स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार
पाश्चिमात्य तसेच भारतातील स्त्रीमुक्तीवादी चळवळींचा माझा अभ्यास नाही, हे या लहानशा लेखाच्या प्रारंभीच सांगून टाकते. तेव्हा या लेखात जे काही आहे, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणांमधून आले आहे, त्यात माझे अनुभव जेव्हा कधीतरी स्त्रीमुक्तीवादी लेखिकांच्या स्त्री किंवा मिळून सार्याजणी सारख्या मासिकांमधून ज्या कथा/कादंबर्या किंवा लेख हाती लागले त्यांच्याशी आपोआप जोडले गेले, कधी त्यात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी जे काही समान पाहिले त्यामधून ही मते कधी टोकदार तर कधी बोथट होत गेली.
स्त्रियांच्या मुक्ततेचा प्रश्न हा सर्व मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या समाजाच्या दृष्टीने नेहमीच थोडा टिंगलीचा, थोडा टवाळीचा तर कधीकधी अतिशय गंभीर असा ठरला आहे. मुळात मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांबद्दल असे म्हणण्याचे कारण असे की एका पीडीत अशा व्यक्तीची ती स्त्री आहे म्हणून पीडीत आहे, आणि म्हणून तिची सुटका करावी, हा विचार मध्यमवर्गियांनीच महत्त्वाचा समजला आहे/असावा. या प्रश्नांकडे अभ्यासक म्हणून बघण्याची गरज मध्यमवर्गानेच जाणली असावी, असा माझा समज आहे. तरी हे प्रश्न मात्र मध्यमवर्गाच्या पलिकडले, सगळ्याच समाजांना, समाजातील सगळ्याच स्तरांतील लोकांचे आहेत.
मी ज्या गावात वाढले, तेथे कुणबी, ब्राह्मण, कायस्थ आणि मुसलमान अनेक वर्षे राहत होते. ब्राह्मण कनिष्ठ मध्यमवर्गीय अधिक होते, कायस्थ हे त्यामानाने सुखवस्तू, शिकलेले असत आणि मुसलमान कारागीर अधिक होते. याउलट कुणबी विशेष करून लोणावळ्याकडील भागातून वसतीला आले होते, आणि लहान लहान "बेडी" करून राहत असत. हे सांगण्याचे विशिष्ट कारण असे, की या जातींप्रमाणे आणि आर्थिक स्तराप्रमाणे स्त्रियांवरील बंधने कमी-जास्त होती. तरीही एका विशिष्ट पातळीवर त्या स्त्रिया समान होत्या. तसेही 'अर्थ' सारख्या चित्रपटांमधून कथेतील पुरुषाच्या आजूबाजूच्या सर्व स्तरातील निम्न, मध्यमवर्गीय आणि यापेक्षा उच्चस्तरीय आणि वरवर पाहता मध्यमवर्गीयांच्या सोवळ्या बंधनांमधून मुक्त स्त्रियांचेही प्रश्न असतात त्यांची झलक दिसलीच होती. त्यावेळी साम्य लक्षात आले नाही, पण जशी मी मोठी झाले तशी माझ्या आजूबाजूला असलेल्या घरांमधली स्त्रियांबद्दलची अॅपथी, थोडेसे दुर्लक्ष, थोडीशी हात झटकून टाकण्याची भावना दिसायला लागली.
माझ्या माहेरी कामाला येणारी बाई लग्न होऊन आमच्या वाडीत आली, तेव्हा आम्ही त्यांच्या घरच्या सत्यनारायणाला गेलो होतो ते आजही आठवते. तिची सासू वर्षानुवर्षे आमच्याकडे कामाला होती. तिच्या सुंदर आणि शालीन अशा त्या सुनेला लग्न करून आणल्यानंतर त्यांच्या घरी प्रसाद देताना पाहिल्याचे मला आजही जसेच्या तसे आठवते. पण नवरा व्यसनी झाला, लवकर गेला, त्याच्यामागे चार मुलांचा सांभाळ करण्यात तिचे आयुष्य कसे जाते आहे हे आम्ही पाहत होतो, पण थोडीफार पैशाची मदत आणि तिच्या मुलांच्या शिकवण्या याखेरीज आम्ही फार काही केले असे वाटत नाही. आता तिचे स्वतःचे घर आहे, मुले बर्यापैकी नीट शिकली, पण तिने खूप भोगले आहे/असावे. अजूनही चार घरची कामे सोडू शकत नाही, हेही तिचे वास्तव आहे. ज्या स्त्रिया तिच्याएवढ्याही नशीबवान नव्हत्या, त्यांना नवर्याच्या मृत्युनंतर घर सोडावे लागले, त्यांच्याबद्दल काहीबाही ऐकू येत असे. लहानपणची माझी खेळण्यातली मैत्रिण तिच्या बहिणीच्या बाळंतपणातल्या निधनानंतर सोळाव्या वर्षी लग्न होऊन तिच्याच मेव्हण्याला दिली गेली. माझ्या मुसलमान मैत्रिणीच्या घरातली अगदी थेट हीच कथा. तेव्हा आम्ही चौथीत असू. अकरावीतल्या तिच्या सख्ख्या मोठ्या बहिणीला अपघाती निधन झालेल्या बहिणीच्या पंचवीशीतल्या नवर्याच्या मागे स्कूटरवर बसून जाताना पाहिली तेव्हा वाटलेले आश्चर्य अजून आठवते.
आमच्या घरी शिक्षण होते, घरदार व्यवस्थित होते. तरी कुठे फारशी स्त्री मुक्त होती? अर्थात पुरुषही मुक्त नव्हते. नोकरीला बांधलेले होते. पण घरातल्या स्त्रियांचा दिवस हा पहाटे चारला सुरु होई आणि रात्री अकराला मावळे. चार वाजता उठून करायचे काय तर आंघोळी करून सर्वांचे डबे, मुलींच्या वेण्या, आणि तयारी. दहाला परत थोडी सुटका झाली, तरी बारापर्यंत सकाळी शाळेत गेलेली मुले घरी येण्याची वेळ व्हायची, मग त्यांची जेवणे, अडीच तीनच्या सुमाराला दुपारची थोडी झोप आणि परत चार वाजल्यापासून संध्याकाळची तयारी. उन्हाळ्यात उन्हाळ्यातली कामे - वाळवणे घालणे, वर्षभराच्या तांदळाला बोरिक पावडर लावून ठेवायचा (हा काय प्रकार होता, तो जे केले आहे त्यांनाच कळेल. तांदूळ दोन हातांमध्ये घ्यायचा आणि पांढर्या पावडरने भरलेले हात घासून ती त्या तांदळाला चोळायची. असा वर्षभराचा तेरा-चौदा माणसांना लागेल एवढा तांदूळ आमच्या घरी उन्हाळ्यात यायचा), डाळींना उन्हे द्यायची, पापड, लोणची, मिरगुंडे, बटाट्याचा वर्षभरच्या उपासांना पुरेल एवढा कीस घालायचा, चिकवड्या-कुरड्या इ. इ. दहा कामे असत. ही कामे करण्यासाठी आम्ही मदत करत असू, पण मुख्य काम बायकांचेच. ती झाली की महिनाभर विश्रांती, माहेरी जाण्याची चंगळ असे. तेवढे झाले की परत जूनच्या पहिल्या आठवड्यात घरी. शिवाय एकत्र कुटुंबांमधील रुसवे-फुगवेही असत. या सगळ्या धबडग्यात नवर्याबरोबर चित्रपटाला जाण्यासारखी हौस तरी भागवायला वेळ कुठे होता? पुढे मी जेव्हा नवर्याकडून सासू-सासरे एकत्र चित्रपटांना जायचे हे ऐकले तेव्हा आठवले की आईबाबा दोघेच मिळून एकत्र चित्रपटाला गेले आहेत असा केवळ एक दिवस मला आठवतो. तेव्हा आईला झालेला आनंद आठवतो. माझ्या घरातल्या इतर स्त्रियांचीही कथा याहून काही फार वेगळी नव्हती. असे वाटते की या बायकांनी आपल्या जाणत्या आयुष्यातील खूप वेळ हा आपल्याला दिला, घरच्यांच्या सन्मानासाठी, पाहुणे-रावळ्यांसाठी दिला. आता तिला माणसांची ऊठबस करण्याचा फार कंटाळा येतो, इतका की कधीकधी मला तिच्या कंटाळ्याचा कंटाळा येतो. पण कधीतरी विचार करताना असे वाटते की तो कंटाळा येण्याचा तिला हक्क आहे. तो तिच्या वेळेवरचा तिचा अधिकार आहे. तो कसाही, तिला हवा तसा घालवण्याचा अधिकार तिला आहे.
मुळात स्त्रियांची मुक्ती हा विषय इतका चावून चघळून चोथा झालेला विषय बनला आहे, की त्यावर वेगळे काय बोलणार असे कधीतरी वाटते. कधी वाटते की आपली एवढी पात्रता नाही. पण तरीही असे म्हणावेसे वाटते की प्रत्येक माणूस, जो जिवंत असतो, त्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाची लांबी ही सारखीच असते. पुरुष आणि स्त्री या दोन्ही व्यक्ती असल्या तरी त्यांना मिळणारे क्षण हे कसलेही लिंग न स्विकारता येतात. त्या क्षणांमध्ये स्त्रियांचा क्षण किंवा पुरुषांचा क्षण असे भेद नसतात. त्या क्षणाच्या काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे अनेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे. हे कोणाही व्यक्तीला करावे लागू नये. यासाठी पैशाचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, दुसर्याच्या इच्छेचे, वेळेचे मोल समजणे इत्यादी गोष्टींचे महत्त्व आहे. बाईने डाळीला फोडणी द्यावी, का पुरुषाने; किंवा बाईने बाळाची शी काढावी, का पुरुषाने, हे प्रश्न माझ्या मते महत्त्वाचे आहेत, पण दुय्यम आहेत, प्रत्येक जित्याजागत्या व्यक्तीला मिळालेला वेळ कसा वापरता यावा या विचारांचे बाय-प्रॉडक्टस आहेत. मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे.
स्त्री-मुक्ती चळवळीची उपेक्षा होते, त्यांचा अजेंडा कसा चुकीचा, एकांगी आहे हे खरेखोटे दळण आपण नेहमीच दळत असतो. मराठी लेखक आणि लेखिकाही एकेरी, कंटाळवाण्या कथा लिहून समाजातील विसंगती दाखवत राहतात. पण हे असे सतत कंटाळवाणे काहीतरी कथा-कादंबर्या-लेखांमधून दाखवणारे भले मूर्ख, एकांगी असतील, पण आजूबाजूला जे जिवंत व्यक्तींच्या आकांक्षा दाबणे, त्यांचा स्वतःच्या वेळेवर हवा तेवढा अधिकार नसणे घडत होते/घडत आहे ते अधिक चुकीचे आहे असे नाही वाटत?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
लेख उत्तम
अभिनिवेशरहित, समंजस आणि
+१
लेख
असेच म्हणते
स्त्री मुक्तीमधील भेदभाव
रिकामी बाई
स्वत:च्या आत्मउन्न्तीसाठी कोणाचीही आवश्यकता नाही
तसे नव्हे
आमची आई म्हणायची - जब किसी भी
>>खेळाचे हे उदाहरण क्षुल्लक
प्रियाली अगदी अगदी!!! परवा मी
लेख छान आहे, पण बरेच मुद्दे
प्रतिसाद
टाळ्या
+१
:)
मुक्ती
स्त्रीमुक्ती, नोकरी करणारी स्त्री, पूर्णवेळ गृहिणी वगैरे
तुम्ही स्वतः खंबीर असाल तर
>> ती मुक्तच आहे की. केवळ
>>>एखादी गोष्ट नष्ट करायची
एखादी गोष्ट रद्द व्हायची असेल
बहुतेक असाच विचार पाश्चिमात्य
अर्थात कोणीतरी आपली सुरक्षा
किंवा
बॉडी गार्ड म्हणायचंय का? पण
सेक्युरिटी गार्डच म्हणायचे होते
सगळं खरं
जर का नवरा हा अधिक कमावणारा
स्वाती२ आणि प्रियालीतै, दोघी
गॅप पडल्यावर परत नोकरी मिळवणं
प्रश्न
१००% सहमत
+१
खंबिरपणा महत्वाचा.
लेख उत्तम
लेख आवडला
झोपेचे सोंग.....!!
निऋत्तीच्या लेकी
वामांगी.
व्वा!
वा
मस्त कविता.
कविता फारच
रसग्रहण/अर्थ
मस्त कविता.
शत्रू
पावर पॉलिटिक्स +१