Skip to main content

जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 23/05/2020 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत? --श्री मंगेश पाडगावकर मागेच लिहिलं होतं-- एक दिवस दवाखाना बंद ठेवला परंतु रस्त्यावरचे स्वच्छता कर्मचारी साधे पोलीससुद्धा काम करत आहेत पाहून स्वतःची लाज वाटली म्हणून आम्ही (मी आणि बायको) दवाखाना चालू केला. एक दिवसा आड बातमी येते अमुक डॉक्टर तमुक डॉक्टर दिवंगत झाले. त्यातून बायका जास्त तणाव घेतात. त्यामुळे बायको एक दिवसाआड डिप्रेशन मध्ये जाते. तिच्या (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद( घाटी) च्या) डॉक्टर मैत्रिणी अशाच बाबी जास्त बोलत राहतात तिथे सुरुवातीला रुग्ण कमी होते आणि मग एकदम भसकन रुग्ण वाढले त्यामुळे ते सर्व लोक टरकले आहेत. मग आपली भीती दुसरीला सांगत राहतात आणि मग सर्वानाच फुकटचं टेन्शन येते. काही वेळेस मला तिचा राग येतो चिडचिडही होते. पण सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो. तिचा बराचसा सल्ला फोनवरच असतो. परंतु काही रुग्ण ताप खोकला असला तरीही तुम्हाला दाखवायचंय असा आग्रह धरतात. अगोदर ताप आला होता हे सांगत नाहीत. त्यामुळे आता ती सुद्धा लोकांवर विश्वास ठेवायला कचरू लागली आहे. बाकी दोन महिन्यात एकाही रुग्णाने टेलिफोनवर दिलेल्या सल्ल्याचे पैसे किती हे विचारले नाही.पैसे घ्यायचे नाही हे ठरवलेच होते परंतु निदान तेवढे सौजन्यही कुणी दाखवले नाही. माझ्या कडे येणारे रुग्ण सोनोग्राफी साठी येतात त्यामुळे सुदैवाने त्यांना कोव्हीड असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे मला तेवढी भीती नाही. अर्थात वेळ सांगून येत नाही. कधीतरी आपल्याला सुद्धा हा रोग होणार आहे हे गृहीत धरूनच मी चाललो आहे. मला स्वतःची चिंता नाही पण वृद्ध आईवडिलांची (८४ आणि ७८) आहे. पण जे नशिबात असेल ते मी स्वीकारले आहे. एका मुतखडा असलेल्या रुग्णाने माझ्या सहायिकेला विचारले कि मला किती सवलत मिळेल? तिने त्याला विचारले कि दारूच्या दुकानाच्या रांगेत उभा होतास तिथे विचारलेस का किती "कन्सेशन" मिळेल ते. दर दोन दिवसांनी तुम्ही "असे केले नाही तर तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करू" म्हणून सरकारची/ महापालिका आयुक्त यांची धमकी वृत्तपत्रात वाचायला मिळते आहे. ते पाहून काही वेळेस डोके फिरते. खरोखरच व्यवसाय बंद करून टाकावा कोणत्याही वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या क्लास मध्ये शिकवावे सहा आकडी पगार घ्यावा. पाट्या टाकून घरी यावे आणि थंड झोपावे सरकार आणि जनता झक मारली असे डोक्यात येते. ते माझे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. आणि क्लास मध्ये शिकवण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज नाही. माझी पदवी आणि पदव्युत्तर पदवी हि प्रथितयश संस्थेची असल्याने त्याला शिक्षणाच्या बाजारात भरपूर किंमत आहे आणि क्लास मध्ये मी एक वर्षं शिकवलेले सुद्धा आहे तेंव्हा त्यात नवीन काहीही नाही. (तेच ते वर्षानुवर्षे शिकवायचे हे फार कंटाळवाणे आहे म्हणून मी पुढे ते सोडून दिले) अशीच मनस्थिती माझ्या पॆक्षा वरिष्ठ अशा अनेक डॉक्टरची आहे. आमच्या आयुष्याला पुरेल इतका पैसे कमावून ठेवला आहे. सरकारची अरेरावी नको असे सर्वांचेच मत आहे. हिप्पोक्रॅटिस ची शपथ खड्ड्यात गेली असे म्हणायची पाळी सरकारने आणली आहे. तुमच्या सेवेची कुणालाही किंमत राहिलेली नाही हे गृहीत धरले तरीही असे धमकी देणे डोक्यात जाते. तरीही मी रोज दवाखान्यात जातो आहे. कारण साकी नाका, डोंबिवली पासून रुग्ण किती कष्ट घेऊन येतात. कुणी मुतखड्यामुळे तळमळत आहे. कुणा गरोदर स्त्रीला बाजारात मोटारीने ठोकले आहे आणि पायाचे हाड मोडले आहे. तिला स्वतःपेक्षा आपल्या बाळाची काळजी वाटते. कुणा स्त्रीला ११ वर्षांनी दिवस गेले आहेत पण रक्तस्त्राव होतो आहे. अशा स्त्रीला तिचे बाळ सुखरूप आहे हे दाखवताना / सांगताना तिच्या डोळ्यात जी कृतज्ञता असते त्याची किंमत पैशात होत नाही असे रुग्ण पाहून घरी बसायची मानसिक तयारी होत नाहीये. एक अजून गंमतशीर गोष्ट म्हणजे गेल्या दोन महिन्यात पोट बिघडलेले केवळ तीन रुग्ण आले होते. हॉटेले बंद असून लोक बाहेर न खाता घरीच खात असल्यामुळे हि एक सकारात्मक बाब दिसून आली. यातील दोन जणांनी दोन दिवसा पूर्वीचे चिकन आणि प्रॉन्स खाल्ले म्हणून पोट बिघडले आणि आज चि रुग्ण होती तिने SWIGGY वरून काही तरी मागवले म्हणून पोट बिघडले होते. आता लॉक डाउनचा दुसरा परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या १० दिवसात ४ स्त्रिया नको असलेले गर्भारपण घेऊन आल्या होत्या. एकीला दोन मुलगे १४ आणि १० वर्षे दुसरीला एक मुलगा एक मुलगी ६ आणि ४ वर्षे. तिसरीच्या दोन्ही मुली १५ आणि १२ वर्षाच्या. आणि चौथीचा मुलगा १० महिन्यांचा आहे. या सर्व स्त्रिया अर्थात विवाहित आहेत आणि जवळपासच राहणाऱ्या आहेत. अशी स्थिती दिवाळीच्या आसपास असते. नवरात्राचा परिणाम महिन्यानंतर दिसू लागतो परंतु या बहुतेक लग्न न झालेल्या आणि कांदिवली चिंचपोकळी बांद्रा सारख्या ठिकाणाहून येतात.म्हणजे स्त्रीरोग तज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट दोन्ही परत भेटणारे नकोत. माझ्या एका नातेवाईकाच्या बायकोला आणि एका वर्गमत्रिणीच्या नवऱ्याला कोविड मुळे रुग्णालयात भरती करावे लागले होते आणि त्यांना तेथे जाताही येत नव्हते. अशा लोकांना धीर देणे आवश्यक असते. त्यात माझा एक आठवडा गेला. सुरुवातीला मुलांनी थोडी कटकट केली कि बाबा तू घरी आल्यावर सारखा फोनवर असतोस. त्यांना समजावून सांगितले कि नातेवाईकांची मनस्थिती काय आहे. आणि अमुक माणूस एक दिवसात मृत्यू पावला सारख्या बातम्या वाचून त्यांच्या काळजाचे पाणी पाणी होते, अशा लोकांना धीर देणे त्यांच्या जखमेवर फुंकर घालणे हे पण आवश्यक आहे. अर्थात मुले समंजस आहेत. दोघे आता घरी बरे होऊन परत आले आहेत जाता जाता -- दारूची दुकाने उघडली त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट- पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी एक किमी लांब रांग आणि तिला शिस्त लावण्यासाठी दुपारी १ वाजता उन्हात उभे असलेल्या पोलिसांची दया आल्यामुळे मी घरी जाऊन २ लिटर लिंबूसरबत तयार केले आणि मुलुंड पूर्वं येथे तीन ठिकाणी दारुच्या दुकानाच्या रांगा मध्ये उभे असणाऱ्या पोलिसांना देण्यासाठी गेलो. तिन्ही रांगांत स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने उभे होते. ( खरं तर अर्ध्या रांगा याच लोकांमुळे होत्या). पहिल्या रांगेत पोलिसाला सरबत देत असताना दोन गणवेशातील महापालिका कर्मचारी त्या पोलिसाला विनंती करत होते. आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत मुलूंड स्मशानभूमीत काम करतो. पोलिसाने काय पाहिजे विचारले तर त्यांना रांगेत उभे न राहता थेट दारू विकत घ्यायची "मेहरबानी" हवी होती. दुसऱ्या रांगेत जुन्नर जवळच्या गावातील महिला पोलीस होती. तिच्याजवळ तिचा एक गाववाला ओळख काढून गप्पा मारू लागला आणि मग हळूच दारूसाठी विनंती करु लागला. तीन रांगातील पोलिसांना सरबत दिल्यावर मी पोलीस स्टेशन वर जेवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरबत देण्यास गेलो तेथे असलेले इन्स्पेक्टर साहेब सांगत होते. काय सांगणार डॉक्टर दोन दिवसापूर्वी स्थानिक आमदार सगळ्यांना फुकट रेशन वाटत होते (१० किलो गहू १० किलो तांदूळ ४ किलो डाळ आणि २ लिटर तेल असं काहीतरी मी एका रांगेच्या ठिकाणी बोर्डावर लिहिलेलं वाचलं होतं). त्या रांगेत असलेले निदान दहा तरी मजूर आज दारूच्या रांगेत उभे होते. पहिल्या मजुराला मी हाकलणार होतो कि दोन दिवसापूर्वी फुकट शिधा पाहिजे म्हणून रांगेत उभा होतास आणि आता दारू साठी. पण नंतर बाकी रांगेत असे भरपूर लोक दिसत होते. शेवटी मी सोडून दिले. काही वेळाने माझ्या समोर दोन माणसे इन्स्पेक्टर साहेबाना "गूळ" लावण्यासाठी लाळघोटे पणा करत होती. ते पाहून मला शिसारीच आली. अर्थात मी घरी केलेले लिंबू सरबत घेऊन गेलो होतो म्हणून त्यांनी ते घेतले पण एकंदर त्यांना थंड पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड ड्रिंक चा पुरवठा करणारे माझ्या सारखे इतरही लोक होतेच. बाकी आमचे आयुष्य संथगतीने चालले आहे त्यात नवीन असे काहीही घडत नाही. धुणी भांडी स्वयंपाक झाडू पोछा हे घरचे सर्व मिळून करत आहोत. त्यामुळे एकावर भर येत नाही आणि त्यात रडारड करण्यासारखे काहीच नाही कारण सर्वच लोक तसे करत आहेत. मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे याची चिंता राजकारण्यांना( कोणत्याही पक्षाचे असोत), सरकारी लोकांना आणि वैद्यकीय तज्ज्ञांना सुद्धा आहे. दुर्दैवाने त्यातील कोणालाच अशा प्रचंड प्रमाणावर असलेल्या जागतिक साथीचा अनुभव नाही. तरी आहे त्या शस्त्रानिशी ते लढत आहेत. निदान आपण त्यांच्या श्रमात हातभार लावू शकत नसलो तरी अनाठायी टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची तरी करत नाही एवढे ध्यानात घेता आले तरी खूप आहे असेच म्हणेन. माझी वृत्ती अशी आहे कि जे वाईट घडायचे आहे ते घडून गेले आहे. येणार काळ अधिकच चांगला आणि उज्ज्वल असेल यावर माझा पूर्ण भरोसा आहे. त्यामुळे मला नैराश्य येत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 62673
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

> मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे ............. इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ का आली ?

In reply to by संजय क्षीरसागर

इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ का आली ?
नका काढू हो तो विषय आता. असे विषय आले की त्यांचं लिहिण्यावरचं कंट्रोल जातं हो. (कपाळ ठोकून घेणारी स्मायली) डॉ.साहेब, तुम्ही अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदी त्यांचे आदर्श आहेत आणि मोदींप्रमाणेच त्यांना परिणामांची पर्वा नाही. लेखात काय म्हटलंय बघा : माझी पदवी आणि पदव्युत्तर पदवी हि प्रथितयश संस्थेची असल्याने त्याला शिक्षणाच्या बाजारात भरपूर किंमत आहे आणि क्लास मध्ये मी एक वर्षं शिकवलेले सुद्धा आहे तेंव्हा त्यात नवीन काहीही नाही.

In reply to by ऋतुराज चित्रे

उत्तर देऊ शकत नाही असे नाही तर द्यायची इच्छा नाही. बाकी तुम्हाला काय वाटेल ते समजु शकता.

In reply to by संजय क्षीरसागर

"..निदान आपण त्यांच्या श्रमात हातभार लावू शकत नसलो तरी अनाठायी टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची तरी करत नाही एवढे ध्यानात घेता आले तरी खूप आहे असेच म्हणेन." हेच हेच येथे अनेकांना समजत नाही किंवा समजवून घ्यायचे नाही ... आज समाजाला आपल्यासारख्यांची जास्त जरुरी आहे डॉक्टर, उगाच "नागरिक शास्त्र शिकवणाऱ्यांची नाही किंवा थोतांड म्हणून ओरडणाऱ्यांची नाही ...

In reply to by संजय क्षीरसागर

कडक लॉकडाऊन मार्च २२ ला लोकांनी स्वतः फक्त १ दिवसाचा कर्फ्यू पाळा असे आवाहन मोदींनी केल्यावर महाराष्ट्रात मामु ठाकरे यांनी ३१ मार्च पर्यंत कर्फ्यू घोषित केला होता हे विसरलात का? https://www.indiatoday.in/india/story/coronavirus-in-india-section-144-… https://www.deccanherald.com/national/north-and-central/maharashtra-loc… मोदींवर निशाणा घेण्याच्या प्रयत्नात असे विस्मरण होते, पण तुमच्यासारख्या महान माणसाकडून हे अपेक्षित नाही.

अशीच मनस्थिती माझ्या पॆक्षा वरिष्ठ अशा अनेक डॉक्टरची आहे. आमच्या आयुष्याला पुरेल इतका पैसे कमावून ठेवला आहे. सरकारची अरेरावी नको असे सर्वांचेच मत आहे. हिप्पोक्रॅटिस ची शपथ खड्ड्यात गेली असे म्हणायची पाळी सरकारने आणली आहे. हे वाचून का कोण जाणे पण एकदम डॉ दीपक अमरापूरकर आठवले. :(

>>> येणारा काळ अधिकच चांगला आणि उज्ज्वल असेल यावर माझा पूर्ण भरोसा आहे. >>> लेखातील हे शेवटचे वाक्य महत्वाचे आहे. ह्याच विजिगिषु वृत्तीने आपण ह्या चायनीज व्हायरसच्या आक्रमणावर मात करणार आहोत.

येणार काळ अधिकच चांगला आणि उज्ज्वल असेल यावर माझा पूर्ण भरोसा आहे.
असाच भरोसा मला सुध्दा वाट्तोय.

हे अतिशय विनोदी विधान सोडलं तर उर्वरित लेख कळतोय. अशा प्रकारे घरी तयार केलेली सरबतं वाटलेली चालतात का लॉकडाऊनमध्ये?? मला फक्त स्टे होमशी संबंधीत काही गोष्टी, ज्या मी राहते त्या राज्यात फॉलो करायला सांगगतात त्या पाहिल्या तर अशाप्रकारे चालेल असं वाटत नाही. एक म्हणजे ट्रेसेबिलिटी राहणार नाही आणि हे त्या गर्दित जाउन करताना फिजीकल डिस्ट्न्सिंग फॉलो करता येणार का? लॉकडाऊनमध्ये नियम जास्त कडक असतील असं आमच्यासारख्या लांब राहणार्या लोकांना वाटतं. बहुतेक ते तसं नसावं.

In reply to by मीअपर्णा

"पण सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो"
माझ्यामते डॉ.साहेबांनी स्वतःवरच्या त्राग्याचा उपाय असा विचार करुन काढला असावा. इथे फक्त लिहिण्याच्या ओघात त्यांनी तो सांगितला. दुसर्यालाही हेच कसे खरे आहे हे पटवण्याचा प्रयत्न केला असता तर ते चुकीचे ठरले असते. मनातल्या मनात सुध्दा पॉलिटीकली करेक्ट विचार करण्याची अपेक्षा करणे कै च्या कै आहे.

अशी स्थिती दिवाळीच्या आसपास असते. नवरात्राचा परिणाम महिन्यानंतर दिसू लागतो परंतु या बहुतेक लग्न न झालेल्या आणि कांदिवली चिंचपोकळी बांद्रा सारख्या ठिकाणाहून येतात.म्हणजे स्त्रीरोग तज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट दोन्ही परत भेटणारे नकोत. बाकी ठीक आहे पण अशी माहिती एका डॉक्टरनी कोरोना लेखाच्या आडून देणं अयोग्य वाटत नाही का? तसेच पोलीस तर सगळीकडेच त्यांची जबाबदारी निभावत आहेत पण लेखकाला दारूच्या दुकानासमोरच्याच पोलिसाला सरबत का वाटावस वाटलं? तुमचा अंतरजालावरच एकूण वावर पाहता बऱ्याच गोष्टींवर शंका येते. बाकी काही नाही.

In reply to by झम्प्या दामले

ही त्यांच्या दृष्टीनं खरी मौजेची गोष्ट असावी. बघा : > या सर्व स्त्रिया अर्थात विवाहित आहेत आणि जवळपासच राहणाऱ्या आहेत आणि मग काहीही संबंध नसलेली माहिती ते रंजक करुन सांगतात : > नवरात्राचा परिणाम महिन्यानंतर दिसू लागतो परंतु या बहुतेक लग्न न झालेल्या आणि कांदिवली चिंचपोकळी बांद्रा सारख्या ठिकाणाहून येतात. त्यामुळे नंतरच्या विधानासाठी, आधीची माहिती लिहिलीये की काय ? अशी शंका येऊ शकते.

In reply to by संजय क्षीरसागर

आपल्याला सर्व विषयात सर्वच कळतं असा गैरसमज असला की असं होतं प्रत्येक गरोदर स्त्रीची सोनोग्राफी करण्याबरोबर तिची संपूर्ण माहिती फॉर्म मध्ये भरून घ्यावी लागते आणि PNDT कायद्याप्रमाणे रोजच्या रोज सरकारला अपलोड करावी लागते. आणि हे फॉर्म पुढचे 3 वर्षे जपून ठेवावे लागतात. आता अशी माहिती आपल्याला रंजक किंवा मौजेची वाटत असेल तर तो आपला प्रश्न आहे

In reply to by सुबोध खरे

तो प्रोसिज्यरचा भाग झाला. पण ही माहिती त्याबरोबर कशाला ? > नवरात्राचा परिणाम महिन्यानंतर दिसू लागतो परंतु या बहुतेक लग्न न झालेल्या आणि कांदिवली चिंचपोकळी बांद्रा सारख्या ठिकाणाहून येतात.

> मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे ............. इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ का आली ?

In reply to by संजय क्षीरसागर

इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ का आली ? आपण सर्वज्ञानी असूनही आपल्याला याचे उत्तर माहिती नाही? आश्चर्य आहे.

In reply to by सुबोध खरे

सर्वज्ञानी या शब्दाबद्दल जनमानसात घोर गैरसमज आहेत. सर्वज्ञानी म्हणजे ज्यानं स्वरुप जाणलं असा. त्यापलिकडे त्याचा काहीही अर्थ नाही. सर्वज्ञानी जगातली प्रत्येक गोष्ट घरबसल्या जाणतो या गैरसमजामुळे भारतीय मानसिकतेचं फार मोठं नुकसान झालं आहे. एकतर अशा अवाजवी कल्पनेमुळे संशोधनाची वाट लागली आणि वैज्ञानिक दृष्टीकोन हरवला. दुसरं म्हणजे आपल्याला सर्व गोष्टींचं सर्व ज्ञान झाल्याशिवाय स्वरुपाचा उलगडा होणं शक्य नाही अशी धारणा दृढ होऊन साधकांची संपूर्ण दिशाभूल झाली आणि आपणच सत्य आहोत या उघड गोष्टीचा उलगडा होण्याची शक्यता मावळली. मागे म्हटल्याप्रमाणे, तुमच्या जीवनात, तुमची इच्छा नसतांना, अध्यात्मानं प्रवेश केला आहे आणि गुरु म्हणून मी तुमची चुकीची धारणा दूर केली आहे. _____________________________________________ आता करोनाविरुद्ध चाललेल्या कार्यात काम करत असलेली एक जवाबदार व्यक्ती म्हणून उत्तर देऊ शकाल का ?

In reply to by संजय क्षीरसागर

इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ का आली ? हा प्रश्न आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा

In reply to by सुबोध खरे

तुम्ही त्या क्षेत्रात कार्यरत आहात. इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ आली याचा अर्थ लॉकडाऊन निरुपयोगी ठरले असा होतो.

In reply to by संजय क्षीरसागर

इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ आली याचा अर्थ लॉकडाऊन निरुपयोगी ठरले असा होतो. या तर्कानुसार. समजा सकाळी पूर्व दिशेकडे तोंड करून एका खुर्चित मी स्वत:ला दिवसभर बांधुन ठेवले.. तेव्हा दिवसभराच्या निरिक्षणानंतर असे लक्षात आले की मी स्वत: स्थिर आहे व सूर्य जो सकाळी माझ्या समोर होता तो सरकत सरकत माझ्या पाठीमागे आला.. याचा अर्थ मी स्थिर असुन सूर्य हालचाल करतो असाच होतो बरोबर..

In reply to by मामाजी

वस्तुस्थिती आहे. वाचा > Highest ever spike of 6767 COVID-19 cases and 147 deaths in India have been recorded in the last 24 hours. Link खुर्ची आणि सूर्याचा काही संबंध नाही

In reply to by संजय क्षीरसागर

माझा मुद्दा हाच आहे की ज्या प्रमाणे सूर्य स्थिर आहे व पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हे सिद्ध करण्यासाठी फक्त डोळ्यासमोर दिसणारी परिस्थिती विचारात घेऊन चालत नाही तर त्या साठी वेगवेगळे आयाम विचारात घ्यावे लागतात तसेच नुसत्या समोर येणार्या आकडेवारीवरून इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ आली याचा अर्थ लॉकडाऊन निरुपयोगी ठरले असा होतो.हा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. त्याच्याशी निगडीत असलेले अनेक पैलु विचारात घ्यावे लागतात. हे म्हणजे अस झालं की आपण आधीच बाण मारायचा व तो बरोब्बर केंद्रस्थानी लागला आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या बाजुने नंतर वर्तुळ काढायचे..

In reply to by मामाजी

मुळ मुद्दा लक्षात येईल > ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

एक डॉक्टर म्हणून आपले अनुभव उत्तमच असतात. लिहिते राहा सर. ०दिलीप बिरुटे

उत्तम लिहिले आहे डॉक, मनातली घालमेल पोहोचली. बाकी सगळ्यांनी कोरोनासोबत राहायची सवय केली आहे कारण १०/१२ दिवस झाले माझे १ दुकान सकाळी ९ ते दुपारी २ चालू ठेवायला परवानगी दिली आहे आणि रोज दुकानात जी गिर्हाईके येतात त्यातली फ़क़्त १ मास्क न लावता थेट आत येत होते, त्यांना प्रेमाने अटकाव केला आणि मास्क लावून यायला सांगितले. बाकी दुकानात १ जन असेल तर लोक न सांगता बाहेर थांबतात आणि तो गेल्यावर आत येतात.

In reply to by उपेक्षित

आपले कसले दुकान आहे आणि काय काय विशेष काळजी घेतली याची माहिती कोरोनासोबत जगायचे आहे...! या धाग्यावर द्याल का..?

In reply to by मोदक

माझे २ व्यवसाय आहे त्यातला एक गेले ४ महिने आपल्या लॉकडाऊन च्या आधी दीड एक महिन्यापासून ठप्प आहे आणि पुढील निदान ६/८ महिने तो फारतर १०% क्षमतेने चालू होईल. दुसरा व्यवसाय म्हणजे स्टेशनरी आणि व्हरायटी शॉप आणि सिजनल फूड चे आहे. १७ मे पासून स्टेशनरी दुकान सकाळी ८ ते २ चालू ठेवत आहे. दुकान चालू करायच्या आधी पूर्ण दुकानं साफ केले आम्ही (dettol आणि इतर काही समान वापरून) तसेच दुकानाबाहेर प्रवेश मार्गावर आडवे टेबल टाकून मार्ग बंद आहे, तसेच बाहेर लोकांना उभे राहण्यासाठी ४ गोल आखले आहेत त्यातच उभे राहण्यास सांगतो आम्ही त्यांना जेणेकरून distance पाळला जातोय. मुख्य म्हणजे आम्ही वस्तू देऊन झाली कि प्रत्येक वेळी sanitizer वापरतोय. सध्यातरी इतकेच हातात आहे बाकी जसे सुचेल तसे बदल करतोय छोटे मोठे.

In reply to by उपेक्षित

माझ्या दवाखान्यात सुद्धा स्त्रिया किंवा त्यांचे नवरे येतात त्यांचा मास्क लावलेला परंतु नाकाच्या खाली उतरलेला असतो. त्यांना मी ताबडतोब मास्क नीट लावायला सांगतो आणि वर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या बाळाला उगाच धोक्यात का टाकता आहात हे विचारतो. माझ्या दवाखान्यात इतके रुग्ण येतात त्यापैकी कोणी जर कोरोना ग्रस्त असेल तर तुम्ही हा धोका का पत्करता असे सौजन्यपूर्ण शब्दात विचारतो. यानंतर निदान दवाखान्यात तरी त्याचा मुखवटा नीट राहतो.

अशा परिस्थितीत एका डॉक्टरचे फर्स्ट हँड अनुभव वाचायला आवडले. तुमचं कौतुक वाटतं.

In reply to by तुर्रमखान

+1

मी मिपावर एक त्रयस्थ आहे, अशा अर्थाने की सभासदांपैकी अनेक लोक एकमेकांना ओळखतात तसा मी कुणालाच ओळखत नाही. समोर आलेल्या लिखाणाबद्दल फक्त पाहायचं झालं तर मला तरी डॉ. खरेंच्या लिखाणात काही गैर दिसलं नाही, जेणेकरून त्यावर तिरक्या कॉमेंट्स कराव्यात. प्रामाणिकपणे आपलं काम पार पाडीत असताना त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी मांडले. एकूणच त्यांचे लिखाण माहितीपूर्ण असते आणि त्यांची शैलीही रोचक आहे. सारांश, ते मोदीभक्त आहेत की नाहीत हा मुद्दा येथे गैरलागू आहे. डॉ. खरे माझे कुणी लागत नाहीत. पण अशा प्रतिसादांमुळे चर्चा भरकटत जाते, एवढंच फक्त.

In reply to by रविकिरण फडके

खर्‍यांचे प्रतिसाद कसे वाटतात ? प्रश्न : > मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे ............. इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ का आली ? उत्तर : आपण सर्वज्ञानी असूनही आपल्याला याचे उत्तर माहिती नाही? आश्चर्य आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

अशाने तुमच्यावर साडेतीन वर्षांच्या लॉकडाऊनचा फेरा लवकरच परत येणार असे भविष्य दिसत आहे. ;)

In reply to by संजय क्षीरसागर

मी फक्त 'सादा'बद्दल लिहिलं, 'प्रतिसादा'बद्दल नाही (असं पोलिटिकल उत्तर मी देऊ शकतो); (पण मी ते देणार नाही कारण) तुमच्या प्रश्नाचं उत्तर जगजाहीर आहे, एवढंच डॉक्टरांना अभिप्रेत असावं (असं मला वाटतं). ते त्यांनी वेगळ्या प्रकारे मांडलं, एवढंच (का, कुणास ठाऊक?). एक त्रयस्थ म्हणून मला एवढंच दिसतंय.

In reply to by रविकिरण फडके

१००% सहमत ...खुलासा ना मी डॉ खरेच फॅन ना मोदींचा.. जे बरोबर दिसतंय त्याच कौतुक करणे एवढेच

माझ्या स्वत:च्या अबुधाबित टेस्ट झाल्या. ४ मे स्वाब टेस्ट, पॉझिटीव ओफ् शोअर, emergency एअर लिफ्टनी होस्पीटल मधे रवानगी! मी एकटाच पॉझिटीव होतो जवळपास ३०० लोकात हे मला नंतर कळाले. ५ मे, १० मे, १२ मे होस्पीटल मधे सगळ्या निगेटिव्ह. रक्त, छातीचा  X-RAY  आणि स्वाब (तीन हि  वेळा)    १२~ १९ मे सेल्फ कोरनटाईन.  स्वाब टेस्ट, २० मे पॉझिटीव!  आणि सर्व स्वाब उजव्याच नाकपुडीतून झाले. अशी काही नियमावली आहे का? कसलाही त्रास नव्हता व नाही किंवा लक्शणे ही नव्हती आणि नाहीत , पण आयला काही ठोस निदान पण नाही ! multi vitamin चालू होतेच आणि आहे.  आता अजुन दोन  टेस्ट  ३० मे आणि १ जून. लगे रहो! ४ आणि १९ मे  चे स्वाब किट मेड इन चायना होते येवढाच फरक. नाकपुडीच्या आत भोक पडलेला!  कश्यातकायआहे.   :-)

In reply to by नावातकायआहे

4 मे ची पॉझिटिव्ह आणि 5 मे ची निगेटीव्ह असेल तर यातील एक टेस्ट चुकीची आहे एवढेच सांगता येईल. कारण या चाचणीची अचूकता नाकातील स्वाबसाठी 63 % आहे. बाकी आपल्याला कोणतीही लक्षणे नसतील तर चिंता करण्याचे काहीच कारण नाही. मग टेस्ट कितीही वेळा पॉझिटिव्ह येवो. कारण बऱ्याच वेळेस रोगातून बरे झाल्यावरही मृत विषाणू तुमच्या शरीरातून बाहेर टाकण्या साठी बराच वेळ जाऊ शकतो आणि या कालावधीत टेस्ट पॉझिटिव्ह येत राहते. त्यामुळे चिंता नसावी परंतु टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत आपण विलग रहा असाच सल्ला मी देईन कारण रोग दुसरीकडून आला तरी तो आपल्यामुळेच आला असा आरोप आपले सहकारी आपल्यावर करण्याची शक्यता आहे? सध्या लोकांची मनोवृत्ती भयग्रस्त आणि संशयग्रस्त झालेली आहे यास्तव ही सूचना.

In reply to by सुबोध खरे

कोरोना निदान झाले होते का? हा प्रश्न आरोग्य नियमावलित, प्रा डॉ, (लि दीर्घ?), नवीन विमा अर्जात किंवा नोकरीत विचारला नक्कीच जाईल.

In reply to by नावातकायआहे

साहेब एक वेगळा लेख येवु द्या. आपल्याकडील आणि तिकडील उपचारात काय फरक आहे. २१ दिवसांच्या ऐवजी ७ दिवसच का?. खर्च किती आणि तो कोणी केला. विलगी करणा मध्ये काय अनुभव आले म्हणजे खाणे पिणे पुरवठा, भेटणे, बाहेर फिरणे. सगळे लिहा जरा.

In reply to by आंबट चिंच

https://www.aksharnama.com/ साऊथ ब्रान्सविक, न्यू जर्सी, अमेरिका अरिझोना, अमेरिका स्टॉकहोम, स्वीडन अल्मेर, नेदर्लंड्स ऑस्लो, नॉर्वे सिंगापूर लंडन, इंग्लंड पॅरिस, फ्रान्स फ्रँकफर्ट, जर्मनी शांघाय, चायना ह्या जागांबद्दल आखों देखा हाल आहे

मार्गदर्शनपर अनुभव धन्यवाद @navatkayahe काळजी घ्या शुभेच्छा

काही वेळेस मला तिचा राग येतो चिडचिडही होते. पण सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो हे वाक्य खूप च खटकले. तुमच्या पुर्वी च्या लेखात बायकांवर असली टिप्पणी वाचल्याचे स्मरत नाही.

In reply to by सुचिता१

तिच्या (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद( घाटी) च्या) डॉक्टर मैत्रिणी अशाच बाबी जास्त बोलत राहतात तिथे सुरुवातीला रुग्ण कमी होते आणि मग एकदम भसकन रुग्ण वाढले. त्यामुळे ते सर्व लोक टरकले आहेत. मग आपली भीती दुसरीला सांगत राहतात आणि मग सर्वानाच फुकटचं टेन्शन येते. काही वेळेस मला तिचा राग येतो चिडचिडही होते. हे अगोदरचे वाक्य आपण वाचले का? डॉक्टर असल्यावर निदान वैद्यकीय विषयावर तरी वास्तववादी विचार करायला हवा अशी माझी अपेक्षा असणे चूक आहे का? स्त्री डॉक्टरनेही खंबीर न राहता भावनात्मक दृष्ट्या वैद्यकीय बाबींचा विचार करावा असेच आपले सर्वांचे मत असेल तर मी माझे हे विधान मागे घेतो आणि सर्वांची क्षमा मागतो.

In reply to by सुबोध खरे

सामान्य स्त्रिया पण बर्याचदा खंबीर स्वभावाच्या असतात. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत स्वतः खंबीर राहून दुसऱ्याला धीर देणार्या बायका पण मी बघितल्या. तुमचे सरसकट "सगळ्या बायका " हे शब्द खटकले म्हणून कळवले. बाकी लेख उत्तम आहे. तुमचे निरीक्षण वाचायला आवडते.

In reply to by सुचिता१

स्वतः खंबीर राहून दुसऱ्याला धीर देणार्या बायका अशा फार कमी असतात. विशेषतः स्वतःवर संकट आलं असताना. सुदैवाने आमची आई अशी आहे. स्वतःला कर्करोग झाला असताना सुद्धा ती शांत होती. टाटा आणि दुसऱ्या रुग्णालयात ४५ दिवस व्हेंटिलेटरवर काढून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर मला कधी भय भीती चा लवलेश दिसला नाही. सर्वात पॉझिटिव्ह रुग्ण म्हंणून टाटाचे कर्मचारी तिच्याबद्दल मला अनेक वेळेस सांगत असत. पण अशा स्त्रिया फार कमी असतात.

In reply to by सुबोध खरे

आजकालच्या स्त्रीया जास्त प्रमाणात खंबीर आहेत म्हणून जिथे तिथे पुरुष डॉमिनेट करत असतानाही खंबीर पणे काम करत राहतात. आपण स्वतः डॉ. आहात म्हणून या विधानावर चर्चा होत असावी. मी वरती देखील प्रतिक्रिया दिली आहेत त्यातले इतर मुद्दे तर तुम्ही वाचलेही नसावेत पण ते असो. विषय भरकटवायचा नाही तरीही हा एक व्हिडिओ पहा. मला वाटतं एकंदरित कोरोना या विषयावरदेखील राजकारण इ. चर्चा करणार्ञा जगातील सर्वच देशांतील लोकांनी हा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. आपला शत्रू कोरोना व्हायरस आहे आपल्यातील कुणी नाही. (हा पॅरा फक्त डॉ. साठी नाही. सर्वांनीच पाहावं, शिकावं, मोठ्या पदावर असणार्या व्यक्तींकडे हा मोठेपणा पोचावा.) मिशिगनची गव्हर्नर ग्रेचन व्हिटमर प्रेसिडंट ट्रम्पने तिला That Woman from Michigan म्हणून हिणवून झालं आहे. त्यावरचं तिचं संतुलित उत्तर पहा. मला वाटतं स्त्रीयांची ती युनिक ताकत तिच्याकडे आहे. आणि अशा स्त्रीया जास्त प्रमाणात आहेत. सो प्लीज अशी जनरलाइज्ड विधानं, बेजबाबदार पणे अशा साईट्स वर करताना इतरांचा विचार करा. https://www.youtube.com/watch?v=u9_-5j_pJn8 या विषयावर यापेक्शा जास्त ताकत नाही खर्च करायची गरज वाटत नाही. शुभेच्छा.

In reply to by मीअपर्णा

आजकालच्या स्त्रीया जास्त प्रमाणात खंबीर आहेत म्हणून जिथे तिथे पुरुष डॉमिनेट करत असतानाही खंबीर पणे काम करत राहतात. >>>>>>>>>>>> अत्यंत एकांगी वाक्य आहे हे, कारण स्त्रिया सुद्धा जिथे तिथे पुरुषांना डॉमिनेट करत असतात.

लॉक डाऊन केला नसता तर आपल्याकडे काही अंदाजाप्रमाणे १५ एप्रिल पर्यंत रुग्ण संख्या ८ लाख पर्यंत गेली असती आणि त्यात ३ % मृत्यू दराने तोपर्यंत २४ हजार मृत्यू झाले असते. आणि हाच आकडा आता पर्यंत २० लाखा पर्यंत आणि मृत्यूचा आकडा ६०,००० पर्यंत गेला असता असे सरकारी आकडे दर्शवतात. त्याबद्दल शंका घेणारे लोकही आहेत. किंवा हे आकडे साफ चूक आहेत असे म्हणणारे लोकही आहेत. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मृत्यूचा आकडा १ लाख पर्यंतही गेला असता. सध्या व्हॉट्स ऍप विद्यापीठातून वैद्यकीय शास्त्रात, विषाणू शास्त्रात पीएच डी केलेल्या लोकांचे पेव फुटले आहे. त्यामुले सर्व तर्हेचे आकडे आपल्याला ऐकायला मिळतात. लॉक डाऊन हे आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल सरकारी अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे एकमत आहे. त्यात कोणतीही शंका नाही. परंतु सुरुवातीला लॉक डाऊन केला नसता तर केवळ उपचारांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आणि चुकीच्या उपचारांमुळे मोठ्याप्रमाणावर मनुष्य हानी झाली असती याबद्दलहि सरकारी अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे एकमत आहे उपचार -- सुरुवातीला कोव्हीड मुळे न्यूमोनिया होऊन रुग्ण दगावतात असा समज होता. त्यामुळे सर्व रुग्णांना व्हेंटिलेटर लागेल असा अंदाज होता आणि आपल्याकडे एवढे व्हेन्टिलेटरही नव्हते किंवा ते वापरणारे तज्ञ डॉक्टर सुद्धा नव्हते. जसे संशोधन पुढे गेले तसे एक गोष्ट लक्षात आली कि रुग्ण न्यूमोनिया होऊन दगावत नाहीत तर फुफ्फुसात रक्ताच्या बारीक गुठळ्या झाल्यामुळे रक्ताभिसरण होत नाही त्यामुळे रुग्ण दगावतात. यामुळे आता रक्त पातळ करण्याची/ गुठळ्या विरघळवण्याची औषधे पहिल्या दिवसापासून दिली जात आहेत त्यामुळे एक तर बरेच रुग्ण मागच्या महिन्यापर्यंत दगावत असता त्यांना वाचवता येऊ लागले आहे आणि बहुसंख्य रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडत नाहीये आणि केवळ नाकाद्वारे ऑक्सिजन देऊन त्यांचे काम चालू शकत आहे. हे उपचार जास्त सोपे आणि एम बी बी एस डॉक्टर सुद्धा देऊ शकतात आणि ते छोट्या रुग्णालयात किंवा जास्त सुविधा नसलेल्या ठिकाणी देता येऊ शकतात. जो रुग्ण अशा लहान ठिकाणी अत्यवस्थ होईल त्यालाच मोठ्या रुग्णालयात व्हेंटिलेटरची गरज पडेल तसे हलवावे लागेल. यामुळे आपल्या उपचार प्रणाली वर अतिरिक्त ताण पडणार नाही. २) सध्या तरी कोव्हीड वर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना केवळ आधारभूत( सपोर्टिव्ह) होईल असेच उपचार दिले जात आहेत. यावर संशोधन अक्षरशः थक्क करेल अशा वेगाने होत आहे. सुदैवाने एखादा नक्की उपचार सापडला किंवा नजीकच्या काळात लस उपलब्ध झाली तर हे उद्यावर टाळलेले अनेक रुग्णांचे मरण कायमचे टाळता येईल अशी अशा करायला जागा आहे. ३) आपली अर्थ व्यवस्था किती काळ हे लॉकडाऊन सहन करू शकेल याचेही आडाखे अर्थ तज्ज्ञांनी बांधले आहेत. त्याप्रमाणे तेवढा काळ लॉक डाऊन केला तो हळूहळू शिथिलही केला जात आहे कारण गरिबीमुळे लोकांचे मृत्यू होऊ नयेत हि काळजीही सरकारला, घेणे आवश्यक आहे. सुदैवाने या यावर्षी आपले शेतीउत्पन्नाची स्थिती उत्तम आहे त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा नक्कीच होणार नाही. अर्थव्यवस्थेला चालना कशी द्यायची याबद्दल अर्थतज्ज्ञ आपआपली मते मांडत आहेत. त्यात लोकांच्या खात्यात पैसे जमा करणे किंवा रेशन कार्ड नसतानाही रेशन देणे सारखेच तात्पुरते आणि उद्योगाला कर्ज देणे किंवा करमाफी सारखेच दीर्घ कालीन उपाय कसे करायचे हे निर्णय सरकार अर्थ तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करेलच. तज्ज्ञांचीहि टोकाची मते आहेत आणि काही लोकांची मते त्यांच्या राजकीय विचारसरणीनुसारच असतील. तो माझा विषय नाही. काही दुवे देत तेच ज्यांना इच्छा आहे त्यांनी वाचावेत. सरकार( भाजपचे केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे) साफ चूक आहे किंवा सरकार बरोबरच आहे असे आपले म्हणणे असू शकते ते आपल्या दृष्टीने बरोबर असेल. https://scroll.in/article/960789/in-charts-are-stringent-lockdown-measu… वरील सहा देशांचा लॉक डाउनचा अनुभव मुद्दाम वाचा https://www.livemint.com/news/india/nationwide-lockdown-will-no-longer-… इंग्लंड मध्ये हर्ड इम्युनिटी ( समूह प्रतिकारशक्ती) विकसित होऊ द्या म्हणू सुरुवातीला लॉक डाऊन केले गेले नाही त्यामुळे त्या देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागी आणि त्यांनी लॉक डाऊन केले हा अनुभव जगजाहीर असताना केवळ विरोधासाठी विरोध करणारे लोक दिसतात. श्री कुबेर यांनी लोकसत्तेत लेख लिहून भारताची स्वीडन शी तुलना केली आहे कि तिथे लॉक डाऊन केला नाही. अंध द्वेष आणि मीच शहाणा म्हटले कि असे होते. कारण स्वीडनची लोकसंख्या घनता एक चौ किमी ला ३५ आहे म्हणेज एक किमी X एक किमी क्षेत्रात फक्त ३५ माणसे राहतात. म्हणजे अक्ख्या शिवाजी पार्क मध्ये ३५ माणसे. भारताची लोकसंख्या घनता ६४०० आहे मुंबईची लोकसंख्या घनता ३२००० आहे तर धारावीची ३ लाख ५४ हजार आहे. म्हणजेच शिवाजी पार्क मध्ये साडे तीन लाख लोक राहायला आले तर त्याची काय अवस्था होईल? मग स्वीडन सारखे सोशल डिस्टंसिंग मुंबईत किंवा धारावीत शक्य आहे का? स्वीडनचे दर डोई उत्पन्न भारताच्या ६-७ पट आहे, आणि तेथील सामाजिक परिस्थिती अतिशय वेगळी आहे. तेथे बरेच लोक वृद्धाश्रमात मरतात आणि सरासरी माणसा च्या पार्थिवाला शवागारातून अंत्यसंस्कार मिळेपर्यंत एक महिना जातो. हे भारतीय मनस्थितीत शक्य आहे का? https://www.thejournal.ie/sweden-funerals-2792223-May2016/ तेथे अंत्य संस्कारासाठी सरासरी फक्त २४ माणसे येतात. आणि १० % लोकांच्या अंत्यसंस्काराला कोणीच येत नाही. https://www.usnews.com/news/best-countries/articles/2016-03-29/in-aging… लोकांना लोकडाऊन न करता पहिल्या दिवसापासून फिरायला दिले असते तर मुंबईतच काही लाख रुग्ण मार्च महिन्याअखेरीस आले असते आणि त्यातून ४०-५० हजार रुग्ण दगावले असते.

In reply to by सुबोध खरे

ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ? > लॉक डाऊन केला नसता तर आपल्याकडे काही अंदाजाप्रमाणे १५ एप्रिल पर्यंत रुग्ण संख्या ८ लाख पर्यंत गेली असती या विधानाला काय अर्थ आहे ? १५ एप्रिलपर्यंत वाट बघायचा प्रश्नच नव्हता.

In reply to by संजय क्षीरसागर

लोकांना लोकडाऊन न करता पहिल्या दिवसापासून फिरायला दिले असते तर मुंबईतच काही लाख रुग्ण मार्च महिन्याअखेरीस आले असते आणि त्यातून ४०-५० हजार रुग्ण दगावले असते. शेवटच्या विधानाला काय आधार आहे ?

In reply to by संजय क्षीरसागर

किती दिवसाची मुदत द्यायला हवी होती? सरकारच सोडून द्या तुमचे काय मत आहे ते सांगा. गणपतीला कोकणात किंवा घाटावर जायचं असेल तरी गाड्या मिळत नाहीत, इथे तर तुम्ही म्हणतंय तस थोड्या दिवसात अचानक काही कोटी लोकांना देशाच्या एका कोपऱ्यातून दुसरीकडे हलवायचे आहे, तुम्ही सांगा काय आणि कस करायला हवं होत? Full proof प्लॅन नसला तरी चालेल पण तुम्ही सारखा सारखा हा प्रश्न विचारताय म्हणजे काही तरी सुचवण्यासारखं असेलच तुमच्याकडे.

In reply to by धनावडे

आता किती लोकांना आणि किती अवधीत हलवले जाणार आहे? मुळात त्यांना का हलवले जात आहे?

In reply to by ऋतुराज चित्रे

करोनाचे साइड इफेक्टसवर मी खर्‍यांना नेमकं हेच विचारलं होतं की "आता स्थलांतर होत असलेल्यात करोना कॅरिअर्स नसण्याची हमी आहे का ?" त्यावर त्यांनी मला उत्तर देण्याऐवजी "फ्लॅटनींग द कर्व, वैद्यकीय सुविधा आणि हर्ड इम्युनिटीचा अभ्यास करा" असा मोलाचा सल्ला दिला. मग पुन्हा तेच प्रश्न आणखी गंभीर होतात : १) लॉकडाऊनमुळे कर्व फ्लॅट झाला का ? २) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय सुधारणात लक्षणीय वाढ झाली का ? ३) लॉकडाऊन हा मोदींनी हर्ड इम्युनिटीच्या विरुद्ध घेतलेला निर्णय आहे, तस्मात त्याचा इथे काहीही संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

सुरवातीला काही महाभागांनी भारतात कोरोना पसरणार नाही, पसरला तर तो हिमालयाच्या पायथ्याच्या राज्यांमध्ये पसरेल असे काहीच्याकही तारे तोडले होते.

In reply to by सुबोध खरे

"...परंतु सुरुवातीला लॉक डाऊन केला नसता तर केवळ उपचारांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ".. अगदी बरोबर आणि हा विचार सर्व जगात थोड्या फार फरकाने तसाच केला गेला , फक्त भारतात्तीलच सरकार कसे चुकीचे हे जे विरोधकांचे उगाळणे चालू आहे ते असा जर "जागतिक आढावा" घेतला तर लक्षात येईल किती एकांगी आणि चुकीचा आहे आज अमेरिकेतील जी परिस्थिती आहे ती सर्व पाश्चिमात्य देशात नाही पण एक तर टोकाची भांडवलशी चे भूत आणि वयक्तिक मोकळेपणाचं टोकाची कल्पना त्यातून अर्थव्यसतेःला बोट लावणारे काही करणे म्हणजे अमेरिकेला कम्युनिस्ट बनवणे असले विचार या मुले १ लाख मेले ३० कोटी च्या लोकसंख्येत .. त्यामानाने भारत ठीक वाटतोय आणि भारतासारख्या देशात हे आटोक्यात आणणे कोणत्याही विचारसरणीचं सरकारला किती अवघड आहे याचा नुसता विचार कार्याला गेले तर ... अरे बापरे त्यामुळे भारतीय रहिवाश्यांनी सरसकट टीका कार्यानधी जर विचार करावं ... नंतर उहापोह करता येईल पण हि वेळ नव्हे राजकारण करण्याची

काही वर्षा पुर्वी, एका मासिकात, एड्स वर एक लेख वाचला होता. त्या लेखात हा रोग भारतात पसरल्यावरचे एक चित्र रेखाट्ले होते. त्यात आपली लोकसंख्या , आरोग्य व्यवस्था लक्षात घेउन असे म्हटले होते की , हा आजार आपल्या देशात टीबी च्या स्वरूपात थैमान घालेल आणि प्रचंड जीवीतहानी होइल. लेख वाचल्यावर एक अस्वस्थतता आली होती. आज विचार करता मनात आले , ह्या रोगा वर अजुन ही औषध सापडले नसताना , खरेच तसे काही झाले आहे का ? वेगळी बाजु मांडणारा एक लेख https://www.loksatta.com/vishesh-news/covidoscope-article-on-michael-le…

वेगळं दृष्टिकोन गिरीश कुबेराचा ? हा हा ! हे म्हणजे सकाळ समूहातील श्रीराम पवार किंवा निखिल वागले हे निपक्षप्पाती पत्रकार आहेत असा दावा करण्यासारखे आहे! शेवटी ओढून ताणून कोविड च्या बंदोबस्तच्या प्रयत्नात सरकार चुकीचेच कसे हा एकच अजेंडा .. आणि असे प्रतिबंध चुकीचे असतील आज अनेक देशाचे अर्थ, वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशासक महामूर्ख आहेत का? कि जे कुबेरणापेक्षा खूप मोठया जबाबदाऱ्या अंगावर घेतात असो माझ्या तरी देशात बंदी चा फायदा झाला असेच म्हणावे लागेल.. आत परतीचा प्रवास चालू झाला आहे बघू कसे काय होते ते इथंही टीका होईल नाही असे नाही.. चौकशी अयोग्य नेमले जातील .."अर्थव्यवस्थेचे पुढे काय" यावर दावे उजवे मतभेद तीव्रतेने पुढे येतील.. परंतु या काळात फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेणे हा एकमेव अजेंडा येथे ना विरोधकांनी ना सरकारने राबवला उलट हुजूर भांडवशाही सरकारला मजूर समाजवादी विचहरसरणीचे काही निर्णय घयावे लागले ...

या पुढे काही कालावधी साठी करोनासहच जगायचे आहे. म्हणूनच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे अतिशय आवश्यक आहे. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

एक डॉक्टर या दृष्टिकोनातून लिहिलेले (आणि एक नागरिक म्हणूनही लिहिलेले) लेखातले तुमचे अनुभव वाचताना छान वाटलं. लेख आवडला. धन्यवाद.