Skip to main content

वर्गलढा एक कविकल्पना

लेखक स्वामीयोगेश यांनी बुधवार, 19/01/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
१) साम्यवादी आणि समाजवादी विचारसरणी वर्ग लढ्यावर आधारित आहे. त्या अनुसार समाजात २ वर्ग आहेत, १ आहे रे आणि दुसरे नाही रे. आहे रे नाही रेंचे शोषण करून श्रीमंत होत असतो आणि या दोन वर्गांचा लढा सामाजिक आणि राजकीय क्रांती च्या रूपाने उभा करून समाजात समानता आणणे हे यांचे उद्देश्य आहे / होते. २) पण प्रत्यक्षात पूर्वेत आणि पश्चिमेत दोन्ही कडील देशात जर अभिजात साहित्य वाचले तर असे दिसून येते की २ राजांमधेय्च लढाया झाल्या आहेत. गेल्या १०० वर्षांतील काव्य नाट्य, साहित्य कृतींमध्येच फक्त वर्ग लढा इ वाचावयास मिळते आहे. आजही टाटा बिर्लाशी लढतो आहे, अंबानी त्यांनाच समकक्ष अश्या स्पर्धकांशी लढतो आहे. आहेरे आणि नाहीरे तर मिळून मिसळून एकत्र उद्योग, समाज इ चालवीत आहेत. ३) मुळात हे दोन वर्ग समाज रथाचे २ चाके आहेत. त्या दोन चाकांमध्ये अंतर आहे त्या अंतरामध्येच तर समाजाचा रथ चालू आहे, जर हे दोन्ही चाके एकत्र आली तर समाज रथ कोसळून पडेल. वर्ष २००८-०९ मध्ये खुपा भयंकर अश्या आर्थिक आपत्ती आल्या होत्या. आजही आहेरे वर्ग त्यातून पुरेसा सावरला देखिल नाही. पण तरीही गेल्या ३ महिन्या पासून सगळी कडून करोडो डॉलर्स च्या देणग्या जाहीर होत आहे असे दिसते आहे. ४) चीन व रशिया हे दोघेही साम्यवादी देश गेली २० वर्षांपासून आप आपल्या देशात दूरगामी व मूलभूत असे परिवर्तन करून केव्हाच मोकळे झाले आहेत. आजचा रशिया व चीन हा १००% साम्यवादी देश नाहीच मुळी. ५) पण भारत मात्र अजूनही कला, नाटके, सिनेमा साहित्य व काव्य प्रांताद्वारे अजूनही नायक म्हणजे क्रांतिकारी व तो आहेरे ना धडा शिकवून नाहीरे चे राज्य स्थापित करणारा तारणहार असेच समजून चालीत आहे. यात हजारो करोडो रुपयांचे सिनेमा, नाट्य, साहित्य उद्योग पोसला जात आहे त्याही पेक्षा खतरनाक नक्षलवाद हि जोपासिला जात आहे. मूलभूत चूक न सुधारणे हे आम्हा भारतीयांचे दुर्दैव आहे. माझी हात जोडून विनंती आहे जरा विचार करावा. व चर्चा प्रस्तावा मधून माझे मार्गदर्शन हि करावे

वाचने 1874
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

गरीबिचे उदात्तिकरण व गरीबी कुरवाळत रहाणे हा समाजवादी नायकाचा व कविंचा उदात्त छंद होता..आत हळुहळु कमी होत आहे.. .. गरीबी जागतिकरणाने नक्किच दुर झाली आहे..निर्यात व अनेक विदेशी प्रकल्प आल्याने सरकार कडे कर रुपाने बक्कळ पैसा आहे..त्याचा विनियोग स्वतःचाच खिसा भरल्याने झाल्याने गरीबी वाढली.. ...राज्यकर्त्यांची भुमीका निर्णायक असते,, जनता आत्ममग्न आहे... त्या मुळे यांचे चांगलेच फावले आहे.

वर्गलढा जर कवीकल्पना असेल तर "भारताचा इतिहास" म्हणून जो इतिहास साम्यवाद्यांकडून सांगितला जात आहे तो चूकीचा आहे असे सिद्ध होईल.

मूळ मुद्दा अगदी योग्य आहे पण त्यात काही दुरित तर्कांची भर पडून मिश्रण झाले आहे. उदा. : ३) मुळात हे दोन वर्ग समाज रथाचे २ चाके आहेत. त्या दोन चाकांमध्ये अंतर आहे त्या अंतरामध्येच तर समाजाचा रथ चालू आहे, जर हे दोन्ही चाके एकत्र आली तर समाज रथ कोसळून पडेल. वर्ष २००८-०९ मध्ये खुपा भयंकर अश्या आर्थिक आपत्ती आल्या होत्या. आजही आहेरे वर्ग त्यातून पुरेसा सावरला देखिल नाही. पण तरीही गेल्या ३ महिन्या पासून सगळी कडून करोडो डॉलर्स च्या देणग्या जाहीर होत आहे असे दिसते आहे. हे अगदी योग्य. "अंतर"महत्वाचे आहे. त्या अंतरामुळेच "आहे रे" च्या ताकदीच्या क्रयशक्तीने उभ्या राहिलेल्या तथाकथित चैनीच्या आणि "अनावश्यक" भासणार्‍या गरजारूपी मागणीच्या पूर्ततांकरिता "नाही रे" वर्गाला तगून राहण्याची आणि त्यातूनच जगण्याची संधी मिळते. सर्वच जण मध्यममार्गी झाले आणि स्वावलंबन आणि निव्वळ गरजेपुरतेच मागणी ठेवू लागले तर सर्व व्यवस्था कोलमडेलच. पण याचा अर्थ असा नव्हे की आत्ता असे सर्व छान चालले आहे. नाही रे आणि आहे रे मधे अंतर आवश्यक असले तरी, १. ते अंतर अमर्याद असून चालत नाही. २. त्या अंतरासहितही नाही रे वर्ग किमान गरजा भागतील अशा स्थितीत असला पाहिजे. म्हणजेच "आहे रे" "जगत" आहेत आणि वरून "झगमगत" आहेत आणि "नाही रे" मात्र नुसते "तगत" ही नाहीयेत असं नको. कारण तगण्याच्या वरच्या लेव्हलला असलेलं जगणं लाभलं तरच ते नंतर झगमगतील आणि अधिक नव्या "नाही रे" वर्गाला मागण्या पुरवू शकतील.

स्वामीजी, वर्गलढा म्हणजे काय, आहे रे - नाही रे वर्ग नेमके कोणते, आणि भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये हे वर्ग कसे असतात आणि त्यात कोणते आंतरिक विरोध संभवतात - यासंदर्भातील आपले तर्क मला अजिबातच पटले नाहीत. १-२ दिवसात विस्ताराने प्रतिसाद लिहितो.

एखाद्या चीत्रपटाचे, कादंबरी अथवा नाटकाचे (गेल्या २-३ वर्शातील) ऊदाहरण देता येइल काय ? तसेच कूंपणच जेव्हा शेत खात असते तेव्हा लढा कसा ऊभारण्यात यावा यावर सूध्दा प्रकाश टाकावा.

वर्गसंघर्षाची कल्पना वेगवेगळ्या नावांनी सर्व अर्थशास्त्रीय पद्धती वापरत असाव्यात. साम्यवादी नसलेले लोक सुद्धा "इकॉनॉमी ऑफ स्केल", "कलेक्टिव्ह बारगेनिंग" वगैरे प्रक्रियांचे विश्लेषण करतातच. अगदी लोकशाही राजकारणशास्त्रातसुद्धा "एकगठ्ठा मते" (= वर्गाने वर्ग म्हणून एका गठ्ठ्यात मते देणे, व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे नव्हे) अशा प्रकारचे विश्लेषण केलेले दिसते - असे विश्लेषण करणारे कित्येक बिगर-साम्यवादी असतात. ("लढा" म्हणजे तलवारी-बंदुकींची धुमश्चक्री, ही राज्यकर्त्यांमध्येच होते, वगैरे मुद्दे बहुधा निरर्थक असावेत. राज्यकर्ते लढाईऐवजी "व्यापारबंदी"सुद्धा करतात = वर्गांमध्ये हरताळ किंवा लॉकआऊट; वाटाघाटी सुद्धा करतात = वर्गांच्या अंतर्गत पगारश्रेणींबद्दल वाटाघाटी... वगैरे. एकुणात वर्गसंघर्षासाठी "लढा" हा काव्यात्मक शब्द प्रस्तावकाच्या "समाजरथ" या उपमेपेक्षा खूपच समांतर आहे.) "आहेरे आणि नाहीरे हे दोन वर्ग आहेत आणि ते लढत आहेत" हे चर्चाप्रस्तावकाने केलेले अतिसुलभीकरण बहुधा चुकीचे असावे. खंडन करताना अतिसुलभीकरण निरर्थक तर झाले नाही ना? ही काळजी घ्यावी. "समाजरथाची दोन चाके", "कुटुंबरथाची दोन चाके" वगैरे उपमा फारच ढोबळ आहेत. "काहीतरी फरक असतो" या सूत्रावरून "आता जितका फरक आहे, तितकाच योग्य" हा स्वर्गलोक गाठणे म्हणजे तर्कशुद्ध नव्हेच. पण समोरच्या व्यक्तीला आपले मत ढोबळमानाने पटवण्यासाठी निरुपयोगी देखील आहे. "नवरा आणि बायको ही कुटुंबरथाचीची दोन नैसर्गिक-भिन्न चाके आहेत -> असे असता स्त्रीला कुटुंबात निर्णयस्वातंत्र्य हवे म्हणणारे स्त्रीराज्य स्थापू इच्छितात -> हे धोकादायक आहे -> म्हणून हल्लीची असमानता सर्वोत्तम आहे. या चुकीच्या वादाशी समांतर तुमचा वाद आहे. "आहेरे आणि नाहीरे ही समाजरथाचीची दोन आर्थिक-भिन्न चाके आहेत -> असे असता नाहीरेंना समाजव्यवस्थेत निर्णयस्वातंत्र्य हवे म्हणणारे नाहीरेंचे राज्य स्थापू इच्छितात -> हे धोकादायक आहे -> म्हणून हल्लीची असमानता सर्वोत्तम आहे. ("काहीतरी फरक असणार" वरून "कितीही फरक असलेला चांगला" असा युक्तिवाद करू नये. नाहीतर हलवायाच्या दुकानात एक किलो पेढे तोलताना त्याने फक्त अर्धा किलो पेढे दिले, तर काय वाद घालू शकाल? हलवाई म्हणेल. "अहो, वजनात काहीतरी फरक असणारच ना, मग इतका फरक गोड मानून घ्या?" उत्तर सोपे आहे - "काहीतरी फरक असेल हे मान्य, पण तो फरक दुर्लक्ष करण्यापेक्षा अधिक असेल, तर सौदा मान्य नाही करणार!") साम्यवादाच्या विवक्षित कार्यक्रमांना विरोध करणे, आणि अन्य आर्थिक कार्यक्रमाचा प्रचार करणे, हे ठीकच आहे. पण तुमचे मुद्दे अतिसुलभीकृत किंवा चूक किंवा विस्कळित असल्यामुळे त्यांचा लोकशिक्षणाच्या बाबतीत कुठलाच सुपरिणाम होणार नाही.