Skip to main content

जय गणराज

लेखक ashvinibapat यांनी सोमवार, 07/02/2011 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज माघ चतुर्थी, श्री गणेशाचा जन्मदिवस. त्यानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पुणे नासिक महामार्गावरील मंचर पासून अवघ्या २.५ कि.मी. अंतरावर असणारे आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग हे गाव निसर्गसंपन्न डोंगररांगांच्या कुशीत वसले आहे. लेण्याद्रि गिरिजात्मजाचे हे मुख असुन अर्धपीठ म्हणून हि याचा उल्लेख आहे , सदर देवस्थान करिता थोरले बाजीराव पेशवे यांनी दर साल एक रुपया ची सनद दिली होती ,तीच सनद इंग्रजांच्या काळात देखील चालू असल्याचे कागदोपत्री दिसून येते.सदर मंदिराच्या समोरच उत्तरेला लेण्याद्री च्या गिरीजात्मजाची पाठ असून दोन्ही मंदिरांची उंची सारखीच आहे.एका छोट्याशा बंधाऱ्या च्या काठावर हे गणेश मंदिर आहे. बंधाऱ्या तील हिरवेगार चकाकणारे पाणी, भव्य आकार, भोवतालचा रमणीय परिसर व सह्याद्री पर्वताची पार्श्‍वभूमी हे सारे पाहून मन प्रसन्न, आनंदी होते.या उत्सवाच्या काळात हजारो गणेशभक्त श्री मोरयाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावतात.देवस्थानच्या वतीने प्रवचन, कीर्तनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम,भजनाच्या गजरात श्रींची सवाद्य मिरवणूक,महानैवेद्य व्यवस्था केलेली असते. वर उल्लेखलेली सनद मोडी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये तेथे फलकावर लावली आहे. असे म्हणतात कि याच्या दर्शना शिवाय अष्टविनायक यात्रा अपूर्णच रहाते, तेव्हा मिपा वरील गणेश भक्तां साठी हि माहिती , श्री गणेशाला आणि सर्व गणेश भक्तांना विनम्र अभिवादन.
लेखनविषय:

वाचने 12563
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

फोटु छाण आहेत ... वरुन तिसरा ,पाचवा आणि खालुन सदोतिसावा फोटु आवडला. झकास. -(कलादलन प्रेमी) कोडॅकटारझन

फोटो न टाकता दिसायला सगळेच काही टारझन नसतात नाही का ? असो परत गेल्यावर फोटो नक्की टाकील , तो पर्यंत मटा ची कृपा पहा ..,.. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowpics/msid-7440194.cms आणि बोला गणपती बाप्पा मोरया

वडगांव काशिंबेग हे महाराष्ट्राचे थोर समाजसेवक श्री. अरूण गवळी यांची सासुरवाडी असल्याचीही माहिती मिपावरील गणेशभक्तांना द्यावीशी वाटते. अरूण गवळीला, श्री गणेशाला आणि सर्व गणेश भक्तांना विनम्र अभिवादन.

In reply to by आजानुकर्ण

पण आपली गल्लत होते आहे. वडगांव काशिंबेग हे महाराष्ट्राचे थोर समाजसेवक श्री. अरूण गवळी यांची सासुरवाडी असल्याचीही माहिती मिपावरील गणेशभक्तांना द्यावीशी वाटते 'डॅडीं'ची सासुरवाडी वडगांव काशिंबेग नसून वडगाव पीर आहे. तेथील मुजावर नामक घराण्यातील कन्यकेशी त्यांनी विवाह केला आहे. हे गाव आंबेगाव तालुक्यातीलच आहे. पण अगदी विरुद्ध बाजूला.मंचरपासून ३० कि.मी.अंतरावर शिरूर -आंबेगाव तालुक्यांच्या हद्दीवर हे पवित्रस्थळआहे. आपल्या या कृतीतून आदरणीय डॅडीजींनी आपणा सर्वांना सर्वधर्मसमभावाचे एक अतिशय ज्वलंत असे अनुकरणीय असे उदाहरण घालून दिले आहे.अजूनही बर्‍याच अनुकरणीय गोष्टी आ. डॅडीजी करत असतात. सगळ्यांना त्यांचे अनुकरण करण्याची सुबुध्दी दे हेच विघ्नहर्त्या गणरायाला साकडं.

गजाननाचा जयजयकार. अवांतरः लेण्याद्रीची लेणी ही हीनयानपंथीय बौद्ध लेणी आहेत. तिकडे गणपतीबाप्पा कसे विराजमान झाले ब्वॉ? जाणकारांकडून मार्गदर्शन अपेक्षित.

In reply to by प्रचेतस

एकूण इतिहास पाहीला तर असे वाटते की पूर्वी वैदिक धर्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात असावा. त्यातील कर्मकांड , यज्ञ, पशुबळी हे मान्य नसणार्‍यांनी बौद्धमत मोठ्याप्रमाणात अनुसरले असावे. म्हणून भारतभरात सर्वत्र बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्यानुसार अनेक बौद्ध मठ स्तूप स्थापन झाले. त्यानंतर जस जसे बौद्धमत लोकांना अनुसरावे असे वाटेनासे झाले तेव्हा तो वर्ग जैन धर्माकडे वळला असेल. म्हणून महाराष्ट्रातही अनेक ठीकाणी मोठ्या प्रमाणात अनेक मंदिरांच्या बाहेर जैन शैलीतली शिल्पे दिसतात. कोकणात अनेक ठीकाणी मंदिरांच्या बाहेर जे देवाचे दगड म्हणून ठेवलेले दिसतात त्यात जैन तिर्थंकरासदृश शिल्पे दिसतात. मग त्यालाही कंटाळून लोक जेव्हा जैनमतानुसरण करणे बंद करून आताच्या प्राप्त परिस्थितीत दिसणार्‍या धर्मात परतले तेव्हा त्या त्या सगळ्या ठीकाणी त्या ठीकाणच्या लोकांची दैवते स्थानापन्न झाली आणि जुन्या मताचे देव देवाचे दगड म्हणून मंदिराबाहेर येऊन बसले. लेण्याद्रिलाही तसेच झाले असेल नक्की. पंढरपूरचा विठोबाचे देऊळ देखील आधी बौद्धमंदिर असल्याचे कुठेतरी वाचले आहे. मग त्यात सध्याच्या पांडुरंगाची स्थापना झाली. लक्षात घेण्यासारख्या गोष्टी अशा की, १. वैदिक - बौद्ध - जैन - वैदिक हा जो मंदिरांचा प्रवास झाला त्यात कुठेही मंदिराची तोडफोड झालेली दिसत नाही. २. जरी पूर्वीच्या मताचा देव अमान्य करून नवीन मताच्या लोकांनी त्यांचा देव देवळात बसवला असला तरी पूर्वीच्या देवाचा अनादर केल्याचे दिसत नाही. म्हणून अजूनही तीर्थंकर सदृश मूर्ती देवळांबाहेर दिसतात. गुरव वगैरे लोक देवाचे दगड म्हणून त्यावरही फूल पाणी वहात असतत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सातवाहनांच्या काळात महाराष्ट्रात बहुसंख्य लेणी निर्माण झाली. एकतर बौद्ध धर्माचा प्रसार व दुसरे व्यापारी लोकांचे आश्रयस्थान म्हणून. बरीचशी लेणी ही कोकणातून घाटावर यायच्या व पुढे घाटावरील तत्कालीन महत्वाच्या शहरांना जोडणार्‍या प्राचीन वहिवाटीच्या मार्गांवरच आहेत. सातवाहनांनी जरी बौद्ध धर्माला उदार आश्रय दिला असला तरी ते हिंदू राजेच होते. नंतर मात्र बौद्ध, जैन धर्माच्या प्रसारानंतर हिंदू धर्माचे पुनरुत्थान करण्यासाठी शंकराचार्यांच्या काळात राम, कृष्ण यांना दैवी स्वरूप प्राप्त झाले. अहिंसेला महत्व प्राप्त झाले. तसेच बौद्ध लेण्यांच्या बरोबरीने इतर लेणीही खोदली गेली. वेरूळचे लेणे यातील सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरावे. घारापुरीही आहेच. लेण्याद्रीप्रमाणेच पुण्याजवळील घोरावडेश्वर ही पण हिनयानपंथीय बौद्ध लेणीच. पण यातही शिवशंभू विराजमान झालेत. या लेण्यात पिंडीवरील मूळची हर्मिकेची चौकट स्पष्ट दिसते. अर्थात लेण्यातील कुठल्याशी स्थित्यंतरात मुळची लेणी उद्धस्त केल्याच्या खुणा नाहीत. याबाबतीत पुपेंशी सहमतच. पंढरपूरचे मंदिर १३ व्या शतकातले इतके माहीत आहे. पण विठोबा मात्र विजयनगरातून आलेला असावा असे मानतात.

In reply to by प्रचेतस

>>>>हिंदू धर्माचे पुनरुत्थान करण्यासाठी शंकराचार्यांच्या काळात राम, कृष्ण यांना दैवी स्वरूप प्राप्त झाले. किंचित अल्पमतीनुसार सुधारणा. बौध्दमताचा पराभव करणार्‍या मीमांसकांचे ईश्वर नाही असे मानणारे मत खोडून काढणे आणि अद्वैत मताचे मायावाद मत मांडणे, सूर्य, देवी, शिव, विष्णु, विनायक, इत्यादी मतांनुसार सगुण पूजा करणार्‍यांनापंचायतन रुपी उपासना पद्धती मान्य करायला लावणे हे काम आद्य शंकराचार्यांनी केली. राम कृष्ण यांना देव स्वरुप पुराण काळापासुन (इस पू २रे शतक ते ८ वे शतक) मानले जातच होते ते पक्के करण्याचे काम दोन शतकानंतर झालेल्या रामानुजांनी केले आहे. त्यांनी शंकराचार्यांच्या मायावादातील काही मुद्द्यांवर आक्षेप घेतले आहेत. त्यानंतर झालेल्या वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभु, रामदास स्वामी इत्यादी संतांना राम, कृष्ण यांचे माहात्म भक्ती मार्ग वाढवला.

In reply to by अवलिया

धन्यवाद नानासाहेब. आदी शंकराचार्यांबद्दल व रामानुजांबद्दल अधिक जाणून घेण्यास आवडेल. पण धागा अवांतर तर होणार नाही ना?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तिरुपती बालाजी चे मंदिर देखील जैन मंदिर होते आणि देव देखील, अस ऐकून आहे. यावर प्रकाश टाकाल का ?

या विषयावर शरद अधिक अधिकारवाणीने बोलु शकतील असे वाटतेय....किंवा अवलिया... नवीन लेख आला तर माहीती मिळेल... तरी शरद्,अवलिया ,पुपे...किंवा ईतर जाणकार कोणीतरी जबाब्दारी घेउन हा विडा उचलावा ही विनंती...

In reply to by डावखुरा

आम्हाला जाणकार म्हटल्यामुळे अंबळ गहिवरून आले. असो. आम्ही जाणकार वगैरे काही नाही. ते सगळे तो नान्या वगैरे आहेत. नान्या लिही रे लेख एखादा यावर.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अहो माझ्या मिपावरील आजवरच्या वास्तव्यात जाणवलेलं मी लिहिले..... आम्ही जाणकार वगैरे काही नाही. असे म्हणण्यास तुमच्यातील मोठेपण कारणीभुत आहे....

In reply to by डावखुरा

या विषयावर शरद अधिक अधिकारवाणीने बोलु शकतील असे वाटतेय सहमत आहे. त्यांना विनंती करतो याविषयाला सुद्धा त्यांनी त्यांच्या देवळांच्या लेखमालेत स्पर्ष करावा !

माहिती छान दिली आहे, मला हे काही माहित नव्हते .. अगदी कालच अष्टविनायक करुन आलो , हे माहित असते तर एक चक्कर मारली असती तिकडे पण .. वेळ मिळाला होता म्हणुन भिमाशंकर ला जाउन आलो मग..

वर्षाच्या २४ चतुर्थीना गजाननाचे २४ अवतार झालेले आहेत असे मानतात. त्यामधील २ मुख्य. भाद्रपदाती शुद्ध चतुर्थी हि शंकर-पार्वती पुत्र गजाननाची तर आजची माघ शुद्ध चतुर्थी हि अदिती-कश्यप पुत्र विनायकाची.. बोला गणपती बाप्पा मोरया..........