपारेलची लायब्ररी,दादरचे मुं.म.ग्रंथसंग्रहालय,आयडिअल्,डेविड ससून्,पारल्याचे लोकमान्य,ब्रिटिश कौन्सिल्,मॅक्स्म्यूलर्,भुलेश्वर-काळ्बादेवीची हिन्दी गुजराती ग्रंथदुकाने,जुहूची भली मोठी कीर्तनशाला लाय्ब्ररी,मिठीबाई-एनेमची लायब्ररी,टाउन हॉल्,किती सांगावं?टाटा थिएटर्,नेहरू सेंटर्,पृथ्वी,भारतीय विद्याभवन्,वामन केंद्रेंनी नावारूपाला आणलेला नाट्यविभाग..आर्ट गॅलर्‍या तर अगणित आहेत्.म्यूझिअम्स्-(रेल्वे,नेवल्,बी.एन्.एच.एस),लोकवाङ्मय गृहा आणि त्यातले अड्डे,भूपेश गुप्ता भवन,बण्डूगोरे भवन,नंदादीप,अलकेश मोदी..मौज,मॅजेस्टिक,शब्दवेध,वसई,अनेक अड्डे,व्यासपीठं. पुण्यात खरी कमतरता जाणवते ती ईटरीज,करमणुकीची साधनं आणि पब्लिक ट्रान्स्पोर्टची.मुंबईत नाट्यगृहं,सिनेमा हॉल्स कितीतरी आहेत.शिवाय मुंबईत कोणी उपाशी रहात नाही,कुठल्याही गल्लीत पाच रुपयाचा वडापाव तरी मिळतोच.त्यामुळे मुंबई हे निम्नमध्यमवर्गाचं आशेचंआकांक्षेचं शहर आहे.पाचदहा रुपयात शहराच्यामोठ्या भागात बेस्टने जाता येतं.स्वतःचं वाहन नसलेला नोकरवर्ग इकडूनतिकडे जा-ये करू शकतो. रद्दीवाला,इस्त्रीवाला घरी येतो.पेपर सकाळी सहाला येतो. आणि मुंबईचे काही नवीन भाग खरोखर देखणे आहेत.चर्चगेट-फोर्ट्-कुलाबा-कफ्परेड सोडाच. पण जेव्हीपीडी,चारकोप गोराई,लोखंडवाला,मालाड-लिंक रोड,बीकेसी,गोरेगाव-दिंडोशी पवई चांगलेच आहे. शिवाय एस्सेल वर्ल्ड्,पॅगोडा,मढ-मार्वे,नॅशनल पार्क्,कान्हेरी,जिजामाता उद्यान्,विखरोळीची गोदरेज कॉलनी आणि तिथली वृक्षसंपदा.. आणि हो, सगळ्यात शेवटी समुद्र..!

In reply to by राही

जबरी प्रतिसाद. आता बाकीचे उगाच जुळवाजुळव करुन पुण्याची वाचवायचा प्रयत्न करणार.

In reply to by राही

बाकी पुण्यात करमणुकीची साधनं नाहीत, खाण्याचे ढाबे,टपर्‍या,स्टॉल इ. नाहीत्,मार्केटस नाहीत हे वाचून प्रचंड कीव आली. मला पुण्याइतकी खाण्याची चैन मुंबईत नक्कीच आढळली नाही. पुण्यातली करमणुकीची साधनं म्हणाल तर मल्टिप्लेक्सला आम्ही चालत जाऊनही दहा-पंधरा मिनीटात पोचतो. अक्षरधारा सारखं ग्रंथसंग्रहालय वाहनाने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. मुंबई म्हणताना तुम्ही कुठे राहता त्याचाही विचार करा. दादर सारख्या भागात राहत असाल तर मुंबई तुम्हाला नक्कीच चांगली वाटणार. ज्यांना उपनगरातून तासंतास प्रवास करुन मुंबईत यावं लागतं त्यांना जरा विचारा एकदा.

In reply to by सूड

खाण्यापिण्याच्या मुद्द्याबद्दल सूडपंतांशी बाडीस (आमच्या अनेक पुणे व मुंबै दोन्ही ठिकाणी राहिलेल्या मित्रांच्या फीडब्याकवरून). मार्केटबद्दल्सुद्धा प्राब्ळम नै. मेण प्राब्ळम है तो ट्रान्स्पोर्टचा. कर्मणुकीची साधनेपण चिकार हैत म्हणा तशी.

In reply to by सूड

चालत दहा मिनिटांवर मल्टिप्लेक्स हे तुम्ही कुठे रहाता त्यावर आहे.अख्ख्या पुण्यातली मल्टिप्लेक्सची संख्या कितीशी आहे? सांस्कृतिक वातावरण ,सिनेमादि करमणुकीसाठी आज मुंबईच्या प्रत्येक उपनगरात चांगल्या सोयी आहेत.अगदी मुळुंद,ठाणे(मुंबईत मानले तर.)गोरेगाव,बोरिवली,पारले,अंधेरी,डोंबिवली(हे पुन्हा मुं.मा.त.)सगळीकडे. चांगली कॉलेजिस अशीच प्रत्येक उपनगरात आहेत.विलेपारले येथील केळवणी मंडल ही तर खूप मोठी आणि देशभर नावाजलेली संस्था.फादर अ‍ॅग्नेल्,अंजुमन इस्लाम्,सेंट झविअर्स,ह्या शंभर शंभर वर्षांची परंपरा असलेल्या उत्तम संस्था.झुनझुनवाला,विवेकानंद,पाटकर,विद्यावर्धिनि ह्याही गेल्या तीसचाळीस वर्षात नावारुपाला आलेल्या संस्था.निम्न मध्यमवर्गाला परवडणार्‍या आणि स्वच्छ अश्या उडप्यांची तर मुंबईत रेलचेल आहे.या शिवाय अफोर्डिबिलिटीप्रमाणे त्या त्या स्तरावरची असंख्य हॉटेले.चाटची दुकाने.(गाड्या नव्हेत.)वडापाव तर जागोजागी.पंजाबी,चायनीझ ही भरपूर्.काँटिनेंटल (इटालिअन्,फ्रेंच),मेक्सिकन ,केरळी,गुजराती,राजस्थानी,कच्छी,चेट्टिनाड्,गोवन,मालवणी,कोल्हापुरी कश्मिरी,जे हवे ते. हां आता मिसळ,खिचडी,थालीपीठ हे मात्र सर्वत्र मिळत नाही.(त्याची मुंबईत क्रेझ ही नाही.)आणि या सर्वांसाठी (काँटिनेंटल आणि कश्मिरी सोडून)कुठे लांब जायला नको.प्रत्येक उपनगरात हे सर्व आहे.इलेक्ट्रॉनिक वस्तू,कपडे,(गार्मेंटची मोठी इंडस्ट्री मुंबईत आहे.)सेरॅमिक्स्,हार्ड्वेअर्,यासाठी शहराच्या केंद्रभागात जावे लागत नाही.मुंबईसारखा किरकोळीचा मोठा फूलबाजार तर मी महाराष्ट्रातल्या कुठल्याच मोठ्या शहरात पाहिला नाही.जिथे तिथे फ्लॉरिस्ट्स आहेत.(बूके वगैरेसाठी)इ.इ. यादी कितीतरी वाढवता येईल.मुंबई बेट असल्यामुळे विस्तारावर मर्यादा आहे,त्यामुळे रहायची जागा महाग आहे हे खरे पण आता नवी मुंबई,कोपरखैराणे,ऐरोली,घणसोली,रबाळे,येथे तुलनेने स्वस्त घरे आहेत.सध्या पुण्यातही औंध बाणेर पाषाणचे लोक नोकरीसाठी मगरपट्टा,विमाननगरला जातात आणि तिथले लोक हिंजवडीला येतात.आणखी विशेष म्हणजे मुंबईत वाहतुकीचे अनेक नवे पर्याय निर्माण झाले आहेत किंवा पाइपलाइन मध्ये आहेत.ठाणे वाशी रेल वे हा प्रमुख मानता येईल.पुण्यात या बाबतीत काही हालचाल दिसत नाही.

In reply to by राही

ते बाकी जे जे काही लिहिलय ते ठिके... पण खाण्याच्या बाबतीत पुणे मागे आहे?????????? तुम्ही पुण्यात कुठे आणि काय काय खाल्लय ताई?? यावर परा भाऊंनी राही ताईंना उत्तर द्यावे अशी मी नम्र विनंती करते.. कारण सदाशिव पेठी उत्तर फक्त "तिकडुनच" येउ शकते..

In reply to by पिलीयन रायडर

याबाबतीत पुणेरी (सदाशिव पेठी म्हणा हवं तर) उत्तर हे "आग्रह नाही आमचा पुण्यात या म्हणून असं आहे" याची कृपया नोंद घ्यावी.

मी पुणेकर कधीकाळी पुणे मुन्सीपाल्टित " मारलेल्या उंदराचा" हिशेब ठवण्याचे माझ्याकडे काम होते. तेव्हा मी अमेरिकेच्या प्रेसिडेन्टची अर्थिक धोरणे कशी चुकतात यावर भाष्य करायचो. (आभार पु.ल.) आता वयाच्या मानाने होत नाही म्हणून टिका करायची खाज मुंबै चैनै आणि बंगळुरू या विषयावर भागवितो. शिवाय अमेरिकेत सगळे "आपलेच" असल्यामुळे जास्त बोलता पण येत नाही. असो. पूर्वी सारखे पुणे राहीले नाही हेच खरे.

एका पुणे जिल्ह्यात असले वीसएक मुंबई जिल्हे सहज मावतील.. शिवाय प्रती चौरस किमीमधे राहणार्‍या रहिवाश्यांची घनता तर अबब.. अन हवेतला दमटपणा नको रे बाबा..पावसाळ्यात होणारे जीवाचे हाल (टीव्हीवर) बघवत नाहीत.. समजा ५ वर्षापुर्वी इंजिनीअरिंग पासआउट झालेला इंजिनीअर आज पुण्यात स्वतःच घर घेउ शकतो..

येवडा काथ्या कुटल्यावर मंग शेवटी काय ठरलं? पुनं चांगलं, का म्हमई? सुंब जळला तरी पीळ काई जात न्हाई मराटी मानसांचा. उद्या बाहेरच्या कुनी पैशाच्या जोरावर यांना जंगलात हाकलून दिलं तरी तितं बी येकमेकांच्या उरावर बसतील 'पुनं चांगलं का म्हमई?' आसं इच्यारत. ..बरे झाले द्येवा अडानी झालो.. न्हाईतर असते दंभेचि मेलो, आसंच आता संत तुकाराम म्हाराजांच्या अबंगाची उसनवारी करुन म्हनावंसं वाटतंय.

हो का मग एवढे मुम्बैकर आजकाल हाकून दिल्यागत पुण्यात का येताहेत. बाकी मुंबईची एक गोष्ट मात्र मानावी लागेल ते म्हणजे मुंबई विद्यापीठ आणि त्याचे रेप्युटेशन. मुंबई विद्यापीठाचा उजेड जगभर पडला आहे. सगळे कुलगुरूदेखील गुणाचे... इतकं बास आहे

In reply to by नर्मदेतला गोटा

पुणेकर बंगलोर हैदराबादला जात नाहीत का?आणि एक आय्.टी सोडले तर बाकी कित्येक क्षेत्रातले लोक वेअरहाउसिंग क्लिअरिन्ग,मीडिया,फिनॅन्स्,फॅशनवेअर्,टी.वी,सिनेमा यातले कलाकारच नव्हेत तर बॅक स्टेजची मोठी फौज मुंबईकडे धावते आहे त्याचे काय?हॉस्पिटॅलिटी,स्पेशलिटी हॉस्पिटल्स्,अणुविज्ञान,सोशल सायंसेस यातले अत्युत्तम शिक्षण आणि संधी मुंबईत आहेत.पालनपुर आणि सुरते खालोखाल हिरेउद्योग आणि व्यापार मुंबईतच आहे.अर्थात या धंद्याकडे सुसंस्कृत मराठी माणूस ढुंकूनही पहात नसल्याने पुणेकर येथे धावत सुटण्याची शक्यता नाही.

बास की आता राव.... घर विकत घेणार्‍या (एकाच) गिर्‍हाईकाचे दोन ब्रोकर चुकून समोरासमोर आल्यावर "कोणती लोकॅलिटी जास्त चांगली?" यावर चर्चा सुरू आहे असे वाटू लागले आहे आता. लायब्ररी, कीर्तनशाला, नाट्यगृहे, सिनेमा हॉल... रद्दीवाला,इस्त्रीवाला घरी येतो. पेपर सकाळी सहाला येतो. :-))

मुंबई महाराष्ट्रातच रहावी यासाठी लढणारे पुणेकर आणि बेस्टबसमधे दो गेट वे ऑफ इंडीया दे दो असं हिंदीत मराठी कंडक्टरला सांगणारे मुंबईकर. यांच्या ****** ******

In reply to by नर्मदेतला गोटा

मुंबई महाराष्ट्रातच रहावी यासाठी लढणारे पुणेकर
अभ्यास वाढवा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी काय फक्त पुणेकर होते का आँ? की अत्र्यांच्या गाड्याबरोबर नळ्याची यात्रा काढणे सुरूये??

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आंतरजालावर मुंबई व पुणे या दोन शहरांबद्दल भरपूर लेखन व चर्चा झाल्या आहेत. मराठी आंतरजालावरील सदस्यांमध्ये या शहरांचे प्रतिनिधित्व करणारे बहुसंख्य आहेत हि वस्तुस्थिती असली तरी इतर ठिकाणचेही अनेक सदस्य आहेतच. पण महाराष्ट्रातील इतर शहरांविषयी अथवा निमशहरी ठिकाणांविषयी फारसे लिहिले जात नाही त्यामुळे त्यावर लिहू शकणाऱ्या सर्वांना आग्रहाचे सांगणे आहे की त्यावर जरूर लिहा. महाराष्ट्राबाहेरील अशी ठिकाणे जेथे अनेक पिढ्यांपासून मराठी संस्कृतीची पाळेमुळे घट्ट रुजली आहे त्यावर लिहिले गेल्यास दुधात साखरच.

दिल्लीत अचानक पाउस, दिल्लीकरांची तारांबळ अशी बातमी आजच्या पेपरमधे दिसतेय. बातमीदार पुणेकर दिसतोय.

पुण्यात दुकानदारांचा बंद दुकानात काम करणार्‍या मुलांनी लक्ष्मी रोडवर चेंडूफळी खेळणे पसंत केले

Assal Puneri, sadashiv pethi Sathe ekda bapat la saangat hote .. Aho te Lele. Ahet na tyanni tyanchya navacha rubber stamp banavla ahe .. Gammat mhanje tyanni ekach 'le' banavla ahe ani donda stamp kartat .. Bapat mhanale aho hyat kaay vishesh .. te Gokhale ani Godbole ahet na tyanni fakt 'Gokha' ani 'Godbo' stamp banavla ahe; Lelencha 'le' udhar gheun jatat !!;)=

हाहाहाअहाहाहाहा टॉपिक असा आहे, की ५०० ते १००० प्रतिक्रीया निश्चित समजा !

पुण्याच्या पेप्रात पेज थ्री असे का ? आणि त्यात काय काय, कोण असते बरे ??