Skip to main content

सांदण

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी मंगळवार, 01/07/2008 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, साहित्य : १ वाटी तांदूळ ; २ वाट्या बरक्या फणसाचा रस ; गूळ ; वेलची पावडर. कॄति : प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून २ तास वाळवून घ्या.मग त्याचा जाडसर रवा काढून तो चांगला भाजून घ्यावा. पूर्ण पिकलेल्या बरक्या फणसाचे गरे घ्यावे आणि नुसते स्टीलच्या चाळणीवर चांगले घोटून त्याचा रस काढून घ्यावा. साधारणपणे इडली सारखे होईल इतपत फणसाचा रस आणि तांदळाचा रवा यांचे मिश्रण करुन २ तास भिजत ठेवावे. मग त्यात व्यवस्थित गूळ घालून तो गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत रहा. वेलची पावडर घाला. खोलगट ताटली किंवा तत्सम कोणत्याही भांड्यात त्याचा पातळ थर देउन मोदकपात्रात किंवा इडलीपात्रात शिजवून घ्या. तत्पूर्वी भांड्याला थोडा तेलाचा हात लावावा. हे सांदण गरम खाण्यातच मजा आहे. साजूक तूप ; साधं दूध किंवा नारळाचं दूध या तिन्हीबरोबर छान लागतं.पण हा अस्सल कोकणी पदार्थ असल्यामुळे नारळाच्या दूधाबरोबर खाण्याची मजा काही औरच आहे.

वाचने 4785
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

संतोषशेठ, केवळ अप्रतिम पाकृ! आमची अतिशय आवडती...! :) आपला, (सांदणंप्रेमी) तात्या देवगडकर.

पाककृतीवरुन असे वाटतेय की सांदण खायला नक्की मजा येईल धन्यवाद संतोषशेठ.

बर्‍याच वर्षां पुर्वी जेव्हा कोकणातला नातेवाईकांकडे गेलो होतो तेव्हा हा पदार्थ खाल्ला होता...आज परत आठवण आली.. (खादाड) मदनबाण.....

एकदम लहान असताना खाल्ली होती सांदणं....बरका फणसाचे गरे आम्हाला कुठुन मिळायला....:( मस्त पाक्रु...

बरका फणस कुठे मिळणार :-( पण अति-पिकलेल्या केळ्याचे, आमरसाचे, किसलेल्या काकडीचे, असेच सांदण करता येते. पाककृती वरच्यासारखीच. ओली हळद कुंडीतसुद्धा रुजून त्याचे झाड येते :-) त्यामुळे आजकाल जपूनजपून माझ्या घरी सांदणात हळदीचे पानही पडते. यानेसुद्धा अस्सल कोकणी चव येते - हळदीचे पान मिळाले तर जरूर वापरावे. सांदणाक गोयांत "धोणास" अशे नांव आसा.

In reply to by धनंजय

सांदणे मस्त. काकडीची कल्पना छान. अवांतर - आमच्या घरी काकडीचे गोड किंवा तिखट घावनही करतात.

In reply to by चित्रा

तांदुळाच्या पिठात घालून करतात का घावन? अजून कय घालतात? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

तांदळाच्या पिठातच. अजून फक्त गूळ, थोडे तेल, चवीला मीठ. फक्त ते घट्टसर भिजवावे लागते, काकडीलाही पाणी सुटते, त्यामुळे पाणी बघूनच घालायचे, नाहीतर ते तव्याला चिकटतात. काहीजण त्यात थोडी कणीकही घालतात /जिरे/कोथिंबीर घालतात असे वाचून आहे! पण आमच्याकडे गोडच घावन करीत.

मस्त माहीती..केळ्याचं तर नक्की करता येईल्....करुन पाहिन नक्की..धन्यु धनंजय! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt