Skip to main content

भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय?

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/09/2011 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय? भारतीय उपखंडात निरनिराळ्या आजारपणांचे प्रमाण वाढते आहे. त्यात मधुमेह, हॄदयरोग, स्थुलपणा आदी गृहीत धरा. वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसूत करत असतात. जरी ती आकडेवारी आहे तितकी खरी मानली नाही तरीही वरील आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच. हे आजारपण वाढण्यामागे अनेक कारणे असतीलही - जसे बदलती जीवनशैली, आर्थीक स्थिती उंचावणे, अन्नघटकाचे पोषणमुल्ये, सुपोषण आदी. परंतु या सर्व कारणांमध्ये भारतीय अन्नाची चव व ते अन्न रूचीदार बनवणार्‍या गृहीणी किती कारणीभुत आहेत? या गृहीतकामागे बर्‍याच घरांमध्ये भारतीय अन्नपुर्णा घरी अन्न बनवतात असे गृहीत धरलेले आहे. भारतीय पदार्थ चविष्ट असण्यामागे या अन्नपुर्णांचा हात स्पष्टपणे असतो. सढळ हाताने चमचमीत अन्नपदार्थ, मिठाया बनवण्यात सर्व जगात पहिल्या क्रमांकासाठी भारतीय उपखंडातल्या स्त्रीयांचा समावेश करावा लागेल. आपल्या उपखंडात मसाल्याचे पदार्थांचा मुबलक वापर केला जातो. हे फार पुर्वीपासून चालत आलेले आहे. त्याकाळातही असल्या आजारांचे प्रमाण येथल्या उपखंडात जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याबाबतीत त्याकाळी शास्त्रशुद्ध अभ्यास नसल्यामुळे ती आकडेवारी मिळणार नाही. भारतीय नारी ही घरातल्या व्यक्तीच्या खाण्याच्या आवडीनिवडीबाबत फारच जागरूक असते. पतीला ही भाजी आवडत नाही - नको डब्यात द्यायला, मुलाला डब्यात निरनिराळे पदार्थ देणे जेणेकरून तो शाळेत डबा संपवेल, असे तीचे चालू असते. अर्थात या सर्वांत त्या स्त्रीचे कुटूंबाप्रती असलेले प्रेमच निर्देशीत होत असते. असल्या कुटूंबवस्तल वृत्तीचा मला आदर आहेच, त्यात वाद नाही. एखादा पदार्थ जर चांगला झाला अन तो आग्रहपुर्वक वाढण्यात आला तर त्यास सहसा नकार न देता दोन घास जास्तीचे खाल्ले जातात हा अनुभव आपणास एकदातरी आलेला असेलच. आणखी एक उपमुद्दा येथे येवू शकतो तो म्हणजे आपल्याकडचे सण-समारंभ आणि उत्सव. यांचेही प्रमाण इतर समाजात व भारतीय समाजात व्यस्त आहे. महिन्याकाठी एकतरी सण समारंभ आपल्या संस्कृतीत करण्याचे प्रमाण आहे. त्यावेळी काहीतरी गोडधोड, चमचमीत पदार्थ घरी केले जातात. भारतीय समाजात वाढणारे आजारपणाची सामाजीक व्याप्तीला नवीन दिशा मिळण्याच्या हेतूने वरील सर्व मुद्दे लक्षात घेवून चर्चा अपेक्षीत आहे. (या चर्चेत अमेरीकन्स पण जाड होतायेत, पिझ्झा बर्गर यांची भारतातही चंगळ होते आहे हे टाळावे. संशोधन करणार्‍या बर्‍याचशा संस्था ह्या अमेरीकन (अभारतीय) असल्याने बहूतेक शारीरीक स्केल्स ह्या अमेरीकन/ ब्रिटीश लोकांनाच गृहीत धरून असतात. उदा. BMI, उंची/ वजन/ रक्तदाब यांचा रेशो आदी. अवांतरः (पाभेचा फुटकळ धागा म्हणून दुर्लक्ष अपेक्षीत नाही.)

वाचने 9288
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

अन्नपूर्णाच नाही तर भारताची उंचावलेली अर्थव्यवस्था, मॉलसंस्कृती, व्यायामाचा अभाव, आरोग्यदायक अन्न खाण्याकडे दुर्लक्ष आणि भरपेट खाण्याची आणि आग्रह करण्याची भारतीय वृत्ती अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. वर तुम्ही म्हटले आहेच - एखादा पदार्थ जर चांगला झाला अन तो आग्रहपुर्वक वाढण्यात आला तर त्यास सहसा नकार न देता दोन घास जास्तीचे खाल्ले जातात हा अनुभव आपणास एकदातरी आलेला असेलच. आपल्याकडे आग्रह केल्यावर एखाद्याने नकार दिला तर यजमानांचा अपमान होतो. पाहुण्यांचीही सरबराई योग्य झाली नाही तर अपमान होतो. घरात चकली, लाडू, चिवडा न मिळणे म्हणजे त्या घरातील गृहिणीला आल्यागेल्याची पर्वा नाही असे समजले जाते. ढेकर देईपर्यंत पाहुणा जेवला नाही तर त्याला वाढलेले अन्न आवडले नाही असा गृहिणीचा समज होतो.
या चर्चेत अमेरीकन्स पण जाड होतायेत,
अमेरिकन्स जाड होताहेत नाही, ते जाड झालेले आहेत आणि भारतीयही त्यांच्याच वाटेवर चालत आहेत. अवांतरः पाभे एकदम अमिता गद्र्यांसारखे का बोलू लागले बरे?

In reply to by प्रियाली

(अतिरेकी प्रमाणात) मीठ, साखर, वनस्पती तूप, मैदा आणि जास्त पॉलीश केलेले तांदूळ हे आरोग्याचे पांढरे पंच-शत्रू होत. @पाभे : प्रसूत नव्हे प्रसृत म्हणा... ! तुमच्यासारख्यांना......... असो. जाऊ द्या ;)

In reply to by नरेश_

@पाभे : प्रसूत नव्हे प्रसृत म्हणा... !
नाही हो. एकूण आकड्यांचे खेळ पाहिले तर त्यांनी चुकून बरोबर लिहिले आहे.

वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसूत करत असतात.
=)) म्हणजे ती आकडेवारी खरी नसून या संस्था ती निर्माण करतात असे काही सुचवायचे आहे काय? बाकी लेखात वर्णिलेल्या भारतीय नारींपैकी बहुसंख्य साठीच्या आसपास किंवा जास्त वयाच्या असाव्यात आणि त्यांचा यात काही हात नसावा अशी आम्हास शंका आहे. उलट अशा नारींची संख्या कमी झाल्याने बाहेरचे खाणे वाढले असावे असाही आमचा अंदाज आहे. बाकी चालू द्या.

In reply to by नगरीनिरंजन

नेमकी हीच गोष्ट आम्ही हेरली आणि ज्याप्रमाणे वेगवेगळ्या संस्था आकडेवारी प्रसवत असतील तर त्यांना मिपावर बोलावून विविध लेख प्रसवणार्‍या लेखकांची आकडेवारी प्रसवण्यासही सांगता येइल काय असा एक विचार डोक्यात प्रसवला. ;)

(पाभेचा फुटकळ धागा म्हणून दुर्लक्ष अपेक्षीत नाही.)
दुर्लक्ष केलेले नाही. भारतात आजार वाढत आहेत, हे दाखवण्यासाठी किमान एकतरी आकडा असायला होता. खाली जागतिक बँकेने दिलेला आलेख दिलेला आहे. त्याप्रमाणे भारतात सरासरी जीवनकाल वाढत आहे असे दिसते. वैद्यकिय सुविधांच्या वापरात झालेले बदल लक्षात घेतले तरीही भारतीय पदार्थांचे किंवा पाकपद्धतीचा काही संबंध आहे असे दिसत नाही.
Data from World Bank

In reply to by क्रेमर

१९८० च्या सुमारास या आलेखात 'नी'* येऊन आयुर्मान वाढण्याचा दर कमी का झाला आहे हे कोणी सांगू शकेल काय? *knee = गुडघा, हा शब्द भौतिकशास्त्रात वापरला जातो. अशा प्रकारच्या आलेखात जिथे उतार (स्लोप) बदलतो त्याला नी असं म्हटलं जातं. पाभे, अलिकडच्या काळात तुम्हीच शुद्धलेखनाबद्दल तक्रार केली होतीत म्हणून... हे शब्द असे लिहीतातः अन्नपूर्णा, कारणीभूत, स्त्रियांचा, तिचे, आग्रहपूर्वक, अपेक्षित, बहुतेक, शारीरि

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१९८० च्या सुमारास या आलेखात 'नी'* येऊन आयुर्मान वाढण्याचा दर कमी का झाला आहे हे कोणी सांगू शकेल काय?
कारण अर्ध्या जानेवारीपर्यंत चरणसिंग आणि उर्वरीत काळ इंदिराजी पंतप्रधान असल्याने.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

८०च्या आसपास दर बारकासा कमी झाला आहे पण त्याचे नेमके काय कारण असावे हे मला माहीत नाही. लाइफ एक्सपेक्टन्सीच्या वाढीचा दर काळात जास्त असतो. मग तो कमी होऊ लागतो. आरोग्य धोरणांमध्ये सुरूवातीला मृत्युदराच्या वाढीस कारणीभूत असलेल्या महत्त्वाच्या घटकांना प्राथमिकता दिली जाते. (उदा. भारतात मलेरिया) मग नंतर असे मूख्य घटक कमी होऊ लागतात आणि एक्सपेक्टन्सीच्या वाढीचा दर मंदावू लागतो. खाली चीन आणि भारत यांचा एकत्र आलेख दिला आहे, त्यावरून हे स्पष्ट व्हावे.
Data from World Bank

In reply to by क्रेमर

चीन आणि भारताची तुलना करायची तर चीनच्या संदर्भात साधारण ६३ वर्ष वयानंतर नी आलेला, भारतात ५५ या वयानंतर. अर्थात चीनचा आलेख नी नंतर फारच सपाट झाला आहे तर भारताचा किंचितच. चीनच्या आलेखावर चटकन विश्वास बसला कारण भौतिकशास्त्रात ज्याला एक्पोनेन्शियल कर्व्ह असं म्हणता येईल, तसा काहीसा त्याचा आकार आहे. नैसर्गिकरित्या वाढणार्‍या गोष्टी या प्रकारचे गुणधर्म दाखवतात (उदा: कपॅसिटरचं चार्जिंग) पण भारताच्या बाबतीत असं दिसत नाही. खरंतर एवढा सोपा आलेख पाहून यावर विश्वास ठेवू नये असं काहीसं वाटायला लाघ्या);-) या प्रतिसादात हलकटपणा नाही, ज्यांना दिसतो त्यांची स्वतःची जाण, समज, इ.इ.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चीन व भारत यांची तुलना करण्याचा हेतू नव्हता. एका काळानंतर एक्स्पेक्टन्सीचा दर मंदावतो एवढेच दर्शवायचे होते. चीनमध्ये ५९-६०च्या दरम्यान पडलेला दुष्काळ व परिणामी उद्भवलेले कुपोषण या गोष्टी साठच्या दशकात नष्ट झाल्या व एक्स्पेक्टन्सी वेगाने वाढली. त्यानंतर मात्र वाढीचा दर मंदावला.

तो घरी स्वयंपाक न करण्यातूनच दिसत असावा! ;) घरी बनवलेले ताजे, गरम अन्नपदार्थ खाणे, सकाळची न्याहारी, जेवणाच्या वेळा नियमित असणे, थोडा का होईना व्यायाम नियमित करणे. कोणतेच पदार्थ अति प्रमाणात न खाणे या आणि अशा आरोग्यपूर्ण सवयी हळूहळू रद्दबातल होताना दिसत आहेत. वारंवार बाहेरचे चमचमीत खाणे घडत असले तर वेगळे काय दिसणार. भारतातल्या शहरातून (माझा अनुभव पुण्यातला आहे परंतु इतर मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असावी) बर्‍याच नोकरदारांचा/धंदेवाल्यांचा दिवस उशिरा सुरु होतो आणि उशिरा संपतो त्यामुळे रात्रीची जेवणे जवळपास १०-१०.३० इतक्या उशीरापर्यंत होतात. तब्बेती बिघडण्यामागे हे एक फार मोठे कारण आहे. कामाचा वाढता ताण हा देखील तब्बेतीला घातकच. उशीरापर्यंत चालणार्‍या नेटमीटिंग्ज, फोन कॉल्स, ईमेल्स हे झोपेवर परिणाम करुन घराचे आरोग्य बिघडवून टाकतात. सणउत्सवात गोडधोड होते ते योग्य आहे. तुम्ही ते किती खायचे हे तुमच्या हातात असते. अतिआग्रह उपयोगाचा नाही. आपल्याकडे काहीवेळा आग्रहाचे प्रमाण फारच जास्त होते ते घातकच. अमेरिकन्स जाड झालेले आहेत कारण अति पिझ्झा, बर्गर, कोक, शिवाय रेडमीट अतिप्रमाणात खाणे आणि व्यायामाचा अभाव. -रंगा

काय खरं आणि काय खोटं कोणास ठावूक? आजकाल आजारी पडण्याचं प्रमाण मात्र जास्तच आहे हे खरं. माझ्या वयाच्या चुलत, आत्ते, मावस, मामेभावंडाना हाय, लो बीपी, पाठीचे आजार, आणि काय काय नवीन बरच होतय असं ऐकू येतंय. सगळेजण पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत बिझीच असतात. कामाची ठिकाणे लांब, रस्त्यांवर खड्डे अशी कारणे आहेत. एका नातेवाईकांची मुले कुठल्याश्या महागड्या शाळेत जातात आणि तिथे 'मुलांना आवडेल' असे जेवण असते. ती मुले घरचे साधे जेवण जेवताना कुरकुर करतात. माझी मामेबहिण भारतात गेल्यावर इतकी आजारी पडते की तिला हॉस्पिटलातच दाखल करावे लागते. अश्याने तिला जाणे नको झाले आहे. शिवाय नवर्‍याचे दोन तीन मित्र तर कमी वयातच हृदयरोगाने गेले. वाहनांचे अपघात तर आहेतच. आता कारणं प्रत्येकाची वेगळी असणार. आपल्याला काय झेपतय, चालतय ते पहायला हवं.

जीवनशैली जवाबदार आहेच पण त्याच बरोबर वाढलेले आयुर्मान हेही जवाबदार आहे. मधुमेह, हृदयरोग वगैरे प्रौढत्वा नंतर येणारे रोग आहेत. जेव्हा सरासरी आयुर्मान ३५ होते त्या काळात या रोगांचे (जिवंत असलेल्यांमधील) प्रमाण हे कमीच असणार.

In reply to by नितिन थत्ते

अगदी अगदी. पूर्वीच्या पिढ्यांमधे अमुक गजाननदादा किंवा केशवमामा कसे "मजबूत तब्ब्येतीचे" होते.. ते प्रत्येक जेवणात वाटीभर तूप घ्यायचे, एका बैठकीत परातभर श्रीखंड पैज मारुन संपवायचे.. आणि कसला रोग नसताना चाळिशीतच अचानक पाटावर बसल्याबसल्या मान टाकून तिथेच कसे "गेले" अशा स्वरुपाच्या गोष्टी पूर्वी बर्‍याचदा ऐकल्या आहेत.

In reply to by नितिन थत्ते

पाभे, अतिशय महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा सुरू केलीत. क्रेमर यांनी जो ग्राफ दाखवला आहे, तो डोळे उघडणारा आहे. तशी थोडी आकडेवारी रोगराईच्या वाढत्या प्रमाणावर या चर्चेत तुम्ही किंवा इतर कोणी दिली तर बघायला आवडेल. मला या विषयावर थोडं विस्तृतपणे लिहायला आवडेल, पण माझ्या विचारांचा गोषवारा नितिन थत्तेंनी अचूकपणे पकडला आहे. आत्यंतिक कुपोषित समाजाला खायलाप्यायला मिळायला लागलं की या रोगांचं प्रमाण प्रथम वाढलेलं दिसणारच. इतर रोगांनी, भुकेपोटी, अस्वच्छतेपोटी, साधे उपचार उपलब्ध नसल्यामुळे लवकर मरणाऱ्यांची संख्या घटलेली आहे. त्यामुळे भारतीय अन्नपदार्थ किंवा ते बनवणाऱ्यांचा यात हातभार असण्यापेक्षा उपलब्ध अन्नाची वाढ हे कारण अधिक महत्त्वाचं वाटतं. प्रगतीचं एका अर्थाने हे लक्षण आहे. याचा अर्थ हा प्रश्न महत्त्वाचा नाही असा होत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार या रोगांचं प्रमाण वाढण्यास काँग्रेस, जवाहरलाल नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया आणि राहुल गांधी हे नेहमीचे गुन्हेगार जवाबदार आहेत असे येथे नमूद करू इच्छितो.

In reply to by नितिन थत्ते

मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार या रोगांचं प्रमाण वाढण्यास काँग्रेस, जवाहरलाल नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया आणि राहुल गांधी हे नेहमीचे गुन्हेगार जवाबदार आहेत असे येथे नमूद करू इच्छितो.
वरल्या सर्वांसोबत थत्तेचिच्चांचे नाव नसेल तर वाक्य कै तरीच वाटतं.

In reply to by नितिन थत्ते

लालबहादुर शास्त्री हे केवळ दीड वर्षेच भारताचे पंतप्रधान असल्याने त्यांचे नाव या उपरोक्त यादीत आले नाही. अन्यथा '...जय किसान' असे म्हणून भारतात अन्नधान्याची रेलचेल केल्याप्रकरणी त्यांच्यावर फिर्याद झाली असती हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. ;)

बदलती जीवनशैली (धावपळ, जेवणाच्या अनिश्चित वेळा, बैठे जीवन), व्यायामाचा अभाव (दारात वाहन, जवळच्या जवळ सर्व वस्तूंची उपलब्धता), शहरांमधून उंचावलेला आर्थिकस्तर (पर्यायाने चैनीचे जीवन, टीव्ही समोर बसून खात राहणे), वाढत्या स्पर्थेतील ताणतणाव, व्यक्तीस्वातंत्र्यातून उद्भवणारे संघर्ष आणि त्यामुळे नातेसंबंधात निर्माण होणार्‍या दर्‍या, आई-वडील दोघेही नोकरी निमित्ताने दिवसभर घराबाहेर राहिल्याने निर्माण झालेल्या अपराधी भावनेतून मुलांचे केले जाणारे अवाजवी लाड, पदार्थांमधील रासायनिक घटकांचे प्रचंड वाढलेले प्रमाण अशी अनेक कारणे देता येतील. कळतं पण वळत नाही अशीही वृत्ती वाढीस आहे. मघुमेह तर वयाच्या बाराव्या वर्षीही लागल्याच्या घटना कानावर येत आहेत. घरातील मोजकाच पण शुध्द आहार, सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण, ७-८ तास झोप, भरपूर चालणं, मांसाहारावर नियंत्रण आदी सवयी मुलांमध्ये रुजवल्यास त्यांना आपल्यापेक्षा कमी आजार होतील अशी एक आशा.

माझ्या मते आजारांच्या वाढत्या प्रमाणाला जबाबदार आहे आजची जीवन शैली,प्रदुषण. पुवीही चांगले चमचमीत, भरपुर तेल घालुन केलेले पदार्थ सेवनात असायचे. पण त्या काळी यंत्र कमी होती. घरातील सगळ्याच व्यक्ती अंगमेहनत करत होती. गाड्या आजच्यासारख्या नव्हत्या. काही मैल चालत जावे लागायचे. त्यामुळे शारीरीक व्यायाम होउन तेलकट, चमचमीत, शर्करायुक्त पदार्थ पचले जायचे. पण आता यंत्रयुगात अंगमेहनत कमी झाली, ऑफिसमध्ये बैठे काम वाढलेले आहे त्यामुळे अन्नपदार्थ पचले जात नाहित. पण योग्य व्यायाम केल्यास ह्या तक्रारी उद्भवत नाहीत. अजुन एक कारण आहे ते म्हणजे आजची शेतीच रासायनीक झाली आहे. पुर्वीसारखी नॅचरल खते जाऊन आता हानीकारक किटकनाशके, खते शेती, फळझाडांना वापरली जातात त्याचाही परीणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो. तसेच वेगवेगळ्या फॅक्टरीज, कंपन्यांमुळे, वाढत्या वाहनांमुळे प्रदुषण वाढले आहे. परदेशी पदार्थ आपल्या देशात ठाण मांडून आवडीचे झाले आहेत. हे पदार्थ आपल्या हवामानानुसार आपल्याला सुट होत नाहीत. पण हल्ली तरूण पिढी जिभेला जास्त आणि स्वास्थ्याला कमी महत्व देताना दिसते. आपल्या देशातील पदार्थ हे आपल्या हवामानानुसार पचण्यास योग्य असतात. फक्त त्याच्या प्रमाणात अतिरेक होऊ नये. जरी आपले मसाले तिखट असले तरी त्या मसाल्याचा दाह कमी करण्यासाठी मसाल्यांमध्ये जिर, धणे सारखे शित घटकही घातले जातात ज्यामुळे मसाल्याचा दाह शरीराला कमी होण्यास मदत करतो. ह्यात अन्नपुर्णेचा काय दोष ? माझ्यामते वरील कारणांचा दोष आहे. अन्नपुर्णा ही घरातील व्यक्तिंची गरज भागवत असते. लहान थोरांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांचे स्वास्थ्यही व्यवस्थित राहील ह्याकडे लक्ष ठेउन आपली कसब पणाला लाऊन त्यांच्या गरजा भागवत असते. जर अन्नपुर्णेने आळसपणा करुन घरातील माणसांचे कुपोषण केले तर घरातल्यांचे स्वास्थ्य चांगले राहील का ?

**

आयुष्यात वाढलेला ताण-तणाव हे एक मुख्य कारण वाटते. ! :( प्रत्येक गोष्टीत घाई... खाण्याची देखील घाई ! आपण पदार्थ खाताना त्याचा आनंद घेणे,चव घेण हे हल्ली लोक विसरत चालले आहेत का ? असा प्रश्न मला कधी कधी पडतो. जाता जाता :--- हिंदुस्थानात २.१ मिलियन मुले वय वर्ष ५ पूर्ण करण्याच्या आधीच मॄत्युमुखी पडतात असे यूएन वाले म्हणतात म्हणे ! बहुधा ३२रु प्रति दिवसचा जुगाड त्यांना (त्यांच्या माता-पितांना) करता येत नसावा. !

सदर निवासी प्रश्नावर अनिवासी लोकांच्या प्रतिक्रिया ग्राह्य का धराव्यात ? ;)

.

काय पाभे. कशाला उगाच सुगरण अन्नपूर्णेला या शोकांतिक अवस्थेबद्दल जबाबदार ठरवता. मुळातच बैठ्या लाईफस्टाईलने आरोग्याचे घोडे अडवून ठेवलेले आहे. च्यायला पैसा कमवण्यासाठी ८-९ तास बसून राहायचे आणि वाढलेली चरबी कमी करण्यासाठी महागड्या जिममध्ये पैसा ओतायचा. हे काय आपल्याला रुचत नाय ना भौ.. - पिंगू

ओबामा सुद्धा म्हणून र्‍हायलेत की भारतीय लोक जास्त खातात म्हणून ! हे बघा. http://daily.bhaskar.com/article/BIZ-GLO-food-prices-to-go-up-as-indian… जास्त खाणं आणि बैठी जीवनशैली म्हटल्यावर आजारपणं जरा जास्तच येणार की! आजकाल बाहेर खाणं खूप वाढलंय, आजारी पडायचं तेही एक कारण आहेच. आणि बहुतेक वेळा हॉटेलांचे शेफ "श्रीयुत"च असतात. सुगरणी नव्हे! ;)

भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय?
पदार्थ नाहीत पण अन्नपूर्णा थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहेत्. हल्ली बर्‍याच बायका(म्हणजे ज्यांचे वय साधारण ५०च्या आत आहेत अशा) स्वयंपाक करायचा म्हणून काहीतरी करतात. त्यामुळे एकंदरितच बाहेर खाण्याकडे पुरुषांचा कल वाढतो. शेव बटाटापुरी/ईडली/डोसा हे रात्रीचे जेवण म्हणून खाणारे मी बघितले आहेत. गेल्या ३० वर्षांत पदार्थांची वाढलेली मुबलकता हेही कारण आहे.

चर्चेला एक वेगळाच आयाम मिळाला आहे. बहूतेकांच्या मते अतिरीक्त अन्न पोटात जाणे, अन्नात जास्त कॅलरीज असणे व व्यायामाचा अभाव ही कारणे आहे. वरील सर्व कारणे मी लेखात गृहीत धरलेली आहेच. मुख्य मुद्दा "भारतीय अन्नाची चव" (व ते अन्न रूचीदार बनवणार्‍या गृहीणी") हा आहे. (यात "ते अन्न रूचीदार बनवणार्‍या गृहीणी" ही गोड तक्रार आहेच.) कदाचीत अन्नपुर्णा ही घरातली स्त्री- मग ती माता असूदे, पत्नी किंवा भगीनी असूदे - ही नात्यातली स्त्री असल्याकारणाने वरील चर्चेला भावनीक पदरही प्राप्त झालेला असावा. त्या माता-भगीनींच्या कुटूंबवस्तल वृत्तीचा मला असलेला आदर मी व्यक्त केलेलाच आहे. बाहेरील जेवणात बर्‍याचदा 'तेलाफुलाची भाजी' नव्हती, भाजीला चव नव्हती अशी तक्रार असते. एक उदाहरण सांगतो: कोबीची भाजी जर कमी तेल वापरले तरीही शिजते, थोडी चवीला खालावते पण खाववली जाते. तिच कोबी जास्त तेल टाकून भाजी बनवली तर चव चांगली लागते. मग असलेच उदाहरण पुढे वाढवत नेवून ईतर अन्नपदार्थांनादेखील लागू होवू शकते. राहीला मुद्दा आकडेवारीचा. सदर लेख काही सायंटीफीक मॅगेझीन मधला लेख वैगेरे नाही. जेवण जास्त जाण्यास "भारतीय अन्नाची चव" कारणीभुत आहे का याची शक्यता जोखणे हा मुद्दा होता. जास्त जेवण = पचण्यास जास्त शक्ती व त्याच शक्तीचा अभाव शरीरात मेद वाढण्यास कारणीभूत ठरते. http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-01-30/india/28363513_1… http://www.hindustantimes.com/India-world-diabetes-capital/Article1-245… वरील लिंक्स उदाहरणार्थ दिलेल्या आहेत. वाढती लोकसंख्या ही भारताला बहूतेक बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर आणून ठेवते. उद्या समजा एखाद्याने स्पर्धा लावली की जगात एखाद्या दिवशी एखादा देशात किती जास्त लोकं सायकल चालवीणार? आपण (भारताने) ठरवीले की आपल्यालाच पहिला क्रमांक हवा, तर सक्तीने जास्तीत जास्त लोकांना सायकलवर फिरायला लावून आपण प्रथम क्रमांक घेवू शकतो. असलीच थिअरी भारतीय लोकांचे आयुर्मानाबाबतीत लागू करता येईल. तरीही भारतीय लोकांचे आयुर्मान वाढत आहे हे खरेच. थोडक्यात एखादा पदार्थ (पुर्ण जेवण/ थाळीसुद्धा) जरी चांगली चव असली तरी त्या अन्नपुर्णेला धन्यवाद देत हात राखून खाल्ले तर पुढील परिणामांची शक्यता काही प्रमाणात का होईना टाळली जावू शकते येवढे जरी चर्चेत सहभागी होणार्‍यांच्या/ वाचकांच्या मनी काही प्रमाणात का होईना ठसले गेले तर ही चर्चा काही प्रमाणात का होईना यशस्वी झाली असे काही प्रमाणात का होईना वाटते. चर्चेत सहभागी होणार्‍यांचे व वाचकांचे मनापासून आभार.

In reply to by पाषाणभेद

>>कदाचीत अन्नपुर्णा ही घरातली स्त्री- मग ती माता असूदे, पत्नी किंवा भगीनी असूदे - ही नात्यातली स्त्री असल्याकारणाने वरील चर्चेला भावनीक पदरही प्राप्त झालेला असावा. त्या माता-भगीनींच्या कुटूंबवस्तल वृत्तीचा मला असलेला आदर मी व्यक्त केलेलाच आहे. आईच्या हाताची चव कुठल्याही बायकोच्या* जेवणाला आजतागायत कधीही आलेली नाही. असे असूनही लग्नानंतर बहुतांश दादल्यांची वजने वाढतात त्या अर्थी सुगरणपणाचा (आणि त्यामुळे जास्त जेवले जाण्याचा) नक्कीच संबंध नाही. :) *कुठल्याही बायकोच्या याचा अर्थ "अनेक बायकांपैकी कुठल्याही" असा नसून "कुठल्याही पुरूषाच्या बायकोच्या" असा आहे. अवांतर: पूर्वी हाटेलात खायची फार पद्धत नव्हती आणि बायकोच्या हातचे जेवण जेवावे लागे ;) त्या काळी सरासरी आयुर्मान कमी होते असे एक निरीक्षण नोंदवत आहे. नितिन थत्ते

'अन्नपूर्णां'नाच दोष का द्यावा? जशी मागणी तसा पुरवठा! :-) आवडीने मागून (किंवा आग्रह मान्य करून!) खाणारेही तितकेच दोषी आहेत असं नाही का वाटत? या संदर्भात नुकताच एक लेख* एका वैद्यकीय नियतकालिकात वाचला. त्यातील निष्कर्षांनुसार भारतातील सद्यस्थितीतील अन्न-संबंधित अ-सांसर्गजन्य रोगांची जी साथ (an ‘epidemic’ of diet-related non-communicable diseases [DR-NCDs]) पसरते आहे, तिला खालील कारणं असल्याचे म्हंटले आहे:
  • १९७३-२००३ या अभ्यासल्या गेलेल्या ३० वर्षांमधील अन्न-प्राशनातील बदललेल्या सवयींमुळे पिष्टमय-द्रव्यांमधून मिळणार्‍या ऊर्जेत ७% घट तर स्निग्ध पदार्थांमधून मिळणार्‍या ऊर्जेत ६% वाढ झाली आहे.
  • इतर कारणांमध्ये दिसलेले फरकः आहारात खालील गोष्टी कमी झाल्या आहेत
  • कडधान्ये
  • द्विदल धान्ये
  • ताजी फळे व ताज्या भाज्या
  • तर खालील पदार्थांचं प्रमाण आहारात वाढलेलं आहे:
  • सामिष आहार
  • मीठ
  • या बदलांच्या जोडीला अर्थातच आहे झपाट्याने झालेल्या शहरीकरणातून उद्भवलेला शारिरीक श्रमांचा आणि व्यायामाचा अभाव. वेळ मिळाला तर मूळ लेखातील आधिक माहिती देण्याचा प्रयत्न करीन. -------- *Nutrition Transition in India: Secular Trends in Dietary Intake and their Relationship to Diet-related Non-communicable Diseases. Anoop Misra, Neha Singhal, B. Sivakumar, Namita Bhagat, Abhishek Jaiswal, Lokesh Khurana J Diabetes. 2011 Jun 7 DOI: 10.1111/j.1753-0407.2011.00139.x

    "नुसते लोळत काय पडताय? जरा उठून व्यायाम करा. योगासने करा. प्राणायाम करा. सूर्यनमस्कार घाला.चालायला जा." -असे मी तिन्ही-त्रिकाळ ऐकत असतो. या मानसिक व्यायामामुळे कितीही (तेलकट, तुपकट, रुचकर आणि गोडधोड) खाल्ले तरी माझे वजन गेली अनेक वर्षे वाढलेले अथवा कमी झालेले नाही.:) यालाही भारतीय अन्नपूर्णाच कारणीभूत आहे. (हे 'भूत' काही पिच्छा सोडत नाही.) ;)

    In reply to by प्रियाली

    पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे... - अभंग ४०३१ स्वतः संतश्रेष्ठ तुकारामच जर विठूरायाला भूत म्हणतात तर आम्ही आमच्या अन्नपूर्णेला भूत म्हटले म्हणून काय बिघडले? ;)

    In reply to by विसुनाना

    बिघडले नाही हो. आम्हाला अत्यानंद झाल्याने कन्फर्म करण्यासाठी प्रश्न केला. तुमचे आणि तुमच्या भुताचे मनःपूर्वक अभिनंदन! ;)

    उत्तम चर्चा, धन्यवाद. >आणखी एक उपमुद्दा येथे येवू शकतो तो म्हणजे आपल्याकडचे सण-समारंभ आणि उत्सव. ह्याला एक अमेरिकेसारख्या देशातली भर म्हणजे एकमेकांकडे भेटून वीकेंडच्या पार्ट्या. ते भेटणे नुसते चहा-फराळाचे असे चालत नाही, दूरवरून ड्राईव करून आल्यामुळे अशा पाहुण्यांसाठी साग्रसंगीत जेवण केल्याशिवाय पाने हलत नाहीत. आणि मग त्यावर व्यायामाच्या नावाने बोंब. त्यामुळे वजन वाढतेच. काही लोक यातूनही मार्ग काढतच असतात, नाही असे नाही, पण तरी बाकीचे लोक आपण नीट केले नाही तर काय म्हणतील, अशा विचारांमुळे असे चक्र चालूच राहते.

    In reply to by चित्रा

    होय, खरे आहे. आमची पाने तुमच्याकडे साग्रसंगीत जेवून वर आवडलेले पदार्थ डब्यात घालून नेईपर्यंत हालली नव्हती याचा दोष तुमच्या चवदार स्वयंपाकालाही द्या म्हणजे झालं.;) श्रीखंडाची आठवण अजूनही येते आहे.

    In reply to by प्रभो

    तुला एवढे सगळे करून बाहेरून आणलेल्या वातड पोळ्याच काय त्या लक्षात राहतात का? @ रेवती - तेव्हाचे कारण खास होते ना? तेव्हा श्रीखंड केले नसते तर या वरच्या ठोंब्याने मला काय म्हटले असते? ;) खरे तर, मला गणपती आणि थ्यांक्सगिविंग याखेरीज एवढा साग्रसंगीत स्वयंपाक म्हणजे फक्त लग्न- काही खास समारंभ एवढ्याच वेळी सुचतो. बाकीच्या वेळी माझ्या घरी आलात तर तुमचे काही खरे नाही. मला जनाची किंवा मनाची लाज न वाटता मी लोकांना मेथीची बर्‍यापैकी भाजी करूनही खायला घालू शकते. आणि सगळे लोक आवडीने खातात. तशी करून घालीन. येता काय? पण असा सुटवंगपणा नेहमी शक्य होत नाही. परवा मीच शंभर बटाटेवडे तळून एका ठिकाणी नेले. हो, मी लोकांना तळकट खाऊ घालण्याचे पाप केले. पण मी शिक्षा भोगणार नाही. प्लॅन माझा नव्हता. (हा पॉट-लक प्रकार म्हटले तर सोपा असतो, पण बर्‍याच लोकांना पुरेलसा एक पदार्थ एवढ्या प्रमाणावर करावा लागतो की दम निघतो. परत तो पदार्थ करायला पुढचा मोठा सण येईपर्यंत मनच होत नाही. )

    अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकात, भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयी यावर एक विशेष प्रकरण आहे, ते उद्बोधक वाटले. त्यांनी आपल्या आहारसवयींचे चांगले विश्लेषण केले आहे. आपण आपल्या खाण्यावर निर्बंध घातले पाहिजेत असे त्यांचे ठाम मत ऐकून त्या पुस्तकावर निर्बंध घालण्यात आला आहे