Skip to main content

द्रष्टेपणा की न्यूनगंड की म्हातारचळ की आणखी काही?

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 20/08/2010 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांमध्ये काही मनोरंजक बातम्या वाचनात आल्या. वातावरण बदलावरुन किंवा इतर काही कारणावरून मानवप्राण्याच्या भवितव्याबद्दल (नुसतीच) बोंब मारण्याच्या सध्याच्या फॅशनला अनुसरूनच या बातम्या आहेत. पण यात ज्यांचा उल्लेख आहे ते कोणी सोमेगोमे नाहीत. एक आहे प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि दुसरा जैववैज्ञानिक. त्यांची मते बहुतेकाना टोकाची वाटतील यात शंका नाही आणि त्यातल्या एकाने सांगितलेला उपाय तर एखाद्या हॉलिवुडी विज्ञानपटात शोभून दिसेल असाच आहे. पहिली बातमी वाचली बीबीसीवर. खाली त्या बातमीचा दुवा दिलेला आहे. सेलिब्रिटी (मराठी शब्द?) भौतिकशास्त्रज्ञ स्टीवन हॉकिंग यांनी मानवजात वाचवण्यासाठी पृथ्वी सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. कारण म्हणे पृथ्वीवर उल्का आदळण्याचा धोका आहे किंवा अण्विक संहार व्हायचा धोका आहे किंवा पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत लवकरच संपुष्टात येतील किंवा सूर्याचं वय झालंय आणि लवकरच (फक्त ७.६ अब्ज वर्षांत) तो पृथ्वीला गिळंकृत करेल. आपल्या ग्रहमालिकेत पृथ्वीसदृश दुसरा ग्रह नसल्याने आपल्याला ४.२ प्रकाशवर्षे दूर (की जवळ?) असलेल्या प्रॉक्सिमा सेंटॉरी नामक तार्‍याच्या ग्रहमालिकेत जाऊन शोध घ्यावा लागेल हे ही त्यांनी सांगितलंय. म्हणजेच कुठे जायचं, कसं जायचं हा सगळा विचार त्यांनी करुन ठेवला आहे. आता फक्त कोणी जायचं हेच ठरवायचं बाकी आहे. बीबीसी वरची बातमी पृथ्वी सोडा किंवा नष्ट व्हा दुसरे महाशय आहेत ऑस्ट्रेलियन जीवशास्त्रज्ञ फ्रँक फेनर. देवीच्या विषाणूंचा नायनाट करण्यात यांनी फार मोठा वाटा उचलला होता. सध्या ते साधारण ९५ वर्षांचे असावेत. यांच्या मतानुसार येत्या १०० वर्षांमध्ये मानवप्राणी नष्ट होणार. त्यांच्या म्हणण्यानुसार वातावरण बदल आणि लोकसंख्येचा स्फोट या दोन प्रमुख कारणांमुळे इतर अनेक प्राण्यांप्रमाणे माणूसही नष्ट होणार. औद्योगिकीकरण आणि एकंदरच नागरीकरण हे याचे मूळ कारण आहे कारण आदिम अवस्थेत माणूस जवळजवळ ४०-५० हजार वर्षे तगला आणि जगला. फ्रँक फेनर हा सगळा 'साठी बुद्धी नाठी' असा प्रकार आहे का? की काही दुर्दम्य आशावादी आणि अध्यात्मवादी म्हणतात तसे हे आत्यंतिक मानवी न्यूनगंडाचे उदाहरण आहे? की तर्काधिष्ठित विचारांचे योग्य अनुमान आहे?

वाचने 8500
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

अंतराळवैज्ञानिकांच्या मतानुसार प्रत्येक सुर्यमालेचे आयुष्य असते. आकाशगंगा फिरता फिरता दुसर्‍या आकाशगंगेत मिसळतात. सुर्य नष्ट पावता त्या सुर्यावर अवलंबून अन्य ग्रह नष्ट होतात. ब्लॅकहोल, अशनी, सुर्याचे ऑर्बीट बदलल्याने तापमानातील बदल, त्यामुळे तात्वीकदृष्ट्या पृथ्वीला नष्ट होण्याचा धोका आहेच. गेले अनेक वर्ष मनुष्य अंतराळात वस्ती करायला जाणार ही कल्पना निदान वैज्ञानिकांना नवी नाही. आता हे सगळे कधी व कसे होणार.... कल्पना नाही काथ्याकूट वाचत आहे.

आपल्याला अनेक अद्वितीय वैज्ञानिक दिसतात, जे आपल्या क्षेत्रातल्या त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे तत्त्वज्ञ, द्रष्टे, असामान्य बुद्धीमत्तेचे मानले जातात. त्यांची बुद्धीमत्ता नाकारायची नाही, पण बऱ्याच वेळा त्यांना आपल्या क्षेत्रातल्या ज्ञानाच्या आधारे एखादं अधिक विशाल भाकीत लोक करायला सांगतात, किंवा त्यांनाच ऊर्मी होत. दुर्दैवाने ते आपल्या क्षेत्रापासून जितकं दूर जातात तितका त्यांचा अधिकार कमी कमी होत जातो. मात्र त्यांची विधानं आत्यंतिक अधिकाराने, अभ्यासाचं पाठबळ असताना केल्याप्रमाणे घेतली जातात. बीबीसीवर एखादं विधान करणं व फिजिकल रिव्ह्यू लेटर्स मध्ये किंवा लान्सेट मध्ये विधान करणं यात फरक आहे. थोर लोकांची तशा महत्त्वाच्या जर्नल्समधली विधानं स्वीकारावीत, व मीडियाला दिलेली विधानं थोडी हलक्यानेच घ्यावीत. अशी नंतर चुकलेली विधानं करणारे शास्त्रज्ञ, तत्वज्ञ खंडीभर आहेत. माणूस स्वतःचा नाश करून घेईल का, याबाबत हॉकिंग काही का म्हणे ना? सुमारे ७.६ बिलियन वर्षांनी आपल्याला सूर्य बदलावा लागणार हे निश्चित. त्यासाठी आजच प्रयत्न करावे का? तुम्हीच ठरवा...

In reply to by राजेश घासकडवी

म्हणजे या विधानांबाबत ते फार गंभीर नसावेत असं तुम्हाला सुचवायचं आहे का? अब्जावधी वर्षांनंतर होण्याची शक्यता असलेल्या घटनेबद्दल आताच विचार करण्यात काहीच हशील नाही, पण दुसर्‍या दुव्यातल्या लेखात ज्यांचा परिणाम तुलनेने बर्‍याच नजिकच्या भविष्यकाळात होईल अशा इतर काही घटकांबद्दल मुद्दे मांडलेत. ते खरे मानले तर कदाचित लगेच कृती करण्याची आवश्यकता भासेल. पण मग ते खरे मानायचे की नाही हा प्रश्न पडतो. अर्थात कोणताही प्रश्न पडू न देता 'व्हायचे ते होईल, आपण विचार करून काय होणारे?' असं म्हणून स्वस्थ राहणे हा आपला सर्वसामान्य आणि सर्वमान्य पवित्रा आहेच पण तरीही उत्सुकता वाटतेच.

In reply to by नगरीनिरंजन

दुसऱ्या दुव्यातल्या लेखात त्यांनी अणुयुद्धाची शक्यता वाढणार, पर्यावरण वगैरे मुद्दे मांडलेले आहेत. त्यावर एक सुजाण, हुशार मनु्ष्य यापलिकडे त्यांचा काय अधिकार आहे? त्यांविषयी त्या विषयांतले महान लोक काय म्हणतात हे पाहावं, इतकंच. बरं, हे धोके टाळण्याचा प्रयत्न करण्यासाठी जितका खर्च येईल त्यापेक्षा कितीतरी पट अधिक खर्च परग्रहावर जायला येईल यात वाद नसावा.
अर्थात कोणताही प्रश्न पडू न देता 'व्हायचे ते होईल, आपण विचार करून काय होणारे?' असं म्हणून स्वस्थ राहणे
हे बरोबर नाही. मानवजातीने खूप मोठे प्रश्न सोडवले आहेत. महाभयंकर रोगराई, सतत पडणाऱ्या दुष्काळांतून होणारी जीवहानी, अन्नधान्याचा तुटवडा, माल्थुशियन क्रायसिस, लोकसंख्येचं नियंत्रण... हे सगळे शंभर ते दोनशे वर्षांपूर्वी भेडसावत असायचे ते आता सुटल्यात जमा आहेत. मॅन मूव्ह्ज इन मिस्टिरियस वेज हिज प्रॉब्लेम्स टू रिझॉल्व्ह...

In reply to by राजेश घासकडवी

दुर्दैवाने ते आपल्या क्षेत्रापासून जितकं दूर जातात तितका त्यांचा अधिकार कमी कमी होत जातो. मात्र त्यांची विधानं आत्यंतिक अधिकाराने, अभ्यासाचं पाठबळ असताना केल्याप्रमाणे घेतली जातात.
सर्नचा प्रयोग हॉकिंगच्या अभ्यासक्षेत्रापासून ० मिमि अंतरावर आहे. तिथे महाशय म्हणाले कि प्रयोगानंतर अखिल विश्व पृथ्वीपासून चालू करून प्रकाशाच्या गतीने नष्ट होतन्जाणा र आहे. आता सर्वात मोठ्या भौतिकीनं असं म्हटल्यावर आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या जेवीला घोर लागणार नै का?
व मीडियाला दिलेली विधानं थोडी हलक्यानेच घ्यावीत
सदर विधानास देखिल तीच ट्रीटमेंट द्यावी काय? कि सामान्य माणसाने विज्ञानात रस घेऊ नये असे दुचवायचे आहे. शेवटी हॉकिंग + बी बी सी ला असा सल्ला आहे तर ...

भौतिकशास्त्रज्ञ स्टीवन हॉकिंग जर म्हणत असतील तर ते खरेच असावे. २०१२ ची भाकिते पण असेच काहीसे सान्गत आहेत. Let,s hope for the Best.

ज्या मातेनी जन्म दिला त्या मातेच्या जीवनापेक्षा माझे जीवन मी महत्वाचे मानीत नाही. आख्खे जग भले हि माझ्या मातेला सोडून जावो, मी मात्र इथून हालनार नाही. माझ्या मातेवर होत असलेल्या वेदनांवर फुंकर घालायला इथे कोण नको का ?

In reply to by गांधीवादी

श्री. गांधीवादी यांच्या प्रतिसादात २०१२ सिनेमातील श्री. चार्ली फ्रॉस्ट (वूडी हॅरेल्सन) दिसले. :-)

जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट कधी ना कधी मरतेच, याच न्यायला अनुसरून कधीतरी पृथ्वीचा नाश होणार हे निश्चितच...पण कधी हे भाकीत करण्याचे काम शास्त्रज्ञ करीत असतात...आता हॉकिन्स यांची कल्पना किंवा भाकीत म्हणू तर खूपच हॉलीवूड पद्धतीचे वाटते आहे...आणि आपण विश्वास ठेऊन न ठेऊन काय होणार? आपण काय करू शकतो ? लोकसंख्या नियंत्रण आणि प्रदूषण नियंत्रण आपल्या हातात आहे पण आपण काही त्याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही.. इतरांची मते वाचण्यास उत्सुक.

In reply to by शिल्पा ब

प्रदूषण नियंत्रणाबाबत तर सध्या 'मच अडू अबाउट नथिंग' अशी परिस्थिती आहे. वरवरच्या मलमपट्ट्या करुन म्हणजे कापडी पिशव्या वापरुन, दिवे बंद करुन फार काही फरक पडेल असं वाटत नाही. विघटन (dismantling) हा एकच उपाय आहे परत फिरण्याचा असं वाटतं. अध्यात्मात जसं खरा मोक्ष मिळण्यासाठी मध्येच मिळालेल्या सिद्धींचा मोह टाळावा लागतो तसा खरी वैज्ञानिक प्रगती करण्यासाठी आपण हे प्रत्येक वस्तूचं भरमसाठ उत्पादन, औद्योगिकीकरण वगैरे टाळायला हवं असं वाटतं. सगळं ज्ञान निसर्गाशी फटकून राहण्यासाठी न वापरता निसर्गाशी तादात्म्य पावण्यासाठी वापरलं तर फक्त खगोलीय (celestial) दुर्घटनांचाच धोका उरेल.

In reply to by नगरीनिरंजन

बरोबर आहे...recycled वस्तू वापरणे, त्यांचे उत्पादन करणे, प्लास्टिकचा वापर कमीतकमी करणे (टाळणे पूर्णपणे शक्य होईल असे वाटत नाही ), रासायनिक वस्तू , केमिकल वस्तू अगदी कमीतकमी वापरणे या गोष्टी आपण करू शकतो..वैयक्तिक पातळीवर मी करते...पण त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या कमी फायद्यात येतील म्हणून हे उपाय करतील असे वाटत नाही...

सचिन तेंडूलकरचा स्क्वेअर कट किंवा स्ट्रेट ड्राईव्ह परफेक्ट आहे कि नाही व नसल्यास तो कशाप्रकारे परफेक्ट होईल यावर कधीही क्रिकेट न खेळलेली किंवा गल्लीबोळात खेळलेली मंडळीसुद्धा कधी कधी फार चर्चा करतात......

सेलिब्रिटी (मराठी शब्द?) भौतिकशास्त्रज्ञ स्टीवन हॉकिंग यांनी मानवजात वाचवण्यासाठी पृथ्वी सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे.
खीक खीक त्यांनी पृथ्वी सोडून जाण्याचा नाही तर लवकरच मानवांनी रहिवासासाठी इतर एखादा ग्रह शोधुन काढला पाहिजे येवढेच म्हणले आहे. साला एकाच टेबलला बसलो होतो आम्ही, आम्हाला विचाराना तुम्ही.

नगरी आज जिवंत आहेस ना मग आजची काळजी कर ना लेका. उद्या काय होणार आणि काही नाही ते उद्या बघता येईल.उद्या साठी आज का बरबाद करतोस.

In reply to by वेताळ

आजची काळजी कर, वर्तमानात रहा वगैरे सल्ले अगदी सोयीस्कर असतात. इतरवेळी मात्र भविष्याचा विचार करुन निर्णय घेणे कसे आवश्यक आहे या वर अगदी एकमत असते. आणि पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वानाच असते, तोच फरक आहे इतर प्राण्यांमध्ये आणि माणसात. शिवाय पुढच्या गोष्टींचा विचार केला म्हणजे आज बरबाद होत नाही. किंबहुना काल केलेल्या योजनांमुळे आजची काळजी मिटली आहे म्हणून आता पुढचा विचार करायचे सुचते आहे. फक्त आज, आत्तापुरतंच विचार करुन जगायचं असतं तर हा सगळा मानवी संस्कृतीचा आणि नागरीकरणाचा डोलारा उभाच कशाला राहिला असता? इतर प्राण्यांसारखे आपणही राहिलो असतो. त्यामुळे माझा आज बरबाद होतोय की नाही यावर चर्चा न करता ते शास्त्रज्ञ म्हणताहेत त्यात किती तथ्य वाटते आणि त्यासाठी आपण काय केले पाहिजे यावर काही मत असल्यास द्यावे.

सौर वादळ मोठ्या प्रमाणात झाल्यास पॄथ्वीचा नाश (पॄथ्वीवरच्या जीवांचा) केव्हाही होउ शकतो. २०१२ मधे असे वादळ होणार आहे असं म्हणतात... बाकी खरं खोट त्या भास्करास ठावुक.

In reply to by मदनबाण

सध्या या सौर वादळांची चलती आहे; तेव्हा याच विषयात घुसायचा विचार आहे! मूळ धाग्याबद्दलः शास्त्रज्ञांची बाबागिरी म्हणा हवं तर! ;-) राजेशचा प्रतिसाद पटला!

In reply to by मदनबाण

सौर वादळे होण्याचा किंवा अशनी आदळण्याचा धोका बराच मोठा आहे आणि त्याची शक्यता पण भरपूर आहे. तरीही गेल्या कित्येक वर्षांमध्ये असं झालं नाही. याचं काय कारण असेल? निव्वळ योगायोग जरी म्हटलं, तर मग आताच त्याचा जास्त धोका का जाणवायला लागलाय? केवळ आपल्याला त्याचं ज्ञान झालं आहे म्हणून?

असेच होईल असे म्हणता येणार नाही.त्याचे संकेत देणाय्रा घटना थोडक्या नाहीत.लेह ढगफूटी,चीनमधल्या दरडी,पाकचा पूर,---

Global Warming च्या दहशती त्यांच्या समयसारिणीपेक्षा खूप आधी दिसू लागल्या आहेत. बाकीची भाकितेही खरी ठरतील कारण अलीकडे measuring instruments इतकी चांगली व अचूक मिळतात कीं काय होणार ते बर्‍यापैकी अचूकपणे सांगता येते. (भूकंप सोडून!) काळे