Skip to main content

पुणे पारपत्र कार्यालय: एक सुखद(?) अनुभव

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच पुण्यात कामानिमित्त जाण्याचा योग आला. हा योग आला नसता तर मी एका दुर्मीळ अनुभवला मुकलो असतो. या एका अनुभवामुळे मला अध्यात्मीक उन्नत्तीचा साक्षात्कार झाला. सहजयोग , विपश्यना , सिद्ध समाधी योग ( एस एस वाय) आर्ट ऑफ लिव्हिंग, ज्ञानेश्वर , तुकाराम , आणि रजनीश ( ऑब्झर्व्ह द ऑब्झर्व्हर) या सर्वांच्या सांगण्याचा एकाचवेळेस प्रत्यय आला. आणि म्या पामराची अवस्था भक्ताला देव भेटल्याचा साक्षत्कार व्हावा काहिशी तैसीच झाली.त्याचे असे झाले मला पारपत्रा संबन्धात मला पुण्यात पारपत्र ( पासपोर्ट ) कार्यालयात जावे लागले. पाऊस अक्षरशः धो धो पडत होता. त्यात अजिबात कंजुशी नव्हती. पारपत्र कार्यालयात खूप मोठी रांग होती. ही रांग कार्यलयाबाहेरील मैदानात होती. लोकाना फुकटात मेडीटेशन चा नुभव मिळावा म्हणून त्यानी ही सोय केली होते. लोक आपापल्या कामाच्या कागदपत्रांच्या फायली घेवून आले होते ही लोकांची चूक होती. पारपत्र कार्यालयाबाहेर आतील लोकांच्या सुरक्षेसाठी असणारे सुरक्षा रक्षक कोणालाही आत जावू देत नव्हते. या रक्षकाना हिंदी शिवाय इतर कोणतीच भाषा उमजत नव्हती. मराठी मुलुखात भारताच्या तथाकथीत राष्ट्रभाषेची जपणुक करण्याच्या दृष्टीने त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. त्याना कोणतेही प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर ते १० नंबर की खिडकी के लाईन मे लग जाओ असेच उत्तर देत होते. मरताना माणूस स्वतःसोबत पापपुण्ण्याच्या हिषेबाशिवाय काहीच घेवून जात नाही मग पारपत्र ऑफिसात तरी सोबत ब्यागा वगैरे कशाला हव्यात या उदात्त विचाराने एका उत्तरभारतीय सुरक्षारक्षकाने लोकानी सोबत आणलेल्या फुटकळ वस्तू ( ल्यापटॉप , पर्सेस,छत्र्या वगैरे) भर पावसात मैदानात उघड्यावर ठेवून ( फेकून) दिल्या. सोनेनाणे आम्हा मृत्तीकेसमान या तुकारामाच्या उक्तीचे स्मरण करून दिले आणि एक धक्का दिला हे सामान त्यानंतर बरेच काळ तसेच पावसत भिजत राहीले. लोकाना चिखलात रांगेत उभे केल्या नंतर पऊस पडला तेथे लहान मुलांसाठी देखील काहीही व्यवस्था नव्हती. स्वच्छता गृह वगैरे सुविधा म्हणजे जणून लक्झरी आणि लक्झरी जगणे म्हणजे परमेश्वरापासून दूर जाणे असेच की काय त्यांचे म्हणणे असावे. ठेवीले अनंते तैसेची रहावे अशा अवस्थेत पावसात दीड तास उभे राहून शेवटी कसाबसा नंबर आला. स्वर्गाच्या दारातून प्रवेश मिळावा अशी काहिशी अवस्था झाली. खरेच हा अनुभव मिळाला नसता तर मी बर्‍याच गोष्टीना मुकलो असतो. १) जे मिळाले त्यात समाधानी रहा अन्यथा जे मिळालेले आहे ते देखील नाहीसे होईल २) ठेविले अनंते तैसेची रहावे याची नव्याने आठवण झाली ३) एखाद्या गोष्टीची सवय झाली की सहनशक्तीच्या मर्यादा वाढतात ४) तुम्ही जगात येताना सोबत काय आणले होते आणि गेल्यानंतर काय नेणार आहात? वस्तुंचा मोह सोडा. पासपोर्ट ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे. ५) जे तुमच्या शरीरासोबत घडते आहे ते तुमच्य बाबतीत घडत नाही. तुमचे शरीर आणि तुम्ही वेगळे आहात. हे अनुभवणार्‍या अनुभवकाला अनुभवा. ६) जर अस्सल पुणेकर लोक हे विनातक्रार सहन करू शकतात तर तुम्ही ते सहज सहन करू शकता. ७) हिंदी ही भारतातील एकमेव भाष आहे हे आज ना उद्या तुम्हाला मान्यच करावे लागणार आहे. मराठी भाषीक शिक्षण घेवून माणसे परदेशी जातात म्हणून हिंदी भाषीक सुरक्षारक्षक ठेवावे लागतात. त्यामुळे महाराष्ट्रातील ब्रेन ड्रेन थंबवावा लागेल. ८) पावसात भेजल्यानंतर तुमच्या अंतर्वस्त्रात देखील पावसाचे पाणी जावू लागते तो अनुभव तुमची तक्रार /कुरकुर नसेल तर गुदगुल्या करणारा असू शकतो. ९)परमेश्वरापुढे आणि पारपत्र कार्यालयासमोरील सुरक्षारक्षकासमोर तुम्ही एक समान आहात. १०)पुण्यातील लोक तक्रार करत नाहीत हे प्रथमच पहायला मिळाले ११)माणसाने विरक्त रहावे विश्वाचा पसारा संभाळणार्‍या देवाला तुमच्या टीचभर ल्यापटॉप चे ओझे होत नाही. १२)ओलेत्याने कामे होऊ शकतात. हे अनुभव घेताना सुरवातीला मला प्रचंड संताप आला होता. मात्र क्रोधात्भवती .............काहीतरी हे वचन आठवले आणि दृष्टीवरील संपुटे आत्मज्ञानाच्या तेजापुढे गळून पडावीत तसा संताप गळून पडला. आणि एक साधा अशीक्षीत सुरक्षा रक्षक किती पॉवरफूल ठरु शकतो हे अनुभवून आत्मसंयम नव्याने शिकावयास मिळाला. मात्र काही प्रश्न अनुत्तरीतच राहीले. पारपत्र कार्यालयात अ) लोकांच्या उभे रहाण्यासाठी व्यवस्था का केली जात नाही? आ) इंतरनेट उपलब्ध असतानादेखील ज्या कामासाठी प्रत्यक्ष येण्याची गरज नसते त्या कामासाठी रांगेत का उभे रहावे लागते. इ) प्रत्येकवेळेस चौकशे खीडकी वर रांग लावून चौकशी करूनच मग मुख्य रांगेत प्रवेश का दिला जातो? ई) पारपत्र कार्यालयात स्वच्छतागृह का उपलब्ध नाहीत. उ) एखाद्या अशिशीक्षीत वा वृद्ध इसमास पारपत्र हवे असल्यास त्याच्या सोबत कोणालाच प्रवेश का दिला जात नाही. ऊ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आणि इतर माननीय ज्यांच्यावर काही केसे देखील असू शकतात ( उदा: बाळासाहेब.. राज ठाकरे ...अडवाणी...अमरसिंग.... सलमान खान ...संजय दत्त, अमिताभ बच्चन , वगैरे) याना पारपत्र हवे असल्यास ते कधी रांगेत उभे रहातात. हे अनुभव पारपत्र कार्यलया बाहेरील व्यवस्थे बद्दल आहेत. आतील कर्मचार्‍यांकडून मात्र असे काहीही अनुभव आले नाहीत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3562
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

पुन्हा पुण्याला टारगेट केल्यासारखे वाटते आहे का? बहूतेक सरकारी ठिकाणी असलीच व्यवस्था असते.

अगदी हेच प्रश्न आणि हाच अनुभव मला मागच्या आठवड्यात आला.फरक इतकाच की पाऊस जास्त नव्हता,पण रांग मोठी होती, ३ तास रांगेत उभे राहिल्यानंतर आत प्रवेश मिळाला. चौकशीअंती असे समजले की सध्या ज्या जागेत हे कार्यालय आहे,ती जागा शेती महामंडळाकडून भाड्याने घेतलेली आहे त्यामुळे या जागेत कसल्याही सुविधा देण्यासाठी पैसे खर्च करण्यात येणार नाहीत, आणि बाणेरला पारपत्र कार्यालयासाठी नवीन जागा मिळालेली आहे तिथे लवकरच मोठे कार्यालय सुरु करण्यात येणार आहे.

पुणे पारपत्र कार्यालय: एक सुखद(?) अनुभव
हे बळंच ! बाकी आपल्या द्वेषाची कल्पना असल्याने अजुन काय बोलणार ? आणि सुरक्षारक्षकांनी लोकांचे सामान फेकुन वैग्रे दिले हे वाचून तर गंमतच वाटली. विजुभौंनी हा लेख लिहून संताप व्यक्त करण्यापेक्षा वरिल दृष्याचे व्हिडिओ रेकॉर्डींग करुन अथवा फटू काढून ह्याला वाचा फोडायला हवी होती असे वाटले. निदान त्यांनी लेखी तक्रार तरी केली आहे काय? नसल्यास का केलेली नाही ? आणि हो विजुभौंकडून इतर शहरातील सरकारी कार्यालयात त्यांचे जाणे झाले असल्यास तिथला अनुभव वाचायला आवडेल. अवांतर :- माझ्या कॅफेतुन गेल्या ७ वर्षात जवळ जवळ ३००+ लोकांनी (ह्यात १५० + एम .आर. आणि १०० + विद्यार्थी) ऑनलाईन अर्ज भरुन मुलाखतीची वेळ ठरवुन तिथे भेट दिली. विजुभौंची पुणे कार्यालयाविषयी तक्रार आहे म्हणून खोटे सांगत नाही पण ह्यातल्या ज्या ज्या लोकांनी त्यानंतर पुन्हा कॅफेला भेट दिली तेंव्हा ऑनलाईन अर्ज भरल्याने किती सोय झाली आणि त्या कार्यालयात देखील वेळ कसा वाचला ह्याचे कौतुकच केले. एका आजोबांनी मात्र स्वच्छतागृह आणि बैठक व्यवस्था निट नसल्याची तक्रार केली होती हे मात्र खरे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

एका आजोबांनी मात्र स्वच्छतागृह आणि बैठक व्यवस्था निट नसल्याची तक्रार केली होती हे मात्र खरे.
ती तीट आहे असं समजा.

पावसात भेजल्यानंतर तुमच्या अंतर्वस्त्रात देखील पावसाचे पाणी जावू लागते तो अनुभव तुमची तक्रार /कुरकुर नसेल तर गुदगुल्या करणारा असू शकतो.
काय पहाडी हसलोय मी हे वाचून! =)) =)) =))

पावसात भेजल्यानंतर तुमच्या अंतर्वस्त्रात देखील पावसाचे पाणी जावू लागते तो अनुभव तुमची तक्रार /कुरकुर नसेल तर गुदगुल्या करणारा असू शकतो.>> आपली आवड ऐकणार्‍या सर्व रसिक श्रोत्यांना पुढचे गाणे ऐकवण्यापूर्वी एक कमर्शियल ब्रेक... लाज खाज खुजली का दुश्मन बीटेक्स मल्हम बीटेक्स लोशन... बीटेक्स आता 'जगाच्या पाठीवर' चित्रपटातील हे गाणे ऐका वासुदेवाची ऐका वाणी, जगात न्हाई राम रे दाम करी काम येड्या दाम करी काम..

पिंपरी -चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अनुभव या पेक्षा वाइट आहे .. टंकला तर कळ फलक रडेल !! माजोरडे पणा काय चीज असतो ते या पोलिसांकडे बघुन कलता

काही अर्थबोध. १. विजुभौ स्वतःला सातारवी म्हणवत असले तरी ते पुणेकर आहेत (नायतर पुण्याच्या पारपत्र कार्यालयात कशाला जातील?) २. विजुभौ लवकरच येथून (भारतातून) प्रयाण करणार असावेत.

१)अहो मी सातारवी असल्यामुळे माझे पारपत्र पुणे कार्यलयातून काढावे लागते. २) येथून पळ काढायचा सध्यातरी विचार नाही. पारपत्र नूतनीकरण केले त्यात त्यानी नावाच्या चूका केल्या होत्या.

नवीन काढता म्हणून इचारला कि कुठे बाहेर जाता म्हणतो मी ? कारे टपलाय मला बाहेर पाठवण्यावर. जरा राहु द्या की मुला लेकरां मित्रां समवेत घटकाभर इथे

मग पारपत्र ऑफिसात तरी सोबत ब्यागा वगैरे कशाला हव्यात या उदात्त विचाराने एका उत्तरभारतीय सुरक्षारक्षकाने लोकानी सोबत आणलेल्या फुटकळ वस्तू ( ल्यापटॉप , पर्सेस,छत्र्या वगैरे) भर पावसात मैदानात उघड्यावर ठेवून ( फेकून) दिल्या.
सरकारी कार्यालयं ही दहशतवाद्यांसाठी मोठी टार्गेट्स असतात. जर लोकांना बिनधास्तपणे ब्यागा ल्यापटॉप वगैरे आत नेऊ दिले तर कोणीतरी आरडीएक्स नाही का घेऊन जाणार? आता विजुभाऊ चेहेऱ्यावरून अतिरेकी वगैरे वाटत नसतील. पण म्हणून काय त्या सिक्युरिटी गार्डने चेहेरे पाहून आत सोडावं? दहशतवादाविरुद्ध लढा द्यायचा तर असल्याच दिरंगाईला, सुरक्षा तपासणीला, अडवणुकीला जागोजाग सामोरं जावं लागेल. आहे तयारी? का त्यापेक्षा तुम्हाला दरवर्षी दोनपाच स्फोट होऊन पाच-पन्नास माणसं मेलेली चालतील? वर षंढ म्हणवून घ्यावं लागेल ते वेगळंच.

या धाग्याला नव्हे. पुणेद्वेशाबद्दलच्या धाग्यात अजून एकाने भर झाली म्हणून + १ ;)

पुणेद्वेशाबद्दलच्या धाग्यात अजून एकाने भर झाली म्हणून माताय......... धन्य आहे. या धाग्यात असा काय पुणे द्वेश दिसला. उद्या मी पुण्यात येवून श्वास घेतला असे लिहिले तरी लोकाना त्यात पुणे द्वेश दिसेल