Skip to main content

बात निकलेगी तो...

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 09/11/2022 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास, कविता लिहिणार... पण जरा जपून हो! प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो! नको लिहूस चंद्र बिंद्र किंवा कंकणभरला हात इथं सगळेच ओळखतात "त" वरून ताकभात.. विस्कटलेल्या केसांवरून उगाच करतील भलते तर्क. एका नजरेत ओळखतील सरलेली वयवर्षं.. सहज म्हणून विचारतील इतका तू उदास का रे? उतरलेला चेहरा मग न बोलता सांगेल सारे.. तुझ्या हरेक शब्दाचा अगदी कीssस पाडतील बोलता बोलता हळूच माझं नाव काढतील. तेव्हा मात्र सांभाळ हं, चेहरा ठेव कोरडा एक जरी हलली रेष, अनर्थ होईल केवढा.. आणखी एक गोष्ट तू कटाक्षाने पाळ, कितीही मनात आलं तरी माझा उल्लेख टाळ.. एकदा नाव कळलं की लोकं तिथंच थांबतील काय? आपल्या छोट्ट्या गोष्टीला मग लांबच लांब फुटतील पाय.. म्हणून म्हटलं, कविता लिहितोयस पण जरा जपून हो! प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!

वाचने 3573
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मस्त आहे.

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या "काही बोलावयाचे आहे" कवीतेची आठवण आली. मिपावर कवीतेच्या दालनाकडे हल्ली गर्दी मुळीच नसते. काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही अंतरात माझ्या, भावनांना फुटती धुमारे कोणास वेळ आहे, प्रदर्शन तयांचे मी मांडणार नाही कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही मनी आठवणींचे, सप्तरंग जरी विखुरले तरीही शब्दचित्र त्यांचे,मी रेखाटणार नाही प्रतीसाद भावनांना इथे मिळत नाही उपेक्षितांचा धनी मी होणार नाही....

साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. चांगले वाईट कसेही असो प्रतीसाद मिळायला हवा एवढीच इच्छा व त्यातुन पडलेल्या या ओळी.

In reply to by कर्नलतपस्वी

इतका सुंदर काव्यत्मक प्रतिसाद आल्यानंतर "प्रतिसाद भावनांना...." हे कसं मान्य करायचं?;)

छान. आवडलीच.

व्वा, खुप सुंदर कविता. प्रेमात गुपितं काटेकोर पणें सांभाळुन घ्यावी लागतात. ब्रभा झाला तर ....... ही भावना उत्तमरित्या व्यक्त झालीय कवितेतून

मस्त आवडली कविता.
म्हणून म्हटलं, कविता लिहितोयस पण जरा जपून हो! प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!
खरंय...! कोणी तरी म्हटलंय. मै चुप रहा तो, और गलतफहमिया बढी वो भी सुना है उसने, जो मैने कहा नही. -दिलीप बिरुटे (गप्प )

सुंदर जमून आलिये.

जब प्यार किया तो डरना क्या, लोग क्या कहेंगे सोचना क्या? घाबरुन घाबरुन केलेले प्रेम म्हणजे प्रेम नव्हे, लोक लज्जे खातर मन मारणे काही बरे नव्हे खरे प्रेम निर्भय बनवते, प्रवाहाविरुध्द पोहायला शिकवते लपुन छपून दुनियेला घाबरुन अंधेरेमे होती है चोरी चोरीकी सिर्फ एकही सजा, सदा बनी रहेगी दूरी ऐसे प्रेमीसे दूर ही रहेना गालिब, जो इजहार ना कर सके प्यार किया है प्यार करेंगे ये खुलकर बता न सके पैजारबुवा,

शिल्पा नाईक, बिरुटे सर, स्वधर्म, चौ.को., मिका, पैजारबुवा... धन्यवाद. बात निकलेगी... या प्रसिद्ध नज्म चा हा भावानुवाद करायचा प्रयत्न आहे.