✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मनातले

स
सहज यांनी
Wed, 10/17/2007 - 08:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33718 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

स
सहज Wed, 10/17/2007 - 08:39 नवीन

ध्यान

आय गो फर्स्ट.. मनात काही विचार नको, शांतपणे ध्यान करा हे मला आजवर कधीही जमले नाही आहे. लोक ध्यान कसे काय करू शकतात हे मला कोडे आहे. पहील्यापासून मला जे काय आहे ते नि:संकोचपणे सांगणे, स्वतःला व्यक्त करणे हे सहज, सोपे, नैर्सगीक वाटते. विचार थांबवा म्हणजे काय? सर्व इंद्रीय व मेंदू शांत (फ्रिज) करणे कसे करायचे बुवा? म्हणजे बघा अगदी शांतपणे अंधार्‍या, शांत खोलीत बसलो व जर का कूठून तळण्याचा वास आला की यक्स कसला वास पासून वॉव! बटाटावडा हा विचार नाक व मेंदू करतात, मी तर शांत बसलोय ना आता. :-) तसेच वास आला व वासावरून विचार आला तर बिघडले काय? मी खाल्ला का बटाटावडा, का उठून चाललोय का इथून, का मी ओरडून माझ्या बाजूला जी व्यक्ती ध्यान करते आहे तिचे ध्यान मोडतोय का? आणी आता जर हा विचार काढून टाकायचा असेल तर कसा व कूठे टाकू? वाटते अलिकडच्या विचाराला, पलीकडचा विचार / प्रक्रीयाच बाजूला करते. पण मग ती साखळी सुरूच...डू नॉट डिर्स्टबचा बोर्ड कुठे बरे लावायचा की पुढे येणारे सर्व विचार येणार नाहीत? गाडी इथेच अडकली आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 10/17/2007 - 16:54 नवीन

हम्म

मस्त चर्चाप्रस्ताव. असाच एक विचार - लंच मीटींगमध्ये कुरकुरीत चिप्स आणून ठेवल्या असल्या आणि कोणी बोलत असताना कितीही वाटले तरी खाताना त्याची कुरकुर भारीच होईल म्हणून खाणे टाळते. असा प्रश्न कोणाला पडतो का? कारण लोक बिनदिक्कत खाताना दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रमोद देव Wed, 10/17/2007 - 09:07 नवीन

विचारांची साखळी!

अजिबात विचार करू नका! मन एकाग्र करा! असे सांगताना आपण बर्‍याच तज्ञ लोकांना ऐकतो.पण माझ्या मताप्रमाणे विचार हे पार्‍यासारखे असतात. हातातनं सारखे निसटत असतात. मी रात्री अंथरुणावर पडलो की पूर्वी लगेच झोप लागायची. पण हल्ली मात्र अंथरुणावर पडले की दिवसभर घडलेल्या घटना आठवायला लागतात आणि त्यातल्याच कुठल्या तरी घटनेतून गाडी पार फ्लॅशबॅक मध्ये जाते. ह्या काळात पूर्वायुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटना मग डोळ्यासमोर प्रत्यक्ष अवतरतात आणि मी त्यात गुरफटत जातो. आठवणीतून आठवणी बाहेर यायला लागतात आणि त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे झोप गायब होते. बर्‍याचदा रात्रभर मी ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत असतो पण झोप लागेल तर शप्पथ.उलटे आकडे मोजणे,श्वासावर लक्ष केंद्रित करणे,मेंढ्या मोजणे आणि वेळोवेळी असे असंख्य प्रकार करून पाहिले पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. आठवणींना जेव्हढे झुगारून द्यायचा प्रयत्न करतो तितक्या आक्रमकपणे त्या अंगावर चालून येतात. शेवटी त्याचा जो व्हायचा तो परिणाम होतोच. त्याचा त्रास मला जितका होतो तितका,किंबहुना त्याहून जास्त इथल्या महाजालावरच्या वाचकांना होतो. कारण.... माहितीच आहे तुम्हाला.... आठवणी..अमूक,तमूक. मी लिहीत सुटतो आणि त्याची शिक्षा मात्र तुम्हालाच होते. :D काय करावे नाईलाजास्तव वाचाव्या लागतात ना! कारण नाही म्हटले तरी 'सार्वजनिक काका' पडतो ना मी! उगीच मोठ्या माणसाला का दुखवा....खरे की नाही. आता इथे खरे खरे लिहायचे बरे का. "फादर सहज"रावांनी आपल्याला लायसन दिलेय कन्फेशन करण्यासाठी तेव्हा आता सगळ्यांनी सुटा... म्हणजे आपल्या मनातलं ओकून टाका. तेव्हा लोकहो ह्यातून आपली सर्वांची म्हणजे तुमची(हे महत्वाचे) आणि माझीही सुटका कशी करता येईल ह्या विचारत सद्या गढलो आहे... अरे पण हे काय.... पुन्हा आठवणी यायला लागल्या. आता माझा नाईलाज आहे हं! काय सुचतोय का उपाय??? :D आता ह्याचे उत्तर माहित असूनही तुम्ही ते दिले नाहीत तर तुमच्या डोक्याची.......... जाऊ दे पुढचे तुमचे पाठ आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 10/17/2007 - 10:24 नवीन

झोप नाही येत ?

सकाळी तास भर देव देव केले, दुपारी २-३ तास मिसळ्यांना पिडले, संध्याकाळी एक तास पायी फिरलात की मग असंभव बघा घरच्यांबरोबर, बघा लागते कि नाही झोप ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ध
ध्रुव Wed, 10/17/2007 - 18:41 नवीन

मग असंभव

मग असंभव बघा घरच्यांबरोबर, बघा लागते कि नाही झोप ती. नक्की लागेल झोप अश्याने :) ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
स्वाती दिनेश Wed, 10/17/2007 - 15:01 नवीन

जे नको

जे नको तेच का हवेसे वाटते? गोडाचा मोह मधुमेह्यालाच ! नाहीतर मग बटाटेवडे नाहीतर समोशाच्या वास नाकातून पाऽऽर मेंदूपर्यंत जाऊन मज्जातंतूना आदेश देणार आणि एखाद दोन खाल्ले तर काय होतं? करत खाणार! आपल्याला आवडणारे सगळे खमंग पदार्थ असे शत्रूपक्षात का बरं जातात? पद्मा गोळेंच्या कवितेतील एक ओळ आठवते- जे सुदूर,जे असाध्य तेथे मन लागे..
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 10/17/2007 - 15:46 नवीन

मस्त

चर्चा प्रस्ताव मस्त. खुप काही विचारिन म्हणतो पण आता सुचत नाहीये. तुमचं असं होतं का हो ? :) -- (प्रश्नांकित) लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 10/17/2007 - 15:52 नवीन

त्याहूनही पुढचं

एखादी गोष्ट आपण सोडून इतर सर्वांना कळते आणि आपल्या चेहर्‍यावरचं भलमोठ्ठ प्रश्नचिन्ह लपवायचा प्रयत्न आपण करतो. असं इतरांचंही होतं का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सहज Wed, 10/17/2007 - 15:55 नवीन

होतं होतं

मग जरा सोंग घेतल जात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/18/2007 - 08:28 नवीन

नेहमी!

बर्‍याच बाबतीत! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
स्वाती दिनेश Wed, 10/17/2007 - 15:57 नवीन

पण

पण कधीतरी वाटतं आपलं सोंगही दुसर्‍यांना कळत आहे की काय? मग मात्र पंचाईत होते. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/17/2007 - 16:05 नवीन

आमचंही तस्सच !

एखादी गोष्ट आपण सोडून इतर सर्वांना कळते आणि आपल्या चेहर्‍यावरचं भलमोठ्ठ प्रश्नचिन्ह लपवायचा प्रयत्न आपण करतो. असं इतरांचंही होतं का हो? आमचं तर नेहमीच तस्स होतं हो ! मिसळप्रेमी आणि उपक्रमींची जोरदार चर्चा सुरु असली की, आम्ही त्या चर्चेत भाग घेतला रे घेतला की ती चर्चा संपून जाते किंवा आमच्या प्रतिसादाकडे बावळट म्हणून पाहतात की काय अशा शंकेने आम्हाला सतत घेरलेलं असतं ! आमच्या प्रतिसादानंतर त्याला खालोखाल प्रतिसाद आला की शांतपणे झोप येते. नाही तर नुसता तळमळत असतो प्रमोदरावांसारखा :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Wed, 10/17/2007 - 16:38 नवीन

हो ना राव

मी बर्‍याच चर्चा अशा बघितल्या ज्या मी प्रतिसाद दिल्या की बंद होतात. की मी बंद झालेल्या चर्चांना प्रतिसाद देतो कोणास ठाऊक. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आवडाबाई Wed, 10/17/2007 - 22:34 नवीन

अपराधी भावना

एका हातात चुरगळलेल्या १०-१० च्या दोन नोटा घेऊन ती आजी माझ्या शेजारीच उभी होती, वय सत्तरीत. दुस-या हातात प्रिस्क्रिप्शन, घड्या पडलेलं, त्यावर दोन औषधांची नावं. त्या कागदाकडे बोट दाखवून गोळ्यांच्या किमती विचारत होती. त्यावर जितक्या गोळ्या लिहिलेल्या होत्या त्या घ्यायला तिच्याकडे पैसे कमी पडत होते, ती अनेक वेळा किमती विचारून त्या २० रुपयात किती गोळ्या बसतात ते पहात होती. अशा वेळेला तुम्हाला कसं वाटतं -- विशेषत: तुम्ही सव्वाशे रुपायांचा शॅम्पू आणायला गेलेले असता तेव्हा? त्या आजीसमोर एका बाटलीकरता इतके पैसे द्यायची हिम्मत होते? ही माझ्याबाबतीत आजच घडलेली गोष्ट ! माझी तरी हिम्मत नाही झाली तिच्यासमोर १०० च्या नोटा काढून द्यायची, एकदम रडू आल्यासारखं वाटायला लागलं, मी काहीतरी कारण सांगून दुकानातून निघून आले खरी पण पुढे काय? मी परत कधीच शॅम्पू विकत घेणार नाही? वापरायचा सोडून देईन? मी तीला पैशांची मदत करायला हवी होती? त्याने काय झाले असते? आणि तो तिचा अपमानच नाही का? आणि जरी मदत केली तरी मी अशी किती लोकांना मदत करू शकते? ह्या अपराधी भावनेचं उत्तर काय? की मला तसं वाटायची खरं तर गरज नाहिये? मी उगीचच जरा गंभीर वळण देतेय असं वाटलं तर सोडून द्या, पण आपण आपले मन मोकळे करून आपल्या मनाला "मोकळे" करू शकते का ते पाहतेय.
  • Log in or register to post comments
क
कांचन Wed, 10/17/2007 - 23:46 नवीन

अपराधी!

असं बर्‍याच वेळा वाटतं! मुलासाठी महागडे टी-शर्ट घेऊन आपण येत असतो. सिग्नलपाशी थांबल्यावर त्याच्याच वयाची फाटका, मळका, ढगळ फ्रॉक घातलेली छोटी मुलगी आपले उघडेनागडे भावंड कडेवर घेऊन कमालीच्या अजीजीने आपल्यापुढे हात पसरते तेंव्हा ही मला असंच वाटतं! कांचन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई
प
प्रियाली गुरुवार, 10/18/2007 - 00:22 नवीन

कम्युनिटी सर्विस

आवडाबाई आणि कांचन यांना वाटणारी अपराधी भावना कमी करायची असल्यास कम्युनिटी सर्विस हा एक उपाय आहे. भारतात आपल्या समाजाला मदत करून हातभार लावण्याकडे उच्च आणि प्रतिष्ठीत वर्गाचा कल खूप कमी दिसतो, त्यामानाने प्रत्येक अमेरिकन कुटुंबाला या ना त्या कारणाने समाजाला मदत करावी लागते. लहानसहान गोष्टीत आपल्याला जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत गेल्यास ही अपराधी भावना कमी होते असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/18/2007 - 04:49 नवीन

सही जवाब

>>लहानसहान गोष्टीत आपल्याला जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत गेल्यास ही अपराधी भावना कमी होते असा अनुभव आहे. आवडाबाई, कांचनजी आपला अनुभव बहूतेक इथल्या सर्वांना थोड्याफार फरकाने आला असणार. हे अपराधी वाटण आपल्या आर्थीक स्थीतीबरोबरच मनःस्थीती वर(व बहूतेक वयावर) अवलंबून असते. शाळा, कॉलेज, सुरवातीची नोकरीची वर्षे तेव्हा मला पण वाईट वाटायचे. तसेही आपण भारतीय खूप भावूक आहोत(निदान मला तरी तसे वाटते अजून कोणाला वाटते?). हेही तितकच खर की आपल्या मदतीच्या कुवतीपेक्षा जास्त गरीब जगात आहेत हे कळले. मग प्रियालीताई म्हणाल्या तस मी पण जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत असतो. म्हणजे कदाचीत Ad-hoc असा अर्थ होऊ शकतो. पण तसेच मला वाटते प्रत्येकाने आपल्याला जे मनापासून वाटते त्याप्रकारच्या एका चॅरीटीशी (लहान मुलांसंबधी, रुग्ण, सामाजीक उपक्रमाशी) कायमस्वरूपी जोडावे. गरीबांसाठी काही ठीकाणी सोयी उपलब्ध आहेत मला नेहमी कनिष्ठ मध्यमवर्गीयांबद्दल विशेष सहानुभूती वाटते. ही लोक कागदोपत्री गरीब नाहीत म्हणून काही सवलती उपलब्ध नाहीत तसेच स्वतः मी गरीब म्हणून फायदा घ्यायला जाणार नाहीत. मदत मागायची पण स्वाभीमानाची खोटी. आपण पण उगाच ह्यांचा स्वभीमान दुखवला जाईल ह्या कारणाने कचरतो. पण अश्यावेळी म्हणायचे हे लोन समजून घ्या, जमेल तसे परत करा असे सांगून मदत केली पाहीजे. ( टॅक्ट्फूली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 06:59 नवीन

'गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही!'

माझ्यापुढेही 'हे असे का होते?', 'ते तसे का होते?' या टाईपचे प्रश्न काही वेळा पडतात आणि शेवटी मी विचार करणेच सोडून देतो! च्यामारी, जे काय व्हायचं ते होऊ देत. आपला थोडाच कंट्रोल आहे प्रत्येक गोष्टीवर?! 'गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही!', 'आला क्षण शक्त तितक्या आनंदात जगायचा, मस्तमजेत जगायचा, साली पुढच्या क्षणाची काय ग्यारंटी?' हेच आमचं तत्त्व! तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 10/18/2007 - 08:31 नवीन

रस्त्यातले भिकारी

मी बसस्टॉपवरून घरी येतो तेव्हा हमखास एखादा भिकारी अडवून मला पैसे मागतो. मी बहुधा त्याची माफी मागतो आणि काहीच देत नाही. पण खूपदा असा विचार येतो. अशा वेषातल्या माणसाने दाखवला असता समजा चाकू किंवा पिस्तूल (ते खेळण्यातले आहे की नाही मी थोडेच परीक्षा करणार आहे!) तर मी त्याला पैशाचे पाकीटच दिलेच असते. इतकेच काय, अशा प्रसंगासाठी थोडेसेच पैसे आणि क्रेडिट कार्डच्या आकाराचे प्लॅस्टिकचे तुकडे असलेले एक पाकीट मी नेहमी बाळगतो. म्हणजे धाक दाखवून चोरी करणार्‍याच्या पात्रापात्रतेकडे मी दुर्लक्ष करतो. मग अहिंसक सालस भिकार्‍याला विचार न करता थोडे पैसे का नाही देत? मी पैसे न दिल्यामुळे तो भिकारी उद्योगधंदा करायला प्रवृत्त होणार नाही - पण जर त्याला कळले की चाकूपुढे मी पैसे टाकतो, तर कदाचीत धाक दाखवून चोरी करायला प्रवृत्त होईल का?
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/19/2007 - 20:22 नवीन

भिक आणि दान

हा अनुभव मला पण आला आहे. पण भिक देणे आणि दान करणे या दोन गोष्टी त्यातील शब्दार्थाप्रमाणेच वेगळ्या आहेत असे वाटते. त्याच कारणामुळे भिकार्‍यास भिक देणे नको वाटते पण बाकी कुठे काही मदत करता येत असेल तर अवश्य करावी असेही वाटते (आणि तसा शक्यतितका प्रयत्न करतो). दान हे पण आपल्या तत्वज्ञानारमाणे सत्पात्री द्यावे असे म्हणतात. त्यचा अर्थ बर्‍याच पद्धतीने लावू शकतो, पण तो वेगळाच विषय होईल. पण प्रत्येकानेच काहीतरी स्वतःबाहेर जाऊन मदत करायची (आर्थीक आणि थोडेसे का होईना वेळ/कष्ट या रूपात) वृत्ती ठेवणे महत्वाचे आणि आवश्यक वाटते. बाकी थोडे अवांतरः सुरवातीस येथे (अमेरिकेत) जेंव्हा आलो तेंव्हा असा एक सल्लादेण्यात आला होता की खिशात $१० तरी ठेवत जा. जर कोणी पकडले आणि तुझ्याकडे काहीच मिळाले नाही तर वैतागून पण बडवेल.. स्टूडंट असताना बॉस्टनच्या र्सत्यावर एकदा एक मूळचा सुदानमधील पण भिकारी (मला अरब समजूनः-)) अरेबीक मधे बोलू लागला. अर्थातच पैसे मागत होता पण तो काय बोलतोय ते समजत नव्हते. त्याला सांगीतले की मला अरेबीक येत नाही आणि मी अरब नाही. तर जरा निराश झाला आणि म्हणला की मग निदान पाकीस्तानी तरी आहेस का? म्हणले नाही भारतीय. मग (चढ्या आवाजात) तुझा धर्म कुठला आहे? ...पुढे काही त्रास दिला नाही पण टेन्षन नक्कीच आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/24/2007 - 12:17 नवीन

पडद्यामागचे वास्तव

१) भारतात उघडी नागडी लहान मुले कारुण्य निर्माण करतात. हेच त्यांच्या आई बापांच भांडवल असतं. त्यांच्याकडून पैसे गोळा झाले कि आईबाप त्याची दारु पितात किंवा गांजा ओढतात.( चक्षुर्वैसत्यम) २) ट्राफिक सिग्नल चित्रपट पाहिलात का? ३) यांची व्यवस्था लावण्यात शासन यंत्रणा कमी पडते. त्यांच्या नावावर काही शासकीय नोकर आपली व्यवस्था करुन घेतात. ४) हे लोक गुन्हेगारीचे "वाहक" म्हणून काम करतात. ५) लोकसत्ता वर्तमानपत्राने यावर वृत्तांत मालिका केली होती, ती अत्यंत वास्तववादी होती. साधारण दोन तीन वर्षांपुर्वी. ६) यात निरपराध बालकांचा बळी जातो ७) पुण्यात व्यंकटेश्वर हॅचरीज ही कंपनी बर्‍याचदा अन्नदानाचा कार्यक्रम बहुसंख्य वेळा करते. आठवड्यात एकदा तरी. यात पुढच्या टायमाला " अमुक " मेनु पाहिजे बरं का? अशी मागणि होते. ८) अनेक श्रीमंतांना एवढ्या विषम व्यवस्थेत आपल्या "श्रीमंती" बाबत अपराध गंड तयार होतो. तो घालवण्यासाठी ते असे वाटप करतात तेवढेच पुण्य. ९) करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्यावर काही लाखांची केलेली खैरात ही प्रतिष्ठा. मानसन्मान, लोकाभिमुखता, प्रसिद्धि, दानशुर अशी विशेषण लावुन जातात. नाही म्हणल तरी ती सुखद असतात. १०) चार चांगल्या गोष्टींचे भांडवल करुन दहा वाईट गोष्टी (निदान भारतात) झाकता येतात. ११) एक भिकारी चहा प्यायला पैसे मागत होता. मी त्याला म्हणले तू पेशल चा पी पैसे मी देतो. त्यावर तो नाही म्हणून पैसेच पाहिजेत असे म्हणू लागला. ( या सदृष अनुभव अनेक) १२) शनी अमावस्येला , शनीवारी, शनिपालट झाला असेल त्यावेळी शनी मंदिराजवळ भिकार्‍यांची रांग पहावी. काही दिले नाही तर शनी वाईट करील ही भीती. १३) शासनाने पुनर्वसन केले तरी शासकीय दराने मजुरी करण्यापेक्शा भीक मागून जास्त पैसे मिळतात म्हणून बहुसंख्य भिकारी कुकडी नदीच्या प्रकल्पावरुन परत मुंबईत पळून आले होते हे वास्तव आहे. आजही तयात बदल नाही १४) यांच्या जीवावर भारतातल्या एनजीओ मोठ्या होतात. एडसच्या एन्जीओंचे काय पेव फुटले होते. एडसने मरणार्‍यांपेक्शा एडसवर जगणार्‍यांची संख्या जास्त होती. अजून बरेच काही....... तरी देखील ही माणसेच आहेत हे विसरुन चालणार नाही. पण यात माणुसकीचा बळी जातो याचे वाईट वाटते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ग
गुंडोपंत Wed, 10/24/2007 - 12:26 नवीन

वा

एडसने मरणार्‍यांपेक्शा एडसवर जगणार्‍यांची संख्या जास्त होती. वा काय बोललात! बाकी सगळाच प्रतिसाद आवडला. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
क
कोलबेर Wed, 10/24/2007 - 12:55 नवीन

+१

नेमक्या शब्दात मुद्देसुद प्रतिसाद आवडला! सगळेच मुद्दे पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सहज Wed, 10/24/2007 - 13:14 नवीन

हे सगळं खर, अजूनही कारणमीमांसा करता येईल

त्यातल्या त्यात आपण सगळे इथे हे वाचणारे करू शकू का, बघा १३) शासनाने पुनर्वसन केले तरी शासकीय दराने मजुरी करण्यापेक्शा भीक मागून जास्त पैसे मिळतात म्हणून बहुसंख्य भिकारी कुकडी नदीच्या प्रकल्पावरुन परत मुंबईत पळून आले होते हे वास्तव आहे. आजही तयात बदल नाही नाही म्हणजे नाही पैसे द्यायचे. अन्न किंवा वस्त्र देतो. पाहीजे तर घ्या नाहीतर जाऊ द्या.... जर सगळ्यांनीच, सर्व म्हणजे आख्या देशाने नाहीतर एका भागातून भिकारी दुसर्‍या भागात स्थलांतरीत होतील. हे केलं तर १००% खात्री आहे की एक मोठा परिणाम होइलच. कदाचित सुरवातीला भीकारी एग्रेसिव्ह होतील, भुरटी, संघटित चोरी वाढेल, काही दुबळे भिकारी आजारी पडतील, मरतील पण बहूदा अन्न, वस्त्र घेणार्‍यातले तेच पहीले असतील. कदाचीत नाही रे वर्ग मोठा हिंसक बनेल. पण म्हणून सर्व उपाययोजना तयार झाली की मगच असा प्रयत्न करायला हरकत नसावीत. सेवा संस्थानी अन्न छत्र सुरू करावीत, एन जी ओ नी मग भिकारी सर्वेक्षण, पुनर्वसन, वेगवेगळ्या राज्यांनी एकत्र येऊन काही योजना.. सगळ्या समाजाचे, संस्थांचे, सरकारचे सहकार्य लागणार पण हे काम केले गेलेच पाहीजे. निदान २०२० सालानंतर एक नवीन भिकारी तरी जन्माला आला नाही पाहीजे. हे एक मोठे प्रोजेक्ट आहे, अजिबात सोपे नाही पण हे सगळे केल्याशिवाय आपण दरडोई उत्पन्नात महाशक्ती जरूर होऊ, प्रगत, सुसंस्कृत समाज नक्कीच नाही. तसेच हे सगळ दिव्य करायची समाजाची पर्यायाने सरकारची इच्छाशक्ती आहे का? का आपण आपल्या जगात सुखी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ज
जुना अभिजित गुरुवार, 10/18/2007 - 10:25 नवीन

हेही

हेही तितकच खर की आपल्या मदतीच्या कुवतीपेक्षा जास्त गरीब जगात आहेत हे कळले. हे अगदी बरोबर आहे. मग अशावेळी आपण किती जणांना पुरणार हाही प्रश्न आहे. पण तात्पुरता तो बाजूला ठेवू. बस्स्टॉप किंवा सिग्नल तरी ठीक आहे पण रेल्वेमध्ये इतके भिकारी येतात अशावेळी तुम्ही कोणाला पैसे द्यायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही धडधाकट लोक सुद्धा भीक मागत असतात. माझ्यापुरतं मी ठरवलं आहे की कमीत कमी काही तरी काम करून पैसे मागणार्‍याला पैसे द्यायचे. म्हणजे रेल्वेत बूटपॉलिश करणारा आला की आपल्या नसलं करायच तरी एकदा पॉलिश करून घ्यायच. किंवा झाडू मारणारा असतो त्याला द्यायचे. हिजडे आणि देवीबिवीच्या नावावर निव्वळ भीक मागणार्‍यांना काही द्यायच नाही. कोणी चहासाठी पैसे मागत असेल तर डायरेक्ट चहा द्यायचा. अन्न द्यायच. नाहीतर बरेच भिकारी व्यसनी असल्यामुळे गांजा बीडी दारू मध्ये पैसे घालवतात. लहानसहान गोष्टीत आपल्याला जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत गेल्यास ही अपराधी भावना कमी होते असा अनुभव आहे. अगदी बरोबर लहान मुले, वृद्ध आणि अपंग लोकांना भीक मागावी लागते हे त्यांच केवळ दुर्दैव आहे. पण अशा लोकांना मदत करण्यासाठी एकट्यापेक्षा संस्थांची गरज असते. प्रत्यक्ष शक्य नसेल तर संस्थेला पैशाच्या स्वरूपात मदत करायला हरकत नाही. इकडे तिकडे आपण बराच खर्च करत असतो. एकदा जरी चमचमीत जेवणाची इच्छा मारली तरी १०० रुपये वाचतात. भिकार्‍यांबद्दल अगदीच हळहळ वाटत असेल तर हा उपाय सोपा आहे. अभिजित
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 10/21/2007 - 18:33 नवीन

सण तेव्हा व आता

लहानपणी दिवाळी म्हणजे सुट्या, फटाके, फराळाचे पदार्थ, नवीन कपडे, सकाळी लवकर उठून उटणे / "मोती" साबण लावून आंघोळ मग बाहेर जाऊन फटाके उडवणे. दसरा - आदल्या दिवशीच घर साफसफाई करणे. मग दाराला झेंडूचा हार करून ठेवणे. संध्याकाळी आपट्याची पाने जाऊन शेजारीपाजरी वाटून यायची. गुढीपाडवा म्हणजे पाटीपूजन, सायकल / गाडी धूणे, झेंडूच्या फूलाचा हार घालणे. सकाळी बाबा गुढी उभारायचे, संध्याकाळी काढली की ती गाठी खायची. :-) बरेच नातेवाईक भेटायचे, मस्त जेवण, त्यानंतर पान खाणे, पत्ते खेळणे, एखादी डूलकी काढणे, व्हीडीओ कॅसेट आणून एखादा सिनेमा बघणे. प्रत्येक सणाला ती नेहमीची गाणी रेडिओ, टी.व्ही वर लागायची, सिनेमे लागायचे. १५ ऑगस्ट ला मनोजकूमार चे गाणे, नंतर (सुभाष घईचा) कर्मा सिनेमा व त्यातील गाणी नाही दाखवले गेले असे दूरदर्शनच्या जमान्यात तरी घडल्याचे स्मरत नाही. श्रावणातले काही दिवस, गणेशोत्सव, नवरात्र, गोपाळकाला, रामनवमीला सुंठवडा, हनुमान जयंतीला मारूतीला तेल, शिवरात्रीला उपासाचा स्पेशल मेन्यू, शंकराच्या देवळात, इ. इ. अगदी जानेवारीतील भोगी, संक्रांत पासून पार नाताळपर्यंत काही ना काही असायचेच. वडलांच्या मुस्लीम मित्रांकडून शिरखुर्मा, ख्रिश्चन मित्राकडून फ्रूटकेक घेताना त्यांना चाचा इदमुबारक, अंकल मेरी क्रिसमस म्हणायला खूप आवडायचे. आत इथे परदेशात नाही म्हणायला आदल्या रात्रीपासून काही मित्रांचे न चूकता काव्यात्मक SMS येतात. काहीवेळा अरेच्चा बघू कालनिर्णय उद्या आहे का दसरा असे होते. फार तर एखादे गोड आणले /केले जाते पण तेवढेच... बर्‍याच गोष्टी आई-बाबा बोनस मिळाले की सर्वांसाठी न चूकता आणायचे. आता घरात कशाचीही कमी नाही. खूपच सामान आहे आपल्याकडे जरा स्टोअर रूम आवरली पाहीजे असे म्हणतो पण चांगले डिल दिसले, खरेदीचा मूड असला नवीन खरेदीही न चुकता होतच असते. एखादा सण आठवड्याच्या दिवसात आला की त्याची दखल घेतलीच जात नाही. सकाळी उठून आवरून कामाला ते रात्री हुश्श्य घरी. नेहमीच विकएन्ड्ची वाट पहाणे. आता सण हा प्रकार फक्त जेवण व खरेदी इतकाच का होऊन राहीला आहे? काय झाले आहे? सणाचे काही विशेष का वाटत नाही, (आई अचानक गेल्यापासून तर नाहीच)? विरक्ती का आळशीपणा आला आहे? संस्कृती सोडली म्हणायची तर कचेरी आणी घर एवढ्यात अडकून बसलोय, कूठे काय संस्कृती बूडवत बसलो असतो. महाराष्ट्र्मंडळात पण सगळेच सण काही साजरे होत नाहीत. कोणाला कधी असे काहीसे वाटले आहे का? हे इथे येणे, मराठीत लिहणे, तुमच्याशी गप्पा मारणे हे म्हणजे जरा परत गतकालात जाणे, आपल्या संस्कृतीचा परत थोडासा भाग होण्याची धडपड आहे का?
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 10/21/2007 - 20:07 नवीन

विषयांतर

विषयांतर होऊ शकेल कदाचित परंतु तुम्ही म्हणता, तसे मलाही वाटते. पण माझ्या मुंबई-पुण्यांत असलेल्या काही मित्रांशी बोललो असताना, त्यांनाही एकंदरीतच सणांविषयी उत्सुकता, उत्साह कमी झाला आहे असं म्हणाले. आता हा वाढत्या वयाचा भाग आहे की पूर्वी ९ ते ५ असणारं काम आता ९ ते ९ किंवा अजून उशीरा झालंय -- सांगता येत नाही. पूर्वी खरेदी फक्त सणासुदीलाच व्हायची. कपडे असोत वा सोने/दागिने. आता तसं काही राहिलेलं नाही. करंजी खायची असेल तर दिवाळीपर्यंत थांबायची काहीच गरज नाही. मार्चमधेही कुठल्याही दुकानात मिळू शकते. त्यामुळे तसाही सणांचा एक्स्क्लुजिव्हनेस कमी झाला आहे. बदलत्या ऋतुचक्रामुळे दिवाळीत थंडी पडायच्या ऐवजी उकडतं. त्यामुळे अभ्यंगस्नानही तितकं हवंहवंसं वाटत नाही. अर्थात हा एक छोटासा बदलत्या काळाचा परिणाम झाला. थोडक्यात, याला आळस - विरक्ती - बदलता काळ - वाढतं वय - अधिक पैसा - कामाचे वाढते तास/ताण - परदेशी राहणे वगैरे एकच एक कारण नसावे. सगळ्याचा एकत्रित परिणाम असावा. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
द
देवदत्त Sun, 10/21/2007 - 20:57 नवीन

सहमत...

आपल्या मताशी पूर्णतः सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/22/2007 - 09:08 नवीन

येथे

येथे दिल्लीला तर हाच हाल आहे, कधी दसरा गेला व कधी दिवाळी आली ते कळालेच नाही. मागील काही वर्षामध्ये तर एकदम मनसोक्त दिवाळी साजरी केलेली आठवतच नाही आहे.... कुठे तरी घरातून, मित्रांच्या कडुन विचारना चालू झाली की दिवाळीला येणार की नाही... मग लक्षात येते की दिवाळी आली. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रकाश घाटपांडे Sat, 10/27/2007 - 09:28 नवीन

सहमत

थोडक्यात, याला आळस - विरक्ती - बदलता काळ - वाढतं वय - अधिक पैसा - कामाचे वाढते तास/ताण - परदेशी राहणे वगैरे एकच एक कारण नसावे. सगळ्याचा एकत्रित परिणाम असावा. एकिकडे व्यक्तिमत्व बहुआयामी तर दुसरीकडे कारणे बहुहरामी. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ग
गुंडोपंत Mon, 10/22/2007 - 09:32 नवीन

छ्या

"मोती" साबण लावून आंघोळ मग बाहेर जाऊन फटाके उडवणे. छ्या!!! फार नोस्ताल्जिक करून टाकले बॉ तुम्ही आम्हाला! मला तर आता साबणाचा वासही येतोय! हल्ली काही मजा राहिली नाही हे मात्र खरंय हो. सहज राव फार छान लिहिता हो तुम्ही! वाचायला छान वाटले. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/22/2007 - 22:16 नवीन

मैसूर सँडल

आमच्या मित्रांत दोन गट होते. एक दिवाळीत मोती साबणाने अंघोळ करणारे, आणि दुसरे मैसूर सँडल ने . (आम्ही दुसर्‍या गटात.) आजही दुकानात मोती घेत नाही, मैसूरच घेतो. पण रोजच्या अंघोळीसाठी हे वापरणे जिवावर येते. संस्कार म्हणजे दुसरे काय, हेच ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
ब
बेसनलाडू Tue, 10/23/2007 - 01:44 नवीन

+१

आमच्या मित्रांत दोन गट होते. एक दिवाळीत मोती साबणाने अंघोळ करणारे, आणि दुसरे मैसूर सँडल ने . (आम्ही दुसर्‍या गटात.) - आणि आम्ही दलबदलू ;) (अपक्ष)बेसनलाडू पण रोजच्या अंघोळीसाठी हे वापरणे जिवावर येते. संस्कार म्हणजे दुसरे काय, हेच ! - +१. रोजच्या वापरासाठी हमाम किंवा चंद्रिका ;) (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/24/2007 - 01:30 नवीन

लाईफबॉय

+१. रोजच्या वापरासाठी हमाम किंवा चंद्रिका ;) रोजच्या वापरासाठी लाईफबॉय (तंदुरुस्ती है वहां) किंवा कधी कधी लक्स (सौंदर्य साबुन) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
प्राजु Wed, 10/24/2007 - 02:26 नवीन

वेगळा अनुभव..

मी कॉलेजमध्ये असताना , आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एका दुकाना समोर उभे होतो. अचानक मला माझ्या आईने एक वस्तू आणायला सांगितल्याचे आठवले. सगळ्यांना 'आलेच मी' असे सांगून, मी तरातरा एकदम त्या दुकानाकडे निघाले. अचानक माझ्या ओढणीला हिसका बसला आणि ओढणी ओढली गेली. माझ्याही नकळत माझ्या तोंडून बारिकशी किंचाळी बाहेर पडली. मी वळले आणि पाहिलं तर हाताला पोलिओ झालेल्या माणसाच्या बोटांमध्ये माझ्या ओढणीच्या रेशमी झिरमिळ्या अडकल्या होत्या.. .. पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता. माझी ती बरिकशी किंचाळीही माझ्या ग्रुपमधल्या मुलांना ऐकू गेली होती . 'तो ' त्यांना पाठमोरा असल्यामुळे त्याची अवस्था त्या मुलांना नाही दिसली. आणि मला कोणीतरी छेडले असे समजून त्यांनी पळत येऊन त्याच्या पाठीवर जोरात लाथ मारली..... मी ओरडले "थांबा".. पण सुरूवातीचाच त्यांचा प्रहार इतका जोरात होता की तो मनुष्य खाली रस्त्यावर पडला.... नंतर त्या मुलांनी त्याला उठवून बाजूला घेतले. थोडे खरचटले होते त्यावर मलमपट्टी केली.... आणि काही रूपये देऊन जाऊ दिले. हे सगळे जरी खरे असले तरी ही बोच कायमची मनाला लागून राहिली. चूक नक्कि कोणाची.. मी किंचाळले म्हणून माझी? की माझी किंचाळी ऐकून माझ्या मदतीला धावून आलेल्या त्या माझ्या ग्रुपमधल्या मुलांची की 'त्या'च्या अपंगपणाची? की नियतीची...? आज ही गोष्ट इथे लिहिल्यामुळे थोडं का होईना पण मन हलकं झालं. धन्यवाद सहजराव. प्राजु.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 10/24/2007 - 02:45 नवीन

चूक..

..कसलीही शहानिशा न करता किंवा कसलाही जाब न विचारता हाता पायीवर येणार्‍या वॄत्तीची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सहज Wed, 10/24/2007 - 07:51 नवीन

+१

+१ ह्या निमीत्ताने म्हणावेसे वाटते की ह्या ओढणीचा (फार तर उन्हात डोक्यावर घेण्याशिवाय) उपयोग असण्यापेक्षा तोटेच मला दिसतात. किती वेळा कोणा न कोणा स्त्रीची ओढणी कधी रस्ता, विशेषता जिना उतरताना पायरी झाडत असतात, सरकता जिना व दुचाकीच्या चाकाशी कानगोष्टी करायला त्या ओढण्याना प्रचंड आवड आहे की काय असे वाटते. जिवाशी किंवा विषाणूंशी सतत खेळ :-) जर ओढणी सांभाळणे इतके अवघड असेल पण तितकेच गरजेचे(?? ) तर जरा लहान लांबीची का नाही करता येत? आपल्याकडे डोक न वापरता वर्षानूवर्षे तेच स्टाइलचे कपडे बनवायची/वापरायची पद्धत, जसे सलवार (पुरषांची किंवा बायकांची) बापरे त्याची कंबर इतकी का मोठी असावी? एकाही डिझायनरला असे का वाटू नये की ही सलवार घालणार्‍या प्रत्येक स्त्री/ पुरुषाची कंबर, पोट ६० इन्च असेलच/होईलच असे नाही. बाळाची लंगोट काय ते पातळ फडकं! ते लंगोट, दुपटे, चादर सगळेच खराब होणार, जरा शू झाली की सगळेच बदला. आता जर लंगोट डिझाईन बदलले असेल तर कल्पना नाही पण जरा डोक वापरून तान्हा बाळाचे कापडी लंगोट असे करता येतात की शू-शी झाली तरी बाकीचे काही खराब होणार नाही. लंगोटात कापडाची बचत, व सलवार, ओढणी मधे वाया...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/24/2007 - 11:16 नवीन

हे जास्त मह्त्वाचे

आज ही गोष्ट इथे लिहिल्यामुळे थोडं का होईना पण मन हलकं झालं. हलक होण अधिक प्रामाणिकं. चुक समजल्यावर ती सुधारण्याचा प्रयत्न करन हे देखील प्रामाणीक. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Wed, 10/24/2007 - 03:02 नवीन

असेल..

असेलही कदाचित....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/24/2007 - 08:28 नवीन

अच्छा...!

मला वाटलं इथे मनातलं फक्त सांगून मन हलकं करायचं...... या एका गोष्टिवरून ओढणी आणि लंगोट यावरही चर्चा करायची आहे.. हे नव्हतं माहीती... आपण करू शकता चर्चा.... या चर्चेमध्ये मला रस नाही. - प्राजु.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/24/2007 - 11:33 नवीन

चर्चेतील रस

आपण करू शकता चर्चा.... या चर्चेमध्ये मला रस नाही. हे वरकरणी वाटणार विषयांतर नव्या विषयाला जन्म घालत. उदा. "ओढणी असून अडचण नसून खोळंबा" ओढणी मुळे होणारे अपघात.( मानसिक नव्हे शारिरिक) एक दुपट्टा दो दो मवाली ......सारखी गाणी दुपट्टा ते दांडपट्टा दुपट्टा शब्दाशी संबंधीत अंताक्शरी मन हलक करण्यासाठी थोड मन घट्ट कराव देखील लागत. काय प्राजू ताई अवांतर- ( ताई म्हणल तर राग येतो का? तसं असेल तर फक्त प्राजू. पण तसं म्हणलं तरी फार लाडिक लाड्कि वाटत बुवा) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ज
जुना अभिजित Wed, 10/24/2007 - 13:39 नवीन

असंच झालं होतं एकदा

प्राजू यांनी सहज यांच बोलणं सहज घेतलेलं दिसत नाही. मुळात तो एक दुसरा विषय आहे त्याला तुमच्या गोष्टीवरची प्रतिक्रिया समजू नका. असंच एकदा इयत्ता चौथीत असताना मी आमच्या वर्गात घुसु पाहणार्‍या खालच्या वर्गातील मुलाला दरवाजातच अडवून बाहेर ढकललं होत. पण तो हेलपाटला आणि पडला कारण त्याला पोलिओ झाला होता. तो कसाबसा त्याच्या वर्गात गेला. मग आमच्या वर्गशिक्षकांपर्यंत तक्रार आली. त्यांनी सर्वांसमोर काड काड अशा दोन कानाखाली लावल्या. कानात सन् आवाज निघत होता. अजूनही तो मुलगा तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो आणि मी खजील होतो. त्याला तेव्हा माफ कर म्हणायची अक्कल नव्हती पण आता परत कधी भेटला तर मात्र नक्की बोलेन त्याच्याशी. अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा