गरमाईतून थंडाईकडे...
कुठे कुठे गरम झालं की कुठे कुठे नरम लागतं. याउलट काहीजरी थंड पडलं तर इतर कुणीही बंड करू शकतात. म्हणून नेहमी गरम असलेलं फायद्याचं, म्हणजे मग नरम लाभाला तोटा राहत नाही!
जरी थंडाईच्या प्रदेशातली उजळ कांती भाव खाऊन जाते, तरी विषुववृत्तीय शिसव गुणाच्या ब्लैकब्युटीने तथाकथित गोऱ्यांच्या हृदयाचा ठाव घेतल्याचे पुरावे मिळतात. गोरेपणा शितलतेशी निगडीत तर काळेपणा उष्णतेशी. गरम डोक्याची माणसं काटक अन् घाम गाळणारी तर थंड माणसं कशासाठीही दाम मोजणारी.
ठंडाई प्याली की आत्मा थंड होतो, याउलट कडक पाणी प्यालं की थेट स्वर्गाचं द्वार खुलं होतं, सूर्यावर थुंकायचीसुद्धा खुमखुमी सुचते. कडक मालाचा असा जोशपूर्ण मामला दिसत असला तरी थंड पाणी पिण्याची सर गरम पेयाला येत नसते. म्हणूनच काही शौकिनांनी कडक प्याल्यात बर्फाचे तुकडे डुंबवण्याचा प्रघात पाडला आहे. त्यामुळे होतं भलतंच, धड गरम होता येत नाही अन् थंडही पडता येत नाही. नुसती कुसाटं बदलण्यात रात्र घालवावी लागते. बर्फ टाकून रम प्यायल्याने रमी तर खेळता येत नाहीच, रमा बरोबरचा झिम्माही काहीकेल्या जमत नाही! तरीही लोक कडक मालाला थंड करून का पितात तेच उमजत नाही. असो.
शिमल्यात जशी बर्फ खेळायला जत्रा उसळते तितकीच गर्दी कोकणातल्या गरम पाण्याच्या कुंडांवरही आढळते. विषुववृत्तीय लोकांना ध्रुवाकडचे आकर्षण तर थंड प्रदेशातील पर्यटकांना वाळवंटाचं वेड. एकूण काय तर पक्षी जसे थंड-उष्ण किँवा उष्ण-थंड अशी शटल पकडतांना दिसतात तिथे मानवानेही त्यांचं अनुकरण केल्यास बिघडत नाही. परंतु थंडोष्णाची भेसळ करून कोष्ण वातावरणात वावरणे म्हणजे स्वतःभोवती निष्क्रियतेचा कोश विणणे होय. गरम होणे जमत नसेल तर थंड पडावे किँवा शांत राहवत नसेल तर जरूर बंड करावे.
मुका मार शेकायला जसं गरम पाणी लागतं, तसंच वणव्याला वठणीवर आणायला थंड डोकंच लागतं. भडक विचारांनी आगी शांत होत नसतात, उलट धुमसत राहतात. असा पूर्वापार ऐतिहासिक अनुभव आहेच.
पूर्वीची थंड विहिरीतली डुबकी नामशेष होऊन गरम पाण्यात निश्चेष्ट पहुडण्याचा टब न्हाणीघरात ठेवण्याची रीत सध्या आढळते. त्या अपुऱ्या टबाला दोन तोट्या- हॉट अथवा कोल्ड नावाच्या. त्यामुळे बॉडी मोल्ड होत असली तरी बोल्ड बनू शकत नाही. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते यामुळेच. म्हणूनच थंड पाण्यात सूर मारायला शिकले पाहिजे. हात पाय हलवित पोहता यायला पाहिजे. धुवाँधार धबधब्याखाली नाचण्यातली मजा किँवा थरार शॉवरच्या गरमाईत नाहीये मित्रांनो.
तेव्हा तापलेल्या सिमेँटच्या जंगलातून बाहेर पडा. निसर्गाची शितलता अंगोपांगी भिनू द्या. पोळणारा वडापाव हादडण्यापेक्षा नारळाचं थंड पाणी प्या, ऊस खा. (बर्फाळलेला रस पित बसू नका.)
गरमाट पाण्याच्या टबात निद्रिस्त होण्यापेक्षा खोल खोल डोहाचा थंडगार तळ अनुभवण्यात खरी मौज आहे. कोमट शॉवरखाली उड्या मारण्यापेक्षा भरतीच्या लाटा झेलण्यात खरे साहस आहे, प्रसंगी तशा उर्मीँना कवेत घेऊन गरम करता आले तरच तो खरा पराक्रम!
नाहीतरी बटन दाबताच वॉटरपार्कचा वेव्हपूल हिंदोळे घेतोच की. परंतु तशा कृत्रिम लाटा अंगावर घेणे वेगळे अन् सागराशी दोन हात करणे वेगळे.
शेवटी काय तर थंडावलेल्या शरीराला गरम करीत बसण्यापेक्षा गरमागरम शारीर थंडगार करण्यातच कुणालाही उत्साह असतो, स्वारस्य असते, जल्लोशही असतो. नाही का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख वाचत
कुठे कुठे
मला
आमच्या
पण हवा गरम
गंमत ग
तुमचा