Skip to main content

ईंग्रजी बाळ्या आणि देशी कार्टं

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 13/06/2012 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हा धागा काढायचं प्रयोजन सांगणं थोडं कठीण आहे पण तसं पहाता आपण सर्वच यात कदाचित मोडतो म्हणून. खरं तर मालिका लिहायला हवी पण आजकाल लोकांना फास्ट्फुडची सवय आहे म्हणून थोडक्यात. ;) ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे सर्वज्ञात आहेच, पण जी छाप आपल्यावर पडली आहे ती पिढ्यान् पिढ्या राहील असे दिसते. तशी ती इंग्रजांनी राज्य केलेल्या सर्व देशात दिसते खरी, पण आपल्याकडे जरा जास्तच, नाही का? ;) आत्मापरीक्षण तसेच आलेले काही स्वानुभव मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अनिवासी भारतीय : अतिशय क्लिष्ट मुद्दा.. बरं मुद्दा मुद्द्यासहितच मांडतो. १. काही लोक्स १ महिन्यासाठी भारताबाहेर जातात ( काही नेपाळ मधे पण) आणि फोरेन रिटर्न असं लग्नाच्या बायोडेटा मधे लिहितात. २. आल्यावर हे लोक्स "शी भारतात किती घाण आहे, लोकं किती चुकीचं ईंग्रजी बोलतात, आय हेट धिस" वगैरे बोलतात. ३. यांना नीट मराठी बोलता येत नाही, २०-३० वर्षे भारतात राहिल्यानंतर पण, भारतात राहिलो याचं दु:ख यांना फार. ४. आम्ही कसे फोरवर्ड आहोत, आणि तुम्ही कसे घाणेरडे आहात हे दाखवण्यात यांना फार स्वारस्य असते. ५. भारताच्या पॉलिटीक्स मधे हे लोकं फार नाक खुपसतात, जसं काय ह्यांच्या सांगण्याने सो कॉल्ड भारतीय पॉलिटीशियन अ‍ॅक्शन घेणार आहेत. अजुन बरेच मुद्दे आहेत, प्रतिसादक मांडतीलच. बरं एमएनसी मधे काम करणारे.. १.यांना असं वाटतं की हे आभाळातून टपकले आहेत. रोज "आम्ही अ‍ॅडव्हान्स्ड आहोत" अशी आरोळी ठोकणारे संध्याकाळी बायकोला शिव्या घालत.. काय कलयुग आला आहे, बायको नवर्‍याची सेवा करत नाही" असं म्हणत आराम खुर्चीवर बसणारे. २. आयटीवाल्यांनी भारताची कशी वाट लावली हा यांचा रोजचा चर्चेचा विषय, त्यांचे पगार कसे कमी करावेत हा गहन चर्चेचा विषय. आई-बाप, काका-मामा १. आमचा मुलगा फॉरेन मधे काम करतो. २. मुलगी आयटीतली पाहिजे. ३. आमच्या मुलाला ६ लाख पगार आहे. (डॉलरचा पगार रुपयात कन्वर्ट करुन, तिथे तो भिक मागून का राहिना) ईतर १. ए, चांगलं ईंग्लिश बोलता येतं का? २. पिझ्झा हट, अय्या.. जावु ना.. ते भाकरी झोपडी नको.. ३. क्रेझी जॉन.. किती छान.. वेडा माध्या हॉटेल नको मी स्वतः एकदा हापिसच्या कँटीन (खानावळीमधे) गेलो होतो, तिथे "डिलाइट कॉर्नर" नावाचा एक "स्टॉल" होता, मी विचार केला की जर हा मराठीत ( आनंदी कोपरा) किंवा हिंदीत (खुश कोना) असतं तर आपण गेलो असतो का? आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे? पण हे कितपत खरं आहे? हा प्रश्न उभा आहे.. तुमच्याकडे उत्तर आहे का? आणखीन अपेक्षित आहे प्रतिसादामधून.. आपला, मराठमोळा

वाचने 23047
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>आता पुण्याचा माणूस पुण्याबाहेर पडला म्हणजे परदेशी जाण्यासारखेच झाले की नाही. ह्या वाक्यासाठी हॅट्स ऑफ !! :D

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे विमे कुठे फेडणार ही पापं? ;) आता पुणेकरांना यात खेचायची गरज होती का? आणि मी आपलं मुंबईला रहाणं नको नकोसं झालं असताना आपलं मानलं, एका पुणेकराने सगळा जाज्वल्य अभिमान बाजूला ठेवून मुंबईची तारीफ केली तर वर हे ऐकायला लागतय... अरेरे.. डोळे पाणावले. बाकी चालु द्या.. मुंबईकर विमे, धाग्याचा पुरेपूर अभ्यास केलाय आणि अलर्ट लावून बसलाय जणू :P

In reply to by मराठमोळा

इतके बार फुसके गेले पण 'पुणे' म्हटलं (रामबाणच हो, वाया कसा जाईल) की लग्गेच धागा धडधडू लागला. नाना, चल ये समिधा टाकायला.

आजकाल काही काही लोकांच्या घरातच एकादा विंग्रजी बाळ्या / बाळी आणिक एकादं देशी कार्ट/ कार्टी असतात. लई पंचाईत होते बघा!

नाही, पण मी काय म्हणते, असे उगीच देश देश , भाषा भाषा , वरण भात वगरै आग्रह करत रहाणे म्हनजे मागालसेपणाचे लक्षण नाही का? कधी 'ग्लोबल' होणार आपण लोक्स? त्याशिवाय प्रगती कशी व्हायची? शिवाय आपण 'विश्वबंधुत्व'वाले नाही का? मग का बरे परदेशाला असे कमी लेखायचे? ........ ......... .......... ..... असेच काहीबाही...... पुरे. :)

नाही, पण मी काय म्हणतो, 'इंग्रजी' बाळ्याचा विषय असताना सगळे अमेरिकेला धरून का बसलेत? अमेरिकन्स आणि इंग्रजांत काही फरक आहे की नाही म्हटलं?

In reply to by मेघवेडा

ह्या बाकी बराबर हां. जल्ला ते अमेरिकन म्हंजे इंग्लिश लोकांच्या उलटे हो. हे लोक चा पितात ते काफी. हेंच्याकडे डावीकडून गाडी चालवतात त्यांच्याकडे उजवीकडून. हे शिष्टाचाराचे पक्के तर ते अर्धी चड्डी घालून रस्त्याने बर्गर खात खात जाणार, हेंच्याकडं बटन खाली केलं का लैट चालू व्हतोय तर तेंच्याकडं वर केल्यावं. येकडाव कशाबाबत मी 'तुमी लोक असं उलट काऊन करतावं, तसं काऊन नाय करत, सोपं हाय न्हवं?' आसं इचारलं तर 'नो, दॅट इज सो ब्रिटिश' आसं उत्तर येका पाकिस्तानी-आम्रिकनानं धिलं व्हतं, आता बोला.

In reply to by रमताराम

एकदा दोघांचं भांडण चालू असता आम्रिकन कार्ट्यानं चिडून इंग्लिश बाब्याला म्हटलं "We'll take you out" इंग्लिश बाब्या उत्तरला "No wonder you spell 'colour' as 'color' mate!" ;)

In reply to by मेघवेडा

पण mate हा टिपिकल अमेरिकन शब्द ना. मला नेहमीच गंमत वाटत आली आहे. कुणीसं आम्रिकन म्हटले की अरे 'रुम-पार्टनर' म्हणत नाही आम्ही, रूम-मेट म्हणतो. पार्टनर चा अर्थ जोडीदार असा घ्यायचा. हे म्हणजे उलटच झालं की नाही. 'The one who 'mates' is called a partner and the one who doesn' mate, is called a mate' आहे की नाही गंमत. :) या आम्रिकनांचं डोकंच उलटं ब्वॉ.

बाळ्या हे बाळी शब्दाचे अनेकवचन समजून उत्सुकतेने धागा वाचू लागलो, पण पुढे विषय गंभीर तत्त्वज्ञानाचा आल्याने अपेक्षाभंग झाला. :)

In reply to by योगप्रभू

निम्म्या गवर्‍या गेल्या की हो, आं? आता 'हरिभजनाविण काळ घालवू नको रे' प्रभूदेवा.

In reply to by रमताराम

त्यांचे एक अनुभवकथन येणार आहे लवकरच - पांढरे केस, हिरवे मन!

In reply to by श्रावण मोडक

श्रामो, ते अनुभवकथन माझे नाही. लिहिलेच तर ते 'तरुण आहे गात्र अजुनि' नावाने लिहीन. :)

In reply to by योगप्रभू

म्हणजे हे सांगण्यासाठी/पटवण्यासाठी पुस्तक लिहायची वेळ आलीये म्हणायची....

In reply to by चतुरंग

रंगाशेट, विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे की नित्यानंद (स्पेलिंगी 'निथ्यानंद') स्वामींनी ह्युमन क्लोनिंगचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांचे क्लोन्स देशाच्या वेगवेगळ्या भागात त्यांचे मठ स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. पुण्यातही एकजण आहे म्हणे असे परवाच एका पत्रकार मित्राने सांगितले.

In reply to by रमताराम

रमता, अरे अभी तो हम जवान है. उगा अकाली वृद्धत्व मिरवण्यात काय गंमत? तुला भजनच्या ऐवजी भोजन म्हणायचे होते का? चांगल्याच कळा आहेत तुझ्या अंगात. मला भजनाचा उपदेश करायचा आणि स्वतः जंगलवाटांवरचे कवडसे न्याहाळत बसायचं. :)

In reply to by योगप्रभू

शिनिअर शिटिझन्सनी एक तरुण उगवत्या सदस्याचा धागा हायजॅक केलेला बघून शरम वाटली. विषयांतर करणरे इतके प्रतिसाद पाहून मिपाकरांना दिलेल्या सुटीचा किती प्रचंड गैरवापर होतो आहे हे पाहून खूप वाईट वाटले..! सदर धाग्याचा श्री बिपिन कार्यकर्ते, रमताराम, योगप्रभु आणि चतुरंग यांनी खरडफळा सजमून जो दुरुपयोग केला आहे याची मिपाचा सदस्य म्हणून मला अत्यंत लाज वाटते...! मिपावर जास्तीत जास्त मोकळे व खेळकर वातावरण ठेवले आहे याचा गैरफायदा कसा घ्यावा याचं हा धागा म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे... वरील चौघांच्या अनावश्यक आणि वाहवत जाणार्‍या विषयांतराकरता मी उर्वरीत मिपाकरांची हात जोडून क्षमा मागत आहे.. परातात्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नित्यानंदांच.... आय मिन योगप्रभूचं अध्यात्माचं दुकान चालू झालं की आपलं बुडणार हे ध्यानात येऊन स्वामी परेंद्रांनी जो त्रागा चालवला आहे हे पाहून एक अध्यात्मिक मिपाकर म्हणून शरम वाटली. ता.क.: स्वामी योगेंद्रांच्या मठात कार्यकारी अधिकार्‍याची जागा परेंद्रांना द्यावी असे योगेंद्रस्वामी म्हणत होते परवा. मठाचे सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायला एवढा लायक माणूस दुसरा कुठला, असं म्हणत होते. ता.क.२: त्याबदल्यात ते किरकोळ फेवर मागत आहेत ते म्हणजे सौंदर्यफुफाट्याचा डेटा.

In reply to by रमताराम

नित्यानंदांच.... आय मिन योगप्रभूचं अध्यात्माचं दुकान चालू झालं की आपलं बुडणार हे ध्यानात येऊन स्वामी परेंद्रांनी जो त्रागा चालवला आहे हे पाहून एक अध्यात्मिक मिपाकर म्हणून शरम वाटली.
परवाच आमची व योगप्रभूंची एक अत्यंत खाजगी बैठक झाली, ज्यात आम्ही व त्यांनी ह्यापुढे एकत्रच दुकान चालवायचे ठरवले आहे. ह्या निर्णयाला आशिर्वाद द्यायला परमश्रेष्ठ श्री. यक्कु स्वामी खुद्द उपस्थीत होते. आता बोला !

In reply to by परिकथेतील राजकुमार

एकुण गुपितं काढून घेण्याचं आमचं कौशल्य वादातीत आहे हे पुन्हा सिद्ध झाले. थोडक्यात हिटलर नि मुसोलिनी आधीच भेटले होते तर. मग याबाबत आमच्यासारख्या स्टॅलिनला अंधारात ठेवणे ओघाने आलेच. पण शेवटी तुमचं स्टॅलिनग्राड आम्हीच करू, समजलात. (मठाचे उत्पन्न परस्पर लाटले गेल्याने चिडलेला) कॉ. रमताराम. (अर्र, हा प्रतिसाद कोटिभास्करांना कस्काय पडला?)

विमे आता पुणेकरांच्या रडारवर आला आहे : पण हश्या हक्काने वसूल करणारा प्रतिसाद होता. परा ह्यांच्या प्रतिसादात त्याने अनिवासी लोकांच्या पाठीमागे रुंजी घालणार्या भारतीयांबद्दल म्हटले आहे. ह्यावरून वार्यावरची वरात आठवली. पु ल देशपांड्यांना गावात ते मुंबईहून आले आहेत हे कळल्यावर गावकरी त्यांना मुंबईज्वर कसा चढला आहे हे "दिल देखे देखो" असा चाचा करत दाखवून देतात. आमच्या कॉलेजातील एका मित्राच्या पंजाबी परिवारात लग्नासाठी अमेरिकेहून भावंड आली होती. तेव्हा मित्राच्या आईने संगीत मध्ये मुलांना विंग्रजी गाण्यावर नाचायला लावले व प्रत्येक वेळी आपण मुंबईत म्हणजे चेंबूर च्या सिंधी केंप मध्ये नेहमी यु ए से चा माल कसा वापरतो हे अभिमानाने सांगितले ( मागाहून कळले की ह्यांचे यु एस ए म्हणजे उल्लासनगर , सिंधी , असोशिएशन ला म्हणतात. पेठकर व शुची च्या प्रतिसादाशी सहमत. आपले ठेवावे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून ह्याच प्रवृत्तीने मी अनिवासी भारतीय ह्या नात्याने माझ्या परदेशी पत्नीस मुंबई व भारत दर्शन घडवतो. माझ्या प्रत्येक भारतभेटीत मी भारताच्या विविध राज्यांना भेट देऊन माझाच देश जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पुढील भारतभेटीत गोव्यावर स्वारी करण्याचे आधीच मिपावर जाहीर केले आहे. योग्य वेळी गवी व टीम गोवा व इतर मिपाकरांचे मार्गदर्शन घेण्यात येईलच. माझ्या निरीक्षणातून मला असे जाणवले की आमच्या लहानपणी आमचे केनेडा व अमेरिकेतून नातेवाईक व भावंडे आली की आम्ही एक न्यून गंडाने पछाडले जाऊन त्यांना तुमचे घर त्या होम अलोन मधील केविन एवढे मोठे आहे का ? त्यांनी आणलेल्या विडीयो गेम वर भिकार्यासारखे तुटून पडणे. एखादे पेन किंवा अंगावरील झबले अमेरिकेतून आले आहे हे समस्त डोंबिवली ला कळे पर्यंत अंगाहून न काढणे व आठवीत मिळालेल्या परदेशी पेनातून शाळांत परीक्षेचा पेपर लिहिणे इत्यादी प्रकार केले. आता मात्र माझ्या शाळेतील वर्गातील अर्धी मुले अनिवासी आहेत व सगळे चेपू वर आहेत. पण आम्ही भारतात येतो तेव्हा आम्हाला कोणीही वेगळी खास वागणूक देत नाही. अनिवासी शब्दाचे अवमूल्यन भारतीय चलनापेक्षा जास्त झाले आहे. व ह्यांचे मला एक भारतीय म्हणून खूप अभिमान वाटतो. भविष्यातील महासत्ता असे परकीय आपले वर्णन करतात. माझे डोंबिवलीतील काही मित्र आता मुंबईत टोलेजंग इमारतीत नवं श्रीमंतांचा झगा चढवून हम किसीसे कम नही अश्या आवेशात आमच्याशी वागतात. हे पाहून जीव सुखावतो. ह्याच भारतीय उच्च मध्यमवर्गीय वर्गावर तमाम बहुराष्ट्रीय कंपन्या डोळा ठेवून असतात. पदवी नंतर आता काय? असे प्रश्नार्थी चेहरे आजकाल दिसत नाहित. अमेरिकन व इतर प्रगत देशातील नोकर्या स्तलांतरित झाल्याने आजकाल भारतात नवीन वर्ग उदयास आला आहे. आयटीत आम्ही आयटी मध्ये आहोत असे न प्रत्यक्ष न सांगता सर्वकाही सांगून जाणारा वर्ग येथे आहे. अश्या सर्व परीस्थितित अनिवासी भारतात येतो आणि महिनाभराच्या अनुभव व आठवणीची सुदाम्याची शिधोरी घेऊन मायदेशी परततो. पैलतीरी वर्षभर ह्याचं शिधोरीतील पोहे चघळून चघळून त्यास जगायचे असते. आता एखाद्या शितावरून उगाच भाताची परीक्षा करण्यास काय हाशील आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

निनादराव - अगदी मनापासून लिहिलंय तुम्ही. शेवटचा परिच्छेद तर मनाला स्पर्शून गेला...

In reply to by निनाद मुक्काम …

निनादराव, प्रतिसाद आवडला. तरी तो केवळ अनिवासींच्या बाबतीत होता असे म्हणतो.. धाग्यामधे केवळ अनिवासीच नव्हे तर एकुणातच जे जे ईंग्रजी ते ते उत्कृष्ट असते अशी जी धारणा आहे त्या अनुशंगाने येणार्‍या अनुभवांआबत लिहिले होते. भारतात ब्रँड क्रिएशन नाही मान्य आहे, आपल्याकडचे सगळेच ब्रँड हे पाश्चात्य देशांतील ब्रँडच्या मानाने कमी लेखले जातात. भारतीय माणूस भारतीय माणसला किंमत देताना आढळत नाही. वर बर्‍याच लोकांनी नाकारले असले तरी अशा लोकांची संख्या कमी होत असली तरी (?) सध्या खुप आहे. पेठकर काका म्हणतात तसे ईंग्रजी भाषेला इतक्या उच्चपदावर कुणी नेऊन बसवले हाही प्रश्नच आहे. कारण बहुतांश ठिकाणी आपण ईंग्रजी बोलणार्‍याला हाय-फाय समजतो. भारतात प्रॉब्लेम आहेत हेही मान्य आहे, पण मग तुमच्याकडे बाहेर जाण्याचा मार्ग आहेच ना, बाहेर जाऊन पुन्हा भारताची बदनामी (कधी कधी खोटंनाटं सांगून) करण्याची काय गरज आहे? मागे मुंबईत असताना नेदलरलँड्स वरुन तिथल्या गव्हर्नमेंट्चे मोठे अधिकारी आयटी टीमला भेट द्यायला आणी अनुशंगाने भारत बघायला आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांना विश्वास बसेना की मुंबईत ईतक्या मोठ्या बिल्डींग्/ईंफ्रास्ट्रक्चर आहे. त्यांच्या मते भारत म्हण्जे गरीब देश, आजही अंगावर झाडाची पाने गुंडाळणारा टाईप्स. या विचारांमागचं कारण म्हणजे तिथे स्थायीक असलेल्या भारतीयांची त्यांना भारताबद्दल सांगितलेली माहिती. जे लोकं भारतात आलेले नाहीत त्यांना अजुनही भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल गैरसमज आहेत कारण आपल्याच लोकांनी पुरवलेली चुकीची माहिती/ उडवलेली टर. इथे देखील काही भारतीय फिरंगांना अशी काय मस्त माहिती देतात भारताबद्दल की फिरंग भारतात कधीच जाणार नाही याची शपथच घेतो.

माझ्या मते, ज्या काही लोकांमुळे तुम्हांस असं वाटतंय, त्यात त्यांचीही काही चूक नाही. बिचार्‍यांना परमेश्वराने द्वंद्वात्मक आघात सहन करण्याची पुरेशी ताकद दिली नसावी. एक चालतं बोलतं उदाहरण घ्या ना! दीक्षित-नेने बाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचा "अ‍ॅक्सेंट" काही बदलला नाही. जे लोक परदेशात दोन-तीन वर्षांहून अधिक काळ राहून आलेत ते तिची बाजू निदान समजू शकतात आणि ज्यांनी उभ्या आयुष्यात कधीही परदेश पाहिला नाही त्यांचं तिच्या नावाने बोटं मोडणंही मी समजू शकतो. मी स्वत: अमेरिकेत दीड वर्ष वास्तव्य केलं, जाण्यापूर्वी अमेरिकेबद्दलचं मत प्रतिकूल होतं, अगदी राजकारणापासून ते संस्कृती पर्यंत, पहिले सहा महिने तुलना करण्यातच गेले. पुढचे सहा अमेरिका समजण्यात आणि त्यानंतरचे अमेरिकेच्या प्रेमात गेले. ज्या-ज्या गोष्टींबद्दल मत प्रतिकूल होतं, वा ज्या-ज्या गोष्टींचा तिरस्कार होता त्याची जागा प्रेमाने घेतली गेली. बहुतेकांच्या बाबतीत असंच होत असावं कारण त्यांचं तिथल्या मातीत मिसळून जाणं. भारतात परतल्यावर द्वंद्व उभंच ठाकलं! आतापर्यंत जे-जे चुकीचं समजत होतो ते अगदीच चुकीच नाही आणि जे-जे एकदम बरोबर समजत होतो ते सगळंच अगदी बरोबर नाही हे उलगडून चुकलं. अगदी खाद्य संस्कृती पासून ते व्यक्तिस्वातंत्र्यापर्यंत. पण लवकरच माझ्या सुदैवाने मला कळून चुकलं की जग विशाल आहे. परमेश्वर म्हणा, नाहीतर कुठलीशी शक्ती म्हणा, यांनी असा काही धागा विणलाय अशी काही माया उभी केलीए, की एका टोकाला एक तर दुसर्‍या टोकाला विरुद्ध गोष्टी आपापल्या ठिकाणी नांदताना दिसतात. ज्याला हे समजून चुकतं, जो हा विरोधाभासाचा आघात सहन करू शकतो, तो मग, ज्या आनंदाने इथल्या पुठपाथवरल्या भैय्याकडचं व्हेज सँ"ड"विच (ड चा पूर्ण उच्चार करून) खातो त्याच आनंदाने परदेशात व्हाईट कॅसल मधले हॅमबर्गर्स (बीफ), "सॅविचेस" खातो. नाहीतर तुम्ही म्हणता त्याच्या अगदी उलट, तिथे अगदी ७-८ वर्ष राहून पण त्यांच्या खाद्यसंस्कृती म्हणा वा इतर काही गोष्टीवर म्हणा यावर नाकं मुरडणारी माणसं मी पाहिली आहेत. असो, असं फर्स्ट हेट अ‍ॅण्ड देन लव असं बर्‍याच बाबतीत होतं. वर कुणी तरी पुणं आणि पुण्याबाहेरलं जग अशी तुलना केली होती, अगदी तसंच, गिरणगाववाल्यांच, लालबागची चाळ संस्कृती आणि उपनगरातली फ्लॅट संस्कृती बाबत होताना दिसतं. बाकी दुसरं म्हणजे उगाचच भारतीय ब्रँडना कमी लेखणं, विंग्रजीला अतिमहत्त्व देणं वगरै वगरै..याला त्या व्यक्तीच ते अज्ञान आहे असं म्हणून सोडून द्यायचं.

पेठकर काका म्हणतात तसे ईंग्रजी भाषेला इतक्या उच्चपदावर कुणी नेऊन बसवले हाही प्रश्नच आहे. कारण बहुतांश ठिकाणी आपण ईंग्रजी बोलणार्‍याला हाय-फाय समजतो. अगदी मिपावरसुद्धा मराठीचा आग्रह धरणार्‍याला 'जुने खोंड', 'मागची पिढी' असे म्हणत, इतर भाषेतील शब्द अंगिकारूनच भाषा 'समृद्ध' होते अशा नवविचारांचे बाळकडू पाजले जाते. कधी कोणाच्या चुका दाखविल्याच तर लक्षात ठेऊन सूड उगविला जातो. आपल्या मातृभाषेलाच 'कार्ट' ठरवायला निघालेले काही जणं 'आपला देश' वगैरे व्यापक विचार काय करणार? त्यामुळे ह्याला आवर न बसता 'इंग्रजी बाळ्या आणि देशी कार्ट' ही वृत्ती वाढीस लागणारच.