मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झुणकाभाकरीची गोडी अन् वेडा कुंभार..

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
विठ्ठला तू वेडा कुंभार..(येथे ऐका) वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचे दिवस होते. दादरला सेनाभवनाच्या अलिकडची गल्ली. तिथे रामचंद्र निवास ही इमारत आहे. तिच्या तिसर्‍या मजल्यावरती बाबूजींनी या चित्रपटाचे कार्यालय थाटले होते. मी अधनंमधनं तिथे दबकत जायचा.. आणि कधी कुठले कागदपत्र फाईल करून ठेव, एखादं बाड इकडून तिकडे पोचव, बँकेची कामं कर, बाबूजींकरता ठाण्याच्या भगवंतराव पटवर्धनांकडे काही काम असेल तर ते कर, अशी बाबूजी सांगतील ती फुटकळ कामं चुपचाप करायचा..कधीमधी उगाचंच त्या कार्याकयात बसून राहायचा.. मग बाबूजीच केव्हा तरी माझ्याकरता चहा मागवायचे.. कधी शांत असत, कधी कुणावर तरी भडकलेले असत, तर कधी कुठल्या विचारात असत.. अशीच एक टळटळीत दुपार.. तेथून जवळच एल जे रस्त्यावर नाना मयेकर नावाचा माझा मित्र राहायचा.. त्याच्याकडे काही कामानिमित्त गेलो होतो. त्याच्या आईनं फक्कडशी झुणकाभाकर केली होती. ती मला वाढू लागली. मी विचारलं, 'बांधून देता का? बाबूजींकडे जायचंय. तिथे खाईन व त्यांनाही देईन." त्या माउलीनं आनंदाने चार भाकर्‍या, लोणी, खर्डा आणि झुणका मला बांधून दिला. मी ती अमृततूल्य शिदोरी घेऊन सावरकर न्यासाच्या कार्यालयात पोहोचलो. "अरे ये, तुझीच वाट पाहात होतो.." कुठनंतरी काही कामाचे पेपर्स यायचे होते आणि ते बाड मला बाबूजी देणार होते. ते ठाण्याला भगवंतरावांकडे पोहोचवायचं होतं.. "थोडं जेवायचं आणलं आहे.. आपण जेऊया का?" झुणकाभाकर पाहताच बाबूजी मनोमन सुखावले.. कार्यालयात आम्ही दोघंच होतो. "अरे काय योग बघ, कालच मी थोडा वाळा आणून त्या मडक्यात ठेवला आहे.. आता झुणकाभाकर खाऊ अन् वाळ्याचं गार पाणी पिऊ.." आम्ही तो भाकरतुकडा खाल्ला.. "कुठून आणलास रे? कोण या सुगरण बाई?" बाबूजींनी मनापासून दाद दिली.. आणि अचानक त्या दुपारी माझं भाग्य उजळलं.. 'फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार..' जेवणानंतर बाबूजी खुर्चीत बसल्याबसल्या सहजच गुणगुणू लागले.. ! मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो होतो ते मला प्रशस्त वाटेना. मी उठून त्यांच्या पायाशी बसलो.. "फिरत्या, चाका.. आकारान्त शब्द आहेत. तो आकार स्वच्छ आला पाहिजे, निकोप पाहिजे. नारायणराव बालगंधर्वांच्या तोंडून कधी 'विठ्ठल' हा शब्द ऐकला आहेस का? ठ ला ठ असला तरी त्यात मार्दव हवं, ममत्व हवं.." बाबूजी बोलत होते.. मी ते ऐकत होतो, शिकत होतो.. गाण्याच्या कुठल्याही क्लासात न शिकवली जाणारी अनमोल शिकवणी माझ्या पदरात पडू लागली..! "वेडा कुंभार..!" हे शब्द म्हणताना त्यात प्रेम हवं, भक्ति हवी.. अगदी हळवेपणे म्हटले पाहिजेत हे शब्द.. बर्र का!" 'तूच मिसळसी सर्व पसारा..' "हे गाताना आपण एखाद्या सख्याशी, सुहृदाशी जसं सहजच परंतु आपुलकीनं बोलतो ना, ते भाव आले पाहिजेत.. अरे तू विठ्ठलाशी बोलतो आहेस, त्याच्याशी संवाद साधतो आहेस असं वाटलं पाहिजे ना त्याला? तुझी हाक त्याच्यापर्यंत पोचायला तर हवी!" "काय म्हमईवाले, कळतंय का आम्ही काय म्हणतोय ते?!" :) 'तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार..' "अण्णाची आठवण येते रे.. इतकं सुरेख आणि एकटाकी लिहायचा..!" बाबूजी अचानक हळवे झाले.. ज्यांच्यासोबत अर्धाअधिक काळ केवळ भांडण्यातच गेला होता, त्या अण्णा माडगुळकरांच्या आठवणीनं त्या सावरकरभक्ताला अचानक भरून आलं.. मंडळी, मी साक्षिदार आहे या घटनेचा! "आणि बर्र का, 'नसे अंत, ना पार..' ची तान अगदी छान गेली पाहिजे बर्र का. तिथं घसरून पडता उपेगाचं न्हाई!" :) बाबूजी मुडात असले म्हणजे मधुनच कलापुरी शब्द वापरायचे! :) 'घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे.." "एकेक स्वर तोलूनमापून लावायला हवा..तसा तो लागायला हवा. तसा मी प्रयत्न केला आहे.."! 'प्रत्येकाचे' चा उच्चार प्रत्त्येकाचे..' असाच आला पाहिजे.. तो शब्द फ्लॅट लागता कामा नये.. 'दैव' शब्दाचा उच्चारदेखील अगदी वळणदार हवा..!" 'मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार..' "आता हेच बघ रे म्हमईवाल्या.. मला काय म्हाईत की तू भाकरतुकडा आणशील अन् माझ्या तोंडात लोणी पडेल?! पण आत्ता या क्षणी अशी किती माणसं आहेत की त्यांच्या मुखी हे लोणी नाही..आहे तो फक्त अंगार..! खरं सांग, आहे की नाही?!" गाणं म्हणजे काय. ते शिकणं म्हणजे काय, हे मला कळत होतं..! गाण्यातले भाव, शब्दोच्चार, स्वर लावण्याची पद्धत, बालगंधर्व, हिराबाई... अनेक विषयावर ते बोलत होते, मी ऐकत होतो, शिकत होतो.. अजूनही शिकतोच आहे.. कारण बाबूजींचं प्रत्येक गाणं हे त्या पांडुरंगाच्या घटांप्रमाणेच आहे.. ज्याच्या उतरंडीला अंत नाही, ना पार..! आपण आपलं शिकत रहायचं, ऐकत रहायचं..! त्यातलीच थोडीशी झुणकाभाकर घेऊन मी ती ललीमावशीला नेऊन दिली. तिथून जवळंच घर होतं बाबूजींचं.. विठ्ठलाकडची शिकवणी संपली होती.. झुणकाभाकर घेऊन रखुमाईकडं चाललो होतो..! -- तात्या अभ्यंकर.

वाचने 11888 वाचनखूण प्रतिक्रिया 42

ऋषिकेश 04/10/2010 - 14:21
हृद्य आठवण!

In reply to by ऋषिकेश

श्रावण मोडक 04/10/2010 - 16:55
हेच, असेच!

In reply to by ऋषिकेश

सहज 04/10/2010 - 18:17
हृद्य आठवण!

In reply to by ऋषिकेश

प्रभो 04/10/2010 - 19:12
हृद्य आठवण!

मेघवेडा 04/10/2010 - 14:56
विठ्ठलाकडची शिकवणी संपली होती.. झुणकाभाकर घेऊन रखुमाईकडं चाललो होतो..! छान! सुंदर लिहिलंय तात्या. मनापासून आवडले! :)

स्वानंद मारुलकर 04/10/2010 - 15:09
नवी दृष्टी दिलीत... ... गाण्याकडे आणि आयुष्याकडे पहायची...

विंजिनेर 04/10/2010 - 16:29
सुंदर. सहज सोपी आठवण खुलवण्यार्‍या लिखाणाची हातोटी निर्विवाद. असा गुरू लाभावा हे तुमचं भाग्यच.

धमाल मुलगा 04/10/2010 - 16:52
हे असलं काही लिहावं तर तात्यानी! साला, घटनेचं सोनं कसं करुन टाकावं ते कळतं :) मस्त आठवण तात्या...आणि खुलवलीही छानच!

महाबळ 04/10/2010 - 18:36
खरोखरंच भाग्यवान आहात तुम्ही... अश्या थोर लोकांबरोबर काही थोडे क्षण लाभणं म्हणजे पर्वणीच :)

समंजस 04/10/2010 - 19:05
लेख तात्या :) गाणं आवडतं परंतू कळत नसल्यामुळे गाण्यातले बारकावे तेवढे सोडले :) [बाकी चांगल्या गाण्याच्या आणि चांगलं गाणार्‍यांच्या विषयी असलेल्या तुमच्या वेडेपणा बद्दल काय बोलावे :) ]

प्रदीप 04/10/2010 - 19:52
अगदी नकळत प्रारब्धी आलेल्या अनमोल क्षणांची मौलिक आठवण शेयर केल्याबद्दल धन्यवाद. हे असेच असते-- अनेकदा प्रयत्न करूनही काहीही हातांत येत नाही. त्याउलट त्या दृष्टिने मुद्दामहून म्हणून प्रयत्न न करता देखील असे काही झळाळून जाणारे झोळीत पडते. आनंद वाटला हे वाचून.

In reply to by प्रदीप

चतुरंग 04/10/2010 - 23:02
अचानक सुखावणारे असे अमूल्य क्षण वाटल्याबद्दल धन्यवाद तात्या! :) रंगा

In reply to by प्रदीप

नंदन 05/10/2010 - 00:09
अगदी नकळत प्रारब्धी आलेल्या अनमोल क्षणांची मौलिक आठवण शेयर केल्याबद्दल धन्यवाद. हे असेच असते-- अनेकदा प्रयत्न करूनही काहीही हातांत येत नाही. त्याउलट त्या दृष्टिने मुद्दामहून म्हणून प्रयत्न न करता देखील असे काही झळाळून जाणारे झोळीत पडते.
सहमत आहे. गाण्यातल्या त्या 'आ'कारांचे निकोप, स्वच्छ आकार प्रथमच ध्यानी आले.

कौशी 04/10/2010 - 20:03
तात्या अजुन वाचायला आवडेल.... तुमचे लिखाण खुप छान असते. खुप आवड्ते

अर्धवटराव 04/10/2010 - 20:45
नशीब नशीब म्हणातात ते हेच. कुठलं व्रतवैकल्य, अनुष्ठान केलं तात्या तुम्ही ? आणि कधि ? जे तुम्हाला असल्या लोकांचा प्रत्यक्ष सहवास लाभला... या शिदोरीला तोड नाहि. अशेच चार घास आमच्याहि तोंडी घालत जा मालक. (भुकेला) अर्धवटराव

डावखुरा 04/10/2010 - 21:27
तात्या हे गाणे आम्हा रसीकांपर्यंत् पोहचवल्याबद्दल आभार् ! ग. दि. मांच्या शब्दांतली ताकद ह्या गाण्यात मस्त एकवटली आहे. "घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !" त्यावर् बाबूजींचा आवाज व संगीत् ही तर् पर्वणीच् ! व्वा - जुन्या गाण्यांना तोड नाही हे खर्ंय ! जियो तात्या...जुग जुग जियो...

तिमा 04/10/2010 - 21:27
व्वा तात्या! प्रसंग छान खुलवलाय. अगदी मोरपिशी आठवण.

वाटाड्या... 05/10/2010 - 00:32
अश्याच आठवणीवर आयुष्य काढता येतं...हे नक्की...साला अजुन काय पायजे जगायला? ४ घास आणि छान गाणं...बास...काय तात्या? - (विद्यार्थी) वाट्या...

शिल्पा ब 05/10/2010 - 01:44
खूपच सुंदर आठवण !! छान लिहिले आहे..असेच लिहित चला.. अवांतर: झुणका, भाकर, लोणी अन खर्डा (ठेचा?) वाचूनच तोंडाला पाणी सुटले. अतिअवांतर : रोशनी हि मालिका पूर्ण करा असा आग्रह.

विकास 05/10/2010 - 01:45
एकदम हृद्य आठवण! अजून येउंनदेत. अवांतरः ज्या गदीमांनी "विठ्ठला तू वेडा कुंभार" असे म्हणत कुंभाराचे एक वेगळेच वर्णन केले, त्यांनीच त्या कुंभाराला गुरूच्या रूपात बघत म्हणले: कुंभारासारखा गुरू नाही या जगात वर मारतो धपाटा आत आधाराचा हात....

शुचि 05/10/2010 - 03:46
>> 'दैव' शब्दाचा उच्चारदेखील अगदी वळणदार हवा..!" 'मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार..' >> खरय. हृदयातील आठवणी अशाच येऊ द्या, व्यक्त व्हा. आवडलं.

विसोबा खेचर 05/10/2010 - 11:23
आपुलकीनं प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकवरांचे मनोमन आभार.. आपल्या प्रतिसादांमुळेच माझ्यासारख्या कडमड्या लेखकाचा हुरुप वाढतो.. सर्व वाचनमात्रांचेही आभार.. तात्या. -- मिथुनदा अंमळ चिंताग्रस्त वाटताहेत, पण मुनमुन मात्र सुखाने विसावली आहे त्यांच्यावर! :)