Skip to main content

वेरूळची लेणी..

लेखक सुहास झेले यांनी मंगळवार, 11/09/2012 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या लांबच्या ठिकाणी भटकंतीला जायचं, म्हणजे खूप आधीपासूनच तयारीला सुरुवात करावी लागते. गाड्यांचे वेळापत्रक बघणे, तिथे राहण्याची सोय आहे की नाही, असेल तर ते परवडणार की नाही. त्या ठिकाणी अजून काय काय बघता येईल, याची इत्यंभूत माहिती काढणे.. इत्यादी इत्यादी सोपस्कार पार पाडणे ओघाने आलंच. बरं इतकी तयारी करूनसुद्धा सगळं नीट जुळून आलं नाही, तर सगळ्या तयारीचा बट्ट्याबोळ. :) सेनापतींच्या बड्डे पार्टीमध्ये अनघाने हंपी आणि बदामी बघायला जाऊया, असा किडा सोडला आणि लगोलग ५-६ जण तयार सुद्धा झाले. मला इतक्या कमी कालावधीत तीन दिवसांची सुट्टी मिळणे निव्वळ अशक्य. मी नंतर सांगतो म्हणून वेळ मारून नेली. मग त्यांचे प्लान्निंग सुरु झाले, मला ईमेल अपडेट्स येत होतेच. म्हटलं जाऊ देत, हे आपल्या नशिबात नाहीत. ह्यावेळी ह्यांना जाऊ देत. मी नंतर कधी तरी जाईन, पण नंतरला अंतर असतेच. कर करता येईल म्हणून हापिसात बॉसला नवस बोललो. तो नवसाला पावला, पण एका अटीवर. आठवड्याचे कामाचे ४५ तास भरून देत, आणि मग हवं तिथे जा. मला एका दिवसाचे काम भरून काढायचे होते आणि बाकी दोन आठवड्याची हक्काची रजा. त्याप्रमाणे हापिस संपल्यावर ४-४ तास बसून सगळे तास पूर्ण करायचे ठरले. इथे आमच्या प्लानचे पार बारा वाजले आणि ऐन मोक्याच्या वेळी हंपी आणि बदामी कटाप केले गेले. नेमका त्याचं दिवशी दोन दिवसांमधला एक दिवस ओव्हरटाईम करून आलो होतो. अजून एक दिवस केलं की झालं, ह्या विचारात मी अगदी आनंदात होतो. घरी येऊन हा ईमेल बघितला आणि म्हटलं आता काही करायला नको. ऑफिसमध्ये काम करून विकांत गपचूप घरी घालवायचा. आता गप्प बसतील ते राजीवकाका आणि अनघा कुठले. ज्यांना हंपी आणि बदामीला यायला जमणार होते, त्यांच्यासाठी नवीन प्लान तयार केला गेला...वेरूळ आणि देवगिरी !! धावपळीत सगळी तयारी केली गेली आणि अगदी आयत्यावेळी दोन गाड्या बुक करून, औरंगाबादच्या दिशेने निघालो. राजीवकाकांनी वेरूळ येथे, वृंदावन ह्या छोटेखानी हॉटेलमध्ये दोन रुम्स बुक करून ठेवल्या. आमच्या अंदाजाप्रमाणे आम्ही पहाटे ३-४ ला पोचून, दोन-तीन तास झोप काढणार होतो, पण मुसळधार पावसाने दगा केला. निवांत प्रवास करत सकाळी ७ ला पोचलो आणि अंघोळी आटोपून ८:३० ला लेण्या बघायला बाहेर पडलो. खरे तर दोन किलोमीटर परिसरात पसरलेल्या लेण्या बघायला, दोन दिवसदेखील पुरे नाहीत....पण आता आम्हाला तेव्हढा वेळ देता येणार नव्हता. त्यामुळे काही मुख्य लेणी बघून, देवगिरीच्या दिशेने कूच करायची असे ठरले होते. :) लेण्यांची पुढील माहिती विकिपीडियावरून साभार - महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत, इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी, हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आले. वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर (कैलास मंदिर - लेणे क्रमांक १६) जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा, एका अखंड खडक वापरण्यात आला असून. तो उघडपणे वरून खाली, म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आलाय आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली. लेणी बघायला प्रचंड गर्दी असते, त्यामुळे विकांत सोडून तिथे जावे. लेणी बघून बाहेर पडल्यावर, रस्त्याच्या डाव्या बाजूला पाच-सहा दुकाने-हॉटेल्स सोडली तर एक तामिळ/तेलगु पाटी असलेलं हॉटेल आहे. दुरून बघितल्यार एक जुनाट गॅरेजसारखे वाटेल, पण तिथे साउथ इंडिअन पदार्थ अफलातून मिळतात. आयुष्यात आजवर खाल्लेला सगळ्यात बेस्ट सांभार इथे खाल्लाय. ते सगळे नाश्त्याचे पदार्थ आपण सांगितल्यावर बनवून देतात. उदारणार्थ पोहे, साबुदाणा खिचडी. मेदू वडा, उपमा इत्यादी. त्या अम्माच्या हाताच्या जेवणाची चव एकदा घ्याच, सुहासची आठवण काढाल :) :) आता काही फोटो - १. कैलास मंदिर २. ३. ४. ५. ६. ७. ८. महाभारतातील प्रसंग... ९. १०. ११. १२. १३. १४. १५. १६. १७. १८. १९. २०. २१. २२. २३. २४. - सुझे !! (देवगिरीचा वृत्तांत आणि फटू लवकरचं... :) )

वाचने 10841
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

निवांत वेळ काढून जा वल्लीशेठ... दोन दिवस मुक्काम करता येत असेल, तर अजंठा लेणी ह्याहून सुंदर आहेत :) :)

In reply to by प्रचेतस

यनी टैम वन्स आय रिटर्न. पंचनद प्रांतातून सातवाहनराज्याकडे मी प्रस्थान केलं की ह्या भागात संयुक्त मोहिम लवकरच काढू.

लेण्याच्या सुरवातीलाच "गजांतलक्ष्मी" हे अती सुरेख शिल्प आहे. हया मधील अनेक शिल्पांची अत्यंत वाईट पद्धतीने "तोड - फोड " केली आहे.

पण तुम्ही कुठले शेवटच्या फोटोमधील ? (ही माबो टीम आहे काय ?)

In reply to by इरसाल

नाही मी नाही आहे त्या फोटोत... आणि ही मराठी ब्लॉगर्सची टीम आहे. सगळे ब्लॉगर्स नाहीत, पण ब्लॉगमुळे ओळख झालेला हा ग्रुप आहे, त्यामुळे कंपूबाजी म्हणता येईल ;-)

भारी रे सुझे!! आधीच्या आठवड्यात झालेल्या दोन दांड्यामुळे या वेळी तुमच्यासोबत येता आलं नाही. :( वल्ल्या, नोव्हेंबरमध्ये नक्की रे.

फोटो जबराच आले आहेत. फक्त फोटो कशाचे आहेत, काही दंतकथा वगैरे काही असं पाहिजे होतं असं वाटलं राव. बाकी, वेरुळला गेलं पाहिजे. :) वल्ली, किसन देव, यांच्या भटकंतीसाठी यजमान यकु आणि मन यांच्या सौजन्याने प्लॅन ठरतोय असं कोण तरी म्हणत होतं. तसं काही असलंच तर भटकंती करणार्‍यांची धावती भेट घेईन म्हणतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्लान ठरतोच आहे. पण धावती भेट का बरं? तुमच्या विद्यापीठामागच्या लेण्या बघायच्या आहेत तुमच्याबरोबरच. आणि बाकीची हटके ठिकाणंही.

In reply to by प्रचेतस

>>>>>विद्यापीठामागच्या लेण्या बघायच्या आहेत तुमच्याबरोबरच. आणि बाकीची हटके ठिकाणंह विद्यापीठाकडे असलेल्या लेणी बघायला जायचं म्हणजे लै कठीण काम आहे. पायर्‍या चढायच्या म्हटल्यावर वयोमानामुळे मला धापा लागतात. पण उठत-बसत कसं तरी रेटुन पाहीन. :) बाकी, प्लॅन लवकर करा. आणि दोनचार दिवस आधी कळवा. -दिलीप बिरुटे

नेहमीप्रमाणेच अप्रतिम, क्लास, ग्रेट! सुझेचं सहलीचं वर्णन, लेण्यांची माहिती आणि फोटो तर खासच खास!


फोटो क्रं १ वरून भव्यतेची जाणीव झाली. फोटो क्रं. १८ पुस्तकात दाखवतात तसा आला आहे. पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती वाटतं!

मस्त फोटो. माझ्याही आठवणी जाग्या झाल्या. हे फोटो कसे चिकटवतात हेच जमत नाही .

In reply to by खुशि

मिपावर उजव्या बाजूस वरती 'मदत पान' आहे त्यावर माहिती दिलेली आहे. लाभ घ्यावा.

मस्त वृतांत :) अमोल केळकर

एकदाची ती वेरूळ लेणी मला पाहायला मिळाली. त्यातही फक्त कैलास लेणं पाह्यलंय. इतर गुंफा पाहायचा मुहूर्त अजून उजाडला नाही. या शिल्पांत भव्यता तर आहेच. एकाच कातळातून समान अंतरावर कोरलेले खांब, शिल्पे कसं काय केलं गेलं असावं असा पावलोपावली प्रश्न पडत राहातो. मूर्त्या आणि गुंफाचा आखीव-रेखीवपणा, प्रमाणबद्धता पाहून डोळे दिपतात. जरा कुठे एखाद्या छिन्नीचा वाकडा घाव पडला की सगळं मुसळ केरात्,पण इथे असं झालं असावं असं वाटत नाही. काही ठिकाणचे रंग अजूनही शाबूत आहेत. चित्रातले माणसं, हत्ती ओळखू येतात. जिथून रंग निघायला सुरूवात झालीय तिथून पाह्यलं की रंग इतक्या वर्षांनंतरही कसा काय शाबूत असू शकतो याचं उत्तर मिळतं. एवढा जाड थर दिल्यावर काय मजाल आहे त्या रंगांची सहजासहजी निघायची? इथेच शेजारी एका बाईचं चित्रही सुरेख होतं. दहा पिढ्या तब्बल दोनशे वर्षे राबल्या म्हणे हे काम करायला!! कातळाची अजस्त्रता इथे दिसून येते. हा वरती आणखी कित्येक फूट उंच आहे.