वडिलोपार्जित मालमत्ता
एका दिवशी भारतात दोन बालके जन्मली. एक होते अब्जोपती कारखानदाराचे मुल तर दुसरे जन्मले त्याच कारखान्यातल्या शिपायाच्या घरात. केवळ मुल म्हणून बघितले तर दोघेही सारखी. एकाच वयाची, एकाच वेळी जन्मलेली. फक्त ते कोणा पोटी जन्मले या फरकाने त्यांचे एकूण आयुष्य एकमेकांपेक्षा वेगळे असणार हे नक्की. अश्या वेळी ह्या दोघांना मिळणार्या संधीमधे कमीत कमी फरक निर्माण व्हावा म्हणून सरकार विविध उपाय योजना करते. जसे निम्न उत्पन्न गटासाठी आरक्षण, मागास जमातींसाठी शिक्षण व नोकरीमधे आरक्षण, शिक्षणाच्या फी मधे सवलत अथवा सुट, शिक्षण घेतायेण्याच्या पात्रतेत सवलत/सुट वगैरे वगैरे.
मात्र इतके सारे असूनही केवळ वडिलोपार्जित संपत्तीमुळे त्या दोन व्यक्तींमधे कधीही भरून न येणारा फरक तयार होतो. श्रीमंत पालकांचा मुलगा हुशार (+कर्तबगार वगैरे वगैरे) आहे व गरीब पालकांचाही तितकाच हुशार (+कर्तबगार वगैरे वगैरे) आहे तरीही श्रीमंत पालकाच्या मुलांचे एक पाऊल नेहमी पुढेच राहते. (अपवाद अगदीच क्वचित). आर्थिक दृष्ट्या श्रीमंतांची मुले/थेट नातलग शुन्यापासून सुरवात न करता थेट "क्ष" किमतीपासून सुरवात करतात.
आपसुकच श्रीमंताच्या वारसाला संपत्ती क्ष पासून पुढे वाढवण्याची जबाबदारी असते. तर गरीबाच्या मुलाला क्ष पर्यंत पोचणेच कठीण असते कारण अधिक आर्थिक बळामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतो व गरीब तसाच राहतो. ह्यावर उपाय काय? आपल्याकडे जी गरीब व श्रीमंत यातील दरी वाढते आहे याला ही "वडिलोपार्जित मालमत्ता" किती कारणीभूत आहे? जरा विचार केल्यावर जाणवतं की वडिलोपार्जित मालमत्ता वारसाकडे पूर्णपणे जाणे याचाही ह्या वाढत्या दरीत हातभार आहे.
म्हणून मी शोध घेतला की विविध देशांत हे असेच चालु आहे का? तेव्हा माझ्या वाचनात [ इन्हेरीटन्स टॅक्स ] म्हणजे वारशावरील कर आला. तुमच्यापैकी बर्याच जणांना हा आधिच माहित असेल कदाचित पण ही माहिती माझ्यासाठी नवी होती. हा कर म्हणजे ह्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील "करेक्शन" झालं. यामुळे सरकार मालमत्तेवर त्याच्या मालकाच्या मृत्यूनंतर कर आकारणी करतो व तो पैसा समाजोपयोगी कामात तर वापरतोच. पण त्याच बरोबर (काहि प्रसंगी कोणत्याही विषेश कर्तृत्त्वाशिवाय) मिळालेल्या ह्या पैशावर चापही बसतो. अर्थातच निम्न उत्पन्न गटात सरकारकरवी पैसा विभागला गेल्याने त्याच्या उत्पन्नात वाढ तर वारसाच्या उत्पन्नात घट होते व दोन स्तरांमधील दरी तितक्या प्रमाणात रुंदावत नाही. अर्थात प्रत्येक देश (व काही अमेरीकेतील राज्ये) यांच्या कर आकारण्याच्या पद्धती, पात्रता वेगवेगळी आहे. काही देश थेट वारस (रक्ताचे नातलग) असल्यास हा कर माफ करतात वा सवलत देतात.
तर काथ्याकुटासाठी प्रश्न असे आहेत:
१. भारतात असा वडिलोपार्जित मालमत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी कोणता कायदा आहे का? असल्यास कोणता व तो प्रत्यक्षात वापरला जातो का?
२. नसल्यास त्यामागे काही कारणे आहेत का? व असा कायदा तुम्हाला भारतात आवश्यक वाटतो का?
३. अश्या कायद्याचे काही तोटे आहेत का? कारण भारताने इस्टेट ड्युटी अॅक्ट १९८५ सली विसर्जित केला होता.
४. तुम्ही भारताबाहेर रहात असाल, गेला असाल अथवा माहिती असेल तर विविध देशांत अश्या प्रकारच्या कायद्याबद्द्ल सांगावे. त्यामुळॅ तिथे दिसणारे फायदे/तोटेही विषद करावेत
प्रतिक्रिया
वेल्थ टॅक्स
ऋषीकेष माफ करा किंचीत अवांतर
हॅ हॅ हॅ
मार्मीक नीरीक्षण ....
+१
वडिलोपार्जित संपत्ती
वडिलोपार्जित संपत्ती हा मामला
सहमत.... मात्र...
रोचक धागा
सरकारने नियंत्रण, अंकुष अश्या
सरकारने नियंत्रण, अंकुष अश्या
धंदा
खुलासा
देशाच्या संपत्तिचे समान वाटप
फरक
एकच आठवले
ही वरची लोकं जर तुमच्या
इनहेरिटन्स टॅक्स जगात फक्त
इथे जर लोकांना कळाले की वारसा
मात्र भारतात वेल्थ टॅक्स आहे
>> भारत हा मुळातच हाय टॅक्स
थत्ते काका. टॅक्स हाय आहे की
सगळे टॅक्स मनात धरून.....भारत
काही हाय टॅक्स देशात सरसकट
चांगली चर्चा
ऑ