Skip to main content

एकदा दुपारी!

लेखक नीधप यांनी शुक्रवार, 20/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
"शू होतीये!" जोरदार रडण्याच्या आवाजात मधेच किंचाळून एक छोटा मुलगा म्हणाला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं. इथल्याच एका गल्लीतली गोष्ट ही. सुट्टीच्या दुपारची शांत वेळ होती. एक कुटुंब रस्त्यावरून चाललं होतं. आई, बाबा, आईचा हात धरून ४-५ वर्षाचा छोटुकला असे पुढे चालले होते आणि चारपाच पावलं मागे छोटुकल्याचा आठनउ वर्षाचा दादा रडत पाय ओढत मधूनच "शू होतीये!" असं ओरडत चालला होता. "अति झालंय हं तुझं आता!" "बोर्डिंगची चौकशी केलीयेत ना हो? तेच बरं. तिथेच जा तू." "शू होतीये तर जा त्यांच्या घरात आणि जाउन कर!" असे आणि या अर्थाचे संवाद अधून मधून आईबाबांच्याकडून येत होते. छोटुकल्याला काय करावं सुचत नव्हतं. आईच्या हाताला धरून चालत जाणं एवढंच तो करत होता. मधेच दादाकडे नजर टाकत होता. छोटुकल्याचा दादा मात्र कळवळून रडत ओरडत होता. 'सगळे नियम गेले खड्ड्यात, इतका कळवळतोय तो 'शू लागली' म्हणून. मुलगाच आहे. लहानही आहे. जाउदेत त्याला त्या बाजूच्या कचरापेटीच्या इथे.' असं भोचकपणे सांगायची जाम इच्छा झाली होती मला. तेवढ्यात गल्ली वळली आणि मी वळताना मला त्या आईचा चेहराही दिसला. असेल माझ्याच आसपासच्या वयाची. जे काय चाललंय त्याची प्रचंड शरम, दु:ख, राग सगळंच होतं तिच्या चेहर्‍यावर. बाबाच्या चेहर्‍यावर पण वेगळं काही नव्हतंच. मग लक्षात आलं मुलाला चुकीच्या वेळेला, चुकीच्या ठिकाणी 'शू लागली' यासंदर्भाने हे सगळं घडत नव्हतंच. जे काय होतं ते बरंच काही आत खोलवर होतं. मुलाला कदाचित खरंच शू लागलेलीही नव्हती. काहीतरी झालं होतं आणि 'शू होतीये' असं रडून ओरडून मुलगा आपला संताप, हतबल होणं सगळंच व्यक्त करत होता. बोर्डींगचा धाक, थोडंफार दुर्लक्ष अशी कुठलीतरी हत्यारं वापरून आईबाबाही तेच सगळं व्यक्त करत होते. कुठेतरी कुणीतरी चुकलं होतं नक्कीच. आईबापांना दोष द्यावा असं वाटलं नाही कारण मुलगा आठनऊ वर्षाचाच जरी होता तरी आईबापही आईबाप म्हणून आठनऊ वर्षाचेच होते. आणि नक्कीच मुलाचा छळ करण्याइतके निर्दय वाटत नव्हते. मुलगा रस्त्यात लाज काढतोय या रागापेक्षा आपण कमी पडतोय याची शरम त्यांच्या चेहर्‍यावर सहज दिसत होती. पुढे मी रिक्शा पकडली आणि जिथे पोचायचं होतं तिकडे निघाले. पुढे काय झालं माहित नाही. मी मदत काही केली नाही/ करू शकले नाही. मदत काय करणार होते म्हणा. त्यांच्या कुटुंबात जो काय प्रश्न असेल तो मी तिथे मधे पडून सोडवू शकणार नाहीये हे मला पक्कं उमजलं होतं. आणि बाहेरच्या माणसाने असे नाक खुपसून त्यांना अजून लाजिरवाणं वाटायला लावणं हे काही माणुसकीला धरून वाटत नव्हतं. मी जरी तिथे काहीच केलं नाही तरी गेला आठवडाभर या एका प्रसंगाला धरून कहाण्याच्या कहाण्या माझ्या मेंदूने विणल्या. अजूनही तो प्रसंग डोक्यातून जात नाही. फुगा घ्यायला नाही म्हणाल्यावर रस्ताभर जोरात भोकाड पसरून आईबाबांना कानकोंडं केल्याच्या आपल्या सगळ्यांच्याच आठवणी असतीलच. त्याने आपल्या आयुष्यावर परिणाम नाही झाला काही. तशीच ही घटना ठरो अशी आशा करणंच उरतं आपल्याकडे. पण तरी ही गल्ली चांगलीच लक्षात राहील माझ्या आणि हे कुटुंबही. - नी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2589
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

.

अगदी परिचित अनुभव. या परिस्थितीत आईवडीलांसमोर काय काय पर्याय होते? १. मुलाला रस्त्याच्या कडेला शू करायला लावणे २. आसपासच्या/ जवळच्या परिचित / अपरिचित एखाद्या घरात जाऊन मुलाची सोय करणे ३. मुलाला तसेच ओढत खेचत फरफरटत नेणे - वाटेत मुलाला चड्डीत शू झाली तरी बेहत्तर. टॉयलेट ट्रेनिंग पूर्ण झालेले नसण्यासाठी आठनऊ वर्षे हे जरा जास्तच वय वाटते. अर्थात काही मुलांना हा कंट्रोल जरा उशीरा येतो. कदाचित हा मुलगा 'स्पेशल' ही असावा. आईवडीलांचा त्रागा बाहेरच्या व्यक्तीला इतका अस्वस्थ करतो, तर त्या मुलावर आणि त्याच्या छोट्या भावावर त्याची काय परिणाम झाले असतील? पण ही संवेदनहीनता अगदी सगळीकडे दिसते. मुलगा आठनऊ वर्षाचाच जरी होता तरी आईबापही आईबाप म्हणून आठनऊ वर्षाचेच होते. हे वाक्य महत्त्वाचे. तरीही फुगा घ्यायला नाही म्हणाल्यावर रस्ताभर जोरात भोकाड पसरून आईबाबांना कानकोंडं केल्याच्या आपल्या सगळ्यांच्याच आठवणी असतीलच. त्याने आपल्या आयुष्यावर परिणाम नाही झाला काही. हे पटले नाही. दृष्य, उघड स्वरुपात आज आपण अशा घटनांकडे थंड, निर्विकार नजरेने बघू शकूही, पण अंतर्मनात अशा गोष्टी कुठेतरी खोल रुतून बसलेल्या असतात. आपल्या स्वभावाची जडणघडण होत असताना त्याचे कडेकोपरे अशाच गोष्टींनी कापले, घासले जात असतात. असे मला वाटते.

In reply to by सन्जोप राव

मुलगा 'स्पेशल' तरी वाटत नव्हता. खरोखर त्याला शू लागली होती का ते विविध कारणांच्यातून (जसे की सिबलिंग रायव्हलरी) आलेले अटेन्शन सिकींग होते माहित नाही. ४-५ वर्षाचा असल्यापासूनच आता तू दादा झालास शहाण्यासारखे वागायचे, मोठा ना तू एवढं समजत नाही याचं प्रेशर असेल तर अश्या पद्धतीने मूल वागू लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आईवडील निर्दय किंवा चाइल्ड अ‍ॅब्यूजची शक्यता नक्की जाणवली नाही. आईवडिलांना संवेदनाहिन नाही म्हणता येत मला. त्यांचे चेहरे व्यवस्थित लक्षात आहेत माझ्या. असहाय होते ते पण. जमत नव्हतं त्यांना परिस्थिती हाताळणं... बाकी फुगा घ्यायला नाही म्हणलं गेल्यावर ते अ‍ॅक्सेप्ट करणं ही आपल्या घडण्यातलीच एक गोष्ट असते ना. त्यावेळेला रडून, गोंधळ घालून आपण आईवडिलांना भरपूर कानकोंडं केलेलं असतं पण फुगा न घेतला जाण्याने आयुष्यावर कायमस्वरूपी आणि वाईट असा परिणाम होत नाही. असं काहीतरी म्हणायचं होतं.

In reply to by नीधप

त्यांचे चेहरे व्यवस्थित लक्षात आहेत माझ्या. असहाय होते ते पण. जमत नव्हतं त्यांना परिस्थिती हाताळणं...
अशा वेळी तुम्ही हळुवार शाब्दिक मदत केली असती तर कदाचित आईवडलांचे अवघडलेपण गेले असते.थोडा भोचकपणा केला असता तर मनाला लागलेली सल दूर झाली असती. शेवटी ती नैसर्गिक हाक आहे. आवेग अनावर होत असताना 'योग्य जागा' मिळाली तर त्यासारखे दुसरे सुख नाही. लक्ष वेधुन घेण्यासाठी च तो मुलगा शु लागल्याच तुणतुण वाजवत असेलच असे नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अशा वेळी तुम्ही हळुवार शाब्दिक मदत केली असती तर आवडलं असतं पण म्हणजे नक्की काय ते सुचलं नाही. जे सुचलं ते योग्य वाटलं नाही.

फुगा न घेण्याच्या घटनेशी सहमत! बरेचदा आईवडील फुगा, पिपाणीसारख्या वस्तू घेऊन देतातही पण नेहमीचेच झाल्यावर मुलांनी कधीतरी पालकांचा 'नकार' घ्यायलाही शिकावे म्हणून हे करावे लागते असा स्वानुभव!;) वरील घटनेच्या आधी बरेच काही घडून गेल्याची शक्यता वाटते आहे. जशी एखाद्या दिवशी चुकांची मलिकाच घडते. कधी एखादा दिवस 'आपला' नसतोच. अश्यातच मुलांची मानसिक अवस्था बदलत असेल तर आईबापांची अवस्था कोंडल्यासारखी होत असेल.

खरोखर त्याला शू लागली होती का ते विविध कारणांच्यातून (जसे की सिबलिंग रायव्हलरी) आलेले अटेन्शन सिकींग होते माहित नाही." "४-५ वर्षाचा असल्यापासूनच आता तू दादा झालास शहाण्यासारखे वागायचे, मोठा ना तू एवढं समजत नाही याचं प्रेशर असेल तर अश्या पद्धतीने मूल वागू लागण्याची शक्यता नाकारता येत नाही." हे पटते. मध्येच बोर्डिंगचा संदर्भ आला. कदाचित त्या मुलाला बोर्डिंगला घालायचे चालले असेल आणि त्याला तिथे जायचे नसेल. आणि सारखी शू लागली म्हणून एखाद्या ठिकाणी (ते जिथे जात असतील ) जाण्यात तो मुलगा वेळकाढूपणा करत असेल. आणि हे सगळं सांभाळण्यापलिकडील असल्याची शरम, दु:ख, राग तिच्या चेहर्‍यावर असेल.

स्फुट आवडले. असे अनेकांच्या आयुष्यात घडते.पण घटनेपुरत्या मर्यादित व्यक्तीसमुहाव्यतिरिक्त त्याचा कोणी फारसा विचार करत नाही. (इथे सत्य माहित असणे आणि त्याचा उच्चार होणे यातील फरक जाणवला.) त्या घटनेचे लेखिकेच्या मनात उमटलेले पडसाद आणि त्यांचा उच्चार करण्याची तिला वाटलेली गरज हे दोन्ही कौतुकास्पद आहे. "फुगा न घेतला जाण्याने आयुष्यावर कायमस्वरूपी आणि वाईट असा परिणाम होत नाही." असे मात्र वाटत नाही. कदाचित वाईट परिणाम होत असेल/नसेल पण कायमस्वरूपी परिणाम होत असावा. मोठेपणी माणसाचा स्वभाव तसा का बनला? या प्रश्नाचे उत्तर बुलेटपॉईंटने देण्याचे ठरविल्यास 'त्याला लहानपणी हट्ट करूनही फुगा मिळाला नाही' असाही मुद्दा असू शकतो. (हे स्फुट लिहीण्यामागे असलेली संवेदनशीलता अशा प्रसंगांमधूनच निर्माण झाली असण्याची शक्यता आहेच.)

असे अनेक अनुभव आपयाला पावलोपावली येतात. कधी आपण केलेली छोटी मदत उपयोगी पडते, तर कधी काहीच करणं आपल्या हातात नसतं. कधी आपण घटनेतले पात्र असतो, आणि एखाद्या तिर्‍हाईताची शाब्दिक मदतही खूप उपयोगाची ठरते. पण आपली संवेदनशीलता जिवंत ठेवणं महत्त्वाचं.

हम्म. दुसर्‍यांचं दु:ख, हतबलता, वैताग लांबून जाणवण्याइतकी संवेदनशीलता असणे चांगले की वाईट हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. यानिमित्ताने "स्वतःची सोबत" असा एक शब्दप्रयोग असलेले वाक्य आठवले. त्याबद्दल नंतर कधीतरी.