Skip to main content

श्रीकृष्णाची चूक

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 29/03/2010 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल आणि परवा पुण्यात एका गिर्यारोहण संस्थेने पानिपतच्या रणसंग्रामावर श्री. निनाद बेडेकरांची दोन दिवस व्याख्याने आयोजित केली होती. दोन्ही दिवस मी माझ्या कन्येला घेउन या भाषणांना उपस्थित राहिलो होतो. माझी मुलगी सीबीएसई बोर्डाच्या शाळेत जाते. त्यांना जो इतिहास शिकवतात तो नि:सत्त्व इतिहास शिकवतात. त्यांना नेमलेल्या पुस्तकांवरून नजर टाकल्यावर माझे हे ठाम मत बनले आहे. इतिहासाच्या शिक्षणात तरी माझी मुलगी माझ्या इतकी नशीबवान नाही कारण चित्रकलेच्या तासाला मुलाना इतिहासातील गोष्टी सांगणारे पुरंदरेसर त्यांच्या नशीबी नाहीत. मी शाळेत असताना वेगवेगळ्या निमित्ताने होणारी व्याख्याने आणि त्यातून होणारे संस्कार पण या मुलांच्या वाट्याला नाहीत. अशा उदात्तीकृत आणि म्हणून एकतर्फी इतिहासाने माझे थोडेफार पोषण नक्कीच केले आहे. इतिहासाच्या शिक्षणातून काय साधायला हवं? मला वाटतं याची उत्तरे अशी देता येतील - इतिहासातून गतकालाचा परिचय व्हावा हे काम शालेय शिक्षणातून अत्यंत रटाळपणे केले जाते. - ऐतिहासिक घटनांनी निर्माण केलेली उर्जा अखंड स्रवून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी मी शाळेत असताना आमच्या पुरंदरेसरानी सांगितलेल्या गोष्टी आणि सध्या निनाद बेडेकरांसारख्या व्रतस्थ इतिहासप्रेमींच्या व्याख्यानातून हे नक्कीच साध्य होत आहे असं मला वाटतं. व्याख्यानाचा १ला दिवस झाल्यावर मी माझ्या मुलीला विचारलं की "तुला काय काय समजलं?" तेव्हा तिने मला प्रामाणिकपणे सांगितले, की तीला काहीही समजलं नाही. पण तरीही दुसर्‍या दिवशीचं व्याख्यान तिला ऐकायला जायची इच्छा होती. (आणि आम्ही गेलोही!) यावरून मला एक गोष्ट जाणवली ती अशी की माझ्या मुलीला व्याख्यानातलं काही समजलं नाही हे तिच्या शाळेतल्या इतिहास शिक्षणाचं अपयश आणि तरीही तिला दुसर्‍या दिवशी जावसं वाटलं हे बेडेकरांच्या तपश्चर्येचं यश! मी पण बेडेकरांनी बारीकसारीक तपशीलासकट, हातात कागदाचा एकही चिटोरा न घेता पानिपताचा इतिहास उभा केला त्यामुळे थक्क झालो होतो. माझ्या आठवणीत फार थोड्या व्याख्यानांनी कायमचे घर केले आहे. मुंबईत टिआयएफार मध्ये झालेले प्रो. चंद्र्शेखरांचे कृष्णविवरांवरचे व्याख्यान, प्राध्यापक मे. पुं. रेग्यानी पुण्यात स्नेहसदन मध्ये दिलेली बुद्धावरची व्याख्याने आणि जनरल के व्ही कृष्णरावांनी बालगंधर्वमध्ये दिलेले काश्मिरप्रश्नावरचे व्याख्यान, ही ती व्याख्याने. त्यात आता एक नवी भर पडली ती बेडेकरांची. असो. तरी पण एका गोष्टीची मला रुखरुख लागून राहिली. माझ्या मते इतिहासाचं शिक्षण तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण इतिहास जसा आहे तसा स्वीकारायला शिकतो. जसा आहे तसा इतिहास स्वीकारणं हे अतिशय अवघड आहे. त्याला भावनिक पदर बरेच आहेत. पण समाजाचे पाउल पुढे पडायला हवे असेल तर त्याच त्याच होणार्‍या चूका टाळायला हव्यात. त्या चूका टाळायच्या असतील तर इतिहासातील काळी बाजू पांढर्‍याबाजूच्या बरोबरीने स्वीकारता यायला हवी. कारण काळी बाजू पुढे आली नाही तर चूकांची दूरुस्ती करायचा सल समाजमनात निर्माण होणार नाही. बेडेकरांच्या व्याख्यानात मराठ्यांच्या इतिहासातील काही चूका अशाच बाजूला सारल्या गेल्या. मराठ्यांच्या पराक्रमाचे पोवाडे फक्त महाराष्ट्रातच गायले जातात... पण महाराष्ट्राबाहेर मराठ्यांची प्रतिमा ही लुटारु अशी आहे (याचा उल्लेख बेडेकरांनी केला पण अतिशय पुसट असा. श्रोत्यांपैकी कितीजणांना या प्रतिमेचं गांभीर्य कळलं हा प्रश्नच आहे). पानिपतापूर्वी आणि पानिपतानंतर मराठ्यांनी प्रचंड पराक्रम करून सत्ता मिळवली पण जिंकलेल्या प्रदेशात आपलेपणाची भावना निर्माण केली नाही. हे मत माझे नाही तर इतिहासाचार्य राजवाड्यांचे आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत. जाता जाता प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या हातून य़ुद्धाच्या गडबडीत (कदाचित अनवधानाने) झालेल्या चूकीचा उल्लेख करावासा वाटतो. ती चूक श्रीकृष्णाच्या हातून झाली नसती तर आज आपला देश कदाचित वेगळा घडला असता. फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले म्हणजे ते रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या नैसर्गिक सत्याविरुद्ध करायला सांगितले. फळाच्या आशेने मनुष्य कर्म करतो तेव्हा तो ते एफिशियण्ट्ली करायचा प्रयत्न करतो. भारतीयांनी आजवर आपापली कर्मे जर एफिशियण्ट्ली केली असती तर आपला देश कदाचित निराळा घडला असता. श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करा' असे सांगायला विसरला...

वाचने 19664
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

जसा आहे तसा इतिहास स्वीकारणं हे अतिशय अवघड आहे. त्याला भावनिक पदर बरेच आहेत. पण समाजाचे पाउल पुढे पडायला हवे असेल तर त्याच त्याच होणार्‍या चूका टाळायला हव्यात. त्या चूका टाळायच्या असतील तर इतिहासातील काळी बाजू पांढर्‍याबाजूच्या बरोबरीने स्वीकारता यायला हवी. कारण काळी बाजू पुढे आली नाही तर चूकांची दूरुस्ती करायचा सल समाजमनात निर्माण होणार नाही. सध्या काही स्वयंघोषित सेवासंघ आणि ब्रिगेड्स 'काळी बाजू' मोठ्या हिरिरीने पुढे आणत आहेत! :> इतिहासाचे अति-उदात्तीकरण नको, हे तर खरेच! मात्र त्याचे 'अति-तटस्थीकरण' सुद्धा सर्वच समाजाला झेपेल असे वाटत नाही. यामुळे दोन धोके उद्भवतात- १)एकंदर इतिहास कंटाळवाणा होणे- जसे रटाळीकरण तुमच्या मुलीच्या अभ्यासक्रमात झाले आहे, असे तुम्ही म्हणता. २)एकंदरच ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे प्रतिमाभंजन होणे. समाजातील एका घटकाला इतिहासाचे यथार्थ आणि तटस्थ चित्रण अभ्यासाच्या दृष्टीने हवे असणे वेगळे सर्वसामान्य जनतेला 'आदर्श' म्हणून आयकॉन हवा असणे वेगळे. शैक्षणिक इतिहास हे काम कितपत करेल, शंका आहे. असो- विषय उत्तम. यावर आणखी लिहायला आवडेल.

कृष्ण परमात्मा बरोबर आहे, आपणच भलता अर्थ काढला आणि तसे वागलो याला काय करणार? 'योगः कर्मसु कौशलम्' हे आपण विसरतो त्याला कृष्ण्बाप्पा तारी काय करणार? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपिनराव, अहो असे काय करता? 'योगः कर्मसु कौशलम्' हे आपण विसरतो... याचा अर्थ "कर्मा मधे कौशल्य हे योगायोगाने येते" असे कृष्ण म्हणाला. आपण अगदी तसेच तर वागतो ना? ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

ती चूक श्रीकृष्णाच्या हातून झाली नसती तर आज आपला देश कदाचित वेगळा घडला असता. फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले म्हणजे ते रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या नैसर्गिक सत्याविरुद्ध करायला सांगितले.
म्हणजे, कृष्णाने सांगितलेले सगळे आपल्या देशाने ऐकले आणि अमलात आणले आहे की काय? आणि समजा कृष्णाने ही " चूक " केली नसती, आणि म्हणाला असता, की बाबांनो, फळाच्या अपेक्षेने कर्म करा, म्हणजे एफिशियंटली कराल, म्हणजे काय लोकांनी लगेच हिरीरीने लय भारी कामं केली असती का?
भारतीयांनी आजवर आपापली कर्मे जर एफिशियण्ट्ली केली असती तर आपला देश कदाचित निराळा घडला असता.
मला वाटतं प्रत्येक देशात एफिशियंटली कर्मे करणारी लोकं असतातच असतात. कुठे कमी असतील, कुठे जास्त असतील. भारतीयांमध्ये जर असे लोक नसतील तर/ झाले नसतील तर आपल्याला प्रेरणा मिळणारा इतिहास कुठुन वाचायला मिळाला असता? आळश्यांचा राजा

अहो युयुत्सु साहेब, त्या सनसनाटी (आणि चुकीच्या) शीर्षकापुढे निदान प्रश्नचिन्ह तरी घाला.. कृष्ण चुकला हा तुम्ही लढवलेला तर्क निखालस चुकीचा वाटतो.. वरती बिकाने सांगितले आहेच.. 'निष्काम कर्मयोग' म्हणजे ध्येय न ठेवता काम करणे नव्हे, तर पूर्ण जोर लावून ध्येय ठेवून काम करायचे पण फळात अडकून पडायचे नाही ते फळ (चांगले अथवा वाईट) सगळे कृष्णार्पणमस्तु.. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि || हे शेवटी नारायणाला समर्पण करणं महत्वाचं.. आणि हो बेडेकरांच्या व्याख्यानाबद्दल काय सांगाव.. बाबासाहेब पुरंदरेंची पण व्याख्यानं अशीच ओजस्वी.. आणि विद्यावाचस्पतींची ही. आमच्या लहानपणी इतिहास घरीच शिकायला मिळायचा (गोष्टीरुपात..) आणि शाळेत त्याची सनावळीसह फक्त उजळणी.. :) उपास मार आणि उपासमार

जी कोणती क्रिया हृदयापासून, अंतकरणापासून केली जाते तिच्यात मनुष्य इतका हरवून जातो की त्याला स्थळा-काळाचही भान उरत नाही. जसं प्रेम हे निर्लोभ, निरपेक्ष असतं, स्व विसरून जऊन केलेलं असतं. अपत्यसंगोपन हे कर्तव्य असलं तरी तो अतिशय अनंदाचा भाग असतो ते अतीव प्रेमामुळेच. अशाप्रकारे जर निरपेक्ष, निर्लोभ प्रत्येक कृती करता आली तर मोक्ष फार दूर नसेल. म्हणून एका माधवावर पूर्ण विश्वास टाकून, त्याला सर्व नित्यकर्मे, कर्मे अर्पण करून जर आपण वरील प्रमाणे उत्कटतेने, अधिक चांगल्या रीतीने काम करू शकलो तर निश्चित उत्तम होइल. कृष्णाला हे सांगायचय की माझ्यावर भार टकून निश्चिंतपणे कामे करा. आणि माझ्यावर अतोनात प्रेम करा. एकदा माझ्यावर प्रेम करायला शिकलात की मग अपोआप तुम्ही वाइट कामांचा भार माझ्यावर टाकणार नाही. तुम्ही आपण होऊन कामे "एफिशिएन्ट्ली" कराल कारण तुम्ही माझ्यावर प्रेम कराल. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

In reply to by शुचि

माझ्यासारखच म्हणतायत.

इतिहास स्वीकारण्याविषयी आपण केलेली विधानं मनापासून पटली. आपले पूर्वज म्हणजे स्खलनशील माणसं होती, व इतर माणसांप्रमाणेच त्यांनी काही थोर गोष्टी केल्या तर काही चुका केल्या. त्यातल्या चांगल्याने भारावून जाणं, प्रेरणा घेणं, व वाईटापासून दूर राहाणं, चुका पुन्हा न करणं हीच खरी इतिहासाची शिकवण. दुर्दैवाने आपल्याकडे सगळंच साखरेच्या पाकात बुचकळून काढण्याचा अट्टाहास दिसतो. आपल्या मुलीला हे शिकवण्याचा प्रयत्न केलात तसंच सर्वच सुजाण पालकांनी करावं असं वाटतं. कृष्णाच्या बाबतीत मात्र शिकवणीचा 'कर्तव्य करणं आपल्या हाती आहे, फळ मिळेलच असं सांगता येत नाही. (केवळ फळ मिळालं नाही) म्हणून कर्म करणं सोडू नकोस' असा मी अर्थ लावतो. त्यामुळे ती शिकवण मारक तरी वाटत नाही. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

दुर्दैवाने आपल्याकडे सगळंच साखरेच्या पाकात बुचकळून काढण्याचा अट्टाहास दिसतो.
ह्यात नविन काहीच नाही. पण स्वतःला दोष देण्याची न्युनगंडित(वा! काय शब्द आहे नै?) वृत्ती बघून मौज वाटली. इतिहास नेहेमी जेते लिहितात असं म्हणतात. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या इतिहासाच्या आवृत्तीत दुसर्‍या व्यक्तीला/देशाला उद्दात्तीकरणापासून दांभिकतेपर्यंत सर्व भाव आढळले तर त्यात नवल काय? दुसर्‍या महायुद्धात जपान्यांनी आशियात केलेले अत्याचार, कत्तली आणि 'कर्म्फट वुमेन' इ. विषयी खुद्द जपानी इतिहासाच्या पुस्तकांमधे अगदी ओझरता उल्लेख आहे. यासुकुनी श्राईन मधे हे अत्याचार ज्यांनी केले त्या (मित्रराष्ट्रांच्यादृष्टीने युद्ध गुन्हेगार ठरलेल्या) सैनिकांची स्वातंत्रसैनिकांच्या बरोबरीने पुजा केली जाते. पण चीन/कोरिया/इंडोचायनामधे जपानविषयी तिरस्कारच आढळेल. मित्रराष्ट्र/चीन-कोरिया-इंडोचायना इ. देश जाऊदे, खुद्द भारतासारख्या "त्रयस्थ"देशातसुद्धा आजही आपण , जपान कडे सुभाषबाबूंना आश्रय देणारा देश म्हणून आदरानेच बघतो.

In reply to by राजेश घासकडवी

कृष्णाच्या बाबतीत मात्र शिकवणीचा 'कर्तव्य करणं आपल्या हाती आहे, फळ मिळेलच असं सांगता येत नाही. (केवळ फळ मिळालं नाही) म्हणून कर्म करणं सोडू नकोस' असा मी अर्थ लावतो. त्यामुळे ती शिकवण मारक तरी वाटत नाही. पर्फेक्ट!!! बिपिन कार्यकर्ते

चुकांसकट इतिहासाचे परखड विवेचन व्हावे हे बरोबरच आहे. फक्त एक मुद्दा पटला नाही. 'फळाची आशा न धरता कर्म करा' असा संदेश श्रीकृष्णासारखा मुत्सद्दी देईल असे वाटत नाही. त्याउअलट मी त्याचा अर्थ लावतो तो असा की फळाच्या आशेवर डोळा ठेवून कर्म करु नका कारण मग फळ काय मिळणार ह्याकडेच सगळे लक्ष लागून राहण्याची शक्यता असते. विहित कर्म संपूर्ण समरसून देऊन करा, त्याचे अपेक्षित फळ हे तशा प्रकारे कर्म करण्यातच असते किंबहुना ते कर्माबरोबरच आपोआप मिळते, वेगळे डोळे लावून बसावे लागत नाही! कोणत्याही क्षेत्रातल्या कोणत्याही मोठ्या लोकांची उदाहरणे पाहिली तरी आपल्याला ह्याचा प्रत्यय येईल कै.बाबा आमटे, कै.पु.ल.देशपांडे, भीमसेन, बाबासाहेब पुरंदरे कोणीही घ्या. समरसून काम = उत्तम परिणाम हेच गणित दिसेल! चतुरंग

--श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करा' असे सांगायला विसरला... मग 'योगः कर्मेशु कौशलम्' काय सांगते साहेब ?? (नक्की 'कर्मेशु' आहे कि 'कर्मसु' आठवत नाहि) (श्रीकृष्णाचा 'फॅन') अर्धवटराव -रेडि टु थिंक

लोकहो मला भगवद्गीता ज्यांनी शिकविली त्या टिमविमधल्या देसाईबाईनी गीतेविषयी एकदा एक महत्त्वाचे विधान केले होते. ते असे, गीतेमध्ये प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या प्रत्येकाला काही ना काही तरी मिळते. कारण गीतेतील विधाने अर्थनिष्पत्तीच्या दृष्टीने अतिशय लवचिक आहेत. हे तुम्हाला ठाउक असेलच. योग: कर्मसु कौशलं या दुसर्‍या अध्यायातील ५० व्या श्लोकाचा (ऍनी बेझण्ट आवृत्ती) संदर्भ बिपिन आणि काही जणांनी दिला. या वाक्याचा अर्थ आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचा विचार करुया. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात पान क्र. ३५ वर "योग म्हणजे कर्मे करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली" अशी व्याख्या गीतेनेच केली असल्याचे म्हटले आहे. ही विशेष प्रकारची कुशलता नक्की कोणती हे जाणून घेण्यासाठी त्याच अध्यायातील ४८ व्या श्लोकाचा दुसरा चरण - "सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते" - बघावा लागेल. 'सिद्धी असिद्धी यांचे ठायी समत्व बुद्धि' असाही योग शब्दाचा अर्थ दिल्याचे टिळक म्हणतात. तेव्हा "योगस्थ: कुरु कर्माणि" असा सल्ला देताना समत्व बुद्धीची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली कर्मे करताना वापर असे श्रीकृष्णाला म्हणायचे आहे, यावर कुणाचे दुमत असू नये असे वाटते. यात एफिशियन्सीचा संबन्ध दूरान्वयाने नाही किंवा समत्व बुद्धीने एफिशियन्सी वाढते असेही सिद्ध होत नाही. इथे मला निर्माण झालेली समस्या अशी की समत्व बुद्धीची "कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली" या फलसिद्धीसाठी/यशासाठी "आवश्यक आणि पुरेशा (नेसेसरी आणि सफिशियण्ट)" अटी आहेत का? मला याचे उत्तर नाही असे द्यावेसे वाटते. कारण पुढे १८ व्या अध्यायात "अधिष्टानं तथा कर्ता.." या श्लोकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच अटी श्रीकृष्णाने सांगितल्या आहेत. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

कारण गीतेतील विधाने अर्थनिष्पत्तीच्या दृष्टीने अतिशय लवचिक आहेत. हे तुम्हाला ठाउक असेलच. हो ना? मग गीतेच्या वचनांचा लौकिक आयुष्य जगताना लौकिक व्यवहारानुरूप अर्थ न काढता, विरुद्ध अर्थ काढला तर चूक कोणाची? आपली की श्रीकृष्णाची?
तेव्हा "योगस्थ: कुरु कर्माणि" असा सल्ला देताना समत्व बुद्धीची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली कर्मे करताना वापर असे श्रीकृष्णाला म्हणायचे आहे, यावर कुणाचे दुमत असू नये असे वाटते. यात एफिशियन्सीचा संबन्ध दूरान्वयाने नाही किंवा समत्व बुद्धीने एफिशियन्सी वाढते असेही सिद्ध होत नाही.
काइंडली डिफाइन एफिशियन्सी. एखादे काम एफिशियंटली करताना मला हे बघावे लागते की ते काम कमीत कमी श्रमात, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नेटकेपणे, जास्तीत जास्त फायदा देणारे असे व्हावे. हे सगळे करायचे असेल तर मला बुद्धीचा वापर करावा लागतो. हाती असलेल्या साधनांचा (त्यात मनुष्यबळही आले, इतर निर्जीव साधनेही आली.) अतिशय चतुराईने उपयोग करावा लागतो. माणसांकडून कामे करून घेताना युक्त्या वापराव्या लागतात. म्हणजे एफिशियंटली काम करायचे असेल तर हे सगळे लागतेच... नाही तर जे काही केले जाईल त्याला 'ढोरमेहनत' (गधामजूरी / डॉन्कीवर्क) म्हणले जाईल की.... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

इयत्ता ११वी मध्ये शिकलेली व्याख्या आपण चर्चेसाठी स्वीकारुया. efficiency = outpt /input output = कर्मफल input = कर्म श्रीकृष्णाच्या सल्ल्याप्रमाणे कर्मफलाचा हिशोब किंवा track ठेवला नाही की efficiency काढायचा प्रश्नच येत नाही. गोची तिथेच आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

व्याख्या मान्य. याच व्याख्येची अपेक्षा होती. पण मुद्दा तो नाहीच आहे. श्रीकृष्णाच्या सल्ल्याप्रमाणे कर्मफलाचा हिशोब किंवा track ठेवला नाही की efficiency काढायचा प्रश्नच येत नाही. गोची तिथेच आहे. माझे म्हणणे आहे की श्रीकॄष्णाने कर्माचा ट्रॅक ठेवू नका असे सांगितलेच नाहीये. तो म्हणतो की फळाच्या आशेने / अपेक्षेने कर्म करू नका. उलट, कर्माच्या सिद्धांत प्रमाण मानल्याने, एव्हरीबडी इज सप्पोज्ड टू कीप ट्रॅक ऑफ हिज / हर कर्म. अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंगाचे दु:ख पदरी येऊ शकते. बिपिन कार्यकर्ते

श्री युयुत्सु यांच्याशी मी १०० टक्के सहमत आहे. 'ब्राह्मणी' घरात तरी आमच्यावर जे संस्कार झाले ते गरीबीचे उदात्तीकरण करणारेच होते. युयुत्सूंनी सांगितलेल्या मुद्द्यांबाबत माझ्या वडिलांच्याबरोबर माझी खूपदा चर्चा होत असे कीं भगवद्गीतेतील 'मा फलेषु कदाचन' असो किंवा 'आटपाट नगर' व तिथला रोज माधुकरी मागणारा नायक असलेल्या 'श्रावणातल्या कहाण्या' असोत, यातून 'गरीबी उदात्त' 'आणि 'श्रीमंती लांड्यालबाड्या केल्याशिवाय मिळत नाहीं' असे संदेश देणारेच आदर्श आमच्यापुढे ठेवले गेले. माणसाने भरपूर पण प्रामणिकपणे पैसा कमावावा व आयुष्य चैनीत व्यतीत करावे असे सांगणारी एकही कथा मला वाचल्याचे आठवत नाहीं. ब्राम्हणेतर हिंदूंतही साधारणपणे अशीच शिकवण मिळत असावी, पण नक्की माहीत नाहीं. नागरिकशास्त्राच्या (Civics) पुस्ताकातले एक वाक्य मला आठवते. मारवाडी वाण्याबद्दलचे "तो व्यापार-उदीम करून खूप पैसे कमावतो व म्हणून तूप-साखरेचे जेवण त्याला परवडते" हे वाक्य माझ्या मनावर कायम कोरले गेले आहे. मला नेहमी वाटायचे कीं मारवाडी समाज जे करू शकतो ते मराठी समाज कां करू शकत नाहीं? कां तूप-साखरेचे जेवण जेवू शकत नाहीं? मराठी माणूस एक वेळ आपले प्राण पणाला लावेल पण आपला पैसा पणाला लावणार नाहीं हेच खरे. आणि मी व माझी मुलेही त्याला अपवाद नाहींत! बघू त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात पुढे असा चांगला बदल होतो कां! माझ्या मुलांना मात्र आम्ही दोघांनी फलाची अपेक्षा ठेवूनच काम करावे, कुणालाही आपल्याला फुकट दावणीला लावू देऊ नये पण चोरी/लांडीलबाडीही करू नये अशीच सोदाहरण शिकवण दिली. मी 'दै. सामना' च्या २०व्या वर्धापनाच्या खास अंकात 'मराठी माणूस-कालचा, आजचा व उद्याचा' हा लेख लिहिला होता. त्यातही मी हाच मुद्दा ठासून मांडला होता. दुर्दुर्दैवाने तो लेख मी 'बरहा' किंवा 'गमभन' मध्ये लिहिला नव्हता त्यामुळे इथे चढविता येणार नाहीं. ज्याना वाचायचा असेल त्यांनी मला त्यांचा ई-मेल दिल्यास मी जरूर पाठवेन. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

In reply to by सुधीर काळे

काका, परत म्हणतो... दोष द्यायचाच असला तर गीतेचा चुकीचा अर्थ लावून त्यायोगे चुकीचे संस्कार देणार्‍या समाजाला द्या. चूक कृष्णाची कशी. जरा विचार करा... माझ्या माहितीत असे बरेच लोक आहेत जे अध्यात्मिक / पारमार्थिक आहेत पण त्याच वेळी अतिशय कर्तबगार आहेत, मोठ मोठ्या अचिव्हमेंट्स केल्या आहेत. नुसते दैववादी न बनता कर्मवादी आहेत. नजरेचा फरक आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अर्थ चुकीचा लावला आहे म्हणणे कितपत बरोबर? जर भाषेच्या लवचिकतेमुळे दोन्ही अर्थ संभवत असतील तर दोन्ही अर्थ बरोबरच आहेत. आपण कदाचित अनडिझायरेबल असलेला अर्थ समाजधुरीणांनी प्रमोट केला असा दोष देऊ शकतो. तो अर्थ सुद्धा अनडिझायरेबल होता असे आपण आज पश्चातबुद्धीने म्हणत आहोत. तो जेव्हा प्रमोट केला तेव्हा तो डिझायरेबल वाटत असेल! एखाद्या विधानाचे दोन्ही (परस्परविरोधी) अर्थ संभवत असतील तर ते विधान........ कृष्णाला (की शंकराचार्यांना) नक्की काय म्हणायचे होते हे स्वतः कृष्णच सांगू शकेल. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपिन-जी, मुद्दा धार्मिक/अधार्मिक नाहीय्. धार्मिक व कर्तबगार लोक फळाची अपेक्षा न ठेवता काम करतात कीं फळाची अपेक्षा ठेवून करतात हा मुद्दा आहे. एरवी व्यक्तिगत आयुष्यात धार्मिक असणारे कर्तबगार लोक ऑफीसमध्ये/कामावर गेल्यावर गीतेतील किंवा इतर धर्मग्रंथातील वाक्ये आठवत काम करत नसणार असे मला वाटते. अंगावर 'गणवेष' चढवला कीं माणूस बदलतो व त्याने तसे बदललेच पाहिजे, नाहीं कां? सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

In reply to by सुधीर काळे

या नावाचा धडा आपल्या काळातील शाळेच्या पुस्तकात होता ( तुला तो आठवत असेलच.) पुलंनी या विषयावर एक उत्तम लेख लिहून श्रीमंतीइतके धट्टेकट्टे दुसरे काहीही नाही असे लिहिले होते. पण कर्माचे फळ म्हणजे रोकडा फायदा होणे एवढेच नाही, त्यातून इतर अनेक प्रकारचे समाधान मिळू शकते, ते सुद्धा फलितच आहे. त्याची आशा धरण्यात काहीच गैर नाही, ते मिळालेच पाहिजे असा हट्ट धरू नये. तू निर्माण केलेली एकादी भट्टी सुरू झाली आणि त्यातून तुला अपेक्षित असे उत्पादन मिळू लागले तर वाटणारा आनंद हा फक्त पगाराच्या रकमेइतकाच मर्यादित असतो की त्याच्या पलीकडे असतो? ज्या वेळी तू ती निर्मिती करण्याच्या कामात मग्न असतोस त्या वेळी तुझ्या डोळ्यासमोर काय असते, फक्त पुढे मिळणारी शाबासकी , बक्षीस, पदोन्नती वगैरे की काम व्यवस्थितपणे करण्याची इच्छा? हे जरासे पर्सनल होते आहे याबद्दल क्षमा कर, पण मला हेच उदाहरण सुचले.आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

आनंद, पहिली गोष्ट म्हणजे मला पगार मिळण्याची खात्री असेल तरच मी कामावर जातो! मला जर कुणी सांगितले कीं नोकरीवर जाणे हे 'कर्म' मी करावे व पगार या 'फल'ची अपेक्षा ठेवू नये तर मी नक्की नाहीं जाणार कामावर! आता कामावर असतांना जे यश मिळते ते पगाराच्यापेक्षा जास्त असणारच कारण नाहीं तर कोण धंदा सुरू करेल? पगारपेक्षा जास्त जो आनंदे मिळतो तो उपभोक्त्याचे संतोषाधिक्य (consumers' surplus) या प्रकारात मोडतो. पण मुख्य मुद्दा हा आहे की फळाची अपेक्षा ठेवूनच प्रत्येक माणूस कामाला लागतो. अगदी देवळात देवाच्या दर्शनालाही आपण फळाची अपेक्षा ठेवूनच जातो (मी तरी). याला कांहीं "म्हातार्‍या आई-वडिलांची सेवा करणे" वगैरेसारखे अपवाद आहेत, पण ९९.९९ टक्के कामें आपण (मी तरी) फळाची अपेक्षा ठेवून करतो! बाकीचे वैयक्तिक! एवढे मात्र खरे कीं कदाचित् गीतेतल्या असल्या न पटणार्‍या श्लोकांमुळे असेल पण आता वयाला ६८ वर्षे झाली तरी गीता वाचावी असे एकदाही वाटले नाहीं! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

In reply to by सुधीर काळे

सुधीरजी, एक धडा विसरलात. 'लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी.' मला तिरस्कार वाटतो या शीर्षकाचासुद्धा.

काळे साहेब, मराठी माणसाचे म्हणाल तर शिवरायांना/बाजीरावाला महत्वाकांक्षा नसती तर त्यांनी राज्य हे स्थापले नसते त्यांच्या वरही भगवतगीतेचे संस्कार झाले होते. पण हा इतिहास झाला वर्तमानाचे म्हणाल तर मराठी माणसाने महत्वाकांक्षा टाकून स्वतःला एका सुरक्षित कोशात बंद केल्याने तशी परिस्थिती झाली आहे त्याचा संस्कारशी संबद्ध नाही. आपण (यात मी सुद्धा) काही करायची महत्वाकांक्षा बाळगायच्या ऐवजी एकतर धर्मातील कर्मकांडात अडकतो वा धर्मातील संस्कार वा धर्मच कसा चूक आहे हे यावर चर्चा करतो धर्मात सांगितलेले संस्कार हीच कसोटी लावायची तर इंग्रज लोकांनी जगावर राज्यच गाजवायला नको, कारण ख्रिताने तर शांती चा संदेश दिला आहे पण इंग्रज धर्माच्या कर्मकांडात न अडकल्यामुळे आणि महत्वाकांक्षा बाळगल्या मूळे जगावर राज्य करु शकला

In reply to by Dipankar

गीता वाचणे व त्याप्रमाणे वागणे यात फरक आहे. मला खात्री आहे कीं सदसद्विवेकबुद्धीचा भाग सोडला तर राजा म्हणून काम करतांना किंवा घोड्यावर मांड टाकून लढताना गीता छत्रपतींच्या किंवा बाजीराव पेशव्यांच्या डोक्यात असेल! आणि सदसद्विवेकबुद्धी ही बाब तर प्रत्येक धर्मात ती शिकविली जाते. (म्हणजे गीतेतच ही शिकवण आहे असे नाहीं) असो. गणवेश चढवला कीं हे सारे घरी ठेवायचे असे माझे एक तत्व आहे. आज "पोलादाचा राजा" असलेले श्री लक्ष्मी मित्तल माझे एके काळी बॉस होते. ते एकदा मला म्हणाले होते कीं "तत्वे ही खासगी जीवनात पाळायची. धंद्यात 'धंद्यासाठी जे उत्तम तेच फक्त तत्व'!" हीही एक प्रकारची गीताच? सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

मला बिपिनच्या युक्तिवादात कुठेतरी "देव चुकेलच कसा" या गृहितकाचा वास येत आहे. आपण दैवतांचे मानवीकरण पट्कन करतो, पण त्यांच्याकडून मानवी चूका होऊ शकतात हे मात्र स्वीकारू शकत नाही... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

श्री. युयुत्सु, सर्वप्रथम मनमोकळ्या चर्चेबद्दल धन्यवाद. :) मला बिपिनच्या युक्तिवादात कुठेतरी "देव चुकेलच कसा" या गृहितकाचा वास येत आहे. अज्जिबात नाही. माझे असे कुठेही म्हणणे नाही. (मला अगदी एवढा भाबडा नका हो बनवू... ;) ) मला एवढेच म्हणायचे आहे की, सांगणारा सांगून गेला, ऐकणारा चुकीचा अर्थ लावत असेल तर मग दोष कोणाकडे? चूक झाली हे शाबित होत असे तर मानायलाच हवे... दैवतीकरण वगैरे जाऊ दे... बिपिन कार्यकर्ते

In reply to by युयुत्सु

>>मला बिपिनच्या युक्तिवादात कुठेतरी "देव चुकेलच कसा" या गृहितकाचा वास येत आहे.. मला वाटलंच होतं गाडी या स्टेशनवार येणार :) चर्चा घडवून आणल्याबद्दल धन्यवाद पण! अहो युयुत्सु, देवही चुकलेच की.. पण ते चूक की बरोबर हे आपण कसे आणि का ठरवायचे हा प्रश्न आहे.. देव किंवा इतर कोणी आदर्श व्यक्तिने घेतलेले निर्णय हे त्या त्या कालातील,परिस्थितीतील आहेत. तुम्हाला ते मान्य नसतील तर ते चूक आहेत म्हणणे पटत नाही. वरील संदर्भाचा विचार करता, तुम्हाला शिकवलेली भगव्द्गीता आणि आम्हाला यात फरक दिसतो.. आणि अप्रस्तुत अर्थ लावून तो भगवंताने सांगितलय असं म्हणणार्‍यांविषयी वाईटही वाटतं. कर्माच्या फळात अडकून पडू नका (ह्याचा अर्थ कर्मावर लक्ष केंद्रीत करु नका असा नाही) हे तुम्हाला पटलं का हे आधी सांगा.. वरती राजेश आणि चतुरंग दोघांनीही अतिशय संयत शब्दात हेच सांगितले आहे. उपास मार आणि उपासमार

In reply to by उपास

देवही चुकलेच की.. पण ते चूक की बरोबर हे आपण कसे आणि का ठरवायचे हा प्रश्न आहे..
देव हे मानवनिर्मित असल्याने ते चूक की बरोबर हे आपण ठरविणे यांत मला गैर काहीही वाटत नाही. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by उपास

आयुष्यात मी जे काही मिळवले ते कर्माच्या फळात अडकल्यामुळेच मिळवले. तसा जर अडकलो नसतो तर काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही...हे नम्रपणे कबूल करतो. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

केवळ कर्माच्या फ्ळात अडकल्यामुळेच तुम्ही मिळवले हे पूर्ण सत्य नसावे, कर्माच्या फळावर लक्ष असल्याने तसेच तुमचे प्रयत्न जोरकस असल्याने तुम्ही कर्म करतानाचा प्रवासही सुकर वाटल्याने (उदा. भगवंताचे अधिष्टान) तुम्ही गोष्ट मिळवू शकलात आणि त्या मिळवल्याकी त्यात अडकून न पडता पुढच्या कर्मासाठी प्रवृत्ता झाला असणार अशा दृष्टीकोनातून मी हे पाहातो. एक छोटेसे उदाहरण - पाचव्या इयत्तेत वर्गात पहिल्यायेण्यासाठी आम्ही वर्गातील सगळ्यांनी कसून अभ्यास केला. प्रत्येकाचा उद्देश एकच - वर्गात पहिला नंबर यायला हवा. मी आणि माझ्यासारख्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. शक्यता एक - माझा पहिला नंबर आला. अरे व्वा! छान. पण म्हणून कर्मफलात अडकून पडण्यात अर्थ नाही, यापेक्षा अधिक चांगल काय करता येईल. शक्यता दोन - माझा पहिला नंबर नाही आला. हरकत नाही. निराश व्हायचं कारण नाही. मी प्रामाणिक प्रयत्न केले कर्म करण्यातला प्रवास आनंदाने घेतला, जर अपेक्शित कर्मफल मिळालं नाही तर ते मिळायलाच हवं ह्यात अडकून पडायची गरज नाही. १५ वर्षांनी स्वत:शीच ---------------- हॅहॅ.. काय बावळ्ळ्ट होतो आपण. वर्गात पहिला नंबर यावा यासाठी झटत होतो. लोकल मॅक्झिमा दुसरं काय.. पुस्तकी अभ्यासाच्या बरोबरीने जगात इतर किती चांगल्या गोष्टी आहेत करण्यासारख्या. तबला, पेटी शिकलो असतो.. काहीतरी छान केलं असतं तरी चाललं असतं त्या पहिल्या नंबरच्या आट्यापिट्यापेक्षा. - तात्पर्य.. एका विशिष्ट पातळीवर पोहोचल्यावर आपल्या गतकालातील कर्मफलांचा त्यासाठी केलेल्या तडजोडी, झालेली ससेहोलपट ह्यांचा उबग येऊ शकतो किंवा त्या कर्मफलांची किंमत शून्य वाटू लागते. अशावेळी कर्मफलात अडकून पडू नयेच ह्याची जाणीव प्रकर्षाने होते. "श्रीकृष्णार्पणमस्तु" हे मनापासून स्वीकारलं तर "art of leaving" रुजवायला मदत होते असं जाणवतं. सस्नेह, - उपास उपास मार आणि उपासमार

त्याने प्राप्त परिस्थितीत अर्जुनाला उपदेश केला. गेली हजारो वर्षे प्रत्येकजण स्वतःला अर्जुनच समजून तो उपदेश स्वतःसाठी लागू करवून घेत असेल तर चूक श्रीकृष्णाची कशी बरें? :) बाकी सर्व ठिक.

In reply to by प्रियाली

गेली हजारो वर्षे प्रत्येकजण स्वतःला अर्जुनच समजून तो उपदेश स्वतःसाठी लागू करवून घेत असेल तर चूक श्रीकृष्णाची कशी बरें? हा मुद्दा अतिशय आवडला.. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by प्रियाली

खरं सांगायचं तर गीता हा ग्रंथ असा vague भाषेत कां सांगितला गेला? ज्ञानेश्वरी हे त्यावरचं पहिलं 'गाईड', ज्ञानेश्वरीही समजेना म्हणून लो. टिळकांपासून सोनोपंत दांडेकरांच्यापर्यंत इतकी गाइड्स लिहिली गेली आहेत व आजही लिहिली जात आहेत कीं विचारायची सोय नाहीं. म्हणजे गीतेचे इतके अर्थ लागतात कां? मला खूपदा वाटतं कीं १८ अध्याय संपल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला off the record विचारले असेल कीं कळलं कां मी काय म्हटलं ते? कीं अजून नीट समजावून सांगू? असे म्हटल्यावर अर्जुन नक्कीच म्हणाला असेल, "नको देवा! त्यापेक्षा मी लढायला तयार आहे!" अति धार्मिक लोकांनी हलके घ्यावे ही विनंती! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

In reply to by सुधीर काळे

हे बाकी नक्कीच खरे असणार. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

In reply to by सुधीर काळे

आधी हे सांगा की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन आणि श्रीकृष्ण काय "टाईम-प्लीज" म्हणून गीतेचे १८ अध्याय जन्माला घालत होते? आणि त्या वेळात दुर्योधन, दु:शासन आणि कर्ण वगैरे "जाऊ द्या रे! श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे आपापसात काहीतरी खुसुरफुसुर चालते आहे ते संपले की आपण युद्ध करू." असे म्हणून आळस देत होते का? गीता ही श्रीकृष्णाच्या तोंडी कोणीतरी छापून दिली आहे असा मला दाट संशय आहे. ;)

In reply to by प्रियाली

प्रियालीताई, हा एक खुप चांगला पण वादग्रस्त मुद्दा आहे. विवेकानंदानी 'थॉट्स ऑन द गीता' ह्या त्यांच्या पुस्तकात ह्याचा उल्लेख केला आहे. 'गीता' मुळात श्रीकृष्णाने महभारताच्या युद्धप्रसंगी सांगितली नसून ती आद्य शंकराचार्यांनी वेदांवर केलीली टीका आहे (खरेतर वैदिक तत्वद्यज्ञानाची शंकराचार्यांनी केलेली समिक्षा) आहे, अशी एक विचारधारा आहे. काही अभ्यासकांच्या मते, हिंदू धर्मातील वेगवेगळ्या विचारांना एकत्र आणून एकच तत्वज्ञान मांडण्याच्या शंकराचार्यांच्या प्रयत्नातील हा एक भाग होता. आणि तसं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, 'भगवान उवाच....' असं म्हटल्यावर कोण आव्हान देणार? अवांतरः सगळेच धर्म 'भगवान उवाच....' चा आधार घेतात, कारण असं म्हटलं की भल्याभल्यांचा 'गेम ओव्हर' होतो :) मुशाफिर.

In reply to by प्रियाली

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्। विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्॥४-१॥ दुवा :--- http://bit.ly/bzoei2 आता इतका आगाउ पणा मी केला आहे तर अजुन दोन शब्द... कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥४७॥ टारगेट "मोक्ष" असेल तर फलाची अपेक्षा ठेवू नये कारण फळाची अपेक्षा ठेवणे ही आसक्ती झाली.तेव्हा फकस्त कर्म करत राहा... मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

In reply to by सुधीर काळे

हा हा हा युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

सांगितली आणि मग अर्जून युद्धाला तयार झाला....हे तितकेसे खरे नाही. खरी गोष्ट अशी आहे की ...माझ्या काही(बहुदा १८) चाली कृष्णाने अर्जुनाला ऐकवल्या...तेव्हा अर्जून त्याला म्हणाला...होतो बाबा युद्धाला तयार...पण कृपा करून त्या चाली ऐकवू नकोस... ;)

In reply to by प्रियाली

प्रियाली ताई, व. पुं. च्या 'आपण सारे अर्जुन' ची आठवण झाली.. :) बरं, तो उपदेश त्या परिस्थितीत अर्जुनाला असला तरी सगळ्या जगाला त्यातून शिकण्यासारखे आहेच की.. म्हणूनच तर गीतेचा अभ्यास करायला इतक्या महनीय व्यक्तींना प्रेरणा मिळाली.. उपास मार आणि उपासमार

रिवॉर्ड आणि पनिशमेंट कोण देणार? परमेश्वर? कृष्णाने म्हटले की मी रिवॉर्ड देईन, किंवा मी पनिशमेंट देईन, तर आपण म्हणणार - परमेश्वर असा नसतोच, त्यामुळे हे धादांत खोटे आहे. मग कृष्णाने असे म्हटले की तुम्हाला फळ मिळेलच, पण ते काय असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे दु:ख टाळायचे असले तर फलाची अपेक्षा करू नका. तर म्हणणार की एफिशियन्सी कशी मोजणार? यामुळेच नुकसान झाले आहे. आणि पानिपताच्या आधी आणि नंतरच्या मराठ्यांच्या राजकारणातील आणि समाजकारणातील कमीअधिक यश-अपयश यांचे खापर कृष्णावर फोडणे हे काही कळले नाही. पेशव्यांच्या काळातले मुत्सद्दी रोज गीतापाठ म्हणत होते याचे काही पुरावे आहेत का?

गीतेतला २.४७ हा प्रसिद्ध श्लोक काही ग्रेट तत्वज्ञान सांगण्यासाठी नसून 'नाही रे' लोकांनी फळ मिळत नाही म्हणून तक्रार करू नये आणि त्याच बरोबर नेमून दिलेले काम करण्याचे थांबवू नये एवढ्या माफक उद्देशाने लिहिलेला असावा. कर्म करण्यावर तुझा अधिकार (शेत कसणे हे तुझे काम- त्याला 'अधिकार' असे गोंडस नाव), कर्माच्या फळावर तुझा बिलकुल (कदाचन) अधिकार नाही (पीक जमीनदाराने / खोताने घेतले म्हणून तक्रार करू नको). फळाच्या आशेने कर्म करू नको (ते तुला मिळणारच नाहीये) पण कर्म न करण्याकडे तुझी आसक्ती नको (सांगितलेले काम निमूट करीत रहा- नाहीतर आमची पंचाईत व्हायची). श्रीकृष्णाची काही चूक आहे असे वाटत नाही. त्याला कर्मयोग सांगायचाच नव्हता. त्याला जे सांगायचे होते ते वर लिहिल्याप्रमाणेच होते आणि ते त्याने नि:संदिग्धपणे सांगितले आहे. (भोगा आता कर्माची फळं आणि झेला विकास-बिनदांड्यांचे- यांचा पाच पानी प्रतिसाद) :D बाकी गीता महाभारतात प्रक्षिप्त असल्याचा प्रवाद पूर्वीपासून ऐकून आहे. शंकराचार्यांनी ती उजेडात आणली (त्यांनीच लिहिली) असे म्हटले जाते. टिळकांच्या कर्मयोग थिअरीच्या अनुषंगाने पहिले तीनच अध्याय खरे बाकीचे प्रक्षिप्त असेही ऐकले आहे. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

In reply to by नितिन थत्ते

युयुत्सुंच्या लेखाला अपेक्षित प्रतिसादाचे अपेक्षित फळ मिळालेले दिसते! :) बाकी - प्रियाली यांच्या दाट संशयाला दा. ध. कोसंबी, कुरुंदकर यांनी सपोर्ट दिलेला आहे. कोसंबींच्या मते गीता अशा काळात लिहीली गेली जेव्हा उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर आला नव्हता, समन्वयाची गरज होती. त्यामुळे युयुत्सुंना एफिशियन्सीचा प्रश्न पडला आहे तोही कोसंबींनी दिलेल्या निकालास योग्य धरल्यास निकालात निघेल. पण मुळात या तत्वज्ञानाची मोहिनी नंतरच्या काळात बर्‍याच लोकांवर पडली हे सत्य आहे. तरीही इतर बरेच काही तत्वज्ञान भारतीयांना वेगवेगळ्या वेळी लागत राहिले. त्याची सुरूवात फार प्राचीन काळापासून झाली - म्हणजे उपनिषदे, आणि जैन तसेच बौद्ध तत्वज्ञानापासून ही प्रथा चालू आहे. (म्हणजे महाभारतात गीता 'घुसडण्याच्या' आधीपासूनच झाली). असो. माणसाला जगायला तत्वज्ञान लागते का? कदाचित नाही. पण एकत्र जगताना कदाचित तत्वज्ञानाची गरज भासत असावी. चार्वाकाच्या तत्वज्ञानाची अलिकडेच विंदांच्या पुस्तकात ओळख झाली. ते तत्वज्ञानही प्रश्नांची उत्तरे मिळण्यास आकर्षक आहे, पण त्याचबरोबर हेही आहे, की त्याकाळी त्या तत्वज्ञानाचा "मासेस"नी स्विकार केला नाही. आजही पर्यायी तत्वज्ञाने जोवर बहुतांशी लोकांना उपयुक्त वाटणार नाहीत, तोवर त्यांचा स्विकार होणार नाही असे मला वाटते. तेव्हा कृष्णाने गीता सांगितली की कुठच्यातरी अर्वाचीन/प्राचीन दरबारच्या भाटाने हा प्रश्न माझ्या मते महत्त्वाचा नाही. आणि दरबारी भाटाने लिहीली असली तर त्याचे कौतुक/निर्भत्सना करायची, का कृष्णाला नावे ठेवत रहायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

In reply to by चित्रा

चार्वाकाच्या तत्वज्ञानाची अलिकडेच विंदांच्या पुस्तकात ओळख झाली. ते तत्वज्ञानही प्रश्नांची उत्तरे मिळण्यास आकर्षक आहे, पण त्याचबरोबर हेही आहे, की त्याकाळी त्या तत्वज्ञानाचा "मासेस"नी स्विकार केला नाही.
चार्वाकाला मार्केटींग करायला योग्य टॅलेण्ट मिळाले नसावे युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

भाउसाहेब पाटणकर या विषयी दोन ओळीत सांगतात.... सांगसी निष्काम कर्म कृष्णा अरे वेदांत तू समजला कि काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू =)) प्रदीप

सध्या असे गृहित धरून चालू की श्रीकृष्णांनी गीता सांगीतली होती. गीता का सांगितली याची मला ज्ञात असलेली पार्श्वभूमी म्हणजे, जेव्हा अर्जुन "आप्तजनांना कसे मारू?" या प्रश्नात अडकून शस्त्रसन्यास घेण्यास तत्पर झालेत, तेव्हा त्यांस त्यापासून परावृत्त करून पुन्हा युद्धसंमुख करण्यासाठी. नानाप्रकारे समजावून सांगताना श्रीकॄष्ण एके ठिकाणी म्हणतात "अरे मी या सर्वांस आधीच मारले आहे. तू केवळ निमित्त हो." का म्हणत असतील ते असे? "मा फलेशु कदाचन" यावर इतक्या मोठमोठ्या लोकांनी मत व्यक्त केलंय की स्वत:चे मत सांगायला जीभ कचरते. पण तरीही - मूळ आशेचा उगम हा कोणत्याही ईच्छेमधे होतो. स्वत:ला फळाची आशा नसणं म्हणजे स्वत:ची काही ईच्छा नसणं असा होतो. पण सोबत आणिक एक अर्थ धरावा लागेल, तो असा - माझी स्वत:ची वेगळी ईच्छाच असू नये, तर भगवंताची ईच्छा हीच माझी ईच्छा असणं; असा त्याचा भावार्थ आहे. व्यक्ती जर काया-वाचा-मने असे वागेल तर, जेव्हा मूळ ईच्छाच भगवंताची तेव्हा त्याच्या फळाची जबाबदारीही त्याचीच. ज्या निष्काम कर्माबद्दल श्रीकॄष्ण सांगतात ते हे. त्यांना त्यात व्यक्तीची शरणागती अपेक्षीत आहे. मला वाटतं "मा फलेशु कदाचन" चा अर्थ असा लावला गेला पाहिजे. ज्याला भगवंत हे "गृहितक" मान्य त्याने याचा आग्रह धरावा. ज्याला ते मान्य नसेल त्याला फळाची आशा नसण्याचा संबंध येतोच कुठे? :) राघव

वाचतोय. कृष्ण,गीता,उपदेश,अर्जून..संशय..सर्व चर्चा प्रतिसाद माहितीपूर्ण आहे...! आमचा मात्र ”यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः | तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥” यावर विश्वास आहे. -दिलीप बिरुटे [धार्मिक]

छान चर्चा चालली आहे, त्यामुळे मलाही चार ओळी लिहिल्याशिवाय राहवत नाही. फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले म्हणजे ते रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या नैसर्गिक सत्याविरुद्ध करायला सांगितले. "केलेल्या कर्माचे फळ मिळणारच नाही" असे श्रीकृष्णाचे सांगितलेले नाही किंवा "त्याची आशा धरू नकोस" असेही नाही. "हतो वा प्राप्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसि महीम्" असे सांगून "दोन्ही बाजूंनी तुझा फायदाच आहे" अशी आशा त्याने अर्जुनाला दाखवली होती. "कर्मावर तुझा अधिकार आहे, तू ते करू शकतोस आणि केले पाहिजेस, त्याचे अमूकच फळ मिळणे हे तुझ्या हक्काचे आहे असे समजू नकोस आणि त्याचा विचार करण्यात आपली शक्ती, बुध्दी आणि वेळ वाया न घालवता या क्षणी जे योग्य आहे ते कर्म तू करायला हवेस"' हा युध्दभूमीवर दिलेला उपदेश आहे. आजसुध्दा लढाईत उतरलेल्या सैनिकाला समोरच्या शत्रूवर सर्वशक्तीनिशी हल्ला करायचा असतो. आपल्याला त्यातून परमवीरचक्र मिळायला पाहिजे असा विचार त्या वेळी तो करत नाही. फळाच्या आशेने मनुष्य कर्म करतो तेव्हा तो ते एफिशियण्ट्ली करायचा प्रयत्न करतो. आपल्या कर्मातून अपेक्षित असलेली गोष्ट घडून आली, त्यामागीव उद्देश सफल झाला, तर त्यातून मनाला जे समाधान मिळते तेवढे फळ बहुतेक वेळी पुरेसे असते. त्यासाठी आवश्यक तेवढी कार्यक्षमता बहुतेक लोक दाखवतात. भारतीयांनी आजवर आपापली कर्मे जर एफिशियण्ट्ली केली असती तर आपला देश कदाचित निराळा घडला असता. ही गोष्ट कोठल्याही व्यक्तीला, समाजाला किंवा देशाला लागू पडेल. कर्मे जर वेगळ्या प्रकारे केली तर त्यांचा वेगळा परिणाम दिसेलच. श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करा' असे सांगायला विसरला... 'कर्म' या शब्दातच 'एफिशियन्सी' अंतर्भूत आहे. प्रत्येक कर्मामागे उद्दिष्ट असते आणि कार्यक्षमतेनुसार ते गांठले जाते. किंबहुना 'किती श्रम केल्यानंतर किती प्रमाणात उद्दिष्ट गांठले गेले' यालाच 'कार्यक्षमता' असे म्हणतात. शत्रूपासून स्वतःचा बचाव करून घेत त्याचा नाश करणे हे युध्दाचे 'उद्दिष्ट' असते, तर त्यानंतर त्याच्या संपत्तीवर कबजा करून तिचा उपभोग घेणे किंवा पदोन्नती, प्रसिध्दी, मानमरातब वगैरे प्राप्त करणे हे त्याचे 'फळ' समजले जाते. 'फळ' आणि 'उद्दिष्ट' यातला फरक उमगला नसेल तर लेखकाने लिहिल्यासारखा विचारांचा घोळ होतो. त्यामुळे "कृष्ण चुकला" असे म्हणण्याऐवजी "त्याच्या उपदेशाचा चुकीचा अर्थ लावला गेला" असे म्हणावे लागेल. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

कृष्ण काय कचेरीत सुद्धा पगारवाढ देतान हेच सांगतात फळाची आशा न करता कर्म करा :)

In reply to by Dipankar

परफॉर्मन्स पाहून पगारवाढ देतात, निदान तसा आभास तरी निर्माण केला जातो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

श्रीकृष्णाने मॅच फिक्सींग अगोदरच केले होते. मी यांना अगोदरच मारले आहे, तू फक्त निमित्त हो (मया एव एते निहता: पूर्वमेव निमित्तमात्र भव सव्यसाचिन् भ. गी. ११.३३) असे म्हटल्यावर फळाची आशा करू नका इत्यादि गप्पा ठीक आहेत. निकाल माहित असेल तर निष्काम कर्म कुणीही करेल... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

मला नाही वाटत कुठेही की श्रीकृष्ण "गप्पा" मारत आहेत. असो. ज्याचे त्याचे मत. निष्काम कर्माचा मला जो अर्थ मांडायचा तो मी मांडलाच आहे. त्या व्यतिरिक्त माझ्याजवळ सांगण्यास काहीही नाही. तुम्हाला जर असे वाटत असेल की निकाल माहित असतांना कुणीही असे करू शकेल तर ते तुमचे मत. राघव

In reply to by राघव

माझे मत मी गीतेतलाच आधार घेऊन मांडले आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

भगवंताला संपूर्ण शरणागत झाल्याशिवाय निष्काम कर्म शक्य नाही हे माझे मत आहे. त्यामुळे तुम्ही काढलेला निष्कर्ष - "श्रीकृष्णाची चूक" हाच मुळात चुकीचा आहे, हे देखील माझे मत आहे. आणि, माझे मत मी गीतेतलाच आधार घेऊन मांडले आहे. निकाल माहित असतांना कुणीही निष्काम कर्म करू शकेल ही भाषा फक्त तुमचीच आहे. स्वतःची चूक असतांना, त्यासाठी उगाच गीतेला नावं ठेवू नका. असो. तुम्ही एकुणात फक्त वाद घालण्यासाठी चर्चा करत आहात असे वाटते. त्यामुळे हा या धाग्यावरचा आमचा शेवटचा प्रतिसाद. राघव

In reply to by राघव

:) बिपिन कार्यकर्ते

यामद्धे एक विषय सुटल्या सारखा वाटतो, मुळात गीतेचा reference exceptionally वापरला पाहिजे, ना की normally. जेव्हा अर्जुन अशा धर्मसन्कटात पडला की, आप्त लोकाना मारावे की युद्ध सोडुन सन्यास घ्यावा, तेव्हा क्रुष्णाने सान्गीतले कि मरणारा कोण आहे त्याकडे लक्ष देवु नकोस तर तु तुझ काम कर. तु क्षत्रीय आहेस तुला लढावेच लागेल. यामधे असे उदाहरण घ्या की तुम्हि हॉटेलच्या countervar बसला आहात आणि भजी खायला तुमचे मित्र आले, पण बिल न देताच जाऊ लागले , तर तुम्ही त्याना कामगारान्च्या मदतिने चोपलेच पहिजे.

यामद्धे एक विषय सुटल्या सारखा वाटतो, मुळात गीतेचा reference exceptionally वापरला पाहिजे, ना की normally. जेव्हा अर्जुन अशा धर्मसन्कटात पडला की, आप्त लोकाना मारावे की युद्ध सोडुन सन्यास घ्यावा, तेव्हा क्रुष्णाने सान्गीतले कि मरणारा कोण आहे त्याकडे लक्ष देवु नकोस तर तु तुझ काम कर. तु क्षत्रीय आहेस तुला लढावेच लागेल. यामधे असे उदाहरण घ्या की तुम्हि हॉटेलच्या countervar बसला आहात आणि भजी खायला तुमचे मित्र आले, पण बिल न देताच जाऊ लागले , तर तुम्ही त्याना कामगारान्च्या मदतिने चोपलेच पहिजे.

फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले म्हणजे ते रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या नैसर्गिक सत्याविरुद्ध करायला सांगितले. फळाच्या आशेने मनुष्य कर्म करतो तेव्हा तो ते एफिशियण्ट्ली करायचा प्रयत्न करतो. भारतीयांनी आजवर आपापली कर्मे जर एफिशियण्ट्ली केली असती तर आपला देश कदाचित निराळा घडला असता. श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करा' असे सांगायला विसरला... १. रिवार्ड पनिशमेंट याला काहीही अर्थ नाही.... 'देअर आर नो रिवार्ड्स नो पनिशमेंट्स , देअर आर ओन्ली कॉन्सिक्वेन्सेस.....' असे कुठे तरी वाचलेले आहे... २. श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करु नका' असे तरी कुठे म्हणाला आहे? म्हणजे त्यचा अर्थ कर्म एफिसिएंटली करा, असाच घ्यावा लागतो.. :) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

पण कृष्णाने आत्म्याबद्दल जे सांगितले आहे ते खरे की खोटे हे स्वतः मेल्याशिवाय कळणार नाही. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले हा एक सरसकट काढलेला चुकीचा अर्थ आहे. कोणतेही कर्म केले तरी फल ( परिणाम) मिळणारच आहे. कर्म न करणे हे देखील एक कर्मच आहे. फक्त त्याचे कर्मफल ठाऊक नसते. एखाद्या कर्मफलाच्या भितीने ते कर्म टाळण्यापेक्षा कर्म करणे श्रेयस्कर. शिवाय एखाद्या कर्माचे फल आपल्याला एज हवे असेल तसेच असेल/मिळेल असे नाही त्यामुळे हव्या तशाच कर्मफलाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा कर्म करणे महत्वाचे आहे या अर्थाने बहुतेक श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले

चर्चा आवडली.. खुप शिकायला मिळालं. सगळ्यांचे आभार. माझे मत मी मांडत नसलो तरी जवळ- जवळ सर्वच मुद्दे आणि बाजु पटण्या सारख्या आहेत. हत्ती आणि अंधळे हि जी उपमा दिली गेली आहे ती खरोखरच किती उपयुक्त आहे हे जाणवते.