मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संकेतस्थळे आणि खाजगी मालकी - एक मुक्तविचार

वाचक · · काथ्याकूट
सध्या दुसर्‍या एका धाग्याच्या निमित्ताने (पुन्हा) हा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासंदर्भाने बर्‍याच दिवसांपासून मनात आलेले विचार शब्दबद्ध करतोय, सगळ्यांचा वैचरिक सहभाग अपेक्षित आहे, कृपया वैयक्तिक टीकेऐवजी मुद्द्यांना प्राधान्य देणे. माणूस संकेतस्थळ का काढतो ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आधी वाटलं - माणसाची आदिम प्रेरणा "मला काही सांगायचय" ही असावी. पण नंतर थोडा विचार केला असता असे लक्षात आले की 'मला जे सांगायचय' त्यासाठी इतर 'फुकट' अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की ब्लॉग, दुसरी संकेतस्थळे. मग स्वतःचे संकेतस्थळ असावे ही प्रेरणा नेमकी कशामुळे ? आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर संकेतस्थळांची 'वृत्तपत्रांशी' तुलना करता येइल. १) 'स्वतःच्या विचारांचा (अनिर्बंध वा मुक्त) प्रसार' किंवा २) 'दुसर्‍यांच्या विचारांचा विरोध' ह्यासाठी स्वतःचे वृत्तपत्र असावे ह्याच विचारांनी अनेकांनी वृत्तपत्रे चालू केली किंवा विकत घेतली. पुढे त्यात जाहिराती हा मुद्दाही समाविष्ट झाला पण तसे बघितले तर तोसुद्धा मुद्दा क्र. १) मधे बसू शकेल. हाच नियम संकेतस्थळांनाही लागू पडतो. हा विचार कॄतीत आणण्यामागच्या प्रेरणाही वेगवेगळ्या असू शकतात. इतर संकेतस्थळांच्या धोरणांविषयी, तिथल्या सदस्यांविषयी, सुविधांविषयी, विषयांबद्दल - नापसंती ही एक प्रमुख प्रेरणा. त्याचबरोबर 'ही गोष्ट तुम्ही करता त्यापेक्षा (वेगळी, चांगली) करता येउ शकेल हे दाखवून देण्याची जिद्द किंवा नुसतीच 'स्वयं शिक्षणाची आच' (अर्थात ही फार दुर्मिळ). पण कारण कुठलेही असूदे, संकेतस्थळ उभारण्या / चालवण्या साठी पदरमोड करण्याची तयारी, (तांत्रिक किंवा समविचारी) सहकार्‍यांची जमवाजमव, सुरुवातीला तरी एक निश्चित धोरण वा उद्दिष्ट अशा अनेक गोष्टींची गरज असते. आता संकेतस्थळ चालू केले आहेच तर मुख्यत्वे 'वाचकवर्ग' आणि नंतर सहभागी 'लेखक वर्ग' हवाच. मग ह्या दोन्ही वर्गांना त्यांचे संकेतस्थळावरचे वावरणे सोपे व्हावे म्हणून अधिकाधिक सुविधा पुरविणे - प्रसंगी (पैशाची, वेळाची, ज्ञानाची) पदरमोड करुन. ह्यातून वाचक / लेखक वाढीस लागले की संकेतस्थळाची 'क्षमता' गरजेप्रमाणे वाढवणे त्यासाठी परत पदरमोड. असे करुन संकेतस्थळ भरभराटीस येते. आता 'असतिल शिते तेथे जमतिल भुते' - किंवा 'कट्ट्यावर जमणारे कट्टेकरी' किंवा 'विचारांची देवाण घेवाण करु इच्छिणारी मंडळी' - कुठल्याही कारणाने का असेना मंडळी जमणारच - आणि ती जमावितच असाच चालकांचा उद्देश तेव्हा हे योग्यच. पण जसजशी लोकं वाढायला लागतात तेव्हाच 'दुसर्‍या' विचारांची लोक, मत्सरग्रस्त, निव्वळ मजा बघणारे, बाजूने भांडणारे, भांडण लावणारे असे अनेक लोक गोळा होतात. हेही साहजिकच. आणि तेव्हाच खरी कसोटी लागते चालकांची. ही खाजगी मालमत्ता खरीच, त्याबाबत दुमत होण्याचे कोणाचे काहीच कारण नाही. आणि खाजगी पणाबरोबरच तो खाजगीपणा जपण्याचे काही नियमही. नियम पाळण्याची जबाबदारी सदस्यांची, ते नियम बनवून, उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी चालकांची आणि नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी प्रशासकांची/संपादकांची. आता ह्यात पारदर्शकता नसली, समन्वयाचा अभाव असला किंवा एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसराच असे प्रकार असले की गडबड होणारच. मालकी खाजगी - त्यामुळे नियम ठरविण्याचे स्वातंत्र्यही आणि ते बदलण्याचेही. त्याचमुळे "चपला", "आहे हे असे आहे" असे प्रतिसाद येणे अगदी साहजिकच. तसच वेळोवेळी स्पष्ट केल्याप्रमाणे 'चालेल तेवढे दिवस चालेल नाहीतर बंद करुन टाकीन तिच्यामायला" हेही परिचयाचे. पण ह्याच वेळी "मिपाकरांमुळेच मिपा आहे..सर्व मिपाकरांचे मनापासून आभार.." अशा प्रतिसादांमुळे गोंधळ उडतो. इथले मालक पूर्वीपासून दुसर्‍या एका संकेतस्थळाचे नियमित, चांगले लिखाणकर्ते सदस्य, स्वत्: संगीततज्ज्ञ म्हणता येईल इथपर्यंत शास्त्रीय संगितात गती असलेले, बर्‍याच वेळेला दिसलेली उत्तम विनोद बुद्धी शिवाय व्यक्तिचित्रातून दिसणारी निरिक्षणशक्ती आणि वेगवेगळ्या कट्ट्यांतून कानावर पडल्याप्रमाणे माणस जोडण्याची क्षमताही. पूर्वोक्त संकेतस्थळांचे जाचक नियम न पटल्यामुळे बाहेर पडून जिद्दिने, पदरमोड करुन नविन संकेतस्थळाची उभारणी आणि ते नावारुपाला आणून दाखविण्याची कला, क्षमता अंगी. अशा सर्व पार्श्वभूमीवर 'अशी परिस्थिती का यावी' हे माझ्या आकलनाबाहेरचे. मालकांनी नुकतेच एका जाहिर कार्यक्रमात 'मिपाचे' प्रतिनिधित्त्व केले, माझ्या अल्प माहिती नुसार ते ह्या संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत म्हणूनच त्यांना सहभागी व्हायची संधी मिळाली (नुसते ब्लॉगलेखक म्हणून नव्हे) आणि त्याच बरोबर त्यांनी सदस्यांचे जाहिर आभारही मानले आहेत. असे असताना, (हे) संकेतस्थळ काढण्यामागची पूर्वीची उद्दिष्ट्ये काय होती, त्यांच्यात काही बदल झाला आहे का? निर्माण केलेले संकेतस्थळ त्या उद्दिष्ट्यपूर्तीच्या मार्गावर आहे का? नसेल तर कसे आणता येईल, प्रशासानात पारदर्शकतपाकशी आणता / वाढविता येईल, वगैरे वगैरे बाबींचा उहापोह करण्यासाठी हा लेख प्रपंच. (टीपः मी नियमित लेखक नसलो तरी नियमित वाचक आहे आणि हा लेख संस्थळाचे बदलते स्वरुप जाणवले म्हणून लिहिला आहे, उडविला गेला, संपादित झाला तरी हरकत नाही, मला माझी जी मते आहेत ती व्यक्त कराविशी वाटली म्हणून केली एवढेच...)

वाचने 6227 वाचनखूण प्रतिक्रिया 22

शुचि Mon, 03/08/2010 - 01:19
>>एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसराच असे प्रकार असले की गडबड होणारच.>> उदाहरण द्या ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

लंबूटांग Mon, 03/08/2010 - 06:22
प्रतिसाद उडून गेल्यानंतर उदाहरण द्यायचे कसे हो? काही उदाहरणे 'त्या' ब्लॉगवर मिळतीलच ;). --(अजूनतरी एकही प्रतिसाद न उडलेला) लंबूटांग

In reply to by लंबूटांग

लंबू, तुझा मुद्दा मान्य १००% आहेच आहे. पण क्वचित कधी व्यक्तीसापेक्ष संपादनही होऊ शकतं. एखाद्या आयडीचे विचार काही काळ वाचनानंतर संपादकांना माहित असतात; नुसतेच विचार असं नाही तर विचार करण्याची पद्धत आणि त्याबरोबर आयडीची प्रगल्भताही! त्यामुळे अशा अपवादात्मक परिस्थितीत एखादं संशयित वाक्य राहू दिलं जाऊ शकतं अथवा दुर्लक्षित राहू शकतं. अर्थात ही एक थिअरेटीकल(च) केस आहे असं मानायला जागा आहे. अदिती

Nile Mon, 03/08/2010 - 01:39
संस्थळ ही खाजगी मालमत्ता आहे आणि त्याचा प्रसार, वृद्धी करण्यासाठी जर त्या संस्थळाच्या मालकांना काही सदस्य इतरांपेक्षा महत्त्वाचे असे वाटत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही असे माझे प्रामाणिक मत. पण, 'चपला घाला, चालु पडा' इ. वाक्ये अनेकांना खटकु शकतात असे वाटते, अर्थातच असे वाटणे हा माझा दृष्टीकोन.

In reply to by Nile

मदनबाण Tue, 03/09/2010 - 11:18
'चपला घाला, चालु पडा' इ. वाक्ये अनेकांना खटकु शकतात असे वाटते, अर्थातच असे वाटणे हा माझा दृष्टीकोन. नीलशी सहमत... तसेही ही खाजगी मालमत्ता असल्याने मालक लिहतील ते "योग्यच" आणि इतरांनी तेच किंवा तसेच लिहलं की संपादीत हा निकष इथे लागतो. मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

In reply to by मदनबाण

वाहीदा Tue, 03/09/2010 - 13:05
'चपला घाला, चालु पडा' इ. वाक्ये अनेकांना खटकु शकतात असे वाटते, अर्थातच असे वाटणे हा माझा दृष्टीकोन. नीलशी सहमत... तसेही ही खाजगी मालमत्ता असल्याने मालक लिहतील ते "योग्यच" आणि इतरांनी तेच किंवा तसेच लिहलं की संपादीत हा निकष इथे लागतो. सहमत !! ~ वाहीदा

नितिन थत्ते Mon, 03/08/2010 - 01:54
संकेतस्थळ खाजगी मालकीचे असले आणि मुक्त लेखनाचे पुरस्कर्ते असले तरी संकेतस्थळ समाजात अस्तित्वात आहे. त्यामुळे समाजात असलेले कायदे संकेतस्थळालाही लागू असतात. त्या दृष्टीने अनिष्ट लेखन झाल्यास त्यावर कारवाई करणे हे आवश्यक ठरते. सध्या एक नवे सदस्य जो कल्ला करत आहेत त्यांच्याकडून ती चूक झाली होती हे म्हणण्यास वाव आहे. ती इतर सदस्यांनी निदर्शनास आणून दिल्यावर त्या नव्या सदस्याने कांगावा करणे बरे नाही. अशा स्थितीत मालक चपला घाला / चालू पडा असे म्हणाले तर त्यात वावगे काही नाही. त्यामुळे 'माझ्या संकेतस्थळावर लेखनाचे पूर्ण स्वातंत्र्य असेल' असे मालकांनी कोणे एके काळी जरी म्हटले असेल तरी हे पूर्ण स्वातंत्र्य या कुंपणाच्या आतच ते आपल्याला देऊ शकतात. दुसरा भाग मालकांच्या काही मुद्द्यांवरील व्यक्तिगत मतांविषयी असू शकतो. पण खाजगी मालकी आहे म्हटल्यावर ते गृहीत धरायला हवे. (मी ही कधी कधी या कारणाने मालकांशी वाद घातला आहे. पण अनावश्यक कात्रीचा अनुभव मला तरी नाही). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

शुचि Mon, 03/08/2010 - 02:18
चांगला मुद्दा मांड्लात थत्ते की - संकेतस्थळ समाजात अस्तित्वात आहे. बरं दुसरं हे की स्वातंन्त्र्याबरोबर जबाबदारी येते. मालकांनी कधी कोणावर सक्ती केलीये वैयक्तीक माहीती भरायची?उद्या एखाद्या जातीला नावं ठेवून तुम्ही मिपा ला वाटण्याच्या अक्षता लावून जाऊ शकता. मालकांच बिचार्‍यांचं काय? ते तोंड देणार का कोर्ट्-कचेरीला? अरे काही तरी विचार करा. नवा सदस्य येतो काय एका जातीला नाव काय ठेवतो आणि त्याचा लेख संपादीत झाल्या झाल्या तुम्ही मिपा ढवळून काढता? मग काय तो लेख तसच ठेवून दंगल होऊ द्यायची? त्या लेखातून फक्त ती जात वगळली असती अणि दुसरा शब्द घातला असता तर त्या लेखाचा अर्थच बदलला असता. तो लेख संपादीत होण्यासारखा नव्हता. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by सन्जोप राव

शुचि Mon, 03/08/2010 - 07:16
अय्या तुम्हाला कस कळलं? पण अजून मंजूर व्हायचाय तोवर तुमचं चालू द्या मग लावते कात्री . ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

विसोबा खेचर Mon, 03/08/2010 - 07:59
वाचकराव, प्रकटन मनापासून आवडले! :)
टीपः मी नियमित लेखक नसलो तरी नियमित वाचक आहे आणि हा लेख संस्थळाचे बदलते स्वरुप जाणवले म्हणून लिहिला आहे,
छान लिहिता आपण.. नुसतेच वाचक न राहता अधनंमधनं काही लिहितदेखील रहा अशी विनंती.. आपला, तात्या.

अर्धवटराव Tue, 03/09/2010 - 08:17
संकेतस्थळे काढणे, चालवणे, त्यातले लेख, टीका... थोडक्यात काय तर संकेतस्थळाच्या गर्भधारणेपासुन तर तेरवि-श्राद्धापर्यंत सगळ्या गोष्टिंचे मूळ कारण म्हणजे 'खाज' !!! खरं तर जगातल्या सर्व मनुष्यमात्रांच्या सर्व क्रिया कलापाची तिच प्रेरणा. आता कधी जास्तच खाजवल तर आघ होणारच. तेव्हा प्रत्येकाने (गुरुवर्य) काकाजी देवासकरांचा उपदेश मानुन आपापल्या पट्टीत खाजवावे... ही खाजच जीवंतपणाचे लक्षण आहे.. तेंव्हा तिचा योग्य तो आणि तेव्ह्ढाच सन्मान केलेला बरा !!! (बौद्धीकिस तत्पर) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by अर्धवटराव

जे.पी.मॉर्गन Tue, 03/09/2010 - 13:17
संकेतस्थळे काढणे, चालवणे, त्यातले लेख, टीका... थोडक्यात काय तर संकेतस्थळाच्या गर्भधारणेपासुन तर तेरवि-श्राद्धापर्यंत सगळ्या गोष्टिंचे मूळ कारण म्हणजे 'खाज' !!! कई बोल्या - येकद्दम बराब्बर... खाज तिथे नाईलाज

संकेतस्थळाची तुलना जर शहरातल्या रहरदारीशी केली तर काही उत्तरे मिळतील. सदस्यांची संख्या वाढल्यावर ही गर्दी वाढते. मग स्वयंशिस्त बाळगली नाही तर अपघात होतात. अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा मुद्दा हा नेहमीच वादग्रस्त असतो. सर्वांना सदासर्वदा १०० टक्के न्याय मिळेल असे संकेतस्थळ वा समाज ही केवळ आदर्श कल्पना आहे. घटनेत जशी मार्गदर्शक तत्वे असतात तशीच काही तत्वे वा पथ्ये सामुहिक जीवनात पाळावी लागतात. संकेतस्थळ हे आयडींचे सामुहिक सहजीवन आहे. प्रत्येक आयडी मागे माणुस असतोच. माणुस आला म्हणजे भावभावना आल्याच. लिहिणारे काहि यंत्रमानव नाहीत व संकेतस्थळांचे मालक ही यंत्रमानव नाहीत. ब्लॉगलेखन म्हणजे आपल्या घरात आपण राजे. पण मग तुमच्या कडे कोणी ढुंकुन पहाणार नाही. अर्धवटराव म्हणतात तसे लेखन प्रेरणा ही खाज आहे हे मान्य पण तशीच ती माज ही आहे. संकेत स्थळावर हा माज कधी कधी उतरतो तर कधी चढतो. अनेक उत्तमोत्तम ब्लॉगर्स आहेत जे दुर्लक्षित आहेत. ते स्वांत सुखाय लिहितात. वाचक यांनी चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. चर्चा चालु द्यात प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

टारझन Tue, 03/09/2010 - 09:30
हाहाहा ... वाचकरावांचीही तगमग झाली .. =)) आपण तर बॉ आपला केवळ एकंच मोटो ठेवतो ... कसल्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत .. कसलीही राजकारनं खेळायची नाहीत ... या बोटाच्या थुक्या त्या बोटावर करायच्या नाहीत ... यायचं .. दंगा करायचा .. भरपुर हसायचं .. (जमल्यास हसवायचं ) आणि लॉगाऊट मारायचं .. शेवटी हे व्हर्चुअल वर्ल्ड ! हा आता दंगा करतांना दोन चार जनांची हाडं मोडली तर ते होणारंच असं ग्रुहित असतं =)) - (जाळपोळ प्रेमी) दंगाराम

आनंद घारे Tue, 03/09/2010 - 10:13
हा मुद्दा कुठून आला? सार्वजनिक जागेवर लावलेली एकादी पाटी (किंवा चित्र) आक्षेपार्ह वाटली तर ती काढून टाकण्याचे काम कोणाला तरी करावे लागतेच. तो अधिकारी माणूसच असतो आणि त्याच्या समजुतीनुसार योग्य किंवा अयोग्य हे ठरवतो. त्या बाबतीत मतभेद असतात आणि त्यावरून दंगली होण्यापर्यंत पाळी आलेली आहे. संकेतस्थळ चालवणे हे जबाबदारीचे काम करणार्‍याला ते सुरळीत चालू ठेवणे हे व्यक्तीगत मतस्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटणारच. माझ्या अनुभवाप्रमाणे मिसळपाव वर लिहिणार्‍यांना बरेच स्वातंत्र्य मिळते. मनोगतवर कोणत्या प्रकारची बंधने येत होती / येतात आणि मिसळपाववर त्यांचे कोणते स्वरूप आहे या तुलनेत माझ्या मते फारसे तथ्य नाही. अखेर कुठेही गेलात तरी 'आहे हे असे आहे' या सत्याला सामोरे जावे लागतेच. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर आलेला कोणाचाही (नकारात्मक) प्रतिसाद उडवायचा नाही हे धोरण मी चार वर्षे पाळले होते, पण अखेर माझाही नाइलाज झालाच. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर आलेला कोणाचाही (नकारात्मक) प्रतिसाद उडवायचा नाही हे धोरण मी चार वर्षे पाळले होते, पण अखेर माझाही नाइलाज झालाच.
ज्या अर्थी आपल्यालाही प्रतिसाद उडवावा वाटला त्याअथी तो त्याच लायकीचा निनावी असणार असा प्राथमिक अंदाज आहे. तीव्र मतभिन्नता व्यक्त करणारे प्रतिसाददेखील आपण उडवणार नाही याची आम्हाला खात्री वाटते प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वाचक Tue, 03/09/2010 - 20:09
सर्व प्रथम चांगली चर्चा चालू आणि 'ठेवल्या' बद्दल सदस्यांचे आणि प्रवर्तकांचे आभार. माझा 'खाजगी मालकी आणि त्या अनुषंगाने येणारी निर्णय स्वतंत्रता' ह्याला अजिबात विरोध नाही. जे काही करायचे असेल ते खुशाल करावे. पण त्याने जर संकेतस्थळाच्या मूळ उद्दिष्टालाच जर बाधा येत असेल तर तसे करण्याचे कारण समजत नाही इतकेच. माझ्या अल्प माहिती नुसार ' १) मनोगत' ह्या संकेतस्थळावरील प्रशासकीय अनुमति हा नियम न पटल्यामुळे २) त्याच प्रमाणे तिथे विषयांचे बंधन जाणवल्यामुळे ३) शुद्ध लेखनाचा अत्याग्रह झाल्यामुळे ४) आणि तात्याना वैयक्तिकरीत्या न पटणारे '(अति)सभ्यतेचे संकेत' पाळण्याची इच्छा नसल्याने "मिसळपाव" ह्या संकेतस्थळाची निर्मिती झाली. इथे वरच्या चार मुद्द्यांपैकी क्र. ३ आणि क्र. ४ ला पूर्ण फाटा देण्यात आलेला आहे आणि तो 'खाजगी मालकी' ध्यानात घेता योग्यही ठरला आहे. पण त्याचबरोबर 'सभासदांबरोबर थोडिफार अरेरावीची भाषा, चालते व्हा असे सल्ले देउन चपला दाखविणे, आय.डी विना पूर्वसूचना गोठविणे' असे प्रकार सुद्धा झालेले आहेत. परत एकदा सांगतो - की 'खाजगी मालकी' ध्यानात घेता ह्यावरही आक्षेप घेता येणार नाही. पण संकेतस्थळ चालू करण्याच्या मूळ उद्देशाशी हे धोरण सुसंगत नाही असे मला वाटले म्हणून हा लेख प्रपंच. 'खाजगी मालकी' चे स्वातंत्र्य मान्य आहेच पण त्याचा अनिर्बंध वापर केल्याने 'संस्थळ' त्याच्या पूर्ण क्षमतेने तग धरु शकणार नाही अशी साधार भिती वाटली आणि दोनेक वर्षातच एवढे चांगले संस्थळ मागे पडू लागेल अशा चिंतेनेच हा चर्चा विषय चालू केला. त्याचबरोबर, एकिकडे 'मिपा मिपाकरांचेच आहे, त्यांच्यामुळेच मिपा आहे, मी कृतज्ञ आहे' अशी भाषा मग 'हिपोक्रसी / ढोंगिपणा' वाटली तर त्याला आमचा नाईलाज आहे.

In reply to by वाचक

विसोबा खेचर Tue, 03/09/2010 - 22:35
'खाजगी मालकी' चे स्वातंत्र्य मान्य आहेच पण त्याचा अनिर्बंध वापर केल्याने 'संस्थळ' त्याच्या पूर्ण क्षमतेने तग धरु शकणार नाही अशी साधार भिती वाटली आणि दोनेक वर्षातच एवढे चांगले संस्थळ मागे पडू लागेल अशा चिंतेनेच हा चर्चा विषय चालू केला.
आपल्याला वाटणार्‍या चिंतेबद्दल कृतज्ञ आहे, परंतु शेवटी प्रत्येक गोष्टीला एक आयुष्य असतं. मिपाला जेवढं आयुष्य आहे तेवढंच ते राहील..जोवर चार लोकं इथे मिपाच्या प्रेमापोटी इथे येताहेत तोवर मिपा सुरूच राहील.. कुणीच येईनासं झालं की ते आपोआप बंद पडेल.. सिंपल!
त्याचबरोबर, एकिकडे 'मिपा मिपाकरांचेच आहे, त्यांच्यामुळेच मिपा आहे, मी कृतज्ञ आहे' अशी भाषा मग 'हिपोक्रसी / ढोंगिपणा' वाटली तर त्याला आमचा नाईलाज आहे.
यात हिपोक्रसी किंवा ढोंगीपणा निश्चित नाही.. नक्की नाही..! मिपा जे आहे जसं आहे तसंच्या तसं आवडणारे मिपाकर आहेत म्हणूनच मिपा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याबाबत मी वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करत असतो.. परंतु वाचकराव, तुम्हाला जर यात काही ढोंग किंवा हिपोक्रसी वाटत असेल तर असहमत असूनदेखील मी आपल्या मताचा आदर करतो.. धन्यवाद, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शुचि Tue, 03/09/2010 - 23:17
मिपा आहे तसं मलाही आवडतं!!! मला अनेकदा वाइट वाटतं ते माझ्यात प्रतिभा नसल्याचं आणि मिपाला उत्तम "काँट्रीब्युशन" देऊ न शकत असल्याचं पण इथे इतकी थोर थोर डोकी आहेत हे पाहून दिलासाही मिळतो आणि कृतज्ञताही वाटते. पुढचं कोणी पाहीलय? मला तर उलटं वाटतय .... मिपा अजून शैशवावस्थेत आहे ..... मिपाला खूप काही मंगल पहायचय आणि समृद्ध होत होत मराठी मन समृद्ध करायचय अजून. अभी तो शुरुआत है... लेट्स सी. *********************************** “The war between the sexes is the only one in which both sides regularly sleep with the enemy”