"ताज महाल" ~ अशा वादाची गरज आहे का ?
संपूर्ण जगात आपल्या देशाचे अनेक बाबातीत चांगलेच नाव झाले आहे, आणि सध्याच्या संगणक क्षेत्रातील घडामोडीमुळे तर युरोप , अमेरिकेत भारतीय युवक/युवतींना "Brand Ambassador" चा दर्जा प्राप्त झाला आहे या मुद्द्यावर तर अगदी चीन आणि पाकिस्तान यांचेही दुमत नाही. तीच गोष्ट कला, संगीत, व्यापार आणि शैक्षणिक (वैद्यकीय आणि तंत्रज्ञान) क्षेत्रातही जे नेत्रदिपक यश भारतीयांनी मिळविले आहे त्याचा हेवा आणि नवल कित्येक विकसनशील देशांना वाटत आहे.
ही झाली बुद्धिमत्ता संदर्भातील जगभर पसरलेली भारताची ओळख. पण त्याच बरोबर आपल्या उज्ज्वल ऐतिहासिक परंपरे मुळेदेखील "भारत दॅट इज इंडिया" असे नाव आहे ते येथील वास्तुकला, शिल्पकला आणि त्यांच्या हजारो वर्षे टिकून राहिलेल्या सौंदर्यामुळे. खरंय ! सा-या दुनियेतून जे पर्यटक या देशाला भेट देण्यास येतात ते काहीं दिल्ली, मुंबई, कोलकाता अशी गजबजलेली महानगरे पाहायला नक्कीच येत नसावी, तर त्यांना उत्सुकता असते ते येथील शिल्पकलेतील भारताने त्या त्या काळात दाखविलेल्या कौशल्याची आणि सौंदर्यपूजकतेची ! या परंपरेतील एक तेजस्वी माणिक म्हणजे "ताज महाल".
या संस्थळावरील ब-याच सदस्यांनी या स्वप्नवत वाटणा-या शिल्पास भेट दिली असेल, त्याच्या अतुलनिय सौन्दर्याने मोहून गेले असणारच ! ज्यांनी अध्यापि ताज महाल पाहिलेला नसेल तो पाहण्यासाठी आवर्जून जावे इतकी सुंदरता या "प्रीती स्मारकात" आहे. रात्रीच्या वेळी (विशेषत: पौर्णिमेचे वेळी...) तर येथे पर्यटकांचा पूरच असतो (मी दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळा ताज महाल पाहिला आहे, परंतु पौर्णीमेतील याची जादू अजून तरी अनुभवता आलेली नाही.....पाहू या कधी योग येतो ते !)
या ठिकाणी ~ आपल्या संस्थळावर ` ताज महाल कुणी बांधला, कारण काय होते ,कसा आराखडा केला असेल, किती काळ लागला, खर्च किती आला असेल ~~ आदी बाबींचा विचार करण्याची गरज नाही, कारण या तांत्रिक बाबी जवळपास सर्वाना माहित आहेच, नसेल तर गुगलिंग केल्यास झटकन अशा प्रकारची माहिती धो धो आपल्यासमोर येईल. या लेखात जो मुद्दा माझ्यासमोर आहे, तो आहे या स्मारकाच्या बांधकामाच्या सत्यतेविषयी. ही बाब मला ताज भेटीच्या चौथ्या फेरीच्या वेळी (सप्टेंबर २००९ मध्ये) फार तीव्रतेने जाणवली. कारण ताजच्या नेमक्या याच फेरी दिवशी आग्र्यात उसळलेल्या शिया-सुन्नी वाद दंगलीमुळे दोन दिवस संचारबंदी लागू झाली होती, व ताजला भेट देऊन झाल्यानंतर लखनौ रस्त्याला आता संध्याकाळच्या वेळेस गाडी घालू एका असा स्थानिक सल्ला मिळाल्यामुळे आग्रा उपनगरात मुक्काम करणे सक्तीचे झाले. चार मित्रापैकी एकाचे वडील सैन्यात कर्नल पदावर काम करीत असल्यामुळे तानी दिल्ली आग्रा व लखनौ येतील त्यांच्या परिचयाचा (मिलिटरी मध्येच) काम करणा-या अधिकारी मित्रांचे पत्ते व फोन नंबर दिले होते. यापैकी एक मेजर राजिंदर अरोरा याना "संचारबंदी" ची कल्पना असल्याने, तत्काळ आम्ही थांबलो असलेल्या यात्री निवासाकडे आपल्या ड्रायव्हर व एका सैनिकास पाठवून उपनगरात असलेल्या आपल्या घरी आम्हास मुक्कामास येण्याचे निमंत्रण दिले. संध्याकाळ होत आली असल्याने व आग्रा शहरात आता रात्रीच्या जमावबंदी आदेशामुळे जायचा प्रश्नच नसल्याने मेजर अरोरा यांच्या बंगल्यामागे असलेल्या छोट्या बागेत आम्ही पाच मित्र अरोरा कुटुंबीय समवेत तसेच त्या निमित्ताने महाराष्ट्रातील "खडकी कॅन्टोनमेंटमध्ये काही काळ नोकरी केलेले त्यांचे वडील, त्यांचे दोन समवयस्क senior scholars (त्यापैकी एकाचे चिरंजीव पुण्याच्या Symbiosis मध्ये शिक्षण घेत होते) यांच्या समवेत गप्पांची मैफल चांगलीच रंगली.
आमच्या गप्पा या सहाजिकच उत्तर भारत सहलीशी निगडी असल्याने, ताज महालाचा विषय तिथे निघणे स्वाभाविकच होते. ताज विषयी बोलायला सुरुवात कारोतो ना करतो तोच त्या ज्येष्ठ पैकी एक जाट ताडकन उद्गारला. "बेटा उसे ताज महाल मत कहो, वो तेजो महाल ही है, और ऐसे सिर्फ शहजहान ने नही बल्की हमारे राजा मान सिग जी ने बनवाया था, शिव पूजा के लिये. वो तो शहजहान ने आग्रा को जीतने के बाद इसका अपनी बिवी मुमताज का मकबरा बना दिया और यहा वहान इस्लाम कि quotations carve कर दिये अपने कारीगारोन्के बल्बुतेपर ..." आता ही बाब मला तरी नवखी नव्हती कारण खुद्द इथे आपल्या महाराष्ट्रात "ताज" की" तेजो " या आव रावर वेगवेगळया दैनिकांच्या रविवारच्या पुरवण्यामधून, तसेच साप्तहीकामधून चर्चा झडत असतातच. पण त्या ब-याचशा ऐकीव स्वरूपाच्या असल्यामुळे त्याला कोणताही ऐतिहासिक ठोस पुरावा नसतो. मात्र आग्रा येथीलच एका अभ्यासकाला वाटणे... एक वृद्ध जाट गृहस्थ ही बाब ठासून सांगू लागले तेंव्हा मनात म्हटले, चला, या निमित्ताने संचारबंदीची रात्र अशी माहिती मिळविण्यासाठी उपयोगात आणता येईल.
त्यांचाबरोबर तसेच मेजर अरोरा यांच्या वडिलासमवेत झालेल्या चर्चेचा मतितार्थ असा कि.... ताज महालाचे प्रत्यक्षातील नाव "तेज-ओ-महालय" असून ते शिव मंदिर म्हणून राजा मान सिंघ ने बांधले होते. शंकराची आजही आग्र्यात "अग्रेषर" या नावाने देवालये आहेत. ब्रिटीश असो वा स्वातंत्रनंतरचे आपले मायबाप सरकार असो कुणीही मुस्लिमांच्या भावनेला ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करीत होते, करीत असतात, त्यामुळे शिव मंदिराचा या दाव्यातील सत्यता वा फोलपणा याचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. इतकेच नव्हे तर इसवी सन २००० मध्ये सुप्रिम कोर्टाने देखील या संदर्भात हिंदू संघटनांनी दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरविली व "ताज महाल" हे नाव बदलण्यास ठाम नकार दिला..... फाईल बंद झाली. पण तेजो महालाचा विश्वास आग्रा परिसरातील हिंदू, शीख, जात समाज मोठ्या श्रद्धेने जपतो. माझ्या इतिहास अभ्यासानुसार ताज चे संपूर्ण नाव होते "रौझः-इ-मुमताज महाल" कि ज्याचा उल्लेख मोघलकालीन कागदपत्रात आढळतो. ब्रिटीश शासनकर्त्यांनी त्याचे सुटसुटीत "ताज महाल" असे नामकरण केले. हा बदल सर्वत्र मान्यही झाला. पण नाही, त्या बुजुर्ग जाटाला आमच्या "इतिहास के पन्ने" वा "भारत एक खोज" कथानकात अजिबात दिलचस्पी नव्हती. त्यांनी तर शहाजहानाचे काय पण त्याच्या अगोदरचे हुमायून, अकबर, सफदरजंग यांच्या नावाने सध्या दिल्ली, आग्रा, लखनौ परिसरात असणारी स्मारके ही प्रत्यक्षातील हिंदूंची देवळे होती असाच दावा केला. त्याच्या पुष्ठ्यर्थ "उपयुक्त" माहिती दिली, ती अशी कि, या मोघलांच्या (जाता जाता हे देखील सांगितले पाहिजे की, या जाट महाशयांनी दोन तीन तासांच्या त्या संभाषणामध्ये चुकून देखील "मुस्लीम" असा उल्लेख केला नाही, केवळ "मोघल". असे का? तर तो देखील एका वेगळ्या धाग्याचा विषय होऊ शकेल, पण ती बाब पुन्हा केंव्हा तरी. असो.) समाध्या प्रत्यक्षात राजपूत आणि जात लोकांनी बांधलेली देवळे असल्याचा पुरावा म्हणजे या ठिकाणी कोरलेल्या कमळाच्या आकृत्या, आणि कमळदलांचा केलेला खूप वापर, ज्या भांड्या मध्ये ही कमले दाखविली आहेत त्या भांड्यांची कलाकुसर ही खास राजपुतांनी धाटणीची आहे. गणेश आकृत्यांचे तर जागोजागी दर्शन होते, पण मुघलधार्जिणे सध्याचे गाईड ही बाब चुकून देखील पर्यटकांना दाखवीत नाहीत. वेलबुत्त्यांची नक्षी तर "ओम" आकाराचे प्रतिक आहे. राजपूत लोक सूर्याची आराधना करत असत, तर मुघल चंद्राची, हे तर सर्वश्रुत बाब आहे, मग अशावेळी मुख्य प्रवेशद्वार आणि "ताज"च्या आतील बाजूस "सूर्य" आकृती कशाचे द्योतक आहे? काय आहे यावर उत्तर?" जाट बाबांनी विजयी मुद्रेने सर्वांकडे पाहिले. आम्ही महाराष्ट्रातून आल्याचे त्यांना माहित होतेच, मग या राज्याचा दाखला देताना ते म्हणाले मी, "तुमच्या महाराष्ट्रात तुम्ही देवळाच्या परिसरातील दीपस्तंभ पाहिले असतीलच, त्याच प्रमाणे राजपुतांनी तेजो महाला भोवती आता जे "मिनार" म्हणून ओळखले जातात, ते प्रत्यक्ष्यात हिंदू धर्मातील दीपस्तंभच आहेत. मुघलांच्या अन्य कोणत्याही स्मारक बांधकामात (मशिदिमध्ये विशेषत:) अशा मिनारांची संगती नसताना तसेच जागा नसताना फक्त ताज महालाभोवातीच मुघल सम्राट मिनार बांधण्याचा विचार करेल का? याचाच अर्थ हे राजपुतांचे शंकराचे तेजो महाल मंदिर आहे." रेडिओ कार्बन टेस्ट ची देखील ते गृहस्थ दाखला देत होते जो माझ्या (आमच्या) आकलना पलीकडील होता. (या शास्त्रीय टेस्ट बाबत येथील कोण सदस्याला काही माहिती असल्यास कृपया विस्ताराने खुलासा करावा ही विनंती .)
मी माझ्या परीने त्या जाट अभ्यासकाचा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला, पण स्वारी ढिम्म होती. चर्चा गरम होत चालली असतानाच, मेजर आरोरांच्या पत्नीने वेळीच वादविवादात प्रवेश करून आम्हाला जेवणाची आठवण करून दिली व 'ताज महाल' कि 'तेजो महाल हा विषय त्यावेळी तरी तूर्तास मिटला. शीख, राजपूत, जाट, हिंदू समाजातील काही घटक यांचा ताज महालाच्या बाबतीत जो विश्वास आहे तो सत्यतेच्या पातळीला उतरतो का? याचा अभ्यास गंभीरपणे इतिहास संशोधकांना करता आला असता का? सुप्रीम कोर्टाने याचिका रद्दबातल ठरविताना कोणते निकष लावले असतील ? हे आणि अशा प्रकारच्या प्रश्नाची मालिका ताज महालाचे सौन्दर्य पाहताना किती लोकांच्या मनात उभे राहत असतील ?
सहज म्हणून विचारतो >> वाद असो व असहमती असो, या संस्थळावरील ज्या सभासदांनी ताज महाल प्रत्यक्षात पाहिला आहे, त्यांनी त्या शिल्पाच्या सौंदर्याला दाद देऊन हे अजरामर गीत बांधणा-या कारागिरांना व त्यांचा कल्पकतेला सलाम केला असेल, त्यांना या प्रेमाचे अमर प्रतिक ठरलेल्या स्मारकाला पाहून त्याच्या बांधकाम स्वामित्व विषयाच्या सत्यतेविषयी कोणत्याही प्रकारची शंका आली होती कां? येईल का? दुसरी एक बाब.... येथील बरेचसे सदस्य नोकरी, व्यवसाय, शिक्षण, सेमिनार, कॉन्फेरेन्सिस आदी कारणास्तव परदेश वास्तव्यास आहेत, तेथे त्यांना त्या त्या देशात/प्रांतात/इलाख्यात तेथील परंपरेच्या स्मारकावरून अशा प्रकारचे दुमत वा वाद आढळले आहेत का? धन्यवाद !
प्रतिक्रिया
खूप
बरोबर आहे
खि खि
(विषय दिलेला नाही)
ह ह पु वा
परंतु एक गोष्ट जी हे कुठलेच
.
आमच्या
गरज वगैरे
काका आणि मामा...!!!
ओक्के! अँड वेलकम
पहिला नियम !
>>थॅन्क्स...
पुणे
कुणीतरी
'अयोध्या
अस्मितेचा प्रश्न असल्याने गरज आहेच ..
खरतंर
पेशवे
अहो पेशवेच
काय सान्गता?
नेटकर पेशव्यांचा अटकर शनिवारवाडा
" अस्मितेचा प्रश्न आहेच " त्यामुळे सगळं मुद्देसुद्च हवं
"....त्यामुळे
शेवटी
लिंक....!
आमच्या
औरंगझेब
धन्य आहे तो पुत्र!
पत्र
अस्मिता....
ताज...का तेजो ....
ताजमहालचे
समर्थक ....
ताजमहालचे
||आज ही
ताजमहाल/ते
हे राम.....
रेडिओ
शन्का
कार्बन टेस्ट...!
मिपाची
शुभेच्छा
भाषा जपून
अत्यंत
तो ताज का तेजो आपल्या काहि बाचा नाहि...
तेजो महालय सारखी उदाहरणे सर्वत्र
पु. ना. ओक: व्यक्ती आणि कार्य
पुनांची आठवण काढल्यावर
पु. ना. ओक स्कूल ऑफ