रूप परमेशाचे - वेध अधिदैविकाचा (भाग दोन)
लेखनप्रकार
मिसळपावच्या सदस्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
(ईश्वराची प्रचिती जीवाला अधिभौतिक, अध्यात्मिक, अधिदैविक पातळीवर येते. ही अनुभूती एकरस, एकसंध असली तरी वैचारिक मांडणीसाठी हे वर्गीकरण केले आहे. भाग १ मध्ये ईश्वराचे अध्यात्मिक स्वरूप आणि ज्ञानमार्ग यांचा थोडक्यात आढावा घेतला. या भागात आधिदैविक स्वरूप आणि भक्तीमार्ग/ नित्योपासना यांचा थोडक्यात आढावा घेऊ.)
भगवान दत्तात्रेयांचे स्मरण करून या भागाची सुरुवात करतो. भगवान दत्तात्रेयांचे त्रिमुखी रूप परमेश्वराचे समग्र आकलन होण्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे. ब्रह्मदेव (उत्पत्ती, सृजन), विष्णू (स्थिती, प्रतिपालक शक्ती) आणि महेश (लय, कल्पांत) असे हे स्वरूप आहे. परमेश्वराचे परमकारुणिक स्वरूप असलेले विष्णूतत्व हा अधिदैविक प्रान्त. अध्यात्मिक आणि अधिभौतिक याना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. 'संभवामी युगे युगे' असे वचनच श्रीहरीने दिले आहे आणि ते सार्थही केले आहे. अनन्य भावाने शरण आलेल्याला 'योगक्षेमं वहाम्यहम' अशी ग्वाहीच भगवंत देतात. प्रामाणिकपणे अध्यात्मिक उन्नती व्हावी असा प्रयत्न करणाऱ्या साधक, उपासकांना मदत करण्यासाठी हे 'गुरुतत्त्व' अखंड, अथक कार्यरत असते. हे गुरुतत्त्व ईश्वरी अवतार या रूपात प्रकटते, तसेच साधना/ उपासना करत वेगवेगळ्या मार्गाने विभूतीमत्वाला पोचलेल्या संतांच्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या संतधर्माच्या माध्यमातून अनुभवास येते. हेच तत्व प्रत्येक जीवाच्या हृदयातही असते. या आतल्या गुरूला जागे करण्याचे काम बाह्य गुरुतत्त्व करते आणि मग पुढची वाटचाल सुरू होते.
परमेश्वराचे राम, कृष्ण, श्रीपाद श्रीवल्लभ, स्वामी समर्थ यांच्यासारखे अवतार होतात. अजन्मा जन्माला येतो. चैतन्य देह धारण करते. सर्वसामान्य व्यक्तीचा जन्म 'जन्म घ्यावा लागे वासनांचे संगे' अशा प्रकारे होतो, तसे ईश्वरी अवतारांचे नसते. विशिष्ट हेतूने हे अवतार होतात. त्यांना आपले जीवितकार्य काय आहे याची सुस्पष्ट जाणिव उपजतच असते अथवा काही ईश्वरी संकेतानुसार घडलेल्या घटना सहाय्यभूत ठरून ती अल्पवयातच होते. सर्वसामान्य व्यक्तीला चमत्कार वाटतील अशा काही घटना यांच्या आयुष्यात घडून येतात. गर्दी गोळा करण्यासाठी हातचलाखीचे प्रयोग करावेत असा तो प्रकार नसतो. हे कार्य ठराविक स्थळ, काळ आणि परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि त्या ओघाने येणार्या काही मर्यादा पाळत करावे लागते. प्रारब्धाचे फारसे बंधन नसताना आणि सिद्धी प्राप्त असूनही हे अवतार मर्यादाभंग करत नाहीत. समाजाची निकोप धारणा व्हावी या दृष्टीने काही संकेत नेहेमीच पाळले जातात, ते अहंभावाने झुगारून देत नाहीत. उलट कमालीच्या हालअपेष्टा सोसत काही आदर्श प्रस्थापित करतात, काळाच्या ओघात झाकोळल्या गेलेल्या काही मूल्यांचे पुनरुज्जीवन करतात . नैतिकतेला उजाळा देतात. यासाठीच स्वत: ज्ञानदेव पैठणच्या पुस्तकी विद्वानांकडून 'शुद्धीपत्र' आणतात. वासुदेवानंद सरस्वती आपल्या प्रत्येक चुकीबद्दल कठोर प्रायश्चित्त घेतात. मारून मुटकून या अवताराना दोन हात, दोन पाय आहेत म्हणून आपल्यासारखे सर्वसामान्य ठरवणे चुकीचे आहे. या भ्रांत गृहीतकाच्या पायावर तत्कालीन वास्तवाकडे डोळेझाक करून यांचे एखादे वाक्य, कृती कुतर्काच्या कचाट्यात पकडून बुद्धिभेद करणारे साहित्यिक प्रलाप काढणे हे बुद्धीप्रामाण्य नाही. ते पाखंडच!
ईश्वराचे जसे अवतार होतात, तसेच तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य, प्रापंचिक आयुष्य जगणारे काहीजण आपल्या साधना, उपासनेच्या जोरावर विभूतीमत्वाला पोचतात. सद्गुरूपदच काय तर जगद्गुरूपद मिळवण्यास पात्र होतात. सुपात्र, श्रद्धावान आणि प्रामाणिकपणे प्रयत्नशील असणाऱ्या शिष्याला त्याच पातळीवर पोचवून ही परंपरा अखंड चालू राहते. यात उभयपक्षी काही पात्रता असणे अनिवार्य असते. त्या जोडीनेच ईश्वरी संकेत आणि त्याची कृपा दोन्ही कार्य करतात. साधना/ उपासनेचे बरेच मार्ग 'गुरूपदिष्ट' आहेत. मोठमोठ्या प्रकल्पावर काम करणारे अभियंते विद्यापीठात पाहुणे परीक्षक म्हणून जातात, मुलाखती घेतात. सुपात्र व्यक्ती हाती आली तर आपल्या संस्थेत तिला पद देऊ करतात आणि तिच्या हातून एखादे महत्कार्य करून घेतात. साक्षात्कारी सद्गुरू आणि शिष्य यांचे संबंध याच स्वरूपाचे असतात. त्या विषयी विवेचन स्वतंत्र लेखात करेन. मिसळपावचे होमपेज या दृष्टीने समर्पक आहे. सोपानदेव, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंशावतार आहेत आणि मुक्ताई ही चित्कला, आदिशक्तीचा अंश आहे. तुकोबाराय तुमच्या आमच्यासारखेच लौकिक जीवन जगत, सगळ्या शिव्या ओव्या पचवत, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असा अविरत संघर्ष करत आपल्या निस्सीम भक्तीच्या जोरावर जगद्गुरूपदी पोचले. तात्पर्य हेच की निर्गुण, निराकार, अचल, अविकारी असे परमेश्वराचे शिवतत्त्व आणि जडतत्वाने बनलेले भौतिक जग या व्यतिरिक्त अध्यात्मिक साधना उपासना करणार्यांना, आपला 'स्वधर्म' ओळखून त्यानुसार जीवितकार्य करण्यासाठी सक्रीय साहाय्य करायला तत्पर असलेले विष्णूतत्व अस्तित्वात आहे.
आता मागच्या भागात एकांगी ज्ञानमार्गाचा केला, तसा थोडक्यात एकांगी भक्तीचा विचार करू. सर्वस्व पणाला लाऊन केलेल्या ईश्वरभक्तीचे वर्णन भावार्थ गीतेत अत्यंत समर्पकपणे केले आहे.
तुझी श्रीहरी सगुण साजिरी मूर्ती अंतरी ठसली, वृत्ती जयांची तवपदी सदा भाव-भक्तीने रतली|
रात्रंदिन ती सर्व इंद्रिये तुझे ची निरुपम रूप, सुखे भोगिती तन्मय होती तो आनंद अमूप|
सर्वसंगपरित्याग करणाऱ्या रमण महर्षी आणि आदय शंकराचार्य यांच्याइतकेच सर्वस्व समर्पित करणारे मीराबाई, चैतन्य महाप्रभू आणि जगदगुरू तुकोबाराय विरळे असतात. सर्वस्व पणाला लाऊन भक्ती साधणे, स्वात्मदान करणे हे तर हटयोगापेक्षाही अवघड आहे. अशी अमला भक्ती ज्याने साधली त्या भक्तासाठी फक्त अधिदैविक हेच वास्तव होते. निस्सीम भक्ताची भावदशा इतकी अलौकिक असते की त्याला अमूर्त अध्यात्मिक संकल्पना चक्क निरर्थक वाटतात. अधिभौतिक जगातल्या मोहमयी विकारवासनाही त्याला भुरळ घालत नाहीत. रमण महर्षी असोत की चैतन्य महाप्रभू यांचे चरित्र वाचून सहज लक्षात येईल की महर्षीना सहज साधलेले प्रखर वैराग्य असेल किंवा चैतन्य महाप्रभूना सहज साधलेली निस्सीम भक्ती असेल दोन्हीमागे प्राग्जन्मी केलेली साधना, उपासना फळाला आलेली असते. सर्वस्व पणाला लाऊन 'स्वेष्णा' धरावी, सर्वस्व झोकून देऊन कृष्णभक्ती करावी हे वैचारिक निर्णय नसतात, ती तार्किक निष्पत्ती नसते. अत्यंत प्रबळ अशी अंतप्रेरणा अशा अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी घडवून घेते. या वरून सहज लक्षात येईल की एकांगी सांख्य/ ज्ञाननिष्ठेइतकीच एकांगी भक्ती सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाची अवस्था कशी असते हे पुढच्या भागात बघू या.
(क्रमश:)
वाचने
4460
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अर्थार्थी-आर्त्-जिज्ञासू
ज्ञान्-भक्ती-हठ-कर्म
In reply to ज्ञान्-भक्ती-हठ-कर्म by शुचि
शुचितै, मला वाटतं थोडं
In reply to शुचितै, मला वाटतं थोडं by राघव
असू शकेल
In reply to असू शकेल by शुचि
:)
In reply to :) by राघव
गोंदवलेकर महाराजांनी स्पष्ट
पहिला भाग कुठे?
@मूकवाचक
अप्रतीम !!
मन:पूर्वक धन्यवाद!
आनंद झाला. वाचून खूप छान
गहिवरून आले
In reply to गहिवरून आले by चौकटराजा
>>>आपल्या लेखाबद्दल माझ्याकडे
In reply to गहिवरून आले by चौकटराजा
हम्म
अजून प्रकटले कसे नाहीत