Skip to main content

कोकण दर्शन मदत हवी आहे.

लेखक मानस् यांनी गुरुवार, 10/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात राहून कोकण पाहिलं नाहीस? असं आजपर्यंत बर्‍याच लोकांकडून ए॓कून घेतलय्...पण आता डिसेंबरमधे मिळणार्‍या सुट्टी व संधीचा फायदा घ्यावा म्हणतोय. मी माझ्या कुठुंबासह २३ ते ३१ डिसेंबर कोकण दर्शनाचा प्लान करतोय. कोकणात ही माझी पहिलीच ट्रिप आहे,इथे बरेचजण कोकणातले असल्याने/ कोकणात जाऊन आले असल्याने मदत करु शकतील असे वाटले. ८ दिवसात काय काय पहाता येइल? साधारण टूर प्लान कसा करावा? रहाण्यासाठी/जेवणासाठी शक्यतो घ्ररगुती चांगली ठिकाणे माहिती असतील तर सुचवाल का प्लीज? मागे एकदा या आशयाचा धागा वाचल्याचे आठवते पण खूप शोधूनही तो धागा सापडला नाही...कोणाला माहिती असेल तर क्रूपया URL द्या. धन्यवाद.

वाचने 72709
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

मी माझ्या कुठुंबासह २३ ते ३१ डिसेंबर कोकण दर्शनाचा प्लान करतोय.
अशा ठिकाणी कोणी सहकुटूंब जाते होय ? कित्ये रे...

In reply to by परिकथेतील राजकुमार

कित्ये रे.. :)

कोकणात सहकुटूंबच जायचे असत... मित्रान्बरोबर तो गोवा... मानस - माझ्या माहितीचा व्यनि केला गेला आहे..

In reply to by साबु

कोकणात सहकुटूंबच जायचे असत... मित्रान्बरोबर तो गोवा...
साबु शेठ, मग तुम्ही खरे कोकण बघितलेच नाहीत अजून असे म्हणतो.

मी माझ्या कुठुंबासह २३ ते ३१ डिसेंबर कोकण दर्शनाचा प्लान करतोय बरे झाले स्पष्ट केलेत.

ही काही ठिकाणे वेळणेश्वर बीच गुहागर हेदवी अंबोली श्रीवर्धन तेरेखोल अंबोली आर्वजून जाण्यासारखी आहेत सावंतवाडी येथील भालेराव खाणावळीचे जेवण उत्कृष्ट असते

In reply to by जाई.

सावंतवाडी येथील भालेराव खाणावळीचे जेवण उत्कृष्ट असते १००+ टक्के सहमत. अजून चव जिभेवर आहे. पण श्री. मानस मांस-मच्छर खातात का?

In reply to by जाई.

येथील साधळे मेस मधील जेवण हि फार च सुंदर होते, तिथे राहण्याची देखील सोय असल्याने, उठल्या उठल्या फ्रेश होउन मस्त नाश्ता करुन फिरायला मोकळे! ;)

तुम्ही कोणत्या बाजूने कोकणात येणार? म्हणजे मुंबईकडून, की गोव्यातून? किती जण आहेत? लहान मुलं आहेत का? वाहन आहे की रेल्वेने? इ. सांगा मग बाकी माहिती मिळेल.

या कलावधीत अजिबात जाऊ नका. प्रचंड गर्दी असते. पुढे जानेवारी , फेब्रूवारीत जमते का पहा :) अमोल केळकर

बरीच मोठी सुट्टी घेऊन निघताय त्याबद्दल अभिनंदन. यामुळे तुम्हाला कोकण नीट बघता येईलच आणि ठिकाणं आणि मार्ग निवडण्याचे बरेच ऑप्शन्स खुले राहतील. कोंकण हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने मार्ग आणि ठिकाणं सुचवू शकतो. त्यासाठी तुम्ही प्रवासाला सुरुवात कुठून करणार हे कळणं महत्त्वाचं आहे. कोल्हापूर सोलापूरकडचे असाल तर दक्षिण कोकणच्या विषयी सांगता येईल.. मुंबई नाशिककडचे असाल तर उत्तर कोकण. किंवा मनात काही बघण्याचं सर्वसाधारण ढोबळमानाने रवलं असेल तर तेही सांगा. त्यानुसार मग कमी वेळात जास्त प्रवास करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते शोधता येईल. शुभेच्छा..

In reply to by गवि

मी,माझी पत्नी व आमचा ४ वर्षाचा मुलगा असे तिघे जाणार आहोत्.शक्यतो गणपतीपुळे ते सिंधुदुर्ग हा भाग पहावा असा विचार आहे.पुण्याहून कारने येऊ त्यामुळे कराड-कोयनानगर मार्गे पुळ्याला बरे पडेल असे दिसते. तर या पट्यात काय काय पहाता येइल? राहाण्यासाठी शक्यतो घ्ररगुती ठिकाण मिळाले तर छान,अशा जागी जास्त आरामदायी वाटतं

In reply to by मानस्

ओके. साधारणपणे पाहण्याचा भाग ठरवला आहेत हे उत्तम. तुम्ही निवडलेल्या भागात कोकणाचा अर्क आहे. गणपतीपुळे ते मालवण (तारकर्ली तिथेच ६ किमीवर) हा पॅच कव्हर करण्यासाठी तुम्हाला असं करता येईल: दिवस १: पुण्याहून थेट कोल्हापूर मार्गे मालवण गाठा. गगनबावडा मार्गे गेल्यास मधला पॅच खराब रस्त्याचा आहे पण रस्ता खूप निसर्गसुंदर आहे. घाटातलं सौंदर्य तर खूपच मस्त. त्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद वेगळ्या प्रकारे येतो. काही जणांना स्मूथ फीचरलेस हायवे आणि गाडीचा पिक अप आणि टॉप स्पीड टेस्ट करण्यासाठी गाडी चालवणं हे उत्तम ड्रायव्हिंग प्लेझर वाटतं, तर काहीजणांना वळणावळणाचा जंगलातला रस्ता आणि आजूबाजूला सतत बदलत असलेल्या खाणाखुणा यात आनंद असतो. तुमचा प्रकार ठरवून घ्या. जर कमी वेळ खराब रस्ता हवा असेल तर पुणे कोल्हापूर - निपाणीनजीक उजवे वळण घेऊन आजरा आंबोलीमार्गे मालवण गाठा.. आंबोली टेक्निकली कोकणात नसलं तरी एक रात्र थांबण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. हिरण्यकेशी उगम आणि महादेवगड पॉईंट हे दोनच स्पॉट पाहिलेत तर मुक्काम न करताही बघता येतील वाटेत ब्रेक घेऊन. राहणार असाल तर ग्रीन व्हॅली रिसॉर्ट (एमटीडीसी) किंवा लाड हाऊस हे दोन्ही चांगले आहेत. लाड हाऊस घरगुती आहे (बेड अँड ब्रेकफास्ट) मालवणला पोचून तारकर्ली बीचवर कोणत्याही बर्‍या दिसणार्‍या हॉटेलात रहा. हे अशासाठी म्हणतोय की तारकर्ली एमटीडीसी रिसॉर्ट हा अगदी बीचवरच आहे आणि ती गणपतिपुळ्याच्या खालोखाल कोकणातली सर्वात सुंदर आणि मोक्याची राहण्याची जागा आहे.. पण दुर्दैवाने त्याचं बुकिंग तुम्हाला मिळण्याची काडीची शक्यता नाही. मी अनेक वर्षं प्रयत्न करतोय. ईअर एंडिगच्या सुमारास तर निव्वळ अशक्य. बाकी तुम्ही घरगुती अरेंजमेंटचा उल्लेख केलाय, तर इथे तारकर्लीत जेवढी म्हणून ठीकठाक घरं आहेत ती सर्व रहायला भाड्याने दिली आहेत की काय अशी शंका येते. निम्मंअधिक गाव भाड्यानेच गेलंय. तिथे घरगुती राहण्याची आणि जेवणखाणाची सोय होईलच. फॅमिलीज भरपूर असतात त्यामुळे काळजीचं कारण नाही. जर तिथे पोचल्यावर घरगुती प्रत्यक्ष पाहून नकोसं वाटलं (एसी नसणं, डास असणं,गाद्या वासाड आणि चादरी अस्वच्छ असणं वगैरे पीडा जाणवल्याने) तर मालवणला चिवला बीचजवळ चिवला नावाचंच नवीन हॉटेल आहे (झांट्ये काजूवाल्यांचं) त्याचा मला उत्तम अनुभव आहे. एसी आणि उत्तम रूम्स असलेलं हॉटेल. रूम सर्विसही चांगली आहे. (टिपः घावणे चटणी ब्रेकफास्टला हवी असल्यास रात्री सांगून ठेवा, म्हणजे दुसर्‍या दिवशी मिळतील.. अवश्य ट्राय करा..) मालवण/तारकर्ली हाच रात्री मुक्कामाचा "हब" बनवून दिवसा कारने येऊनजाऊन कुणकेश्वर, देवगड, विजयदुर्ग,वेंगुर्ला अशी ठिकाणं दोन दिवसात कव्हर करा. सिंधुदुर्ग किल्ला इथून वॉकेबलच आहे, तेव्हा तो पहा असं वेगळं सांगायला नको. पण पहाटे निघून लवकरच पहा. होडीत बसून तिथे पोचून पूर्ण गड पहायला उन्हात खूप त्रास होतो. विशेषतः चार वर्षाच्या लहानग्यासोबत. रात्रीच्या वेळी मालवण बाजारात मारलेली फेरी हा स्मरणीय अनुभव ठरावा. अगदी तळकोकणातल्या खास चिजांच्या खरेदीने प्रसन्न व्हाल. मालवणी मसाले, खाजे वगैरे न चुकवण्यासारखे.. तिसर्‍या दिवशी लवकर निघून रमतगमत समुद्रकिनार्‍याचा रस्ता पकडून रत्नागिरीपर्यंत या (राजापूरमार्गे मेन रस्त्याने नव्हे.. आतला रस्ता.. जैतापूर-आडिवरे-पूर्णगडकडून थेट पावसला निघणारा.. तिथे पाट्या बघत आणि विचारत निघालात की कळेलच.) या आतल्या रस्त्यावर कोकणचं खरं अप्रतिम रूप पहायला मिळतं. शिवाय साथीला सतत समुद्र राहतो.. फोटोग्राफीप्रेमी असाल तर हा तुम्हाला स्वर्ग वाटेल.. रत्नागिरीत पोचण्यापूर्वी गणेशगुळे असा बाण दिसेल, ते ठिकाण अर्ध्या तासात बघून घ्या.. रत्नागिरीत पावस साईडकडून पोचण्यापूर्वीच भाट्ये लागतं.. आता इथे दोन ऑप्शन्स आहेत. जर बजेट उत्तम असेल तर कोहिनूर समुद्र रिसॉर्ट मधे त्याच्या अफलातून लोकेशनसाठी रहा.. उंच कड्यावरुन खाली पसरलेला अनलिमिटेड समुद्र. इथे तुमच्या मुलाला आवडेल अशी रिसॉर्टच्या आत फिरायला ट्रेनही आहे. शिवाय कड्यावर टायटॅनिकसारखी बोट बांधली आहे तिथून समुद्राचा थरार कळतो. नाहीतर मग जरा कमी बजेट असेल तर त्याच डोंगरावरुन उतरुन खाली असलेल्या सुरुबनात असलेला रत्नसागर बीच रिसॉर्ट आहे त्यात रहा. मस्त लाकडी कॉटेजेस आहेत. थेट बीचवरच.. कायम लक्षात राहील असं ठिकाण. त्या रात्री कुठेच न जाता आणि आराम करा. फारतर संध्याकाळ मिळाली असेल तर रत्नागिरीच्या बाजारपेठेत चक्कर मारुन खरेदी करा. रत्नागिरीतच दुसर्‍या दिवशी रत्नदुर्ग किल्ला पहा. तो दिवस पूर्ण रत्नागिरीतच घालवा.. मिर्‍याबंदर, भगवती बंदर, सावरकरप्रेमी असल्यास पतितपावन मंदिर वगैरे बघा. त्यानंतरच्या दिवशी सकाळी आठ्च्या सुमारास निघून तास दीड तासात गणपतिपुळे गाठा.. इथेही हातखंबा- निवळी - चाफे - जाकादेवी असा रस्ता सरधोपट आहे. पण एक नवीन काहीतरी म्हणून पतितपावन मंदिरासमोरचा (परटवणे) रस्ताच पकडून आतून आतून गणपतिपुळ्याला जाउ शकता. हा खूपच शॉर्टकटही आहे. फक्त रस्ते जरा लहान आहेत.. हाही समुद्राला लागून जात रहातो.. गणपतिपुळ्याबाबतही तेच..अफलातून लोकेशन लाभलेलं आणि अत्यंत सुंदर सोयीस्कर असं एमटीडीसी.. पण बुकिंग मिळणार नाही. ऑनलाईन बुकिंग होतं पण तीनचार महिने आधीच बुक असतं. लक ट्राय करा.. कदाचित ईअरएंडिंगच्या आधी काही दिवस जरा सुट्टीचा मूड कमी असतो तेव्हा म्हणून मिळून जाईल कदाचित.. पण फार आशा नको.. ते न मिळाल्यास अभिषेक म्हणून रिसॉर्ट आहे तो बुक करा.. हा बीचलगत नसला तरी उंचावरुन अमर्याद सी व्ह्यू देणारा आहे.. शिवाय स्टँडर्डही आहे. खेरीज घनवटकर आणि अन्य गुरुजींच्या सारवलेल्या टिपीकल कोकणी घरांमधे राहण्याखाण्याची सोय होऊ शकते. पण तिथे राहणे किती मानवेल ते आपापले ठरवावे.. जेवणासाठी मात्र पोचल्यापोचल्या घनवटकरांकडे ऑर्डर द्या आणि सात्विक मोदकांचं घरगुती जेवण मिळवा.. गणपतीमंदिराच्या अगदी दाराशी शेडवजा टी हाऊससारखी नाश्त्याची दोनतीन हॉटेल्स आहेत. त्यातल्या एक आणि दोन नंबर हॉटेलांत दर्शनानंतर (किंवा ऐवजी) मिसळ आणि साबुदाणा खिचडी आवर्जून खा आणि नंतर नेहमी आठवण काढा. गणपतिपुळ्यात मुक्काम टाकल्यावर जवळच असलेलं कोकणचं हेरिटेज दाखवणारं छोट्या डोंगरउतारावर असलेलं संग्रहालय बघा.. मालगुंड आणि भंडारपुळे चुकवू नका.. गणपतीपुळ्याहून सोयीस्कर मार्गाने पुण्याला परत येऊ शकता. वाटेत वाटल्यास परशुराम पाहून, प्रसादाची गरमागरम चविष्ट खिचडी खाऊन कोकणचा निरोप घ्या.. डेरवणच्या शिवसृष्टीत गेलात तर स्त्रियांना ट्रॅडिशनल ड्रेसशिवाय आत सोडत नाहीत हे लक्षात घ्या.. पुरुषांना ही अट नाही.. आणखी काही शंका असल्यास व्यनि करा.. शुभयात्रा.. सर्व फोटो जालावरुन.. तिथूनच लिंक केलेले असल्याने वेगळे तपशील देत नाही...

In reply to by गवि

गवि तुम्हाला कोकणचा ब्रँड अ‍ॅंबेसिडर केला पाहीजे बघा __/\__ धन्य आहात. अतिशय उत्कॄष्ट माहिती. निव्वळ तुमच्या प्रतिसादापायी ह्या धाग्याची वाचनखूण साठवली आहे.

In reply to by गवि

आम्ही नुसते निमित्तमात्र.. याचे श्रेय आमच्या टंकनिकेला द्या..
आम्ही तुम्हाला माहितीचे फक्त श्रेय दिले आहे ;) टंकनाचे श्रेय टंचनिकेलाच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

+१११ एकदम सहल कंपनीच्या थोबाडात मारेल अशी इटिनेनरी ! मीही वाचनखूण साठवली आहे.

In reply to by गवि

अतिशय तपशिलवार आणि उत्कृष्ट माहिती. मी सुद्धा डिसेंबरात कोकणात उतरण्याचा विचार करतो आहे. मला ही माहिती उपयोगी पडेल. धन्यवाद गवि.

In reply to by गवि

वाचनखुण साठवुन ठेवतो!! वेगळा धागा असता तर सगळ्यांना माहीती कळेल. इतकी इत्थंभुत माहीती वाचुन धन्य झालो.

In reply to by गवि

इतका सविस्तर आणि माहितीपूर्ण प्रतिसाद पाहून अक्षरश: भारावून गेलोय. खरोखरच कोकणात जाऊ इच्छिणार्‍या सर्वाना मार्गदर्शक ठरावा असाच प्रतिसाद आहे आपला. आता एवढी Expert's advice मिळाल्यावर अजुन काही शोधयची गरजच वाटत नाही.थेट बुकिंगच्या कामाला लागतो. काही मदत लागल्यास व्यनि करतोच.. खूप खूप धन्यवाद!

In reply to by गवि

गवि ने गवि ने कोकण टुर्स अँड ट्रॅवल्स ही कंपनी काढावी असे सुचवतो. मी आणि परा त्याचे शेअर नक्कीच विकत घेउ. आणि त्यांची टंकनिका गाईड म्हणुन द्यावी ही उपसुचना.

In reply to by गवि

गवि एक वेगळा धागाच का नाही काढला? साले आमचे प्रवासवर्णनाचे धागे बकवास असतात असे वाटौन गेले एकदम. सुंदर माहिती

In reply to by गवि

खल्लास प्रतिसाद! अतिशय महत्त्वाचे बारकावे असलेली माहिती पुरवल्याबद्दल 'कोकणप्रवाससम्राट गवि' यांना शतशः धन्यवाद!! (तुमचे आणखीन एक नाव आम्ही आजपासून 'कोकणविहारी' असे ठेवले आहे! ;) ) आत्ताच मी गणपतीपुळ्याच्या एमटीडीसी रेझॉर्टचे बुकिंग केले. क्रिसमस सुट्टी सुरु व्हायच्या आधीच्या दिवसांचे केल्याने लगेच मिळाले. एमटीडीसी ची वेबसाईट अतिशय प्रोफेशनल वाटली उपलब्ध खोल्या, त्यांच्या तारखा, भाडी, एका खोलीत किती जण राहू शकतात इ. माहिती सविस्तर आणि अतिशय व्यवस्थित पुरवली आहे. ऑनलाईन बुकिंग करता येते. सगळे भाडे आगाऊ भरावे लागते, परंतु एक आठवडा आधीपर्यंत १०% चार्ज वगळता बाकी सगळे भाडे रिफंड होऊ शकते असे लिहिले आहे. (बुकिंग करण्यासाठी आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते.) हा एमटीडीसीचा दुवा* - http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Index/Index.aspx मानस तुम्हाला क्रिसमसच्या दिवसाचे मिळत नसेल तर थोडे आधीचे शक्य असले तर पहा अजूनही साईटवर कॉटेजेसची उपलब्धता दाखवली आहे. गवि, तुमच्या प्रतिसादासाठी वाचनखूण साठवली आहे आणि प्रवासाला जाताना प्रिंटाऊट सोबत नेणार आहे! :) (अत्यानंदित) रंगा * टीप - मी कोणत्याही प्रकारे एमटीडीसीशी संबंधित नाही दुवा केवळ माहिती म्हणून दिलेला आहे.

In reply to by गवि

".....तर मालवणला चिवला बीचजवळ चिवला नावाचंच नवीन हॉटेल आहे (झांट्ये काजूवाल्यांचं) त्याचा मला उत्तम अनुभव आहे. एसी आणि उत्तम रूम्स असलेलं हॉटेल. रूम सर्विसही चांगली आहे." तारकर्ली येथे झांट्ये काजूवाल्यांचं 'तारकर्ली न्याहरी व निवास' हे नवीन हॉटेल आहे. सुरेख.एसी आणि उत्तम रूम्स असलेलं हॉटेल. रूम सर्विसही चांगली आहे. नेट बुकिंग पण आहे. तसेच पुढे देवबाग आहे. जलक्रीडा उत्तम व्यवस्था.

In reply to by गवि

गवि साहेब, खुपच माहितीपुर्ण प्रतिसाद ! लै भारी ! हा छापून कायमचा जवळ ठेवायला पाहिजे कोकणात जाताना !

मी दिवाळीच्या सुट्टीत सहकुटुंब कोकण दौरा केला. एका धडाडीच्या / व्यवसायात नव्याने ऊतर्लेल्या मराठी मुलीने माझा दौरा आखून दिला होता. हा दौरा हा आमच्या कुटुंबा करता सुखद अनुभव होता. मानसरावाना मी व्य.नि. द्वारा तीचा फोन नंबर दिला आहे. ईतर कोणा मिपाकराला हवा असल्यास व्य.नि. करावा ही वि.

मी आणखी थोडी भर घालते. मालवणहून एन एच १७ ने न येता सागरी महामार्ग पकडा. अर्थात हा फक्त नावाचा महामार्ग आहे. बराचसा अरुंद आणि वळणांचा. जैतापूरपर्यंत समुद्रकिनार्‍याने बराचसा प्रवास करता येतो. रत्नागिरीच्या वाटेत जरा दुसर्‍या रस्त्याला जाऊन विजयदुर्ग पाहता येईल. गणपतीपुळ्याजवळ मालगुंडला केशवसुतांचं स्मारक बघा. गणपतीपुळ्याला जायचा रस्ता साखरतर, बसणी आरे वारे अशी निसर्गरम्य गाव बघत पार करा. परतीच्या रस्त्यात शक्य असेल तर मार्लेश्वर, संगमेश्वर करून शक्यतो आंबा घाटातून कोल्हापूरमार्गे पुण्याला चला. कारण तो घाट सर्वात सोपा आणि रुंद आहे. फोंडा घाटातून शक्यतो संध्याकाळी उशीरा जायचं टाळा, कारण पूर्वी तिथे लूटमारीचे प्रकार घडलेले आहेत. आणखी एक खबरदारी म्हणजे दिवेलागणीच्या वेळेला घाटात प्रचंड धुकं थंडीच्या दिवसात पडतं. फॉग लाईट्सचा/हेडलाईट्सचा उपयोग होत नाही. तेव्हा त्या अडनिड्या वेळेला प्रवास करायचं शक्यतो टाळा.

In reply to by पैसा

सागरी महामार्गावरील समुद्र किनार्याला समांतर ड्राईव्ह फारच मस्त. आरे आणि वारे समुद्रकिनारे ३-४ वर्षापूर्वी पहिले तेव्हा ते नुकतेच प्रसिद्धीला येत होते. खूप सुंदर आहेत. आता कितपत गजबजलेले आहेत माहिती नाही. पण मी तरी "नक्की पहा " असाच शिक्का मारीन. गणपतीपुळे फारच व्यावसायिक आणि अति गजबजलेले झाले आहे असे माझे मत. पण पाहिले नसले तर अवश्य पहावे असे ठिकाण. आसपास बघण्यासारखा खूप आहे. तुमच्या कडे भरपूर वेळ आहे. पण तुम्हाला कशाची आवड आहे यावर अवलंबून आहे.( म्हणजे बीचेस, रेसोर्त , देवदर्शन, ऐतिहासिक स्थळे इ). मुलगी लहान आहे तेव्हा प्रवासाच्या वेळेवर ( दीर्घ प्रवास) बंधने येणार. स्वतःचे वाहन असेल तर शक्यतो रात्री प्रवास न करणे चांगले असे मला वाटते. खूप धावपळ करण्यापेक्षा मोजक्याच ठिकाणी भरपूर वेळ देवून एन्जोय करावा असे मला वाटते. आपला प्रवास सुखाचा होवो आणि कोकण यात्रा संस्मरणीय होवो.

गवि व पैसा यांचे उत्तम प्रतिसाद. उपयुक्त माहिती. धन्यवाद.

गवी खुप छान माहीती दिली हो तुम्ही. पण मदत कराल काय मला?? माझी समस्या जरा गहण आहे हो?? कोकणात तर जायचे आहे पण...

कृपया मला ह्या धाग्यावरील गाविंचा प्रतिसाद दिसत नाही आहे तो उपलब्ध होवू शकेल का?

मानस तुमचा गूग्ले किंवा याहू किंवा अन्य तत्सम व्यनि दिल्यास मी तुम्हाला कोकण दर्शन ची फिले पाठवु ईच्छितो..वर्ड फाईल पाठवु ईछितो..

धन्यवाद गवि - महाराष्ट्रीय असुन कोकण खरचं बघायचं राहीलं आहे. ज्या कोणी हा धागा वर आणला त्यानांही धन्यवाद. अप्रतिम माहीती आणि फोटोमुळे अजुन भर पडली. आमचापण भारतात जुन्-जुलै मध्ये यायचा विचार आहे यावेळेस कोकण ट्रिप योग्य होइल असे वाटते का? आधी केरळचा विचार होता, पण तिथे पाऊस (मान्सुन सिझन) जुनच्या पहिल्या आठवडयातच सुरु असल्याने ते होईलसे वाटत नाही. तसेच शाकाहारी लोकांसाठी कोकण बघताना काही खास सुचना आहेत का?

मानस यांनी योग्य वेळी सुरू केलेल्या धाग्याला बरेच उपयोगी प्रतिसाद आल्याने साठवणीलायक झाला आहे .#गवि +१० .(१)पुण्याहून मुळशी कोलाड घाट -कोलाडचे कुंडलिका राफ्टिंग --श्रिवर्धनपासून दक्षिणेकडे ही सुरुवात #गवि कशी वाटते ? (२)ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे नसेल त्यांना 'कोकण प्रतिष्ठान 'च्या सहलींचा पर्याय चांगला आहे असे मला वाटते .

ग वि खालून वर रत्नागिरीपर्यंत पोहचले आता पुढचे दापोली पर्यंत मी काही पर्याय सुचवतो . असेच पुढे सागरी किनार्याने जयगड गाठा . इथे तरि ची सोय आहे पलीकडे गुहागर तालुक्याला जायला. गुहागर तालुक्यात प्रवेश करा . मग पुढे तवसाळ- रोहिले -नरवण करीत हेदवी च्या गणपतीला पोहचाल . मंदिर खूप सुंदर आहे . अष्टभुजा आहे. दर्शन झाल्यावर लगेच जाताना पालशेत मार्गे (माधुरी दीक्षितचा गाव तसेच काकस्पर्श चे चित्रीकरण येथेच झाले होते) गुहागर गाठा. तिथे वस्तीकारिता भरपूर लॉज, किंवा घर्गुति सोय उपलब्ध संध्याकाळ गुहागरचा शांत आणि सुंदर समुद्र किनार्यावर घालवा . दुसरे दिवशी सकाळी गोपाळगड गाठा . या ठिकाणी लाईट हाउस मध्ये वरती जायला देतात. माणशी काहीतरी १० रुपये ticket आहे. इथून जयगड ची खाडी ते हर्ण्ये मुरुड पर्यंतचा शांत निळाशार समुद्र छान दिसतो. मग बाजूला लागुनच असलेला Enron प्रकल्प पाहावयास जा. ( मी तीथे १९ महिने कामाला होतो त्या वेळेला लोक ट्रीप ला यायचे. त्यांच्या प्रकल्पच्या गाडीने तेव्हा आतमध्ये सर्व फिरवून आणतात आता माहित नहि.) आता पुढे २ पर्याय आहेत एक तर पुन्हा तरी मार्गे (प्रत्यक चार चाकी गाडी मागे ४५ रु. घेतात ) खाडी ओलांडून पलीकडे दाभोळ बंदर ला उतरलं कि दापोली तालुक्यात प्रवेश कराल. नाही तर गुहागर ला परत येवून गुहागर - चिपळूण मार्गे ( अंतर ४ कि. मि. )कोयना घाट चढून पुणे गाठू शकता. चिपळूण ला येवून ग. वि. नि सुचवलेले डेरवण येथे जावू शकता तेथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन पट पुतळ्याच्या रुपात पहायला मिळेल. जर दाभोळला गेलात तर दाभोळ - दापोली २८ कि. मी. रस्याला घाट चढून गेल्यावर वाटेत चंडिका देवीला जा. मुख्य रस्त्याने साधारणपणें १/२ कि.मी. आत रस्ता जातो. गाडी थेट चंडिका देवी मंदिरा पर्यंत जाते. अवश्य बघा स्वयंभू देवी आहे. जाताना पुजार्याला प्रथम आत मध्ये जायला सांगा कारण आत खाली भुयारात अंधार असतो. फक्त समयी चा प्रकाश असतो मुलाला सांभाळा. मग सरळ दापोली गाठा . इथेही भरपूर लोजेस , घरगुती सोय उपलब्ध आहेत. दापोलीत एका दिवसात पाह्ण्यासाखे भरपूर स्पॉट आहेत. पुन्हा समुद्र किनार्यावरचा "कड्यावरचा गणपती" पाहणं आनंददाई. जाताना हर्ण्ये मुरुड मार्गे जा ( जो तुम्ही गोपाळगडाच्या light house मधून बघितले होते ते ) पण इथे समुद्र चे पाणी खराब आहे पाण्यात जावू नका. परत आलात कि लाडघर ला जा तिथे मात्र फक्त तेवढाच समुद्राची वाळू कशी काय माहित नाही लाल आहे. खूप शांत ठिकाण तिथेच एख्याद्या वाडीत माडाच्या बनात जेवणाची सोय होवू शकते. मग पुन्हा दुपारी दापोली शहरात परत आलात कि दापोली कृषी विद्यापीठ अवश्य पाहा . तुमचा मुलगा हाताने तोडून तिथली सर्व फळे खावू शकतो एवढी लहान फळझाडे रांगोळीच्या टिपक्या सारखी एका सरळ रांगेत लावली आहेत. जर हवी असतील घरातल्या फुलबागे करता रोपे खरेदी करू शकता. मग दापोली मार्गे खेड ला येवून कशेडी कवटी घाट चढून पोलादपूर- प्रतापगढ मार्गे वाए मग तिथून पुणे गथा. सर्व प्रवासास हार्दिक शुभेछा तसेच प्रवास झाल्यावर फोटोसहीत वृतांत जरून टाका.

In reply to by प्रमोद देर्देकर

हेदवीला अष्टभुज गणेशमंदिराबरोबर ब्राह्मणघळदेखील बघण्यासारखी आहे. डोंगरच्या अरुंद (एका बाजुने दुसर्‍या बाजुला उडी मारता येईल इतकी अरुंद्)कपारीत समुद्राचे पाणी आतपर्यंत घुसले आहे.
आणि दापोली मार्गे खेड ला येवून कशेडी कवटी घाट चढून पोलादपूर- प्रतापगढ मार्गे वाए मग तिथून पुणे गाठा
याऐवजी वेळ असेल तर दापोलीहुन वेश्वीला जा. (बाणकोटजवळ) आणि वेश्वी-बागमांडला फेरी बोट घेवुन हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर बघुन ताम्हीणीमार्गे पुण्याला या. (खुप दिवसापासुन मुंबई-गोवा हायवेला न जाता मुंबई ते गोवा जाण्याची इच्छा असलेला) सौंदाळा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वेश्वी-बागमांडला फेरी बोट घेवुन
ह्या फेरीवर चारचाकी घेतात का?
मुंबई-गोवा हायवेला न जाता मुंबई ते गोवा जाण्याची इच्छा असलेला
यस. एन्ड टू एन्ड किनारी सफर करायची आहे एकदा.

In reply to by प्रमोद देर्देकर

मस्त माहिती... हा दुवा तर गवि आणि तुमच्या माहितीपूर्ण प्रतिसादाने संग्राह्यच नाही तर कोकण सहलीचे आयोजन करताना आवश्यकच झाला आहे

दुसरे दिवशी सकाळी गोपाळगड गाठा . या ठिकाणी लाईट हाउस मध्ये वरती जायला देतात.
हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. 'टाईम प्लीज' या मराठी चित्रपटाचा शेवटचा भाग इथेच चित्रीत केला होता.

माझा अनुभव .माझी मुलगी चार ते दहा वर्षे होईपर्यंत चारपाच वेळा जाऊन कोकण पाहिले .केवळ समुद्र पाहिजे म्हटले तरी सर्व किनारे सुरक्षित नाहित . मुलांना देवळे फार आवडत नाहित .मुरूड कर्देला हॉटेल किनाऱ्याजवळ असले तरी मुले (दुसरी मुले नसल्यास) दुपारी 'बोअर' होतात .कोकणात बऱ्याच ठिकाणी हॉटेलवाले फक्त रुम भाड्याने देत नाहित तर नाश्ता ,चहा ,दोन जेवणाचे प्रत्येकी अमूक रूपये असा रेट(माथेरान सारखा) घेतात त्यात काटछाट करत नाहीत .यात नुकसान होते .पुण्याकडून कोकणात उतरायला कोणता घाट कार ड्रायविंगला बरा वाटतो तोच नेहमी कायम ठेवा .

बऱ्याच वर्षांपूर्वी गणपतीपुळे , मालवण च्या सहलीवर गेलो होतो , तिथे कुठल्यातरी मुक्कामी किनार्यावरच्या वाळूत , सुरुच्या झाडांमध्ये बांबूची घरे आहेत त्यात मुक्काम केल्याचे आठवते आहे ,पण ते नेमके ठिकाण कोणते ते आठवत नाही . २ री , ३ रीत असेन फार तर तेंव्हा , घरच्यांसोबत गेलेलो … आता मी घरच्यांना तिथेच घेऊन जावे अशी इच्छा आहे . पण ठिकाण आठवत नाही कोणत्या किनारी अशी व्यवस्था आता उपलब्ध आहे का ?

जुनच्या शेवटच्या आठवड्यात को़कणचा प्लान करणे हे ईष्ठ ठरेल का ? म्हणजे पाउस कदाचित असेल ( का उकाडा ?), पण बीचवर जाताच येणार नाही, अशी परिस्थिती असेल का ? साधारण आठवडा थाम्बायचा विचार आहे, तारकर्ली, गणपतीपुळे असा... जाणकारांनी मार्गदर्शन करावे....

In reply to by ब़जरबट्टू

निसर्गाच्या तर्‍हा बघायला जाणार तर एक विलक्षण अनुभव मिळेल. पावसाची शक्यता ९९%. समुद्रकिनारी जायची कल्पनाही करू शकणार नाही असे भयावह वातावरण. भयानक उकाडा. घामाच्या धारा लागणार. पाऊस नसेल तर घामाने तुम्ही गच्च ओले होणार. चांगला आनंददायक अनुभव नाही. (मी गेली चार/पाच वर्षे दर महिन्याला एक दोनदा घाटावरून रत्नागिरीला जा ये करतो. त्या अनुभवावरून सांगत आहे. तेवढा जाणकार नाही)

In reply to by ब़जरबट्टू

अजिबात येऊ नका. जून शेवटचा आठवडा आणि जुलै पहिला आठवडा, आम्ही लोक नाइलाज झाला तरच घराबाहेर पडतो. लाईट जाणे, रस्त्यात, रेल्वे मार्गात अडथळे हे नेहमीचेच आहे. त्यात जर मजा वाटणार असेल तर या. नाहीतर काय तोपाऊस म्हणून शिव्या द्यायची वेळ येणार असेल तर अजिबात येऊ नका. एका दिवसात काही इंच पाऊस पडणे वगैरे हमखास बघायला मिळेल. पण अशा हवेत घरात गप्प बसून राहणे हे शहाणपणाचे.

गवि आम्ही पति पत्नी व ४ वर्षाचा मुलगा कोकण दर्शन साठी जात आहोत. स्वतचे वाहन नाही . कोल्हापुर पर्यंत ट्रेवल्स ने येतोय. तर पुढ्च नियोजन कसे करावे. आम्ही गणपतीपुले पाहून येणार होतो आणखी काय काय आणि कसे पाहता येईल.

आपल्या अनुभवा नुसार , नियोजन नुसार काय बदल करावा ? माझे नियोजन कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन कन्हेर मठ 15km (OLD बेंगलोर हाईवे) शाहू पैलेस 3KM नानीज किंवा पुले मुक्काम Stay नानिज to पुले 50 km दुसरा दिवस आगमन गणपती पुले 7am गणपति पुले दर्शन गणपति दर्शन ८ am , प्राचीन कोकण, माल्गुंड बिच 5km बीच 6 PM Stay Gp तिसरा दिवस महाबलेश्वर दर्शन : पाचगनी stay महाबलेश्वर or पुणे प्रस्थान महाबलेश्वर to पुणे 117 km (at ngt or mrng) चौथा दिवस पुणे दर्शन

In reply to by ओशो

लिमिटेड कालावधीसाठी ठीकच आहे तुमचा प्लॅन. एंजॉय करा आणि वृत्तांत फोटोसहित लिहा. शुभेच्छा...!!!