Skip to main content

जीवनाचे ध्येय काय ?

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 01/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
उमेदीच्या काळाच्या सुरुवातीस एका मुलाखतीत मला एक प्रश्न विचारला गेला होता. 'तुमच्या जीवनाचे ध्येय काय ?' 'What is the esteem of your life ?' या प्रश्नाचे निश्चित असे उत्तर मला अजूनही सापडलेले नाही. सर्वसाधारणपणे आम्ही आमच्या जीवनाचे ध्येय ठरवतो ते असे. डॉक्टर, इंजीनीअर झालो की माझे ध्येय साध्य होईल. पदवी मिळते. पुढे ? भरपूर पगाराची नोकरी मिळाली की माझे ध्येय साध्य होईल. पुढे चांगली बायको, मुलेबाळे, स्वत:चे घर, आणखी पैसा, आणखी सोयी, परदेशगमन... ! अरे, अरे, किती ही ध्येये ? त्यांच्यामागे पळता पळता एक दिवस हे सगळं राहतं इथेच अन पळणारा जातो स्वधामाला... चांगली पदवी, चांगला व्यवसाय, चांगला/ली जीवनसाथी, मुलेबाळे, उपनगरात एक छोटंसं घरकुल , भरपूर पैसा, विस्तृत मित्रपरिवार इ. इ. यांना जीवनाची ध्येये म्हणावे का? यापेक्षा अधिक व्यापक ध्येय कोणते ? सामान्य माणसाच्या जीवनाचे ध्येय काय असावे ? थोर थोर नेते , राष्ट्रपुरुष यांची कार्ये ही सामान्य माणसांच्या जीवनाचे ध्येय असावे का ? तितकी कुवत आहे की नाही हे नको का पाहायला ? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते ध्येय साध्य करण्यातच आपले हित आहे हे आपल्याला निश्चित माहिती आहे का ? तसे पाहिले तर ध्येय ठरवताना ते साध्य केल्यानंतर आपण सुखी होऊ अशी आपली खात्री असते. पण ते साध्य होते तेव्हा हे सुख ओंजळीतल्या पाण्यासारखे कधी निसटून जाते हातातून कळतही नाही. तेव्हा ध्येय ठरवताना सुखाचा विचार होणे आवश्यक असावे. तसेच प्रत्येकाच्या जीवनाचे ध्येय अगर उद्देश्य सारखे असण्याचे मुळीच कारण नाही. निसर्गात हजारो अविष्कार पाहायला मिळतात. पण एक जीव कधी दुसऱ्यासारखा नसतो. एक पान दुसऱ्यासारखे नसते, एक दृश्य कधी दुसऱ्यासारखे नसते. अगदी जुळ्या मुलांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचा रेटिना यात फरक असतोच. मग एकाच्या जीवनाचे ध्येय दुसऱ्यासारखे का असावे ? यशस्वी व्यक्तींच्या मुलाखतीमध्ये एक ठराविक प्रश्न असतो. 'तुमच्या लहानपणी तुम्हाला कोण व्हायचे होते ?' माझ्या माहितीत तरी आजवर या प्रश्नाचे उत्तर एकाही प्रसिद्ध व्यक्तीने 'आज जो मी आहे तोच.' असे दिल्याचे आठवत नाही. गायकाला डॉक्टर व्हायचे होते. अभिनेत्याला चित्रकार व्हायची आकांक्षा होती. उद्योगपतीला आर्किटेक्ट होण्याची इच्छा होती अन बँकरला साहित्यिक व्हायला आवडले असते. पण तरीही या व्यक्ती आपापल्या जीवनात इतक्या यशस्वी झाल्या की त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. तेव्हा ध्येय ठरवताना आपल्या खऱ्याखुऱ्या आवडीनिवडी, कल महत्त्वाचे की आपल्याला काय चांगले जमते अन कशात गती आहे हे महत्त्वाचे ? तसेच अयशस्वी व्यक्तींच्या कधी मुलाखती जाहीर झाल्या नाहीत. पण त्यापैकी काहींच्या अनुभवावरून असे लक्षात येते की त्यांनी वारंवार व सर्वतोपरी प्रयत्न करूनही काही गोष्टीत त्यांना कधीच यश मिळाले नाही. याउलट काही व्यक्तींच्या बाबतीत असेही घडते की सहज हात पुढे करावा अन हातात फळ पडावे तसे एकाच अन साध्याच प्रयत्नात त्यांना लगेच यश मिळते. जुळ्या मुलांचेही नशीब वेगवेगळे असते. मुळात जीवनात काही ध्येय असावे का ? की आपले वारा येईल तशी पाठ फिरवण्यातच शहाणपणा आहे ? यावर इतरांची मते व अनुभव ऐकायचे आहेत.

वाचने 24033
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

वा वा लिनाआजी मजा येणार. ‍ कितीवेळ कसं सुनं सुनं वाटत होतं.. लोक झोपा काढत होते वाटतं बहुतेक दुपारच्या वेळी. मलाही हेच प्रश्न पडतात - पण काही उत्तर सुचत नाही तरी जीवन जगावं लागतं. जीवन जगून संपले की कदाचित उत्तरे मिळतील. किंवा ज्यांचे जीवन जगून संपले असेल आणि गाडी यायला उशीर असेल त्यांनी उत्तर देण्‍याचे पुण्‍यकर्म करावे.

मलाही हेच प्रश्न पडतात - उत्तराचा शोध चालू आहे. माझ्या तुटपुंज्या ज्ञानाने आणि अनुभवाने, मला असं वाटतं की, स्वतःचा शोध लागणं हे पहिलं पाउल असावं. तो शोध एकदा का लागला की मग की मग आयुष्यात ध्येय गवसतं. ह्याच विषयावर स्वतःच्या ब्लॉगवर काही बाही लिहायचा प्रयत्न चालू आहे. बघू कितपत जमतोय?

जीवनध्येयावर मत द्यावे असा अनुभव अजून गाठीशी नाहीये... पण काही गोष्टी कॉलेजात असतानाच ठरवल्या आहेत, एक म्हणजे रात्री शांत झोप लागली पाहिजे (आपण अपेक्षा छोट्या ठेवल्या की अपेक्षाभंग तितक्या तीव्रतेने जाणवत नाही. :-)) दुसरी - समाधानी राहून सतत असंतुष्ट राहणे. ....

In reply to by मोदक

आपण अपेक्षा छोट्या ठेवल्या की अपेक्षाभंग तितक्या तीव्रतेने जाणवत नाही.
ह्या वाक्याला सहमती... कारण मी ही असंच वागतो... लाँग डिस्टन्स /टाइम टार्गेट्स सेट केले की काशी होते... अन मग मुळातच अपेक्षाभंग होतो...
सामान्य माणूस वाईट परिस्थितीत किंवा संकटात कसे वागतो, निर्णय घेतो, त्याग करतो किंवा आपलेसे करतो, या गोष्टी त्याच्या सद्सदविवेकबुद्धीवर अवलंबून असते.
स्वातीविशुंचा हा प्वाइंट आवडला... सर्वांचे प्रतिसाद वाचनीय अन ''थत्तेचाचांचा'' प्रतिसाद तर क्या बात...

In reply to by वपाडाव

>>>लाँग डिस्टन्स /टाइम टार्गेट्स सेट केले की काशी होते लाँग डिस्टन्स /टाइम टार्गेट्स ठरवताना करताना टॉलरन्स + पेशन्स ची योग्य सांगड घालणे जमले पाहिजे... फक्त आपले माईलस्टोन, लोअर लिमीटस आणि बॅकअप प्लॅन आधीच ठरवून घ्यावे लागतील.. (हा प्रतिसाद थोडासा "यो" किंवा "डूड" च्या पातळीवर गेला आहे वाटते. ;-))

कमीतकमी पन्नाशीनंतर तरी प्रत्येकाने स्वतःला "मी,मी, माझे,माझे, मला,मला" या वृत्ती पासून सोडवण्याचे ध्येय ठेवावे. आसक्तीतून सुटका झाली तर परमशांती मिळते.

मी एक प्राणी असल्याने पुढील दोनच ध्येये आहेत. १. शक्य तितका काळ जिवंत राहणे. (या ध्येयाच्या पूर्ततेसाठी जेवणे, त्या साठी अन्न मिळवणे त्यासाठी पैसा कमावणे, आरोग्य चांगले ठेवणे, त्यासाठी पैसा कमावणे, थंडी पाऊस यांपासून संरक्षण मिळवणे, त्यासाठी घर घेणे म्हणून पैसा कमावणे, कमावलेला पैसा चोरला जाऊ नये म्हणून घराचे संरक्षण करणे म्हणून पैसा कमावणे) १ ब. वरच्या ध्येयासाठी पैसा कमावण्यासाठी काम धंदा करावा लागतो ; कामधंद्यावर कपडे घालून जावे लागते म्हणून कपडे घेण्यासाठी पैसा कमावणे. २. माझे जीन्स पुढे संक्रमित करणे (या ध्येयाच्या पूर्ततेसाठी मुले जन्माला घालणे, त्यांचे संगोपन करणे, त्यांना आरोग्य मिळवून देणे, शिक्षण देणे , त्यासाठी पैसा कमावणे) बघा माझी ध्येये किती साधी आहेत. ;)

In reply to by नितिन थत्ते

@बघा माझी ध्येये किती साधी आहेत.>>> ए...ढिशक्याँव ढिशक्याँव ढिशक्याँव.... ठ्ठो ठ्ठो ठ्ठो

In reply to by नितिन थत्ते

......त्यासाठी पैसा कमावणे!!! अहो माणसाने अध्यात्मिक, साहित्यिक वा वैचारिक काहीही असण्याचं वरून सोंग आणू देत... पण जोपर्यंत दिडक्या टिचवल्याशिवाय या जगात जर अन्न, वस्त्र आणि निवारा मिळत नाही तोवर 'पैसा कमावणे' हे ध्येय न ठेवून आपण सगळे सांगतोय कुणाला? :)

"Question Authority..." हेच माझे आपल्या प्रश्नाला उत्तर आहे ;) बाकी मला स्वतःला ट्विलाइट मधील जेसिकाज स्पिच कायम मजेशीर वाटतं . ती म्हणते When we were five, they asked us what we wanted to be when we grew up. Our answers were things like astronaut, president, or in my case… princess. When we were ten, they asked again and we answered - rock star, cowboy, or in my case, gold medalist. But now that we've grown up, they want a serious answer. Well, how 'bout this: who the hell knows?! This isn't the time to make hard and fast decisions, its time to make mistakes. Take the wrong train and get stuck somewhere chill. Fall in love - a lot. Major in philosophy 'cause there's no way to make a career out of that. Change your mind. Then change it again, because nothing is permanent. So make as many mistakes as you can. That way, someday, when they ask again what we want to be… we won't have to guess. We'll know..." असो, मुलाखती दरम्यान असल्या असंबध्द प्रश्नांचा खरपुस समाचार घ्यावा हेच बरं. मलाही काही प्रश्नांचा सामना करावा लागला जसंकी... सध्या तुम्ही काय करताय ? म्हटलं आज रात्री कोणता चित्रपट बघावा याचा विचार करतो आहे... मग तुम्ही जॉब स्विच का करताय ? म्हटलं सांगा तुम्ही ही कंपनी का उघडुन ठेवली आहे ?( अथवा तुम्ही इथं जॉब का करताय ?) अर्थातच पैसा... हे काय विचारणं झालं ( वरुन इतके कसे मंद हो तुम्ही असा भाव चेहर्‍यावर आणायचा) ;) थोडक्यात अशा प्रश्नांना योग्य जागी मारणे जास्त चांगले.

आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे याच्या संकल्पना अनेकदा बदलत असतात हे आपणच आपला भूतकाळ आठवून बघितले की लक्षात येईलच. त्यात चूकही काही नाही. जसे अधिक जग बघितले जाते त्याप्रमाणे सगळ्या कल्पना अधिक realistic होत जातात. पण काहीही असले तरी आपण स्वतःला इतर ओळखत असतात त्यापेक्षा नक्कीच जास्त चांगले ओळखतो. तेव्हा आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे आपले आपणच ठरवावे. ते इतरांना अजिबात ठरवू देऊ नये.म्हणजे जे काही होईल त्याची जबाबदारी केवळ आपली आणि आपलीच. इतर मंडळी अनेकदा आपल्याला "तू अमूक एक गोष्ट कर" असे सांगून स्वत:चे अजेंडे आपल्याकडून राबवून घ्यायचा प्रयत्न करतात. इतरांनी सांगितलेली गोष्ट आपण केली आणि त्यात आपण यशस्वी ठरलो तर त्याचे श्रेय लाटायला ही मंडळी सगळ्यात पुढे. आणि त्यात आपल्याला अपयश आले तर मात्र "मी तुझ्या चांगल्यासाठी सांगितले होते. तुला अपयश आले हे तुझे नशीब" असे म्हणून कधीही पसार होऊ शकतात. तेव्हा आपल्याला नक्की काय हवे हे माहित हवेच आणि त्या गोष्टीसाठी वेळ पडली तर इतरांचा विरोध पत्करूनही वाटेल तितके कष्ट करायची तयारी हवी आणि आपल्याच आयुष्याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायला हवी. हे सगळे करता येत नसेल अशा मंडळींविषयी मात्र काही बोलायचे नाही. Steve Jobs चे Stanford विद्यापीठात दीक्षांत समारंभाला केलेले अजरामर भाषणातील शेवटच्या काही ओळी मला नेहमीच अपील करतातः "Your time is limited, so don't waste it living someone else's life. Don't be trapped by dogma which is living with the results of other people's thinking. Don't let the noise of others' opinions drown out your own inner voice. And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary."

गोष्ट आहे अविनाश धर्माधिकारी यांच्या एका भाषणातील. बडोद्याच्या राजाला राज्याचा वारस म्हणून आणि राजा व्हायला योग्य असा मुलगा दत्तक घ्यायचा असतो.त्यासाठी ठिकठिकाणची मुले राजवाड्यात 'मुलाखतीसाठी' आलेली असतात.सगळ्या मुलांना विचारायच्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न समान होता,"काय रे बाळ, इथे कशाला आलास". त्यावर काही मुलांनी मी राजा झालो तर मला सोन्याचांदीने झालेल्या रथातून फिरायला मिळेल, मला दूध खूप आवडते तेव्हा मी राजा झालो तर मला पाहिजे तितके दूध मिळेल, मला लाडू खूप आवडतात तेव्हा मी राजा झालो तर मला पाहिजे तितके लाडू मिळतील अशा पध्दतीची उत्तरे दिली. एका कुटुंबातील तीन मुले त्या मुलाखतीला गेली होती.त्यातील एक मुलगा तर तो प्रश्न ऐकून पळूनच गेला.दुसरा म्हणाला--"कोन जानं" म्हणजे "मला माहित नाही". पण तिसरा मुलगा आत्मविश्वासाने म्हणाला,"मी इथे राजा व्हायला आलो आहे".आणि हाच मुलगा राजा म्हणून निवडला गेला. हा मुलगा पुढे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड या नावाने प्रसिध्द झाला. अविनाश धर्माधिकारी म्हणतात-- "काय रे बाळ इथे कशाला आलास?" या प्रश्नाला खूप छटा आहेत. आयुष्य आपल्याला पदोपदी विचारत असते,"काय रे बाळ इथे कशाला आलास". या प्रश्नाचा अर्थ "तू सायन्सला कशाला आलास, आर्ट्सला कशाला आलास इथपासून तू माणूस म्हणून जन्माला कशाला आलास" इथपर्यंत जातो.हा प्रश्न ऐकताच आपल्यातले काही पळूनच जातात.काही म्हणतात,"कोन जानं" म्हणजे मला काय माहित.काही म्हणतात मी मला दूध मिळेल म्हणून, लाडू मिळतील म्हणून. पण आपल्यातील किती जण "मी राजा व्हायला आलो" हे आत्मविश्वासाने सांगू शकतात? या गोष्टीचा (मला कळलेला) मतितार्थ असा की यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपण सध्या जे करत आहोत ते का करत आहोत हे माहित असणे खूपच महत्वाचे आहे. आणि अविनाश धर्माधिकारींच्या गोष्टीमध्ये मी थोडी भर घालून म्हणतो की आयुष्य आपल्याला "काय रे बाळ इथे कशाला आलास" या प्रश्नाबरोबरच "इथून पुढे कुठे जाणार आहेस" हा प्रश्नही विचारत असते.या दोन्ही प्रश्नांची उत्तरे "मला माहित नाही" अशी असतील तर यशस्वी व्हायची शक्यता अगदी शून्यच.

द लास्ट सामुराई मधे एक वाक्य आहे.... As for the American captain, no one knows what became of him. Some say that he died of his wounds, others, that he returned to his own country. But I like to think, he may have at last found some small measure of peace that we all seek and few of us ever find. हे सुद्धा असु शकत का जीवनाचे ध्येय?

एकाचा आनंद हा दुसर्‍याचे दु: ख असता कामा नये. पण काही वेळेला ते असते. उदा." मी मेहनत केली पण प्रमोशन रंगनाथनलाच मिळाले." अशी स्थिती असेल त्या वेळेला . एरवी कालाच्या दीर्घ पट्यावर आपले जीवन फार नगण्य . सबब त्याचा फारसा गंभीरपणे विचारच न करणे. कारण सारेच अशाश्वत आहे. पण जाणीवांचा हा फसवा खेळ खेळणे भागच आहे. सबब आनंद घेत रहाणे देत रहाणे . म्हणजेच मिपावर येत रहाणे.

शिर्षकातले पहिलेच दोन शब्द वाचून *सखाराम गटणेची आठवण झाली. पण प्रतिक्रिया आवडल्या. *व्यक्ती आणि वल्ली मधला, आपले काडीवाले नव्हेत.

कधी कधी नशिब असावे लागते मग लोकल मधल्या डब्या सारखे आपण फक्त त्या घटकेला दारा जवळ कोठे तरी योग्य रीतीने उभे रहायचे, डब्या मधून उतरणा-या (किंवा डब्या मध्ये चढणा-या) लोकांच्या धक्या मुळे आपोआपच आपण डब्या तून उतरतो (किंवा डब्या मध्ये चढतो).

डोळे उघडणारा लेख आणि तितकेच प्रबोधक प्रतिसाद आवडले. जीवनाला ध्येय असते किंवा असायला पाहिजे हेच मला माहित नव्हतं. आता शोधलं पाहिजे काहीतरी. बेटर लेट द्यान नेव्हर. आणि हो, तेवढं ते यशस्वी म्हणजे काय ते कोणी सांगितलं तर तेही व्हावं म्हणतो.

बिल्याक लेबल १०० रुपयामधे कशी मिळेल यावर संशोधन आणि प्रयत्न करत रहाणे

ध्येय या शब्दा इतके ही हा प्रकार अवघड नसतो. त्याची चर्चा केल्याने हा प्रकार विनाकारण गुंतागुंतीचा होतो. प्रत्येक माणसाला ज्याला किमान काही विचार करता येतो त्याला ध्येय निश्चिती करता येते. भारतीय मध्यमवर्गिय मानसिकता ब-याचदा काही सामाजीक आशय असणा-या उद्दिष्टांनाच ध्येय वगैरे समजते, हे चुक. बाकी वर आलेली सगळी ध्येयं मला तरी उदात्त आणि सामाजिक सुंदरतेचे पैलु वाटतात. या लेखामुळे आपण एक विषय चघळायला दिलात त्याबद्दल आभार.

खरेतर ध्येय ठरवून कधीच साध्य होत नसतात. यशस्वी कधीच ठरवून (काही अपवाद वगळता) होता येत नाही. सामान्य माणूस वाईट परिस्थितीत किंवा संकटात कसे वागतो, निर्णय घेतो, त्याग करतो किंवा आपलेसे करतो, या गोष्टी त्याच्या सद्सदविवेकबुद्धीवर अवलंबून असते. तसेच लेखात लिहिल्याप्रमाणे नशिबाची साथ असणे मह्त्त्वाचे आहे.

In reply to by स्वातीविशु

नशिबावर हवाला हा रडण्याचा प्रकार आहे. ज्यांच्या आयष्यात बहाण्याशिवाय काही नाही त्यांना नशिबाचा अवलंबून राहावे लागते. जरा तिखट वाटणारी प्रतिक्रिया देतोय पण, असेल हरी तर देईल खाटल्यावरी या वृत्तीने अत्यंत कतृत्व संपन्न भारतीय समाजाचे वाट्टोळे केले आहे, आणि ही वृत्ती संक्रमित होते आहे, पिढ्यानपिढ्या ! हवे असेल तेते सर्व घडविता येते त्या साठी करावी लागणारी मरणी धडपड कमी पडली की नशिबाच्या डबक्यात डुंबावे वाटते. नशीब वगैरे काही नसते. ठरविलेल्या ( ध्येय ) गावाला जायला प्रचंड जोमाने, पोचल्या शिवाय थांबणार नाही या उर्जेने सुरवात केली की पोचाल ना. मध्ये पाऊस येईल, रात्र येईल, अपघात होईल, भूक लागेल, तहान लागेल, वगैरे वगैरे. सगळेच सामान्य असतात. जे सगळी संकटं पचवून, बाजूला सारून पुढे जातात ते तुमच्या लेखी अपवाद होतात, किंवा असामान्य. पण त्यांची ही सुरुवात तुमच्याच स्थानकावरून होते. रडू नका. नशीब नावाच्या अदृश्य हवाल्याला टाका कचऱ्याच्या टोपलीत.

In reply to by स्वातीविशु

नशिबावर हवाला हा रडण्याचा प्रकार आहे. ज्यांच्या आयष्यात बहाण्याशिवाय काही नाही त्यांना नशिबाचा अवलंबून राहावे लागते. जरा तिखट वाटणारी प्रतिक्रिया देतोय पण, असेल हरी तर देईल खाटल्यावरी या वृत्तीने अत्यंत कतृत्व संपन्न भारतीय समाजाचे वाट्टोळे केले आहे, आणि ही वृत्ती संक्रमित होते आहे, पिढ्यानपिढ्या ! हवे असेल तेते सर्व घडविता येते त्या साठी करावी लागणारी मरणी धडपड कमी पडली की नशिबाच्या डबक्यात डुंबावे वाटते. नशीब वगैरे काही नसते. ठरविलेल्या ( ध्येय ) गावाला जायला प्रचंड जोमाने, पोचल्या शिवाय थांबणार नाही या उर्जेने सुरवात केली की पोचाल ना. मध्ये पाऊस येईल, रात्र येईल, अपघात होईल, भूक लागेल, तहान लागेल, वगैरे वगैरे. सगळेच सामान्य असतात. जे सगळी संकटं पचवून, बाजूला सारून पुढे जातात ते तुमच्या लेखी अपवाद होतात, किंवा असामान्य. पण त्यांची ही सुरुवात तुमच्याच स्थानकावरून होते. रडू नका. नशीब नावाच्या अदृश्य हवाल्याला टाका कचऱ्याच्या टोपलीत.

In reply to by स्वातीविशु

कॉर्पोरेट वर्ल्ड, ध्येय वा गोल सेटींग वरच चालतं. थोड्याफार फरकाने व्यक्तिगत आयुष्यातही त्याच तत्त्वावर मार्गक्रमण करता येऊ शकतं, असं मला वाटतं. दुसरं म्हणजे ध्येय साध्य झाली नाहीत तरी नाउमेद न होता तितक्याच जोमाने "पुन:च्छ हरिओम" म्हणून मार्ग शोधत राहणं आणि पर्यायाने एका विशिष्ठ दिशेने आयुष्याची वाटचाल होणं अधिक महत्त्वाच आहे असं वाटतं. "देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं" हे टिळकांच स्वप्न वा ध्येय होतं, ते त्यांच्या हयातीत पूर्ण झालं का? नाही. पण त्या ध्येयासाठी त्यांच्या हातून जे महत कार्य झालं ते महत्त्वाचं. अर्थात मोठ्या माणसांच्या गोष्टीच वेगळ्या. पण सामान्य माणसाने (स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना) त्याच्या आयुष्यातली असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड केली तरी आयुष्याला अर्थ येउ शकेल असे वाटते.

बापरे! 'ध्येय' वगैरे मोठ्ठ्या गोष्टी वाटतात. त्यापेक्षा 'प्रायॉरिटी' बरी वाटते, माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीला.

In reply to by रेवती

यु शी ! यू नो ! यू आर करेक्ट ! युवर ऑनर ! युवर हायनेस ! युवर चॉईस यीज ब्येस ! व्हाट ? 'प्रायॉरिटी' आय मीन ! ध्येय मान्साला चिकाटलं क्यी त्येचं जीवण लई म्वोनोटोनस व्हतंया !

In reply to by रेवती

हे मात्र खरोखरच प्रॅक्टिकल वाटते. ध्येय ठरवून स्वतःचि पळवणूक करून घेण्यापेक्षा रस्ते बदलत रहाणं सोयीचं आहे.

खरेतर ध्येय १च असते या जिवन रुपि समुद्रातुन मोक्श रुपि किनारा गाठ्णे. बाकि सर्व मनाचे खेळ.

८४ लक्ष योनी मधून भ्रमंती केल्यानंतर हा नरदेह प्राप्त झाला आहे. त्याचे जमेल तेवढे चोचले पुरवणे. आयुष्यात सुख उपभोगणे

या धाग्याला इतका भरून प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. तेही सर्व चांगले. आणि त्यातुन माझे तर नक्कीच प्रबोधन झाले आहे. सर्वांना मनापासुण धन्यवाद !

आमद बराए बंदगी बिन बंदगी जिंदगी शर्मिंदगी बंदगी करता नही बन्दा हुवा तो क्या हुवा गेरुआ कपडा अगरचे रंग लिया तो क्या हुवा