Skip to main content

"आदर्श" सोसायटी.

मितभाषी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
लष्करी अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधलेल्या आदर्श सोसायटीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सासूबाईंचा फ्लॅट असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी हा महिती प्रसिद्धी माध्यमांना दिल्याचे समजते. भगवती मनोहरलाल शर्मा या चव्हाण यांच्या सासूबाई आहेत. तसेच यातील १०३ क्रमांकाचा फ्लॅट एस. बी. चव्हाण या नावाने असून मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे नाव शंकरराव भाऊराव चव्हाण असल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचं दिसून येत असल्याची चर्चा आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्यांच्या पत्नींना घरे देण्यासाठी हा भूखंड लष्करी अधिकाऱ्यांनी मिळवला. प्रत्यक्षात तेथे एकाही अशा दुदैर्वी वीरपत्नीला फ्लॅट मिळाला नाही. तेथे लष्कराच्या आजी आणि माजी ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी फ्लॅट्स बळकावले अशी तक्रार नौदलाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केली. कारण हा टॉवर नौदलाच्या संवेदनशील भागाला खेटूनच उभा राहीला आहे. आता असे उघडकीस आले आले आहे अनेक राजकीय नेते आणि सनदी अधिकारी यांनीही तेथे फ्लॅट्स मिळवले आहेत .. यामध्ये, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सुरेश प्रभू अशी नावे आहेत. तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव शंकरन, भारतीय परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ अधिकारी देवयानी खोब्रागडे, मुंबईच्या माजी जिल्हाधिकारी कुंदन अशी अनेक नावे आहेत. देवयानी,आयएएस अधिकारी उत्त्तम खोब्रागडे यांची कन्या आहे. या प्रकरणीची आता सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. सीबीआयने सोसायटीच्या चिटणीसांना, एका आठवड्यात या प्रकरणाबाबत विचारलेल्या माहितीचा तपशील पुरवावा, असे कळवले आहे. दरम्यान लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांनी, या प्रकरणाच्या चौकशीच आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री अँथनी यांनीही या मामल्याची माहिती काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना दिली आहे. हा भूखंड सोसायटीला मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारमधील अनेक अधिकाऱ्यांनी नियम बाजूला सारले असे आता आढळले आहे. या अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. येथील प्रत्येक फ्लॅटची किंमत किमान तीस कोटी (काही व्रूत्तपत्रात किंमत ७५ कोटी दिली आहे)रूपये आहे, परंतु या प्रत्येक सदस्याने हा फ्लॅट सुमारे साठ लाख रूपयांत खरेदी केल्याची नोंद महसूल खात्यात आहे. दरम्यान चव्हाण यांचे विरोधक सक्रीय झाले असून इतक्या महत्त्वाच्या, संरक्षणाच्या दृष्टिने नाजूक मामल्यात चव्हाण यांनी दुर्लक्ष केले असा त्यांचा आरोप असून ही बाब पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नजरेस आणून द्यावे असे विरोधकांचे प्रयत्न आहेत आता अशोकरावांची गच्छंती निश्चित असे आपणास वाटते काय?
पंख

पण ३० कोटी किंमत ? कुणी त्या फ्लॅटचा एरिया सांगु शकेल काय ? परिसरात काय भाव आहे प्रति स्क्वे.फुट ? असूही शकेल.. कि ऊगीच आपलं ३० कोटी अन ७५ कोटी अशी कोटीच्या कोटी ऊड्डाणे ..?
30/10/2010 - 10:42 Permalink
चिगो

In reply to by पंख

नक्की असेल की एवढी किंमत.. नौदलाच्या एरीयाला खेटून, म्हणजे नेव्हीनगर कुलाबा एरीया असणार, तिकडे असतील एवढ्या किंमती.. खरे तर काही नवलाची गोष्ट नाहीये ह्यात, म्हाडाच्या बिल्डींग्समधे सर्रास होतो हा प्रकार. आता लष्कराने घाण केलीय, एवढंच..
30/10/2010 - 12:04 Permalink
मदनबाण

हा तर शहीदांच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा प्रकार झाला... (म्हणुन मी बर्‍याचवेळा म्हणतो की आपल्या देशात शहीद हा शब्द फारच स्वस्त झाला आहे. :( ) हा घोटाळा कॉग्रेसच्या अनेक घोटाळ्यांच्या यादीत नव्याने जमा झाला आहे... कॉमनवेल्थ कशी जमवावी हे याचे मूर्तीमंत उदाहरण असुन हा घोटाळा म्हणजे मला देशद्रोह वाटतो. असे म्हणतात की ज्याच्या ज्याच्याकडे या प्रकल्पाची फाईल गेली त्याचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे नाव यादीत जोडतच गेले... प्रत्यक्षात तेथे एकाही अशा दुदैर्वी वीरपत्नीला फ्लॅट मिळाला नाही. तेथे लष्कराच्या आजी आणि माजी ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी फ्लॅट्स बळकावले अशी तक्रार नौदलाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केली. त्या सर्व लष्करी अधिकार्‍यांना ताबोडतोब सवेतुन बडतर्फ करण्यात आले पाहिजे... बाकी मुख्यमंत्र्यांचं म्हणाल तर मला वाटतय ... हे सुद्धा लवासाप्रमाणे नियमित केले जाईल !!! ;) मुठ्ठीभर राजकारणी करोडो देशवासियांची लुट कसे करत आहेत...हे आता रोज दिसु लागले आहे... जो सैनिक देशासाठी प्राणाची आहुती देतो... त्यांचीच ही फसवणुक ? कुठे फेडाल ही पापं ? :( साले हे नेता लोक एक नंबरचे चोर आहेत... भिकेला लावतील आपल्या देशाला !!!
30/10/2010 - 10:58 Permalink
sagarparadkar

अरे अजून मिपावरचे सुमार चाचा कॉन्ग्रेजींच्या बचावासाठी नाही धावले ... झोपलेत कि काय ... बाकी या कॉंग्रेजींचे वर्तन म्हणजे "आपलं ठेवायचं झाकून, आणि दुसर्‍याचं पाहायचं वाकून" ... ह्याच लोकांनी अ‍ॅडमिअल गोर्श्कोव्ह खरेदीविरोधात रान उठवलं होतं, आता ते श्रीमान विष्णु भागवत कोठे गेले कोणास ठावूक. शिवाय ती नौका खरेदी मात्र होणारच आहे, रद्द झालेली नाहीच, शिवाय ती हस्तांतरीत व्हायला पण अजून वेळ लागणार आहे म्हणे (ह्या स्टेटस्बद्दल चू.भू. माफ असावी), मग काही वर्षांपूर्वीच ती भंगार आहे असा धोशा याच काँग्रेजींनी का लावला होता? कि यांचं कमिशन बुडत होतं त्यात? बाकी ह्या 'आदर्श' प्रकरणात 'भाजप-सेने'चे नेते पण गुंतले आहेत असं कळतंय, म्हणजे एकूण काय तर "सब मिलजुलके खाओ" आता जरा राळ उठलीय म्हणून कारवाईचं नाटक होईल, पण पब्लिकची मेमरी लय शॉर्ट ... तवा "ठंडा करके खाओ" पण शेवटी खाणारच ते बघा ...
30/10/2010 - 11:36 Permalink
तिमा

फक्त राजकारण्यांनाच कशाला दोष देता ? आपला संपूर्ण समाजच 'आदर्श' बनत चालला आहे. फरक इतकाच की तो कलियुगातला आदर्श! (तेच ते कलियुग, एका हातात शिस्न आणि दुसर्‍या हातात जीभ धरुन हंसणारे) भ्रष्टाचार, भेसळ, भानगडी, बलात्कार, बाहुबली या सगळ्यांचे प्रस्थ वाढले असले तरी त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करुन फक्त भौतिक प्रगतीचे आलेख काढायचे आणि देशाच्या प्रगतीचे गोडवे गायचे हे केवळ राजकारण्यांचेच नव्हे तर सुखवस्तु, आत्मधुंद लोकांचेही व्यवच्छेदक लक्षण झाले आहे.
30/10/2010 - 11:59 Permalink
समंजस

In reply to by तिमा

अंशतः सहमत. सध्या तरी या विषयावर जास्त लिहीण्याची इच्छा नाही. राजकारण्यांनी/राजनेत्यांनी, त्यांच्या कुंटूंबियांनी परत एकदा सिद्ध केलंय की, राजकारणात येण्याचा आणि राजकारण हा पुर्णवेळ व्यवसाय स्विकारण्यामागे मुख्य उद्देश भरपूर श्रीमंत होणे हाच आहे (ही गोष्ट वेगळी की हे राजकारणी त्याला समाजसेवा असं नाव देतात. तद्दन भपंकपणा) जो पर्यंत मतदार हे फक्त आणि फक्त विकास याच मुद्यावर मतदान न करता, जाती/धर्म/प्रांत/समाज/वर्ग या मुद्यांवर मतदान करत राहणार तो पर्यंत अश्या घटना होतंच राहणार.
30/10/2010 - 13:43 Permalink