हे सगळे गेले कुठे?
गेल्या काही दिवसात कोणत्या मित्र-मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून मनसोक्त गप्पा केल्या आहेत असा प्रश्न विचारल्यास फार कमी लोकांना ठाम उत्तर देता येईल. मात्र त्यात जीमेल वरच्या लिखित गप्पा किंवा स्काइपवरच्या ऑडिओ-व्हिडिओ गप्पांचा पर्याय टाकला तर बहुतेकांना ठाम उत्तर देता येईल. मी स्वतः या दुसर्या गटातली म्हणजे बहुसंख्यांपैकी आहे. जगभरात स्थित असलेल्या मित्रमंडळाच्या सान्निध्यात राहून, त्यांच्याशी विविध प्रकारे गप्पा-टप्पा करत त्यांच्याबरोबर विचार-भावना-ज्ञान वाटून घ्यायची जी सोय आहे त्याबद्दल आधुनिक तंत्रज्ञानाची मी कायम ऋणी राहिन.
असंच एकदा पुण्यात असणार्या एका मैत्रिणीसोबत जीमेलवर लिखित गप्पा चालू असतांना पुण्यातच वास्तव्याला असणार्या दुसर्या, तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीविषयी सहज चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की दोघीही आपापल्या नोकरी-संसारात गुरफटून गेल्याने वेळेअभावी आता पहिल्यासारखे नियमित भेटायला जमत नाही. त्यानंतर आणखी काही हवा-पाण्याच्या, आणखी चार मित्रमैत्रिणींच्या चौकश्या करून आमच्या गप्पा संपल्या पण तिचे हे वाक्य मात्र मनात घर करून बसले आणि मग ते आणखीच घोळत राहिले.
आपल्या आयुष्यात आपण केव्हातरी एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ येतो, तिच्यासोबत हिंडण्या-फिरण्यात, हितगुज करण्यात त्या कालावधीतला भरपूर वेळ घालवतो. ती व्यक्ती आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनून जाते. तेव्हा आजूबाजूचे इतर लोकही आपल्याला आणि त्या व्यक्तीला परस्परांचे सोबती म्हणूनच ओळखतात. ही व्यक्ती मग कोणी मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईक किंवा ऑफिसातले सहकारी किंवा आणखी कोणी असू शकते किंवा अशीही व्यक्ती असू शकते जी आपल्या फार जवळची नसतानाही मनावर ठसा उमटवते. पण कालचक्र फिरते तशी आजूबाजूची परिस्थितीही बदलते. गरजा, जबाबदार्या बदलतात आणि हळूहळू, आपल्याही नकळत आपण त्या अविभाज्य असलेल्या जवळच्या व्यक्तीपासून दूर जायला लागतो. सुरुवातीचे काही दिवस संपर्क ठेवण्याचा प्रयत्नही होतो पण त्यात काही राम नसतो. लवकरच ते प्रयत्नही आटतात आणि त्या व्यक्तीची आठवणही आटत जाते, पुढे ती स्वतःहून कधी होतही नाही. चुकून त्या काळात आपल्याला ओळखणारी कोणी तिसरी व्यक्ती या जवळच्या व्यक्तीबद्दल चौकशी करते तेव्हा आपण थोडं ओशाळून 'सध्या बर्याच दिवसात संपर्क नाही पण पुण्याला/मुंबईला/कॅलिफोर्नियाला आहे असं वाटतं' असं सांगतो. अश्या प्रसंगानंतर त्या व्यक्तीची, तिच्यासोबत घालवलेल्या दिवसांची आठवण होते. मनात दु:खाची हलकीशी कळ येते आणि थोड्याच वेळात विरूनही जाते. खरंच, अश्या किती जणांच्या आठवणींचं दु:ख करत बसणार? जवळ येऊन दूर गेलेल्या व्यक्ती अगणित असतात.
कधी कधी भावनेच्या भरात वाटतं, "आपणच हलगर्जीपणा केल्यामुळे त्या नात्यापासून, त्या व्यक्तीपासून दूर गेलो का? थोडे प्रयत्न केले असते तर आजही त्या व्यक्तीच्या जवळ असतो का?" पण थोड्या विचाराअंती उत्तर मिळतं, 'नाही'. नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते. काही रक्ताच्या नात्यासारखी दीर्घायुषी नाती कायम सोबत असतात. काही नातीच अल्पायुषी असतात आणि ती या काळाच्या प्रवाहात केव्हाच विरून जातात. त्यांना ओढून ताणून तगवत ठेवण्याचा प्रयत्नही करू नये. तसे प्रयत्न कधी हास्यास्पद तर प्रसंगी तिरस्कारासही पात्र होतात. बरं प्रत्येक वेळी आपणच त्या व्यक्तीपासून दूर जात असतो असं नाही. कधी दोघंही एकमेकापासून लांब जात असतो तर कधी दोघांतली एक व्यक्ती तिथेच असते आणि दुसरी दूर जात असते. अश्या वेळी 'त्या' आपल्या जवळच्या व्यक्तीला तिथेच ठेवून आपणच दूर निघून आलो ही बोच मनाला लावून घेणं फारसं व्यवहार्य नाही. आठवणी या येणारच, मानवी अस्तित्वाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्यांचा क्लेश करून घ्यायचा नाही.
आणि मग अचानक कळायला लागलेल्या वयापासून तर आतापर्यंत आपल्या आयुष्यात येऊन गेलेले आणि त्या क्षणाला आठवणारे कितीतरी चेहरे एकदम डोळ्यासमोर येतात. त्यातले काही इतके धूसर असतात की नाकी-डोळी ओळखूही येत नसतात पण त्यांचं अस्तित्व मनाला माहिती असतं. त्यात असतात... ३-४ वर्षाची असतांना आणि तोपर्यंतच भेटलेली माझ्यासोबत खेळणारी शेजारची मुलगी, प्राथमिक शाळेत असतांना रोज सोबत डबा खाणारी आणि नंतर शाळा/गाव बदलणारी मैत्रीण, प्राथमिक शाळेतल्या बाई, शाळेचे दहा वर्ष आपल्याच वर्गात असणारी पण मध्येच एखादे वर्षच 'चांगली' असणारी मैत्रीण, शाळेत ८वी ते १०वीत असतांना रोज संध्याकाळी फोन करून गप्पा मारणारा वर्गमित्र, त्याच काळात जिच्यासोबत रोज शाळेत आणि प्रत्येक शिकवणीला गेलो ती मैत्रीण, आजीच्या भजनी मंडळातल्या हज्जार प्रश्न विचारणार्या आज्या, क्लासवरून घरी येतांना रात्र होते म्हणून रोज ज्याच्यासोबत सायकल पिटाळत यायचे तो वर्गमित्र, शाळेत मराठीचा प्रत्येक धडा आणि कविता कळकळीने शिकवणारे सर, दररोज सकाळी डोक्यावर भलं मोठं भाजीचं टोपलं घेऊन येणारी भाजीवाली, कळायला लागल्यापासून तर उच्च शिक्षणाकरता घराबाहेर पडेपर्यंत पाहिलेला दुपारी लोटगाडीवर डाळ्या-मुरमुरे विकायला येणारा मुरमुरेवाला, घरी आल्यावर कौतुक करणारे बाबांचे मित्र, कॉलेजात गेल्यावर पहिल्याच वर्षी आणि आयुष्यात पहिल्यांदाच 'प्रपोज' करणारा तो, कॉलेजात असतांना आपल्याच वर्गात असलेली -सोबत प्रोजेक्ट करणारी - पुन्हा सगळीकडे सोबत असणारी मैत्रीण, ज्याच्याकरता कॉलेजच्या दिवसात काळजाचं भिरभिरं व्हायचं तो, याच कॉलेजच्या दिवसात आपलं कुटुंबच असलेल्या रूममेट्स, ऑफिसातली रोज चहा-कॉफी-जेवणाला-गप्पांना सोबत असणारी मैत्रीण, अनोळखी शहरात ४ वर्ष जिच्या घरात राहिलो ती मायाळू घरमालकीण, जिमचा इन्स्ट्रक्टर, आणि... आणि.... आणि..... अजून कितीतरी......
बरोबर आहे, माझा एवढासा मेंदू काय काय आणि किती ते लक्षात ठेवणार. त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. तरी सध्या फेसबूकमुळे एक बरं झालंय की आधीच्या लक्षात राहिलेल्या आणि आता नव्याने होणार्या ओळखी, नाती त्यात नोंदवली जातायेत. कधीतरी एखाद्या विस्मृतीत गेलेल्या मित्र-मैत्रिणीची पोस्ट आली की प्रतिक्रिया उमटते, "अर्रे, ही/हा सुद्धा आहेच की!, हिचं लग्न झालं वाटतं, त्याने होंडा सिटी घेतली!, हल्ली सिंगापूरला सेटल झालेले दिसताय, बाळ कसलं गोड आहे, काका किती वयस्कर दिसायला लागले, आजी गेल्या???, ......." पुन्हा मन या सर्वांना आठवणींच्या लांबच लांब रस्त्यावर शोधायला धावतं आणि जिथे त्यांच्यापासून वेगळे झालो त्या वळणावर जरा वेळ घुटमळतं.
म्हणूनच आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाची ऋणी आहे. ते नसते तर चुकून केव्हातरी या आठवणी आल्यावर फक्त प्रश्नच पडला असता की हे सगळे गेले कुठे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुंदर
आवडेश.
सुरेख मनोगत.
सुंदर लिखाण
सुरेख !! लिखाण आवडल हल्ली
लाडु कसले ? बारश्याचे
@ ५० फक्त आधी लग्नाचे मग
मस्तच ग स्मिता. आवडल आणि पटल.
मस्त गं स्मिता
सुंदर लेख...
छान.
व्वा!! अतिशय सुंदर लेखन!!
प्र का टा आ
छान लिहिलंस!
अगदी सेम अनुभव!
फार छान...!
छान!
कोण म्हणतं की भावनांना शब्दात
भाबडेपणा खल्लास झाला !
लेखन खूपच मनापासून केलेले
स्मिता,सुंदर लेखन !!
केवळ अप्रतिम...
अतिशय सुंदर लेख आहे.
सहजसुंदर लिखाण, खूप आवडलं!
छान
सहज सुंदर लेखन.
ललित आवडल
आवडलं
वाह
सुरेख लिखाण,
एवढं चांगलं लिहीते तरी.....
+१असो.
सुंदर..
सुंदर.
धन्यवाद
स्मिताअफलातून लिहिले
खुपच मस्त लिहिले आहेस स्मिता
सुंदर लिहिलंय. खूप