Skip to main content

केवायसी, एक बँकानुभव

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 18/01/2021 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर दोन चार धागे वाचून झाले आठ दहा कॉमेंट्स करून झाल्या अन एकदम आठवले बँकेत पैसे जमा झाले का ते बघायचं राहील. लगेच डबडीहाय बँकेच्या साईटवर गेलो लॉगिन केलं. पैसे परवाच जमा झाले होते. बॅलन्स दीड लाख रु दाखवत होता. सध्या या पैश्याचं खरेदी करायचं वै काही प्लॅन नव्हता. वर्षभरासाठी एफडी करायची आयडिया चांगली होती. व्याज मिळून पैसे थोडे वाढणारही होते. कोरोनाच्या काळात डबडीहाय बँकेत पाऊल टाकायचं म्हंजे लैच डेंजर अनुभव असायचा. जवळच होती डबडीहायची शाखा, हायवेला. कोरोनाच्या काळात स्टाफ कमी. सॅनिटायझर फवारा मारून घ्यायचा, टेम्परेचर मोजून घ्यायचं आणि मगच आत जायला मिळायचं. पाच-सात पायऱ्या चढून जायला लागायच्या. तिथला सिक्युरिटी गार्ड स्वतःला मोठा राजा समजायला लागला होता. शाखे बाहेर १५-२० लोकं जमली की खूप गर्दी झाल्यासारखी वाटायची. ५-७ माणसे अंतर ठेऊन पायऱ्यांवर उभी राहायची, उरलेली उन्हात रस्त्यावर वर. तिथंच दुचाकी पार्क केलेल्या असायच्या. त्यांचा आत जाणाऱ्या रस्त्याच्या लोकांना त्रास व्हायचा. म्हातारी कोतारी कावायची. सिक्युरिटी गार्ड त्याचा माज दाखवत लोकांना लवकर आत सोडायचा नाही. हे सगळं चित्र डोळ्यापुढं आलं अन शाखेत जाऊन एफडी काढायचा विचार रद्द करावा लागला. म्हटलं ऑन-लाईन एएफडी काढू. मग दुपारी फुरसतीच्या टाइममध्ये डबडीहायला लॉगिन केलं. एक लाखाची एफडी करून टाकली. पैसे बचत खात्यातून एफडी खात्याला ट्रान्सफर झाले. त्यासंबंधी एसएमएस देखील आले. ऑन-लाईन एफडी पावती तयार झाली, एफडीची सॉफ्टकॉपी इ-मेलने देखील आली. म्हटलं चार आठ दिवसांनी शाखेत गेलं की पावती घेऊ आपल्या रेकॉर्ड्ससाठी. डबडीहायचं एक वैशिष्ट्य होतं, एफडी मोडायची असेल तर शाखेत जाऊन एफडी पावतीवर लिहून अथवा वेगळा अर्ज करून एफडी मोडायला लागायची. इतर बँकांची मात्र ऑनलाईन मोडता येते. पैसे बचत खात्यात जमा होतात. दुसऱ्या बँकेत ऑनलाईन एफडी बिनधास्त करायचो, पण या बँकेबाबत जरा सावधच असायचो. BANK1234 शनिवार रविवार उलटला, अन सोमवारी दुपारी मोबाईलवर डबडीहाय बँन्केचा एसएमएस येऊन थडकला : " केवायसी अद्ययावत नसल्यामुळे तुमची ऑनलाईन एफडी रिजेक्ट झालेली आहे. ताबडतोब केवायसी अपडेट करा" अन थोड्याच मिनिटांत रद्द झालेल्या एफडीची रक्कम बचत खात्यात जमा झाल्याचा एसेमेस ! च्यामारी, वैतागलोच ! केवायसी अपडेट नाही ही माहिती एफडी करायच्या आधीच द्यायची ना ! केले असते आधी केवायसी अपडेट अन मग केली असती एफडी. एफडी झाल्यानंतर, त्याची पावती ई-मेल ने पाठवल्या नंतर रद्द करतात म्हणजे काय ? जाब विचारला पाहिजे त्यांना. मंगळवारी केवायसीची सर्व कागदपत्रे, फोटो वै घेऊन पोहोचलो शाखेत. नेहमी प्रमाणे शाखे बाहेर पायऱ्यांवर १५-२० खातेदार. सिक्युरिटी गार्डचा रुबाब चालूच. अर्ध्या-पाऊण तासाने आत प्रवेश मिळाला. सिंगल विंडो फॅशनमुळे तिथं एकच पोरगेलासा भैया इसम माणूस वेगवेगळी कामं बघणारा. या काउंटरसाठीचे ५-७ खातेदार संपले मग माझा नंबर आला. फॉर्म भरले, सह्या केल्या, कागद पत्रे जोडली अन त्याला विचारले "कधी पर्यंत होईल ?" तो उत्तरला : "१५ दिन लगेंगे " हे ऐकून माझं डोकंच सटकलं, इतके दिवस का म्हणून त्याच्याशी वादावादी सुरु झाली. "स्टाफ कम हैं , केवायसी अपडेट मुंबई ब्रान्चमें होता हैं. सब पेपर अप्लिकेसनके साथ मुंबई जाते कुरियरसे . इ." हे ऐकून आता मात्र डोकं चिघळंलच. पुढं त्यानं असं "चलो, हटीयें, बहोत लोग हैं पीछे. मुझेसें क्यों झगड रहे हैं ? दोन नंबर काउंटरपे नयना मॅडमसे मिलीए " असं म्हणत जवळजवळ खास भैय्या टोनमध्ये हुसकावून लावलं. नयना मॅडमच्या काउंटरला पोहोचलो. आधीच आवाज वाढला होता. ऑन-लाईन एफडी रिजेक्ट झाल्याबद्दल त्यांना शिव्या घातल्या. " असली कसली तुमची बँकेची सिस्टीम" म्हणून इज्जत काढली. " बँक "आपुलकीनं वागणारी माणसांची " होती तो पर्यंत अश्या अडचणी लगेच सोडवल्या जायच्या. माझ्यासारख्या वीसतीस वर्षे जुन्या खातेदाराला जर असा त्रास होत असेल तर नकोच मला ही बँक ! " माझ्याबाबतीत बँकेने मागे केलेले घोळाचा पाढा वाचला. नयना मॅडम सिनियर होत्या, मॅच्युअर अन कुल देखील. ब्रँच मॅनेजर क्वारंटाईन झाल्यामुळं मॅनेजरची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं "चूक झालीय अन तुम्हाला त्रास झाला बद्दल सॉरी. मी स्वतः यात लक्ष घालते." BANK12345 अवस्थ होऊन घरी परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दहालाच नयना मॅडमचा फोन आला. "सॉरी सर, तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल. आता मी स्वतः फॉलोअप घेत आहे. २४ तासाच्या आत तुमची केवायसी पूर्ण होईल आणि तुम्हाला एफडी उघडता येईल" दुपारी मी दुसऱ्या बँकेचा पर्याय निवडला आणि तिथे एफडी काढली. पुढच्या दिवशी बँकेचा एसएमएस आला " तुमची केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, तुम्ही पुढील व्यवहार करू शकता " पुन्हा नयना मॅडमचा "केवायसी डन. आता तुम्ही एफडी करू शकता" असा फोन आला, पण मी " वैतागून दुसऱ्या बँकेत एफडी काढली" असे उत्तर दिले. दोन तीन दिवस गेले अन बँकेची मेल आली " पॅरॉडिक केवायसी पडताळणी तातडीने करा, नाही तर आपणास देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होऊ शकतो " आता मात्र माझं डोकंच हाललं. तिरमिरीत बँकेला ई-मेलने पुढील प्रकारे कस्टमर कम्प्लेंट केली : १) माझी केवायसी पडताळणी प्रलंबित आहे, आणि तातडीने पडताळणी करावी लागेल हे मला वेळेत का सांगितले गेले नाही ? २) मला बँकेकडून कालावधिक केवायसी पडताळणी करा असा ई-मेल एफडी रिजेक्ट झाल्यानंतर प्राप्त झाला. ही विसंगती का ? केवायसी पडताळणी साठी फक्त ई-मेल का ? फोन अथवा ईमेल एसएमएस का आला नाही ? जर एखादा काही कारणाने ई-मेल वाचत नसेल त्याला केवायसी पडताळणीच्या तातडी संबधी कसे कळेल ? ३) केवायसी पडताळणी तातडीने करणे गरजेचे आहे असे सांगितले गेले या तातडीची मुदत काय ? किती दिवस किंवा किती महिने ? ४) मला एफडी काढताना ऑन लाईन व्यवहार करत असतानाच केवायसी प्रलंबित असलेल्या बाबींची मला माहिती का दिली गेली नाही अथवा एफडी करण्यासाठी तिथेच रिजेक्शन का झाले नाही ? हे तिथे सिस्टममध्ये कळले असते तर ती प्रक्रिया पूर्ण करून एफडी काढली असती किंवा दुसऱ्या बँकेचा पर्याय शोधला असता. ५) केवायसी पडताळणी न केल्यास कोणते व्यवहार रोखले जातील? ("केवायसी प्रलंबित स्थिती" च्या काळात ) मी याच दरम्यान अनेक ऑनलाईन व्यवहार केले तेव्हा सिस्टमने मला प्रतिबंधित केले नाही. हा विरोधाभास का? ६) केवायसी पडताळणी करण्यासाठी कालावधी काय आहे ? (उदा. वाहन चालविण्याचा परवाना 1 महिन्यापूर्वी नूतनीकरण केला जाऊ शकतो किंवा वैधता तारीख कालबाह्य झाल्यानंतर 1 महिना) ७) केवायसी पडताळणी करण्यासाठीची एकंदरीत प्रणाली काय आहे ? पूर्वी मी शाखेत गेलो असताना मला केवायसी पडताळणी करायला सांगण्यात यायचे, पण कधी कोणतेही व्यवहार थांबण्यात आलेले नव्हते. या वेळीच असे का झाले ? यासाठी बँकेची सिस्टममध्ये अलर्ट, ई-मेल, एसएमएस अलर्ट, फोन इ फूफप्रूफ सिस्टम का नाही. ८) केवायसी पडताळणी करण्यासाठी मी शाखेत गेलो व काउंटरवर सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केली. काउंटरवरील व्यक्तीने की केवायसी अद्ययावत औपचारिकता १० ते १५ दिवसांत केली जाईल. संबंधित अधिकारी तिनेही याची पुष्टी केली, केवासी साठी एवढा वेळ का लागावा ? ९) नंतर फोन करून संबंधित अधिकाऱ्याने संगितले की २४ तासाच्या आत तुमची केवायसी पूर्ण होईल. यावर विश्वास कसा ठेवावा ? १०) माझ्या जुन्या खातेदाराला (वीस-तीस वर्षे जुना) जर असा क्लेशदायक अनुभव येत असेल काय म्हणणार.आपणासोबताचा बँकिंगचा अनुभव अनुभव अतिशय दुःखद होता हे सांगायला मला खेद वाटत आहे. असा अनुभव इतर ग्राहकांना येऊ नये अशी मी प्रार्थना करतो. चारपाच दिवसांनी बँकेचे असे गुळमुळीत ई-मेल उत्तर आले : आपल्याला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपली केवायसी पडताळणी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. केवायसी पडताळणी प्रक्रिया बँकिंगच्या नियमानुसार अनिवार्य आहे. आपण ऑनलाईन लॉग इन करून अमुक अमुक मेनू मध्ये जाऊन तपासू शकता. केवायसी पडताळणी आम्ही आपल्याला खाली माहिती माहिती देऊ इच्छितो : १) कालावधिक केवायसी पडताळणीसाठी बँक ई-मेल आणि एसएमएस पाठवते. २) केवायसीमुळे खाते गोठल्यास आपल्या खात्यात डेबिट व्यवहार करण्यास प्रतिबंधित केले जातात. ३) आपण ही प्रक्रिया ऑनलाईन खालील प्रमाणे करू शकता: इंटरनेट बँकिंग (म्हणजेच तुमच्या खात्यावर लॉग इन> मेन मेनू> सेवेवर क्लिक करा & विनंत्या> नवीन विनंती> खाती> इतर सेवा> सबमिट करा. मी त्यांना ई-मेल करून सांगितले: धन्यवाद. आपण दिलेल्या उत्तराने मी पूर्णपणे समाधानी नाही. बऱ्याच मुद्द्यांविषयी स्पष्टीकरण दिलेले नाही. माझे आणखी काही मुद्दे पुढील प्रमाणे: १) बँकेने कालावधिक केवायसी पडताळणीसाठी पाठविलेला ई-मेल होता त्यात ऑनलाईन केवायसी पडताळणी विषयी चकार शब्दसुद्धा नाही. ऑनलाईन केवायसी पडताळणी विषयी ग्राहकांना योग्य ती माहिती व प्रशिक्षण दिले तर बँकेचा व खातेदारांचाही फायदा होऊ शकेल आणि शाखा कर्मचार्‍यांना डोकेदुखी कमी करेल. स्टेट बँकेत तेथील कर्मचारी वर्ग अशी मदत करतो. २) मी पुढे जाऊन असे म्हणायचे धाडस करतो की : केवायसी पडताळणी ही बँक कर्मचाऱ्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी आणि खातेदारांसाठीही नॉन-व्हॅल्यू अ‍ॅडींग अ‍ॅक्टिव्हिटी आहे. कृपया माझ्या विधानाचे गंभीरपणे पुनरावलोकन करून ही प्रक्रिया रद्द करावी अथवा त्रास होणार नाही अश्या पद्धतीने प्रक्रिया अधिक सुलभ करावी ही विनंती. BANK123456 ह्या ई-मेल नंतर तीन दिवसांनी कस्टमर केअर विभागातून फोन आला. त्यात माझ्या मुद्दयांवर थातुरमातुर स्पष्टीकरण देण्यात आले. मी हे स्पष्टीकरण ई-मेलने पाठवा असे सांगितल्यावर "हो पाठवतो" असे सांगितले गेले. अर्थात ई-मेल आली नाही. सराईत झालेल्या यंत्रणा आपल्या सारख्या ग्राहकांना फाट्यावर मारतात याचा आणखी एक किस्सा अनुभवाच्या पोतडीत जमा झाला. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला माझ्या या अनुभवाबद्दल ? तुम्हाला ही असा डोकेफोडडू अनुभव आलेला आहे काय ? (प्रचि आंजावरून साभार )

वाचने 40374
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

In reply to by चौथा कोनाडा

The pattern of loops and whorls on your fingerprints was fixed three months before you were born. You can scar your fingerprints with a cut, or temporarily lose them through abrasion, acid or certain skin conditions, but fingerprints lost in this way will grow back within a month. As you age, skin on your fingertips becomes less elastic and the ridges get thicker. This doesn’t change your fingerprint, but it’s harder to scan or take a print from it. https://www.sciencefocus.com/the-human-body/can-fingerprints-change-dur…

In reply to by सुबोध खरे

माहितीपुर्ण ! धन्यवाद खरे साहेब ! लोअर पातळी वर अश्या केसेस कश्या हाताळत असतील या बद्द्ल जिज्ञासा आहे. पर्यायी पद्धत वापरत असतील तर प्रश्न नाही !

In reply to by चौथा कोनाडा

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सेवेबद्दल न बोलणेच उत्तम. इतकी भिकार सेवा तुम्हाला केवळ सरकारी कार्यालयातच मिळू शकते. दुर्दैवाने आमच्या आईचे निवृत्तीवेतन खाते आणि वडिलांच्या मुदतठेवी तेथे असल्यामुळे तेथे नाईलाजाने जावे लागते. अन्यथा मी सरकारी बॅंकांशी संबंध कधीच तोडलेले आहेत. दुर्दैवाने हेच कर्मचारी माझ्याकडे रुग्ण म्हणून येतात तेंव्हा त्यांना त्यांच्या लायकीचीच सेवा द्यावी असा दुष्ट विचार मनात येतो. परंतु सौजन्य, सद्विचार आणि नैतिकता असे करण्याचा आड येते.

In reply to by चौथा कोनाडा

बोटांचे ठसे उमटत नसतील तर रेटिनल स्कॅन करता येतो. पण तो आधार मध्ये अंतर्भूत केलेला नाही. कदाचित नंतर होईल. (म्हणजे होणार असेल तर मोदी असतांनाच होईल नंतर शक्य वाटत नाही.)

In reply to by निनाद

व्वा, छानच ! असे पर्याय उपलब्ध करून संबंधितांनी डोळसपणे अंमलबजावणी केली तर नागरि़कांचे आयुष्य सोपे होईल. रेटिनल स्कॅन आधार मध्ये अंतर्भूत देखील अश्वासक आहे.

In reply to by कंजूस

थंब स्कॅनिंगला पर्याय हा मोबाईल ओटीपी व्हेरिफिकेशन आहे. बीएसएनलमध्ये फेस वेरिफिकेशनची पद्धत वापरली जाते.

के वाय सी अर्थात - नो यूवर कस्टमर - तुमच्या ग्राहकाला जाणा.
अगदीच सहमत चेतन सुभाष गुगळे सर. हे बँकेचेच काम आहे पण त्यात त्यात गुंतागुंत करून ठेवली की खातेदारांना नाहक त्रास होतो. बोटाचे ठसे+ आधार ओटीपी ही खुप सुटसुटीत प्रक्रिया आहे. आयकर खात्याचा रिटर्न भरताना ओटीपी ने ओळख पडताळणी करणे सोपे आणि सुटसुटीत आहे. सर्वांनी अश्याच प्रकारची प्रक्रिया राबवली तर ग्राहकांची गैरसोय होणार नाही !

In reply to by कानडाऊ योगेशु

खरंय ! पण एकंदरीत गुगळे साहेबांनी लेखन संन्यास घेतलेला दिसतोय. गुगळे साहेब म्हटलं की मला त्यांचा "सिहिंण" हा लेख आणि त्यावरचे धमाल प्रतिसाद आठवतात !

नुकताच आलेला बँकानुभव. एच.डी.एफ.सीचे क्रेडीट कार्डची मुदत संपत असलेल्याने बँकेने नवीन कार्ड पाठवण्याचा एकतर्फी निर्णय परस्परच घेतला.लॉकडाऊननंतर कंपनीने वर्क फ्रॉम होम सुरु केल्याने सध्या कंपनीच्या ऑफिसात कोणीच नाही. कार्ड त्या पत्त्यावर गेले व कुरियरवाल्याचा फोन आला कि कार्ड घेऊन आलोय म्हणून.(खरेतर तेव्हाच कळले कि कार्ड एक्स्पायर होणार होते व बँकेने नवीन कार्ड पाठविले आहे. एरवी लोन हवे का? क्रेडिट लिमिट वाढवुन हवी का? म्हणुन उठसुठ फोन करणार्या कस्टमर केअरने हे आधी सांगायला हवे होते कि तुमचे कार्ड एक्स्पायर होणार आहे तेव्हा नवीन कार्ड पाठवत आहोत म्हणुन.पण ते असो.). त्याल सांगितले कि मी सध्या कोविड कारणाने शहरात नाही म्हणुन कार्ड घेऊ शकत नाही. त्याने ते परत पाठवेन म्हणुन सांगित्ले. पुढे मी बँकेच्या कके ला फोन केला. एकतर डायरेक्ट कके प्रतिनिधीशी बोलायचा पर्यायच नव्हता. बरेच सव्यापसय करुन प्रतिनीधीशी संपर्क झाला.तिला हा क्रेडिट कार्ड चा प्रकार सांगितला तेव्हा तिने पत्ता अपडेट करुन कार्ड नवीन पत्त्यवर मागवायला सांगित्ले. फोन ठेवला. अर्थात मला त्या क्रेडिट कार्ड ची गरज नव्हती म्हणुन मी काही पत्ता अपडेट करायच्या फंदात पडलो नाही. पण नंतर कके मधुन फोन आला कि क्रेडिट लिमिट वाढवुन हवी आहे का ते? तिला सांगितले कि बाई माझे क्रेडिट कार्ड अमुक अमुक कारणाने परत पाठविले गेले आहे काय करु सांग? पुन्हा पत्ता अद्ययावत करायची टेप वाजवली तिने.तिला म्हणालो कि बै माझे सगळी कागदपत्रे जिथे कार्ड आधी पाठवले होते त्यासंबंधित आहेत. आता दुसरी कागदपत्रे कुठुन पाठवु. ह्यावर तिच्याकडे उत्तर नव्हते. तिचा सुपरवायझर आला आणि पुन्हा हेच पाढे म्हणुन लागला. गो टू युअर निअरबाय ब्रँच आणि सबमिट द डॉक्युमेंट त्यला म्हणालो बाबा अशी दोन दोन कागदपत्रे कशी असु शकतात आणि तसेही मला जर ब्रँच मध्येच जायचे असेल तर तिथेच पाठव ना बाबा माझे कार्ड. मी माझी ओळखपत्रे दाखवुन तिथुन्च घेईन ते. बर्याच प्रायवेट बँकेत हा पर्याय असतो. त्याने ह्या बँकेत तशी सोय नाही म्हणुन दिलगीरी व्यक्त केली. मी ही मला लिमिट वाढवुन नको आहे म्हणुन दिलगीरी व्यक्त करत फोन ठेवला.

In reply to by कानडाऊ योगेशु

एच डी एफ सी बँकैची सेवा पण आता सरकारी बँकेसारखी झाली आहे. त्यांनी सरकारी बँकेतून मुदतपूर्व निवृत्त झालेले अनेक कर्मचारी घेतले आहेत ज्यांची बेपर्वा वृत्ती स्पष्टपणे दिसून येते. फक्त त्यांची संगणक प्रणाली अद्ययावत असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेस बँकेत जावेच लागत नाही. अन्यथा आता त्यांचा अनुभव फारसा चांगला राहिलेला नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

HDFC होम लोन चे पार्ट पेमेंट करायला ब्रांच मधे चेक घेऊन जावं लागतं. जास्त अवघड नाही हे implement करणं पण त्यांनी मुद्दाम तसच ठेवलं असेल. ह्यामुळे लोकांचे पार्ट पेमेंट कमी होतात. SBI मधे सुद्धा ते ऑनलाईन होतं.

In reply to by शलभ

HDFC च्या लोन टिकवून ठेवायच्या टॅक्टीज .... ! प्रत्येक बॅंकेच्या टॅक्टीज वेगवेगळ्या, ग्राहक ओढण्यासाठी आकर्षक सवलती ठेवायच्या आणि त्याची वसूली अन्य छूप्या मार्गांनी करायची ...... आणि असल्या खाचाखोचा ग्राहकांना अजिबात कळू द्यायच्या नाहीत, संभाषणात शिताफीनं टाळायचा !

In reply to by कानडाऊ योगेशु

माझे एस बी आय चे डेबिट कार्ड एक्स्पायर झाल्यानंतर ते घरच्या पत्त्यावर आले होते, त्यावेळी मी घरी नसल्याने कुरियरवाल्याने घरी इतर कोणालाही न सोपवता परत नेले. मला SMS आला की कार्ड बँकेत जमा केलेय, तिथुन कलेक्ट करा. एस बी आय जर असे करु शकते पण HDFC नाही हे ऐकुन नवल वाटले.

In reply to by कानडाऊ योगेशु

@कानडाऊ योगेशु, भारी अनुभव ! हे कार्ड घरपोच प्रकरण आपण घरी असेल तर भारी जमून जातं पण यात काही गडबड झाली तर डोक्याला ताप होतो. १० वर्षांपुर्वीची गोष्ट. मला ICICI चं नविन कार्ड हवं होतं, जवळच्या शाखेत पाठवा मग मी तिथं जाऊन माझं आयडी दाखवून घेईन असं सांगितलं तर म्हणाले "आमच्या सिस्टीमप्रमाणे असं करू शकत नाही" असं सांगितलं. मी किंवा कुणीही घरी नसेल तर काय याला त्यांचं उत्तर नव्हतं. माझं ICICI चं कार्ड घरपोच पाठवले आहे असा एसएमेस आला. नेमकं त्या वेळी घरी कोणी नव्हते. कार्ड परत गेले तसा एसएमेस आला. असं आणखी एकदा झालं. ककेशी वादावादी झाली, मला सांगितलं की ५-६ दिवसांनंतर होम ब्रॅन्चला येऊन कार्ड घ्या असं सांगितलं. आठवड्याने आधी फोन करून धावपळ करून १२ किमि दुर असलेल्या होम ब्रॅन्चला गेलो, तर सांगितलं की कार्ड अजून कुरीयर एजन्सी कडून परत आलं नाही. मी हबकलोच. खुप वादावादी झाली. खाते बंद करायची भाषा सुरु केल्यावर मला थांबायला सांगितले आणि एका टेबलच्या खालच्या ड्रॉवर मधून माझं कार्ड काढून दिलं !

In reply to by चौथा कोनाडा

असे उगाचच नाडायला काय कारण असावे ब्रे? म्हणजे पैसे वगैरे देतो पण लवकर करा असेही नसावे. नुकताच दुसर्या कुरियर वाल्याचा फोन येऊन गेला. माझे ते परत केलेले कार्ड आता दुसर्या पत्त्यावर (संदर्भ ) बँकेने पाठवले. असा हा आगंतुक्पणा बँकेला करायला कोणी सांगितला आणि मला दिसत असलेल्या माहितीनुसार हा पत्ता मला दिसतच नाही आहे.तरी बरे कि कुरियरवाल्याने तिथुन फोन केला आणी त्याला लगोलग पतली गली से निकल जा म्हणुन सांगितले.

In reply to by कानडाऊ योगेशु

असे उगाचच नाडायला काय कारण असावे ब्रे? कर्मचार्‍यांमध्ये सुसंवाद नसावा. "डिलीव्हरी रीटर्नड" वाली कार्डं त्या ड्रॉवरमध्ये ठेवत असावेत, आणि त्याला त्यात सापडले असावे (आणि त्याची एन्ट्री सिस्टीमम्ध्ये झाली नसावी) ...... आणि क्रेडिट कार्डवाल्याला पतली गली से परत पाठवून दिले हे भारीच झाले ! संदर्भ धाग्यातील "प्रातःस्मरणीयच" अनुभव खरंच त्रासदायक आहे. मी चेन्नईला असताना घरमालकाने किरकोळ कारणावरून फोनवर मला शिविगाळ केली (दारू प्यायलेला होता तो. आणि गंमत म्हणजे पोलिस खात्यात होता) , इतर वेळा माझ्याशी छान गप्पा मारायचा, बोलता-बोलता माझं कौतुकही करायचा) त्याच्या मुलीने मध्यस्ती करून फोन त्याच्या कडून काढून घेतला आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सांगितले. मला ही हा त्रासदायक अनुभव आठवत असतो !

इथे मिपावर बँकेत काम करणारे किंवा ज्यांचे जवळचे बँकेत काम करणारे आहेत का ? ज्यांच्या कडुन कर्मचारी असे का वागतात हे समजु शकेल का ? त्यांची बाजु काय असु शकेल.

In reply to by मराठी_माणूस

१) सरकारी बँका, खासकरुन SBI मार्फत सर्व सरकारी योजना कार्यान्वित केल्या जातात. उदा. जनधन योजनेत तळागाळातील लोकांचे खाते उघडले गेले. त्या कोट्यावधी खात्यांपैकी मोजकीच खाती ग्राहकांकडून वापरली जातात. मग बाकीच्या खात्यांच्या मेंटेनन्सचं काम या बँकांना करावंच लागतं. ज्यात बँकांना काहीच फायदा नाही. उलट unproductive कामंच वाढतात. आणि त्या कामाचं प्रेशर वरपासून खालीपर्यंत कायम असते. २) क्लर्क आणि सबस्टाफ सोडल्यास आॅफिसर लोकांची दर २-३ वर्षांनी बदली होत राहते. मागच्या आॅफिसरने केलेली घाण नवीन आलेल्या आॅफिसरला निस्तरावी लागते. ३) बँकरचं काम वाटतं तितकं सोपं नाही. ग्राहकांसाठी बँक ५ pm पर्यंत बंद होतात पण नंतर आॅफिसर लोक ८-९पर्यंत काम करत राहतात. ४) बँकेत जसे काही नाठाळ कर्मचारी असतात तसेच असंख्य नाठाळ ग्राहक पण येतात. अडाणी तसेच भांडकुदळ ग्राहकाशी डील करणं सोपी गोष्ट नाही.

In reply to by Ujjwal

कामाचे प्रेशर असणे, काम सोपे नसणे असे बर्‍याच क्षेत्रात असते , ह्या मुद्द्यावे खुप चर्चा होउ शकते. तसेही बँकाचे बरेच काम संगणकावर होते मग काय अडचण आहे असा प्रश्न पडतो. दुसरे, प्रत्येक अधिकारी घाणच का करतो ? तिसरे, जर समोरचा माणुस सभ्य आणि सौम्य भाषेत बोलत असेल तरीही त्याच्याशी तुसडेपणे का बोलले जात ? सगळेच काही नाठाळ नसतात

In reply to by मराठी_माणूस

कुठल्याही बॅन्केत गेलात तर, एक साधी उपाययोजना करायची .... चतूर्थ श्रेणी कामगारा बरोबर, हसते खेळते संबंध ठेवायचे... कामे पटकन होतात ... उपाय करून बघा, मी तेच करतो .... दुसरा एक उपाय आहे, आपल्या परिचयातला कुणी, ज्या बॅन्केत असेल, त्या बॅन्केत खाते उघडा.... हमखास कामे होतात... नातेवाईक युको बॅन्केत होता, म्हणून त्या बॅन्केत खाते उघडले...तो रिटायर झाला तरी, त्रास नाही ... नियम न तोड़ता, वेळ वाचत असेल तर, हे प्रयोग करून बघा ... दुसर्याला मान द्या, तो नक्कीच मदत करतो ....

In reply to by मराठी_माणूस

हायफाय ते निरक्षर अडाणी अश्या मोठ्या प्रमाणात येणारे खातेदार, अंमलबजावणी करताना येणारे प्रॅक्टीकल प्रॉब्लेम, चित्र विचित्र नियम या मुळं कर्मचारी कावून जातात. थोडाफार इकडं तिकडं होतच असतं. मुवि साहेब म्हणतात ते बरोबर आहे, हसत खेळत दोस्तीचं स्माईल स्वभावात ठेवत काम करून घ्यायची.

सुरेख निरिक्षण . आज काल अनेक बँकांमधुन केवायसीच्या आडुन क्रेडीट कार्ड , डी मॅट अकाउंट यांचा आग्रह केला जातो .

खाते उघडतांना , पत्त्यासाठी भाडे करार स्वीकारला होता , पण घर बदलल्यावर पत्ता बदलण्यासाठी नवा भाडे करार चालणार नाही असे म्हणतायत. नवीन खाते म्हणजे अधिक धंदा तेंव्हा सगळे चालले, त्यात ह्यांना फयदा दिसला , आता पत्ता बदल म्हणजे नुसतेच काम वाढणार , धंदा नाही, त्यात त्यांना असे वाटत असेल की आत ग्राहक कुठे जाणार पळुन.

In reply to by मराठी_माणूस

घर बदलल्यावर पत्ता बदलण्यासाठी नवा भाडे करार चालणार नाही
हे विचित्रच आहे, जो माणुस भाड्याच्या घरात राहतो, बदली वा इतर कारणांनी दुसर्‍या घरात भाड्याने रहायला जातो त्याला नविन पत्त्यासाठी कसा काय नकार देऊ शकतात ? कोणी जाणकार या बाबत सांगू शकेल काय ? याची वर तक्रार केली आहे का ? बँकेचे काय म्हणणे आहे ? खाते बंद करायची धमकी देऊन बघा, घेतील कदाचित.