Skip to main content

लाजरे राहूलजी!

लेखक विकास यांनी गुरुवार, 12/05/2011 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला! जे कदाचीत गांधी घराण्यात जन्मून, सत्ताधारी गांधी घराण्याची कॉंग्रेस पायाशी असून देखील जे शक्य झाले नाही, ते आज मायावतीने केले.... राहूलजींना अटक करून एका क्षणात हिरो केले! किमान प्रयत्न तरी केला आहे. कारण आपण सर्वांनी वाचले असेलच. तरी देखील थोडक्यात सांगायचे झाले तर, बट्टा पसरल या उत्तर प्रदेशातील गावात शेतकर्‍यांच्या काळजीने राहूलजी धडकले. सध्याच्या राजकारण्यांच्या ("माझ्या मधे तू येयचे नाही,तुझ्यामध्ये मी येणार नाही" या) अलिखित कराराप्रमाणे त्यांच्या येण्यावर मुख्यमंत्री मायावतींनी बंदी घातली होती. तरी देखील हूल देत राहूल गेलेच! वास्तवीक तिथेच ते हिरो झाले असते. पण मायावतींनी त्यांना अटक करून खातरजमा केली. खरं म्हणजे राहूलजींचे हे खेळण्याबागडण्याचे दिवस आहेत. म्हणजे कसं, की मुंबई हल्ल्याच्यावेळेस ते अजिबात न डगमगता नाचात मग्न होते. तसेच त्यांनी शेतकर्‍यांच्या बाबतीत करायला हवे होते. पण तसे होणे नव्हते. आणि मग उत्तरप्रदेशातील विरोधी पक्षाच्या राज्यातील शेतकर्‍यांचे हाल पाहून त्यांना एकदम भारतीय असल्याची लाज वाटली... म्हणजे आजपर्यंत त्यांना महाराष्ट्र, आंध्र वगैरेत शेतकर्‍यांचे काय हाल झालेत/होत आहेत याची कल्पनाच नव्हती का? आणि हो एकामागोमाग एक भ्रष्टाचाराची लफडी, कलमाडी सारखे नग दिवे लावत असताना, त्यात भारतीय असण्याची लाज वाटण्यासारखे काही नव्हते? (याच राहूलजींना,२६/११ नंतर केवळ उत्तर भारतीयांनी मदत केल्याचे आठवल्याचे या संदर्भात आठवले...). अगदी आणिबाणीच्या काळातही तमाम विरोधी नेत्यांनी स्वतःचे आणि जनतेचे हालहाल होत असताना देखील कधी भारतीय असण्याची लाज वाटली, असे म्हणल्याचे आठवत नाही. ज्या व्यक्तीकडे त्याच्या पक्षातले आणि त्याच्या पक्षाचे समर्थक "भावी पंतप्रधान" म्हणून बघतात त्याच्यातले "अभावी भारतीयत्व" बघताना आपण भारतीय म्हणून लाजावे का अशा नेत्यांची लाज बाळगावी का "माझ्या मना बन दगड" म्हणत गुमान बसावे?

वाचने 2983
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांचा प्रश्न काय आहे? त्यांचा लढा रास्त आहे का? कॉंग्रेसच्या उच्च पदाधिकाऱ्याने त्यात उडी घ्यावी इतका महत्त्वाचा प्रश्न आहे का? या सर्व गोष्टींविषयी जाणून घ्यायला आवडेल. दुर्दैवाने सामान्य जनतेच्या लढ्यांच्या कारणांबद्दल तीव्र मतं आहेत म्हणून कृती करण्याऐवजी, राजकारणी लोक आपल्या फायद्यासाठी त्यांचा वापर करून घेतात हे सत्य आहे. पण माझ्या मते त्याहीपेक्षा अधिक दुर्दैव म्हणजे इतर अनेक सामान्य व ज्ञानी लोक मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित होऊ देऊन राजकारण्यांच्या माकडचाळ्यांकडेच बघत बसतात. मीडियादेखील या चमचमीत वर्णनात सामील होताना दिसतो. ज्या क्षणी आपण सगळेच ही वरची सर्कस पहायची सोडून जमिनीवर काय चाललंय हे बघायला लागू त्या क्षणी ही सर्कस थांबेल.

अहो ! त्याच्या कडे भारतियत्व किवा इटालियत्व असा पर्याय आहे :) मजा आहे बुवा एक लबाड राजपुत्राची !!

अशा प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे ... :) बाकी हेच युवराज 'भ्रष्टाचार निर्मूलनाचे' काम 'शांतपणे' करत होते ... तिथे त्यांना 'हिरो' बनायची इच्छा नव्हती ... आता ह्या प्रकरणात मात्र त्यांना हिरो बनायचे होते असं दिसतंय ... असे 'निवडक्-प्रसंगी भारतीयत्व-लाजरे हिरो' आपले भावी पंतप्रधान असणार आहेत .... काळजी नसावी ... आपले स्वयंघोषित (स)माजवादी बुद्धिजीवी त्यांची तळी उचलायला कायम तयारच असतील

अभावी भारतीयत्व की भावी अभारतीयत्व ? आपल्या छकुल्याच्या त्या गोग्गोड बाळलीला पाहून त्या माऊलीला कित्ती कित्ती छान वाटत असेल!

विकास यांची आजवरची वाटचाल पाहता सदर लेख कोणीतरी दुसर्‍याने लिहिल्यासारखा वाटला. विकास यांचा आयडी हॅक झाला आहे का? किंवा जळजळ फारच विकोपाला गेली असावी असे वाटते. >>म्हणजे आजपर्यंत त्यांना महाराष्ट्र, आंध्र वगैरेत शेतकर्‍यांचे काय हाल झालेत/होत आहेत याची कल्पनाच नव्हती का? अशाच स्वरूपाचे आश्चर्य अलिकडेच आम्ही नुकत्याच समाज सेवा करू लागलेल्या सदस्याबाबत व्यक्त केले होते असे स्मरते.