Skip to main content

कामवाली

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 24/09/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हा कदाचित, भारतात राहण्यार्‍या भारतीय (आयटी वाईफ्/वर्किंग वाईफ/रिच नॉन वर्किंग वाइफ) गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय असेल. आजकाल चांगली कामवाली मिळणे कठीण गोष्ट आहे असे ऐकिवात आहे. ;) गोष्ट तशी जुनी आहे. मी बेंगलोरात नवखाच गेलो होतो तेव्हाची. ऑफिस शहराबाहेर असल्याने जवळपास रहाणे क्रमप्राप्त होते, पगारही कमीच होता. लोटेगोल्लाहली नावाच्या खेड्यासम एरीआ मधे १ बीएचके जागेत रुमपार्टनर हवा आहे म्हणून अ‍ॅड लागली होती हापिसात. भाडं कमी होतं, पंजाबी रुम पार्टनर म्हणजे खाण्या आणि "पिण्याची' आबाळं होणार नाहीत अशी अपेक्षा करुन चांगभलं म्हंटलं. शनिवारी संध्याकाळी रहायला गेलो. रविवारी सकाळी सकाळी, "बय्या, उटो". असा आवाज आला आणि चवताळून उठलो. तर एक बाई हातात झाडु घेऊन माझ्या समोर उभी होती. वय जास्त नसावं, मध्यम बांधा, काळा वर्ण, वय २४-२५ असावं, पाच साडे पाच फुट उंची, झोपेतुन उठल्याने काय होतय हे समजेना, तेवढ्यात पवन ( रुम पार्टनर) आला. ओये, उठ जा भाई, साफ सफाई का टाईम है. मी रविवारच्या सकाळी ७ वाजता मनातल्या मनात चीडचीड करत चडफडत उठलो. ब्रश करत होतो तेवढ्यात ही बाई पुन्हा समोर उभी. "कपडा कौनसा धोना?" च्यामारी... मी नकारार्थी मान डोलावली, तेवढ्यात पुढचा प्रश्न "ब्रेकफास्ट क्या होना?" "यार पवन, ये क्या टेंशन है यार?" - मी "समझ जायेगा" - पवन ब्रेकफास्ट टेस्टी होता. सोमवार पासून ऑफिस पुन्हा सुरु झाले. सकाळचा ब्रेकफस्ट आणि लंच ऑफिसमधेच व्हायचं, रात्री घरी गेल्यावर जेवण तयार असायचं. पण शनिवार रविवार ही बाइ मला काही उसंत देइना. पण हळू हळू सगळ्याची सवय झाली. मग बर्‍याच गोष्टी समजल्या. ह्या बाईच नाव शांती होतं. सहसा नवरे बायकोला टाकतात, पण हिने दारुड्या, काम न करणार्‍या नवर्‍याला टाकून दोन मुलांची जबाबदारी उचलली होती. गेल्या सहा महिन्यात एकही सुटी घेतली नव्हती. सकाळी पाच वाजता ऊठुन मुलांना तयार करुन शाळेत सोडायची, मग दिवसभर ५-६ घरी धुणं भांडी करून पुन्हा मुलांना शाळेतुन घरी घेऊन जायची. शनिवारी आणि रविवारी मुलांना बरोबर घेऊन काम संपवूनच मग घरी जायची. मलाही तिचं फार कौतुक वाटलं, वयाच्या २४-२५ व्या वर्षी दोन मुलं संभाळणारी ही माता गेल्या ३ वर्षात एकही नवी साडी न घेता, एकही रुपया औषधाखातर खर्च न करता झगडत होती. धुण्याच्या कपड्यात एखादी दहाची नोट असो, किंवा कोपर्‍यात पडलेलं एखादं रुपयाचं नाणं, कधी चोरीला गेलं नाही. घरात, इकडे-तिकडे पडलेले कपडे असो किंवा फ्रिजमधली एखादी खराब होत चाललेली भाजी कधी तिने न विचारता घरी नेली नाही. कधीही आमच्या जवळून जाण्याचा प्रसंग आलाच तर जाताना अंग चोरुन जाण्याची सवय तिचं चारित्र्य सिद्ध करत होती. कधीही शाळेत न गेलेली ही स्त्री हिंदीसहित ५ भाषा शिकली होती. तिला थोडंफार ईंग्रजी येतं हे समजल्यावर मला स्वतःचीच थोडी शरम वाटली होती हे इथे नमूद करतो. मला तिच्या चिमुकल्या मुलांचा लळा लागला, शनिवारी, रविवारी ही मुले घरी यायची, खेळायची. मीही त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळायचो, आम्हाला एकमेकाची भाषा येत नसली तरीही. मी त्यांची वाट बघायचो. ते आले की मीही त्यांची भाषा शिकायचा, बोलायचा प्रयत्न करायचो. एकदा मी त्यांच्यासाठी मॉंजीनीज् चा केक आणला, त्यावर शांती फार नाराज झाली. मी "क्या हुआ?, केक है, बच्चे पसंद करेंगे" ती: "नही बय्या, मै दिन मे एक बार कुकर मे बाथ (भात) लगाती हु, हमारा सारा दिन का काना (जेवण) उसी मे होता है. आप उनको केक देंगे और वो कल मुझसे फिर केक मांगेगे तो मै उनको नही दे सकती" तिची गरीबी तिच्या करुण डोळ्यातून वहात होती आणि मी त्या माउलीकडे पहाण्या पलिकडे काहीही करु शकलो नाही. एक दिवस "बय्या, ए लो, मिठाई." - शांती मी: "क्या हुआ?" शांती: "मेरी बेटी पास हो गई, टीचर कहते है अच्छे मार्क्स आये है" मी; "ये लो, सौ रुपये, मेरी तरफ से उसको कुछ दे देना". तिने पैसे घेतले. शांती; "बय्या, ये पैसे मे उसके स्टडी मे खर्च करेगी. मेरे बच्चे बी एक दिन आपके जैसे सहाब बनेंगे" असं बोलुन ती पाठमोरी होताच माझ्या डोळ्यात हलकेसे पाणी तरारले. आपला, मराठमोळा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10842
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

मराठमोळा ची कथा आवडली. गोष्ट सांगण्याची पध्दत आवडली.

लेखन आवडले. बाई जिद्दीची आहे. माझ्याकडेही पुण्यात अशीच बाई कामाला होती. नवरा सुधारण्याच्या शक्यतेतला वाटल्यानं हिनं चांगला धाकात ठेवला होता. ओळखीनं नोकरी करायला लावली होती. ओळखीच्या लोकांकडनं वर्तमानपत्र घेऊन जायची मुलांचं वाचून झालं की परत आणून द्यायची. कधी दिवाळीला जास्त पैसे मागितले नाहीत की कधी उसने मागितले नाहीत. स्वच्छता कमालीची होती. हैद्राबादची बाई मलाच रागवायची. अम्मा, हे करा ते करा असं सांगायची. तिचं काम मात्र चोख करूनच जायची.

लेखन आवडलं आमच्याकडे काम करण्याऱ्‍या राजेश्वरी काकूदेखील वरील वर्णनाप्रमाणेच आहेत त्यांना पाहिल की शाळेत वाचलेला कुसुमावती देशपांडेँचा "कला" हा धडा आठवतो तसे आतापर्यत चार पाच काकूंचे बरेवाईट अनुभव घेतलेत एका दांडीकाकूंमुळे कंटाळून वाँशिग मशीनचा पर्याय स्वीकारावा लागला होता

पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार, म्हणून तुम्हाला एवढी चांगली कामवाली मिळाली. आमच्या म्याडम आमच्यापेक्षा जास्त सुट्या घेतात. रविवार, सगळे सण इ.इ. आहेच, पण श्रावण सोमवारी सुद्धा तिला देवळात जायचं असतं. म्हणून कामाला दांडी ठरलेलीच. कपडे, भांडी, कचरा काढून फरशी पुसणं इतकं सगळं काम बाईसाहेब मोजून २५ मिनिटांत करून पसार! जमिनीवर चुकून पडलेली प्रत्येक गोष्ट कचर्‍यात गेलीच पाहिजे हा तिचा नियम, मग ते घड्याळ का असेना! क्रिकेटमधला स्वीपचा फटका तिला पाहूनच कोणीतरी शोधला असावा ही माझी खात्री आहे. फक्त बया कधी पैसे अ‍ॅडव्हान्स वगैरे घेत नाही आणि प्रामाणिक आहे, त्यामुळे "सुसरबाई तुझी पाठ मऊ" म्हणून गप्प बसावं लागतं.

ह्म्म्म.... वास्तविक चांगुलपणा हा उपजत असायला लागतो मग कामवाली असो की एखद्या कंपनीचा सीईओ.

बाईंच कौतुक वाटलं...बिनकामी नवरा सोडुन मुलं स्वत:च्या जिवावर पोसणं, चांगले संस्कार करणं सोप्पं नाही. शिकलेल्या वगैरे बायका लोकं काय म्हणतील वगैरे करुन रडत ओढत संसाराचा गाडा ओढतात त्यापेक्षा हे बरं...नव्हे चांगलंच.

आशय, भावना इत्यादी सगळे छान आहे. एक अनाहुत सल्ला देतो. सुबक आकार येण्यासाठी काही मिपाकरांचे मार्गदर्शन घेतल्यास अधीक सफाई येइल. (अवांतर- "पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार" या वाक्यातले 'ममो' हे "श्रामो" यांचे कोणी आहेत का?:~ :-~ :puzzled: )

In reply to by चिंतामणी

>>सुबक आकार येण्यासाठी काही मिपाकरांचे मार्गदर्शन घेतल्यास ... ममो चा आकार सुबक नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? ;-)

आशय, भावना इत्यादी सगळे छान आहे. एक अनाहुत सल्ला देतो. सुबक आकार येण्यासाठी काही मिपाकरांचे मार्गदर्शन घेतल्यास अधीक सफाई येइल. (अवांतर- "पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार" या वाक्यातले 'ममो' हे "श्रामो" यांचे कोणी आहेत का?:~ :-~ :puzzled: )

ममो, बऱ्याच दिवसांनी बोर्डावर बघून बरं वाटलं. तुमच्या कामवालीचं व्यक्तिमत्व छाप पडण्याजोगं आहे. स्वतःच्या आयुष्याचा असा ताबा घेऊन आपल्या शक्तिनुसार शक्य असेल ते जिद्दीने करणाऱ्यांचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

>>ममो, बऱ्याच दिवसांनी बोर्डावर बघून बरं वाटलं. सहमत. कथाही चांगली आहे. >>स्वतःच्या आयुष्याचा असा ताबा घेऊन आपल्या शक्तिनुसार शक्य असेल ते जिद्दीने करणाऱ्यांचं असेच म्हणतो. काही जण आपल्यावर आलेल्या परिस्थितीचं रडगाणं गात बसतात. तर काही जण "या परिथितीत मला कायम रहायचं नाही" असा विचार करून त्यावर मात करायचा प्रयत्न करतात.

In reply to by राजेश घासकडवी

सहमत आहे.

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जींच्या शब्दा शब्दाशी सहमत आहे.

In reply to by राजेश घासकडवी

व्यसनी नवर्‍याला सोडून स्वतःच्या मुलांसाठी वेगळी वाट धरायची हिम्मत दाखवणे ही तरुण स्त्रीसाठी कष्टकरी समाजात सोपी गोष्ट नाहीच. कामवाली जिद्दीची आहे. तिच्या धैर्याला आणि जिद्दीला सलाम! -रंगा

In reply to by राजेश घासकडवी

ममो, बऱ्याच दिवसांनी बोर्डावर बघून बरं वाटलं.
गुर्जींशी सहमत. (गतजन्मीच्या पापांची फळे भोगण्याची ही सुरुवात असावी काय?) कथा आवडली. उगाच आडियन्सच्या काळजाला हात घालण्यासाठी ती लांबवली नाही हे जास्ती आवडले. बाकी हा धागा टाकायच्या आधी 'घरची परवानगी' घेतल्या गेली होती काय ? ;)

ममो, मस्त अनुभव मांडला आहे. मुलांवर उत्तमातले उत्तम संस्कार झाले पाहिजेत त्यासाठी कष्ट उपसणारी अशी मोलकरीन वेगळीच. तरुणपणात नवर्‍याला सोडून दिल्यानंतर पैसे कमविण्याचा शॉर्टकट निवडताही आला असता, पण जगायला लागणारा प्रामाणिकपणा, शुद्धचारित्र्य, आणि भविष्यात एका मोठ्या स्वप्नाच्या आशावादाला हे जगणे मोलाचे ठरेल यात शंकाच नाही. छान लेखन. -दिलीप बिरुटे

लेख छान. पण शेवटी डोळ्यात पाणी तरारायला हवेच का?

In reply to by आदिजोशी

काही काही वाक्यातून अगदी तात्यांची आठवण झाली (आणि मग माझ्या डोळ्यात पाणी तरारले) मामो, लेख मस्तच रे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक दिवसांनी लिहिलेस. बाकी त्या पुणे-चेन्नई लेखमालेचे काय झाले रे? बरीच प्रकरणे बाकी आहेत ना त्याची ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

काही काही वाक्यातून अगदी तात्यांची आठवण झाली (आणि मग माझ्या डोळ्यात पाणी तरारले) अशा व्यक्तीचित्रणांचा शेवट हॄदय हेलावणारा झालाच पाहिजे :)

In reply to by आदिजोशी

अ‍ॅडी, व्यक्तीचित्रणाचा शेवट कसा झाला आहे याकडे मी लक्ष दिलं नाही, कारण मी व्यक्तीचित्र लिहितोय हे मला माहित नव्हतं, एक अनुभव लिहिला आहे एवढच. बाकी या कहानीचा सुखद शेवट तेव्हाच जेव्हा या बाईच्या कष्टाला फळ येईल आणी तिच्या यातनांच्या प्रवासाला पुर्णविराम मिळेल. :)

वरचा लेख आवडला kam (अवांतर--मला आज पर्यंत आवड्लेली कामवाली"पुश्पक" सिनेमा मधील होती.माझ्या कडे घर कामासाथी तशीच एक गेली १०/१५ वर्शे झाली शोधतो आहे ;-))

छान लिहिलंय, आमच्याकडंचा अनुभव बराच उलटा आहे, इथं कामवाल्याची युनियन आहे महिन २००० ची भिशी लावतात, चौघीजणींनी तर शेअरिंग मध्ये टु व्हिलर घेतल्या आहेत. अर्थात त्या पण कधी काळी या दिवसातुन गेल्या असतिल, पण एकजुटितली शक्ती इथं प्रखरतेनं दिसुन येते. एवढंच काय, माझ्या शेजारणीकडे जेंव्हा वाशिंग मशिन घेतलं , तेंव्हा तिच्या कामवालीनं स्पष्ट सांगितलं की एक दिवस त्या मशीनवाल्याला बोलवा मला शिकवायला, अन्यथा नंतर चुकलं बिघडलं तर मी जबाबदार नाही.

In reply to by ५० फक्त

माझ्या शेजारणीकडे जेंव्हा वाशिंग मशिन घेतलं , तेंव्हा तिच्या कामवालीनं स्पष्ट सांगितलं की एक दिवस त्या मशीनवाल्याला बोलवा मला शिकवायला, अन्यथा नंतर चुकलं बिघडलं तर मी जबाबदार नाही. वॉशिंग मशीन विकत घेउन ते चालवण्यासाठी कामवाली बाई ठेवणारे लोकसुद्धा जगात आहेत काय ? ते स्वयंचलित यंत्र धाय मोकलून रडले असेल :)

तशी कहाणी नेहमीची पण त्याला चेहरा - नायक / नायिका- मिळाला की मगच ती कहाणी आपली वाटू लागते. अशी 'नायिका' उभी करणारं हे लिखाण खूपच आवडलं. उपसंहारः या कामवाल्याच असं नाही पण एकुणच आपल्या मुलांमधे (विषेशतः मुलग्यांमधे) इतके गुरफटून जाणार्‍या अनेक स्त्रिया दिसतात. त्यापैकी मुलांसाठी जीवाचं रान करताना आपण मुलांना अति-लाडावत नाही आहोत ना हे मात्र क्वचित बघितलं जातं. (या कथेतील नायिका मात्र त्याला अपवाद दिसत्येय. मुलांना केक नाकारून त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव ती करून देत आहे) हे यासाठी आठवलं आणि लिहितोय त्याला कारण आमच्याकडे भांडी घासणे व घराच्या साफसफाईचे काम करणार्‍या मावशींनीही त्यांच्या तरूणपणी अशीच तगतग करून मुलाला वाढवले - शिकवले. त्या सांगतात तो एम्बीए आहे. आम्हाला आश्चर्यही वाटे आणि तीच्या जिद्दीला सलामही करावासा वाटे. तिने मुलाला भेटवलंही होतं. तो कुठल्याशा कंपनीत आहे असेही तो म्हणाला होता. मावशींचं तोंड मुलाची स्तुती करून दुखत कसं नाहि असं आम्हाला होतं. त्यांनीही दारूबाज नवर्‍याला हाकलंलं होतं. त्यांच्या विश्वात त्यांचा मुलगा हाच सर्वस्व आहे. आता गेल्या महिन्यात मावशी सांगत होत्या, एका मुलीशी परस्पर सूत जमवलं आहे आणि लग्न करत नाहिये कारण तिला आईसोबत रहायचं नाहिये. आता मुलगा लग्न करायचंय म्हणून आईलाच तु वेगळी खोली भाड्याने घेतेस का? विचारू लागला आहे. सध्या तिचा नकार त्याने ऐकला आहे. मात्र हे ऐकून जर पुढे मागे मुलाने जबरदस्ती मावशींना घराबाहेर काढलं तर त्यांचं रहाण्याचं सोडा पण मनाची हालत काय होईल हा विचार मला अस्वस्थ करतो. त्यात परवा तिचा मुलगा एका मॉलमधे नोकरी करताना दिसला. म्हणजे एम्बीए नसावा. आता हे मावशींना माहित आहे /नाहि कल्पना नाही. आणि सांगवतही नाही :(

In reply to by ऋषिकेश

त्यात परवा तिचा मुलगा एका मॉलमधे नोकरी करताना दिसला. म्हणजे एम्बीए नसावा.
तुम्ही त्याला काय करत असताना पाहिले? ह्यावरही ते अवलंबुन आहे...... थिंक +ve फ्रॉम युवर मौशी'स साइड..... त्याने रिटेल मॅनेजमेण्ट मध्ये एम्बीए केले असेल कदाचित.... पण जर तो साध्या कपड्यात (अटेंडर) वावरत असेल तर मग फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही....

In reply to by वपाडाव

बेसिकली फरशी पुसत होता :( त्याच्या एकुण वावरण्यावरून व इतरांचे त्याच्याशी असलेल्या वागणूकीवरून तो उच्चपदस्थ तर अजिबात वाटला नाही

पण ममो, तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं असणार, म्हणून तुम्हाला एवढी चांगली कामवाली मिळाली. >>> अगदी खरं आहे . आम्ही मेली पापी माणसं ! म्हणुन तर चिमुकल्या जीवांना सांभाळायला ठेवलेल्या कामवाल्या बाईंचे प्रताप आणि प्रमाद कितीही मोठे असले तरी आम्हाला ते निमुटपणे पोटात घालावे लागत होते. कारण अचानक ती काम सोडून गेली तर दुसर्‍या दिवशी आणि त्यानंतर नवी कामवाली मिळेपर्यंत इवल्याशा चिमण पाखरांना एकटे टाकुन नोकरीधंद्यावर कसे जायचे हा यक्षप्रश्न होता. एका कामवालीने माझे घाई गडबडीत इतरत्र ठेवलेले सोन्याचे झुमके व अंगठी गायब केली ! एक महामाया माझ्या मुलांच्या वाट्याचे दुध लिंबुरस पिळुन मुद्दाम फाडीत असे. आणि गॅसवर तासन तास ते तव्यामध्ये साखर टाकुन आटवत असे. आणि कहर म्हणजे ती एकटीच ते खात असे. पहिलीमध्ये शिकत असलेल्या माझ्या मुलीने एकदा धीर करुन हे सांगितले तेव्हा कळले !एक भवानी इतकी नीच निघाली की तिच्या काळात घराच्या रिनोव्हेशनच्या वेळी काम करायला येणार्‍या वायरमनला, घराचे काम संपल्यानंतरही आमच्या अपरोक्ष बर्‍याचदा आमच्या घरी येताना शेजारच्या लोकांनी पाहिले आणि तिला त्वरित हाकलून द्यायला लावले. मुंबईच्या कामवाल्यांकडुन वाईट अनुभव आल्यामुळे अखेर गावात रहाणारी नात्यातलीच गरीबाघरची मुलगी कामाला ठेवली. पण बर्‍याच साप्ताहिक सुट्टींच्या दिवशी आमच्या तळमजल्यावर असणार्‍या घरासमोर बर्‍याच अनोळखी लोकांच्या घिरट्या सुरु असल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी करता आमच्या कामवालीने अख्ख्या कॉलनीमध्ये तिच्या अस्तित्वाची, आमच्या घराची विनाशुल्क जाहिरात केल्याचे समजले................अखेर कामवाली न ठेवण्याचा निर्णय घेतला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! नोकरीच्या वेळात मुलांना दिवसभर अनुक्रमे काही काळ शेजारी, काही काळ जवळपास रहाणारे नातेवाईक, काही काळ पाळणाघर वगैरे ठिकाणी ठेवुन घरची सगळी कामे आम्ही उभयतांनी करायला सुरुवात केली. यथावकाश मुले जाणती झाली. घरातल्या घरात स्वावलंबनाचे धडे गिरवत आणि घेत स्वावलंबी बनली. त्यामुळे कामवाली न ठेवण्याचा निर्णय आणि कामवाली ह्या प्राण्यापासुन आजतागायत कटाक्षाने दुर रहाण्याचे प्रयत्न यशस्वी झाले !

लेख वाचत असतानाच हे जाणवलं होतं की हा तुमचा खरा अनुभव आहे. कारण त्यातील अस्सलपणा भिडला. असं काही वाचलं की नंतरचे बरेच दिवस चांगले जातात. धन्यवाद.