Skip to main content

आरोग्य मित्र प्रकल्प - सेवा भारति पुर्वांचल

लेखक विश्वास कल्याणकर यांनी शुक्रवार, 09/03/2012 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालैंड, मणीपुर, मेघालय, मिझोराम व त्रिपुरा हे भारताच्या इशान्येकडिल ती राज्ये आहेत जेथे सुर्याची पहिली किरणे पडतात. रामायण, महाभारत कालापासुन किंबहुना त्या पुर्वी संस्कृती च्या आरंभ काळापासुन सप्तभगिनीचा हा भुप्रदेश आपल्या पवित्र मातृभुमीचा एकसंघ व एकतेचा सांस्कृतिक वारसा जपत आहे. या प्रदेशात राहणारे निवासी हे मुख्यत: जनजाती वर्गात मोडतात. अति दुर्गम व विषम परिस्थीतीत व प्रतिकुल नैसर्गीक अडचणींना तोंड देत, तसेच आर्थीक विवंचनेत जगत असुनही ते आपला सांस्कृतीक वारसा जपत आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. यातील बहुताश जनजाती बंधु आणि भगिनी आधुनिक वैद्यकिय सुविधे पासुन वंचित आहेत. सेवा भारति पुर्वांचल या संस्थेने मुख्यत: या दुर्लक्षित अशा आरोग्य क्षेत्रात काम करण्याचे प्रथम ठरविले. व त्यादृष्टिने १९९३ मध्ये आरोग्य मित्र या प्रकल्पाद्वारे या ग्रामीण व निम्न स्तरावरील दुर्लक्षित जनजातिंमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करण्याचे काम सुरु केले. आरोग्य मित्र प्रकल्प हा सेवा भारती पुर्वांचल चा एक फार विस्तृत असा प्रकल्प आहे. आजच्या घडिला आरोग्य मित्रा चे कार्य इशान्य भारतातील ५००० खेड्यात पसरले आहे. या प्रकल्पाद्वारे या भागातील व्यसनांधीन तरुणांना व्यसनापासुन परावृत्त करुन त्यांना सुरळीत मार्गावर आणुन त्यांना त्यांच्या संस्कृतीची पुन्हा ऒळख पटवुन त्यांच्यात राष्ट्रियत्वाची भावना निर्माण करणे हे महत्कार्य खेड्यात पसरलेले संस्थेचे आरोग्य मित्र करित आहेत. "आरोग्य मित्र" प्रकल्पद्वारे येथील ५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांचा आठवड्यातुन दोन दिवस दिड तासांचा "आरोग्यम" हा कार्यक्रम राबविला जातो. यात त्यांच्यात शिक्षण, चरित्र निर्माण व आरोग्या विषयी जागृकता निर्माण केल्या जाते. आरोग्य मित्र प्रकल्पाची उद्दिष्टे : ग्रामीण क्षेत्र, जनजाती बहुल भाग,व चहाच्या मळ्यातील कामगार वर्गाच्या वस्त्यांमध्ये कमीत कमी प्राथमीक वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे. निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने परिसरातील स्वच्छ्ता व स्वत:चे स्वास्थ निट ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी या बाबत प्रशिक्षण देणे. प्राथमिक चिकित्से बाबत प्रशिक्षण देणे. आरोग्या बाबत पुर्वापार व परंपरागत उपचाराबाबत जसे आयुर्वेदीक उपचार, त्यांना माहीती देणे व प्रोत्साहीत करणे आरोग्य मित्रांच्या मदतीने त्यांचा सामाजिक व आर्थीक दर्जा उंचावणे व त्यांच्यात राष्ट्रियत्वाची व समानतेची भावना निर्माण करणे याबाबत प्रबोधन व आवश्यक तेथे मदत करणे ही कामे केली जातात. आजतागायत आरोग्यमित्र प्रकल्पाद्वारे ५१३१ केंद्राद्वारे या भागात ९ लाख लोकांना वैद्यकिय सेवा उपलब्ध केल्या गेली आहे. यात जंगलात राहणार्‍या जनजातींना त्यांच्या आजारपणात मदतीचा हात देणे. पैरासिटामाल सारख्या गोळ्यांसाठी त्यांना १०-१५ कि.मी पायी जावे लागत असे तेथे वैद्यकिय मोबाईल सेवा उपलब्ध केल्या गेली. या भागात पाण्यापासुन होणार्‍या आजाराचे प्रमाण खुप जास्त होते. आरोग्यमित्राने त्यांच्यात आरोग्य विषयक जागृती निर्माण केल्या मुळे आता ते पाणी उकळुन किंवा स्वच्छ करुन पिणे व स्वच्छता पाळणे याबाबत जागृत झाल्यामुळे आजाराचे प्रमाण खुपच कमी झाले आहे. सेवा भारतीने जनजातीतील तरुणांना प्राथमीक उपचारांचे प्रशिक्षण देउन त्यांना त्यांच्या समाजासाठी काम करावयास उद्युक्त केले. त्यामुळे आज स्थानीक जनजातीचे तरुण समाज सेवेचे काम करतांना आढळतात..

वाचने 4232
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सेवाभारती प्रकल्पास हार्दीक शुभेच्छा. अमृत

या सर्व माहितीसाठी धन्यवाद! ईशान्य भारतात नशेच्या पदार्थांचं वापराचं प्रमाण जरा जास्त आहे असं कुठेतरी वाचलेलं अंधुक आठवतंय. हे खर आहे का?

नमस्कार भारतातील कुठल्याही जनजाती समुहात स्थानीय मद्य पान व नृत्य हा त्यांच्या संस्कृतीचा गाभा असतो. ते व्यसन नसुन त्यांच्या जिवनाचा एक भाग आहे. आणी त्यात त्यांना आपण काही वावगे करतो असे वाटत नसते. इशान्य प्रदेश हा तेथील भौगोलीक परिस्थीती मुळे एक संवेदनशील प्रदेश आहे. त्यामुळे अर्थातच केन्द्र सरकारचे तिकडे विशेष लक्ष्य असते. तेथे परकिय शक्तींचे देखील विवक्षित कारणाने हितसंबंध गुंतले आहेत. ३६०० मैलाची आंतरराष्ट्रिय सिमा असलेला हा भाग भारताशी केवळ ६० कि.मी पट्टीने जोडला आहे. या व येथे असलेली उग्रवादी संघटनांचे जाळे यामुळे केंन्द्र सरकात येथील राज्य सरकारांना दरवर्षी करोडो रुपयांचे पैकेज विकासाच्या नावाखाली गेल्या ५०-६० वर्षापासुन देत आली आहे. भारत भर असणारा भ्रष्टाचार येथे देखील आहे. त्यामुळे हा पैसा देखील सगळ्यांच्या हाती समसमान खेळत असतो. विनासायास आलेला पैसा मग चैनी मध्ये खर्च होतो. येत्थील तरुण पिढी मोकळ्या संस्कृती मुळे या पैशाचा वापर ओघाने नशेखोरीत करते. शस्रांची व मादक पदार्त्थांची तस्करी येथे सर्रास चालते. उमलत्या पिढीवर योग्य ते संस्कार व्हावे यादृष्टीने सेवा भारती येथे, आरोग्य मित्र, आरोग्यम, गोपालन गोग्राम इत्यादि प्रकल्प राबवुन या सर्व गोष्टीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करित आहे व त्यात त्यांना भरपुर यश मिळत आहे. पण ही एक दिर्घ कालीन प्रक्रिया आहे. यात आपल्या सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. वर्षातुन काही दिवस जरी प्रत्येकाने या कामासाठी देण्याचे ठरविले तरी खुप मोठी क्रांती होउ शकते.