Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पा on Wed, 12/14/2011 - 16:52
लेखनविषय (Tags)
प्रवास
राहणी
माझं गाव मु पो . -नवेघर, आडिवरे, ता.राजापूर, जि. रत्नागिरी हा पत्ता इतकी वर्ष नुसता ऐकून होतो, स्वतःच गाव असूनही फक्त एकदा लहानपणी ४ ते ५ तासांसाठी गेलो असेन. बास त्याव्यतिरिक्त आपल गावाला काहीच नाही , हेच मनावर ठसवले गेले होते.पण अचानक तिथल्या घराच्या व्यवहारासंबंधी कोर्टाची बोलणी सुरु झाली, तशी रीतसर नोटीस आमच्या काकांनी पाठवली, काही कागदपत्रांवर आमच्या सह्या आवश्यक होत्या आणि ती संबंधित कागदपत्र मिळवण्याची जबाबदारी आमच्या तीर्थरूपांनी आमच्यावर टाकली. आता गावाला जाणे आलेच. अचानक ठरल्याने रेल्वेने जाण्याचा प्रश्नच नव्हता. बस चे तिकीट मिळाले, एकटा कुठे जाणार म्हणून एका मित्राला बरोबर घेतले. गावाला जाणार तेही माझ्या हक्काच्या.. डोक पूर्ण रिकाम होत, फक्त काकाशी फोन वर बोलण झालेलं होत. रात्री ९ ची डोंबिवलीला बस होती,ती यायला ९.३० वाजले, पण पनवेल च्या अलीकडे मजबूत ट्राफिक लागल आणि आणि १ दीड तास पनवेल क्रॉस करायलाच लागला. बस भयानक पॅक होती. चायला म्हटल इथेच १२ वाजून गेलेत, पोचणार कधी? पण बहुतेक पळस्पे क्रॉस झाल आणि रस्ता मोकळा झाला. तिथून म. रा. प. चा ड्रायवर जो पेटला ... अगगाग्गा .(अन्या दातार ने फोन वर म. रा. प पासून सावध राहायला सांगितल होत.. का ते आता पटलेलं होत ;) ) वोल्वो चालवणार्यांच्या थोतरीत मारेल, अशी बस हाणायला लागला. त्याचा भन्नाट स्पीड पाहून बहुतेक सगळे हादरलेलेच होते, मागे बसलेल्या २ ३ माणसांनी कंडक्टर ला सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करून पहिला पण त्यांचे सारे प्रयत्न वडखळ फाट्यावर मारण्यात आले :D घाटातही साहेब ८०- ९० खाली उतरत नव्हते हे पाहून द्वोळे पाणावले आणि कधी मिटले गेले कळलंच नाही. नंतर जाग आली ती "रत्नागिरी ,रत्नागिरी , उतरा उतरा" ..... या हाकांनी ... मित्राला उठवलं, घडाळ्यात पाहिलं बरोबर ५.३० झालेले होते. त्या साहेबांना मनोमन साष्टांग घालून खाली उतरलो. समोरच आडिवऱ्याला जाणारी पहिली बस पाहीली आणि त्यात चढलो. रत्नाग्री बाहेर बस पडली आणि बाहेरचा गार वारा लागताच दिल खुश हो गया. मस्त लाल मातीतली कौलारू घर, नारळ पोफळीच्या बागा, नुकत्याच पेटलेल्या चुलींमधून वर सरकणारा धूर....अन या सगळ्यांना कुशीत घेतलेलं धुक .... १. १अ. पावस सुटल .. आणि गाव जवळ आल हे जाणवायला लागल.. आता दोन्ही बाजूंना आंब्याच्या , काजुंच्या बागा.. मधेच खाली दिसणारी लाल कौलारू घर .. एक दीड तासात आडिवर्याच्या पेठेत पोचलो आणि बस खडखडत पुढे 'नाट्याला' गेली . पोटात सणकून भूक लागलेली होती. पेठेतच महाकाली च देऊळ आहे, तीच दर्शन घेतल , आणि बाजूच्याच हाटेलात मस्त पोहे आणि मिसळीवर ताव मारला. अजून प्रवास संपला नव्हता.काकाला फोन करून सड्यावर उभ राहायला सांगितल . पुढे नवेघर पर्यंत २ किमी अंतर होत. मस्त चालत रमत गमत घरी आलो. २. वडाच विस्तीर्ण झाड आणि बैलगाडी ३.हे खाली टोकाला दिसतंय ते माझ घर ४.मागच्या वर्षी घराला १२५ वर्ष पूर्ण झाली गेल्या गेल्या काकूने मऊ भात वाढला.. सोबत लोणचं पापड आणि मस्त आल्याचा चहा . ५.आमची छोटीशी बाग ६. ७. एक छोटस अननस धरलेलं होत ८.तुळशी वृंदावन, त्यामागे चूल आणि बाजूला विहीर ९. चुलीवर पाणी तापलं होतच. खाल्ल्यानंतर अंघोळीला पळालो. नंतर काकाबरोबर परत पेठेत आलो. महाकालीच आत जाऊन दर्शन घेतल. १०. ११.देवळाच्या जीर्णोद्धाराच काम सुरुये १२.या महाकालीच रूप पाहिलं कि कोल्हापूरची आठवण येते (फोटो काढायला परवानगी नाही - आंतरजालावरून साभार ) १३. विहिरीतून पाणी काढायचा हा वेगळाच जम्बो रहाट पाहीला तलाठी हापिसातली काम मार्गी लावली. घरी आल्यावर मस्त ताणून दिली. डायरेक्ट जेवायलाच उठलो. दत्त जयंती असल्याने कोकणात ठिकठिकाणी मोठे उत्सव असतात, नाटकं, गाण्याचे कार्येक्रम, कीर्तनं सगळीधमाल असते. आमच्या गावातही दत्तच देऊळ होत . रात्री चंद्र ग्रहण असल्याने चारलाच दत्त जन्म साजरा करणार होते, मग कीर्तन होत. ४ ला देवळात गेलो. १४.दत्त मंदिराकडे देऊळ मस्त सजवलेलं होत. १५. आत जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरु होती. १६. बाहेर बुवांच कीर्तन सुरु झाल. १७. थोडावेळ बसून आम्ही परत गाव भटकायला निघालो जेमतेम ५०- ६० उम्ब्र्याचं गाव असेल. मग तिथूनवर सड्यावर आलो. १८. १९. थोड्यावेळाने काळोख पडायला लागला. सड्यावर बरेचदा चकवा लागतो असे काकाने बजावले होते.. आणि आम्ही नवीन . म्हणून वेळेवर खाली आलो . घरातले सर्व अजूनही देवळात होते. मग आम्ही मस्त बाहेर खुर्च्या टाकल्या आणि गफ्फा हाणत बसलो . सकाळी मोहवून टाकणारा परिसर संध्याकाळ होताचं भयाण वाटत होता :). आजूबाजूला किर्र झाडी , त्यात रातकिड्यांचा आवाज. पण देवळात चालणार्या कीर्तनाचा आवाज अख्या गावात ऐकू येत होता. रात्री जेवल्यानंतर आमच्या मित्राला चैतन्यकांडी ओढण्याची हुक्की आली. आता इथे काही दुकान नाही , पेठेत तंगड तोड करत जाव लागणार. बाहेर हा भयानक अंधार. पण त्याच्या मोबिल मध्ये टोर्च होता. (मला सज्जनगडावर आम्ही अंधारात आणि पावसात धाब्याच्या मारुती पाशी गेलेलो त्याची आठवण झाली). म्हटल चला जरा किडे करून येऊ. बाहेर पडल्यावर अंधार जाणवायला लागला. जेमतेम ३ ४ फुटांपर्यंत दिसत होत. मागे वळून बघितल तर मिट्ट काळोख. चायला म्हटल डेंजर वाटतंय. अर्ध्या रस्त्यात पोचलो आणि ढुप्प.. मोबाईल स्वीच ऑफ !!! आधी एक दोन सेकंद काय झाल कळलंच नाही .... आजूबाजूचा अंधार जीव घेऊन अंगावर आला. आईचा .. मग जरा सावरलो.. चुकून वर बघितल ... तेजायला... वर ग्रहण लागत होत... आधीच काय कमी फाटलेली :D , मग जरा सावरलो.. पण घंटा काहीच दिसत नव्हत. तसंच पाय रेटत पुढे पुढे चालत राहिलो. कसेबसे एकदाचे रस्त्याला लागलो.. आता मध्ये मध्ये वस्ती होती . कसे बसे पेठेत पोचलो. चायला म्हटल आता परत जायचं आपल्याला. पण येई पर्यंत ग्रहण सुटलेलं होत, छान चंद्रबिंब दिसत होत . टिपूर चांदण पडलेलं होत.शिवाय दत्त मंदिरातील कार्येक्रम संपलेला असल्याने वाटेवर मध्ये मध्ये माणस दिसत होती. कसे बसे घरी येऊन झोपलो :) दुसर्यादिवशी जायची वेळ आली तेंव्हा अजून १ २ दिवस रहाव अस वाटत होत. पण सुट्टी नसल्याने मनावर दगड ठेवून निघावच लागल. घराला एकदा डोळे भरून पाहून घेतल आणि निघालो. पेठेतून ११.३० ची बस मिळाली. पावसला पोचेस्तोवर १२.३० झाले. स्वरूपानंदांचा छान आश्रम आहे पावसला. एकदम सुंदर आणि शांत ठिकाण आहे. दुपारी गरम गरम खिचडी आणि लोणच्याचा प्रसाद मिळतो. मस्तपैकी जेवलो.. थोडावेळ आजूबाजूला हिंडलो.. तिथे कोकम सरबतही झकास मिळते.. ते हि पिऊन झाले. मग रत्नागिरी बस पकडली. आता आमच्याकडे 3 ते ८ वेळ होता. तेवढ्या वेळात गणपतीपुळे आटपायचे होते. परत रत्नागिरीला बस ची वाट बघणे आले. पण या वेळी एक सुखद धक्का बसला. गणपतीपुळ्यासाठी एक छोटीशी हिरव्या रंगाची मिडीबस आली. आणि अजिबात गर्दी नव्हती. मस्त आरामात बसलो . एका तासात गणपती पुळे. २०. २१. अजिबात गर्दी नव्हती, बाप्पाच मस्त दर्शन झाल. समुद्र खुणावत होता, पण हातातल्या सामानाची काहीतरी सोय बघायची होती. मग तिथे जे अनेक बापट कुटुंब खानावळी चालवतात, त्यापैकी एका खानावळीत संध्याकाळच्या जेवणाची ऑर्डर दिली , आणि सामानही तिथेच ठेवले. समुद्रात मस्त भिजलो. भरपूर फिरलो. २२. २३. २४. त्यातल्या त्यात फोटूग्राफी २५. २६. २७. २८. कोकण मेव्याची खरेदी झाली. तोपर्यंत ७ वाजले होते, मग फतफत खानावळीत आलो. मस्त जेवण होत. आडवा हात मारला. मोदकांची ऑर्डर आधी द्यावी लागते, आयत्यावेळी मिळत नाहीत, म्हणून ते चापायचे राहिले. सामान घेतल आणि निघालो. मुख्य रस्त्यावर आलो... थोडावेळ बस ची वाट बघितली पण कसलाच चिन्ह दिसत नव्हत, एका माणसाला विचारल तर म्हणाला शेवटची बस कधीच गेली ... बोंबला... प्रायवेट गाड्या सुद्धा नव्हत्या . लिफ्ट मागून बघितली कोणीही आमच्या अवताराकडे बघून थांबायला तयार नव्हते, जे थांबले त्यांना रत्नागिरीला जायचं नव्हत... गाडीची वेळ जवळ येत होती... देवच नाव घेतल, म्हटल बाप्पा पोचंव रे वेळेवर :) ५ मिनिटात समोरून आमची सकाळची मिडी बस आली, तिची शेवटची फेरी होती. जीवात जीव आला. जाताना बशीत आम्ही दोघंच होतो. त्याने ४० मिनिटात आम्हाला रत्नागिरीत पोचवले. तिथून अजून एक बस करून स्टेशनात आलो. स्टेशन खच्चून भरलेलं होत. अर्थात रिसर्वेषण नव्हतंच. २ ट्रेन अशाच सुटल्या. चढायला मिळालंच नाही. शेवटी ११ च्या कोकण कन्येत कसबसं चढलो .. पुढे ठाण्यापर्यंत कसे पोचलो ते न लिहिलेलंच बर असो पण कोकणात अशी पीड ट्रीप मारायला मजा आली. लाल डब्याने खूप साथ दिली. माझ्यामते कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेतेच :)
  • Log in or register to post comments
  • 26678 views

प्रतिक्रिया

Submitted by अन्या दातार on गुरुवार, 12/15/2011 - 22:07

In reply to सांगलीत जन्मलेला, कोकणात by ५० फक्त

Permalink

नाही नाही नाही

सध्यातरी शादी.कॉमसारख्या संस्थळांची मला काहीच गरज नसल्याने जे काही टंकलय ते "पूरे होशोहवास में" टंकलय. संपादनाचीसुद्धा गरज वाटत नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 12/15/2011 - 21:43

In reply to +१ सध्या बदलापूराबद्दल मला by सूड

Permalink

बदलापूर

छॉनच आहे बॉ !!!
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 12/15/2011 - 22:10

In reply to बदलापूर by रामदास

Permalink

अरे हो. त्या aspect बद्दल

अरे हो. त्या aspect बद्दल तुम्ही धागा काढणार होतात ना ?? सचित्र काढा हां चांगला. स्पा-सूड फोटो काढायला मदत करतील :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on गुरुवार, 12/15/2011 - 22:17

In reply to अरे हो. त्या aspect बद्दल by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

विमे

तुम्हालाही ओढ लागलीये का बदलापूरची? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 12/19/2011 - 10:29

In reply to बदलापूर by रामदास

Permalink

काका, तसं असेल तर.....

असारे खलु संसारे सारं श्वशुरमन्दिरम् असं म्हणायला हरकत नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 12/15/2011 - 21:52

In reply to +१ सध्या बदलापूराबद्दल मला by सूड

Permalink

तुम्हालाच काय इथल्या ब-याच

तुम्हालाच काय इथल्या ब-याच जणांना आपल्या मुळ भुमीपासुन लांब गेल्यावर असं वाटतं, मुळ भुमीपासुनच काय पण अगदी ऑर्कुटचं फेसबुकला / रेडिफचं जिमेलला/ याहुचं लाइव्हला/ उपक्रमाचं मनोगतला / मनोगतचं मिपाला / मिपाचं मिमला अन तिथुन ऐअला गेलं तरी असं होतं, मुंबईकराच्या बाबतीत तर वेस्टचं इस्ट अन सेंट्रलचं हार्बरला आलं तरी असं होत असेल, पुणेकराच्या बाबतीत पेठेतुन धायरीला अन बिबवेवाडीतुन बाणेरला गेलं तरी असं होतं, औरंगाबाद्च्या लोकांना घाटीजवळुन जालना रोडला सिडको मध्ये आलं की असंच होतं. एवढंच का अगदी तीन वर्षे विंडोज फोन वापरुन नंतर सिंबियन वापरतो कधी कधी, नंतर कधी कुणाचा विंडोज फोन समोर आला की तीच चुंबकीय ओढ जाणवते. आणि शास्त्रीय मार्गाने विचार केला तर संपुर्ण प्रुथ्वी ही एका चुंबकाप्रमाणे कार्य करत असल्यानं ही शक्ती सगळीकडे जाणवणारच, आणि एखाद्याला जाणवत नसेल तर त्यानं चांदीच्या पेल्यातनं पाणी पिण्यापेक्षा लोखंडाच्या भांड्यातुन प्यावं, म्हणजे तेवढंच शरीरातलं लोह वाढुन चुंब*य शक्तीच्या ऐवजी चुंबकीय शक्तीचा अनुभव येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on गुरुवार, 12/15/2011 - 16:48

Permalink

सुंदर...

च्यायला, स्पावड्या काय काय करतो, नै? भयकथा लिवतो, परीक्षणं लिवतो, संगणकावर फोटूशॉपच्या करामती करतो.. आणि आता झ्याकपैकी फोटू काढून, लोकांना हळवं करणारं प्रवासवर्णन पण लिवतो.. जियो, दोस्त.. बाकी फोटू झक्कासच.. च्यायला तो स्टार फिश आणि शंखातला खे़कडा तर कमालच आहे.. कोकणात अगदी ओझरतासा गेलो होतो, मालवणला.. आता पुन्हा एकदा ट्रिप काढावी लागेल..
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 12/15/2011 - 17:39

Permalink

कोकण सहल

आवडली. मी महाकाली च्या देवळात गेल्याला बहुधा ४०-२४ वर्षे होऊन गेली असावीत. घर आणि परिसर झकास आहे. मोबाईलची रेंज मिळत नसेल तर अधिक उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 12/15/2011 - 18:51

Permalink

मस्त कोंकण...

पावसाळ्यानंतर कोंकण दर्शन म्हणजे स्वर्गसुख. जिवाला निवांतपणा असावा, खिशात दामाजी पंत वास्तव्याला असावेत, समव्यसनी साथ असावी, आणखिन काय हवे? स्वर्ग म्हणजे काही वेगळे थोडेच असते?
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on गुरुवार, 12/15/2011 - 20:50

Permalink

गाववाल्या, फोटू आणि वर्णन

गाववाल्या, फोटू आणि वर्णन झकासच रे ..... मस्त लिहिलयस
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Fri, 12/16/2011 - 11:48

Permalink

झकास प्रवास वर्णन

झकास प्रवास वर्णन.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 12/16/2011 - 12:24

Permalink

वृत्तांत आणि फोटू भारी आहेत.

वृत्तांत आणि फोटू भारी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 12/16/2011 - 12:24

Permalink

वृत्तांत आणि फोटू भारी आहेत.

वृत्तांत आणि फोटू भारी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 12/16/2011 - 15:04

Permalink

कोकणातल्या मातीत अशी काही

कोकणातल्या मातीत अशी काही चुंबकीय शक्ती आहे कि ती आपल्या माणसांना ती कुठेही, मुंबई पुणे, नाशिक, दिल्ली, लंडन , अमेरिका , अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शेवटी आपल्याकडे खेचून घेतेच ह्या एका वाक्यासाठी तुला उकडीचे मोदक! बाकी ज्या कामासाठी गेलेलात ते पार पडलं की नाही? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 12/16/2011 - 15:44

In reply to कोकणातल्या मातीत अशी काही by यशोधरा

Permalink

>>>>बाकी ज्या कामासाठी

>>>>बाकी ज्या कामासाठी गेलेलात ते पार पडलं की नाही? स्पावड्या, तुझं एक काम झालेलं ठाऊक नाही काय रे जनतेला? काय चाललंय काय? ;) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 12/16/2011 - 17:41

In reply to >>>>बाकी ज्या कामासाठी by प्यारे१

Permalink

हो, आता कोकणकन्येचं तिकीट

हो, आता कोकणकन्येचं तिकीट काढायची गरज नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 12/17/2011 - 22:28

Permalink

रे कोकण्या

मस्त लिवलास! फोटो पण खूपच छान आलेत. लिहिता लिहिता मधेच भयकथा झाली पण तीही आवडली. तो जंबो रहाट आहे त्याला ओकती म्हणतात. हिरव्या बशीला 'पोपट' असं नाव आहे. फक्त तू आमच्या रत्नाग्रीला रेल्वेचं जंक्शन केलंस ते नाय आवडलं. रत्नदुर्ग किल्ला, लो. टिळकांचं जन्मस्थान, थिबा राजवाडा अशी काही ठिकाणं बघायची होतीस रे! असो, पुढच्या वेळेस नक्की बघ. कोकणकन्येचं तिकिट का नको आता? रेल्वेचा जावई होणारेस का?
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Sat, 12/17/2011 - 22:31

In reply to रे कोकण्या by पैसा

Permalink

कोकणकन्येचं तिकिट का नको आता?

कोकणकन्येचं तिकिट का नको आता? रेल्वेचा जावई होणारेस का? अत्यंत अज्ञानमूलक प्रश्न! यावरच जाणकारच अधिक प्रकाश टाकू शकतील ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sun, 12/18/2011 - 09:45

In reply to कोकणकन्येचं तिकिट का नको आता? by अन्या दातार

Permalink

माझाही एक अतिशय अज्ञानी

माझाही एक अतिशय अज्ञानी प्रश्न ' रेल्वे हा कोणाचा आयडी आहे ? मी कालपासुन उपक्रम, मनोगत, मिपा, मिम, ऐअ आणि बाकी बरीच मराठी संस्थळे पालथी घातली, काही सापडला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Sun, 12/18/2011 - 09:37

Permalink

असे फक्त आमचा स्पावड्याच लिहु शकतो,

स्पावड्या, दोस्ता मस्त लिहितोस, शेवटचे वाक्य वाचुन तर मी तुझ्यावर बेहद्द खुश झालो आहे तुझ्यावर, अगदी मनातलं बोललास. तुला आगदी मनापासुन खुप खुप आशिर्वाद. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sun, 12/18/2011 - 16:49

Permalink

सर्वच फोटो सुंदर. ह्या

सर्वच फोटो सुंदर. ह्या पद्धतीच तुळशी वृंदावन आधी कधी बघितलं नव्हत.अप्रतिम आहे. अननसाच झाड बघायची लहानपनापौन खूप उत्सुकता होती.मला वाटत होत अननस कोबी फ्लोवेर येतात तशी येत असतील.फोटो मस्त आलाय. दुसरा फोटो अतिशय उत्तम.सांज ये गोकुलीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 12/19/2011 - 11:52

Permalink

स्पावड्या भन्नाट घर आहे रे

स्पावड्या भन्नाट घर आहे रे तुझे? का विकतोस रे एवढे सुंदर वडिलोपार्जित घर? बाकी लेख आणि फोतो झक्कासच
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 12/19/2011 - 12:11

In reply to स्पावड्या भन्नाट घर आहे रे by मृत्युन्जय

Permalink

@मृत्युंजय घर विकायचे नाही,

@मृत्युंजय घर विकायचे नाही, म्हणून हि धावपळ चाललेली आहे काहीही झाले तरी चालेल पण घर वाच्वाय्चेच, बघूया काय होतंय
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 12/19/2011 - 12:10

Permalink

क्लासच !

नशिबवान आहेस रे :)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on गुरुवार, 12/22/2011 - 19:53

Permalink

असले सुंदर घर सोडून डोंबिलीला .... नको नको!

प्रसन्ना, तुमचे गाव आवडले. प्रकाशचित्रेही आवडली. म्हणजे सुंदरच आहेत ती. एक सूप्त इच्छा निर्माण झाली. की त्या तुळशी वृंदावनाखालील प्राजक्तांच्या स्वस्तिकासमोर माथा टेकवावा आणि ज्या घराला सव्वाशे वर्षाचे दीर्घायू मिळाले त्याला आणखी सव्वाशे वर्षाची उमर मिळो अशी प्रार्थना करावी! तरीही, असले सुंदर घर असते तर ते सोडून मी डोंबिलीला येऊन राहिलो असतो का हा प्रश्नच आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 01/03/2012 - 00:38

Permalink

काय प्रसन्न वाटते आहे स्पा हा

काय प्रसन्न वाटते आहे स्पा हा धागा पाहुन ... शब्दात बोलताच येणार नाहि
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 01/03/2012 - 02:56

Permalink

भन्नाट गाव आहे रे स्पा

भन्नाट गाव आहे रे स्पा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com