Skip to main content

अनलॉक १.० ते ५.०

लेखक Prajakta२१ यांनी मंगळवार, 02/06/2020 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा डॉ बिरुटे सरांच्या सूचनेनुसार नवीन धागा काढत आहे धन्यवाद https://www.esakal.com/mumbai/mission-begin-again-start-maharashtra-chie... अनलॉक १.- हळूहळू सर्व सुरु करणार आहेत लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे अनलॉक १.- हळूहळू सर्व सुरु करणार आहेत लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे स्वयंशिस्त १. मास्क वापरणे २. मास्क काढावा लागला तरी नंतर लगेच हात sanitize करणे ३. सार्वजनिक ठिकाणी without कव्हर न शिंकणे,न खोकणे ,न थुंकणे ४. गर्दी न करणे (whatsapp सारख्या माध्यमांचा उपयोग करून वार ठरवून घेणे सामान खरेदीसाठ,शक्यतो दुकानदारांना फोन करून जाणे) ५. ऑनलाईन ,घरपोच डिलिव्हरीला प्रोत्साहन देणे ,प्राधान्य देणे अवांतर - रुग्णसंख्या वाढत असताना देखील लोकडाऊन शिथिल करण्याच्या भारताच्या निर्णयावर जगात आश्चर्य व्यक्त होत आहे असे आज एका वृत्तवाहिनीवर (tv ९) सांगत होते आत्ता चक्रीवादळाची बातमी सारखी दाखवत आहेत चक्रीवादळामुळे परत त्या त्या ठिकाणी संचारबंदी आहे निसर्गच लोकडाऊन वाढवण्याचा इशारा तर देत नाहीये ना असे वाटले

वाचने 51015
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

माझ्या तालुक्याच्या गावची लोकसंख्या कागदोपत्री वीस हजार तर अशी तशी मिळून पस्तीस एक हजार भरेल. पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून तर आत्तापर्यंत म्हणजे लॉकडाऊन 5.0 अर्थात अनलॉक 1.0 पर्यंत लोकांच्या जीवनव्यवहारात थोडा फार फरक पडलेला दिसतो. अगदी स्ट्रीकली लॉकडाऊन होतं तेव्हा लोक एकटे दुकटे दिलेल्या वेळात सामान घ्यायला दिसायचे, रहदारी कमी होती. तालुल्यातल्या एका खेडेगावी एक बाधित रुग्ण होता तोही कुठेतरी कोणाच्या संपर्कात आलेला त्यामुळे त्याचं कुटूंब आणि काहींना संसर्ग झाला आणि ते बरेही झाले. काहींवर उपचार तालुक्याच्या गावी सुरु होता त्यामुळे एक भिती काही दिवस होती. नंतर मात्र, लोक उपरणे, मास्क, टॉवेल असे काही-बाही गुंडाळून रस्त्यावर दिसतच होते. एक भितीयुक्त पण जीवनव्यवहार नेटाने मागच्या पानावरुन पुढे सुरुच होते. आता अनलॉक वन मधे शहराचा अंदाज घ्यावा म्हणून काल गाडीतून फेरफटका मारुन आलो तेव्हा जाणवले की शहर मुक्त वाहात होते. नेहमीची गच्च ट्राफीक रस्त्यावर दुतर्फा होती, भाजीपाल्यावाले जमेल तिथे दुकाना लावून होते. काहींना मास्क होते तर काहींना नव्हते. गर्दीतल्या एका परिचिताला मास्क नव्हता म्हणून त्याला मास्क लावून फिर ना भो, असं म्हणालो तर म्हणाला की ''जब मरनेका टाईम आयेगा तो मरेंगे उसको कोई नै रोकेगा'' असे बेफिकिरपणा आढळला. बाकी, सॅनिटायजर, साबण पाण्याचा वापर करणे या गोष्टी आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी नित्यनियमाने करावे लागेल. आपल्याला आपलीच सावधानता बाळगावी लागेल. आपणच आपल्याला जपायचं हे लक्षात घेऊन यापुढील वावर करणे गरजेचे आहे. आपल्याला हातात तितकेच आहे, आपल्याला संकटाला सामोरे जाण्याचे भान आले आहे, असे समजून आपल्याला नेटाने पुढे जाणे आहे. बाकी, लॉकडाऊन आणि त्याचा जनजीवनावर झालेले परिणाम आपण विविध माध्यमातून समजून घेत आहोत, पाहातही आहोत. गरीब-मजूर यांच्या वाटेला आलेल्या दु:खाबद्दल कोणताच युक्तीवाद करता येत नाही ते दु:खदायकच होतं. बाकी, ”रोम जळत होते तेव्हा निरो फ़िडेल वाजवत होता” ही गोष्ट नव्याने समजून घेत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

”रोम जळत होते तेव्हा निरो फ़िडेल वाजवत होता” ही गोष्ट नव्याने समजून घेत आहे. शेवटी एकदा पंतप्रधांनाबद्दल पिंक टाकल्या शिवाय आपला दिवस जात नाही का? आज जर मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर अशीच पिंक आली असती का? अनलॉक 1.0 बद्दल बोललं तर बरं नाही का?

In reply to by चौकस२१२

त्यांना पंप्र ऐवजी मा मु अभिप्रेत असतील तर? किंवा ह्यापैकी कोणीच अभिप्रेत नसतील तर? त्यांनी तर कोणाचेच नाव घेतले नाही, तुम्ही मात्र उगाच मोदी मनमोहन आणताय असे दिसते.

In reply to by प्रचेतस

”रोम जळत होते तेव्हा निरो फ़िडेल वाजवत होता” हे कोणाला उद्देशून हे समजायला (भारताच्या संधर्भात ) याला किती अक्कल लागते? ए सकाळ मधील ब्रिटिश नंदी किंवा श्रीराम पवार यांच्या लेखासारखे आहे .. कितीही चांगले देशात घडले असले तरी शेवटी सद्य सरकार वर घसार्याचे.. फुस्कुलाय टाकत

In reply to by चौकस२१२

तुम्हाला जसं वाटतंय देशात चांगलं घडतंय आणि तुम्ही तुमचं मत देखील मांडत आहातच, त्याचप्रमाणेच एखाद्याला वाटत असेल देशात चांगलं घडत नाहीये आणि ती व्यक्तिदेखील तसंच त्यांचं मत मांडत आहेच. व्यक्तिगत न होता हे मांडायला तुमची काही हरकत आहे काय? शिवाय एखाद्याने न उच्चारलेले शब्द उगा त्यांच्या तोंडी तुम्ही घालताहेत असे वाटते.

In reply to by प्रचेतस

माफ करा प्रचेतस पण श्री बिरुटे यांनी लिह्लेलाय १.० वरील लेखनात उगाचच शेवटी अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधानांचाच उल्लेख केला तो सुद्धा उपहासाने म्हणून मी पिकं टाकणे हा शब्द वापरला जसे कोणाला मी मोदींचा आंधळा "जुंपलेला " भक्त आहे असे वाटते तसेच मलाही बिरुटे हे एकतर्फी लिहितात असे वाटते .. खास करून साध्यासाह्य जगभर अवघड असलेल्या परिस्थितीत नाही नाही माझेच चुकले ”रोम जळत होते तेव्हा निरो फ़िडेल वाजवत होता” हा "निरो" बहुतेक गांधी किंवा पवार असावेत .. कारण ३०३ मिळून त्यांचेच राजय आहे ना सध्या ( हे उपरोधाने लिहिले आहे )

In reply to by चौकस२१२

माझं इतकंच म्हणणं आहे की, जसं तुम्हाला त्यांचं लिहिणं एकतर्फी वाटू शकतं तसंच त्यांनाही तुमचं लिहिणं एकतर्फी वाटू शकतंच. अर्थात जोपर्यंत कुणीही वैयक्तिक होत नाही तोपर्यंत त्या एकतर्फी वाटण्यालाही काही हरकत नसावी.

In reply to by प्रचेतस

खुलासा देतो प्रचेतस .. मी कुठे म्हणतोय कि सध्या सगळं देशात चांगला घडतंय श्रीराम पवार आणि ब्रिटिश नंदी यांचा संधर्भ फक्त सध्याच्या परिस्थितील त्यांचे लेख नसून एकूण २०१४ पासूनचे जे लिखाण आहे त्याबद्दल आहे .. आपण जणू अर्थ काढलात कि मी आत्ताचेच फक्त म्हणतोय "शिवाय एखाद्याने न उच्चारलेले शब्द उगा त्यांच्या तोंडी तुम्ही घालताहेत असे वाटते." म्हणजे ते निरो वैगरे... काय बोलणार! मग कोणाला उद्देशून हो ते ? तुम्ही समजावून सांगा किंवा सरळ ज्यांनी लिहिले ते सांगतील मेक इन इंडिया चे आव्हान याबद्दल ची चर्चा आठवा मिपावरची... नेहरू काळा पासून चालू आहे ती कल्पना .. ती आत्ताच्या सरकारने आणली परत तर लगेच चुकते! .. असे दर्शवणारे लिहितात जेवहा लोक तेव्हा हे किती "केवळ विरोध साठी विरोध " आहे आणि फोल आहे ते ज्याने उत्पादन क्षेत्रात काम ़केलाय त्याला वाटते म्हणून प्रतिक्रिया देतो

In reply to by चौकस२१२

मला खुलासा देऊ नका हो, मी तो मागितलाही नाहीये. बाकी श्रीराम पवार किंवा ब्रिटिश नंदीचं तुम्ही उदाहरण देतात त्याचप्रमाणे भाऊ तोरसेकर किंवा अर्णब विषयी का बोलत नाहीत, त्यांचे लेखनही कुण्या एकाच पक्षाला धार्जिणे असतेच की. बाकी ते निरो फिडल रोम कशावर अभिप्रेत आहे हे त्या प्रतिसादकर्त्यालाच ठाऊक. तुम्ही मात्र ते नाहक मोदींवर ओढवून घेताय असे दिसते. मी राजकीय चर्चांत कधीच नसतो मात्र हल्ली समर्थकांचे खूपच एकांगी प्रतिसाद दिसतात. विरोध असावाच मात्र तो वैयक्तिक पातळीवर जाऊ नये इतकेच.

In reply to by प्रचेतस

परत लिहितो पण तुम्हीच म्हणाल खुलासा मागितलं नवहता अर्णब बद्द्दल मत : अतिशय घाणेररड्या पद्धतीने हा माणूस लोंकाच्या मुलाखती घेतो... नुसता ओरडतो . समोरच्याला बोलू देत नाही, हा कसलं पत्रकार भाऊ तोरसेकर: जास्त संतुलित असतात ... "रोम " ़अभिप्रेत आहे हे त्या प्रतिसादकर्त्यालाच ठाऊक. तुम्ही मात्र ते नाहक मोदींवर ओढवून घेताय असे दिसते. वाह हा खास न्याय .. मी ओढवून घेतोय... निरो कोण होता? सध्याचा संधर्भ काय ..कोणीही सांगू शकेल कशाला बाजू घेता राव .. "हल्ली समर्थकांचे खूपच एकांगी प्रतिसाद दिसतात." हो ना मला हि असे वाटत "हल्ली सरकार विरोधकांचे सुद्धा खूपच एकांगी प्रतिसाद दिसतात"..खास करून सध्याच्।ञाआ संकटात कुचकामी असे . विरोध असावाच मात्र तो वैयक्तिक पातळीवर जाऊ नये इतकेच.... काय बोललोय मी असे? , उलटे श्री प्रोफेसर यांचेबरोबर जेव्हा "आत्मनिर्भर आणि मेक इन इंडिया" वर चर्चा चालली होती तेव्हा चांगल्या हेतूने आव्हान केले कि आपल्या (शिक्षण ) क्षेत्रातील काही सुचवा ज्याने भारताला फायदा होईल . उत्तर तर नाहीच दुसरेच काही .".सरकारे ने काय दिले पाहिजे हे तुणतुणे " ( याही क्षेत्रात अनुभ होता म्हणून बोललो नाही तर कशाला उदाहरण देईन? माझे वडील एक इंजिनीरिंग कॉलेज ( साखर कारखानदारीच्या मालकीचे ) चे मुख्य होते त्यांनी केलं मेक इन इंडिया चा प्रयत्न जेणेकरून भारताला पैसे मिळेल ,, आखाती देशातून विद्यार्थी आणण्याचाच प्रयतन वैगरे ़केले मोदिन्च्यआ आधि ) आणि वैयक्तिक पातळीवर डॉक्टर खरे आणि इतर जे थोडी सरकरची बाजू घेतात किंवा असे म्हणतात कि "अरे जरा सगळ्या बाजू बघा " त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका होत नाही. लगेच भक्त ! लेबल लावतात ! अरे कसलं भक्त हे घ्या फॉर द रेकॉर्ड - मोदीची व्यक्तिपूजा हि लोकशाहीत कोण्ही करू नये ते चुकीचे आहे - मोदींचा "चमको" पण जरा जास्त होतंय ( सगळ्या राष्ट्राध्यक्षांना मिठी मारणे, गुहेत ध्यानाला गेल्याचा इव्हेंट होणे - करणे किंवा करू देणे अजूनही नकारात्मक आहे पण ते त्यांच्यापेक्षा त्यांना उगाच डोक्यावर घेणारी लोकांबद्दल जास्त आहे, असो

In reply to by प्रचेतस

पंप्र असो की मा.मु. बासर्‍या कोण वाजवताना आणि केव्हा आढळले ? त्यांनी त्यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय आरोग्य सेवेतील तज्ञांचे सल्ले कसोशीने पाळले. शेवटी भारतात किंवा महाराष्ट्रात लॉक डाऊन कुणासाठी होते ? ज्यांच्या पर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचणे कठीण आहे तिथे आजार पोहोचू नये यासाठी प्रयत्न होता. पं.प्र आणि मा.मु. यांनी प्लानिंग मध्ये वेळ घालवून विलंब केला असता तरी त्यावर टिका झालीच असती किंबहुना तशी ती केलीही पाहिजे कारण मुंबईतील लोकलसेवा सार्वजनिक ट्रान्सपोर्ट इत्यादी गोष्टी बंद करण्यास अक्षम्य विलंब झाला. आठवडी बाजार आणि जिवनावश्यक वस्तुंचे मार्केट नेमके कसे काम करते आणि तिथूनही शक्य वीषाणू प्रसारा बद्दल शेवट पर्यंत नीटशी चर्चा झालेली दिसलीच नाही. जिवनावश्यक वस्तुंच्या बाबतीत लॉकडाऊन एवजी उपलब्धता कालावधी अधिक असतातर लोकांनी गर्दी कमी केली असती का ट्रान्स्पोर्टचे रेट वाढवून प्रश्न हलका करता आला असता असे पश्च्चात प्रश्न बरेच रहातात पण कोणतीही शासन व्यवस्था सहसा स्थुल व्यवस्थापन करते सुक्ष्म व्यवस्थापन हा त्यांच्या सहज कौशल्याचा भाग असत नाही. फार तर एरर ऑफ जजमेंट अशी टिका पंप्र मामुंवर करता येईल. स्थलांतरीतांसाठी भारतात कुठेही रेशन घेण्याची व्यवस्था का नाही याचे उत्तर भूतकाळातील राजकारण्यांना विचारावी लागेल ती क्षणार्धात उभी करणे कोणत्याही व्यवस्थेस शक्य नव्हते. पण तरीही जिथे माहिती मिळेल तिथे राज्य आणि केंद्र शासनाने व्यवस्था केली. योगी अदित्यनाथांनी डझनभर आय ए एस अधिकारी परराज्यात स्थलांतरीत होऊन गेलेल्यांच्या समस्या ऐकुन संबंधीत राज्यसरकार यंत्रणांशी संपर्क साधून सुविधा पुरवण्यासाठी लावले. सगळेच अन्नानदशे मुळे वापस गेले का ? केरळातून आलेल्या नर्सेस लॉकडाऊन उठला की का वापस गेल्या ? बेसिकली वीषाणू कसा पसरतो या बद्दल अनभिज्ञ लोकांनी वाढवलेले भावनिक दबावामुळे घाबरुन बरेचसे स्थलांतर झाले. माध्यमांकडून महामारीच्या बातम्या दिल्या जात होत्या त्यापेक्षा अधिक विवीध भाषी डॉक्टरांशी संवाद झाला असता तर लोकांना वीषाणू प्रसार म्हणजे काय आणि आपल्या गावी वापस जाण्याच्या ह्ट्टाने तो तिकडे पसरण्याच्या शक्यतेचे गांभीर्य समजले असते ते गांभीर्य समजून देण्यात कोणतीच जबाबदारी निभावायची नाही मांडीवर मांडी ठोकुन सरकारात असलेल्याच्या नावे नुसतीच खडेफोड करण्याबद्दल साशंकता वाटते.

In reply to by चौकस२१२

हे चौकस आणि खरे ला मोदी Hysteria झाला आहे. ओढून ताणून कोणत्याही प्रतिसादाचा संबंध मोदी विरोधाशी जोडुन बाकी आयडिंना नाक्यावरचा, librandu अशी लेबलं लावाण्याच्या कामाला जुंपले आहे.

In reply to by झम्प्या दामले

श्रीयुत झम्प्या मोदी किंवा कोणाचा हिस्टेरिया होण्या एवढे ना मी, ना डॉ खरे एवढे झूल लावून चालणारे बैल आहोत " ... बघा मोदींनी काय चांगले केले अश्या प्रकारची सुरवात मी तरी केलेली आठवत नाही आणि तास हेतू हि नाही इथे तिथे सतत कसाही करून सरकार आणि मोदी आणणारे नकारात्मक लिहिणे होते त्याला आलेली प्रतिपक्रिया

१) काल गाडीतून फेरफटका मारुन आलो अणि २) जाणवले की शहर मुक्त वाहात होते. यातच सर्व काही आले की सगळे तुमच्या सार्खेच फेरी मारायला बाहेर पडले असणार… त्यांना दोष का देताय मग…

In reply to by आंबट चिंच

आपलं म्हणनं बरोबर आहे, किराणा होता गाडीत म्हणून थोडंसं पुढे चक्कर मारुन आलो. विनाकारण बाहेर पडणार नाही, शब्द देतो सर आपल्याला. -दिलीप बिरुटे

In reply to by आंबट चिंच

आता ऑफीस उपस्थिती काही टक्क्यांवर सुरु होत आहे, कर्फ्युची वेळही बदललेली आहे. काही दिवसांनी शाला कॉलेजेस सुरु होतील. हळुहळु आता जीवनमान सुरुच होत आहे ना ? सकाळी फिरायला परवानगी दिली, समविषम अटीवर दुकाना सुरु होत आहे, लोक बाहेर पडतीलच अनलॉक वनमधे काळजी घेऊन वावरणे हेच आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हालाही आता दिवसाआड ऑफिसला जावं लागतंय, सर्व प्रकारची काळजी घेतोच आहे. बाईकवरच जात असल्याने फिजिकल डिस्टनसिंग आपसूकच पाळल्या जातंय. १५% इतकीच ऑफिसात एकूण उपस्थिती असल्याने तिथंही प्रश्न नाही.

In reply to by प्रचेतस

आमच्याकडे कॉलेज सुरु होतील तेव्हा परिक्षेचा घोळ सुरु होईल असे दिसते. अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या विद्यार्थ्यांना बाकीच्या सत्रपरिक्षांच्या गुणांवरुन पुढे पास करायचं हे धोरण ठरत होतं की आज बातम्यात वाचले की राज्यपाल म्हणतात, युजीसी म्हणाले परिक्षा घ्या तर परिक्षा झाल्याच पाहिजे. युजीसी शैक्षणीक क्षेत्रातली सर्वोच्च संस्था आहे, त्यांनी विद्यापीठांना परिक्षा घ्या असे सांगितले होते. विद्यापीठांनी परिक्षा घ्यायला पाहिजे होत्या. मंत्रीमंडळ-मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतात की सध्याच्या काळात परिक्षा घेऊ शकत नाही. आता विद्यार्थी परिक्षांसाठी येतील तेव्हा त्यांची व्यवस्था, काळजी आणि इतर प्रश्न निर्माण होतील. असा सर्व घोळ आहे सध्या. परिक्षा विषयावरही राजकारण सुरु आहे. शाळा सुरुवातीला ऑनलाईन सुरु करा असे म्हणत आहेत. एकूण्च सर्व हळुहळु सुरु व्हायला पाहिजेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी पुढील दिवस अधिक काळजीचे आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्याच्या काळात परीक्षा घेणे हे खरोखरंच शक्य नाही, राज्यपाल महोदय उगीच परीक्षा रेटून न्यायला बघतात असे वाटते. ग्रेडिंग पद्धत सर्वत्र अमलात आली असती तर हे घोळ टळले असते असे वाटते. क्युम्युलेटिव्ह ग्रेडिंगमुळे अंतिम परीक्षेला फारसा अर्थ राहत नाही. शिवाय बहुसंख्य ठिकाणी cgpa च ग्राह्य धरतात.

In reply to by प्रचेतस

परीक्षा न घेणे हा अभ्यासु , कष्टकरु आणि ओपन कॅटेगरीतील मुलांवर अन्य्याय आहे ! मला स्वतःला बी एस स्सी ला फर्स्ट यियर ला ७९ , सेकन्ड ला ८४ आणि थर्ड ला ९२ टक्के होते . थर्ड यियर चा पर्फॉर्मन्स मुळे मि विद्यापिठात १० वा येऊ शकलो नाहीतर पहिल्या २०-३० मध्ये येण्याचाही योग नव्हता ! ओपन कॅटेगरीतील मुलांसाठी स्पर्धा अक्षरशः कट थ्रोट असते , एकेक गुण महत्वाचा असतो . आयायटीच्या ज्या कोर्स मध्ये मला अ‍ॅडमिशन घ्यायची होती त्यात केवळ ८४ जागा होत्या अन सर्व रिझर्वेशन पकडुन तब्बल ४२ जागा लॉक्ड होत्या त्यामुळे अख्ख्या देशात पहिल्या ४६ मध्ये येणे भाग होते , मी ६६ वा होतो, मि किती रडलोय तेव्हा माझं मला माहीत आहे ! असो. ओपन कॅटेगरीतील मुलांसाठी किमान ऐछिक का होईना पण परीक्षा असाव्यातच भले आयुश्यातील ६ महिने किंवा १ वर्ष वाया गेले तरी बेहत्तर असे माझे वैयक्तीक मत आहे! बाकीच्या विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन डीग्री द्यायला माझी काहीही हरकत नाही ! कोणतेही राजकारण नाही , कोणावरही टीका टीप्पणी करायची इच्छा नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

आपल्यावेळी टक्केवारी पद्धत होती आणि शेवटच्या वर्षातील टक्क्यांना खूप महत्व असे, मात्र आता परीक्षा पद्धत वेगाने बदलत आहे. बऱ्याच विद्यापीठानी आता CGPA पद्धत आत्मसात केली आहे, ह्या पद्धतीत शेवटच्या वर्षातील टक्केवारीला फारसा वाव नाही किंबहुना परिक्षेलाच फारसा वाव नाही. परीक्षा, सतत वेळोवेळी होणाऱ्या असेसमेंट्स, प्रोजेक्ट्स, हजेरी, बिहेवीयर वगैरे सर्वच फॅक्टर ह्या गुणपद्धतीत धरले जातात. त्यामुळे फायनल ग्रेडिंग हे तुमच्या ३/ ४ वर्षातील एकंदरीत सर्व गुणांकावर ते आधारित असते. काही विद्यापीठे अजूनही जुनीच टक्केवारी पद्धत वापरत आहेत त्याच विद्यार्थ्यांना हा परीक्षा न घेतल्याचाफटका बसू शकतो.

In reply to by प्रचेतस

किंबहुना परिक्षेलाच फारसा वाव नाही. परीक्षा, सतत वेळोवेळी होणाऱ्या असेसमेंट्स, प्रोजेक्ट्स, हजेरी, बिहेवीयर वगैरे सर्वच फॅक्टर ह्या गुणपद्धतीत धरले जातात.
बापरे हे असं असेल तर खरेच अवघड आहे. परीक्षेला अर्थच नाही काही ! असे असल्यास कशाला हव्यात परीक्षा ? मी तुमच्या मताशी सहमत आहे मग परीक्षा नकोतच ! पण हे म्हणजे आपल्या ऑफीसात बोनस अन सॅलरी रेज देणे जसे बॉस च्या हातात असते तसे काहीसे झाले . शिक्षकांची , डिपार्टमेन्टची मर्जी राखली की झाले ! ह्या लॉजिक ने मी विद्यापिठात करेक्ट ४था येऊ शकलो असतो ;) अवांतर : पण असल्या शिक्षणाला काय अर्थ ? ही अशी पास झालेली पोरं स्पर्धात्मक जगात कितपत टिकु शकतील ? अवघड आहे एकुणच .

In reply to by प्रसाद गोडबोले

नेहमीच्या टक्केवारी पद्धतीपेक्षा ही श्रेयांक पद्धती खूपच चांगली आहे, आणि सध्या हीच जागतिक स्तरावर वापरली जाते.

In reply to by प्रचेतस

बाईकवरच जात असल्याने फिजिकल डिस्टनसिंग आपसूकच पाळल्या जातंय.
म्हणजे एनफिल्डवर धक धक आवाज करत मुसळधार पावसात प्रचेतस सुसाट राईड करणार. आणि तेही एकटे? मागे कोणीही नाही? आणि कोणी आपलं माणूस मागे चिकटून बसले असल्यास सोशल डिस्टनसींग कसे बुवा मेंटेन होईल (फार काळ)? विश्वास नाही बसत.

In reply to by टवाळ कार्टा

Jugad साइड कार म्हटले तर फक्त एकच बसेल यात अनेक दर्पणसुंदर्‍या बसु शकतील चित्र अर्थात अंजवरुन साभार.. पैजारबुवा,

स्वतः पॉझिटिव्ह विचार ठेवून कोरोना पॉझिटिव्ह ना होणे हा फार मोठा चॅलेंज आहे... परत कडक लोकडोवन ६.०० आणण्याची वेळ येऊ नये हीच प्रार्थना

सर्व व्यवहार मूळपदावर यायला हवेत... पण हे जितक वाटतं तितक सहज आणि सोप्पे असेल का ? माझ्या मनातील काही मुद्दे :- १] हल्लीच्या कंपनी कार्यालयात क्युबिकल सिटिंग अरेंजमेंट असते, मग तिथे सोशल डिस्टंसिंग कसे पाळता येणार ? २] बहुतेक इमारतींच्या कार्यालयात खिडक्या उघडण्याची सोय नसतेच व सेंट्रलाइझ एसी द्वारे वायुविजन होत असते... या एसीच्या वार्‍याचा झोत वेगवान देखील असतो, मग यामुळे व्हायरस संपूर्ण फ्लोअरवर पसरु शकतो का ? ३] कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझर इं पुरवतील का ? [ स्मॉल स्केल उध्योगांना ते सध्य स्थितीत आर्थिक दृष्ट्या परवडु शकेल का ? ] ४] कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना कंपनीतच इन्फेक्शन झाल्यास कुठल्या प्रकारची जवाबदारी घेतील किंवा मदत करतील का ? ५] आता पावसाळा सुरु झाला आहे, हा काळ व्हायरस पसरण्यास अधिक पोषक ठरु शकतो का ? ६] साउथ कोरिया, इरान आणि इराक इथे लॉक डाउन मध्ये ढिलाई दिल्यावर सेकंड व्हेव्ह स्प्रेड झाल्याचे आढळुन आले आहे, मग आपण त्यातुन काय शिकु शकतो किंवा किती कठोर उपाय योजना गरजेचे आहे ? हे आपल्याला कसे कळेल किंवा शिकता येइल ? ७] आत्ता पर्यंत जवळपास मुंबईत जवळपास ७ डॉक्टरांचा जीव कोरोना संक्रमणामुळे गेला आहे, याचा अर्थ परिस्थिती गंभीर असुन आपण जीव वाचवणार्‍या देवदुतांचेच मृत्यू होताना पाहत आहोत, याचा अर्थ परिस्थिती अजुनही गंभीर आहे ! व्हायरसचे उगम स्थान असलेल्या चीन ने काय काय गाइड लाइन्स त्यांच्या इथे राबविल्या आहेत ते खालील व्हिडियोतुन समजेल. :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Scientific Study on Chanting Gayatri Mantra - Benefits of Gayatri Mantra

१] हल्लीच्या कंपनी कार्यालयात क्युबिकल सिटिंग अरेंजमेंट असते, मग तिथे सोशल डिस्टंसिंग कसे पाळता येणार ?>>>>>>> १०% उपस्थिती किंवा १० जण त्यामुळे एका cubicle मध्ये एक पुढचे रिकामे मग परत एक असे --पण हे त्रासदायक होऊ शकते त्यापेक्षा WFH continue करावे जिथे परवडत असेल तिथे खाजगी/IT कंपन्यांना WFH लांबवायला सांगायचे होते (ऑफिस चे भाडे वगैरे मुद्दे असतील तर कंपन्या चालू करण्याच्या मार्गावर असतील ) २] बहुतेक इमारतींच्या कार्यालयात खिडक्या उघडण्याची सोय नसतेच व सेंट्रलाइझ एसी द्वारे वायुविजन होत असते... या एसीच्या वार्‍याचा झोत वेगवान देखील असतो, मग यामुळे व्हायरस संपूर्ण फ्लोअरवर पसरु शकतो का ?>>>>>>>> याचीच भीती आहे AC बंद ठेवावे लागतील ३] कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझर इं पुरवतील का ? [ स्मॉल स्केल उध्योगांना ते सध्य स्थितीत आर्थिक दृष्ट्या परवडु शकेल का ? ] एक कॉमन सनिट्झर पुरवू शकतील मास्क चे नाही सांगता येणार ४] कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना कंपनीतच इन्फेक्शन झाल्यास कुठल्या प्रकारची जवाबदारी घेतील किंवा मदत करतील का ? कंपनीवर अवलंबून आहे आणि कर्मचाऱ्याच्या श्रेणीवर (दुर्दैवाने ) ५] आता पावसाळा सुरु झाला आहे, हा काळ व्हायरस पसरण्यास अधिक पोषक ठरु शकतो का ? पावसाळ्यात रस्त्यावर थुंकण्याचे प्रमाण वाढते मी स्वतः दुचाकीवरून येता जाता हे बघितले आहे उन्हाळ्या-हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात रस्त्यावर थुंकण्याचे प्रमाण जास्त असते (ते पाण्यात वाहून जाते म्हणून लोक कसेही वागतात) त्यामुळे पावसाळ्यात जास्त सतर्कतेची गरज आहे IT क्षेत्र व जिथे WFH ला काही अडचणी नाहीयेत तिथे WFH अजून वाढवावे असे वाटते त्याने गर्दी पर्यायाने रोगप्रसार कमी होईल एकंदरीतच अनलॉक १. ० साठी घाई करत आहेत असे वाटते

In reply to by Prajakta२१

6 June 2020

एकंदरीतच अनलॉक १. ० साठी घाई करत आहेत असे वाटते.

देशातील लॉकडाऊन अभ्यास करणार्‍या सामाजिक संस्थेसाठी संशोधनाचा विषय आहे. अनलॉक केव्हा करायला पाहिजे हेही आपल्या हातात नाही, तो ही अभ्यासाचाच विषय आहे. आत्ताची परिस्थिती योग्य आहे, असे म्हणायला आपल्याकडे फार आशादायक आकडेवारी नाही. आपण आता सुरक्षित आहोत असे केवळ समजून चालायचे आणि आपला वावर करायचा. आपल्या आजूबाजूचा हा बाधीतच आहे असा संशय घेऊनच यापुढे आपल्याला वाटचाल करायची आहे, अशी वाटचाल पूर्वीपासून आपली सुरुच आहे. आज सहा जूनचा आलेख पाहता तो अजून वरवरच चालला आहे असे दिसते. महाराष्ट्र सरकारचा रिपोर्ट पाहता रुग्ण संख्या वाढतच आहे, असे असले तरी असे म्हणू की मरणाच्या थप्प्या लागणार होत्या, दवाखान्यात भारतात रुग्णांना जागा मिळणार नाही, असे जे चित्र मिडियात होते ते तरी आज तरी दिसत नाही. भविष्यातलं माहिती नाही. मिडियाने प्रचंड भीती निर्माण केली होती त्या तुलनेत परिस्थिती बरी आहे असे समजून आपण आपले दिवस काढायचे. बाकी, आपण सर्वच देवाला प्रार्थना करुया की हा कोरोना नुसता भारतातूनच नव्हे तर जगातून जाऊ दे, आज शनिवार तेव्हा आलोच देव्हा-यातल्या देवाला दिवा-बत्ती करुन.

-दिलीप बिरुटे

तुळशीबाग,मंडई ,हॉंगकॉंग लेन चालू मंडईत गर्दी झाल्याचे बातम्यात सांगत होते नेहमीप्रमाणेच सोशल डिस्टंसिन्ग चा फज्जा अशी line सांगत होती निवेदिका पण चित्रात एवढे नाही दिसले हॉंगकॉंग लेनमध्ये p १/p २ असले तरी दुकाने एवढी खेटून आहेत त्यापेक्षा एक आड एक दुकाने उघडावीत (समोरासमोर पेक्षा )

आपल्या आजूबाजूचा हा बाधीतच आहे असा संशय घेऊनच यापुढे आपल्याला वाटचाल करायची आहे,>>>>>>>>>> असेच काहीसे वाटत आहे प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मुंबई आणि इतर ठिकाणी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, मुंबईचीच जर ही भयावह स्थिती असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी ! मुंबई महानगर पालिकेची कोट्यावधीची फिक्स डिपॉझिटस [ जवळपास 66,958 कोटी ]आहेत पण रुग्णांवर उपचार करण्यासाठी मात्र धड हॉप्सिटल्स नाहीत ! हे फिक्स डिपॉझिट मधले पैसे आता जनतेच्या सेवेसाठी वापरण्यास काय अडथळा आहे कोणास ठावुक ! राजकारणी सतत सांगतात हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हाच का तो ? खाजगी हॉप्सिटल्स तर लुट करत असुन त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण उरले नसुन त्यांना कोणताच धाक नाही ! मध्यंतरी व्हॉट्सअपवर मुंबईतील एका नामांकित हॉस्पिटलचे बिल व्हायरल झाले होते, एका दिवसाच्या उपचाराचे बिल होते जवळपास साडे चार लाख रुपये ! ही हॉप्सिटल्स राहिली नसुन सामान्य नागरिकाच्या कष्टाच्या पैशावर दरोडा टाकायची केंद्रे झाली आहेत, इथे जगणे कठीण आणि मरणे महाग झाले आहे ! अशीच एक ९ लाखाच्या बिलाची बातमी :- अशीच अजुन एक बातमी... या सर्वाच्या पलिकडील खालील बातम्या :- कोरोना पॉझिटिव्ह सहा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांकडून यादी जाहीर शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोना रुग्ण बेपत्ता, मृतदेह बोरिवली स्टेशनजवळ सापडला

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kum

बापरे लवकर जग करोनामुक्त व्हावे हीच प्रार्थना न्यूझीलंड झाले आहे पण तो वेगळा विषय आहे भारतात हे असेच चालू राह्यची शक्यता जास्त आहे हे कटू सत्य आहे दिवसागणिक अशा बातम्या वाढत आहेत इतर ठिकाणी आवेशपूर्ण भाषणांपेक्षा व्यावहारिक उपायांवर भर दिला आहे शेवटी देवाक काळजी

In reply to by Prajakta२१

शेवटी देवाक काळजी
''कोरोना को हराना है'' पासून सुरु झालेला आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा रोचक प्रवास हळुहळु ''कोरोना के साथ जीना है'' आणि आता त्याच्या पुढील व्हर्जन म्हणजे ''शेवटी देवाक काळजी'' रे बाबा इथपर्यंत येऊन ठेपला आहे. माझा देव वगैरे अशा काही चमत्कारिक गोष्टींवर विश्वास नै ये पण ही कोरोनाची बला जून एंडला गेली गेली तर आमच्या गावातल्या मारुतीला मनोभावे नमस्कार करुन येईन. हाय काय आणि नाय काय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोरोना वाटतो तितका भयंकर नाही असं पटवून घेत असताना उलट सुलट बातम्या येतात. आजूबाजूला काही दिसतं, ऐकू येतं आणि पुन्हा तो गंभीर वाटू लागतो. सध्या पूर्वीप्रमाणे रोजचं काम पुन्हा सुरू करणं आणि जे होईल ते सहन करणं हाच मार्ग उपलब्ध आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवाक काळजी याबद्दल, मुन्नाभाई mbbs मधून वाक्य उधार घेऊन: डॉ. सुमन: खुदा ने चाहा तो सब ठीक हो जायेगा। जहीर: खुदा क्या चाहता है ये तो जाहिर है।

अनलॉकचा हेतू होता हळुहळु आणि सावधगिरी बाळगून जनजीवन पूर्ववत करणे.सध्या मात्र दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे. मृत्युचंही प्रमाण वाढतच आहे. काळजी घेऊन वावरणे हेच आपल्या हातात आहे. रुग्णालये, रुग्णालयातील लूट हेही नवीन प्रश्न समोर आले आहेत. आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात पहिला रुग्ण पंधरा मार्चला सापडला होता आज दहा जून आहे, आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या रुग्ण संख्या बावीसशेच्या आजपास आहे. तर अ‍ॅक्टीव्ह केसेस नऊशेच्या जवळपास आहेत. लॉकडाऊनमधेही केसेस वाढतच होत्या अनलॉक मधेही केसेस वाढत आहेत हे सत्य आहे, ही परिस्थिती सर्वत्रच आहे. आपण सर्वांनी काळजी घेऊन वावरणे यातच आपलं भलं आहे. केंद्रसरकार आणि राज्यसरकारही आता मरगळलेल्या अवस्थेला आले आहेत, उपाययोजना कराव्यात तर कोणत्य कराव्यात असे प्रश्न त्यांच्यासमोरही उभे असावेत. सध्या तरीआपली जवाबदारी इतकीच की काळजी घेणे. अजिबात बेफिकीर न राहणे. रुग्णालयात होणार्‍या हेळसांड आणि असंख्य गोष्टी आपल्यासमोर येत आहेत.सर्वांनी स्वतःला जपावे. -दिलीप बिरुटे

समयोचित धागा आणि उपयोगी चर्चा. गेले दोन महिने आम्ही उभयता (वय ६८ आणि ६४) घराची साफसफाई - भांडी वगैरे स्वतः करत आलो. मात्र काही दिवसांपासून झाडू पोछा आणि भांडी घासणे यासाठी येणार्‍या मुलीला परत येऊ देत आहोत. मुलगी मुस्लिम असून त्या सहा - सात बहिणी , त्यांचे आईवडील हे एका लहानश्या घरात रहातात. सगळ्या मुली ( वय ६-७ ते २०) विविध घरात काम करतात. मात्र आपण हे योग्य करत आहोत किंवा कसे याबद्दल संभ्रम आहे. खरेतर आम्ही अजुनही ही कामे करू शकत आहोत, पण उन्हाळ्यात जरा थकायला होते म्हणून सुरू केले. यावर मिपाकरांचे मत काय आहे ?

In reply to by चित्रगुप्त

सकाळपासून तीनदा प्रतिसाद लिहायला घेतला आणि तीनही वेळा ठेवून दिला. कन्फ्युज म्हणून. बाकी, अधिकृत सांगायला मी काही जाणकार नाही. पण, काळजी म्हणून माझं मत असं की, काही दिवस तुम्ही तुमचं करुन घ्यावे असे वाटते. सदरील कामवाली मुलगी कोणाच्या बाधीत रुग्णांच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे तसा काही धोका नाही. पण ते वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करुन येतात म्हणून आपल्या मनात तसे विचार येतात. पण सध्या आपलं मन निसंशयी, उत्साही आणि फीट राहण्यासाठी काही दिवस आपापल्या लेवलवर घरातल्या घरात सांभाळून काम करावे असे सुचवावे वाटते. आपण योग्य निर्णय घ्यावा. बाकी, बरेच दिवस झाले चित्रवजा लेख टाकला नाही, चित्र टाकत राहा आणि येत राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by चित्रगुप्त

यावर मिपाकरांचे मत काय आहे ?
माझ्यामते, झाडूपोछावालीला सध्या तरी येऊ देऊ नये... किमान डिसेंबरपर्यंत तरी.

In reply to by चित्रगुप्त

मुळातच भारतात स्वतःचे काम स्वतः करण्याचे प्रमाण कमी ( खास करून पुरुष घरातील कामे कमी करतात) त्यामुळे या कोविद संकटातून जर एक गोष्ट शिकण्यासारखी असेल तर ती म्हणजे 'निदान घरात तरी स्वावलंबन' आणि यात स्वयंपाकापासून ते संडास धुण्यापर्यंत ..किंवा स्वतः कपड्यांना इस्त्री करण्यापर्यंत ) अर्थात यावर असेही म्हणले जाते कि १) सगळेच जर स्वतःची कामे करून लागले तर अनेक लोकांचाच रोजगार जाईल....आणि दुसरे कि जी लोक अगदी उच्च पदावर आहेत त्यांनी भांडी घासण्यात वेळ घालावा कि आपल्या जबाबदारीचे काम पार पडावे ( कार्यालयातील काम घरी करणे इत्यादी) दोन्ही बाजू खऱ्या आहेत ,त्यामुळे याचा सुवर्ण मध्य कसा गाठावयाचा ?

लॉकडाऊन ते अनलॉक वन चे फायदे कोणी समजावून सांगेल काय ? रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत आहेत, नशीब असे की रुग्ण बरेही होत आहेत ही त्यातली बरी बातमी असते अशात. बाकी, मृत्युचं प्रमाण कमी आहे तरी लॉकडाऊन वन ते अनलॉक वनमधेही आपण फिजिकल डिस्टेन्स पाळायचं हेच शिकत होतो आणि आता अनलॉकवन संपत असतांनाही तेच आहे, तर एकूण झालेला फायदा तपशीलवार विदा देऊन कोणी समजावून सांगेल काय ? बाकी, कोरोनाला आपण फार गंभीर घेत नै ये. भिती जरा कमी झाली आहे, हा फरक लॉकडाऊन ते आत्तापर्यंत वाटत आहे. तसेही, बरेच दिवस झालेत आदरणीय, माननिय, वंदनीय, यांनी एकदा टीव्हीवर येऊन सध्या काय परिस्थिती आहे हे सांगून एखादा सोपा 'टास्क' द्यायला पाहिजे असे वाटते. खूपच आठवण येत आहे. बाकी काय नाय. -दिलीप बिरुटे

अनेक ठिकाणी लॉक डाउन परत जाहिर झाला आहे, लॉक डाउन संबंधी उलट्या सुलट्या बातम्यांनी सामान्य नागरिक गोंधळुन जात आहे. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, अनेकांचा रोजगार उध्वस्थ झाला आहे तर अनेकांना एक वेळ जेवायला मिळायची भ्रांत झाली आहे. यात भर म्हणजे हॉस्पिटल सुविधांचा बोजवारा उडताना दिसत असुन अनेक हॉस्पिटल रुग्णांची लूट करत आहेत. अनेक डॉक्टर / पोलिस / आवश्यक सेवा पुरावणार्‍या लोकांचे प्राण सातत्याने जात आहेत. रोज नवी आकडेवारी डोळ्या समोर असते, कधी अमुक इतके रुग्ण बरे होउन गेले तर कधी अचानक बाधितांचा आकडा वाढुन यमलोकी पोहचलेल्यांची संख्या वाढताना दिसते ! यात भरीस भर म्हणुन सामान्य जनतेला वाढीव वीज देयकाचा शॉक बसला आहे. अर्थाजनाचे मार्ग खुंटताना महागाई मात्र भरमसाठ वाढताना दिसते, अगदी औषधांच्या दरा पासुन भाज्यांच्या दरा पर्यंत वाढच दिसत आहे.काही काळाने लोकांचा संयम सुटेल असे दिसते ! आठवड्याभरात भाज्यांच्या दरात मोठी वाढ डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील धक्कादायक वास्तव मुंबईतील करोनाबाधित निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयाकडून तब्बल २५ लाखांचं बिल

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi

अनलॉक ३.० च्या सर्वांना शुभेच्छा. काय नै आपण आपली काळजी घ्यायची. येता-जाता साबण-पाण्याने हात धुणे, फिजीकल डिस्टंनस, गर्दी टाळणे, बाजारात सारख्या वस्तू चिवडत बसणे टाळणे. भिती बाळगायची नाही, काळजी करायची नाही. रीलॅक्स राहावे. कुटूंबातल्या सदस्यांशी चीड चीड करायची नाही. वातावरण आनंदी, उत्साही ठेवायचं. तशी काही शंका आल्यास जवळच्या डॉक्टरांच्या सल्ला घ्यायचा. रुग्णालयात जाऊन रुग्ण बरे होतात. बाकी, आता सर्व परिस्थितीचे सिंहावलोकन केले असता असे लक्षात येते की प्रसार-माध्यमे आणि रात्रीच्या 'आकाशवाणीने' आपल्या मनात खुपच भिती निर्माण केली होती. आता आजूबाजूची परिस्थिती पाहता परिस्थिती तितकी भयंकर राहीलेली नाही. पण, येता जाता काळजी घ्यायची बस दुसरं काही नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by मराठी_माणूस

चिंता ये नही की करोना केस २३ लाखसे ज्यादा होग गए. चिंता ये है की साहब बता नही, रहे की अब बजाना क्या है. ;) -दिलीप बिरुटे

आजपासून जिल्हाअंतर्गत एसटी अर्थात लालपरी सुरु होत आहे, बावीस प्रवाशांना परवानगी प्रवासाची असेल. चला, हळुहळु जीवन करोना सोबत जगत जीवन पूर्वपदावर येत आहे, असे म्हणू या. पण, पायी चालत गेलेल्या, काही मरण पावलेल्या, आणि आयुष्यातून उद्ध्वस्त झालेल्या लोकांना असेच सोडले असते तर जे काही प्रश्न निर्माण झाले, ते झाले नसते असा विचार आज आला. सर्व प्रवाशांनी आपापली काळजी घेऊन प्रवास करावा. मास्क, सॅनिटायजरचा वापर, सारखं इकडे-तिकडे हातांचा स्पर्श टाळावे. नीट गपगुमान बसून राहावे. घरी गेल्यावर स्नान, कपडे वगैरे थेट साबणपाण्याने धुवायला टाकणे. आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायचीच. लशीचं काही नक्की होईपर्यंत आणि ती आपल्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला करोनासोबत वावरावेच लागेल. अर्थात करोना साथ जीना है, काळजी घ्यायचीच. दिवा-बत्ती आणि थाळ्या वाजवून काही होत नसतं, त्याच्या भरवशावर राह्यचं नै, त्याने काही होत नसतं. हॅव गुड्डे....! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो. आज सकाळीच ही बातमी वाचली. निर्णय निश्चितच स्वागतार्ह. एकच समजले नाही, बस मधुन प्रवास करणार्‍यांना इपास ची गरज नाही. मग ट्रॅक कसा ठेवणार.

In reply to by मराठी_माणूस

तेच लॉजिक समजेना. Epass इतर सर्व खाजगी वाहनांना कम्पलसरी आहे आणि ST ने मात्र कुठेही फिरू शकता. यामुळे फक्त एवढंच समजतेय कि येन केन प्रकारे ST चालू करून सरकारकडे पैश्याचा ओघ सुरु करायचाय. ST ने फिरलेल्या लोकांचे ट्रॅकिंग कसे होणार त्यांना QUARANTINE चे काय नियम असणार, लक्षणे असणारे कसे ओळखणार? कंडक्टर आणि ड्राइवर यांच्या सुरक्षेचं काय? आणि मग प्रश्न उरतोच कि खाजगी वाहनांना आंतरजिल्हा प्रवासा करता e pass ची सक्ती का? कोणी ठाकरे भक्त किंवा सोनिया सेना मेंबर जरा या गोष्टी समजवून सांगेल का??

In reply to by बाप्पू

हेच कोड मलाही पडलंय. एसटीत २२ लोकंच असणार आहेत. त्यामुळे पैश्यासाठी एसटी चालू केली असेल असं वाटत नाही. गणपतीत एसटी बंद ठेवणे राजकीय दृष्ट्या सोयीचे नसावे. इपासमुळे वरकड कमाई होते असं वाचल्याच आठवतं. तेच तर कारण नसेल?

In reply to by मराठी_माणूस

तसेच ते लोक जिथे जातील तिथे त्यांनी विलगीकरणात रहायचे का नाही ते ही स्पष्ट नाही.

नमस्कार, मित्रो, भाइयो और बहनो...अनलॉक चार शुन्यमधे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीने सावधगिरी बाळगून जगरहाटीचा प्रवास सुरु ठेवला तो पुढेही असाच सुरु ठेवावा लागेल. लशीचं अजून काही नक्की नाही. अधून मधून बातम्या येत असतात. पण, जेव्हा थेट लशीवाले आपल्या दारात येऊन टीका लगाना है क्या असे विचारतील तो पर्यंत आपण आपली काळजी घ्यायची. सॅनिटायजरचा वापर, येता-जाता साबणपाण्याने हात धुणे, मास्क लावणे, हँडग्लोवजचा वापर करणे. या सर्व गोष्टे आपल्याला बघायच्या आहेतच.
Unlock 4.0

आता यापुढे म्हणजे, २१ सप्टेंबर २०२० पासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर गर्दी संख्या १०० इतकी मर्यादेसह परवानगी देण्यात येईल. तथापि, अशा मर्यादित मेळावे अथवा गर्दीच्या ठीकाणी मास्क घालूनच परवानगी असेल. सामाजिक अंतर, थर्मल स्कॅनिंग आणि हात धुण्यासाठी किंवा सॅनिटायझरची तरतूद मागील पानावरुन पुढे सुरु राहील.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे की 30 सप्टेंबर 2020 पर्यंत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील आणि काही नियमित वर्ग अटी ठेवून चालू राहतील, जिथे आवश्यकता वाटल्यास तिथे . राज्ये / केंद्र शासित प्रदेश 50 % पर्यंत अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत एका वेळी ऑनलाईन शिकवणी, आणि संबंधित कामांसाठी बोलविण्याची परवानगी देऊ शकतात.

इयत्ता 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या कंटेन्ट झोन बाहेरील भागात, त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. हे त्यांच्या पालक / पालकांच्या लेखी संमतीच्या अधीन असेल. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मिशन किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर मंत्रालयांमध्ये नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेण्यास परवानगी असेल.

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (एनआयईएसबीयूडी), भारतीय उद्योजक संस्था (IIE) आणि त्यांचे प्रशिक्षण घेणार्‍यांना देखील परवानगी दिली जाईल. केवळ संशोधन (पीएचडी) आणि प्रयोगशाळा, प्रायोगिक कामांची आवश्यकता असलेल्या तांत्रिक आणि व्यावसायिक प्रोग्रामच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था यांना एमएचएशी सल्लामसलत करून उच्च शिक्षण विभाग (डीएचई) परवानगी राहील.

केंद्र सरकारच्या सल्ल्याशिवाय-परवानगीशिवाय, कोणतेही स्थानिक लॉकडाउन (राज्य / जिल्हा / उपविभाग / शहर / गाव पातळी) राहणार नाही. आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी / मान्यता / ई-परमिटची आवश्यकता नाही. अजून बर्‍याच गोष्टी आहेत, त्यासाठी अधिकृत केंद्रसरकारचे मार्गदर्शन पाहावे. (छायाचित्र इंडियाटूडेच्या सायटीवरुन साभार)

-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी / मान्यता / ई-परमिटची आवश्यकता नाही. प्रवास केल्यानंतर विलगीकरणाची गरज आहे किंवा नाही हे स्पष्ट नाही. बाकीच्या गोष्टी स्वागतार्ह.

In reply to by मराठी_माणूस

प्रवास केल्यानंतर विलगीकरणात राहीलं पाहिजे, असे काही दिसले नाही. कदाचित आज उद्या, महाराष्ट्र सरकार आपले अनलॉकच्या बाबतीत काही नवी मार्गदर्शक धोरणे जाहीर करतील त्यात तपशील येईल असे वाटते. सध्या तरी रुटीन नियमित नौकरीनिमित्त प्रवास करणार्‍यांना काही अडचण दिसत नाही, असे दिसते. आणि त्यांचा प्रवास सुरु आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by गणेशा

Gym चालू होणार आहेत का?
अनलॉक चार मधे जीमबद्दल स्पष्ट असे उल्लेख आढळत नाही. पण, २१ सप्टेंबरनंतर ज्या अर्थी सामाजिक उपक्रमांना (खेळ वगैरे) परवानगी दिली ज्यात शंभर लोकांपर्यंत परवानगी असेल तेव्हा त्याल जीमही खुले होईल असे वाटते. -दिलीप बिरुटे

लॉकडाऊन मधे आदरणीय.... वेगवेगळे टास्क द्यायला सारखे अधुन मधुन यायचे पण सध्या जरा कमी झालंय असे मला वाटते, असे कोणाला वाटतेय का ? की एखादा मोठा ब्रेक घेऊन मोठा टास्क देतील. बाय द वे, तो विषय प्रतिसादाचा नाही. आत्ताच कुठे तरी वाचलं की आता लॉकडाऊन अजून तीव्र होणार तर आणखी एक बातमी लगेच दिसली की अनलॉक ०५ मधे उपहारग्रुहे खुले होण्याची शक्यता आहे, हॉटेल व्यावसायिकांना मा.मुख्यमंत्र्यांनी काही अटी ठेवून जसे की पन्नास टक्के आसनक्षमता ठेवून वगैरे हॉटेल सुरु ठेवायला परवानगी देणार असे वाचले. तसेच, आताशी देशात दुसरी लाट सुरु होत आहे, तीव्रता आणखी वाढणार असेही वाचले. तसे पाहता आता लोकांची भिती कमी झालेली आहे. जे बेफिकिर वागायचे ते वागतच आहेत आणि जे काळजी घेत आहेत त्यांच्यातील काही अधुन मधुन संक्रमित होऊन बरे झाल्याचे वाचनात येत आहे. करोनाला आता साताठ महिने होत आहेत तरीही करोना कशामुळे होतो, वाढतो, उपाय काय वगैरे हे सर्व अंधारात चालण्यासारखंच आहे. उपायच नव्हता तर लोक बरे होत आहेत. आता आपण लोक म्हणतो की वयस्कर आणि दुर्धर आजार असणा-यांना अधिक धोकादायक होऊ शकतो वगैरे आपले आपलेच हिशेब. आता अनलॉकमधे विद्यापीठाच्या परिक्षा सुरु होत आहेत. लोकांची ऑफीसेस सुरु झालेली आहेत. काहींचं वर्क फ्रॉम होम सुर आहे. सर्व परिस्थिती पाहता आता लॉकडाऊन आणि अनलॉकचा खेळ करीत बसू नये. लोकांना जितकं शहानपण यायचं तितकं पुरेसं आहे, असे वाटते. आपण आपलीच काळजी घ्यायची. माझं कुटुंब माझी जवाबदारी. -दिलीप बिरुटे