Skip to main content

एक नवा उपक्रम - पत्राला उत्तर हवंय

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 18/10/2011 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले कुणाला पत्रंच लिहायचा प्रश्नच आला नाही, आणि मला ही बँक स्टेटमेंट सोडुन इतर कुणाची पत्रंच आली नाहीत. सध्या वेळ पण बराच आहे, म्हणुन विचार केला पत्रं लिहायला सुरु करावं. पत्र लिहायला बसलो खरं, पण पुन्हा प्रश्न होताच, लिहावं कुणाला, मित्राला,भावाला, बहिणिला,आत्याला, मामाला कुणाला लिहावं, कुणितरी असं हवंय ज्याच्याकडुन उत्तर येईल, किमान पत्र पोहोचल्याचा फोन गेला बाजार एसेमेस तरी येईल. का अपेक्षाच ठेवु नये उत्तराची, छे हे शक्य नाही, निरपेक्ष जगण्याला काय अर्थ आहे, एखादा बाण धनुष्यातुन सुटल्यावर त्यानं समोरच्याचं चिलखत भेदावं, जावुन त्याच्या काळजात रुतावं अन वेदनेनं तडफडत त्याचा जीव घ्यावा एवढी अपेक्षा नाहीच, पण निदान टिव्हीवर दाखवायचे तसं एखाद्या बाणाला जाउन धडकावं तरी त्या बाणानं. अगदी एखादा जाउन पोहोचलाच चिलखतापर्यंत अन ओढलाच एखादा ओरखडा तर भारीच मौज येईल. दोन दिवस विचार झाल्यावर असं ठरवलं की जाउ दे, आपणच लिहावीत पत्रं कल्पनेतल्या कुणाला तरी आणि त्या कल्पनेतल्या कुणीतरी द्यावीत त्याला उत्तरं. लिहिणारे हात, म्हणजे टाइपणारी बोटं तीच असतील, पण त्या बोटांना येणारे संदेश दोन वेगळ्या विचार प्रक्रियेतुन आलेले असतील, शेवटी मी कुणाला तरी पत्र लिहिणार म्हणजे त्याच्या विचारप्रक्रियेलाच पोक करणार ना, थोडक्यात उचकवणार ना, त्यावरच त्याचा चांगला प्रतिसाद येईल किंवा उलट प्रतिक्रिया येईल. पण काल रात्री मेंदुनं एक संदेश दिला, अरे हे एवढं एकटाच करण्यापेक्षा कुणी तयार आहे का समोर उभं राहायला ते तरी पहा, मार तरी एक बाण, पडला एखादा महारथी मस्तच नाहीतर किमान एखादा घोडा तरी घाबरेलच ना शेजारी बाण पडल्यावर. तुम्ही ' तुम्हारी अमृता' पाहिलं असेल ना, नाही ठिक आहे, ऐकलं तरी असेल, ते पण नाही. ओके, पण अनुभवलं तरी असेल ना तुमच्या आयुष्यात. मला तसंच करायचा विचार आहे फक्त स्टेजवर नाही इथंच आंतरजालावर, आणि कोण्त्याही फॉर्मट मध्ये, एखाद्या मित्र मैत्रिणीच्या रुपात किंवा १२ वर्षे संसार केलेल्या पती पत्नीच्या रुपात किंवा अगदी ४ मित्रांचा ग्रुप बनवुन हे करु. ह्यात हलका फुलकाच काय तर अगदी डार्क विनोद पण असेल, किंवा महागाई अन प्रेमभंगासारखे गंभीर विषय असतील. जर हे यशस्वी झालंच तर दोन तीन वर्षानंतर नेउ त्याला कट्ट्यांवर आणि मग तिथुन स्टेजवर, शेवटचं लक्ष्य तेच आहे, पण प्रत्येक प्रवासाची सुरुवात तर आपल्या आपल्या घरातुन बाहेर पडुन करावी लागेल ना. कुणाला आहे का वेळ आणि इच्छा या मध्ये सहभागी होण्याची, असेल तर कळवा तसं. अर्थात हे सगळं व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मिसळपाव व्यवस्थापनाचे अतिशय आभार.

वाचने 4169
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मी आजही मित्र-परिवारात हौसेने पत्र व्यवहार करतो. (ते पत्रोत्तर देण्याऐवजी फोन वरून बोलतात.) पण पत्र हे संपर्काचं साधन म्हणून फार आवडीचं आहे. लहान असताना आजीच्या नातलगांची पत्रं तिला वाचून दाखवणं आणि तिने डिक्टेट केलेली पत्रं लिहिणं यातला भरपूर आनंद घेतलाय आणि पत्र-लिखाणाचा तसा आनंद अजूनही घ्यायला आवडेल, नक्की! तेव्हा आमचा होकार घ्या, हर्षदभाऊ! पत्ता धाडा, आमचं पत्र लगेच पोहोचेल.... :-)

आपला धागा वाचला व मन भुत कालात गेले " सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे. " हा सुविचार आठवला... चांगले वळणदार व मोत्या सारखे अक्षर असणे हि कौतुकाची बाब होति/आहे.. पुर्वि परीक्षा पेपरात चांगल्या अक्षराला गुण असायचे..स्वछ्यता व टापटीप हा त्या काळी विद्यार्थ्यांचा महत्वाचा गुण समजला जायचा... देव नागरी व इंग्रजी अश्या दोन लिप्या आहेत..माझे दोनहि लिप्या मधले अक्षर वळण दार आहे.... पुर्वि मुलांकडुन कित्ते गिरवुन घ्यायचे त्या मुळे हातास एक वळण लागत असे.. शिक्षण मराठी माध्य मातुन झाल्याने आमच्या पिढीला इंग्रजी लिपि तुटक तुटक लिहिण्याची सवय होति..रनिंग लिपि त्या काळी फारशी प्रचलित नव्हती.. जी मुले इंग्रजी लिपि रनिंग मधे न लिहिता तुटक लिहितात त्यांच्या अक्षराचे वळण चांगले असते..असा माझा एक समज आहे... वळणदार अक्षर ईंग्रजी मधे म्हणाल तर AvantGarde Md BT फ़ॉंट सारखे व मराठीत सुशा सारखे अशी माझी कल्पना आहे.. AvantGarde Md BT हा माझा आवडता फ़ॉंन्ट..व माझा पत्र व्यवहार हि मी त्या मधेच करायचो.. पण संगणक आला अन सारेच बदलले..कळफलक वापरता वापरता लिहिण्याची सवय मोडुन गेली... ह्ल्ली पत्र पाठवण्याची पण वेळ येत नाहि..स्कायपी वा इ मेल..वा मोबाईल असतोच.. परवा लिहित असताना ध्यानात आले कि लिहिण्याची सवय पार मोडली आहे.. अक्षराचे वळण पहिल्या सारखे राहिले नाहि...शेवटी Practice makes the man perfect..हा जुना फंडा खरा आहे तुमचा धागा वाचताना सारे आठवले. ऊपक्रमात सहभागी व्हायला आवडेल

त्यापेक्षा तुम्ही पंतप्रधान, राष्ट्रपती, विधानमंडळांचे अध्यक्ष्-सभापती, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इ.इ. ना का पत्रे पाठवीत नाहीत? ही पत्रे कधी आणि कोणत्या(ही) विषयांवर कशी लिहायची याचे धडे तुम्हाला मिपावरच मिळू शकतील!

In reply to by सुनील

' पंतप्रधान, राष्ट्रपती, विधानमंडळांचे अध्यक्ष्-सभापती, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ' मग माझ्या या उपक्रमात तुम्हीच या भुमिका का करत नाही, धाग्यात म्हणल्याप्रमाणे इथं पत्रं आपणच एका भुमिकेतुन लिहायची आहेत आणि त्याला उत्तरं दुस-या भुमिकेतुन द्यायची आहेत.

ऊपक्रमात सहभागी व्हायला आवडेल मी गणेशा या नावाने पत्रास उत्तर लिहिणार नाही ... एक शंका.. आपण एक पत्र लिहायचे आणि उत्तर दूसर्या भावनेने द्यायचे असेच म्हणने आहे की.. वरील कोणाचे ही पत्र घेवुन त्याला अभिप्रेत असणारी व्यक्ती होउन आपण पत्र लिहायचे .. अवांतर : भरगच्च साथ लाभेल माझी, पण या आठवड्यात खुप काम असल्याने आणि नंतर दिवाळीची सुट्टी असल्याने थोडा प्रतिसाद देण्यास वेळ लागेल .. नंतर ही खिप बिझी असल्याने चआंगला उपक्रम नेमका माझ्यासाठी चुकीच्या वेळेला आला आहे असे वाटले.

निबंध पत्रलेखन या सगळ्यां पासून शाळेतच फारकत घेतली आहे. पण एखाद (स्वत:साठी आलेल) पत्र मिळाल्यावर जो आनंद होतो तो शेकड्यांनी आलेल्या इ-मेल्स पेक्षा कैक पटींनी जास्त असतो. त्यामुळे हर्षदराव* जर आपण आम्हाला पत्र लिहिलत तर उत्तरा दाखल तुम्हाला पत्र येईलच याची खात्री देत नाही पण फोन करून... गेला बाजार येशेमेश करुन नक्कीच कळवु. :) * फक्त ५० राव टंकायला कैच्या कै वाटते. मुळ नावाचा उल्लेख केल्या बद्दल क्षमस्व.

प्रिय ताईस, आमचे लग्न होऊन सात वर्षं होऊन गेली. नवरा बँकेत कामाला आहे. आधी कॅशिअर होता. वर्षापूर्वीपासून कॅशिअरचे काम करताना चुका जास्त व्हायला लागल्या म्हणून तिकडून उचलून बँक ग्यारंटी बनवायच्या कामावर आणला होता. सुरवातीला बॉण्ड पेपर वरचे नोटांचे कागद कापून घ्यायला लागला. नोटांसारखी थप्पी करुन मोजू लागला होता. पगारातून बँकेने सात हजार नऊशे पनास रुपये कापून घेतले आणि पंधरा दिवस घरी बसवले. डॉक्टरकडे नेऊन आणल्यावर दोन चार महिने बरे गेले पण आता तर खूपच त्रास वाढला आहे. रात्री बोटाची हालचाल नोटा मोजताना जशी होते तशी करु लागला आहे. काय करु समजेनासे झाले आहे. उपाय सुचवा. आपलीच, एक त्रस्त भगिनी. . . . . प्रिय भगिनीस, आपली समस्या समजली.खरेतर आपल्या पतीला कामामध्ये असलेल्या आवडीब द्दल आपल्या पतीचे कौतुक केले पाहिजे. काम करताना ते जितके समरस होतात त्याच्या १०% जरी लोकांनी कामे केली तरी आपला देश कितीतरी पुढे जाईल. अर्थात आपल्याला जो त्रास होत आहे तो थोडा समजून घेऊ. आपल्या पतीच्या डोक्यामध्ये असलेल्या नोटा हे खरे मुख्य कारण त्यांच्या अशा वागण्याचे आहे. त्यांच्या डोक्यात सारख्या नोटा येतात का? म्हणजे खरंतर त्यांच्या डोक्यात नोटांचा विचार 'येतो का' पेक्षा 'का येतो' हा विचार होणं आवश्यक आहे. आपण उलट टपाली आपली पूर्ण माहिती द्याल अशी अपेक्षा आहे. जेणे करुन आपली समस्या सोडवण्यास मदत होऊन आपला संसार सुरळीत चालण्यास मदत होईल. आपलीच, ताई. **** समुपदेशन केंद्र. दू. ४२०-४२०-८४०० हे असे चालेल का रे ५० फक्त?

प्रश्न तुमचे उत्तर पन्नासरावांचे अशा प्रकारचे (पूर्वीच्या वपुंच्या प्लेझर बॉक्स सदराप्रमाणे) पत्रोत्तरांचे सदर सुरु करावे अशी मी सूचना मांडतो.