मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पथकर (टोल) वसुली मुळातच घटनाबाह्य..!

कॉमन मॅन · · काथ्याकूट
मध्यंतरी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पथकराविरोधात आंदोलन केले. आमचे या संदर्भात असे मत आहे की सध्या आयआरबी किंवा तत्सम कंपन्यांकडून परस्पर जी पथकरवसुली केली जात आहे ती हे मुळातच घटनाबाह्य आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम २६५ व २६६ मध्ये याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत. कलम २६५ प्रमाणे कोणताही कर हा केवळ सरकारलाच वसूल करण्याचा अधिकार आहे. सदर पथकर हा आयआरबी किंवा तत्सम कंपन्यांकडून वसूल होत असल्यामुळे कलम २६५ ची पायमल्ली होत आहे. कलम २६६ प्रमाणे, सदर गोळा झालेला कर हा प्रथमत: 'कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया' ह्या शीर्षकांतर्भूत खात्यातच जमा झाला पाहिजे. सध्या तसा तो होत नसून आयआरबी ही कंपनी परस्पर स्वत:च्या खात्यात गोळा करत आहे. सबब, सध्या ज्या पद्धतीने पथकर वसुली होत आहे ती पद्धत मुळातच घटनाबाह्य आहे..या संदर्भात एका निवृत्त सनदी अधिकार्‍याने मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे कळते.. डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटना समितीच्या सर्व सदस्यांना विनम्र अभिवादन.. जय हिंद..! -- कॉमॅ.

वाचने 3276 वाचनखूण प्रतिक्रिया 12

गवि Wed, 08/01/2012 - 14:06
काय करायचं पण? मी टोल देणार नाही असं बाणेदारपणे म्हणून वाद घालत राहावा तर मागचे लोक श्वासभरही न थांबता पँपँपँपँपँपँपँपँ सुरु ठेवतील. बंद झाला तर आनंदच आहे. हजारभर रुपये महिन्याचे वाचतील. पण बंद करण्याचं काम सरकारनेच केलं पाहिजे. जिथे उपमुख्यमंत्री यावर कॉमेंट करताना मूळ टोल योग्य / अयोग्य / एक्सेस /लूट याविषयी न बोलता "दुचाकीस्वार, पादचारी, रिक्षा अशा सामान्य प्रवाशांना / लोकांना याचा ताण पडत नाही" अशा आशयाचं बोलतात तिथे फार आशावादी कसं रहावं बुवा? आताच्या दिवसात कार असणं म्हणजे अत्यंत उच्चवर्ग असं मुळीच नाही. पण तरी तसं आहेच असं समजू.. आम्ही सारेच कारवाले एकजात माजोरडे, पैशाने माजलेले, ऐषारामी.. ठीक आहे, मान्य करु क्षणभर.. आमच्यासारख्या फुगलेल्या लोकांकडून पैसा लुटलाच पाहिजे...असंही म्हणू.. पण मग आमच्याकडून रोजचे साठ रुपये तिथे वसूल करुन चांगल्या कामासाठी तरी वापरा. केवळ कारवाले आहेत म्हणून टोल योग्य? खर्च + नफा वसूल होऊन दसपट कोटी रक्कम जमा झाल्यावर अजूनही पंधरा -तीस वर्षं टोल कोणाच्यातरी खिशात कशाला घालताय? पण बोलणार कोण अन ऐकणार कोण?

चिरोटा Wed, 08/01/2012 - 14:56
मनसेने मांडलेले मुद्दे पटतात. टोलवसूलीबाबत नेहमीच लपवाछपवी होत असते.

चिगो गुरुवार, 08/02/2012 - 12:56
पण तो पथकर असतो का? माझ्या माहितीत, पथकर म्हणजे रोड टॅक्स, जो आपण वाहन खरेदी / रजिस्ट्रेशन करतांना सरकारला देतो. आणि "टोल" ही कदाचित "सर्व्हीस फी" टायपात येतो. अर्थात ह्याच्यात डबल टॅक्सेशनचा मुद्दा पण आणता येतो, की जर मी रोड टॅक्स भरलाय तर मग टोल का भरावा पुन्हा? बाकी गविंनी नेहमीप्रमाणे योग्य मुद्दे मांडलेच आहेत.. मनसेचे मुद्दे-बिद्दे बिनतोड आहेत, पण पुढे काय? आणि टोल- आकारणी थांबली(च) तर त्यानंतर रस्त्यांची निगा राखण्यात जवाबदार कोण?

In reply to by चिगो

शिल्पा ब गुरुवार, 08/02/2012 - 13:01
>>आणि टोल- आकारणी थांबली(च) तर त्यानंतर रस्त्यांची निगा राखण्यात जवाबदार कोण? आता निगा राखली जाते असं तुमचं म्हणणं आहे का?

In reply to by शिल्पा ब

चिगो गुरुवार, 08/02/2012 - 13:37
आता निगा राखली जाते असं तुमचं म्हणणं आहे का?
नसेलही कदाचित.. पण आता कमीत कमी (फोडायचं झाल्यास) कॉन्ट्रॅक्टर/कंपनीच्या डोक्यावर फोडता येईल खापर.. नंतर कोणावर फोडणार? प्रश्न उपहासात्मक नाहीये. टोलबद्दल जो काही कॉन्ट्रॅक्ट/MoU/परवाना-करार झाला असेल तो रद्द केला जाणार का आणि त्यानंत ती जवाबदारी PWD(Roads) सारख्या खात्याकडे दिला जाणार का, हा प्रश्न आहे..

In reply to by शिल्पा ब

चित्रगुप्त Sun, 08/05/2012 - 09:10
आता निगा राखली जाते असं तुमचं म्हणणं आहे का? ..पुण्या-मुंबईचे ठाऊक नाही, पण दिल्लीतील फ्लायओव्हर वगैरे, जिथे टोल घेतला जातो, त्यांची अतिशय चांगली निगा राखली जाते, चोवीस तास त्यांचे लोक कामावर असतात. टोल आकारणीची मुदत संपल्यावर मात्र रस्त्यांची दुर्दशा झालेलीही बघायला मिळते. दिल्लीतील एका चार किलोमीटर लांबीच्या उड्डाण-पुलासाठी तीस रुपये टोल घेतला जातो, ज्यात चोवीस तासाच्या मुदतीत कितीही वेळा जाणे-येणे करू शकता. माझ्या घरापासून दिल्लीला एकदा जाण्या-येण्याचा पेट्रोल खर्च चारशे रुपये येतो, त्यात ही तीस रुपयाची भर पडली, तरी वेळेची बचत, व जाम मधे न अडकणे, यात तो पूर्ण वसूल होतो... टोल वाल्यांची वागणूक नम्रतेची आणि व्यवस्थित असते, उलट लोकच अरेरावी करताना दिसतात. मध्यंतरी एका मोटार-चालकाने टोल वसुलीवाल्याला पिस्तुलाने उडवल्याची पण घटना घडली होती.