✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाबा महाराज डोंबोलीकर आणि आर्थिक षडरिपू....

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 03/01/2021 - 13:14  ·  लेख
लेख
खालील लेख हा तद्दन फालतू असून, खूप विचार करत बसू नका. ज्यांच्या कडे, वेळ नसेल, त्यांनी लेख वाचायची तसदी घेतली नाही तरी चालेल, कारण, खालील लेखांत कुठलेही मौलिक ज्ञान नाही आणि काही मौलिक ज्ञान मिळाल्यास, तो योगायोग समजावा....सर्वज्ञ मंडळींनी, आपला मौलिक वेळ वाया घालवू नये, ही विनंती.... ------------------------------- हळद लागवड झाली आणि मी रिकामटेकडा झालो... आमच्या हळदीचे एक बरे आहे, लागवड करा आणि विसरून जा.हळद येतेच. ह्या वर्षी हळद लागवड करता करता, मुलाच्या अंगाला पण हळद लावायचा विचार होताच.गावी रहात असल्याने, लवकर लग्न, म्हणजेच, सांसारिक जबाबदारीतून, लवकर मुक्ती, ही विचारसरणी नक्की झाली आहे. अर्थात, मी जरी काही निर्णय घेत असलो तरी, सल्लागार म्हणून, बाबा महाराज डोंबोलीकर, यांनाच नेमले आहे...नेहमी प्रमाणे, एका प्रवचनांत काम न करता, त्यांनी ह्या वेळी 6 प्रवचने घेतली, त्याचाच गोषवारा देत आहे.... मिपाकर हे उत्तम वाचक असल्याने, जास्त फाफटपसारा लावण्याची गरज नाही. ---------------------- मी: बाबा कसे आहात? मुलासाठी वधुसंशोधन करत आहे.आशीर्वाद हवा आहे. बाबा:तो तर आहेच पण, नुसते आशीर्वाद देऊन कामे होत नाहीत. जसे, जपजाप्य करत हिंदू धर्म टिकला नाही, तलवार होती म्हणूनच हिंदू धर्म टिकला, तसेच निव्वळ आशीर्वाद देऊन कामे होत नाहीत, काही व्यावहारिक गोष्टी पण पाळाव्या लागतात. आता मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात, आर्थिक संकटे किंवा शत्रू, येतच असतात. आजारपण, पैपाहुणे, कौटुंबिक वाढदिवस,केळवणे, हे येतात आणि जातात पण,साखरपुडा, लग्न, मंगळागौर, डोहाळजेवण, बारसे आणि मुंज, हे खरे आर्थिक षडरिपू...ह्या 6 जणांना जितके दूर ठेवाल तितके आर्थिक बळ वाढत जाते.... आता पहिली गोष्ट म्हणजे, साखरपुडा..... खरं तर ही खूप कमी खर्चिक प्रथा आहे.फक्त घरच्या नातेवाईक मंडळींशी, जिवलग मित्र-मैत्रिणींची, एकमेकांशी ओळख करून देणे, ह्या पलीकडे, ह्या प्रथेला महत्व नाही आणि ह्या गोष्टीला कुठलाही शास्त्राधार नाही.मौर्य काळात ही प्रथा न्हवती.सरळ लग्नच लाऊन देत होते....त्यामुळे, साखरपुडा करण्याची काही आवश्यकता नाही आणि केलेच तर, अतिशय कमी खर्चात करा. दुसरी गोष्ट म्हणजे, लग्न.....कितीही उत्तम मुहूर्त असला, कितीही उत्तम शिक्षण असले, तरीही विधीलिखित टळत नाही.तडजोड हा सांसारिक जीवनाचा पाया आहे, हे समजले नाही की, काडीमोड किंवा घुसमट, ही ठरलेलीच. कोर्टात केलेले लग्न पण टिकते आणि मुहूर्त पाहून, मनसोक्त खर्च करून केलेले लग्न पण टिकत नाही. बाबा आमटे, पुल देशपांडे, डाॅक्टर कोल्हे ह्यांनी कोर्टात लग्न केले आणि ते उत्तम टिकले, ह्या उलट, राजेश खन्ना, हृतिक रोशन, यांच्या लग्नाचा फियास्कोच झाला.कोर्ट मॅरेज, हा आर्थिक दृष्टीने एकदम योग्य पर्याय आहे आणि वैदिक पद्धतीने, कमीत माणसांच्या साक्षीने केलेले लग्न हा मध्यम पर्याय आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मंगळागौर...... सध्याच्या काळांत, ही अतिशय अयोग्य प्रथा आहे. पुर्वीच्या काळी ही योग्य प्रथा होती कारण ह्या निमित्ताने, नविन सुनेचे गूण समजत होते, गायन, नर्तन, हजरजबाबीपणा इतर स्त्रीयांना समजत होते आणि ह्या निमित्ताने, दोन्ही घराण्यातील स्त्रीयांना एकमेकांचा स्वभाव पण समजत होता. आता एकतर, बहुतांशी स्त्रीया नौकरी करतात.प्रत्येकीला बुधवारी सुट्टी कशी काय मिळणार? मंगळागौरीचा मुळ हेतूच जर साध्य होणार नसेल तर, शनिवारी गौरी मांडा आणि मस्त पैकी दडपण न बाळगता, खेळा... गौरीची पुजा असल्याने, घरीच खेळलेले उत्तम... त्यासाठी मुद्दाम मंगल कार्यालय घ्यायची काही गरज नाही... चौथी गोष्ट म्हणजे, डोहाळजेवण...... मुळांत ही गोष्ट, गर्भवती स्त्रीला आनंद वाटावा, तिचे शारिरीक आरोग्य उत्तम रहावे हा मुळ हेतू आहे... डोहाळजेवणातील खाद्य पदार्थ पौष्टिक असावेत, हे भान ठेवलेच पाहिजे. ही देखील एक घरगुती प्रथा असल्याने, मुद्दाम कार्यालय घ्यायची काही गरज नाही.... पाचवी गोष्ट म्हणजे, बारसे..... चार-चौघी बायकांच्या साक्षीने, अपत्याचे नामकरण करणे, ह्या पलीकडे ह्या प्रथेला स्थान नाही. पण सध्या बारसे म्हणजे, बाळाला आणि बाळंतीणीला, जास्तीत जास्त त्रास कसा होईल? हेच बघीतल्या जाते. सकाळ पासून ते रात्री पर्यंत, मोठ्या आवाजात लावलेले स्पीकर्स, भरपूर पाहुणेराहुणे, जो येतोय तो अपत्याच्या गालाचा मुका घेत असल्याने, बाळाला होत असलेला जंतू संसर्ग आणि बाळाची आणि बाळंतीणीची होणारी झोपमोड, कुणीही लक्षांत घेत नाही. हा विधी पण घरगुती असल्याने, मुद्दाम कार्यालय घ्यायची काही गरज नाही आणि बाळंतीणीची आणि बाळाची काळजी घेऊनच, हा विधी पुर्ण कर .... सहावी गोष्ट म्हणजे, मुंज...... मुलगा जर संध्या करणार नसेल किंवा पौराहित्य करणार नसेल तर, हा विधी करण्याची काहीही गरज नाही... खरं तर हा विधी आधी अत्यावश्यक होता.. मुलाला एखादी कला आणि स्वतः पुरता स्वैपाक येत असेल तरच मुंज केली जात होती आणि त्याला शिक्षण घेण्यासाठी गुरूगृही पाठवत होते.वाटेत भूक लागली तर असावेत म्हणून काही खाद्यपदार्थ आणि अडीनडीला उपयोगी पडावेत म्हणून काही पैसे देत होते...अगदीच अडचण आली तर, एखादा दागिना हवा म्हणून भिकबाळी, गळेसर किंवा अंगठी देत होते...पण आता, ह्या प्रथेची तुला तरी काहीही गरज नाही आणि हा विधी केला नाही तरी तुला आणि तुझ्या मुलांना चालण्यासारखे आहे... सध्याच्या काळांत, मुलगा 3-4 वर्षांचा झाला की त्याला योग्य ते शारिरीक शिक्षण देणे आणि व्यायाम करायला लावणे हीच खरी मुंज.कुठल्याही काळात, शरीरं आद्यं, खलू धर्म साधनं. तस्माद, वरील सहा गोष्टींवर, जितका कमी खर्च करता येईल, तितका कमी खर्च कर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
20512 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

साखरपुडा, लग्न, मंगळागौर,

चौथा कोनाडा
Mon, 03/01/2021 - 14:36 नवीन
साखरपुडा, लग्न, मंगळागौर, डोहाळजेवण, बारसे आणि मुंज, हे खरे आर्थिक षडरिपू...ह्या 6 जणांना जितके दूर ठेवाल तितके आर्थिक बळ वाढत जाते.... +१ सहमत ! बरेच मुद्दे पटलेले आहेत. अगदी वेळ काढून आवर्जून वाचावा असा लेख !
  • Log in or register to post comments

बाबामहाराज .....

चौकटराजा
Mon, 03/01/2021 - 18:25 नवीन
बाबामहाराज खरे आहे तुमचे म्हणणे ! या सर्व गोष्टी टाळल्या नाहीत मी पण त्यावर फारसा खर्च कधी केला नाही ! ( काही लोक पी एफ मधून पैसे काढतात व मुलांचे वाढदिवस साजरे करतात पुढे तीच मुले म्हातारपणी लाथा घालतात ) पण..... यातून एक तोटा झाला .. चिकट माणसाला मित्र नसतात तसे झाले . आज अगदी पटकन धावून येईल .. सुख व दु:खात सामील होईल असा एकही मित्र मी कमावू शकलो नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

चिकट माणसाला मित्र नसतात, तसे झाले....

मुक्त विहारि
Mon, 03/01/2021 - 18:49 नवीन
समान शीले आणि समान व्यसने, मैत्री होते... पुढाकार घ्या आणि एक छानसा, चहा कट्टा ठरवा.... अस्सल मिपाकर, चहापान करण्यासाठी देखील, कट्टा करायला तयार होतो... रामदास, भाते, सुबोध खरे, नुलकर,कंजूस, टका,मदनबाण, अभिजित अवलिया, सुखी, हेमांगी, पैसा ताई, स्नेहांकिता, अजया ताई,विनोद18, यांच्या बरोबर काही कट्टे असेच झाले आहेत....काही नावे राहिली पण असतील ... मी पण खूप काही श्रीमंत नाही, पण, माझ्या मनांत अजिबात न्यूनगंड नाही.. मिपाकर, खिसा बघून मैत्री करत नाही.... तुम्ही फक्त कट्टा ठरवा, मिपाकर नक्की येतील... ------- राहता राहिली गोष्ट सुख आणि दुःखाच्या प्रसंगांची.... तुम्ही आवाज द्या, कुणी ना कुणी मिपाकर, नक्कीच सहभागी होईल.. तो कदाचित आर्थिक मदत करणार नाही पण, तुमच्या चिंचवड मध्येच 3 मिपाकर आहेत, ज्यांनी मला पण मदत केली आहे ... 1. नादखूळा .... मुलगा आजारी असतांना, त्यांनी सर्वतोपरी मदत केली. 2. वल्ली.... आमच्या आग्रहा खातर, मुद्दाम लेणी समजावून द्यायला आला होता. 3. Gogglya .... तुम्ही हाक मारा, वेळ असेल तर, हमखास येणार... स्वानुभव आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

लईच भोळे आसा ..

चौकटराजा
Mon, 03/01/2021 - 19:51 नवीन
मिपामधली मैत्री वेगळी व्यक्तिगत आयुष्यातील वेगळी ! तसे अमेरिकेतून काय आणू असे विचारणारे चित्रगुप्त ही आहेत ! तो भाग वेगळा आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

असं नाही ....

मुक्त विहारि
Mon, 03/01/2021 - 21:17 नवीन
एकाने फसवणूक केली म्हणून सगळेच तसे नसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

+१११

Bhakti
Mon, 03/01/2021 - 20:51 नवीन
चांगले अवलंबन करण्यासारखे विचार आहेत.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख!

तुषार काळभोर
Mon, 03/01/2021 - 21:01 नवीन
अलीकडच्या काळात उलट या गोष्टींवर होणारा खर्च गगनचुंबी व्हायला लागलाय. त्याच्या साखरपुड्याला पाच लाख खर्च आला? माझ्या मुलीचा साखरपुडा आठ दहा लाखात व्हायला पाहिजे! मैत्रिणीच्या लग्नातला लॉन वरचा अन स्टेज वरचा सेट दहा लाखाचा होता, माझ्या लग्नात पंधरा लाखाचा पाहिजे! तिचं डोहाळजेवण सोसायटीच्या हॉल मध्ये दोनशे पाहुण्यात झालं. माझ्या सुनेचं कार्यालयात पाचशे पाहुण्यात व्हायला पाहिजे. सुदैवाने पुण्याच्या ग्रामीण भागात अजून तरी मंगळागौर नाहीये. आणि आमच्याकडे ब्राह्मणांच्या मुंजी पण अगदी घरात होतात. या दोन गोष्टी तूर्तास तरी लाखाच्या घरात गेलेल्या नाहीत. माझ्या साखरपुड्याचा अन चार महिन्याने झालेल्या लग्नाचा खर्च मी पुढील पाच वर्षे फेडत होतो! दोन्ही कडून खर्च केला नसता अन नोंदणी विवाह केला असता तर आमच्याच शेतात हजार बाराशे स्क्वेअर फुटांचा बंगला बांधता आला असता! पण रेट्रोस्पेक्टिव पश्र्चाताप काय कामाचा!! बाकी डोंबोलिकर म्हाराजांचा अनुग्रह व्हायचा मुहूर्त लवकर यावा, ही इच्छा!
  • Log in or register to post comments

कधीही या

मुक्त विहारि
Mon, 03/01/2021 - 21:15 नवीन
घर आपलेच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

आश्रम सध्या कुठे ..

चौकटराजा
Tue, 03/02/2021 - 09:32 नवीन
बाबा हळदीवाले बाबा यांचा आश्रम सध्या कुठे आहे ... ? म्हणजे डोंबोलीचे " कपाट " उघडले काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सध्या एक नविन फॅड निघाले आहे ...

मुक्त विहारि
Mon, 03/01/2021 - 21:56 नवीन
अपत्याचा पहिला वाढदिवस ... प्री वेडिंग शूट....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

प्री वेडिंग शूट....

तुषार काळभोर
Tue, 03/02/2021 - 06:26 नवीन
अरे हो.,. हे प्रकरण विसरलोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

न्ही कडून खर्च केला नसता अन

चौथा कोनाडा
Tue, 03/02/2021 - 12:41 नवीन
न्ही कडून खर्च केला नसता अन नोंदणी विवाह केला असता तर आमच्याच शेतात हजार बाराशे स्क्वेअर फुटांचा बंगला बांधता आला असता!
स्पर्धा आणि समाजातील प्रतिष्ठेसाठी दिखाऊपणाचा मोह टाळता येत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मुवि साहेब, माफ करा पण लेख

बोलघेवडा
Tue, 03/02/2021 - 00:03 नवीन
मुवि साहेब, माफ करा पण लेख पटला नाही. माणसाच्या आयुष्यात तसं बघितलं तर कशालाच अर्थ नाही. पण विविध सण, समारंभ, रिती, रीवाज घालून त्यातून आनंद निर्माण व्हावा, चार लोक एकत्र यावीत, त्यानिमित्ताने समाजातील इतर घटकांना आर्थिक, सामाजिक हातभार लागावा यासाठी ही योजना आहे. नाहीतर एकलकोंडा, नितिशून्य, मंद आयुष्य तर आहेच. त्यासाठी ह्या रिती रवाजना नावे ठेऊ नयेत. फार तर असे म्हणावे की यासाठी ओढून ताणून पोटाला चिमटा काढून कर्जे काढून साजरे करू नये. असो. फार मनाला लावून घेऊ नये. जे वाटले ते लिहिले. क्षमस्व!!
  • Log in or register to post comments

व्यक्ति तितक्या प्रकृती असतात....

मुक्त विहारि
Tue, 03/02/2021 - 10:30 नवीन
कुणी आजचा दिवस साजरा करतो, तर कुणी पुढील 50-60 वर्षांचा विचार करतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा

सण साजरा करणे आणि अफाट खर्च करणे ह्यात फरक आहे

असा मी असामी
Tue, 03/02/2021 - 17:16 नवीन
सण साजरा करणे आणि अफाट खर्च करणे ह्यात फरक आहे. साधे मंगळागौर, डोहाळजेवण हे घरात आणि जवळच्या नातेवाइक सोबत सजरा करण्या सारखे सण त्यात किति अफाट खर्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा

बोलघेवडा, यांच्याशी एकदम सहमत

nutanm
Tue, 03/02/2021 - 03:55 नवीन
बोलघेवडा, यांच्याशी एकदम सहमत.
  • Log in or register to post comments

मोठी कार्ये सहज परवडतील एवढी

nutanm
Tue, 03/02/2021 - 04:03 नवीन
मोठी कार्ये सहज परवडतील एवढी बहुतेक जण ( मध्यमवर्गीय) 1/2च करतात. बाकी saving करुनच छोटी छोटी get-toethers करावीत.
  • Log in or register to post comments

थोडक्यात ...

चौकटराजा
Tue, 03/02/2021 - 09:29 नवीन
मिपाचा कट्टा ३५० रु च्या जेवणाचा नसावा .... तर नुसता वडापाव व चहा यावर असला तर मधुमेही देखील कट्ट्याला येतील व थांबतील ! ))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nutanm

कर्ज काढून, सणवार कधीच साजरे करू नयेत....

मुक्त विहारि
Tue, 03/02/2021 - 10:34 नवीन
अनावश्यक खर्च केलेला पैसा परत येत नाही.. "द पेशंट" ..... ह्या नावाचे एक सुंदर पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मिपाचे कट्टे नुस्त्या "चा

टवाळ कार्टा
Tue, 03/02/2021 - 13:58 नवीन
मिपाचे कट्टे नुस्त्या "चा"साठी सुद्धा होतात ओ...आहात कुठे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चांगले विचार!

राघव
Tue, 03/02/2021 - 13:13 नवीन
लेख आवडला. लोकं काय म्हणतील, प्रतिष्ठा टिकवणे या आणि अशा वृथा गोष्टींमुळे वारेमाप खर्च करण्याची वृत्ती अलिकडे फार वाढलीये हे खरं. गावांत तर हा प्रकार फारच दिसलाय.. गावजेवण म्हणजे अक्षरशः गावजेवण बघीतलंय! लोकं कंजूष म्हणतील हा एक भाग असतोच, पण आपण अनेकांच्या गावजेवणात जेऊन आलोय, आता आपली पाळी आली तर मागे कसे फिरणार असाही एक प्रकार असतो. याच अनुषंगानं पण थोडं अवांतरः मला वपूंची एक गोष्ट आठवते.. नाव आठवत नाहीये आत्ता.. पण ती गोष्ट फार भिडलीये मनाला! थोडक्यात कथा अशी - // एक काका, मुलगा आणि सुनेसमवेत राहत असतात. काका नाटकातला पडदा रंगवणारे कुशल कलाकार होतेत. आता जवळपास धंदा आता बंद होत आला आहे. पण तरीही जे काम मिळतं ते अगदी मनापासून करतात, बरेचदा पैसा पुरेसा मिळत नाही तरीही. मुलगा चांगला कमवता आहे पण जुगाराचं व्यसन आहे. सून सालस आहे पण नवर्‍याच्या व्यसनापायी वैतागलेली आहे. काका एकदा असेच कामासाठी सकाळपासून बाहेर जातात, वेळेत न येता अगदी रात्री परत येतात. तोवर मुलगा/सुनेचे धाबे दणाणलेले असते. येतात तेव्हा मुलगा चिडून त्यांना खूप बोलतो- "पैसेसुद्धा वेळेवर मिळत नसतांना इतक्या घाईनं सगळं काम पूर्ण करण्याची गरजच काय?".. इत्यादी. काका थोड्यावेळानं जेवणाच्या टेबलवर मुलासोबत शांतपणे बरंच बोलतात, कळवलं नाही हे चुकलं असं मान्यही करतात. हळूहळू संवाद पैशावर जातो. तेव्हा ते म्हणतात - "मी माझं काम आनंद आणि समाधानासाठी करतो. पैसा कमी मिळाला तरी मला त्याचा त्रास त्यामुळे होत नाही. तू जुगार खेळतोस. पैसे गमावतोस. मग घरी आलास की सगळा वैताग घरात काढतोस. तुला एवढा त्रास का होतो, समजतंय? कारण तू जुगार पैसा कमावण्यासाठी खेळतोस. पैसा कमावण्यासाठी जुगार खेळणं हा विचारंच मुळात चुकीचा आहे. जुगार हा पैसा उडवण्यासाठी, त्यातली नशा अनुभवण्यासाठी खेळायला हवा."// ही कथा मला फार फार आवडते. कशासाठी काय करायचं हे समजलं आणि त्याप्रमाणे क्रियेमागचा हेतू ध्यानात घेऊन काम केलं, तर आपलं आणि आपल्या आजुबाजूच्या अनेकांचं आयुष्य खूप सुखकर होईल. किती मोठी गोष्ट वपू अगदी सहज सांगून जातात, नाही?
  • Log in or register to post comments

पुर्वी आणि काही ठिकाणी आजही, कोकणांत गावजेवणे होतात

मुक्त विहारि
Tue, 03/02/2021 - 16:36 नवीन
2000 साली, अशाच एका लग्नाला गेलो होतो...1000-1200 मंडळी सहज जेवली असतील. बेत पण साधाच होता. भात, काळ्या वाटाण्यांची उसळ, लोणचे आणि एक-एक बुंदीचा लाडू..लाडू सोडून, बाकी पदार्थ हवा तितके खा.. नंतर ही प्रथा समजली की, गावात कुणाचे लग्न जमले की, घराघरातून नारळ, लग्नाच्या ठिकाणी जमा होतात. गावातीलच मंडळी स्वैपाक करतात, वाढतात. मुलीकडच्या मंडळींची ऐपत नसेल तर, मुलगी-नारळ आणि 11 रूपये, इतकेच, वरपक्ष स्वीकारतो ... हल्ली मात्र, वरील सर्वच कार्यक्रमांना, बडेजाव दाखवतात. चालायचेच, आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात "शिक्षणासाठी आणि वैद्यकिय कारणासाठीच ऋण काढावे, एकाने ज्ञान मिळते, तर एकाने जीव वाचतो....बाकी इतर वेळी काढलेले ॠण, नरकयातना देण्याची शक्यता जास्त."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

होय बाबा महाराज!!

Bhakti
Tue, 03/02/2021 - 17:08 नवीन
होय बाबा महाराज!! या प्रथांच प्रस्त जास्त झालंय....गेला बाजार घरातील माणसांत जवळीक असेल तर चार आपल्या माणसांत किती भारी सणवार, कार्यक्रम होऊ शकतात हे करोनाच्या धक्क्याने शिकवले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वेळ, ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे .... मुहूर्त नाही ...

मुक्त विहारि
Tue, 03/02/2021 - 17:35 नवीन
आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात, अंगी नाही बळ, त्याने जपमाळ ओढू नये. थोडक्यात, एखादी गोष्ट जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, तर आणि तरच, ती गोष्ट खर्च करावी... अत्तर तयार करत असाल तरच, अत्तराचे दिवे लावावेत, घरात दुधदुभते भरपूर असेल तरच, तुपाचे दिवे लावावेत, उगाच अत्तराचे दिवे लावू नयेत घरात तेलाचा घाणा असेल तरच, तेलाचा दिवा लावावा, उगाच तुपाचे आणि अत्तराचे दिवे लावू नयेत आणि नौकरदार माणसाने, हातपाय पसरू नयेत, नौकरी आणि वयात आलेली मुलगी, ह्यांचा काही भरवसा नाही.... वयांत आलेली मुलगी, प्रियकरा बरोबर पळून जाऊ शकते किंवा तिच्यासाठी सुयोग्य स्थळ पण कधीही येऊ शकते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

+१ वपुंची ही कथा सुंदरच आहे,

चौथा कोनाडा
Wed, 03/03/2021 - 13:19 नवीन
+१ वपुंची ही कथा सुंदरच आहे, मला ही आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

जय जय रगुवीर समर्थ !

मदनबाण
Tue, 03/02/2021 - 16:51 नवीन
बाबा प्रॅक्टिकल आहेत... सणवार जरुर करावेत पण उगाच अधिकाचा आर्थिक खर्च करु नये हा आशय अधिक योग्य वाटतो. ज्याच्याकडे अधिक लक्ष्मी तो हल्ली अधिक थाटमाट करतो, उध्योग पतींच्या लग्नाच्या बातम्या होतात आणि तशा लग्नात अमिताभ आणि आमिर वाढपी म्हणुन पण दिसतात. :))) तलावारीने धर्म टिकला हे जसे सत्य आहे त्याच प्रमाणे जपजाप्य करत हा सनातन धर्म आजही पताका फडकवत आहे हे देखील तितकेच सत्य आहे. याचा देखील अभिमानच असावा. धर्म टिकवण्यासाठी तो असावा देखील लागतो. श्री समर्थ रामदास स्वामींनी अनेक सांकेतिक पत्रव्यवहार छत्रपती शिवाजी महाराजां बरोबर केलेले आहेत. तसेच महाराजांनी स्वामींना सनद देखील दिली होती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |
  • Log in or register to post comments

एका हातात तलवार असेल तरच, दुसर्या हातात जपमाळ राहते...

मुक्त विहारि
Tue, 03/02/2021 - 17:03 नवीन
बॅन्केत मनसोक्त पैसा असेल तरच, इतर अनावश्यक खर्चाला, हात सैल करता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

एका हातात तलवार असेल तरच,

मदनबाण
Tue, 03/02/2021 - 17:24 नवीन
एका हातात तलवार असेल तरच, दुसर्या हातात जपमाळ राहते... हे अमान्य नाही, तलवार धर्माच्याच रक्षणासाठी उचलली गेली,पण यामुळे उपासना पद्धती ताज्य ठरत नाही आणि त्यामुळे दुसर्‍या हातात माळ असणे हे देखील महत्वाचेच ठरते. राक्षस येउन यज्ञ विध्वंस करतात म्हणुन ऋषि विश्वामित्र यांनी श्री रामास राक्षसांचा संहार करण्यास नेले. तेव्हा जशी तलवार महत्वाची तसेच धार्मिक कृती देखील तितक्याच म्हत्वाच्या ठरतात. बॅन्केत मनसोक्त पैसा असेल तरच, इतर अनावश्यक खर्चाला, हात सैल करता येतो सत्य. मनसोक्त पैसा मिळवण्यासाठी अथक प्ररिश्रम करावेत आणि मग हौसेने सणवार करावेत. सणवार अनावश्यक नाहीत, तो आपल्या संस्कृती आणि परंपरेचाच भाग आहे. फक्त स्टेटस मिरवण्यासाठीच अमाप पैसे उधळणे हे उध्योग मात्र टाळावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आपण इथेच थांबू या.....

मुक्त विहारि
Tue, 03/02/2021 - 17:40 नवीन
कारण, व्यक्तीपुजा करणार्या व्यक्ती बरोबर वाद घालण्यात काहीही अर्थ नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आपण इथेच थांबू या.....

मदनबाण
Tue, 03/02/2021 - 18:28 नवीन
आपण इथेच थांबू या..... चालेल. व्यक्तीपुजा करणार्या व्यक्ती बरोबर वाद घालण्यात काहीही अर्थ नाही... मी उपासना पद्धती बद्धल बोललो आहे, व्यक्तीपुजे बद्धल नाही. हा देश जसा वीर योद्धांचा आहे तसेच तो साधु,संत आणि महात्म्यांचा देखील आहे. जगातुन लोक केवळ आणि केवळ आध्यात्मिक ओढीसाठीच हिंदुस्थानात आले आहेत, येत आहेत आणि येत राहतील. ३२:३६ नामदेव महाराज आणि भागवत धर्माची पताका यावर भाष्य माजी मुख्यमंत्र्यांनी केले आहे ते देखील ऐकावे. आपणास व्यक्तीपुजा पटत नाही म्हणुन जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म, याला उगा बोल लावु नका आणि त्याची एकमेकात गल्लत करु नका.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म,

मुक्त विहारि
Tue, 03/02/2021 - 19:18 नवीन
यांच्यामुळे कुठलीही राज्यसत्ता किंवा धर्म टिकला नाही.... पारशी लोकांना देश सोडावा लागला ज्यू लोकांची, युरोप मधून हकालपट्टी झाली माया संस्कृती नष्ट झाली रोमन संस्कृती नाहीशी झाली इतकेच कशाला? वाकाटक, राष्ट्रकूट, मौर्य, यादव घराणे पण नष्ट झाले विजयनगर साम्राज्य पण नष्ट झाले छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, आज हिंदू धर्म टिकला नसता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म,

मदनबाण
Tue, 03/02/2021 - 21:40 नवीन
जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म, यांच्यामुळे कुठलीही राज्यसत्ता किंवा धर्म टिकला नाही.... हिंदू धर्म अजुन टिकुन आहे आणि जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म हे आजही चालु आहे, काळानुरुप प्रमाण [ यज्ञ-याग ] कमी झाले असतील पण सगळी आक्रमणे झेलुन, शतकांची गुलामी सहन करुन देखील त्यांचा धर्म लोप पावला नाही ना त्यांची त्यांच्या धर्मातली आस्था लोप पावली.ही हिंदूंची जीवन पद्धतीच त्यांच्या टिकुण राहण्यास कारणीभुत ठरली. वाकाटक, राष्ट्रकूट, मौर्य, यादव घराणे पण नष्ट झाले विजयनगर साम्राज्य पण नष्ट झाले तुम्ही फक्त जप-जाप करा पण लढु नका असे कोणीच कधी सांगितले नाही, उलट किर्तना सारख्या प्रकारातुन जन जाग्रुती केली गेलेली आहे. "मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु || मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ || भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ || मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ || अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ || तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ || तुकाराम महारांजेचे शब्द देखील तितकेच कठोर आहेत जे तुम्हाला केव्हा कसे वागायला हवे ते सांगते. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, आज हिंदू धर्म टिकला नसता.... अर्थातच, यास कोणतीस शंका घ्यावयाचे कारण नाही, पण लोकांना शिवाजी दुसर्‍याच्या घरात जन्मास यावा वाटतो ! जो पर्यंत तुम्ही शत्रुला शत्रु प्रमाणे वागवणार नाही आणि त्याचे घर जाळणार नाहीत तो पर्यंत तुमच्या घरात शांतता नांदणार नाही ! हिंदूंचे जवळपास सगळेच देव वेपन्स लोडेड आहेत ! :) त्यांनी माझे नाम घ्या पण शस्त्र प्रयोग करु नका असे सांगितले नाही, अगदी महाभारतात देखील स्वतः नारायण युद्ध भुमीत अर्जुनाला गांडीव उचलण्यासस सांगतात. आजच्या काळात जर आपण पाकिस्तानची सारखी वाजवत राहिलो असतो तर आपल्या वीर योद्धांच्या इतक्या शवपेट्या आपल्याला पहावयास लागल्या नसत्या ! दर ६ महिन्यात १ असे सर्जिकल स्ट्राईक जरी आपण करत राहिलो असतो तर आज परिस्थिती फार वेगळी राहिली असती, हीच गोष्ट चीनला देखील लागु पडते. अधिक इथे :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जे तुम्हाला समजत आहे, ते सामान्य माणसाला समजत नाही.

मुक्त विहारि
Tue, 03/02/2021 - 21:55 नवीन
समर्थ रामदास यांनी पण आधी शरीर कमवा हेच सांगीतले. त्यासाठी त्यांनी मारूती मंदिरांची स्थापना केली. पण आता समर्थ रामदास यांनी केलेली प्रथा न पाळता, त्यांचे चमत्कारच लोक लक्षांत ठेवतात.... मला वाटते की, आता आपण एकमेकांना फोन करू या. कारण, धाग्याचा विषय "आर्थिक षडरिपू" आहे. बाबा महाराजांचे प्रवचन आणि सामान्य नागरिक आणि सामाजिक भान, हा एक वेगळा विषय आहे, तो नंतर चघळत बसू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

व्यक्ती पूजा हे वाक्य तुम्ही सारखे वापरता

Rajesh188
Tue, 03/02/2021 - 19:19 नवीन
का? त्यांच्या राजकीय मता वरून बोलत असाल तर.राजकारण आणि मत हे काय २४ तास डोक्यात नसतात. आयुष्य खूप विविध विषयांनी भरलेले असते.विविध छंद,आवडी,मत, लोकांना असतात. तुमच्या डोक्यात २४ तास राजकारणाचा कचरा भरलेला असतो. असे तुम्ही व्यक्ती पूजा हे वाक्य वापरले की मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

दोन गोष्टी आहेत

मुक्त विहारि
Tue, 03/02/2021 - 19:33 नवीन
एक तर तुम्ही मला किंवा मदनबाण, यांना वैयक्तिक भेटलेले नाही आहात.. मदनबाण यांच्या बरोबर माझे संबंध अतिशय उत्तम आहेत, वेळ मिळाला की आम्ही भेटतोच... त्यांची आणि माझी मते वेगळी आहेत पण आम्ही दोघेही एकमेकांचा दुस्वास करत नाही.... दुसरी गोष्ट अशी की, त्यांच्या गुरूंची आणि आमच्या गुरूंची मते पटत नाहीत. आता ह्यात देखील तुम्हाला, राजकारण दिसत असेल तर, आपण महान आहात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

जाउंद्या ना बाळासाहेब

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 03/02/2021 - 20:19 नवीन
या धर्तीवर जाउंद्या ना मुविकाका, कुठे नादाला लागताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

त्यांची आणि माझी मते वेगळी

मदनबाण
Tue, 03/02/2021 - 21:40 नवीन
त्यांची आणि माझी मते वेगळी आहेत पण आम्ही दोघेही एकमेकांचा दुस्वास करत नाही.... सत्य.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अपत्याचा पहिला वाढदिवस

परिंदा
Wed, 03/03/2021 - 05:10 नवीन
आर्थिक षडरिपुत "अपत्याचा पहिला वाढदिवस" याला पण अ‍ॅड करा. त्यासोबत पाचवा, अठरावा वाढदिवस हे उप-षडरिपु! आजकाल अठराव्या वाढदिवसाचे नवीनच खुळ निघालेय. पाश्चात्य देशात अठराव्या वर्षी मुलं स्वतः काही ना काही कमवतात आणि मित्रांसोबत पार्टी करतात. त्यांची ही रीत आपल्याकडे अत्यंत चुकीच्या पद्धतीने पाळली जाते. अठराव्या वर्षी दमडीही न कमवणारा मुलगा/मुलगी आपल्या आईबापाच्या पैशाने आपल्यासारख्याच थिल्लर पोरापोरींना जमवून पार्ट्या झोडतात.
  • Log in or register to post comments

मुविकाका तुम्ही 'बाबा महाराज डोंबोलीकरांचे' मार्केटिंग जोरात करत

टर्मीनेटर
Wed, 03/03/2021 - 11:31 नवीन
मुविकाका तुम्ही 'बाबा महाराज डोंबोलीकरांचे' मार्केटिंग जोरात करत रहा, जसजसे त्यांचे अनुयायी वाढत जातील तशी त्यांच्या प्रवचनातील आर्थिक षडरीपुंची संख्या षोडशरिपू पर्यंत पोहोचत जाईल &#128512 अनेक क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती समाजाला देणारी जागतिकच नव्हे तर वैश्विक केंद्र असलेली आपली डोंबिवली एखादा बुवा/बाबा/महाराज देण्यातही मागे नसावीच म्हणतो मी 🤣 बाकी लेखातील काही गोष्टी पटल्या तर काही नाही पटल्या! ऋण काढून सण साजरे करू नये ये सौ बात कि एक बात &#128077
  • Log in or register to post comments

एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात....

मुक्त विहारि
Wed, 03/03/2021 - 12:41 नवीन
एखाद्या व्यक्तीला, एका दिवसांत, 400-500 कोटी खर्च करायला काहीही वाटत नाही, तो नंतर ते पैसे वसूल करू शकतो... उदाहरणार्थ, समजा एका व्यक्तीचा खनिज व्यवसाय आहे आणि तो टनावारी खनिजे विकत असेल तर, त्याने 5-10 रुपये टनावारी वाढवले तरी, एका वर्षांत त्याचा खर्च भरून निघतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

एकुणातच आपल्याकडे आर्थिक

राघव
Wed, 03/03/2021 - 11:44 नवीन
एकुणातच आपल्याकडे आर्थिक सजगता लहानपणापासून बाणवली जात नाही, त्याला महत्त्वही दिले जात नाही. जर काही ठिकाणी अपवादात्मक दिसली तरी ते किती व्यवहारी आहेत, असे म्हणून हिणवले जाते. काटकसरीने राहणे हेच आपल्याकडे सांगितले जाते. ते हवेच, पण त्या वाचवलेल्या पैशाची योग्य गुंतवणूक कशी केली पाहिजे हे नाही समजावले जात. सेविंग आणि रेवेन्यू जनरेशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अन् त्या दोन्हीही आपल्या व्यवहारात असायला हव्यात, हे मला स्वतःला कळायला पंचवीशी उजाडली. ते कसे करायचे हे कळायला पस्तिशी! तोवर व्यवहाराबद्दल एवढी अनास्था होती की हिशेबाचा विचार सुद्धा नको वाटायचा, कारण काय तर मला नाही समजत त्यातलं म्हणून. जर आधीपासून ते समजलेलं असतं तर आर्थिक बाबतीत आयुष्य कितीतरी सुकर झालं असतं असं वाटतं. बाकी शालेय अभ्यासक्रमात अर्थशास्त्र नावाचा एक विषय होता. "विषयाची" नावड ही संत शिकवण या विषयाबाबत अगदी मनापासून तयार होईल अशी माहिती आणि ती सांगणारे शिक्षक, हा चर्चेचा एक वेगळाच "विषय" होईल! आमच्या अर्थबुद्धीचा विकास होण्यासाठी अच्युत गोडबोलेंना "अर्थात्" लिहावे लागले यातच सर्व आले!! विनोदाचा भाग सोडला तरी हा दृष्टीकोन आपल्याक्डे लहानपणापासून बिंबवायला हवा. अनेक देशांमधे लहानपणापासून याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. काही उदा :- - छोटी छोटी कामं करणे आणि त्यातून पै-पैसा कमवून जमा करणे => यातून मेहनतीनं कमावलेल्या पैशाचं मोल समजतं - शिक्षा म्हणून ओळखीच्या किंवा शेजार्‍याच्या कडे एखादे काम फुकट करायला लावणे => यातून इतरांशी कामाच्या बाबतीत कसं वागावं ते समजतं [constructive punishment] - गरजूला पैसा दान देणे आणि त्या पैशाचा विनियोग कसा केल्या जातो ते बघण्याचा प्रयत्न करणे => सत्पात्री दान देण्याचं हे शिक्षण आहे. सोबतच जगातल्या अडचणी दु:ख ह्यांची ओळख होण्यासाठी हे अनुभव गरजेचे असतात. ह्या आणि अशा अनेक गोष्टींकडे बघतांना आपल्या मुलाच्या/मुलीच्या अनुभवांकडे लक्ष ठेवणं, दिशा देणं, सांभाळून घेणं; हे पालक म्हणून आपलं काम आहे. आर्थिक आणि सामाजिक शिक्षणासाठी योग्य वातावरण तयार करणं म्हणजे हेच की, अजून काय? पैसा मिळवताना फार हळू मिळतो आणि खर्च लगेच होऊन जातो हे समजल्यावर येणारं आर्थिक शहाणपण, गुंतवणूकीसारख्या प्रश्नांना आपसूक चालना देतं. माणूस आपणहून स्वतःच हे शिकत जातो आणि त्यातूनच पुढे आंत्रप्रिनर्स तयार होतात. आपल्या भारतात नोकरदार आणि व्यापारी जास्तीत जास्त तयार होतात, आंत्रप्रिनर्स फार कमी याचं हे एक प्रमुख कारण आहे.
  • Log in or register to post comments

जोडुनिया धन, उत्तम व्यवहारे ....

मुक्त विहारि
Wed, 03/03/2021 - 12:37 नवीन
ही एक शिकवण आहे.... ----------------- मध्यंतरी एक वाक्य वांचनांत आले होते की, लाख कमवावे आणि रूपया खर्च करावा.... जाॅनी वाॅकरचे असेच एक वाक्य आहे, ब्लॅक लेबलची ऐपत असेल तर, भारतीय व्हिस्की प्यावी. कारण आज जरी तुम्हाला ब्लॅक लेबल परवडत असली तरी, उद्याची आर्थिक परिस्थिति वेगळी असू शकते... भगवान दादा, मेहमूद ही अशीच काही आठवलेली उदाहरणे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

लेख आवडला. ".......... सहा

शेखरमोघे
Wed, 03/03/2021 - 20:58 नवीन
लेख आवडला. ".......... सहा गोष्टींवर, जितका कमी खर्च करता येईल, तितका कमी खर्च कर", या बरोबरच हल्ली ऊठसूठ वाजवले जाणारे फटाके हाही एक खर्च टाळला गेला तर कुणाच्याच आनन्दात उणे पडू नये.
  • Log in or register to post comments

नुसते बोलून चालत नाही

Rajesh188
Wed, 03/03/2021 - 21:46 नवीन
दुसऱ्यांना शहाणपण शिकवणे हे खूप सोपं आहे. उपदेश देण्यात काही ही नुकसान नसते. बदलाची सुरुवात स्वतः करायची असते. लग्नातील फालतू खर्च वाचवण्यासाठी वीस वर्षापूर्वी वैदिक पद्धतीने लग्न माझ्या मित्रांनी केले होते . आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असताना सुद्धा. पाहिले स्वतः कृती करा आणि नंतर उपदेश ध्या. मूवी नी त्यांच्या मुलांची लग्न,मुंज केली असतील तर कशी केली हे सांगावे . नंतर उपदेश द्यावेत.
  • Log in or register to post comments

पाहिले स्वतः कृती करा आणि नंतर उपदेश ध्या.

मुक्त विहारि
गुरुवार, 03/04/2021 - 11:02 नवीन
प्रचंड सहमत आहे. साखरपुडा घरच्या घरी केला.... पण, लग्नाच्या बाबतीत, वैदिक पद्धतीने...आजेसासूने खूप नाटके केली... आमचे सासरे आणि सासूबाई तयार होते, पण ... मंगळागौर घरी डोहाळजेवण घरी बारसे पहिले अपत्य असतांना, कार्यालयात, कारण आजेसासूची शेवटची इच्छा होती.....म्हातार्या माणसां बरोबर वाद घालणे अशक्य होते...आमच्या सासूबाई घरात बारसे करायला तयार होत्या, पण आजेसासू ऐकायलाच तयार न्हवत्या....नंतर एकाच वर्षांत गेल्या.....(आणि नंतर आमचे अनावश्यक खर्च वाचायला लागले...) दुसर्या अपत्याच्या वेळी, बारसे घरांत दोन्ही मुलांची मुंज, सार्वजनिक... मुलांची हौस होती... आता मुलाचा साखरपुडा घरच्या घरी आणि मुलाचे लग्न वैदिक पद्धतीने, असेच ठरले आहे... इतपतच खर्च वाचवू शकलो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मोठ्या मुलाचा साखरपुडा झाला ...

मुक्त विहारि
Fri, 04/09/2021 - 16:06 नवीन
साखरपुड्याचा खर्च ... डोंबिवली ते सांगली व्हाया कल्याण ... 1000/- तिकीटे आणि खाणे मुलाचा भाड्याने आणलेला कोट .... 200/- साखरपुड्याचे जेवण .... 1000/- (त्यांनी त्यांचा खर्च करायचा आणि आम्ही आमचा) फोटोग्राफर .... 1000/- येतांनाचे तिकीट .... 800/- एकूण .... 4000/- आमच्याकडची माणसे 3, मी, सौ आणि मोठा मुलगा धाकटा मुलगा ऑनलाइन काॅलेज असल्याने, येऊ शकला नाही.. साखरपुडा घरच्या घरी केला.. मी मुलांसाठी आधीच अंगठ्या बनवून ठेवल्या असल्याने, तो खर्च वाचला. माझ्या मृत्यू नंतर देण्यापेक्षा आधीच दिली... लग्नाच्या खर्चाचा हिशोब नंतर देईन. चिंता करू नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्ही स्वतःच्या मुलांना लसी

टवाळ कार्टा
Sun, 03/07/2021 - 00:45 नवीन
तुम्ही स्वतःच्या मुलांना लसी टोचवा पण दुसर्यांना सागा लस म्हणजे थोतांड आहे....चान चान :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

*सांगा

टवाळ कार्टा
Sun, 03/07/2021 - 00:45 नवीन
*सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चालायचेच ...

मुक्त विहारि
Sun, 03/07/2021 - 11:22 नवीन
चालायचेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा