Skip to main content

महाराष्ट्रीयन हॉटेल्स्/रेस्टॉरंट/खानावळी ईतरत्र का आढळत नाहीत?

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 14/04/2011 14:13 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 3335
प्रतिक्रिया 65

प्रतिक्रिया

गप्प रहायचे ठरवले आहे .

In reply to by टारझन

"नोकरी " प्रिय ....महिन्याकाठी ठराविक रक्क्म हातात हवी .....धोका पत्करण्याची तयारी / ऊतेजन नाही.

In reply to by तर्री

सहमत ... आणि "जाऊ तिथे मान खाली घालून राहू" ही वृत्ती. म्हणजे आमच्या पिठलं भाकरीची , कोल्हापूरी तांबड्या रश्शाची चव जगातल्या कुठल्याही पदार्थाला यायची नाही असे अमराठी लोकांसमोर म्हणणे म्हणजे गुन्हा असावा असा समज अनेक मराठी माणसांमधे दिसला. आमच्या टिमच्या पार्टीची चर्चा चालली होती. (टीममधे १४ पैकी ९ मराठी. १ दाक्षिणात्य ४ उत्तर भारतीय) मी म्हटलं श्रेयस मधे जाऊ जेवायला. तसेही श्रावण चालू असल्याने ९ पैकी ८ मराठी असल्याने नॉनव्हेज खाणार नव्हते. तरीही माझ्या या ठरावाला आमच्या मराठी साहेबासकट सगळ्या मराठी लोकांनी एकमताने विरोध केला. म्हणणे पडले आपल्या टीममधे इतरही लोक आहेत त्यांचाही विचार व्हायला पाहीजे. मी म्हटले "अरे त्यांना तसे म्हणूद्यात ना! तुम्हीच का त्यांच्यावतीने म्हणता आहात? आणि जरी तसे ते म्हटले तरी एखाद्या वेळेला बहुमताचा सन्मान करण्यासाठी त्याना त्यांच्या पसंतीविरुद्ध जेवावे लागले तर त्यात काय वाईट आहे? " असो मराठी माणूस आहे हा असा आहे त्यामुळे त्याची चिंता मी मुळीच करत नाही फक्त मी मराठी आहे असे मी स्वतःतरी मान खाली घालून मुळीच बोलत नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>म्हणजे आमच्या पिठलं भाकरीची , कोल्हापूरी तांबड्या रश्शाची चव जगातल्या कुठल्याही पदार्थाला यायची नाही असे अमराठी लोकांसमोर म्हणणे म्हणजे गुन्हा असावा असा समज अनेक मराठी माणसांमधे दिसला. १००% सहमत आहे.. बरीचशी मराठी माणसे स्वतःला आणि महाराष्टीयन पद्धतींना ईतरांच्या (स्पेशली नॉर्थ ईंडीया) मानाने कमी लेखतात. (याला हिंदी सिनेमे बहुतांशी जबाबदार आहेत असे माझे मत आहे.) हा सर्वात वाईट प्रकार आहे.. उसात असताना माझ्या आजुबाजुचे मराठी लोकं ईतर अमराठी लोकांबरोबर मिळून महाराष्ट्राची, आडनावांची, लग्नाच्या पद्धतींची खिल्ली उडवायचे.. आपलंच घोडं पेंड खातय तेव्हा करणार काय? असो, बरंच अवांतर झालं..

In reply to by मराठमोळा

महाराष्टीयन पद्धतींना ईतरांच्या मानाने कमी लेखतात आपण आपल्या पदार्थाचे व्यवसायीकरण करत नाही/त्यात कमी पडतो.इतर प्रा॑तिय जाणीव पुर्वक त्या॑च्याच लोका॑च्या हाटेलात जातात या उलत आपण वागतो. विनित

In reply to by तिमा

ह्यातील एकाही पर्यायाला मत दिले नाही आहे . निदान माझ्या शहरात तरी मराठी जेवणास भरपूर प्रतिसाद मिळाला आहे .

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रतिसाद आवडलेला आहे आणि त्यास संपूर्ण अनुमोदन आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पेशवे तुमचा बाणा आवडला.
आमच्या पिठलं भाकरीची , कोल्हापूरी तांबड्या रश्शाची चव जगातल्या कुठल्याही पदार्थाला यायची नाही असे अमराठी लोकांसमोर म्हणणे म्हणजे गुन्हा असावा असा समज अनेक मराठी माणसांमधे दिसला.
या विधानाशी सहमत. नाही म्हणायला बर्‍याच उत्तर भारतीय चालवणार्‍या हॉटेलांत कोल्हापुरी (व्हेज्/नॉन्व्हेज) पदार्थ असतात. पण त्यांनी खरा कोल्हापुरी पदार्थ चाखलाच नसावा. निव्वळ लाल मिरची पुड आणि रंग टाकुन कोल्हापुरी बनत नाही हे त्यांना कोण सांगणार. (पण लोकांना ते ही मिटक्या मारत खाताना पाहिलय. मग निदान एक मराठी पदार्थ तरी खपतोय या आनंदात गप्प बसतो.)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ह्याचे एक कारण हे असु शकेल कि मराठी हॉटेलात गेल्यावर ग्राहकांचे जेवण हा सोपस्कार लवकरात लवकर उरकवण्याचाच हॉटेलमालकाचा उद्देश असतो. त्यामुळे अर्धाएकतासात आपण हॉटेलबाहेर.टीम-लंच हा चांगला तास-दोन तास चालणारा प्रकार आहे.त्यामुळे केवळ जेवणासाठीच म्हणुन जायचे असल्यासच मराठी हॉटेल ह्या पर्यायाचा विचार केला जात असावा.

In reply to by टारझन

इतर ला मत दिलय मराठी माणसाने हॉटेल चालवले नाही म्हणून हॉटेलात मराठी पदार्थ मिळणार नाहीत हा संबन्ध चुकीचा आहे. दिल्लीत पंजाबी माणसाच्या हॉटेलात दाक्षीणात्य पदार्थ मिळतात. मुम्बैत शेट्टीच्य हॉटेलात पंजाबी पदार्थ मिळतातच की. ज्या भागात लोक स्थलांतर करतात त्या भागात मूळ ठीकाणचे पदार्थ मागणीनुसार मिळू लागतात. खानदेशात कोकणी पदार्थ मीअणार नाहीत किंवा कोकणात खानदेशी पदार्थ मिळत नाहीत कारण तेथे त्या पदार्थांची मागणीच होत नाही. मराठी लोक इतर प्रान्तात फारसे जात नाहीत म्हणून मराठी थाळी सर्वत्र मिळत नाही. पण इंदोर वगैरे भागात "पोहे" ही डीश अक्षरशः राष्ट्रीय डीश असावी इतकी लोकप्रिय आहे. गुजरात मध्ये पुरणपोळी ,श्रीखंड, आमटी ( तिकडे त्याला ओसामण म्हणतात) लोकप्रीय आहे

In reply to by विजुभाऊ

विजूभाऊंशी एकदम सहमत. मराठी माणसे 'गड्या आपला गाव बरा' म्हणत बाहेर जात नाहीत. त्यामुळे मराठी पदार्थांची मागणी नसते. याच कारणामुळे बाकी प्रांतातील लोकांना मराठी पदार्थ माहीत देखील नसतात. पण आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात हॉटेल चालवणार्‍या मराठी माणसाला महाराष्ट्राच्या बाहेर जावून धंदा करावा/वाढवावा असे वाटत नाही. आज बंगळूरात इतके मराठी लोक आहेत की एखादे 'श्रेयस' सारखे हॉटेल किंवा गेला बाजार ठाण्याच्या गोखले रोड वरच्या हॉटेल सारखे छोटे हॉटेल नक्कीच चालेल. मराठी मंडळाच्या कार्यक्रमानंतर मिळणार्‍या मराठी पदार्थांवर लोक तुटून पडतात. पण 'आमची कुठे शाखा नाही' हे अभिमानास्पद असेल तर काय करणार. -ओंकार.

In reply to by मी_ओंकार

विजूभाऊ एखाद्या स्थळी एका विशीष्ट प्रकारचे खाणे (cuisine) मिळण्याची , त्या प्रांताचे लोक तिथे असण्याशी सांगड घालत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठी लोक महाराष्ट्राच्या बाहेर कुठे जातच नाहीत, तस्मात अन्यत्र मराठी खाण्यास मागणी नाही, म्हणून मराठी रेस्टॉरंट्स/खानावळी महाराष्ट्राबाहेर फारश्या मि़ळत नाहीत. असे असते तर मुंबईत ६० च्या दशकात उडिपी खाणे कसे पॉप्युलर झाले असते? जगभर इतालियन व फ्रेंच पद्धतिचे खाणे, भारतीय ह्या नावाने सरसकट मिळणारे पंजाबी खाणे कसे पॉप्युलर झाले असते? अगदी अमेरिकेतही जिथे 'पटेल्स आणि मॉटेल्स' अशी सांगड अनेक दशकांपासून आहे, किंवा लंडनसारख्या शहरात जिथे दशकांपूर्वी गुजराती बांधव मोठ्या संख्येने स्थलांतरीत झालेले आहेर, तिथेही गुजराती थाळी पॉप्युलर होण्याऐवजी पंजाबी खाणेच कसे पॉप्युलर झाले असते? मेडिटेरॅनियन खाणे जगभर इतके कसे पॉप्युलर झाले असते? तेव्हा एखाद्या स्थळी एखाद्या प्रकारचे खाणे पॉप्युलर होण्याशी त्या त्या प्रांतांच्या लोकांचे तिथले वास्तव्य व तदनुसार त्यांचा लोकाश्रय कारणीभूत असतोच असे नव्हे. मला वाटते ह्यामागे एक प्रमुख कारण असे की धंदा करण्यासाठी व तो वृध्दिंगत करण्यासाठी जे जे काही लागते ते मराठी जनांत फारसे आढळून येत नाही. पैश्याचे पाठबळ, सेवाभिमुख प्रवृत्त्ति ह्यात आपण बरेच कमी पडत असू? अनेकदा मराठी रेस्टॉरट्सच्या चालक/मालकांच्या , मराठी छोट्या खाद्य-स्टॉलधारकांच्या नियतकालिकांतून येणार्‍या मुलाखतींतून असे दिसून येते की हे चालक/मालक मालाच्या दर्जास संपूर्ण महत्व देतात, पण रेस्टॉरंट्स नुसते 'चांगल्या' मालावर चालत नाहीत, तर सेवाही तत्पर, हसतमुख व ग्राहकाचा सन्मान करणारी असावी लागते; रेस्टॉरंटमधे जाणे हा ग्राहकाच्या दृष्टिने एक अनुभव असतो, ज्यायोगे तो पुन्हा तिथे येण्यास उद्युक्त व्हावा, तसेच इतरांनाही त्या रेस्टॉरंटविषयी चांगले सांगावा-ह्या बाबींविषयी ते बरेच अनभिज्ञ असतात अथवा त्याविषयी त्यांना अजिबात आस्था नसते. मागे एकदा अशाच चर्चेच्या दरम्यान सुधीर काळेंनी एक मुद्दा मांडला होता की मराठी खाणे तयार करण्याच्या पद्धति जिकीरीच्या असतात. पंजाबी खाण्याच्या तुलनेने ह्यात तथ्य आहे, पण तसे पाहिले तर इतालियन पद्धतिही जिकीरीच्या असतातच. धंद्याच्या दृष्टीतून पदार्थ बनवण्याच्या व साठवण्याच्या नवनव्या पद्धति अवलंबिल्या याव्यात. इतरेजन हे करीत असावेत.

In reply to by प्रदीप

मी लहानपणी रत्नागिरीत राहायचो. तिथे लोकसंख्या खूप कमी होती. त्यात पंजाबी / साऊथ इन्डिअन लोक तर बघायलाही मिळायचे नाहीत. असले तर लाख लोकसंख्येत काही शेकडा. तरीही सर्व हाटेलांत दाल फ्राय, नान , डोसा, मेदूवडा हेच मुबलक मिळायचे आणि फेमसही होते. मलाही सर्व हॉटेल भोजनांमधे तेच खाल्ल्याचे आठवते. महाराष्ट्रियन खानावळीही होत्या, पण ही वर म्हटलेली हॉटेले जास्त फेमस आणि गर्दीची असायची. पदार्थाला मागणी निर्माण होण्यासाठी तशी टेस्ट / ग्लॅमर डेव्हलप करावी लागते. "इकडे" (पक्षी मुम्बईत ;) ) बहुसंख्य मराठी खाद्यव्यावसायिकांची पद्धत अशी असते: एक किंवा दोन कॅसेरॉल भरुन पोहे / इडली / वडे / उपमा इ इ. एखाद दोनच पदार्थ बायकोने घरी बनवलेले सकाळी घेऊन कुठेतरी उभे राहायचे आणि तेवढे (अर्थातच गारढोण पडलेले पदार्थ) पेपरडिशमधे "एक्स्ट्रा चटणी मागू नये" पॉलिसीने विकायचे. तेवढा कॅसेरॉल संपला की परत यायचे. या सर्वातून शक्यतो कोरड्या हाताने आणि डाग लावून न घेता धंदा करण्याची वृत्ती दिसते. त्यात इन्व्हॉल्वमेंट नाही. पोहे विकले काय किंवा कालनिर्णय विकले काय..एकच.. अशी मानसिकता दिसते. व्यवसायाची खास गरज आणि पॅशन दिसत नाही. नाईलाजाने डबे भरुन विकावे लागतेय असा भाव दिसतो. तिथेच दिवसभर तवा/कढई लावून गरम सांबार पुन्हापुन्हा प्लेटेत ओतून वाफाळणारी इडली / डोसा / वडा खाऊ घालणार्‍या अण्णाशी तुलना होणारच आणि तिथे आपण मागे पडणारच.

In reply to by गवि

>>तिथेच दिवसभर तवा/कढई लावून गरम सांबार पुन्हापुन्हा प्लेटेत ओतून वाफाळणारी इडली / डोसा / वडा खाऊ घालणार्‍या अण्णाशी तुलना होणारच आणि तिथे आपण मागे पडणारच. बहुतांशी सहमत आहे, पण फक्त हे एकच कारण आहे असे वाटत नाही. नाशिकला असताना एक मिसळसाठी फेमस हॉटेल होते. ते एक शेट्टी चालवत होता. म्हणजे आपले पदार्थ चविष्ट बनवण्याची कला त्याने साधली होती. ईतरही होतीच पण सर्वीस, सभ्यता, विनम्रता, हसतमुख नेपाळी वेटर यामुळे हेच ठिकाण जास्त चाले. मराठी जेवण काय असते हे महाराष्ट्राबाहेरील लोकांना माहितच नाही. पब्लीसिटीच झालेली नाही कधीच.

In reply to by गवि

पोहे विकले काय किंवा कालनिर्णय विकले काय..एकच..
हे आवडले!

In reply to by पंगा

मराठी वातावरणात खाद्यपदार्थ उद्योगाविषयीची ऐकू येणारी वाक्यं ही दुर्दैवदर्शक असतातः १) खानावळ / हॉटेल चालवतात त्या. नवर्‍यानंतर पोटाला कमावण्यासाठी शेवटी हाती लाटणं धरावं लागलं हो.. २) पुरुषमाणूस एवढा, पण पोळ्या बडवतो..बघवत नाही हो. पण काय करणार. ३) शिक्षणात दिवे लावले. वडापावची गाडी टाकून द्यावी लागली शेवटी. ४) माझ्या आईने आयुष्यभर अक्षरशः जेवणाचे डबे बनवून चार पैसे मिळवून आमची शिक्षणं केली. आता तरी तिला सुख लागावं असं वाटतं. ५) कर्तबगार मनुष्य हो.. नुसत्या वडापावच्या गाडीवर कार घेतलीन. घरही घेतलंन. आता मुलांना चांगलं कॉलेजात शिकवून त्यांची यातून सुटका केलीन त्याने. यातून त्या व्यवसायाचं "स्केल"ही कळतं. आणि अशी अनेक. भांडवलाची बोंब आणि धंदेवाईकपणाचा अभाव ही कारणं असावीत. मी फक्त निरिक्षण नोंदवले.

मागणी नाही म्हणून आढळत नाहीत्.बेंगळूरमध्ये एक माहितीतले मराठी कुटुंब हॉटेल चालवते.(pure Maharashtrian अशी जाहिरात असते) Bombay Vadapav- 17 रुपये. श्रीखंड्+पुरी+बटाट्याचा रस्सा- ५० रुपये(श्रीखंड ४ सें.मी. व्यासाच्या वाटीत असते) मिसळ पाव- ४० रुपये(मिसळ प्रत्येकवेळी तीच- मटकीची उसळ आणि त्यावर शेव+कांदा) आता हा १७ रुपयाचा वडापाव आणि ४० रुपयाची मिसळ पाव कोण खाईल? तेही उभे राहून?कीचनमध्ये डोकावून बघितले तर नेपाळी लोक वडे तळत होते. मागणी आहे,पदार्थ लोकप्रिय पण करता येतील पण नीट आयोजन हवे.

दुसरं काय? २००३सालची गोष्ट आहे, आम्ही ६ मित्र दिल्लीत गेलेलो नोकर्‍या शोधायला. महिनाभर पंजाबी पध्दतीचं खाऊन कंटाळल्यावर शोध लागला की दिल्ली हटमध्ये स्टेट-टुरिझमचे स्टॉल्स असतात तिथे मराठी जेवण मिळतं. गेलो. कायतरी १० वगैरे रुपयांचं तिकीट काढून गेलो. दिवस बेरोजगारीचे, पण मराठी जेवणाची ओढ म्हणून गेलो. कुणीतरी नागपूरचे कुटुंब होते जे हा मराठी खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवत होते. वडापाव (२ नग) : २५ रुपये. वांग्याची भाजी, टोमॅटोची कोशिंबीर, दह्याची वाटी, २ कागदासारख्या भाकर्‍या : फक्त ६० रुपये. एरवी रोज ढाब्यांवर ३०-३५ रुपयात जेवण व्हायचं.... मग कसं चालणार हे असले धंदे?

In reply to by धमाल मुलगा

आमची कुठेही शाखा नाही' वृत्ती. +१ वडापाव (२ नग) : २५ रुपये. वांग्याची भाजी, टोमॅटोची कोशिंबीर, दह्याची वाटी, २ कागदासारख्या भाकर्‍या : फक्त ६० रुपये. एरवी रोज ढाब्यांवर ३०-३५ रुपयात जेवण व्हायचं.. -१ असल्या प्रदर्शनात दिवसाचाच भाडं १0०० ते 2००० च्या दरम्यान असत त्यातून त्या कुटुंबाला थोडे तरी पैसे सुटायला नकोत का? म्हणून असे रेट लावावे लागतात

In reply to by स्पा

साहेब, प्रदर्शन नव्हे! कायमस्वरुपी होतं ते. आणि सन २००३मध्ये २ कागदी भाकर्‍या आणि वांग्याच्या भाजीला ६०रुपये मोजावे लागणं ह्याइतका वेडेपणा नसावा.

In reply to by धमाल मुलगा

बेंगलोरमध्ये जयनगरमध्ये राजवर्धन नावाचे मराठी पदार्थ मिळणारे हॉटेल आहे. खास भाकरी खाण्यासाठी मोठ्या आशेने तिथे गेलो. एक्स्ट्रा भाकरीची किंमत २० रूपये ऐकुनच चपापलो. तसाच सरळ बसवनगुडीच्या कामत हॉटेलमध्ये गेलो.१२० रूपयात अनलिमिटेड ज्वारीच्या भाकरीचे जेवण.अगदी तृप्त होईपर्यंत जेवलो. आता कोणी पाहुणा घरी आला तर त्याला कामत हॉटेलमध्ये न्यायचा माझा प्रयत्न असतो. मराठी माणसाच्या खानावळीत/हॉटेलात जाणे मलाही आवडते/पटते पण केवळ त्यासाठी स्वतःच्या खिशाला भोक पाडणे काही पटत नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

-०.५ मराठी माणसाची नुसतीच हॉटेले निघावीत असे नव्हे तर खरोखरच एक दिवस त्याने परमुलुखात २५० रुपयाला एक झुणका भाकरी विकावी आणि ती विकली जावी हीच सदिच्छा.. त्या राजवर्धनमधे गर्दी असते का? असेल तर खरेच कौतुक आहे. कमर्शियल सक्सेस त्यात आहे. वीसला विकतात म्हणजे वीसला विकले जात असावे. दीड रुपयात तर कोणीही योजना सुरु करुन बंद पाडेल. आणि त्या योजनेच्या टपरीत चायनीज विकेल. ;) असो. :)

In reply to by कानडाऊ योगेशु

मला वाटते की आपण आपला दृष्टीकोन बदलायची गरज आहे. इथे (पक्षी:- मुंबईत) पंजाबी धाटणीच्या हॉटेलात नान/रोटीचे २० रुपयेच काय जास्तही असतात अनेकदा. मराठी माणसांनी त्याची तक्रार केलेली ऐकिवात नाही फार. (बंगळुरुत किती पडतात रोटी/नान/कुलचा वगैरेचे, सर्वसाधारणपणे?) मुळात मराठी माणसे बाहेर जाऊन मराठी वारंवार जेवणार नाहीत. मग २० रु भाकरी ठेवायला लागू शकते. मागणी वाढली तर किंमत भविष्यात कमी होईलही कदाचित.

इतरला मत दिले आहे. महाराष्ट्राबाहेर तीन ठिकाणी महाराष्ट्रीयन जेवण जेवण्याचा योग आला. तीनपैकी फक्त एका ठिकाणी बरे होते. उरलेल्या दोन ठिकाणांपैकी एके ठिकाणी त्या हाटेलाची मालकीण एकटक आमच्याकडे पहात बसल्याने जेवण गेले नाही. तिसर्‍या ठिकाणाबद्दल बोलत नाही. हे फक्त आपल्याच हाटेलांबाबत होते असे नाही. बाकी राज्यांची त्यांच्या राज्याबाहेर चालवलेली सगळीच हाटेले काही बरे जेवण देतात असे नाही. अगदी बंडल साऊथ इंडीयन ते बंडल नॉर्थ इंडीयन प्रकारही आहेत. पण त्या राज्यांचे बरे एखादे तरी हाटेल असते म्हणून आपण वा! वा! म्हणत तिथे जातो. कालांतराने बंडल प्रकार लोकाश्रया आभावी बंद झालेले दिसतात. आपल्या चांगल्या हाटेलांची साखळी यायला हवी असे वाटते. अर्थातच ते दुसर्‍या कोणी करावे मी यात पडणार नाही.;)

मी हाच विचार करून एक बारीकसे हाटेल काढायचा विचार केला होता...पण माझ्याकडे पैसा नाही आणि नवर्याकडे आहे पण तो देत नाही. त्यामुळे जर कोणाला भागीदारी हवी असेल तर सांगा... आणि हो, आमची शाखा अमेरिकेत असेल. :)

In reply to by शिल्पा ब

ओ शिल्पा म्याडम.... सन्निवेल ला इंडिया कॅश अ‍ॅन्ड कॅरी च्या बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हो sssssss. हॉटेलचे नावः इंडिया चाट क्युझिन. पत्ता: 1082 E El Camino Real, Sunnyvale, CA 94087 मेन्यूतील काही पदार्थ: साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, थालिपीठ, पुरणपोळी, पोहे, झुणका, वडापाव, पुणेरी मिसळ. (बकासूर) बबलु.

In reply to by बबलु

हा खरा मराठी माणूस. दुसरा मराठी माणूस (किंवा बाईमाणूस) व्यवसायाचे स्वप्न पाहतो(ते) आहे हे बिलकुल सहन होत नाही. अरे असेल तुमच्या सन्निवेल (न्नि??) मध्ये ५-६ मराठी पदार्थ मिळत, म्हणून इतक्या मोठ्या बे एरिया मध्ये दुसरे मराठी उपहारगृह निघू नये. खेकडा वृत्ती, दुसरे काय ;-) डबल्यु (W) ता.क. :- खेकड्यावरून आठवले, बे एरिया मध्ये खेकडा(खरा, मराठी माणूस नाही) चांगला मिळतो म्हणे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

वि.मे. काका, किती बोलाल तुम्ही ? :) :) जरा कधी नव्हे ते इथे मराठी हॉटेल मिळालंय तर वर्ड स्प्रेड करूद्यात की राव. :) (मी आणि बेला तिकडे हादडून आलो). असो.... स्वतः तिकडे ठाण्याला मटणवाटीसहीत चमचमीत गिळून वर आमच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या काकांच्या वॄत्तीचा त्रिवार निषेध !! ;)

In reply to by बबलु

>>वि.मे. काका, किती बोलाल तुम्ही ? हे वाक्य "तुझा पगार किती? तू बोलतोस किती?" असे वाचले गेले आहे. >>जरा कधी नव्हे ते इथे मराठी हॉटेल मिळालंय तर वर्ड स्प्रेड करूद्यात की राव. काही जुने वाद आठवले आणि मन भरून आले. >>स्वतः तिकडे ठाण्याला मटणवाटीसहीत चमचमीत गिळून वर आमच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या काकांच्या वॄत्तीचा त्रिवार निषेध शालीमार, पक्वान, रज्जोत, मसाला झोपडी झालेच तर ऑलिव्ह गार्डन आणि तत्सम अनेक ठिकाणी जाऊन तिथले फोटो टाकून याचा बदला तुम्ही घ्यावा अशी सूचना करीत आहे. (१/४५ पगारवाला) वि.मे. त.टी. :- बाकी, सदर चर्चा अवांतर असल्याने, पुढील चर्चा खव मध्ये करुय,, असा प्रस्ताव मांडत आहे. :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हेच म्हणणार होते...एकच मराठी हाटेल आहे तर मला दुसरे काढु द्या की!! तुम्हालाच जास्त चॉईस मिळेल. हवं तर तुम्हाला १०% सुट देउ, काय?

In reply to by शिल्पा ब

एकच मराठी हाटेल आहे तर मला दुसरे काढु द्या की!! तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!! आणि तुम्ही इथे मिपावर वैश्विक पाककृती देत नसल्यामुळे तुम्हाला भांडवलही उभे करण्यात मदत करावी असा मोह होतो आहे!!!! ;)

आपल्या सर्वाना नेहमी इतरांच्या गोष्टीबद्दल (खाद्य पदार्थ) आकर्षण असते. त्यामुळेच तर बाहेरच्या राज्यत जाउद्यात महाराष्ट्रातही पंजाबी, साऊथ इंडियन, इतर हॉटेल जास्त असतील.

In reply to by बबलु

इथे उगाचच "रंग माझा वेगळा" विनोदाची आठवण झालेली आहे. :) असो, बाकी हाही मुद्दा खराच आहे म्हणा. बाकी लोकं काही केल्या त्यांच्या पद्धती सोडत नाहीत, आणि आपण (आपणच म्हणावं लागेल) लगेच दुसर्‍याची भाषा, पद्धती अवलंबतो.

In reply to by बबलु

इथे एक लक्षात घ्यायला हवे की महाराष्ट्राची तुलना दक्षिण्(म्हणजे चार राज्ये) आणि उत्तर्(७/८ राज्ये)शी होत आहे. दक्षिणेत प्रत्येक राज्याची वेगळी खाद्यसंस्कृती आहे आणि ह्या राज्यांच्याबाहेर ईडली/वडा/डोसा ह्यापलिकडे विशेष माहिती नाही.कारण बाकीचे पदार्थ लोकप्रिय नाहीत. उत्तरेतल्या राज्यांचेही तसेच असावे.उदाहरण द्यायचे झाले तर्- उडुपी लोकांची सांबार बनवण्याची पद्धत वेगळी,तामिळनाडुत वेगळी आणि केरळात वेगळी. मुंबईत/पुण्यात उडुपी लोक साउथ इंडियन्च्या नावाखाली सरसकट काहीही खपवतात.

इतर राज्यांतील पदार्थांची लोकप्रियता पाहून काही विचार मनात येतात. मराठी पदार्थ बनवून विकणार्‍यांचे टारगेट मराठी माणूस हे असते. अमराठी माणसाने मराठी पदार्थ खावेत असे टारगेट नसते. तसे ठेवले तर मार्केट वाढू शकेल. म्हणजे दिल्लीत थालीपीठ विकायचे असेल तर ते "ऑथेंटिक" महाराष्ट्रीय असता कामा नये तर ते पंजाबी पद्धतीने बनवायला हवे. यामुळे दिल्लीतले मराठी लोक तुमच्याकडे थालिपीठ खायला येणार नाहीत पण दिल्लीकर येतील. दिल्लीतला मराठी माणूस हे टारगेट ठेवले तर धंदा वाढणार नाही. कारण दिल्लीत मराठी लोक असणार किती आणि ते नेहमीच तुमच्याकडे येणार असे थोडेच आहे. याचे समांतर उदाहरण द्यायचे तर चायनीज पदार्थांचे देता येईल. मुंबईत किंवा भारतात मिळणारे चायनीज पदार्थ ऑथेंटिक चायनीज नसतातच उलट आपल्याला आवडतील अशा भारतीय चवीचे असतात. [ऑथेंटिक चायनीज खायला फाइव्ह स्टारमध्येच जावे लागत असावे]. गुजरात मध्ये जो वडापाव मिळतो तो मुळीच मराठी पद्धतीचा नसतो. बटरमध्ये बरबटलेल्या/परतून-तळून काढलेल्या पावात वडा घालून देतात. परंतु तो येथे खपतो कारण तो गुजरात्यांना आवडेल अशा रीतीने बदललेला असतो. आणखी उपाय म्हणजे मराठी पदार्थांची जाहिरात सेलिब्रिटीजच्या मार्फत इंग्रजी वृत्तपत्रातून करणे. [माधुरी दीक्षितने माझा आवडता पदार्थ "पिठलं भात" सांगितला तरी ते पिठलं घरगुती असणार नाही याची काळजी घ्यायला हवी].

In reply to by नितिन थत्ते

कारण दिल्लीत मराठी लोक असणार किती
हा भाग गंडतो आहे असे वाटते. आकडेवारी माहीत नाही, पण बरेच असावेत. आणि ही आजकालची गोष्ट नाही.
आणि ते नेहमीच तुमच्याकडे येणार असे थोडेच आहे.
हा भाग ठीक असू शकतो.
म्हणजे दिल्लीत थालीपीठ विकायचे असेल तर ते "ऑथेंटिक" महाराष्ट्रीय असता कामा नये तर ते पंजाबी पद्धतीने बनवायला हवे.
म्हणजे "थालीपीठ" या नावाखाली वाटेल ते खपवून द्यावे काय? मग त्याला "थालीपीठ" तरी का म्हणावे?
मुंबईत किंवा भारतात मिळणारे चायनीज पदार्थ ऑथेंटिक चायनीज नसतातच उलट आपल्याला आवडतील अशा भारतीय चवीचे असतात.
यात "चायनीज"ची विक्री होत नसून विक्रेता खपवत असलेल्या मालाची विक्री होते. बाकी, थालीपीठ पंजाबी पद्धतीने बनवून विकले तर पंजाबी गिर्‍हाईक त्याकडे आकृष्ट तर होणार नाहीच, पण चुकूनमाकून येणारे उरलेसुरले मराठी गिर्‍हाईकही गमावून बसण्याची पाळी येण्याची शक्यता अधिक वाटते.

In reply to by पंगा

>>यात "चायनीज"ची विक्री होत नसून विक्रेता खपवत असलेल्या मालाची विक्री होते. सुधारणा. विक्रेता खपवत असलेल्या मालाची "चायनीज म्हणून" विक्री होते. त्या अर्थाने भारतात चायनीज पदार्थ लोकप्रिय नाहीत. चायनीज म्हणून विकले जाणारे पदार्थ लोकप्रिय आहेत. तसेच थालीपीठ म्हणून तो पदार्थ लोकप्रिय करायला हरकत नसावी. वडापावच्या गुजराती उदाहरणाबाबत काय मत आहे?

In reply to by नितिन थत्ते

सुधारणा. विक्रेता खपवत असलेल्या मालाची "चायनीज म्हणून" विक्री होते. त्या अर्थाने भारतात चायनीज पदार्थ लोकप्रिय नाहीत. चायनीज म्हणून विकले जाणारे पदार्थ लोकप्रिय आहेत.
मान्य.
तसेच थालीपीठ म्हणून तो पदार्थ लोकप्रिय करायला हरकत नसावी.
फायदा काय?
वडापावच्या गुजराती उदाहरणाबाबत काय मत आहे?
गुजरात्यांना काय आवडावे आणि 'वडापाव'च्या नावाखाली त्यांनी काय खावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी 'वडापाव' या नावाखाली साबूदाण्याची खिचडी खायचे जरी ठरवले, तरी त्याला माझी वैयक्तिक हरकत असायचे काहीच कारण नाही. प्रश्न हा आहे, की ते खातात, म्हणून आपण वाटेल ते खपवावे काय? त्यातून नेमके काय साध्य होते? आपला यामागील नेमका उद्देश काय? आपल्याला महाराष्ट्रीय पदार्थांचे मार्केटिंग करायचे आहे, की महाराष्ट्रीय पदार्थांच्या नावाखाली वाटेल त्याचे - आपण खपवू त्या पदार्थाचे - मार्केटिंग करायचे आहे?

In reply to by पंगा

आपला यामागील नेमका उद्देश काय? आपल्याला महाराष्ट्रीय पदार्थांचे मार्केटिंग करायचे आहे, की महाराष्ट्रीय पदार्थांच्या नावाखाली वाटेल त्याचे - आपण खपवू त्या पदार्थाचे - मार्केटिंग करायचे आहे?
नेमका उद्देश मराठी रेस्टॉरंट्सवाल्यांनी उत्तम धंदा करणे हा आणि केवळ हाच आहे. त्यासाठी पदार्थांच्या चवीत, त्यांच्या कृतित स्थलकालानुसार थोडीफार मुरड घालण्यास काहीही हरकत नाही. शेवटी बॉटम लाईन महत्वाची. मराठी खाद्यपदार्थांच्या कौमार्याची ध्वजा खांद्यावर घेऊन कुणीही धंदा महाराष्ट्राबाहेर करू म्हटले तर तो यशस्वी धंदेवाईक होऊ शकणे कठीण! नितीन प्रॉडक्टचे लोकलायझेशन सुचवताहेत. सगळ्ञा यशस्वी धंद्यांना हे करणे आवश्यक आहे, ह्याविषयी दुमत होऊ नये.

In reply to by प्रदीप

सहमत. ज्यांना महाराष्ट्रीय पदार्थ बाहेर कसे विकले जावे असा प्रश्न पडला त्यांच्यासाठी एक सुचवणी आहे.

In reply to by प्रदीप

>>सगळ्ञा यशस्वी धंद्यांना हे करणे आवश्यक आहे, ह्याविषयी दुमत होऊ नये. पण दुमत व्यक्त करणे हाच उद्देश असेल तर?

In reply to by प्रदीप

नेमका उद्देश मराठी रेस्टॉरंट्सवाल्यांनी उत्तम धंदा करणे हा आणि केवळ हाच आहे.
'मराठी रेस्तराँवाले' म्हणजे नक्की कोण? मराठी पदार्थ विकणारे (कोणतेही) रेस्तराँवाले, की मराठीभाषक (कोणतेही पदार्थ विकणारे) रेस्तराँवाले? (पहिला अर्थ असेल असे गृहीत धरतो.) मला वाटते 'पदार्थाचे मार्केटिंग करणे' हा (या धाग्याप्रमाणे तरी) मूळ उद्देश आहे. 'धंदा चालवणे' हा तदानुषंगिक दुय्यम. आवश्यक, पण तरीही दुय्यम.
शेवटी बॉटम लाईन महत्वाची.
बॉटमलाईन महत्त्वाची खरीच. पण त्याआधी त्यामागचा नेमका उद्देश क्लियर असणे महत्त्वाचे.
त्यासाठी पदार्थांच्या चवीत, त्यांच्या कृतित स्थलकालानुसार थोडीफार मुरड घालण्यास काहीही हरकत नाही.
थोडीफार मुरड घालण्यास हरकत नाही, आणि थोडीफार नैसर्गिकतः घातलीही जात असावी. पण 'थोडीफार' म्हणजे नेमकी किती? मूळ पदार्थापासून किती फारकत घ्यावी? पदार्थ खपतोय म्हणून इतकीही घ्यावी का, की मूळ पदार्थ ओळखता येऊ नये?
मराठी खाद्यपदार्थांच्या कौमार्याची ध्वजा खांद्यावर घेऊन कुणीही धंदा महाराष्ट्राबाहेर करू म्हटले तर तो यशस्वी धंदेवाईक होऊ शकणे कठीण!
'कौमार्याची ध्वजा' आवडली. :) यशस्वितेच्या काठिण्याबाबत साशंक आहे.
नितीन प्रॉडक्टचे लोकलायझेशन सुचवताहेत. सगळ्ञा यशस्वी धंद्यांना हे करणे आवश्यक आहे, ह्याविषयी दुमत होऊ नये.
एका ग्राहकाच्या दृष्टिकोनातून मला लोकलायझेशनची कल्पना पटलेली नाही. मी जेव्हा बाहेर जाऊन (उदाहरणादाखल) चिनी, इतालियन, जपानी किंवा इतर काही (दमड्या मोजून) खाऊन पाहत असतो, प्रयोग करून पाहत असतो, तेव्हा मला 'ही शिंची चायनीज/इतालियन/जपानी/जी काही असेल ती भानगड असते तरी काय हे पाहू या' हे कुतूहल असते. चारचौघांत जाऊन 'मी काल इतालियन खाल्ले बॉ' असे मिरवता यावे हा (किमानपक्षी प्राथमिक) उद्देश नसतो. अर्थात स्थानिक परिस्थितीत मला शंभर टक्के ऑथेंटिक असे काही मिळणार नाही याची पूर्ण कल्पना असते, पण तरीही मूळ पदार्थाच्या शक्य तितक्या जवळ जाणारे काहीतरी अनुभवायला मिळावे, ही अपेक्षा असते. स्थानिक परिस्थितीत तेच सारे साहित्य जसेच्या तसे मिळणार नाही, त्यामुळे शंभर टक्के ऑथेंटिक असे काही बनवता येऊ न शकण्यात विक्रेत्याचा नाइलाज आहे, हे मी समजू शकतो. मात्र 'मला अमूक प्रकारचे खाण्याची सवय आहे' म्हणून (किंवा तसे ठरवून) विक्रेत्याने मुद्दाम त्याचा पदार्थ माझ्या पदार्थासारखा बनवून - मँगल करून - माझ्याच हितासाठी केल्यासारखा माझ्या गळ्यात मारावा, ही एक ग्राहक म्हणून मला माझी फसवणूक वाटते. इतालियनचे सोडा. आमच्यात ज्यातत्यात गोडा मसाला घालण्याची सवय असते किंवा गोडा मसाला आवडतो, असे ठरवून उद्या कोणा पंजाब्याने गोडा मसाला घातलेले छोले किंवा कोणा उडप्याने गोडा मसाला घातलेले सांबार माझ्या गळ्यात मारले, तर ते मी निमूटपणे सहन करावे काय? मला काय आवडते किंवा आवडू शकते हे एक ग्राहक म्हणून मला ठरवू दे ना! 'मला अमूकअमूक पद्धतीचेच आवडते / आवडू शकते' हे माझ्या वतीने ठरवायला - थोडक्यात मला गृहीत धरायला - दुकानदार कोण लागून गेला? आणि मी जर शक्य तितके ऑथेंटिक खाऊन पहायला तयार आहे, तर 'मी ऑथेंटिक खाणारच नाही' हे दुकानदाराने परस्पर ठरवणे हा ग्राहक म्हणून माझ्या अभिरुचीचा अपमान नाही काय? हे एका प्रकारचे प्रोफायलिंग नाही काय? आणि माझी खायची तयारी आहे, तरी मी ते खाणारच नाही हे अगोदरच ठरवण्याचा दळभद्रीपणा कुठला? बाकी, दिल्लीकर पंजाबी जर मुळात थालीपिठाला तोंड लावायला तयार नसेल, तर तो थालीपिठाचे पंजाबीकरण केले तरी कितपत तयार होईल, याबाबत साशंक आहे. कारण काहीतरी पंजाबीकृतच जर खायचे असेल, तर त्यापेक्षा त्याला ऑथेंटिक पंजाबी पदार्थांचा चॉइस दिल्लीत राहून भरपूर आहे. मग तर तो सरळ धाब्यावरच जाईल, मराठी उपाहारगृहात कशाला फिरकेल? मात्र या भानगडीत थालीपीठ आपले थालीपीठपण गमावून तेवढे बसेल, याहून अधिक काहीही होणार नाही. त्यापेक्षा, थालीपिठाला न बदलतासुद्धा, काळजीपूर्वक योजलेल्या जाहिरातींतून काही करून थालीपिठाला ग्लॅमर आणले, आणि अशा जाहिरातींचा सतत भडिमार केला, तर यश येण्याची शक्यता थोडी अधिक वाटते. (त्यासाठी थोडा पैसा गुंतवण्याची आणि थोडी रिस्क घेण्याची तयारी मात्र पाहिजे.)

In reply to by पंगा

'मराठी रेस्तराँवाले' म्हणजे नक्की कोण? मराठी पदार्थ विकणारे (कोणतेही) रेस्तराँवाले, की मराठीभाषक (कोणतेही पदार्थ विकणारे) रेस्तराँवाले? (पहिला अर्थ असेल असे गृहीत धरतो.)
बरोबर, पहिला अर्थच अभिप्रेत आहे.
मला वाटते 'पदार्थाचे मार्केटिंग करणे' हा (या धाग्याप्रमाणे तरी) मूळ उद्देश आहे. 'धंदा चालवणे' हा तदानुषंगिक दुय्यम. आवश्यक, पण तरीही दुय्यम.
पुन्हा तेच लिहीतो. मराठी रेस्टॉराँवाल्याचा (वर सहमती दर्शवलेल्या व्याख्येनुसार) (रेस्टॉरॉचा) धंदा चालणे हा प्रार्थमिक उद्देश आहे.कारण तो त्याचा कोअर काँपिटन्स आहे. तेव्हा त्यावर तो कॅपिटलाईज करेल.मराठी पदार्थांचे मार्केटिंग करणे हे तो धंदा यशस्वी होण्याच्या प्रेरणेतून यावे. रेस्टॉरॉचा धंदा यशस्वी होणे मूळ उद्देश. त्यासाठी आवश्यक मार्केटिंग हे साध्य नव्हे, तर साधन आहे.
एका ग्राहकाच्या दृष्टिकोनातून मला लोकलायझेशनची कल्पना पटलेली नाही. ............मात्र 'मला अमूक प्रकारचे खाण्याची सवय आहे' म्हणून (किंवा तसे ठरवून) विक्रेत्याने मुद्दाम त्याचा पदार्थ माझ्या पदार्थासारखा बनवून - मँगल करून - माझ्याच हितासाठी केल्यासारखा माझ्या गळ्यात मारावा, ही एक ग्राहक म्हणून मला माझी फसवणूक वाटते.
लोकलायझेशन दोन कारणांमुळे केले जाते. आवश्यक त्या मालाची व साहित्याची अन्यत्र सहजी नसणारी उपलब्धता हे एक. आणि स्थानिक ग्राहकांच्या खाण्यापिण्याविषयीची आवडनिवड हे दुसरे, आणि सर्वात महत्वाचे. तुम्ही 'कुणीतरी काहीतरी तुमच्या गळ्यात मारावे,.. कुणीतरी दुसरा हे ठरवणारा कोण', वगैरे जे प्रश्न निर्माण केले आहेत ते नुसते वाद घालण्यासाठी नसून खरेच ती तुमची मते असावीत, असा संशयाचा फायदा तुम्हाला देत पुढील उत्तर देत आहे. एखाद्या स्थळातील जनांना नेमके कसल्या प्रकारचे खाणे आवडते, त्यांच्या चवीची, त्यांच्या संवयींची आवड काही दुकानदार (रेस्टॉराँवाले) यशस्वी काळजीपूर्वक जोखतात व त्यानुसार ते तेथे माल तयार करून खपवतात. जे ही लवचिकता दर्शवत नाहीत, ते फक्त 'आम्ही अगदी मूळ चवीचा मालच ठेवतो आमच्या रेस्टॉरॉंत' ह्या नशेत रहातात खरे, पण त्यांच्या ह्या परप्रांतातील/ परदेशातील धंद्याचे लवकरच बारा वाजतात. दुसर्‍या तर्‍हेने हेच सांगायचे झाले तर, परकीय प्रांतीय/परकीय देशीय दुकानदार ते जिथे धंदा करीत आहेत तेथील ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार न करता काही खपवू लागले तर त्यांचा तेथील धंदा चालणारच नाही. पण तो यशस्वी झाला तर समजावे त्याने स्थानिक गिर्‍हाईकांच्या आवडीनिवडींना योग्य तर्‍हेने जोखले आहे.
पण 'थोडीफार' म्हणजे नेमकी किती? मूळ पदार्थापासून किती फारकत घ्यावी? पदार्थ खपतोय म्हणून इतकीही घ्यावी का, की मूळ पदार्थ ओळखता येऊ नये?
हा पाखंडी प्रश्न कुणीतरी उपस्थित करेल असे वाटलेच होते. ह्यापुढे जाऊनही आता कुणीतरी 'मूळ पदार्थ ओळ्खण्याच्या/ न ओळखण्यच्या विद्याचा प्रश्न' उपस्थित करेलही. ही प्रश्नावली अगदी अनंत काळा सुरू ठेवता येते! एक उदाहरण देतो. समजा लंडनमधे एखाद्या मराठी सद्गृहस्थाने मराठी पदार्थ देणारे रेस्टॉरों सुरू केले. व त्यात त्याचा 'स्टार आयटेम' बटाटेवडा आहे. स्थानिक ग्राहकाच्या संवयीशी फारकत न घेणारा, समंजस, धंद्याकडे लक्ष देणारा हा दुकानदार असल्याने त्याने सुरूवातीपासूनच वड्याबरोबरची लसणीची चटणी अगदी मिळमिळीत करून टाकलीय. त्याही पुढे जाऊन तो वड्याबरोबर वूसेस्टर अथवा टार्टार सॉसेस प्रमोट करतोय. वडा मात्र जसा आपण ('आपण म्हणजे नक्की कोण? मुंबईचे / कोल्हापूरचे/ विदर्भातले...' वगैरे प्रश्न बाजूस ठेऊ) बनवतो तसा ठेवला आहे. तर काही महिन्यांनतर त्याच्या लक्षात येते की त्याची ह्या वड्याची विक्री वूसेस्टर सॉस समवेत अथवा टार्टार सॉस समवेत प्रचंड होते. चटणी फारशी कुणी घेतच नाही. किंवा घेतली तरी ती तशीच टाकतात. कालांतराने तो ती चटणी करणेच बंद करून टाकतो. मग एक मराठी माणूस उत्साहाने तेथे जातो, व वड्याबरोबर चटणी न मिळाल्याने नाराज होतो. हे त्या दुकानदाराचे अगदी 'नगण्य' असे गिर्‍हाईक असल्याने त्याला ह्यामुळे फरक पडू नये. 'मूळ पदार्थापासून' त्याने फारकत घेतली आहे, पण वडा तसा अजूनही ठीक वडाच आहे. लोकलायझेशनचे अजून एक उत्तम उदाहर्ण द्यायचे झाले तर मक्डोनॉल्डचे देता यावे. त्यांनी अनेक ठिकाणी लोकलायझेशन करून जगभर पाय रोवले आहेत.

In reply to by पंगा

>>म्हणजे "थालीपीठ" या नावाखाली वाटेल ते खपवून द्यावे काय? मग त्याला "थालीपीठ" तरी का म्हणावे? हॅ हॅ हॅ.. अहो उभ्या आडव्या (बेळगाव कारवार संकेश्वर निपाणी धरून) महाराष्ट्रातच थालीपीठाचे असंख्य प्रकार बनवण्यात येतात, त्यातला नक्की कुठला ऑथेंटिक मानायचा. की तुम्ही किंवा मी खाल्लाय तोच ऑथेंटिक..

In reply to by अर्धवट

अहो उभ्या आडव्या (बेळगाव कारवार संकेश्वर निपाणी धरून) महाराष्ट्रातच थालीपीठाचे असंख्य प्रकार बनवण्यात येतात, त्यातला नक्की कुठला ऑथेंटिक मानायचा.
त्या सगळ्यांनाच माना की! कुठल्याही मराठीभाषक समाजात थालीपीठ अमूकएक पद्धतीने बनवायची प्रथा असली, की झाले ऑथेंटिक मराठी थालीपीठ. हाय काय नि नाय काय! पण त्याला मोडतोड करून (सगळ्या प्रथा धाब्यावर - धाब्याच्या कुठल्याही अर्थाने - बसवून) पंजाबी कशाला बनवायचे, तेही केवळ पंजाब्याला विकता यावे म्हणून?

तुम्ही ईथेच शाटमारी करत रहा आणी चर्चेचा किस पाडत रहा.तिकडे ते ईतर प्रांतीय आपली पोळी भाजुन घेतात तेवढ्या वेळात..

"आमची शाखा कुठेही नाही" यामध्येच मरहाराष्ट्रीयन हॉटेल चालवणार्‍यांना अभिमान वाटतो. ;)

येथील जाणते सदस्य श्री. प्रभाकर पेठकर यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर रेस्टॉरंटचा व्यवसाय केलेला आहे. त्यांचे अनुभवाचे बोल येथे मोलाचे ठरतील.

पर्याय क्रमांक २ आणि ४ कडेच बहुतांशी लोकांनी कल दाखवला आहे. मराठी माणसे खाद्य व्यवसायात मागे आहेत हे सर्वांना कबूल आहेच व एखाद्याने सुरुवात केलीच तरी ईतर मराठी लोकांना स्वतःच्या खाद्य संस्कृतीचा अभिमान नसल्याने मराठी खाद्यपदार्थांची पब्लीसीटी होणेही अवघडच असे एकंदरीत चित्र दिसते. घराबाहेर असल्यास मी स्वत: आता शक्य तिथे मराठी जेवणासाठी आग्रह धरेन, शक्य तिथे मराठी उपहारगृहातच जाण्याचा प्रयत्न करेन (महाग असले तरी) आणि ईतरांनाही प्रवृत्त करेन. :) धन्यवाद.

कारण बहुतांश मराठी माणसे बाहेर गेल्यावर महाराष्ट्रीयन जेवणापे़क्षा ईतर पदार्थ खाणे पसंत करतात, पोटाला त्रास झाला तरी याला अभिमान नसणे म्हणा किंवा खोटी प्रतिष्ठा जपणे म्हणा.

In reply to by सन्जयखान्डेकर

मिपा गंडल्यामुळं दोन/ तीनदा प्रतिसाद आलाय. उगाच खवचट पणे इतक्या वेळा एकच गोष्ट का लिहिलीए म्हणुन विचारु नये.

In reply to by सन्जयखान्डेकर

जिथे जातो तिथली खाद्य संस्कृती ट्राय करून बघायला हवीच...मी पण साधारणपणे ज्या गावात जाते तिथले लोकल काही असेल तर ते आधी बघणे, खाणे पसंत करते... फक्त आपला गाव, आपल्या चवी वगैरे कुपमंडूकपण करण्यात काय अर्थ आहे...पण कायमस्वरूपी राहण्याच्या जागी आपल्या चवी असलेले जास्त चांगले कारण इतर देशींच्या चवी या चवीपुर्त्याच ठीक असं आपलं माझं मत. बाकी पोटाला झेपत नसेल तर जे झेपतय ते खावं.

In reply to by सन्जयखान्डेकर

जिथे जातो तिथली खाद्य संस्कृती ट्राय करून बघायला हवीच...मी पण साधारणपणे ज्या गावात जाते तिथले लोकल काही असेल तर ते आधी बघणे, खाणे पसंत करते... फक्त आपला गाव, आपल्या चवी वगैरे कुपमंडूकपण करण्यात काय अर्थ आहे...पण कायमस्वरूपी राहण्याच्या जागी आपल्या चवी असलेले जास्त चांगले कारण इतर देशींच्या चवी या चवीपुर्त्याच ठीक असं आपलं माझं मत. बाकी पोटाला झेपत नसेल तर जे झेपतय ते खावं.