Skip to main content

रैना बिती जाए..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 31/10/2010 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
राग तोडी..! हिंदुस्थानी रागसंगीतातला एक दिग्गज राग. ज्याला तोड नाही असा तोडी..! सुरवातीलाच सारंगी. भाईकाकांच्या भैय्या नागपुरकराच्या भाषेत सांगायचं तर 'कलिजा खल्लास करणारी जीवघेणी सारंगी..!' 'नी़ नी़सा सा..' ने संपणारा दीदीचा केवळ अशक्य आलाप - तकदीरचा मारा असलेल्या कुणा आनंदबाबूला घायाळ करतो अन् त्याचे पाय थबकतात..! सुरांचा तो प्यासा त्या तोडीच्या झर्‍याच्या शोधात माडी चढतो..! 'रैना बिती जाए..!' - पंचमदांची अद्भूत प्रतिभा अन् दीदीचा स्वर.. हिंदुस्थानी सिनेसंगीतातलं एक माईलस्टोन गाणं जन्म घेत असतं..! संतूर, गिटार, आणि केहेरव्याचा वजनी ठेका.. सारंच भन्नाट..! 'निंदीया ना आए..' - तोडीच्या स्वरात संपूर्णत: वर्ज्य असणारे, विसंगत वाटणारे शुद्ध मध्यम, शुद्ध धैवत फक्त पंचमच टाकू शकतो. अन्य कुणाची ना तेवढी हिंमत, ना तेवढी प्रतिभा. खूप खूप मोठा माणूस..! दुर्दैवाने घरात सुख न लाभलेला आमिरजादा आनंदबाबू आणि सुरांची मलिका असलेली त्याची पुष्पा..! 'आय हेट टियर्स, पुष्पा..!' असं म्हणणारा आनंदबाबू. शारिरीक वासनेचा नव्हे तर पुष्पाच्या स्वरांचा भुकेला, तिला प्रेमाने हलवा-पुरीची फर्माईश करणारा आनंदबाबू..! कोठेवालीचा व्यवसाय करणारी पुष्पा - जिच्या घरात नेहमी पूजा-फुलांनी मढलेला देव्हारा अन् सोबतीला रामकृष्ण परमहंसांची तसबीर..! शब्दांचं प्रेम, स्वरांचं प्रेम, अमरप्रेम..! काय चूक, काय बरोबर हे ज्यानं-त्यानं ठरवू देत.. आमचा मात्र सलाम त्या दीदीला, त्या पंचमला, त्या आनंदबाबूला अन् शर्मिला टागोर नामक त्या पुष्पा कोठेवालीला..! -- तात्या अभ्यंकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4244
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

गाणं खुपच गोड आहे यात वाद नाही तात्या! लताबाईंनी जितकं सुंदर गायलय तितका सुंदर अभिनय मात्र शर्मिला टागोरांना करता आलेला नाही. आणि तो आनंदबाबू कि कोण आहे तो चक्क नाटकी वाटतो.

In reply to by रेवती

लताबाईंनी जितकं सुंदर गायलय तितका सुंदर अभिनय मात्र शर्मिला टागोरांना करता आलेला नाही.
हम्म..!
आणि तो आनंदबाबू कि कोण आहे तो चक्क नाटकी वाटतो.
मला मात्र त्यातला 'काका' फार आवडला.. असो, आपल्या मताचा आदर आहे. प्रतिसादाबद्दल आभार.. मी शर्मिला, राजेश खन्नापेक्षाही आनंदबाबू, पुष्पावर लिहिलं आहे. मला ती पात्रं खूप भावली आहेत.. तात्या.

सुंदर. पहिला आलाप एकदम किलर. >>तोडीच्या स्वरात संपूर्णत: वर्ज्य असणारे, विसंगत वाटणारे शुद्ध मध्यम, शुद्ध धैवत कानाला गोड वाटतंय तोवर व्याकरण पाहू नये किंवा तेवढ्यापुरते व्याकरण बदलून घ्यावे. :)

In reply to by नितिन थत्ते

कानाला गोड वाटतंय तोवर व्याकरण पाहू नये किंवा तेवढ्यापुरते व्याकरण बदलून घ्यावे.
अगदी खरं.. परंतु ते व्याकरण बदलायचा अधिकार केवळ पंचमदांचाच. तोच मी उद्घृत केला आहे..! तात्या.

In reply to by नितिन थत्ते

बाहेरून उचलल्या आहेत. ( तरी आरडी आम्हाला आवडतात :) ) रैना बिती .. गाणे सुरेख आहे.

किस सौतन से ......लागी नज रिया ...किस बैरन ने रोकि ड ग रि या .. काय गाण आहे? मला हे बघण्या पेक्षा ऐकायला फार आवड्त . बघताना मात्र ... राहुदे . तात्या सुन्दर . तुम्ही तुमच्या रागदारी पद्धतिन ऐका आम्ही त्यातल्या भावनेत रमतो.

In reply to by स्पंदना

आम्ही त्यातल्या भावनेत रमतो.
अहो मीदेखील भावनेतच रमतो म्हणूनच लिहितो.. रागदारी वगैरे सगळं नंतर..! गाण्यातले भाव नेहमीच पहिले..! तात्या.

अगदी लहानपणापासुन आवडीच गाणं.. आणि संगीत या एका शब्दातलं सगळं सामर्थ्य आपल्यासमोर उलगडुन दाखवणारं.

तात्या... मस्तच! >>शारिरीक वासनेचा नव्हे तर पुष्पाच्या स्वरांचा भुकेला यावरून नटरंग मधील 'गुणा' हे पात्र आठवलं.

धन्यवाद! लताशिवाय हे गाणं ईतक्या ताकतीन कोणीच गाऊ शकणार नाही !!