कहाणी मंगळागौरीची
आटपाट नगर होते. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, 'अल्लख' म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई.
ही गोष्ट तिने नवर्याला सांगितली. त्याने तिला एक युक्ती सांगितली. "दाराच्या आड लपून बस, 'अल्लख' म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल." अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. "मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बोवांनी उ:शाप दिला.
बोवा म्हणाले, "आपल्या नवर्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्रे परिधान कर, रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल," असे बोलून बोवा चालता झाला.
तिने आपल्या पतीस सांगितले. वाणी रानात गेला. घोडा अडला, तिथे खणले, देवीचे देऊळ आहे, जिरेजडिताचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची मुमुर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. 'वर माग म्हणाली. "घरदारं आहेत, गुरेढोरे आहेत. धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दु:खी आहे."
देवी म्हणाली, "तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे !"
त्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीने "माझ्या मागल्या बाजुला जा, तिथे एक गणपती आहे, त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल," असे सांगितले. नंतर देवी अदृश्य झाली.
वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, पोटभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला तो आपला मोटेत आंबा एकच आहे. असे चार-पाच वेळा झाले.
गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितले, "तुझ्या नशिबी एकच फळ आहे." फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातले. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. नवमास पुर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयंतांना मोठा आनंद झाला.
तो दिवसामासी वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी "लग्न करा," म्हणाली, "काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाही," असा माझा नवस आहे. असा जबाब दिला.
काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले. मामा-भाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झाले? वाटेत एक नगर लागले, तिथे काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकींचे भांडण लागले, एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी म्हणू लागली, "काय रांड द्वाड आहे, काय रांड द्वाड आहे!"
तेंव्हा ती मुलगी म्हणाली, "माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे!"
हे भाषण मामांनी ऐकले. त्यांच्या मनात आले, "हिच्याशी आपल्या भाच्याचे लगीन करावे म्हणजे हा दीर्घायुषी होईल."
परंतु हे घडणार कसे" त्या दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झाले" त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढे कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरे होईल, त्याला पुढे करून वेळ साजरी करू, म्हणून धर्मशाळेत पाहू लागले. मामा-भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेले, गोरज लग्न लाविले. उभयतांना गौरीहरापाशी निजविले. दोघे झोपी गेली.
मुलीला देवीने दृष्टांत दिला, "अगं मुली, तुझ्या नवर्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा सरा जवळ ठेव. दुध पिऊन सर्प कर्यात शिरेल. आंगच्या चोळीने तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे !"
तिने सर्व तयारी केली. दृषांताप्रमाणे घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला, भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिर्हाडी गेला. मामा-भाचे मार्गस्थ झाले.
दुसरे दिवशी काय झाले ? हिने सकाळी उठून स्नान केले, आपल्य आईला वाण दिले. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात हार घातला.
पुढे पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, "हा माझा नवरा नाही, मी याजबरोबर खेळत नाही." रात्रीची लाडवांची इ अंगठीची खूण पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडणार ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राम्हण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीने धुवावे, आईने पाणी घालावे, भावांनी गंध लावावे आणि बापाने विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले.
इकडे मामा-भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राम्हणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. लमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचे युद्ध झाले, लमदूत पळून गेले, गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असे-असे स्वप्न पडले. मामा म्हणाला, "ठीक झालं. तुझ्यावरच विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ."
परत येऊ लागले, लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितले, "इथे अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा!"
ते म्हणाले, "आम्ही परान्न घेत नाही."
दासींनी यजमानणीस सांगितले. त्यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्याने घरी नेले. पाय धुताना मुलीने नवर्याला ओळखले. नवर्याने आंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, "तुझ्याजवळ खुण काय आहे?" त्याने लाडवाचे ताट दाखविले. सर्वांना आनंद झाला. भोजन-समारंभ झाला. मामा-भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले.
"तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला," असे म्हणाली.
तिने सांगितले, "मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा!" उद्यापन केले, मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां-आम्हाला होवो आणि आपले सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवीची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
प्रतिक्रिया
मस्तच ! हि कहाणी पण सहीच ग.
धन्यु जागु ताई!!! आज माझी
जागु!... धन्यवाद गं! छान आहे
जागु ताई तू या कहाण्या लिहीत
धन्यु.....मी विचारातच पडले होते.
मांदा आणि दोंद
मांदा आणि दोंद म्हणजे काय?
तात्पर्य
छान...माझ्याकडे चातुर्मासाच
छान! जागु ताई खूप वर्षांनी
जागु ताई
१) गणपतीच्या मूर्तीवर पाय
जाऊ द्या
प्रियाली
पेन
प्रियाली
छान
तिरशिंगराव माणूसघाणे
तिरशिंगराव माणूसघाणे