Skip to main content

भारत कॅनडा संबंध का बिघडत आहेत? आणि परिणाम?

लेखक कंजूस यांनी सोमवार, 23/10/2023 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
भारत कॅनडा संबंध का बिघडत आहेत (राजकीय घडामोडींची नोंद) आता आताच जी २० चे शेवटचे बिगुल वाजले, सर्वांनी एकमेकांशी हात मिळवले आणि छान पैकी त्यांच्या आठवणी काढत मंत्रालय मंडळी स्मरण करत असतानाच कॅनडाच्या मुख्य मंत्र्यांनी भारतावर तोफ डागली. ती सुद्धा त्यांच्या पार्लमेंटांतच. "खलिस्तानवादी नेत्याची हत्या होण्यात भारत सरकारचा छुपा हात तर नाही?" शिवाय तो मनुष्य कॅनडाचा नागरिक म्हणजे गंभीर आरोप. शिवाय हल्लीच दोन्ही देशांनी एकमेकांचे अधिकृत डिप्लोमॅट परत पाठवायला सुरुवात केली आहे. असे राजकीय आणि (व्यापारी) संबंध बिघडणे भारताला तरी परवडणारे नाही. यासंबंधी India Today साप्ताहिक आणि Hindustan Times paper बरेच अपडेट्स देत आहेत ते तिकडे पाहता येतील. मुख्य म्हणजे कॅनडाचे मुख्य मंत्री एवढे भडकण्याचे आणि त्यांनी वक्तव्यं करण्याचे आंतरिक राजकारण काय आहे? तर ट्रुडो यांच्या पार्टीला सत्ता मिळवण्यासाठी ज्या वीस सांसदांचा आधार घ्यावा लागला ते सर्व खलिस्तानवादी विचारांचे कॅनडिअन शीख नागरिक आहेत. त्यामुळेच त्यांना खुश करण्याचा ट्रुडो यांनी चंग बांधला आहे. शिवाय आता एक वर्षात तिकडे निवडणुका होत आहेत. योगायोगाने इकडे भारतातही निवडणुका होणार आहेत. प्रस्थापित भाजपाला हा एक कळीचा मुद्दा ठरेल. पण विरोधी पक्षातल्या कॉन्ग्रेसलाही खलिस्तानवादी विरोधातून इंदिरा गांधींच्या काळात जबर फटका बसला होताच. इतरांसाठी - राष्ट्राचे तुकडे होणार का? एकूण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जळके चटके बसणार आहेत. राजकारणात नसलेल्यांनाही धक्काच ठरेल. कॅनडात गेलेले भारतीय नागरिक हे दोन भागात वाटले गेलेत - शीख आणि इतर धर्मीय. परत यावं लागण्याची भीती सर्वांनाच सतावत आहे. पंजाबी रॅप गायकांचा श्रोतावर्ग कमी होईल आणि धंदा संपेल हीसुद्धा शक्यता आहेच. दोन ठिकाणी होळ्या पेटल्यावर आपल्या घरचीही चार लाकडे जाणारच यात शंका नाही, किंवा हाळ लागणारच. तर ती कुठे आणि कशी बसेल या विषयी चर्चा म्हणून धागा काढत आहे. थोडक्यात राजकीय चर्चा नसून धुमाळीचा धुरळा कसा उडेल याबद्दल. (संस्थळाच्या नियमाने आणि संयमाने आपले विचार मांडावेत ही विनंती.)

वाचने 6908
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

वेगळा धागा काढलात हे उत्तम! इस्त्रायल-पॅलेस्टाईन धाग्यावर विषयांतर झाले असते ते टळले. आता त्या धाग्यावर देण्यासाठी टंकायला घेतलेला प्रतिसाद इथे देतो 😀 कॅनडाचा हा 'पप्पू' आणि त्याचे 'पप्पा' ह्या दोघांच्या कारकिर्दीत भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडण्याची जुनी परंपरा आहे. जस्टीन ट्रुडोचे पप्पा पियरे ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान असतानाच्या काळात हे संबंध बिघडण्यास सुरुवात झाली होती आणि त्यासाठी १९७४ च्या मे महिन्यात भारताने केलेली अणुचाचणी निमित्त ठरली होती. (त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता, त्यामुळे तेव्हाची राजकीय परिस्थिती कशी होती ह्याची मला काही कल्पना नाही, पण तुम्हाला ती माहिती असेल.) ह्या पियरे ट्रुडोने खलिस्तानी अतिरेक्यांना आश्रय देऊन त्यांच्या भारतविरोधी चळवळीला खतपाणी घातले होते. भारत आणि कॅनडा उभय देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने दिलेल्या इशाऱ्यानंतरही पियरे ट्रुडोच्या निष्काळजीपणामुळे १९८५ साली कॅनडातून आपल्या कारवाया करणाऱ्या खलिस्तानी अतिरेक्यांना एअर इंडियाच्या कनिष्क ह्या प्रवासी विमानात बॉम्बस्फोट घडवण्यात यश मिळाले होते. ३८ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत विमानातील सर्व ३२९ प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. कॅनडा या घटनेचा तपासही पूर्ण करू शकला नाही त्यामुळे आजतागायत हा घातपात घडवून आणणाऱ्या एकाही खलिस्तानी अतिरेक्याला शिक्षा झालेली नाही. सीबीआयनं ह्या घातपाताचा तपास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कॅनडानं कायद्याच्या मदतीनं अडथळे निर्माण केले आणि त्यांचाही तपास पूर्ण होऊ दिला नव्हता. कॅनडाच्या गुप्तचर संस्थेला आणि पोलिसदलाला ह्या घातपाताच्या कटाची पूर्वसूचना अनेक गोष्टींतून मिळाली होती आणि त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली असती तर हा घातपात टाळता आला असता पण तसे घडले नव्हते, आणि भारताच्या दृष्टीने ह्यासाठी पियरे ट्रुडो जवाबदार होता. आपल्या 'पप्पा' कडून भारतद्वेष वारशात मिळाला असला तरी सध्या ह्या कॅनडाच्या 'पप्पू' ने ज्या नव्या वादाला तोंड फोडले आहे त्याला मात्र त्याची राजकीय मजबुरी कारणीभूत आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातला दुसरा सर्वात मोठा देश पण अवघ्या चार कोटिं पेक्षा अगदी थोडी जास्त लोकसंख्या असलेल्या कॅनडातील 'कोविड परिस्थिती' आपल्या सरकारने यशस्वीरीत्या हाताळल्याने जनता खुश असून आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाला बहुमत मिळेल अशा भ्रमात २०१९ च्या निवडणुकांना सामोरे गेलेल्या कॅनडाच्या ह्या पप्पूच्या लिबरल पक्षाने २०१५ च्या निवडणुकीत मिळालेले बहुमत गमावले. नंतर २०२१ च्या मुदतपूर्व निवडणुकीतही बहुमत तर नाहीच पण पक्षाच्या फार काही जागाही वाढल्या नव्हत्या. त्या निवडणुकांमध्ये जगमीत सिंग नावाच्या खलिस्तान समर्थक नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढवलेल्या NDP पक्षाला २५ जागा मिळाल्या आणि त्या पक्षाच्या पाठिंब्याने पप्पूने आपले पुन्हा सरकार बनवलेले आहे. उघडपणे भारतविरोधी वक्तव्ये करणाऱ्या ह्या जगमीत सिंगला त्याची भारत विरोधी वक्तव्ये आणि खलिस्तान समर्थक पार्श्वभूमी अशा कारणांसाठी २०१३ मध्ये भारताचा व्हिसा नाकारण्यात आला होता. ह्या नवीन मित्राच्या मदतीची पप्पूला आपल्या राजकीय भवितव्यासाठी नितांत गरज असल्याने त्याचे शिखांचे लांगुलचालन अगदी भरात आले आहे त्यामुळे कॅनेडियन लोकं गमतीने त्याला जस्टीन'सिंग' ट्रूडो असे म्हणू लागली आहेत. असो, ह्या भारत विरोधी बाप-लोकांचा हा इतिहास आणि वर्तमान बघता भारताने कॅनडाच्या ह्या पप्पूला भीक घालण्याची अजिबात गरज नाही, त्याने भारताशी वैर घेतल्याने भारताला काही विशेष फरक पडणार नसून कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर मात्र त्याचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात. कॅनडात दीर्घ कालीन आणि अल्पकालीन शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेत तीस अब्ज डॉलर्सची भर पडत आहे. त्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण ४०% आहे. म्हणजे ढोबळमानाने तब्बल १२०० कोटी डॉलर्सची भर (एका कॅनेडियन डॉलरची किंमत आज ६०. ६२ रुपये आहे. १२०० X ६०. ६२ = ७२,७४४ कोटी - अक्षरी बहात्तर हजार सातशे चव्वेचाळीस कोटी रुपये.) भारतीय पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी त्यांच्या जमा पुंजीतून किंवा शैक्षणिक कर्ज काढून कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत घालत आहेत. २०१८ साली ह्या पप्पूच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र मंत्री असलेल्या बाईंनी ट्विटरवर सौदी अरेबियावर मानवाधिकाराच्या मुद्द्यावर टीका करून एका वादाला तोंड फोडले होते. त्यावेळी सौदी अरेबियाने तीव्र नाराजी दर्शवत त्वरीत कॅनडाला चिलखती गाड्यांसाठी दिलेली १५ अब्ज डॉलर्सची ऑर्डर गोठवत तिथे सौदी सरकारच्या शिष्यवृत्तीवर आणि स्वखर्चाने शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आपल्या सर्वच्या सर्व १५०००+ विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मायदेशी परतण्याचा आदेश दिला होता. इतक्या कमी वेळात आपला गाशा गुंडाळताना त्या विद्यार्थ्यांची खूप धांदल उडाली होती तो भाग वेगळा. पण कॅनडातली 'Laurentian University' दिवाळखोरीत जाण्यामागे असलेल्या चार कारणांपैकी एक कारण सौदीचा हा निर्णय असल्याचे सांगितले जाते. खरंतर कॅनडातली बहुतांश विद्यापीठे परदेशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत चिनी आणि भारतीय विद्यार्थ्यांवर विसंबून असतात, परंतु ह्याला Laurentian University अपवाद होती, ती सौदी विद्यार्थ्यांवर अधिक विसंबून होती. ट्विटर वर केलेल्या टीकेची प्रतिक्रिया म्हणून त्यावेळी सौदी अरेबियाने घेतलेला तो निर्णय योग्य होता कि नव्हता हा भाग अलाहिदा पण त्यामुळे कॅनडाला चांगलाच दणका बसला होता. आणि इथे तर ह्या जस्टीन'सिंग' ट्रूडो उर्फ कॅनडाच्या 'पप्पू'ने थेट त्यांच्या संसदेत भारतावर गंभीर आरोप केले आहेत, आणि त्यावर भारताची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र आणि टोकाचीच असावी असे माझे वैयक्तिक मत. भारता सारख्या लोकशाही असलेल्या देशाला सौदी प्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना माघारी बोलावण्याचे फर्मान सोडणे शक्य नाही, पण कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवाद्यांनी 'हिंदूंनी कॅनडा सोडावा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा' वगैरे सारख्या दिलेल्या धमकीनुसार तिथे भारतीय वंशाचे नागरिक किंवा विद्यार्थ्यांबाबत काही हिंसाचार, अत्याचाराच्या घटना घडल्यास आपोआपच कॅनडात अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याचे सर्व जगात पडसाद उमटू शकतात. आणि असे काही होऊ नये ह्यासाठी आता जस्टीन ट्रूडोला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार तसेच त्यांच्या सुरक्षायंत्रणांवरचा ताण देखील वाढणार हे उघड आहे. कॅनडात आपल्या पाल्यासाठी धोका असल्याची थोडी जरी शंका पालकांना आली तरी त्याचा परिणाम पुढच्या आणि त्यापुढच्या वर्षी तिथे शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर होणार, ज्याचे भांडवल तिथला विरोधी पक्ष २०२५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत नक्कीच करणार. तसेही आज निवडणूक झाल्यास जस्टीन ट्रूडो सत्ता गमावणार वगैरे बातम्या कॅनडातीलच वर्तमानपत्रे देत आहेत. एकंदरीत कॅनडाच्या ह्या पप्पूने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे आणि त्याच्या बापाने भारताला दिलेल्या वागणुकीचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आता मिळाली आहे, तेव्हा तिचा पूर्ण लाभ भारताने घ्यावा अशी अपेक्षा!

In reply to by टर्मीनेटर

मागण्या वाढत जातील. मग ते डोईजड होईल. पण तोपर्यंत भारताला डोकेदुखी आहे. '७८ सालापासून भटकंती सुरू झाली आणि विशेष ओढ तलाव क्षेत्र होते, गड किल्ले नव्हते. पण वैतरणा पाहून झाले होते. पण तानसा पाहयला गेलो तेव्हा खलिस्तान वाद्यांच्या दहशती कारवायांना लक्षात ठेवून सरकारने सर्व मुख्य तलाव पाहण्यास बंदी केली. मग तिथे केंद्रीय सैनीक ठेवले. त्यानंतर इतर जमावाच्या दहशती सुरू झाल्या आणि तलाव कायमचेच बंद झाले.

In reply to by टर्मीनेटर

त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता माझा पण नव्हता झाला :=)) बदला घेण्याची सुवर्णसंधी आता मिळाली आहे, तेव्हा तिचा पूर्ण लाभ भारताने घ्यावा अशी अपेक्षा! सहमत.

आजकाल कुठल्याही देशाचे नाक दाबायचे असेल तर सरळ युद्ध करण्यापेक्षा आर्थिक युद्धावरच भर दिला जातो. रशिया युक्रेन युद्धात रशियाची कोंडी करण्यास हेच तंत्र वापरले गेले. रशिया आधीपासुनच(कोविड नंतर) चीन विरुद्ध सुद्धा वन प्लस पॉलिसी तशीच आकार घेते आहे. तर कमिंग बॅक टू कॅनडा- ६०-७० च्या दशकात ब्रिटीश कोलंबिया राज्यात जंगलतोड करण्यासाठी पंजाबी मजूर जाउ लागले तेव्हापासुन तिथे त्यांची संख्या वाढू लागली आणि आता त्यांची तिसरी की चौथी पिढी तिथे नांदते आहे. शिवाय ईंदिरा गांधी हत्येनंतर आणि खलिस्तान चळवळीनंतर ज्या शीखविरोधी दंगली झाल्या तेव्हा काही देशांनी शिख लोकांना निर्वासित(रेफ्युजी) स्टॅटस देउ केले आणि आपल्या देशात सामावुन घेतले. त्यात एक देश कॅनडा होता. त्याचा पुरेपुर लाभ घेउन अनेक शीख तिकडे स्थायिक झाले. जरा स्थिर स्थावर होताच त्यांनी तिकडे हात पाय पसरायला सुरुवात केली आणि अनेक क्षेत्रात जम बसविला. जरी भारताने हर प्रकारे प्रयत्न करुन खलिस्तान चळवळीला नेस्तनाबुत केले(भिंद्रनवाले /ऑपरेश्न ब्लु स्टार वगैरे) तरी ती या बाहेरच्या (कॅनडा/युके/ऑस्ट्रेलिया) शीख लोकांनी पैसा आणि ईतर मदत पाठवत राहुन एक प्रकारे विझु दिली नाही. त्याच्यानेच मध्ये अध्ये अमृतपाल सिंग सारखी भुते उभी राहत असतात आणि सरकार वेळोवेळी त्याचा बंदोबस्त करत असते. एक प्रकारे "जिस थाली मे खाना उसी मे छेद करना" असा हा प्रकार आहे. राहता राहीली गोष्ट ट्रुडो संसदेत काय म्हणाले त्याची. तर वर म्हटल्याप्रमाणे २२ शीख खासदारांच्या टेकुवर उभा असलेल्या लाचार माणसाकडुन अजुन काय वेगळी अपेक्षा करणार? गंमत म्हणजे मेलेले दोघेही जण( व्हँकुव्हरमध्ये निज्जर आणि विनिपेग मध्ये गिल) काही धुतल्या तांदळासारखे नव्हते. निज्जर तर प्लंबर म्हणुन तिकडे गेला आणि झोल झाल मार्गाने त्याने नागरिकत्व मिळवले. शिवाय ज्या गुरुद्वाराचा तो प्रमुख होता तिथल्या जुन्या प्रमुखांना त्याने भल्या-बुर्‍या मार्गाने बाजुला हटवले होते. थोडक्यात सांगायचे तर-- एक--सगळेच देश ह्या ना त्या मार्गाने अशा कारवाया करतच असतात. इस्त्राईलची मोसाद तर अशा प्रकारात माहीरच आहे. रशियन केजीबी, अमेरिकन सी आय ए सुद्धा हस्ते परहस्ते अशा कारवाया करतात हे उघड सत्य आहे. मग भारताने केले तर काय बिघडले? दुसरी गोष्ट-कॅनडा-भारत व्यापार बंद झाला आणि/किवा भारतीय विद्यार्थी तिथे जाणे बंद झाले तर भारतापेक्षा कॅनडाचे नुकसान जास्त होईल. त्यामुळे ट्रुडो काय बरळायचे ते बरळुदे. राहता राहिली गोष्ट कॅनेडियन बिगर-शीख भारतीयांनी परत जावे ह्या धमकीची--हे म्हणजे एखाद्या भय्याने " माझ्या नंतर मुंबईत आलेल्या सगळ्या भय्यांनी यु पीला परत जावे" असे म्हणण्यासारखे आहे. या बाबतीत सगळ्या नागरीकांची सुरक्षा करणे ही कॅनेडियन सरकारची जबाबदारी असल्याने ते ती पार पाडतीलच. शिवाय तसे काही झाले तर त्याचे पडसाद भारतीय शिखांवरही झाल्याशिवाय राहणार नाहीत, तेव्हा सध्या मत व्यक्त करणे टाळतो.

मुळात भारताने कॅनडा मधील लोकांना व्हिसा देणे बंद केल्यामुळे आणि भारत असलेल्या दिल्ली सोडून इतर तीन वकिलाती बंद केल्यामुळे खलिस्तानी लोकांना जाण्या येण्यासाठी व्हिसा मिळवणे बरेच जिकिरीचे होणार आहे. आणि संशयास्पद व्यक्तींचा व्हिसा भारत नाकारून तेथून येथे येऊन भारत विरोधी कारवायांना पायबंद घातला जाईल. यामुळे इथल्या खालिस्तानावाद्यांना मिळणारा पाठिंबा कमी होईल. याशिवाय अनेक संशयास्पद खलिस्तानी लोकांचे PIO कार्ड भारत रद्द करून त्यांच्या येथे येण्यावरच पायबंद घातला जाईल शिवाय अशा लोकांच्या इकडच्या मालमत्ता जप्त करुन त्यांची ( गुरपतवंत सिंह) आणि त्यांच्या इथल्या पित्त्यांची बरीच कोंडी केली जात आहे. https://www.livemint.com/news/india/india-canada-row-nia-to-seize-prope… 'हिंदूंनी कॅनडा सोडावा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा' अशी धमकी गुरपतवंत सिंह याने दिली असल्याने कॅनडाची पार गोची झालेली आहे. त्यातून भारतीय विद्यार्थी तेथे सुरक्षित नाहीत अशी हाकाटी केल्यास आपल्याकडून तेथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाल्यास तेथील विद्यापीठांची स्थिती डबघाईला येऊ शकते. भारताने ज्या तर्हेने युरोपीय देशांना आणि अमेरिकेला आरसा दाखवला आहे त्यामुळे कॅनडा सारख्या देशाला भीक घालायची मुळीच गरज नाही. भारतीय विद्यार्थी किंवा प्रवासी कॅनडाला गेले नाहीत तर भारताचे काहीच बिघडत नाही पण कॅनडाची मात्र बूच मारली जाईल.

भारताने कॅनडा विरुद्ध FATF मध्ये तक्रार करण्याचे ठरवले आहे त्याने त्यांची अजूनच कोंडी होईल https://sundayguardianlive.com/top-five/india-may-take-canada-to-fatf-f…

In reply to by सुबोध खरे

भारताने कॅनडा विरुद्ध FATF मध्ये तक्रार करण्याचे ठरवले आहे योग्य निर्णय

भारतीय विद्यार्थी कॅनडाला १ लाख ६० हजार कोटी रुपये फी म्हणून देतात( २००० कोटी डॉलर्स). हि रक्कम कॅनडा सरकार तेथे शिक्षणावर खर्च करत असलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. https://economictimes.indiatimes.com/nri/study/how-india-is-pouring-bil… यातील बहुसंख्य विद्यार्थी तेथे गेले नाहीत स्त्री भारताला काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना तिकडे जाण्यास अडचणी आलाय तर हेच विद्यार्थी इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारख्या इतर ठिकाणी शिक्षणास गेल्यास कॅनडाची हवा टाईट होईल यात शंका नाही. त्यामुळं कॅनडाच्या वकिलातील अतिरिक्त ४१ लोकांना देशाबाहेर काढल्यामुळे इतक्या विद्यार्थ्यांना व्हिसा देणे त्यांना कठीण जाणार आहे यामुळे कॅनडा हवालदिल झाला आहे

वरील सर्व प्रतिसाद वाचले. एक भारतीय म्हणून भारतीय सरकारने घेतलेल्या बरोबर / चुक निर्णयांना पाठींबा देणे हे आपले कर्तव्य आहेच. मात्र सगळ्या प्रतिसादांमधून कॅनडाचीच ठासली जाणार आहे असे प्रतिबिंबित होते. तसे होईलही कदाचित पण ज्या भारतीयांचे लागेबांधे कॅनडाबरोबर आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. (मी शीख समुदायाबद्द्ल बोलत नसून इतरांबद्द्ल विचारतो आहे. ) ज्यांची मुले कॅनडात शिकायला आहेत किंवा जे भारतीय कॅनडा मधे नोकरी करताहेत किंवा कॅनेडीयन कंपन्यांबरोबर व्यवसाय करत आहेत ते. त्यांचे देशप्रेम वरचढ ठरेल की व्यवहार ? समजा जस्टिन (केस) ट्रुडो यांचा पक्ष पुढील निवडणूकीत निवडून नाही आला आणि सध्याचा विरोधी पक्ष निवडून आला तर ते विद्यमान सरकारची पॉलीसी १८० अंशातून फिरवतील काय ? समजा कॅनडातील शिक्षण सोडून द्यायचे ठरले तर दुसरे काय पर्याय आहेत (त्या दर्जाचे शिक्षण आणि साधारण तेवढाच खर्च, जवळपास तसेच राहणीमान असेल असे पर्याय) यात भारताचे (भारतीयांचे ) कितपत नुकसान होईल ? याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी सरकारच्या निर्णयाला पाठींबा आहेच फक्त तो कणखरपणा शेवटपर्यंत टिकावा ही इच्छा ! अवांतर : युक्रेन मधून शिक्षण अर्धवट सोडून जावे लागलेल्या विद्यार्थ्यांचे पुढे काय झाले याबददल काही बातम्या येत नाहीत आताशा.

In reply to by धर्मराजमुटके

मात्र सगळ्या प्रतिसादांमधून कॅनडाचीच ठासली जाणार आहे असे प्रतिबिंबित होते. तसे होईलही कदाचित पण ज्या भारतीयांचे लागेबांधे कॅनडाबरोबर आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. त्यांचा ते बघतील. आम्ही आमच्या भारत सरकार बरोबर आहोत.

In reply to by रंगीला रतन

त्यांचं ते बघतील म्हणजे?? ते विद्यार्थूी भारतीयच होते ना?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण ज्या भारतीयांचे लागेबांधे कॅनडाबरोबर आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. ते विद्यार्थी का भारतीय कोण पण असोत त्यांचा ते बघतील. मी या वादात भारत सरकार बरोबर आहे.

In reply to by रंगीला रतन

मी या वादात भारत सरकार बरोबर
तुम्ही (आणी मी सुध्दा) ह्या वादात कुणाच्याही बाजूने राहीलो तरी भारत सरकार, कॅनडा सरकार, खलिस्तानी, आयेसाय, हमास , इस्रायल, श्रीलंका ह्यांना काहीही फरक पडनार नाहीये. :)

कॅनडाकुमारने जेव्हा भारताचं नागरीकत्व मिळवलं नेमकं तेव्हाच मी कॅनडा जायचा विचार करत होतो पण वाचलो.

बहुतेक भांडण हे राजनैतिक स्तरावर आहे. माझ्या माहितीप्रमाणे कॅनेडियन समाज आणि भारतीय समाज ह्यांचे संबंध आहेत तसेच चांगले आहेत. शेवटी संबंध हे कागदावरील शाईने निर्माण होत नसून लोकांमुळे निर्माण होतात. काही वेळ गेल्यानंतर विस्कटलेली हि घडी पुन्हा बसेल. जास्त चिंता करू नये.

Quora वरील कॅनेडियन लेखका नुसार आणि त्यांच्या कमेंट्स नुसार तरी कॅनेडियनलोकांना Trudeau नको आहे. निज्जर नी खोटी कागदपत्रे दाखवून कॅनडात प्रवेश केला आणि बोगस लग्न करून नागरिकत्व मिळवले ह्यामुळे कॅनेडियन लोकांना तरी निज्जर chya खुणा मूळे जराही भारताविषयी द्वेष आहे आस वाटत नाही. पण तेथील स्थानिक शीख लोकांच्या भावना माहिती नाहीत. त्यांना कदाचित एखादा शीख देश झाला तर होऊ दे अशी मुक समती कदाचित असेल. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथे भरता विरुद्ध बरीच निदर्शने झाली. मंदिरांवर पोस्टर ही चिकटवलेली होती. एकदा का बाहेरच नागरिकत्व मिळालं आणि थोडे पैसे जमा झाले की आपल्या धर्माचा एखादा देश जर तयार होत असेल तर होऊ दे अशी भावना कदाचित असेल. गूगल नुसार कानडा मध्ये शीख लोकांपेक्षा हिंदू समाज जास्त आहे. पण कदाचित तो विखुरलेला असेल आणि एकमेकांशी जास्त कनेक्टेड ही नसावा.

आणि कॅनडाला पण फरक पडणार नाही... कॅनडा मध्ये दुसरे सरकार आले की परत संबंध सुरू राहतील..

In reply to by मुक्त विहारि

किंवा भारतात दुसरे सरकार आले तर खलिस्तानवाद्यांना संरक्षण मिळेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हसु नका. खलिस्तान वाद्यांचा आवडता भिंद्रनवालेचे भुत कॉग्रेसनेच उभे केले होते. शेकड्याने यावर माहिती उप्लब्ध आहे. https://www.indiatoday.in/india/north/story/jarnail-singh-bhindranwale-…

In reply to by अहिरावण

प्रातशाखेत जात असाल तर जाणं बंदं करा. अश्या कुजबूजी तिथूनच सुरू होतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खो खो. पण तुम्ही स्वतः शोध घेऊन खात्री करणार नाही. फक्त हे संघाचे कारस्थान म्हणत वाळूत डोके खूपसून निपचित पडून रहाणार. पडुन रहा निवांत :) सुचना - मी संघाचा समर्थक अथवा संघी नाही त्यामुळे लगेच अशांनी मला "आपला" मानु नये. सुचना संपली.

जसविंदर सिंह तुंडा आणि भ्रष्ट राजनेत्यांनी सत्तेसाठी आणि अवैध कमाईसाठी कनाडाला आतंकवाद्यांचे घर बनवून टाकले आहे. भविष्यात त्याचे गंभीर परिणाम कनाडाचे सामान्य नागरिक भोगतील.