Skip to main content

कसाबच्या निमित्ताने......

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 22/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
चला,उशिरा का होईना,भारत सरकारला एकदाची जाग आली आणि कसाब फासावर लटकला. पण हा खरंच भारताने दहशतवाद्यांना शिकवलेला धडा म्हणावे का? एक कसाब मारायला आपल्या देशाची ४ वर्षे आणि ४० कोटी रुपये खर्ची पडले. असे अनेक कसाब तिकडे पाकिस्तानात दिवसाला १०० पैदा होत आहेत. ते सगळे जर अंदाधुंद सुटले तर ते आपल्याला कितीला पडणार आहे ? आजच पेपरात कै मेजर संदीप उन्नीकृष्णन याच्या वडिलांचे विचार वाचले. ते म्हणतात की दहशतवादी कधीच धडा वगैरे शिकत नसतात. ज्यांचा धर्मच जिहाद आहे त्याला मरणाची भीती वाटतच नसते. आपल्या सहिष्णू सरकारकडे अजून ही अफजल गुरूच्या दयेचा अर्ज प्रलंबित आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे अफजल वाचला आणि अजमल कसाब मेला? गेल्याच आठवडयात छ शि ट स्थानकात एका मित्राची वाट पाहण्यासाठी १ तास उभं राहण्याचा योग आला होता. सहज म्हणून आजूबाजूला नजर टाकली तर सुरक्षा व्यवस्थेचे नेहमी प्रमाणे तीन तेरा वाजलेले होते. स्टेशन परिसरात पोलीस औषधालाही दिसले नाहीत. २-३ होमगार्ड हातात लाठी हे "अत्याधुनिक" शस्त्र घेऊन गस्त घालीत होते. लाखो माणसे स्टेशनात ये जा करत होती. कोणाचे कोणाकडे लक्ष नव्हते. समोर दिसणारी ट्रेन आपल्याला पकडायची आहे ह्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेले लोक सैरावैरा पळत होते. मेटल डिटेक्टर जणू स्टेशनाची शोभा वाढवायला लावल्यासारखे स्तब्ध उभे होते. एखादी घटना घडल्यावर त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आपल्या सरकारचा हात कोणी धरू शकत नाही. पण मुळात कुठल्याही घटनेला आमंत्रणच का द्यायचे? पुन्हा २६/११ ची पुनरावृत्ती घडणारच नाही कशावरून? का येते एवढी शिथिलता आपल्या यंत्रणेत? आपण सतत आंतरराष्ट्रीय दबाव,अमेरिकेची दडपशाही ह्या कारणांमुळे बोटचेपेपणाचे धोरण अवलंबतो. अमेरिका आपले प्रश्न झटपट सोडवून मोकळी पण होते. ते आपल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणाच्या तोंडाकडे बघत बसत नसतात. तेवढी ताकद आपल्यात पण आहे. परवाच माझ्या वाचनात आले कि भारताने कधीही कोणत्याही देशावर स्वतःहून आक्रमण केलेले नाही. हि बाब अभिमानास्पद म्हणावी की चिंताजनक? इसापनीतीत वाचलेली एक सापाची कथा ह्याठिकाणी लागू पडते. तो साप अहिंसावादी होता म्हणून रस्त्याच्या कडेला पडून राहायचा. पण म्हणून मग हळू हळू रस्त्यावरची पोरं टोरं सुद्धा त्याची शेपूट धरून त्याला आपटू लागली.एका साधूने त्या सापाला कानमंत्र दिला की अरे असा तू मारून जाशील एक दिवस. तुला लोकांना चावायला आवडत नाही हे काबुल पण म्हणून निदान फुत्कार टाकून स्वसंरक्षण तरी करत जा म्हणजे मग तुझ्या कोणी वाटेला जाणार नाही आणि मग तुला हवे तसे आयुष्य जग. नेमका हाच धडा आपला देश का विसरतो?

वाचने 4268
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

ते सगळे जर अंदाधुंद सुटले तर ते आपल्याला कितीला पडणार आहे
ते सगळे येथे येवू न देणे गरजेचे आहे. पण आपल्या बर्‍यापैकी सडलेल्या सुरक्षा यंत्रणेमुळे ते पूर्णपणे शक्य नाही.
सहज म्हणून आजूबाजूला नजर टाकली तर सुरक्षा व्यवस्थेचे नेहमी प्रमाणे तीन तेरा वाजलेले होते
प्रॅक्टिकली अशी कायमस्वरुपी सुरक्षा देणे शक्य नाही.आज छ शि ट, उद्या दिल्ली,परवा कोलकाता, नंतर हैद्राबाद? किती ठिकाणी अशी सुऱक्षा पुरवायची ?शिवाय दहशतवादी पुढचे हल्ले लहान शहरातही करू शकतात.

कसाब कसाब कसाब कसाब ..टीव्ही वर कसाब...फेस्बुकात कसाब..पेप्रात कसाब..गप्पात कसाब.. मरावे परी चर्चा रूपे उरावे

>>आपण सतत आंतरराष्ट्रीय दबाव,अमेरिकेची दडपशाही ह्या कारणांमुळे बोटचेपेपणाचे धोरण अवलंबतो. अमेरिका आपले प्रश्न झटपट सोडवून मोकळी पण होते. ते आपल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणाच्या तोंडाकडे बघत बसत नसतात. तेवढी ताकद आपल्यात पण आहे. ही गोष्ठ माहितीच्या अधिकारात कळली आहे का? >>परवाच माझ्या वाचनात आले कि भारताने कधीही कोणत्याही देशावर स्वतःहून आक्रमण केलेले नाही. हि बाब अभिमानास्पद म्हणावी की चिंताजनक? असे सांगणारे तरी ही अभिमानाची गोष्ठ म्हणूनच सांगतात ब्वॉ

परवाच माझ्या वाचनात आले कि भारताने कधीही कोणत्याही देशावर स्वतःहून आक्रमण केलेले नाही. हि बाब अभिमानास्पद म्हणावी की चिंताजनक?
यात चिंताजनक काय ते समजले नाही. बाकी कीस काढायचाच तर तांत्रिक दृष्ट्या हे वाक्य कितपत खरे मानावे याविषयी साशंक आहे. स्वतंत्र भारताने हैद्राबाद संस्थानावर हल्ला केला होता असे म्हणता येईल का?

In reply to by ऋषिकेश

संस्थानांचे विलिनीकरण, गोवा,हैद्राबाद मूक्तिसंग्राम, काश्मिर मध्ये राजा हरिसिंगच्या विलिनीकरणानंतर सैन्य घुसवणे इत्यादी इत्यादी.

In reply to by कलंत्री

गोव्यातील संग्राम हा अंतर्गत होता त्याला भारताने केवळ पाठिंबा दिला होता. इतर बहुतांश संस्थाने आपणहून विलीन झाली किंवा जनमतानंतर सामील झाली किंवा लोकांच्या बंडामुळे त्याचे राजे पळून गेले (जसे जुनागढ) काश्मिर आधी भारतात विलीन झाले आणि मत तिथे आपले सैन्य गेले तेव्हा तिथेही हल्ला म्हणता येऊ नये म्हणून फक्त हैद्राबादचे उदाहरण ग्राह्य असावे असे वाटते

कसाब हा क्रूरकर्मा होता. त्याला फाशी दिली ते योग्य झाले हे सर्व खरे. पण उन्नीकृष्णन म्हणतात त्याप्रमाणे कोणाच्याही मृत्युचा आनंदोत्सव करु नये. फुगड्या खेळणार्‍या भाजपाच्या कार्यकर्त्या, एकमेकांच्या तोंडात पेढे कोंबणारे नागरिक, हे फोटो पाहिले की आपला समाज कुठल्या दिशेने चालला आहे तेच कळत नाही. कसाब हे प्यादे होते. खर्‍या अर्थाने, करवित्या धन्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत दहशतवाद चालूच रहाणार. आज, सगळ्या राजकीय पक्षांचे चाळे पाहिले की नाईलाजाने का होईना, हेच म्हणावेसे वाटते की त्यातल्या त्यांत, काँग्रेस पक्ष हाच जबाबदारीने वागणारा पक्ष आहे. ज्या दिवशी त्याला जास्त चांगला विकल्प निर्माण होईल तो सुदिन!

In reply to by तिमा

असं कोण म्हणतो? सोनिया गांधी? की मोरॉन सिंग? समाज कुठल्या दिशेने चालला आहे हे जर कळत नसेल तर शिकून घ्या. मी त्या दिवशी काका हलवाइ कडून मुद्दाम मिठाई आणली. ती जास्त गोड लागली हे सांगायची गरज नाही. त्या जबाबदारी ने वागणार्या कॉन्ग्रेस पक्शाची सुरळी करा आणि चुलीत टाकून द्या.

आपण सतत आंतरराष्ट्रीय दबाव,अमेरिकेची दडपशाही ह्या कारणांमुळे बोटचेपेपणाचे धोरण अवलंबतो. अमेरिका आपले प्रश्न झटपट सोडवून मोकळी पण होते. ते आपल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणाच्या तोंडाकडे बघत बसत नसतात. तेवढी ताकद आपल्यात पण आहे. फक्त आपण ती वापरली पाहीजे कुठल्याही दबावात न येता....

त्या जबाबदारी ने वागणार्या कॉन्ग्रेस पक्शाची सुरळी करा आणि चुलीत टाकून द्या.
ती सुरळी संपूर्ण मावेल/जळेल इतकी मोठी चूल आहे का तुमच्या पाशी? (विचारजंत) आ.गो.

या असल्या लेखांना काय म्हणावं कळत नाही. एखाद्या रडक्या पोराच्या कितीही मनासारखं केलं तरी त्याचं तोंड वाकडं ते वाकडंच रहातं त्यासारखं आहे. गेली चार वर्षं कसाबला फाशी द्या कसाबला फाशी द्या, त्याने जरब बसेल.... केलं. आता फाशी दिल्यावर आता त्याचा जरब बसायला काहीच परिणाम होणार नाही, तिकडे तसले शंभर तयार होतील वगैरे तक्रार...
एक कसाब मारायला आपल्या देशाची ४ वर्षे आणि ४० कोटी रुपये खर्ची पडले.
अमेरिका आपले प्रश्न झटपट सोडवून मोकळी पण होते. ते आपल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणाच्या तोंडाकडे बघत बसत नसतात. अहो, चाळीस कोटी तुम्हा आम्हाला खूप आहेत. देशासाठी महत्त्वाच्या घटनांसाठी हा काहीच नाही. अमेरिकेने दहशतवाद्यांना दहशत बसवल्याबद्दल कौतुक उफाळून येताना दिसतं. पण त्यांना ओसामा बिन लादेनला मारायचा खर्च किती आला माहीत आहे का? इराक आणि अफगाणिस्तान युद्धात मिळून ८०,००,०० कोटी रुपये. ऐशी लाख कोटी रुपये! http://costofwar.com/ एवढ्या पैशात किती शाळा, किती हॉस्पिटलं, किती रस्ते, किती नवीन उद्योगधंदे, किती नवीन पॉवर प्लॅंट्स होतील कल्पना आहे का? कोणीतरी श्रीमंत देशाने युद्धासाठी असला खर्च केला म्हणून आपण सुद्धा करायचा का? काहीतरीच आपलं. प्रत्येक गोष्टीविषयी फक्त तक्रार एके तक्रार करण्याऐवजी थोडा नीरक्षीरविवेक बाळगला तर बरं होईल...

In reply to by राजेश घासकडवी

एखाद्या रडक्या पोराच्या कितीही मनासारखं केलं तरी त्याचं तोंड वाकडं ते वाकडंच रहातं त्यासारखं आहे. गेली चार वर्षं कसाबला फाशी द्या कसाबला फाशी द्या, त्याने जरब बसेल.... केलं. आता फाशी दिल्यावर आता त्याचा जरब बसायला काहीच परिणाम होणार नाही, तिकडे तसले शंभर तयार होतील वगैरे तक्रार
प्रचंड सहमत! - (नीरक्षीरविवेकी) सोकाजी

In reply to by राजेश घासकडवी

८० लाख कोटी खर्च करणे अमेरिकेला शक्य होते. त्यांनी केले. तुम्हाला जेवढे जमतात तेवढे तुम्हीए करा. ८० लाख कोटीच करा असे नाही. पण स्वसंरक्षणासाठी आणि शत्रूला धडा शिकवण्यासाठी जर पैसे असतील तर ते खर्च केलेच पाहिजेत. ८० लाख कोटी सद्दाम आणि ओसामाला पकडण्यात खर्ची पडले. त्यांना संपवण्याचा खर्च १५-२० गोळ्यांच्या खर्चापेक्षा आधिक नाही. पकडल्यावर त्याला पोसण्यासाठी ४० कोटी रुपये खर्च केले गेलेले नाहित हे कृपया लक्षात घ्या. राहता रहिला प्रश्न ४० कोटीचा. तर देशाच्या अर्थव्य्वस्थेत तो क्षुल्ल्क खर्च आहे. प्रश्न ४ वर्षाचा आहे. सद्दाम हुसैन नामक एका देशाचा माजी प्रमुख ६ महिन्यात खपवला जाऊ शकतो आणि ओसामा नावाचा एक दहशतवाद्यांचा मास्टरमाइंड एका रात्रीत मारुन समुद्रात फेकला जाउ शकतो तर ट्रकभर पुरावे असताना कसाब नावाचा एक क्षुल्लक परकीय दहशतवादी या देशाला ४ वर्षे पोसावा लागतो याचे दु:ख आहे. आणि हो कसाबला बिर्याणी खायला घालण्याला पण माझा आक्षेप आहे. तुरुंगातले जेवण नरड्याखाली उतरत नसेल तर जीव दे म्हणाव ***. बिर्याणी खायला घालायला काय तो देशाचा जावई होता काय?

In reply to by मृत्युन्जय

http://www.miamiherald.com/2011/11/08/v-fullstory/2493042/guantanamo-ba… ग्वाटानामो बेमध्ये जे कैदी आहेत त्यांना तिथे पोसण्यासाठी प्रत्येक कैद्यामागे अमेरिकेचे वर्षाला आठ लाख डॉलर्स म्हणजे पाच कोटी रुपये खर्च होतात. दरवर्षी ७५० कोटी रुपये! "each captive gets $38.45 worth of food a day." अमेरिका जे करते ते बरोबर, भारत खर्च करतो ती मात्र उधळपट्टी... तरी बरं ख्रिसमसला त्या कैद्यांना केकच का दिला वगैरे पिरपीर अमेरिकन नागरिक करत नाहीत.
त्यांना संपवण्याचा खर्च १५-२० गोळ्यांच्या खर्चापेक्षा आधिक नाही.
काहीही. युद्ध केल्याशिवाय सद्दाम सापडला असता का? युद्ध केल्याशिवाय ओसामा हाती लागला असता का? आणि हा चाळीस कोटी आकडा नक्की कुठून आला कोणी सांगू शकेल का? यात तुरुंगवास आणि खटला या सगळ्याचा खर्च सामील आहे की नुसते कसाबला दिलेल्या बिर्याणीचं ते बिल आहे? काही विदा आहे का?

हल्ले झाले होते, हल्ल्ले होत आहेत आणि हल्ले परत परत होत राहतील. पाकड्यांना आपल्या देशाची जरब वाटेल असे अत्ता पर्यंत काय केले आहे ? पाकडे आपल्या बरोबर समोरा-समोर युद्ध न करता एक अघोषित युद्ध करत आहे त्यासाठी आपल्या देशाने कोणती रणनिती ठरवली / अमलात आणली ? ज्या संसदेत हे पगारी मंत्री-संत्री देशाची सेवा करण्यासाठी बसतात त्या संसदेवर हल्ल्ला करणार्‍या अफझल्याला ( जो आपल्याच देशातील नागरिक आहे)२००४ मधे फाशीची शिक्षा झाली असुन सुद्धा त्याला लटकवण्यासाठी सरकार अजुन किती वेळ घेणार ? जर या हल्ल्यात या संसदे मधील मंत्री-संत्री मारले गेले असते तरी इतकाच वेळ लागला असता का ? सर्वात महत्वाचा प्रश्न :--- असे हल्ले सहन करण्याची हिंदुस्थानच्या जनतेतली सहनशक्ती कधी संपणार ? अश्या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळावीत असे मला वाटते... :( जाता जाता:--- तुमचे घर लुटणारा / तुमच्या जिवावर उठणार्‍या / तुमच्या आप्तस्वकियांचा जीव घेणारा / तुमच्या विरुद्ध सतत विघातक कारवाई करणार्‍याला तुम्ही माफ करु शकाल ? त्याचे सर्व कारनामे विसरु शकाल ? सुशील कुमार शिंदे यांनी पाकड्यां बरोबर होउ घातलेल्या क्रिकेट सामन्यांसाठी झाले-गेले विसरुन जा असे विधान केले. तुम्ही तयार आहात "सर्व" विसरायला ? महत्वाचे काय आहे तुमच्यासाठी क्रिकेट की राष्ट्रप्रेम ?

तेवढी ताकद आपल्यात पण आहे.
ताकद म्हणजे काय हो? प्रचंड लोकसंख्याच ना.

लेखाचा उद्देश समजण्यात गोंधळ उडू नये म्हणून अधिक माहिती : १) मुळात हा लेख लिहिण्यामागे देशाची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था एवढा एकच उद्देश आहे. देश्याच्या नेतृत्वात किलिंग इंस्टीक्ट यावे अशी प्रामाणिक इच्छा आहे. २) कोणाही विषयी तक्रार करणे हा हेतू नसून सत्य परिस्थितीची जाणीव ठेवणे हा आहे. ३) देश आधीच सुरक्षा कारणांसाठी बराच खर्च करत आहे त्यात वाढ करा असे म्हणण्यात आलेले नाही. उलट केलेल्या खर्चातून पोलिसांची बुलेटप्रूफ जाकेट अजूनही त्यांना मिळाली नाहीत. मुंबई व कोंकणाच्या किनारपट्ट्या अजूनही दुर्लक्षित आहेत. मुंबईच्या वांद्रे वरळी सागरी सेतूच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची ह्यावर अजूनही मुंबई पोलीस आणि नौदल यांच्यात वाद आहेत. आओ जाओ घर तुम्हारा !! ४) पाकडे किंवा इतर शत्रू त्यांना जे हवाय ते करणारच त्यावर आपण बंधने घालू शकत नाही. त्याचा मुकाबला करायला आपण समर्थ झालोय कि नाही ह्याचाच आढावा घेणे गरजेचे आहे. चोर चोरी करणारच पण म्हणून तुमच्या दरवाजे खिडक्यांना कुलुपे नीट लावा असे सांगणे म्हणजे रडणे नव्हे ! ५) ताकद ह्याचा अर्थ आपली लष्करी ताकद असा घ्यावा. लोकसंख्या हे आपले बलस्थान की कच्चा दुवा हा स्वतंत्र वादाचा विषय आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

देश्याच्या नेतृत्वात किलिंग इंस्टीक्ट यावे अशी प्रामाणिक इच्छा आहे. !! नरेंद्र मोदी नमो नमः !!

सुरक्षेचे उपाय डोळ्याने दिसतीलच असे काही नाही उलट ते दिसत नसल्याने घातपात घडवणारे अधिक निष्काळजीने वागतील व पकडले जातील. मला विश्वास आहे की, सी सी टि व्ही कॅमेऱ्यातून सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून छ शि ट च्या सर्व कोपऱ्यांतील हालचालींवर लक्ष ठेवून असणार अन थोडाही संशय आल्यास त्या व्यक्तीला हटकले जात असणार. कुणास स्वतःच्या जबाबदारीवर या यंत्रणेच्या उपयुक्ततेची परीक्षा घ्यायची असेल तर लहान मुलांची खेळण्यातली रायफल तिच्यावरील रंगीबेरंगी स्टिकर्स हटवून एखाद्या पिशवीत लपवून छ शि ट वर घेऊन जावी व फलाटावर पोचल्यावर हळूच ती रायफल बाहेर काढावी. मला विश्वास आहे की काही सेकंदात रेल्वे पोलिस तुमची धरपकड करतील; -). पोलिसांनी नाही केली तरी फलाटावरील जनता तुम्हाला पकडून जोरदार प्रसाद देऊ शकते त्यावर उपाय म्हणून एखाद्या मित्राला काही अंतरावर कॅमेरा हातात धरून उभे राहावयास सांगावे म्हणजे स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली स्वतःचा बचाव करता येईल :-). एवढे करूनही मार पडल्यास देशाच्या सुरक्षिततेच्या उपायांची तपासणी करण्यासाठी आपण स्वतःचा जीव धोक्यात घातला असा समज करून घ्यावा व स्वतःबद्दल अभिमान वाटून घ्यावा :-).